ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, December 30, 2011

१०६. धागा


आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का? एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.
मी फोटो काढला.

मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाही दाखवला.
ते सगळे खूष झाले एकदम.
आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला.
हा फोटो मी तुम्हाला कसा पाठवू मी विचारलं. त्यावर ते सगळे गोंधळले, एकमेकांकडे पहायला लागले.
ठेव तुझ्याकडे आमच्या गुरुंची; आमच्या धर्माची आठवण म्हणून आजोबांनी निर्णय दिला. सगळ्यांनी मान डोलावली.
पोस्टाने पाठवते फोटो, ई-मेलने पाठवते.... असले विचार मी मनातच ठेवले.
****
खूप वर्षांपूर्वी कधीतरी दुस-या राज्यातल्या कोणीतरी ‘ये सावित्रीबाई कौन थी?’ असं मला विचारलं होतं, तेव्हा मला राग आला होता –शिकल्यासवरल्या माणसांना काही माहिती नसतं म्हणून! त्यानंतर कामानिमित्त मला भरपूर भटकता आलं – उत्तराखंडपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचलपासून गुजरातपर्यंत. या सगळ्या प्रवासात आपल्याला आपला देश किती कमी माहिती आहे हे पुन्ह्पुन्हा लक्षात आलं. पण त्यामुळे एक नक्की झालं - आपलं जग दुस-या कोणाला माहिती नसलं, तर ते त्यांचं घोर अज्ञान ....आणि आपल्याला दुस-या कोणाचं जग माहिती नसलं, तर ते मात्र स्वाभाविक – अशा मानसिकतेतून मी बाहेर पडले – निदान असं मला तरी वाटतं.
परवा चंदीगडकडून सिरसाला निघालो तेव्हा आधीच उशीर झालेला होता. सकाळची मीटिंग अपेक्षेपेक्षा लांबली होती. पण त्यात अनेक मुद्दे - जे मला सांगायचे होते त्यावर चर्चा झाली होती, निर्णयही झाले होते त्यामुळे समाधान होतं. पण या सगळ्याच्या नादात एरवी शहराकड मी ज्या पद्धतीन पाहते, त्यावर विचार करते त्यासाठी वेळ मिळालेला नव्हता.
प्रवास सुरु झाला तेव्हा मग फोनही सुरु झाले. फोन हे असं एक साधन आहे की ज्याद्वारे आपण समोर जे आहेत त्यापेक्षा समोर जे नाहीत त्यांच्यासाठी असतो. पण मला मी ज्यांच्याबरोबर असते  - त्यांच्यासाठी वेळ द्यायला आवडतं. सकाळपासून फोन ‘शांत’ (silent mode) ठेवला होता तो मी – त्यावर अनेकांच्या हाका (missed calls)  दिसल्या – मग त्यांच्याशी बोलणं झालं. या नादात आम्ही एक तासभर तरी पुढे आलो होतो पतियाळाच्या दिशेने. 
सगळ काम आटोपून मी जरा निवांत झाले. रस्ता मस्तच होता – खड्ड्यांविना. बरीच गर्दी दिसत होती. ट्रॅक्टरमध्ये बसून जाणारी माणसं दिसत होती अनेक. आधी मला वाटलं शेतमजूर असतील. पण ते थकलेले दिसत नव्हते, उलट मजेत बसले होते. म्हणून वाटलं लग्नाचं व-हाड असेल. पण असे एकामागून एक ते दिसतंच राहिले तेव्हा प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आलं. दरम्यान रस्त्यात लाल झेंडे फडकवत अनेक ठिकाणी तरुण मुलं गाडया थांबवायचा प्रयत्न करत होती. तिथ मोठे मंडप दिसत होते आणि ध्वनिवर्धकावर काहीतरी चालू होतं – काही ठिकाणी बोलणं तर काही ठिकाणी गाणी! लक्ष देवून ऐकलं तर संदर्भाने आता मला पंजाबी कळतं – पण आम्ही सतत पुढे जात होतो त्यामुळे नीट समजून घेता येत नव्हतं. पण रस्ता अडवून गावगुंडांनी गणपतीची, साईबाबाची, नवरात्राची, होळीची, जीर्णोद्धाराची वर्गणी मागण्याचा (खरं तर वसूल करण्याचा) आपल्या महाराष्ट्रातला नेहमीचा अनुभव. त्याच प्रकारचं हे काहीतरी असणार असं समजून मी सोडून दिलं.
दोनशेवा ट्रॅक्टर पाहिल्यावर मी सोबत असलेल्या गृहस्थांना विचारलं – इतके सगळे लोक कुठून कुठे चाललेत म्हणून. त्यावर काका (हे आमच्या वाहनचालकाचं नाव. पंजाबीत काका म्हणजे ‘छोटा’ हे नव्यानंच समजलं) म्हणाला – ते सगळे फतेहगड साहिबवरून येताहेत. महिन्याभरापूर्वी मी फतेहगड साहिबच्या परिसरात जाऊन आल्यामुळे मी माझ ज्ञान पाजळलं – ‘हो, तिथं एक मोठं गुरुद्वार आहे ना. तिकडे काय आहे आज?
