ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, November 12, 2012

१४१. हे अरुणाचल ....

हे अरुणाचल! माझ्या घरात प्रवेश करून आणि मला आकर्षित करून तू मला आपल्या हृदयगुहेत कैदी का बनवून ठेवले आहेस?
हे अरुणाचल! तू स्वत:च्या आनंदासाठी माझे हृदय जिंकले आहेस? की माझ्यासाठी? आता जर तू माझा त्याग केलास, तर सारे जग तुलाच दोष देईल!
हे अरुणाचल! मला वारंवार तुझी आठवण का येते आहे? मी आता तुला विसरूच शकत नाही ...
***
अरुणाचल हे नाव उच्चारताक्षणी त्या दिवसापर्यंत बर्फाच्छादित शिखरांशी लपंडाव खेळणा-या लोहितचे आणि हिरव्यागर्द जंगलांचं चित्र डोळ्यांसमोर तरळून जायचं. पण त्या दिवशी मी आणखी एका अरुणाचलला भेटून आले होते. इथं नदी नव्हती, फारसं घनदाट जंगलही नव्हतं. तरीही मन गुंतवून ठेवणारं, विस्मयचकित करून टाकणारं खास काहीतरी याही अरुणाचलात होतं! स्वाभाविकच आहे म्हणा! अभिमानाने मिरवण्याजोगी एक खूण या अरुणाचलाजवळ आहेच मुळी!! ती म्हणजे रमण महर्षींची आठवण. त्यांच्या सान्निध्यामुळे की काय, अरुणाचल अधिकच विनम्र आणि भव्य वाटतो. भव्य असूनही भयप्रद न वाटता आपलासा वाटतो.
या अरुणाचलची जुजुबी ओळख होऊन तशी बरीच वर्ष उलटली होती. पॉल ब्रन्टनच्या A Search in Secret India या पुस्तकात रमण महर्षी आणि अरुणाचल हे दोन्ही पहिल्यांदा भेटले. रमण महर्षी यांच्या मौनातच माझे सारे प्रश्न नाहीसे होऊन मला मानसिक शांती मिळाली अशा आशयाचे ब्रन्टन महोदायांचे विधान वाचून गंमत वाटली होती मला. पण त्याचा फारसा कीस काढायच्या फंदात मी तेव्हा पडले नव्हते.
अशीच आणखी काही वर्ष गेली. दरम्यान दक्षिण दौरा करून आलेल्या काही लोकांकडून तिरुवण्णामलैचे गुणगान कानी पडायचे. त्यामुळे अरुणाचलबद्दलचं माझं कुतूहल जागृत झालं. रमण महर्षीचं चरित्र मी याच काळात वाचलं. अशक्यप्राय स्वप्नं पाहण्याच्या माझ्या सवयीने अरुणाचल भेटीचं स्वप्न जागं ठेवलं.
त्यावर्षी एका मैत्रिणीने पॉन्डिचेरी भेटीचा बेत आखला. मीही गेले. पॉन्डिचेरीचा समुद्रकिनारा मला फारच आवडला. सकाळ-संध्याकाळ तिथं निवांत आनंदात जायची. अशातच एक दिवस रमणाश्रमात जाऊ यात काय? अशी विचारणा झाली. मी तयारच होते. भेटीची आखणी आणि तयारी बाकीच्यांनी केली. मी मात्र पॉन्डिचेरी पर्यटन विकास महामंडळात जा, नकाशे गोळा कर, ग्रंथालयात बसून संदर्भ पाहा .. अशी निरर्थक कामं नेहमीप्रमाणे केली.
पहाटे पाच वाजता आमचा प्रवास सुरु झाला. काळोखात फारसं काही दिसत नव्हतंच आधी पण रविराजाच्या आगमनाने सारं चित्र बदललं. दूरपर्यंत दिसणारी वळणावळणाची काळीशार सडक, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुलणारी हिरवळ, निळसर आकाश मधेच झाकोळून टाकणारे ढग, अंगावर झेपावणारा वारा ...या सगळ्याचं सुख अनुभवत  प्रवास झाला.
वाटेत दुरून जिंजी किल्ल्याचे अवशेष दिसले. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर येऊन गेले आहेत म्हणून त्याला भेट द्यायची इच्छा होती – पण तेवढा वेळ हातात नव्हता. आणि बसने प्रवास करत असल्याने ‘पाहिजे तिथं’ थांबायची चैन आम्ही करू शकत नव्हतो. थोड्या वेळातच ‘तिरुवण्णामलै’ अशी पाटी दिसली आणि मी सावरून बसले.
अरुणाचलाचं पहिलं दर्शन मोठ ओबडधोबड आणि रखरखीत होतं. पाषाणखंड प्रचंड मोठे होते. निसर्गाच्या या रुद्र आणि काहीशा रुक्ष रुपाने मी बावरून गेले. इथं ना डेरेदार वृक्ष दिसत होते ना खळाणणारे झरे! ‘इतक्या कोरड्या आणि उजाड डोंगराचं माहात्म्य स्थानिक लोकांना कां वाटत असेल’ – असा प्रश्न माझ्या मनात नकळत आलाच.
