ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, December 31, 2012

१४५. क्षुल्लक

दिल्लीत परतल्यापासून जंतर-मंतर, इंडिया गेट इथल्या निदर्शनात सामील व्हायची संधी मिळत नव्हती. म्हणजे रोज काही ना काही घडत होतं तिथं; पण संचारबंदी लागू असल्याने आणि त्याहीपेक्षा दहा मेट्रो स्थानकं बंद असल्याने मी तिथवर पोचू शकले नव्हते.


आज मात्र गेले. जंतर-मंतरला. आजपर्यंत मी या ठिकाणी गेले आहे ती अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं. तेव्हा भरपूर गर्दी असायची. आज तितकी नव्हती. ते स्वाभाविकच. सोमवार संध्याकाळ किती लोकांना मोकळी असणार? निळ्या गणवेशातले 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स'चे  लोक होते पण कमी होते तेही. सुरक्षा तपासणी नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे गट बसले होते. एका गटात दोन पुरुष गेले आठ दिवस उपोषण करत आहेत तिथं मेणबत्त्या लावलेल्या होत्या बरेचजण बसून घोषणा देत होते. त्यात पुरुषांचा सहभाग चांगला दिसत होता. देश का युवा जाग गया, राहुल गांधी भाग गया ही एक नवी घोषणा ऐकायला मिळाली.


दुसरा एक गट अनेक ट्यूबलाईट घेऊन बसला होता . त्यावर लोक मार्करने सह्या करत होते, संदेश लिहित होते. दोन-तीन लोक होते तिथं. दुस-या एका गटात आठ दहा स्त्रिया आणि दोन पुरुष उभे राहून घोषणा देत होते. बलात्कार करणा-यांना फाशी द्या ही त्यांची मुख्य मागणी होती. एका गटात शहर कुणाचं अशा आशयाचं एक गीत चालू होतं. एका ठिकाणी कागदावर संदेश लिहून तिथं मेणबत्त्या ठेवल्या होत्या. दोन मुली बसल्या होत्या तिथं. एक मुलगी एकटीच  न्याय मिळाल्याविना नव्या वर्षाचा आनंद होणार नाही असा फलक हातात घेऊन एकटीच बसली होती. तिचा चेहरा अतिशय विदीर्ण दिसत होता. आणखी एका गटात बरीच जास्त गर्दी होती, मेणबत्त्याही जास्त होत्या. तिथं काहीतरी धार्मिक वाटावा असा विधी चालला होता.


त्या विधींकडे मी पाहतच होते तेवढ्या माझ्या पाठीवर हात पडला. स्वेटर, जीन्स, गळ्यात मफलर अशी एक तिशीची स्त्री होती. तुम्ही निदर्शनात सहभागी व्हायला आलात का? तिनं मला विचारलं.
हो, मी सांगितलं.
माझ्याबरोबर पाच मिनिटं याल? ती स्त्री.

मला काही कळेना. कुठं जायचं? कशासाठी?

ती म्हणाली मी ----- वाहिनीची आहे (नाव सांगत नाही, सगळ्या वाहिन्या सारख्याच, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं!). आमचा आत्ता पाच वाजता लाईव्ह शो आहे. तुम्ही प्रतिक्रिया द्याल का? प्लीज..

या ठिकाणी वाहिन्यांचे कॅमेरे अगणित होते. नेहमीच असतात. पण मी त्यांच्यापासून नेहमी लांब राहते. परिवहन मंडळाच्या बसस्थानकावर प्रवासी शोधत जसे खासगी जीपवाले फिरतात तसे पत्रकार फिरत असतील याची मात्र मी कधी कल्पना केली नव्हती. मला जरा हसू आलं पण मी नकार दिला.

ती म्हणाली, या बलात्काराच्या घटनेत एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे?
ही काही एका क्षणाची घटना नव्हती. स्व-संरक्षणार्थ अथवा भीतीतून हे कृत्य घडलेलं नाही. त्या मुलाने जे क्रौर्य केलं त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. ते घृणास्पद कृत्य करताना तो लहान नव्हता मग शिक्षेच्या वेळीच कसा लहान? मी उत्तर दिलं.

