ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, May 28, 2010

२९. प्रयाग: भाग २

प्राचीन काळी प्रयाग ’तीर्थराज प्रयाग’ या नावाने ओळखले जायचे. भरद्वाज मुनींचा आश्रम या संगमाच्या काठी होता. वनवास काळात राम, लक्ष्मण आणि सीता या आश्रमात मुनींच्या दर्शनाला आले होते असा रामायणात उल्लेख आहे. ययातिकन्या माधवीशी गालव मुनींनी येथेच विवाह केला होता. रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, वामनपुराण, पद्मपुराण, शिवपुराण, कूर्मपुराण, ब्रह्मपुराण अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये प्रयागचा उल्लेख आहे. भक्त प्रल्हादाने येथील संगमात स्नान केले होते असे भाविक मानतात. जैनांचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ स्वामींनी याच ठिकाणी तप करून कैवल्यद्न्यान प्राप्त करून घेतले होते असेही मानले जाते.

प्रयागसंबंधीचे अनेक उल्लेख ऐतिहासिक काळातही आढळतात. यमुनातीरीचा किल्ला सम्राट अशोकाने बांधलेला आहे. समुद्रगुप्ताचा ’प्रयाग प्रशस्ती’ शिलालेख प्रसिद्ध आहे. चिनी प्रवासी ह्युएन्संगने इसवी सन ६४३ मध्ये प्रयाग नगरीत सम्राट हर्षवर्धनची भेट घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

इलाहाबाद ही उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आधुनिक काळात इलाहाबादने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल आणि जवाहरलाल नेहरू, पुरूषोत्तमदास टंडन, सर तेजबहादूर सप्रू, चंद्रशेखर आजाद असे अनेक धुरंधर नेते दिले आहेत. तर साहित्याच्या दरबारात पंडित रामनरेश त्रिपाठी, श्रीमती महादेवी वर्मा, श्री. सुमित्रानंदन पंत, पंडित सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन अशी अनेक रत्ने सादर केली आहेत.

या थोर व्यक्तिमत्त्वांचा परिणाम म्हणून की काय, पण प्रयागमध्ये मला भेटलेले सर्व तरूण आणि तरूणी एकतर राजकीय कार्यकर्ते तरी होते किंवा कवी तरी होते. चर्चेचे, गप्पांचे विषय दोनच – राजकारण आणि साहित्य. अयोध्येसारखा भावनिक आणि स्फोटक विषय मी जाणीवपूर्वक टाळत होते पण ’आज सकाळच्या जेवणासाठी कोणती भाजी करायची?’ या साध्या प्रश्नाची सांगताही राजकीय विचारांनी अथवा कवितेने व्हायची. जीवनातल्या कोणत्याही समस्येवर उत्तरे दोनच – एक म्हणजे राजकीय व्यवस्था बदला; किंवा चांगल साहित्य लिहून जनमत परिवर्तन घडवून आणा! चर्चेला मी सोडून कोणीच कंटाळायचं नाही. इतक्या थकवा आणणा-या चर्चा फक्त पुणेकरच करतात असा माझा तोवरचा अनुभव होता. पण प्रयागकर पुणेकरांपुढे सहजासहजी हार मानणार नाहीत अशी माझी तेंव्हा खात्री पटली होती.

उत्तर भारतात हिंडताना महाराष्ट्र प्रगतीशील असल्याचा एरवी पोकळ वाटणारा दावा खरा वाटायला लागतो. सामाजिक शिस्त, सामाजिक जबाबदारी हे शब्द आपण येथे बोलतो तरी! माझ असलं बोलंण प्रयागच्या मुलामुलींना अगदी विनोदी वाटायच. परतीच्या प्रवासाला मी निघाले तेंव्हा रेल्वे स्थानकावर मला निरोप द्यायला आलेल्यांना मी ’प्लटफार्म तिकिट काढू तुमची’ असं सुचवताच एखाद्या गावंढळ माणसाला हसावं तसे सगळे मला हसले. “आमचं एवढं मोठं टोळकं पाहून हिंमतच नाही व्हायची कोणाला तिकीट विचारायची" असं त्यांनी मला स्वच्छपणे सांगितलं! त्यांच्या सांगण्यात काही साहसाची झलक नव्हती, होता सहज स्वाभाविकपणा!