पण या अरुणाचलाची महती फार प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणात याला ‘विश्वाचे हृदय’ म्हटलं गेलं आहे. ब्रह्माण्ड आणि वायू पुराणांत कैलासाच्या पश्चिमेस असणा-या पर्वताचे असेच वर्णन आहे. अनेक संतांनी इथं तपश्चर्या केली असं लोक मानतात. रमण महर्षीही अरुणाचलास अत्यंत पवित्र स्थान मानत. अरुणाचलाच्या सान्निध्यात अखंड शांतीचा स्रोत आपल्यालाही स्पर्श करून जातो असा अनेक लोकांचा अनुभव आहे- माझाही आहे. यात वास्तव किती आणि श्रद्धा किती हा चर्चेचा आणि वादाचा विषय असू शकतो हे मला माहिती आहे.  
या पर्वताबद्दल एक पौराणिक कथा आहे – जी मला अतिशय आवडली. एकदा ब्रम्हा आणि विष्णू यांच्यात ‘सर्वश्रेष्ठ कोण’ असा वाद सुरु झाला. दोन मानवी सत्ताधीश भांडायला लागले तर काय होतं, याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे. हे तर साक्षात देवांचं भांडण! साहजिकच पृथ्वीवर अराजक माजलं. सृष्टी लयाला जाते की काय अशी वेळ आली. इतर देवतांनी मग शिवशंकरांना ‘यातून मार्ग काढा’ असं साकडं घातलं.
मग शिव स्वत: एका प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. या स्तंभाचा आदि अथवा अंत जो जाणेल तोच खरा श्रेष्ठ अशी आकाशवाणी झाली. विष्णूने वराहरूप धारण केलं आणि प्रकाशस्तंभाचा उगम शोधण्यासाठी जमीन खणायला सुरुवात केली. ब्रह्माने राजहंसरूपात आकाशात भरारी घेतली – प्रकाशस्तंभाचा अंत शोधण्यासाठी. पण ब्रह्माने थोडी लबाडी केली (देव कसा लबाडी करेल हा प्रश्न गैरलागू आहे!).एका पर्वतशिखराच्या वृक्षावरून पडणारं फूल त्याने आणलं आणि ‘ते प्रकाशस्तंभाच्या शिखरावरून आणलं आहे’ असं खोटंचं सांगितलं. विष्णू मात्र परमप्रकाशाच्या साक्षात्काराने नम्र होऊन परत आला. यातून विष्णूचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं. विष्णू म्हणजे अहं(कार), ब्रह्मा म्हणजे मन आणि शिव म्हणजे आत्मा असं लक्षात घेतलं की या कथेचा आशय अधिक अर्थपूर्ण होतो. या कथेतला प्रकाशस्तंभ म्हणजे आजचा अरुणाचल अशी परंपरागत धारणा आहे.
रमणाश्रमाच्या दिशेनं जाताना डाव्या बाजूला एक भव्य मंदिर दिसलं. हेच ते अरुणाचलेश्वराचे मंदिर – ज्यात तेजोरूप शिवलिंग आहे. हे मंदिर विजयनगरच्या कृष्णदेवरायाने सोळाव्या शतकात बांधलं आहे. याचा विस्तार थोडाथोडका नाही तर पंचवीस एकर आहे. चारी दिशांना गोपुरं आहेत. मुख्य गोपूर बारा मजल्यांचे असून त्याची उंची दोनशे फुटांहून जास्त आहे. अरुणाचलावरील स्कन्दाश्रमातून या मंदिराचं दृश्य फार मनोहर दिसतं. दगडात कसला आला आहे देव? हा प्रश्न या मंदिराच्या दर्शनाने मला अर्थहीन वाटू लागला. अशा प्राचीन मंदिरांचा आपल्याशी नि:शब्द संबाद होतो, तेव्हा मानवी प्रवासाचा, त्यांच्या आशा-आकाक्षांचा एक रस्ता थोडासा दिसतो – निदान दिसल्याचा भास मला तरी झाला. या मुक्या मंदिरांच्या निश्चलतेआड एका सामाजिक कालखंडाचा जिताजागता इतिहास आहे ही जाणीव मनाला विलक्षण स्थितीत नेते. अर्थात माझ्याबरोबरच्या लोकांना इतिहासात फारसा रस नव्हता – त्यामुळे थोड्यात समाधान मानून घ्यावं लागलं मला.
पर्यटन संस्कृतीच्या प्रभावामुळे रमणाश्रमात पाहण्यासारखं काय आहे? असा प्रश्न लोक हमखास विचारतात. रमणाश्रमात कसलाही चकचकाट नाही, श्रीमंती बडेजाव नाही, फार कसली औपचारिकता नाही .. आहे ती फक्त शांतता. आणि स्मशानशांतता नाही तर आनंदी शांतता. निदान मला तरी असंच दिसलं!