अगदी हेच हवं आहे मला, ती पत्रकार स्त्री म्हणाली. बालगुन्हेगार कायद्यात बदल -याच विषयावर आमचा शो आहे.
अहो, पण मला कायद्याची काही माहिती नाही. इथं पुष्कळ अभ्यासक कार्यकर्ते असतील, त्यांची तुम्हाला जास्त मदत होईल, मी काढता पाय घेत म्हणाले.
छे! मी जास्त काही विचारणार नाहीच. तुम्ही आत्ता जे वाक्य बोललात ना तेच फक्त बोला, मी माईक धरणारच नाही तुमच्यापुढे त्याहून जास्त. ती अजीजीने म्हणाली.

माझे काही मित्र-मैत्रिणी पत्रकार आहेत. त्यांना बिचा-यांना अशीच अजीजी करावी लागत असेल का रोज   असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तिच्याबरोबर गेले.

एका टोकाला वाहिन्यांच्या कॅमे-यांची भिंत होती. वाट काढत, मी येत आहे अशी खात्री करून घेत ती चालत होती. मी म्हटलं, हाही एक अनुभव घेऊन पाहू.

एक सरदारजी होते. पन्नाशीचे असतील. एक बाई होत्या त्याही त्याच वयाच्या. आणि मी.
सरदारजी म्हणत होते, लहान असला म्हणून काय झालं? त्याला तर उलट जास्त शिक्षा द्या. ते पाहून बाकीच्या लहान मुलांना चांगली जरब बसेल आणि पुन्हा कुणी असं वागणार नाही.

त्यांच्या पाठीमागे काही पुरुष उभे होते. एक म्हणाला, लहान आहे मुलगा, त्याला सुधरायची संधी दिली पाहिजे. आणखी कुणीतरी म्हणालं, त्या मुलाला कसली शिक्षा देताय? त्याच्या आई-बापाला दिली पाहिजे शिक्षा. मुलाला वळण लावत नाहीत म्हणजे काय? आणखी कुणी विचारत होतं, त्याला आयुष्यभर तुरुंगात टाकून द्या, तीच शिक्षा त्याला. झोपडपटटी वाढली की दुसरं काय होणार? आणखी एक प्रश्न. प्रश्नातच जणू उत्तर आहे दडलेलं अशा अविर्भावात.

तेवढ्यात कॅमेरामन आणि एक पुरुष यांची वादावादी झाली. कॅमेरामन त्याला बाजूला व्हायला सांगत होता आणि तो माणूस म्हणत होता, होऊ तर द्या तुमचं सुरु, मग होतो की बाजूला.माझ्या डावीकडे दुस-या वाहिनीचा माणूस ताडताड माईकमध्ये बोलत होता. आता रोजची सवय असणार झालेली त्याला या विषयावर बोलायची. ‘सिंगापूरमधल्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची’ असं काहीतरी तो बोलत होता.  उजवीकडे तिसरा वाहिनीवाला कुणालातरी फोनवर अबे, अंग्रेजी बोलनेवाला चाहिये, पकडके ला किसीको जल्दी असं सांगत होता.

माझ्या शेजारच्या बाई मुलाला सांगत होत्या मावशीला फोन कर लगेच. तिला सांग हे लाईव्ह पहायला. त्यांची मुलगी तिच्या डिजीटल कॅमे-यात बहुधा व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती. मागे घोषणा चालूच होत्या. आमच्याभोवती बरेच बघे जमा झाले होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होती. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली .. पंधरा झाली. आमची पत्रकार हेडफोन कानात अडकवून तयारीत उभी होती. तेवढ्या एक पठ्ठा धावत आला. कॅमेरामन आणि त्याची गळाभेट झाली. मग तो लाईव्ह शो" सुरु झाला.