मग त्याने मला सांगितलं की गुरु गोविंदसिंहाच्या दोन कोवळ्या मुलांना आणि गुरुंच्या आईला जिथं कैद करून ठेवलं होतं आणि त्या दोन मुलांनी धर्मांतर करण्यापेक्षा क्रूर मरण स्वीकारलं होतं (ही घटना १७०५ मधली) तो परिसर आता फतेहगड साहिब गुरुद्वार या नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणी २८ डिसेंबरला मोठा कार्यक्रम असतो. हे सगळे ट्रॅक्टरमधले लोक तिथल्या कार्यक्रमातून आपापल्या गावी परत जात होते. ते अर्थातच स्वखर्चाने गेले होते. त्यांना बोलावणं कोणा व्यक्तीचं नव्हतं तर गुरुंचं होतं, धर्माचं होतं. या ट्रॅक्टरची मोजदाद करायचं मी सोडून दिलं. सगळा पंजाब आज वेगळ्या भावनेत होता तर! धर्मात (ती नीट वापरली तर) समाजाला प्रेरित करण्याची, बांधून ठेवण्याची किती अफाट ताकद आहे हे जाणवून मी स्तब्ध झाले होते.
पण मग रस्त्यावर गाड्या अडवून हे तरुण काय करत होते आजच्या पवित्र दिवशीही? आणि एक दोन ठिकाणी नाही तर दर दोन मैलांवर? मी काकाला विचारलं.
काका म्हणाला, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे तरुण मागत काही नाहीत. आज साहिबजाद्यांच्या(फतेहसिंह आणि झोरावरसिंह ही ती गुरु  गोविंदसिंहांची दोन मुलं) स्मरणार्थ गावागावात लंगर आहे. ते आपल्याला थांबून प्रसाद घ्यायचा आग्रह करताहेत.
नीट माहिती न घेताच त्या मुलांबद्दल मत बनवण्याची चूक मी केल्यामुळे मी जरा खजील झाले. काका म्हणाला, आमच्या गावात पण असतो मोठा लंगर. पण आता आज मी तुमच्याबरोबर आहे ना, मग राहून गेलं ते ...
मी काकाला म्हटलं, थांबू आपण एका गुरुद्वारात. तिथं प्रसाद घेऊ आणि पुढे जाऊ.
उशीर तर नाही व्हायचा आपल्याला पोचायला? त्यानं साशंकपणे विचारलं. पण सिरसात जाऊन पोचायचंच होतं फक्त आज रात्री – काम उद्या होतं. अर्धा तास उशीरा पोचल्याने काहीच फरक पडणार नव्हता.
संगरूर जिल्ह्यात प्रवेश करून एका गुरुद्वारासमोर आमची गाडी थांबली. आम्हाला दहा तरुणांनी वेढा घातला. त्यांच्या हातात चहा होता, पुरी होती, हलवा (शिरा) होता, बरेच पदार्थ होते. खरं तर आत जावून बसून जेवायची व्यवस्थाही होती – पण ज्यांना ते करायला वेळ नसतो त्यांच्यासाठी ही ‘जलद सेवा’ होती. मी न मागताच हलव्याचा द्रोण माझ्या हातात आला, चहाचा ग्लासही आला. एक प्रौढ सरदारजी आमची चौकशी करायला आले. काकाने सांगितलं असणार त्यांना मी दिल्लीतून आले आहे वगैरे – कारण दोन मिनिटांत ध्वनिवर्धकावरून मला माझ ‘स्वागत’ ऐकू आलं.
मला ते वातावरण विलक्षण वाटलं. ‘देण्याघेण्याच्या’ जमान्यात कोणीतरी कोणाला फक्त देत असलं की मला कौतुक वाटतं. मी सरदारजींशी गप्पा मारायला सुरुवात केली. साहिबजाद्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दर वर्षी २७, २८ आणि २९ डिसेंबर असे तीन दिवस या गावात लंगर चालतो. एक समिती नेमली जाते – जी देखरेख करते. पण मुख्य काम करतात ते शेकडो – हजारो स्वयंसेवक – कारसेवक. किती माणसं तीन दिवसांत जेऊन जातात याची काही गणती नाही. मागच्या वर्षी चार लाख खर्च आला होता. हा सगळा खर्च गावातले लोक स्वयंप्रेरणेने करतात. पैसा येतो, गहू येतो, साखर येते, लाकडं येतात, भाजी येते, सामान येतं .... राबायला माणसंही येतात. इथं राबायला हा शब्द चुकीचा आहे खर तर – सेवा करायला म्हणायला पाहिजे.
एक फोटो काढला तर चालेल का? मी विचारलं. मी फोटो काढल्यावर सगळेजण परत माझ्याकडं पहायला लागले. मग आणखी दोन सरदारजी आले. म्हणाले, ‘चला, तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो. मग ते मला आत घेऊन गेले – जिथं पदार्थ शिजत होते. वेगेवेगळे विभाग होते आणि शिस्तीत काम चाललं होतं – आरडाओरडा नाही. स्वच्छता होती. मी शिरा    बनवणा-याचा फोटो काढला. मग पोळया बनवणा-या विभागात गेलो – तिथ प्रामुख्याने बायकाच काम करत होत्या. यांचा पण काढा फोटो सरदारजींनी मला हुकूम सोडला. त्यांचा स्वर प्रेमळ होता त्यामुळे मी त्यांचं ऐकलं लगेच. दहा मिनिटांनी आम्ही निघालो, तोवर रात्रीचं जेवण त्यांनी आम्हाला बांधून दिलं होतं.