आश्रमाच्या एका कोप-यातून मोराचा आवाज आला. आम्ही लगोलग तिकडं मोर्चा वळवला. एक-दोन नाही तर पंचवीस-तीस मोर होते. आमची चाहूल लागताच काही दूर निघून गेले, तर काही आमच्याकडे दुर्लक्ष करत तिथंच रेंगाळले. पण नृत्य करायचं मात्र कुणीच मनावर घेतलं नाही म्हणून माझी निराशा झाली. जगात प्रत्येक गोष्ट ‘मेड टू ऑर्डर मिळणार नाही आपल्याला याचं भान पुन्हा एकदा आलं! आमच्या सोबत गाय-वासरांची फौजही होती. एका वासराला मी जरासं थोपटलं तर दुसरंही माझ्याजवळ आलं – थोपटून घायला! रमणमहर्षी यांच्या प्राणीप्रेमाच्या अनेक कथा आधी वाचल्या होत्या. जेवणाची वेळ झाल्यावर पातेली भरभरून अन्न आधी प्राण्यांसाठी जाताना पाहून त्या कथा ख-या असाव्यात असं वाटलं.
महर्षींचं शेवटचं वास्तव्य ज्या सभागृहात होतं, तिथं आम्ही गेलो. त्या छोट्याशा सभागृहाला आता ध्यानकक्षाचे रूप प्राप्त झालं आहे. आत जाताच रमणांच्या भव्य चित्राने नजर खेचून घेतली. त्यांच्या डोळ्यांतला शांत आणि आश्वासक भाव; चेह-यावरची किंचित करुणेची छटा; आधार देणारे स्मितहास्य ....ते चित्र इतकं जिवंत आहे की वाटतं आता पुढल्या क्षणी महर्षी आपल्याशी बोलतील, आपल्याला आशीर्वाद देतील, काही सांगतील ... (या अनुभवावर लिहिलेला एक संवाद इथं आहे) .माझ्यासारख्या अश्रद्ध व्यक्तीलाही नतमस्तक करण्याचं सामर्थ्य त्या चित्रात आहे असं मी म्हणू शकते अनुभवानं!! महर्षीनी वापरलेल्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. आजकाल पंचतारांकित संस्कृतीचे अनेक साधु-संत पहायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर रमणांचा साधेपणा विलक्षण चकित करून गेला मला.
अरुणाचलाच्या माथ्यापर्यंत चढत जायचा माझा विचार होता. पण आश्रमाच्या लोकांनी फक्त ‘स्कन्दाश्रमापर्यंत जाऊन या, पुढे निर्मनुष्य भागात आज जाऊ नका अशी कळकळीने विनंती केली. त्या डोंगरावर त्या दरम्यान स्त्रियांशी गैरव्यवहाराच्या काही घटना घडल्या होत्या हे कळल्यावर (आणि आम्ही सगळ्या स्त्रियाच होतो म्हणून) मी माझा हट्ट सोडून दिला. अनेक भक्त मंडळी जातात तिथवर मिळून ठराविक दिवशी – पण त्या दिवसापर्यंत मी काही तिथं असणार नव्हते.
स्कन्दाश्रम ही अरुणाचलाच्या कुशीत वसलेली एक छोटीशी गुहाच आहे खरं तर. तिथं आता बांधकाम केलेलं आहे. रमणांनी इथं काही काळ राहून साधना केली होती. डोंगरातून एक झरा इथवर येतो त्यामुळे गुहेत एकदम मस्त थंड वाटतं. इथं आम्ही बराच वेळ नुसतेच निवांत, काहीही न बोलता बसून होतो. इथल्या वातावरणाचा प्रभावच आहे तसा.
रमण महर्षींचं तत्त्वज्ञान आणि उपदेश अद्वैत वेदांताला अनुसरणारा आहे. आत्मसाक्षात्कार हेच रमणांच्या मते मानवी जीवनाचं ध्येय आहे – असायला हवं.  ‘या साक्षात्कारासाठी गुरुकृपा आवश्यक आहे’ असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.  कृपा असतेच, ती घेण्याची आपली पुरेशी क्षमता हवीअशी मिस्कील पण कठोर आठवणही ते आपल्याला करून देतात. उपदेश देण्याची महर्षींची पद्धत वरवर साधीसोपी वाटली तरी अतिशय गूढ आणि सखोल होती असं दिसतं. आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी संन्यासच घेतला पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता. महर्षींचं स्वत:चं जीवन अतिशय अद्भूत आणि अविश्वसनीय आहे. अशी माणसं आजही असतात याचं नवल वाटतं.
***
अरुणाचलावरून परतताना संध्याकाळ झाली. पाहता पाहता ‘नभ मेघांनी आक्रमिले’ आणि झिम्मड पाउस कोसळायला लागला. त्या सरींनी हातभर अंतरावरचं काही पाहणंही अशक्य करून टाकलं. काळोखाची झूल मग आसमंतावर पसरत गेली. क्षणाक्षणाला मी पाठ फिरवून जणू अरुणाचलापासून दूर चालले होते.
डोळ्यांसमोर मात्र त्याचंच रूप होतं आणि मनात महर्षींचे शब्द:
हे अरुणाचल! काय, तू मला आत नाही बोलावलेस? पण मी तर आत येऊन चुकलो आहे. माझ्या रक्षणाचा भार आता तुझ्यावरच आहे!
हे अरुणाचल! माझे मन इतस्तत: भटकू नये म्हणून तू सदैव माझ्या मनात विराजमान रहा ...
हे अरुणाचल! हे अरुणाचल!