पहिला नंबर सरदारजींचा. ते आधी बरेच तावातावाने बोलत होते पण कॅमे-यासमोर अगदी शांत निर्धाराने बोलले. त्यांना बहुधा सवय असावी अशा कार्यक्रमात सामील व्हायची. नंतर नंबर त्या बाईंचा. त्याही इतर देशात बालगुन्हेगारांना अशा प्रसंगी कडक शिक्षा दिली जाते अशा आशयाचं एक वाक्य बोलल्या. मग अचानक ती पत्रकार आणि कॅमेरामन दोघंही निवांत झाले आणि मागच्या मेणबत्त्यांकडे पहायला लागले. मग मला कळलं की ते लाईव्ह दाखवलं जातंय. सरदारजी आणि बाई दोघांनाही अजून काही बोलायला सुचत होतं. ते पत्रकार बाईना सारखं काहीतरी सांगू पाहत होते. आणि ती त्यांना गप्प रहा, नंतर बोलू अशी खूण करत होती. ती बहुतेक ऐकत असणार कार्यक्रम.

अशी आणखी पाच एक मिनिटं गेली. मेणबत्त्यांजवळचा कॅमेरामन परत आला.
मेरा हो गया? असं पत्रकार स्त्रीने कुणालातरी विचारलं.

मग मला म्हणाली, सॉरी, तिकडे स्टुडीओत पण एक-दोन लोक होते बोलायला. त्यामुळे वेळ संपली.

मी ठीक आहे म्हणून निघाले.
बाईट हुकली माझी. ते चांगलंचं झालं. त्यामुळे काहीच बिघडलं नाही. वरवर पाहता.

एका बाईटमागे काय काय असतं ते कळलं.
मात्र आत खूप काही विस्कटून गेलं.
बाहेरच्या झगमगाटात खरी घटना, खरी वेदना, खर दु:खं किती क्षुल्लक होऊन जातं तेही अनुभवाला आलं.