बांदा जिल्ह्यातून प्रवास करताना माणसांचं एक वेगळं दर्शन घडलं. ठिकठिकाणी लोक खांद्यांवर बंदूक घेऊन हिंडत होते. मला तर आधी सैनिक किंवा पोलीस गणवेषात का नाहीत हे कळेना. एका सहप्रवाशाला विचारल्यावर ’पोलिसाबिलिसांवर आमचा विश्वास नाही, इकडे आपल रक्षण आपणच करायच असतं’ अशी त्याने माहिती दिली. ’आम्ही तिकीट काढणार नाही. एखाद्या दिवसाची गोष्ट वेगळी, आम्ही रोज शाळेत जातो ते शिकायला. तेथे काही आम्हाला पैसे मिळत नाहीत, मग आम्ही कुठून द्यायचे?” असली शाळकरी मुलांची गुंडगिरी कोणालाच खुपत नव्हती. वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या गाठीशी इतका अनुभव होता!

प्रशासनव्यवस्थेवरचा लोकांचा अविश्वास लक्षात येण्याजोगा होता. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचा आपण तोरा तर मिरवतो, पण त्या लोकशाहीची खरी अवस्था काय आहे? लोकशाही म्हणजे फक्त आमदारकी, खासदारकी, महामंडळांची अध्यक्षपदे, मंत्रीपद, गाडया, बंगले, चैन! आणि मतदारांच्या दृष्टीनेही आपल्या पुढा-याकडून गैरमार्गाने आपापली कामे करून घेण्याचा परवाना! प्रशासनव्यवस्थेची स्थिरता, तिची विश्वासार्हता, तिची कार्यक्षमता, यांचे महत्त्व कोणालाच – अगदी जनता जनार्दनालाही नाही! एका प्रसंगी आमची बस ’चक्का जाम’मुळे बराच वेळ थांबून होती. त्यावेळी प्रवासी आपापसात गप्पा मारत होते. कशावरून तरी संजय दत्तचा विषय निघाला. एक तरूण म्हणाला, “ हे मराठी लोक जरा जास्तच संवेदनशील आहेत. एक एके ५६ मिळाली तर त्याला टाडा लावून तुरूंगात ठेवलय त्यांनी! त्या लोकांना इकडे आपल्याकडे येऊन बघा म्हणावं! घरोघरी एके ५६ आणि ५७ मिळतील. टाडा लावता लावता पळापळ होईल मराठी लोकांची!” त्यावर बसमधले सगळे लोक मनापासून हसले. तो संवाद ऐकताना माझ्या हृदयाचा एक ठोका नक्कीच चुकल होता!

याचा अर्थ उत्तर प्रदेशात सगळं काही वाईट आहे आणि महाराष्ट्रात सगळं काही आलबेल आहे, असा मात्र मुळीच नाही. सगळ्याच समाजांमध्ये, सर्वच काळात चांगल्या आणि वाईट गोष्टी बरोबरीने, अगदी हातात हात घालून नांदत असतात. महाराष्ट्रात गुंडगिरी, दहशतवाद नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. पण आपण आपल्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित जागा शोधलेली असते, आणि इतरांनीही ती शोधली असेल हे आपण गृहित धरतो. आपली जागा सोडली की दुसरी बाजू दिसायला लागते. प्रवासात असे प्रसंग वारंवार येतात!

प्रयागमधल्या माणसांची खरी ताकद प्रयागच्या ऐतिहासिक महत्त्वात आणि इलाहाबाद विश्वविद्यालयात दडलेली आहे. अगदी सामान्य माणूसही या दोन विषयांवर भरभरून बोलतो. प्रयागची थंडी आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ तूप खाणं हा एक अस्सल ’गावरान’ अनुभव होता. तेथील सांस्कृतिक चर्चासत्रांचे केंद्र असणा-या ’काफी हाऊस’ ला भेट देणे मात्र जमले नाही वेळेअभावी.

प्रयागला परत येण्यासाठी म्हणून तिथल्या मित्रमंडळींनी अर्धकुंभमेळ्याचे दिलेले आमंत्रण अजूनही तसे बाकी आहे. आठवणींच्या कप्प्यातले ते प्रयाग आता मला भेटत नाही. मागच्या दहा वर्षांत किमान पंचवीस वेळा प्रयागला जाणे झाले. पण आता मला वेगळेच प्रयाग दिसते, भेटते. मी बदलेले तशीच प्रयागही तर बदलणारच जगण्याच्या ओघात!