वर उल्लेख केलेला कमिटीचा फोटो निघताना अगदी शेवटी काढला.
त्यावर मी विचार करत राहिले आणि लक्षात आलं की हा सगळा अनुभव त्यांना काही ‘देण्यासाठी’ नव्हताच मुळी .... तो माझ्यासाठी होता....मला काही समजावून सांगणारा ...

मी लक्षात ठेवावी धर्माची सकारात्मक ताकद ...
मी विसरून जाऊ नये माणसांचं साधेपण ...
मी मत बनवू नये अर्धवट माहितीच्या आधारे ...
मी ठेवावी इतिहासाची जाण....
मी कुठेही असले तरी फटकून राहू नये समाजाशी कधीही ....
एक धागा आहे या सगळ्याचा माझ्या जगण्याशी ...
तो अतूट ठेवणं ही माझीही जबाबदारी आहे. 

Thursday, December 22, 2011

१०५. तिचा एक दिवस

शारदा एकदम दचकून जागी झाली. आपण कुठे आहोत आणि हा कसला आवाज आहे असा तिचा गोंधळ क्षणभरच टिकला. पहाटे पाणी आल्याआल्या लगेच भरलं तरच मिळतं, नाहीतर त्याचा काही भरोसा नसतो, म्हणून रात्री झोपताना नळ चालू ठेवून झोपायची तिने स्वतःला सवय लावून घेतली आहे. तरीही तिचे हे रोजचे दचकून जागे होणे मात्र काही संपत नाही.

खरे तर आज शारदा खूप दमली आहे. शेजारी प्रकाश - तिचा नवरा - घोरत पडला आहे. रात्रीच्या जोर जबरदस्तीनंतर त्याचे हे निवांत झोपणे आणि तिची दमणूक हेही आता नेहमीचे झाले आहे. पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा मनात आलेला विचार तिने लगेच झटकून टाकला. पाणी राहायचे बाजूला, आणि त्याचे पुन्हा लगटणे चालू व्हायचे! त्या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारा आला. तिचे मन आणि तिचे शरीर आजकाल त्याच्या मागणीला तयार नसते. पण एकदा लाडीगोडीत ’जरा हळू’ असे तिने म्हणताच ’कोण असेल तसा, त्याच्याकडे जा मग’ असे म्हणत त्याने तरातरा बाहेरची वाट धरली होती. आपण थोडे जरी ताणले तरी हा लगेच दुस-या बाईकडे जाईल याची शारदाला तेव्हा खात्रीच पटली होती. मग बाहेरची काही लागण त्याने घेऊन येण्यापेक्षा त्याच्या इच्छेला निमूट शरण जाणे तिने स्वीकारले होते. “नाहीतरी लग्नाची बायको आहे मी त्याची, म्हणजे या शरीराचा मालकच की तो" असा कडवट विचार तिच्या मनात आला आणि तिचे अवसान आणखीच गळून गेले.

या विचारांत पाच एक मिनिटे गेली असतील नसतील, शारदा उठली. शारदाला फक्त तीन बादल्या पाणी मिळाले. आता त्यातच कपडे धुवायचे, अन्न शिजवायचे, भांडी घासायची आणि आंघोळ करायची इतकी कामे तिला उरकावी लागणार तर! खरे तर तिच्या डोळ्यांमध्ये अजून झोप रेंगाळते आहे. पण आज कामाला दांडी मारून पण चालणार नाही, देसाई बाई चांगल्याच रागावतील, नाही गेले तर तिचे कामही सुटेल. आज देसाई बाईंच्या लेकाचा वाढदिवस आहे, बरेच पाहुणे येणार आहेत. शारदाला ’थोडा जास्त वेळ कामाला ये’ असं त्यांनी मागच्या आठवडयातच सांगितलं आहे. चार तास जातील पण त्याचे पन्नास रूपये द्यायचे त्यांनी कबूल केले आहे. घरात आज शिजवायला दाणा नाही. त्या पन्नास रूपयांच्या आशेने शारदाला थोडा उत्साह येतो.

स्टोव्ह पेटतच नाही. बाटलीत केरोसीनचे जेमतेम चार थेंब दिसतात. म्हणजे चहाचा विचार बाजूलाच ठेवणे भाग आहे. तशीही घरातली साखर पण संपलीच आहे. निदान चपात्या भाजी करायचे काम वाचले याचाच शारदाला आनंद आहे. कालची रात्रीची थोडी भाजी आणि एक भाकरी शिल्लक आहेत. प्रकाशचे सकाळचे खाणे त्यात भागेल कसेबसे. नव-याची झोप उडू नये अशा सावधपणाने शारदा दार हलकेच लोटून लगबगीने घराबाहेर पाऊल टाकते.

प्रकाश बरा असतो तेव्हा त्याच्या त्या जुनाट मोपेडवरून तो शारदाला ’श्रीराम’ सोसायटीपर्यंत सोडतो. पण चहासाठी तकतक नको म्हणून तिने आज त्याला उठवले नाही. कालची त्याची अजून उतरली नसणार म्हणजे आज काम बुडवून तो घरातच बसणार हे शारदाला आता अनुभवाने माहिती झाले आहे. आता त्यामुळे पुढची वीस मिनिटे शारदाला चालत जावे लागणार. सकाळी रस्त्यावर तितकीशी गर्दी नाही. पण शारदाच्या अंगात भरभर चालण्याइतकी ताकद नाही या क्षणी!

शारदाला कामाच्या पहिल्या घरी पोचायला दहा मिनिटे उशीर झाला. मोकाशी बाई त्यामुळे रागावल्या आहेत. शारदावर त्या थेट ओरडायला सुरूवात करतात. खर तर दिवसभर मोकाशी बाई घरातच असतात. त्यांना काही कुठे कामाला जायचे नसते, त्यामुळे पाच दहा मिनिटे इकडे तिकडे झाल्याने तसा काही त्यांना फरक पडायला नको. पण त्या घडयाळावर नजर ठेवून बसलेल्या असतात. त्यांना काही सांगण्यात अर्थ नाही हे आता शारदाला अनुभवाने माहिती आहे. मोकाशी बाईंना काही ऐकून घ्यायची सवय नाही. शारदा काही न बोलता कामाला लागते, याचा मोकाशी बाईंना आणखी राग येतो. त्यांच्या तोंडचा पट्टा आता जोरातच सुरू आहे.

रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरातले बेसिन खरकटया भांडयांनी गच्च भरले आहे. लोक खायचे नसताना, भूक नसताना इतके अन्न ताटात वाढून कशासाठी घेतात हा नेहमीचा प्रश्न आजही शारदाला पडतो. त्या खरकटयाच्या वासाची तिला खरे तर शिसारी येते. बाथरूममध्येही ढीगभर कपडे आहेत. मोकाशी बाईंना शारदाच्या मागे मागे हिंडायची वाईट खोड आहे. एक मिनिट त्या काही शांत बसत नाहीत. ’असेच कर, तसे करू नकोस’ असा सूचनांचा सारखा भडिमार चालू असतो त्यांचा. त्या शांत राहिल्या तर शारदाला भरभर काम उरकता येईल. पण मोकाशी बाई बोलत राहतात. शारदाने ’हो, नाही, बरोबर’ अशा थाटाचे काही उत्तर दिले, की त्यांना जणू प्रोत्साहन मिळून त्या नव्याने सुरूवात करतात. जोवर शारदा काही बोलत नाही, तोवर मोकाशी बाई तेच तेच बोलत राहतात. त्यांनी दिलेल्या दोन चार जुन्या साडयांवर शारदाचं वर्ष निभावतं, आत्ताही शारदाच्या अंगावर त्यांनी दिलेलीच साडी आहे. म्हणून शारदा त्यांच ऐकून घेते. मोकाशी बाई तशी मनाने चांगली आहे, वेळप्रसंगी अडचण भागवते. त्यांना तोडून आपल्याला चालणार नाही याची शारदाला जाणीव आहे.

पुढचं काम जोशी बाईंचं! शारदाने बेल वाजवल्यावर लगेच दार उघडतं. दारात जोशी बाबा हसत उभा असलेला पाहून शारदाच्या हृदयाचा ठोका चुकतो. जणू तॊ शारदाची वाटच पाहत होता. जोशी बाई आठवडाभरासाठी त्यांच्या बहिणीकडे गेल्या आहेत, हे ती विसरलीच होती. जोशी बाईंची आई आजारी आहे, त्यामुळे त्यांना परत यायला दोन चार दिवस जास्तही लागू शकतात, तसे त्या शारदाला सांगून गेल्या आहेत. जोशी बाई चांगल्या आहेत, पण त्यांचा नवरा मात्र आगावू आहे. एरवीही त्याची नजर शारदावर असते. एक दोनदा तर त्याने चुकून लागला असं भासवत शारदाच्या अंगाला नको तिथे हात लावायचाही प्रयत्न केला होता. आता त्याचे हसणे पाहून दोन्ही पोरही घरात नाहीत हे शारदाला नीटच समजलं. “मी तासाभराने येते त्या काकूंचं काम आटोपून" असं शारदा शेजा-यांना ऐकू जावं अशा बेताने मोठया आवाजात म्हणते. त्यावर जोशी साळसूदपणे म्हणतो, "मला काय दुसरे उद्योग नाहीत की काय? लवकर काम आटोपून घे. मला कामाला जायचंय. आई घरात नसताना कोणाला दार उघडायचं नाही असं मी मुलांना सांगून ठेवलंय, म्हणजे तुला सुट्टीच पाहिजे म्हण की!”

शारदाचा नाईलाज होतो. शारदा पुढच दार उघडंच ठेवते आणि स्वयंपाकघराच्या खिडकीतून शेजारच्या बाईंशी मोठमोठयाने गप्पा मारते. जोशी तिच्या मागेमागे फिरायला लागल्यावर "साहेब, उगी एका जागी निवांत बसा पाच मिनिटं. माझं काम झालं की मग काय आवरायचं ते आवरा’ असं मोठया आवाजात म्हणते. ते ऐकून शेजारची राणी मॅडम दार उघडून "काय जोशी, काय म्हणतेय सासूबाईंची तब्येत?” अशी चौकशी करायला लागते. जोशीला चडफडत पण हसतमुखाने राणीशी बोलावे लागते. कधीकधी शारदाला वाटते की तिची आणि जोशीबाईंची कहाणी खरे तर सारखीच आहे. आपल्या नव-याचे रंगढंग शारदा चांगली ओळखून आहे. जोशी बाई मात्र भोळीभाबडी आहे, इतकाच काय तो फरक. शारदा गरीब आहे, आणि जोशी बाई श्रीमंत आहे हे खरे, पण बाई म्हणून दोघींचेही जगणे तितकेच अभागी आहे असे शारदाला नेहमीच वाटते. क्षणभर जोशी बाईबद्दल शारदाच्या मनात कणव दाटून येते.

उद्यापासून दुपारी जान्हवीताई घरी असेल तेंव्हा कामाला यायचं असं स्वत:च्या मनाशी ठरवून शारदा बाहेर पडते आणि समोरच्या राणीच्या घरात शिरते. तिथे गरम चहाचा कप आणि चार बिस्किटे शारदाची वाट पाहत असतात. दोन मिनिटे निवांत बसून तो आयता चहा पिताना शारदा सुखावते.

राणी शारदाला एक कागद देते. “नीट वाच आणि मग सही कर. काही शंका असली तर न लाजता मला विचार,” असं म्हणत ती शारदाच्या हातात पेनही देते. राणीची कोणीतरी एक मैत्रीण ’घरकाम करणा-या बायांची’ म्हणजे मोलकरणींची संघटना चालवते हे शारदाला माहिती आहे. एकदा ती बाई राणीकडे आली असताना तिने शारदाला कामाबद्दल खूप प्रश्न विचारले होते ते शारदाला आठवलं. राणी मोलकरणींच्या हक्कांबाबत शारदाशी नेहमी बोलते. आजही तिने नियमित आणि चांगला पगार, पगारी रजा, बोनस, आठवडयाची हक्काची सुट्टी अशा गोष्टी शारदाशी बोलायला सुरूवात केली. अशा गोष्टी बोलायला काय ऐकायलाही चांगल्याच वाटतात.