Monday, December 17, 2012

१४४. प्रदर्शन


फोन वाजला. अनोळखी नंबर होता. पण फक्त ओळखीचे, यादीत असलेलेच फोन घेण्याची चैन मला करता येत नाही. मला असेच कुठूनकुठून फोन येतात. हा फोन नंबर त्या अर्थाने सार्वजनिक आहे.
नमस्कार”, एक बाई होत्या. दिल्लीतल्या. त्यांनी स्वत:चं नावं सांगितलं आणि मग श्रीयुत क्ष यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे म्हणाल्या. या ‘क्ष’ना मी अनेक वर्षांपासून आणि चांगली ओळखते. एका सामाजिक संस्थेचं काम करतात ते. त्यांच्या संस्थेबद्दल मला काही फार प्रेम आहे अशातला भाग नाही; पण ‘क्ष’ अतिशय तळमळीने आणि निस्वार्थीपणाने काम करतात. मग ‘क्ष’चं नाव घेत कुणीही माझ्याकडे आलं की मी त्यांना जमेल तितकी मदत करणं स्वाभाविक आहे माझ्यासाठी.
बोला, काय मदत हवी आहे? मी इकडेतिकडे वेळ न घालवता थेट मुद्याला हात घातला.
क्ष म्हणाले की तुमच्याकडे बरीच माहिती आहे, त्या बाई मोघमपणे म्हणाल्या.
या असल्या स्तुतीच्या चक्रात अडकायचं आता काही माझं वय राहिलेलं नाही – हे कदाचित त्या बाईंना माहिती नसणार.
कसली माहिती हवी आहे तुम्हाला? मी सरळ विचारलं.
स्त्रियांची त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं.
आता स्त्रियांची माहिती हा फार मोठा आवाका असलेला विषय आहे. या बाईंना नेमकी कसली माहिती हवी आहे हे जोवर मला कळत नाही तोवर मी त्यांना मदत करू शकत नव्हते.
कुठल्या स्त्रियांची? कोणत्या विषयावर? मी पुन्हा विचारलं.
भारतीय स्त्रियांची. कोणत्याही विषयावर चालेल. त्या बाई तितक्याच शांतपणे बोलत होत्या.
मला जरा वैताग आला. पण ‘क्ष’चा संदर्भ असल्याने मी फोन ठेवून देऊ शकत नव्हते.
दहा मिनिटं गेल्यावर आणि मी बरीच चौकशी केल्यावर कळलं की क्ष आणि या बाई यांची संस्था प्राचीन भारतीय इतिहासावर एक प्रदर्शन भरवणार होती, त्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती.
तुम्ही काही नावं काढली आहेत का? मी विचारलं.
तुमचं नाव आहे की... बाई उत्तरल्या. विनोदी दिसत होत्या बाई.
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्त्रियांबद्दल बोलत होते मी. काय काय पूर्वतयारी केलीय तुम्ही त्याचा अंदाज दिलात तर मी पुढची मदत काय करायची ते बघते. मी.
नाही हो, मला वेळच नाही मिळाला. तुम्ही सांगाल ती नावं घेता येतील, त्यात काही अडचण नाही, बाई उत्तरल्या. अडचण कसली म्हणा? यांचा काही विचारच झालेला दिसत नव्हता. ठीक आहे, नावं देऊ यात यांना असा मी स्वत:शी विचार केला.
प्रदर्शन दिल्लीत असणार म्हणजे मजकूर हिंदीत असायला हवा.
मी इंग्रजीत मजक्रूर दिला तर तुमच्यापैकी कुणी हिंदीत करेल ना तो? मी होकाराच्या अपेक्षेने विचारलं.
नाही हो .. तुम्हीच दिलीत माहिती हिंदीत तर बरं होईल. तुम्ही पण दिल्लीत राहता म्हणजे तुम्हाला हिंदी येत असेलच की ... बाईची फटकेबाजी चालूच होती.
ते नंतर बघू ‘क्ष’शी बोलून असा विचार करत मी पुढचा प्रश्न विचारला.
बरं, तुम्ही पोस्टर्स करणार असाल ना? मी विचारलं.
हो, बहुतेक ... त्या बाई उत्तरल्या.
चित्र कोण काढणार आहे? पोस्टरवर किती मजकूर द्यायचा याला मर्यादा असतात त्यामुळे मजकूर विचारपूर्वक निवडावा लागेल, पोस्टर्सचा आकार काय असेल  ... माझी विचारांची गाडी सुरु झाली होती.
तुमच्याकडे नाहीत का चित्र? त्या बाईंनी विचारलं.
नाहीत, मी शांतपणे उत्तरले. आता ‘क्ष’च्या ओळखीच्या असल्या तरी या बाईंचा मला थोडा राग यायला लागला होता.
मग काय करायचं? बाई विचारत्या झाल्या.
प्रदर्शन यांनी ठरवलं होतं की मी?
तुम्ही ठरवा. मग मला सांगा सावकाश, मी त्या बाईंना सांगितलं.
अहो वेळ कुठं आहे? त्या बाई करवादल्या.
आता मात्र मी राग विसरले आणि मला कुतूहल वाटायला लागलं. या बाईना प्रदर्शन करायचं आहे, त्याच्या विषयाची त्यांना काही माहिती नाही, त्याची कसलीही तयारी नाही यांची. मदत मागण्यासाठी मला फोन करून या मला हुकूम देत सुटल्या आहेत. आमची काही ओळख नाही तरी या माझ्यावर कारण नसताना वैतागत आहेत. यांना ‘क्ष’ने नेमकं काय सांगितलं होतं माझ्याबद्दल? कारण मी या बाईंचा अपेक्षाभंग करत होते हे अगदी उघड होतं. ‘असा कुणालाही माझा फोन नंबर देत जाऊ नका’ असं ‘क्ष’ला सांगितलं पाहिजे याची मी मनातल्या मनात नोंद केली.
घाई होतेच हो अशा वेळी, मी समजूतदारपणा दाखवला.
उत्साहाने मी पुढे बोलले (सवय! सवय!), तुम्ही एकदा तुमच्या टीमशी बोला. मग आपण एकत्र बसू आणि ठरवू. काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित.
बाईंना जरा बरं वाटलेलं दिसलं. आज येता संध्याकाळी? त्यांनी विचारलं.
मी आत्ता दिल्लीत नाही. आठवडाभराने येईन परत. मग फोन करते तुम्हाला. तोवर तुम्ही चित्रकार आणि हिंदी अनुवाद करणारे लोक शोधून ठेवा ... मला बहुतेक त्या बाईंची दया आली .
आठवडाभर नाही तुम्ही? मग काय तुमचा उपयोग? बाई मला मोडीत काढत म्हणाल्या.
म्हणजे? मी आवाजावर काबू ठेवत विचारलं.
अहो, प्रदर्शन या शनिवार रविवारी आहे ...बाई उत्तरल्या.
मी तुम्हाला यावेळी काही मदत करू शकत नाही, क्षमस्व. आणि तुम्हाला प्रदर्शनासाठी शुभेच्छा. असं म्हणत मी फोन बंद केला.
प्रदर्शन!
कशाचं प्रदर्शन?
आपण काम करतो याचं? आपल्याला संस्कृती-इतिहास यांचं फार पडलं आहे याचं? आपण सामाजिक काम करतो म्हणजे कसंही केलं तरी चालेल या मानसिकतेचं? वेळ मारून नेण्याच्या वृत्तीचं? आपल्याला इतरांकडून अपेक्षा करण्याचा हक्क आहे या समजुतीचं?
कशाकशाचं प्रदर्शन!!  