8 comments:

  1. छान. जायला हवं एकदा तिकडे!

    ReplyDelete
  2. अनामिक/का, जरूर जा. रमणाश्रमाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती आहे. लेखात दुवा आहे संकेतस्थळाचा.

    ReplyDelete
  3. Happy Deepavali !
    Thanks for the blog on Tiruannamallai & Raman Ashram and off course Arunachala..
    I have been passing through Tiruannamallai temple on may occasions.Looking to the spread of the temple and its Gopura's I wanted to make special visit to it by planning not a via journey. And we did it few months back.It is an awesum experience to take Parikrama with in temple.Your narration reminded me all details and various stories.
    Raman ashram :The large number of foreigners and Ashram devotees is another bright side of the Tiruannamallai. I am yet to visit the ashram.
    After reading your note I feel this too has to be special visit and not on way sight seeing visit.
    Complements for the beautiful write up
    With best wishes
    RKM

    ReplyDelete
  4. RKM सर,
    तुम्ही जाऊन या आणि लिहा रमणाश्रमाबद्दल - मला वाचायला आवडेल ते. मंदिराबद्दल तुम्ही आधीच काही लिहिलंय कां?
    कौतुकाच्या शब्दांबद्दल आभारी आहे.

    ReplyDelete
  5. श्रीराज, बेत ठरवा एका सुट्टीत :-)

    ReplyDelete
  6. अरुणाचल ला जायचे आहेच. बघू कधी साधतेय ते. यावेळच्या भेटीत सिक्कीम झालेय आता पुढल्यावेळी दिल्ली आणि जवळपास काही ठरवायला हवे. :)

    ReplyDelete
  7. भाग्यश्री, ठरवून टाक पुढचा बेत :-)

    ReplyDelete