पण शारदाला राणीच्या भोळेपणाचं नवल वाटतं. बाहेर काम मिळवायला आणि एक एक काम टिकवायला जीवाचा कसा आटापिटा करावा लागतो, हे राणी मॅडमला नाही समजायचं. कामाला बाया कमी नाहीत, बाईलाच काम मिळत नाहीत अशी बाहेर परिस्थिती आहे. एका बाईने एका घरचं काम सोडलं तर ते मिळवायला दहा बाया टपलेल्या आहेत. पोटापाण्याला रोजच्या पैसे लागतात आणि व्यसनी नव-याच्या बाईला ते स्वत: कमवावे लागतात, तिथं ही हक्कांची भाषा करायची म्हणजे पायावर धोंडा पाडून घ्यायचा म्हणा ना! राणी मॅडम बोलताहेत, त्यातली एक गोष्ट जरी बाहेर एखाद्या घरात बोलली तर त्या दिवशी लगेच ते काम सुटेल. या सगळ्या हक्कांशिवाय काम करायला अनेक बाया तयार आहेत. बायांची एकी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या एकीमुळे तांदूळ आणि साखर थोडीच स्वस्त मिळणार आहे, असा कडवट विचार शारदाच्या मनात येतो.

पण राणीशी हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाही. आपण बाई आहोत म्हणून शारदासारख्या गरीब बायांचं दु:ख आपल्याला समजतं, असा राणीचा समज आहे. राणी चांगली आहे, पण आपल्या जगण्याची दुर्दशा राणीला कधीही समजणार नाही, हे शारदाला मनातून माहिती आहे. शारदाला राणीचा चांगुलपणा समजतो, म्हणून ती राणीला कधी उलटून काही बोलत नाही. आजही ती नुसती मान डोलावते पण कागदावर काही सही करत नाही. राणी वैतागते आणि रागावून शारदाशी काही न बोलता पेपर वाचायला लागते. शारदाला वाईट वाटतं पण तिचा काही इलाज नाही. कागदावर सही केली नाही म्हणून राणी तिला कामावरून काढून टाकणार नाही याची शारदाला खात्री आहे.
.
सोसायटीतल्या दुस-या इमारतीपाशी पोलिस उभे आहेत. सोबत त्यांचा वास घेणारा कुत्रा पण दिसतो आहे. म्हणजे सोसायटीत आणखी एक चोरी झाली आहे तर! असा काही प्रकार झाला की शारदासारख्या हातावर पोट असणा-या लोकांवर पोलिसांची वाकडी नजर फिरलीच म्हणून समजायचे, हे आता शारदाला अनुभवाने चांगल माहिती झालं आहे. अर्थात पोलिसांना काही चोर पकडायचा असतो अशातला भाग नाही, गरीबांकडून पैसे उकळायला त्यांना चांगल निमित्त मिळतं इतकं मात्र नक्की. पैसे दिले नाहीत तर पोलिस मग उगाच घरी चौकशीला येणार, कामे बुडवून चौकीत फुकटच्या चकरा मारायला लावणार, हे पाहून शारदाच्या नव-याचं डोकं फिरणार आणि तो शारदावर भलतेसलते आरोप करणार. शिवाय कामाला दांडी मारली की ज्या त्या घरी ऐकून घ्यावं लागणार, पोलिसांनी चौकीत बोलावलं होतं हे कळताच जी ती बाई संशयाने पाहणार. हे सगळं टाळायचं तर आज देसाई बाईंकडून जास्तीच्या कामाचे जे पन्नास रूपये मिळतील, ते या पोलिसांना द्यावे लागतील.... शारदाचा कामाचा उत्साह मावळतो. आता या सोसायटीत चो-या नेहमीच्याच झाल्या आहेत. पन्नासाच्या ऐवजी वीस रूपयांत पोलिसांना पटवता आलं तर आजच्या खर्चासाठी थोडे पैसे हातात राह्तील असाही विचार शारदाच्या मनात येतो.

आणखी तीन घरचं काम आटोपून शारदा देसाई बाईंकडे पोचते तेंव्हा घडयाळाचा काटा बाराकडे झुकलेला असतो. लवकर यायला सांगितलेलं असतानाही शारदा नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर उशीराच पोचली आहे, म्हणूने देसाई बाईंचा पारा चढलेला आहे. त्यांचा आरडाओरडा सुरू होतो. शारदाला खरे तर कोणी तिच्याशी असे चढया स्वरांत बोललेले आवडत नाही, पण आत्ता या क्षणी तर शारदाला मुकाटयाने ऐकून घेण्यावाचून पर्याय नाही. देसाई बाईंसाठी आजचा दिवस खास आणि म्हणून वेगळा असेल. पण शारदाला त्याचें काय? तिच्यासाठी हा नेहमीचाचं आहे. कोणाच्या घरी वाढदिवस असो, लग्न असो, लग्नाचा वाढदिवस असो, बारसे असो की आणखी काही सण समारंभ असो, शारदाला काय फरक पडतो? या सगळ्याचा अर्थ शारदासाठी तरी ’अधिक राबणे’ इतकाच असतो. तिला या जास्तीच्या कामाचे चार पैसे जास्त मिळतात हे खरे. पण राबण्याचं आणि हातात पडणा-या पैशांचं गणित तिचं तिलाच माहिती आहे!

शारदा खोल्या झाडते, फरशी पुसून घेते. शारदा भांडी घासते. शारदा कपडे धुते. रोजची कामे उरकल्यावर – आज पाहुणे असल्यामुळे हेही काम जास्त आहे - शारदा स्वयंपाकघरात मदत करते. भाजी चिरणे, नारळ खोऊन देणे, कणीक मळणे, भाजी फोडणीस टाकणॆ, चपात्या लाटणे … शारदा कामावर काम करत राहते, उसंत कसली ती नाहीच तिला. एखाद्या यंत्रासारखी शारदा सकाळपासून गरागरा फिरते आहे. तिचे मन बंड करते. तिच्याभोवती देसाई बाईंच्या घरातली माणसे निवांत बसली आहेत. खाणे, पिणे, गप्पा सारे काही मजेत चालले आहे. मधूनच काहीतरी विनोद झाल्यावर सगळेजण खो खो हसत आहेत. सगळे मजेत दिसताहेत. त्यांच जगण चांगलं चाललेलं दिसतंय.