Monday, December 3, 2012

१४३. सबलीकरण

पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते.
मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत.
मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत.
मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही.
मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही.
माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही.
मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत.
मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही.
मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच, समजूही शकत नाहीत ती भाषा.

माझ्या सोबत असलेल्या स्त्रियांचा दृष्टीने ‘तुम्ही किती हुशार आणि आम्ही किती अडाणी’ असा मुद्दा अधोरेखित करणारी ही यादी न संपणारी आहे. त्यांच्या दृष्टीने मी जणू कुठल्यातरी परग्रहावरून आले आहे. त्यांच्या आणि माझ्या जगण्यात साम्य तर नाहीच पण त्यांना कधी माझ्यासारखं जगता येईल ही शक्यताही त्यांना दिसत नाही. खरं तर या जाणीवेत, या भावनेत, या अभिव्यक्तीत एक संदेश पण आहे माझ्यासाठी. ‘तुम्ही जे काही बोलाल, ते आम्हाला लागू पडणार नाही’ असंच जणू त्या स्त्रिया मला सांगायचा प्रयत्न करताहेत. मी बरीचशी संदर्भहीन आहे त्या परिस्थितीत.
मला त्या स्त्रियांची भावना समजते. पण सत्याला अनेक बाजू असतात आणि त्यांना केवळ सत्याची एक बाजू दिसते आहे असं मला वाटतं. कारण त्या सत्याची दुसरीही एक बाजू आहे – ती मला आत्ताच दिसते आहे असं नाही, तर अनुभवाने मला ती माहिती आहे. त्या बाजूची चर्चा झाल्याविना हा संवाद पूर्ण नाही होणार माझ्यासाठी.
मी गुजरात राज्यात आहे. तापी जिल्ह्यातल्या छिन्दिया गावाच्या एका पाड्यात मी आहे. माझ्या सोबत पंधरा वीस कोटवालिया स्त्रिया आणि काही मुले-मुली आहेत. भारत सरकारने एकंदर ७५ आदिवासी समूहांना ‘आदिम जनजाती’ अशी मान्यता दिलेली आहे. या समुहांची जीवनशैली बरीच जुन्या पद्धतीची  आहे आणि विकासाचा वारा त्यांच्यापर्यंत न पोचल्याने त्याच्या फायद्यांपासून ते वंचित आहेत. त्यांची शेतीची आणि उपजीविकेची साधनं आधुनिक झालेली नाहीत अद्याप.
मीटिंगच्या आधी मी त्यांच्या वस्तीतून एक फेरफटका मारते आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज मला आला आहे. शिवाय इथं येण्यापूर्वी माझ्या सहका-यांनी मला या समूहाची, या गावाची माहिती पुरवली आहे. त्यामुळे समोर येत असलेल्या दृश्यात अनपेक्षित, धक्का बसावं असं काही नाही माझ्यासाठी. जे आहे ते काही फारसं सुखावह नाही, हे मात्र निश्चित.
स्त्रियांच्या सोबत फेरफटका मारताना अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत आहेत. त्यात मी वर उल्लेख केलेले अनेक मुद्दे येताहेत. इथं मला त्यांच्या जगण्याबद्दल जितकं कुतूहल आहे, तितकंच, किंबहुना थोडंसं जास्तच त्यांना माझ्या जगण्याबद्दल आहे. शिवाय मी एकटी आणि त्या वीस जणी – त्यामुळे एकापाठोपाठ मला प्रश्न विचारण्याची संधी त्यांना आहे. मला गुजराती भाषा चांगली समजते त्यामुळे त्या विनासंकोच प्रश्नांच्या फैरी माझ्यावर झाडत आहेत. मला गुजराती फार चांगलं बोलता येत नाही – बोलण्याच्या ओघात मी व्याकरणाच्या चुका करते आहेत. त्यामुळे खूष होऊन त्या स्त्रिया आणि  लहान मुलं हसत आहेत.
माझे प्रश्नही बहुधा विनोदी आहेत. पाड्यात भटकताना मला एक सायकल दिसते, तेव्हा ‘तुमच्यापैकी कुणाला येते सायकल? या माझ्या प्रश्नावर सगळ्याजणी हसतात. कदाचित त्या प्रश्नातूनच ती वरची प्रश्नोत्तरी उगम पावली आहे. झाडाखाली एक पुरुष बसला आहे. तो माझा प्रश्न ऐकतो आणि त्या स्त्रियांना त्यांच्या (आदिवासी) भाषेत काहीतरी सांगतो, त्यावर एकच हशा उसळतो. काय म्हणाले ते भाई? मी विचारते. तर तो भाई म्हणालेला असतो की, सांगा येते सायकल आम्हाला म्हणून. त्या बेनसमोर कशाला काही येत नाही म्हणता? तिला थोडचं खरं काय ते कळणार आहे? पण त्या स्त्रिया खोटं सांगत नाहीत. कदाचित मी ‘दाखवा बरं चालवून’ असं म्हणेन याचा त्याना एव्हाना अंदाज आला असावा.
पण तो माणूस हुशार आहे – अनोळखी लोकांसमोर आपली बलस्थानंच फक्त जाहीर करावीत – हे त्याचं धोरण तसं पहायला गेलं तर योग्यच आहे.
भटकून झाल्यावर आम्ही एक ठिकाणी बसून ‘मीटिंग’ करतो आहोत आता. माझ्या इथं येण्याने स्त्रियांचा न्यूनगंड वाढणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. त्यांनी त्यांना येत नसणा-या गोष्टी प्रामाणिकपणे मला सांगितल्या आहेत. आता गरज आहे मीही तितकंच प्रामाणिक असण्याची. 