Sunday, May 23, 2010

२८. प्रयाग: भाग १

प्रयागला मी पहिल्यांदा १९९२ मध्ये गेले तेंव्हाची ही गोष्ट! त्यानंतर अनेकदा या शहरात जाण्याची, तेथे राहण्याची संधी मला मिळाली. पण तो पहिला अनुभव अजूनही मनात आहे......त्यावेळी लिहिलेली काही पाने परवा अचानक सापडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या......

पूर्वी लोक तीर्थयात्रेला जायचे तेंव्हा म्हणे ’परत येऊ की नाही’ या आशंकेने आपल्या मागची सगळी तरतूद करून जायचे. स्वाभाविकच होतं ते! आजकाल परिस्थिती बदलली आहे, असं आपलं आपण म्हणतो! पण प्रत्यक्षात प्रवासाला निघालं की ’सा-याच बदलांना प्रगती मानू नये’ असा साक्षात्कार चडफडत का होईना पण होतोच!

गाडी ’ऊशीराने’ - ( हा खास मध्य रेल्वेचा शब्दप्रयोग!) धावत असल्याने आत्ताच्या वेळेचं काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पहाटे निघायचं म्हणून मैत्रिणीने दुपारच्या जेवणाचा डबा सोबत दिला होता, तो दादर स्थानकात संपवला मी. बसल्या बसल्या झोप काढत असताना दुपारी कधीतरी माझा प्रवास सुरू झाला.

सहप्रवाशांशी बोलताना अलाहाबादला इलाहाबाद आणि खरं तर प्रयाग म्हणायचं असतं अशी माहितीत भर पडली. गंगा आणि यमुनेचा एकेरी उल्लेख करणं म्हणजे तर ’शांतं पापम!!’ ’गंगाजीके दर्शन हररोज सुबह करोगे ना बेटा?” असं एका बाईंनी मला विचारल्यावर मी जरा घाबरलेच! नदी म्हणजे निव्वळ H2O असं समजण्याइतकी मी टोकाची तर्कनिष्ठ नाही. मलाही नदी आवडते. पण नदीच दर्शन? डिसेंबरच्या थंडीत? पहाटे? जास्तच होती नुसती कल्पनाही. पण वाराणसीला ’गंगामय्या’ पाहताना ’दर्शन’ हाच शब्द मनात आला. पण ती पुढची गोष्ट झाली!

प्रयागला मी पोचले, तेंव्हा संध्याकाळचे फक्त साडेपाच झाले होते, पण अंधार असा की जणू रात्रीचे आठ वाजलेत! रस्ते अगदी सूनसान. थंडीचा पहिला झटका आधी जाणवला आणि मग प्रयागच्या आतिथ्याची झलक!

’केल्याने देशाटन’ माणूस शहाणा होतो म्हणतात. आजकाल माहितीचा इतका भडिमार आपल्यावर होत असतो की, जणू आपल्याला सगळ माहिती आहेच असं आपल्याला वाटायला लागतं! पण आपल्या देशाच्या विशालतेची, भव्यतेची खरी जाणीव प्रवासात होते. इतके दिवस अलाहाबाद आणि पंडित नेहरू एवढ एकच समीकरण डोक्यात होतं. पण जगदगुरू शंकराचार्यांनी ज्या पूर्वमीमांसकाचे श्रध्दापूर्वक दर्शन केले ते कुमारिल भट्ट प्रयागनिवासी होते हे येथे पोचल्यावरच लक्षात आलं.

मला प्रवास करायला आवडतं ते वेगवेगळी माणसं भेटतात म्हणून. बाकी निर्जीव ठिकाणं पाहण्यात मला काही रस नसतो. प्रयागच्या लोकांबरोबर हिंडताना त्यांचा एक वेगळा पैलू जाणवला- तो म्हणजे ते कोणतीही बाब निर्जीव मानत नाहीत. सिंहगडावर जाऊन तानाजीची समाधी न पाहताच परत येणारे अनेक लोक मला माहिती आहेत. ’त्यात काय पाहायचं? समाधीसारखी समाधी असणार..” हे तुम्हीही ऐकलं असेल वाक्य! पण प्रयागमध्ये माणसं त्या त्या स्थानाशी मनाने जोडली गेली आहेत असं वाटतं. ’ब्रह्माने या ठिकाणी १०० अश्वमेध केल्याची’ माहिती ते मला अशा थाटात सांगत होते, की ते जणू त्याचे एक यजमान होते! गंमत वाटली मला.