शारदाला वाटतं, यांच्याकडे पैसा आहे म्हणून केवळ माझ्यासारख्या गरीबाला हे लोक राबवून घेऊ शकतात. शारदाला सगळ्या जगाचाच राग येतो. ’माझ्यात काय कमी आहे?’ असा दिवसातून दहादा तिला पडणारा प्रश्न परत एकदा तिच्या मनात फणा काढून उभा राहतो. शारदा शाळेत असताना हुषार होती, चांगले मार्कही मिळायचे तिला. दहावीनंतर शिकायची स्वप्नं पाहिली होती तिनेही! शिकून नोकरी करायची, पैसे कमवायचे तिचे बेत हवेतच विरले कारण घरच्यांनी सोळाव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं! शारदा नुकतीच अठराची झाली - ती अद्याप तिची स्वप्नं विसरलेली नाही. आपली स्वप्नं कधीही पूर्ण होणार नाहीत याची तिला जाणीव झालेली आहे. कदाचित म्हणूनच आजकाल तिला शिकल्या सवरल्या माणसांना असं निवांत बसलेलं पाहून त्यांचा राग येतो. शारदाच्या डोळ्यात पाणी तरारून येतं. आता या ठिकाणी या वेळी असे डोळे भरून येणं चांगलंं नाही हे जाणवून ती हलकेच पदराने आसवं पुसते.

देसाई बाईंच्या घरचं काम संपतं तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत. आता देसाई बाईंकडे पोराच्या वाढदिवसासाठीचे पाहुणे येतील. शारदाने सगळं तयारच केलेलं आहे, आता तिच्या मदतीची गरज संपलेली आहे. “उद्या लवकर ये बर का" असं शारदाला दहा वेळा बजावायला मात्र देसाई बाई एवढया गडबडीतही विसरत नाहीत. शारदाला आपण ना दिवसभर काही खायला दिले, ना एवढया पदार्थांमधले दोन तिला बांधून देत आहोत – हे देसाई बाई सोयिस्करपणे विसरल्या आहेत.

सकाळी राणी मॅडमकडे मिळालेल्या चहा बिस्किटांव्यतिरिक्त दिवसभरात शारदाच्या पोटात दुसरे काही गेलेले नाही. आता काम संपल्यावर भुकेच्या जाणीवेने ती व्याकूळ होते. दिवसभर कामात गर्क असल्याने जे जाणवले नव्हते ते सारे तिच्या नजरेसमोर येते. घराकडे वळाणारी तिची पावले जड झाल्याचे तिला जाणवते. घरात केरोसिनचा थेंब नाही, डाळ नाही, तांदूळ नाही, हे तिला आठवते. वाटेत पोलिस हप्त्यासाठी वाट पाहत असणार त्याच्या हातात काहीतरी टिकवल्याशिवाय आजची रात्र सुखाची जाणार नाही याचे तिला भान येते. शारदाजवळ वेळप्रसंगी लागली तर असावी म्हणून नव-यापासून लपवून ठेवलेली केवळ एक दहाची नोट आहे. तेवढयाने त्या पोलिसांची भूक थोडीच भागणार आहे? आणि समजा चुकून त्यांची भागली, तरी शारदाचे काय? प्रकाशचे काय?

शारदाच्या मनात एक विचार येतो. जिन्यातून परत येऊन ती देसाई बाईंकडे पैसे मागते. तसेही देसाई बाईंनी आजच्या जास्तीच्या कामाचे पन्नास रूपये द्यायचे कबूल केलेले आहेच. शारदासाठी आज ते पन्नास रूपये लाखमोलाचे आहेत. पण शारदाच्या तोंडचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच देसाई बाईंचा आरडाओरडा सुरू होतो. “ मी काय तुझे पन्नास रूपये ठेवून पळून जाणार आहे की काय? पैशांच्या बाबतीत जेवढा चोखपणा दाखवतेस तेवढा कामाच्या वेळेबाबत बरी दाखवत नाहीस ती! आजचेच बघ, एवढे हजार वेळा तुला सांगूनही दोन तास उशीरा येऊन माझा खोळंबा केलासच ना? अगदी हजार रूपये मी देणे लागत असल्यासारखी घाई का करतेस? आलेल्या पाहुण्यांसमोर माझी अशी लाज का घालवतेस बाई? महिन्याचा पगार देताना देईन तुझे पन्नास रूपये. जा आता, उद्या मात्र लवकर ये, आजच्यासारखी कारणं नको सांगू मला." असे म्हणत दे़साई बाई शारदाची रिकाम्या हाती बोळवण करतात.

देसाई बाईंच्या घरातले लोक, आलेले पाहुणे, शेजारीपाजारी विचित्र नजरेने शारदाकडे पाहतात. कानकोंडी होऊन शारदा निमुटपणे माघारी फिरते. आता आणखी काही बोलले तर हे काम सुटेल याची शारदाला जाणीव आहे. देसाई बाई पैसे काही बुडवणार नाही हे शारदालाही माहिती आहे. पण आपण देसाई बाईची आणि तिच्यासारख्या या ब-या घरातल्या बायांची नड जाणतो आणि त्यांच्या वेळेला कामात मदत करतो. आपल्या मदतीला, आपल्या वेळेला मात्र या कोणी उपयोगी पडत नाहीत अशा कडवट विचाराने शारदाला निराश वाटते. आपल्या कामाचे, हककाचे पैसे मागावे लागतात आणि ते हातात न पडता फुकटचा अपमान तेवढा होतो याचे शारदाला वाईट वाटते.