मिटींगमधली औपचारिकता पार पडते – ओळख, स्वागत वगैरे. आता मी बोलायचं आहे. मी ती संधी घेते. त्या स्त्रियांच्या रोजच्या कामाची चर्चा सुरु करते.
आजपर्यंत कोटवालिया समाजाने गायीम्हशी कधीच पाळल्या नव्हत्या. पण सरकारी योजेनेचा भाग म्हणून आता त्यांना म्हशी मिळाल्या आहेत. इथल्या स्त्रिया आणि पुरुष काहीही अनुभव पाठीशी नसताना म्हशीची धार काढायला लागल्या आहेत.
हं! मला नाही येत गायी-म्हशीची धार काढायला.कधीच काढली नाहीये मी धार, मी सांगते. सगळ्या हसतात.
या सगळ्या स्त्रिया शेणाच्या गोव-या करतात, मला हेही काम येत नाही करता.
जंगलात एकटीने जायचं आणि जळणासाठी पाहिजे ती (योग्य या अर्थाने) लाकडं आणायची हे रोजचं काम आहे त्यांचं. मी जंगलात एकटी जाऊ शकणार नाही आणि कोणतं लाकूड जाळण्यासाठी योग्य आहे हे मला कळत नाही आणि मला लाकूड तर तोडताच येणार नाही हे मी जाहीर करते. सगळे पुन्हा हसतात. आता त्यांना गंमत वाटायला लागली आहे. आत्तापर्यंत मी ‘हुशार’ होते त्यांच्या दृष्टीने, पण मला अनेक गोष्टी येत नाहीत हे हळूहळू त्यांच्या लक्षात येतंय!!
हापशावरून त्या पाणी आणतात – घराला लागेल तितकं. मला भरलेली बादली उचलायला फारसं जमणार नाही हे मी त्यांना सांगते.
त्या स्त्रियांना त्यांची आदिवासी भाषा आणि गुजराती दोन्ही चांगल्या येतात, हिंदीही थोडी थोडी बोलता येते. म्हणजे त्यांना तीन भाषा येतात. मलाही हिंदी, गुजराती येत असलं तरी त्यांची भाषा मात्र येत नाही.
त्या चुलीवर स्वैपाक करतात, मला तर चूल पेटवताही येत नाही, स्वैपाक करणं तर फार पुढची गोष्ट!
त्यांना बांबूची बास्केट बनवता येते – जी मला येत नाही.