प्रयागमधील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे अर्थातच त्रिवेणी संगम! गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी एकमेकींना भेटतात! सरस्वती तुम्हा आम्हाला दिसत नाही, पण ती असते .. सूक्ष्म, अदृष्य पण प्रवाही...पहिल्या दिवशी काही वेळ यमुनेवर जाऊन बसलो होतो. विस्तीर्ण पण गलिच्छ घाट, पिण्डदानासाठी, श्राद्धासाठी तेथे जमलेले लोक, .. जणू मृत्यूच सर्वव्यापी होता.. ते दृष्य पाहून मन काहीसं उदास झालं. नंतर एक दोन वेळा चालण्याच्या हौसेपायी, तर कधी चक्का जाम म्हणून रात्री यमुनेच्या काठी भटकलो. रात्रीच्या अंधारात मात्र यमुना सौम्य, स्नेहमयी वाटली. खट्याळ श्रीकृष्णाच्या बालक्रीडांच गुपित तिच्याजवळ आहे याची जाणीव काळॊखात तिचा आवाज ऐकताना झाली.

प्रथमदर्शनी गंगेने मात्र माझा भ्रमनिरास केला. विस्तीर्ण वाळवंटात दूरवर एक इवलीशी जलधारा दिसत होती. ती गंगा, यावर माझा विश्वास बसेना. कदाचित गंगेबद्दल माझ्या अपेक्षाच अवास्तव होत्या. ऐकून, वाचून – विशेषत: आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले गंगास्तोत्र वाचून मी केलेली अपेक्षा अगदीच फोल ठरली. मागे एकदा पानशेत धरण पाहायला गेले होते तेंव्हा आणि गोहत्तीला ब्रह्मपुत्रेचं ’दर्शन’ घ्यायला गेले तेंव्हाही माझी अशीच फसगत झाली होती. माझ्या मनातले भाव मला लपवून ठेवता आले नाहीत. कारण माझ्याबरोबरचे लोक पावसाळ्यात गंगेला किती पाणी असतं, त्याच पुन:पुन्हा वर्णन करत होते.

गंगा ही नदी मोठी मजेदार आहे. मला ती भारतीय जीवनशैलीची, संस्कृतीची प्रतिनिधी वाटते. दोन्ही गोष्टींची आपण थोरवी ऐकलेली असते, पण प्रत्यक्षात आपल्याला पहिल्यांदा दिसते ती त्यातली घाणच! गंगेबाबतही मला तोच अनुभव आला. पाणी इतक घाण होतं, की त्यात हात काय पायही घालावेसे वाटले नाहीत. चिकाटीने मागोवा घेत राहिलं, की भारतातल्या चांगल्या गोष्टीही दिसायला लागतात, मन त्यामुळे भारावून जातं! गंगेला एक सूक्ष्म नाद आहे, तिला एक विशिष्ट गंध आहे. तिच्या काठचा वारा इतका सुखद आहे, की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. माणूस हळूहळू गंगेच्या प्रेमात पडतो. ’नाहं जाने तव महिमानम, पाहि कृपामयी मामद्न्यानम’ या शंकराचार्यांच्या ओळी मी नकळत तोवर गुणगुणायला लागले होते. गंगेचा महिमा असा अपार आहेच.

गंगा यमुनेच्या संगमावर नावेत बसून जाताना उगीच भव्य दिव्य काहीतरी वाटलं मला. कोणी म्हणेल, त्यात काय एवढं? नद्यांसारख्या नद्या. पण त्या दोन्ही नद्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा, शेकडॊ- हजारॊ वर्षे चालत आलेल्या त्यांच्याविषयीच्या कथांचा मनावर प्रभाव पडतो. गंगेचं पाणी गढूळ, काहीस घाण दिसणारं, हलक्या लाटांचं! आणि यमुना भव्य, काळीशार, मोठया लाटांची! त्यांच्या मीलनाचा तो क्षण चिरंतन आणि अविरत....कुठे तक्रार नाही, समर्पणाचा अविर्भाव नाही.. त्या संगमात स्नान करणारे असंख्य लोक, त्यांच्या आसपास उडणारे अगणित पांढरेशुभ्र बगळे... रमणीय दृष्य होत ते! या ठिकाणी मान्यतेनुसार यमुनेच अस्तित्त्व संपतं, आता ती गंगाच आहे. गंगा सगळ्यांना आपल्यात सामावून घेते, गंगेचं रूप देते. द्वैत संपून हा अद्वैताच्या प्रवासाचा शुभारंभ! म्हणून भारतीय संस्कृतीने इतक महत्त्व दिल का गंगेला?
भाग २ लवकरच...