घराकडे परतताना शारदाला केरोसिनची मोकळी बाटली दिसते, मोकळे डबे दिसतात. आज शिजवायचे काय आणि पोटात ढकलायचे काय याची शारदाला चिंता आहे. घरात प्रकाश कालच्या त्या शिळ्या भाकरीवरच असेल, म्हणजे त्याच्याही पोटात वणवाच पेटला असेल एव्हाना. अन त्याला तर भूक सहन होत नाही. कालची दारू अजून नीट उतरली नसेल तोवर भुकेच निमित्त त्याला मिळाल म्हणजे आज त्याच्या हातचा मार आहेच ठरलेला. देसाई बाईच्या कामामुळे आज घरी जायला उशीरच झालाय. म्हणजे संध्याकाळचही पाणी येऊन गेलं असणार. शेजारणीकडून काही उसनं आणायची पण सोय नाही. त्यांच्याही घरात कमी अधिक हेच असणार. आता त्यांच्या घरातली पुरूषमाणसं कामावरून आली असतील, त्यांच्यासमोर काही उसनं मागणंही अवघड. त्यांच्यातल्या कोणाकोणाशी प्रकाशची कधी ना कधी काहीतरी शिवागीळ, बाचाबाची झालेली आहे. पुरूषांची आपापसातली भांडणं घरातल्या बाईची इच्छा असो वा नसो, तिला निभावून न्यावी लागतात. दुकानदारांची आधीचीच बाकी आहे, शारदाला कोणी दारात उभदेखील राहू देणार नाही, त्यांना चुकवतच तिला घराची वाट चालावी लागते अलिकडे. काय करायचं? कुठे जायचं? - शारदाच्या डोक्यात विचारांचं चक्र अविरतपणे चालू आहे. सकाळपासून नाही, गेल्या दोन वर्षांपासून!

दिवसभर राब राब राबून शेवटी पोटात फक्त भूक उरावी या परिस्थितीमुळे शारदाला अगदी असहाय्य वाटतं, तिला स्वत:ची कीव येते. कशासाठी काम करायचं? कशासाठी जगायचं? या सगळ्याला कधी अंत तरी असणार आहे का? एक दिवस पोटभर अन्न नाही की एक दिवस सुखाची झोप नाही. कशासाठी राबायचं मग इतकं परक्यांच्या घरात, त्यांच वेडंवाकडं ऐकून घेत? - या प्रश्नांनी शारदा गांजून गेली आहे.

शारदाला वाटतं हे शहर म्हणजे लहानपणी आपण पुस्तकात वाचलं होत तशा एखाद्या राक्षसासारख आहे. दूरवरून याची भूल पडते, पण एकदा त्याच्या जवळ आलं की हे शहर आपल्यालाच गिळून टाकतं हे शहर आपल्याला हतबल करतं, आपली नामोनिशाणी मिटवून टाकतं. हे सगळं आपण एका क्षणात कां संपवू नये? नाहीतरी माहेरच्यांना आपली काही किंमत नाही, आपण मेलो तर प्रकाश आनंदाने दुसरं लग्न करेल; मोकाशी बाईला काय आणि देसाई बाईला काय दुसरी कोणीतरी बाई मिळेलच की कामाला. आपण नसल्याने कोणाचच काही अडणार नाही या विचाराने शारदा उद्विग्न होते. रस्त्यावर पुष्कळ मोठया इमारती आहेत. कोठल्यातरी गच्चीवर जाऊन खाली उडी टाकली की खेळ खलास होईल. हे रोजचे काम नको, की डोक्याला ताप नको.

पण या शहरात शारदाला मरायचीही सोय नाही. सगळया उंच इमारतींच्या दारात वॉचमन बसलेले आहेत. त्यांच्या पन्नास प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. आणि एकदा आतमध्ये समजा गेल तरी गच्चीला कुलूप असत. या शहरात जीव द्यावा अशी एकही विहीर नाही. इथल्या नदीला पावसाळ्यातसुद्धा पाणी नसतं. शारदाला या शहराचाच राग येतो. इथं धड जगायची सोय नाही आणि मरायचीही सोय नाही. हे जगणं रेटत नेण्याविना शारदाला काही पर्यायच नाही.

शारदाच्या डोळ्यांतून अश्रू झरताहेत. आपल्या रडण्यालाही काही किंमत नाही, या आसवांत काही बुडवण्याची ताकद नाही हे शारदाला माहिती आहे. भुकेची कासाविशी, घरापासूनच तुटलेपण, दमणूक, एकाकीपणा, अपमान, भीती .. ….. या सगळ्याला सामोर जात शारदाचा एक दिवस पार पडला. असे आणखी किती दिवस तिला रेटून न्यायचे आहेत? जमेल का तिला हे निभावून नेणं? या प्रश्नाच उत्तर शारदाकडे नाही. आज नाही, कदाचित कधीही असणार नाही!

**
ही कथा ‘मिळून सा-याजणी’ मासिकाच्या डिसेंबर २०११ च्या अंकात 'तिचे जगणे' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. 



Thursday, December 15, 2011

१०४. रिकामपणातलं पूर्णत्व


एखाद शहर कितीही सुरक्षित वाटत असलं आपल्याला, तरी भल्या पहाटे तिथ पोचण टाळायला पाहिजे शक्यतो, हे मी पुरेशा अनुभवानंतर शिकले.