आता आमच्या चर्चेत रंग भरायला लागला आहे. मला असंख्य गोष्टी येत नाहीत याची त्यांना झालेली जाणीव त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा करते आहे.
त्यांना तालावर नृत्य करता येतं; मला येत नाही.
त्यांना गाणी गाता येतात वेगवेगळ्या प्रसंगाना अनुरूप; मला गाता येत नाही.
त्यांना झाडं ओळखता येतात, झाडांची नावं सांगता येतात – माझं ज्ञान दोन-चार झाडांपल्याड जात नाही.
त्यांना ‘माशांची आमटी आणि भाजी ’ बनवता येते मस्त – मला मासेही ओळखू येत नाहीत वेगवेगळे.
शहरतली असले, शिकलेली असले, पैसेवाली असले, इंग्रजी बोलता येणारी असले ... तरी मला सगळं येत नाही ही गोष्ट आता त्या स्त्रियांना चकित करून गेली आहे.
माझ्यासाठी ही साधी गोष्ट आहे. जगण्याची काही कौशल्य त्या स्त्रियांकडे आहेत – काही माझ्याकडे आहेत. काही माझ्याकडं असणारी कौशल्य जशी त्यांच्याकडं नाहीत तशीच त्यांच्याजवळ असणारी अनेक कौशल्य माझ्याकडं नाहीत. त्या काही बाबतीत अडाणी आहेत तर मी काही बाबतीत अडाणी आहे.
नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आमच्यात फरक पडला आहे हा? शिक्षण? जात? आर्थिक स्थिती? शहर-खेड्यात असणा-या संधी? त्या आदिवासी आहे आणि मी नाही म्हणून? धर्म? हा फरक केवळ वर्तमानाताला आहे की त्याला भूतकाळ आहे? हा फरक इथं संपणार की भविष्यातही असाच राहील?
अनेक प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत; जी माहिती आहेत ती विषण्ण करणारी आहेत. म्हणून मी प्रश्न विचारत नाही, त्यांची उत्तरं इथं शोधायचा प्रयत्न करत नाही. आम्ही मिळून ज्या गप्पा मारतो आहोत, त्यातून आमची एकमेकीच्या आयुष्याबद्दलची समज वाढायला मदत होते आहे हे मात्र नक्की! त्यातून आमचे सगळ्यांचेच सबलीकरण होते आहे कळत नकळत!

स्वत:ला पाहिजे तसे निर्णय घेत स्वत:चं आयुष्य घडवण्याची क्षमता असणं अशी सबलीकरणाची ढोबळ व्याख्या करता येईल. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला मिळणा-या संधींवर अवलंबून असते. आपली बलस्थानं कोणती याचं भान असणं ही या प्रक्रियेतली महत्वाची गोष्ट आहे. आमच्या या चर्चेतून आम्हाला आमची बलस्थानं कळली हे फार चांगलं झालं! आपल्याला जे चांगलं करता येतं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं याच्याइतकंच महत्त्व आहे ते आपल्याला जे काही चांगलं करता येत नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते!!
त्यादिवशी आमच्या त्या गप्पा आम्हाला सगळ्यांनाच नवा विचार देवून गेल्या.

मी काय केलं मला नाही माहिती; पण त्या स्त्रियांनी मला थोडं अधिक सबल केलं त्यादिवशी!!       
**