मी ऑफिसच्या क्वार्टर्समध्ये रहात होते तेव्हा आलेल्या एका अनुभवानंतर आता ‘पुरेसे’ झाले आहेत अनुभव असा निष्कर्ष मी एकदाचा काढला. एकदा सकाळी साडेपाच वाजता घरी पोचताना रिक्षावाल्याने मला शांतपणे ‘फक्त तीनशे रुपये’ मागितले – त्या काळच्या शंभर रुपयांच्या अंतरासाठी. अगदी ‘परतीचे भाडे’ गृहित धरले तरी ही रक्कम दीडशे रुपयांच्या वर जात नव्हती. पण माझ ऑफिस एकाकी रस्त्यावर होतं आणि आमचे गेटवरचे सुरक्षारक्षक गायब झाले होते कुठेतरी. रस्त्यावर कोणी नव्हतं मी आणि तो रिक्षावाला वगळता. मी त्या रिक्षावाल्याला काही म्हणायच्या आधीच तो म्हणाला, मी आत्ता तुमच्या हातातला laptop घेऊन पळालो, तर तुम्हाला केवढ्याला पडेल ते बघा.’ त्यावेळी मी हाक मारली तर ऐकायला परिसरात कुत्रही नव्हतं. मला धक्का वसला त्या रिक्षावाल्याच्या बोलण्याचा – तरी ‘बर झाल तुम्ही काय परिणाम होईल ते आधी बोललात ते ‘ अस म्हणत मी त्याला मुकाट्याने त्याने मागितलेले पैसे दिले. तो भाग किती एकाकी आहे हे मला माहिती होतं, रिक्षावाल्याला माहिती असण्याची शक्यता कमी (नाहीतर त्याने थेट कृती नसती केली का धमकी देण्याऐवजी) असा तर्कशुद्ध विचार मला नंतर    ब-याच तासांनी सुचला!

मग मी पुणे रेल्वे स्थानकावर असलेली (गेले ते दिवस!) ‘Pre Paid’ रिक्षा सेवा वापरायला सुरुवात केली. इथ निदान काही झालच दुर्दैवाने तर नंतर तक्रार तरी करता येते. एक पोलिस हवालदार त्या बूथवर असायचा आणि रिक्षाचा नंबर आणि आपला संपर्क नंबर लिहून घ्यायचा तो. ही सेवा केवळ एक रुपयात मिळायची – तरीही पुणेकरांनी न वापरून ही सेवा बंद पाडली पुढे. असो.

एकदा पहाटे पाच वाजता मी या बूथवर पोचले. मी एकटीच आहे अशी खात्री करून घेतल्यावर पोलिसमामांनी मला एक तासभर स्थानकावरच वेळ काढण्याचा सल्ला दिला. त्या काळात रिक्षावाल्यांनी प्रवाशांना लुटण्याच्या असंख्य घटना घडत होत्या त्यामुळे पोलिस जास्त सावधगिरी बाळगत होते. ‘एक कप चहा घ्या, एखादा पेपर घ्या, वाचत बसा, तास कसा गेला तुम्हाला कळणारही नाही ... अशी मोलाची भर त्याने त्याच्या सल्ल्यात टाकली. ‘सहाच्या आत एकट्या व्यक्तींना रिक्षाने जाऊ द्यायचं नाही पहाटे’ अस काहीतरी धोरण त्या काळात असणार पोलिसांच! आता साक्षात पोलिस ‘जाऊ नका’ म्हटल्यावर आणि ते आपल्या भल्यासाठी असल्यावर स्थानकावर बसून राहण भाग होत मला. आपल्याच गावात, प्रवासातून परत आल्यावर असा स्थानकावर वेळ काढावा लागण म्हणजे काय भयंकर अनुभव असतो, हे जे त्यातून गेलेत त्यांनाच कळेल.

मग मी माझ प्रवासाच धोरण बदललं. भल्या पहाटे पुण्यात पोचणार नाही अशाच ट्रेनन मी यायला लागले. मला खर तर भल्या पहाटे माझ्या घरी परत यायला आवडायचं ..पण काय करणार?

पण त्या दिवशी मात्र मला पहाटे पाच वाजता पुण्यात पोचणा-या ‘अहिंसा एक्सप्रेस’च तिकीट मिळालं होत. दिवाळीच्या सुट्ट्यांचे दिवस होते – जे तिकीट मिळतं ते घ्या अशी स्थिती होती. त्यामुळे तिकीट बदलायच्या भानगडीत मी पडले नाही. मला पुढच चित्र दिसत होत – स्टेशनवर बसून राहाण्याच – पण नाईलाज होता. मला पुणे रेल्वे स्थानकावर बसून रहायचं जीवावर आलं होत. मग मी ठरवलं की आपण शिवाजीनगर स्टेशनवर – म्हणजे एक स्टेशन आधीच उतरू. तिथही बसून राहावं लागेल तासभर – पण निदान बसून राहण्याची जागा तरी बदलेल असा माझा विचार होता. पावणेपाचच्या आसपास गाडी शिवाजीनगरला पोचेल तेव्हा तिथे पहिली लोणावळा लोकल पकडणा-या लोकांची गर्दी असेल असा मी अंदाज बांधला.

शिवाजीनगरला गाडी थांबली. बरेच लोक उतरले. मीही उतरले. हातात घड्याळ नव्हत त्यामुळे वेळेच काही भान नव्हत. दोन नंबरच्या फलाटावरून एक जिना चढून आणि उतरून मी एक नंबरच्या फलाटावर आले तेव्हा फलाट अगदी रिकामा होता. स्टेशनवर उतरलेले सगळे लोक घाईघाईने बाहेर पडले होते. ते ठीक. पण लोणावला लोकलसाठी कोणीच कसं नव्हत? मी फलाटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली आणि माझ्या लक्षात आलं की पहाटेचे फक्त साडेतीन वाजलेले आहेत. ही गाडी राजकोट ते त्रिवेंद्रम अशी सुपर असल्यामुळे ती पुण्यात तासभर आधी येते नेहमीच्या अहिंसा एक्सप्रेसपेक्षा हे मी विसरून गेले होते पार!



त्या क्षणी त्या फलाटाच, त्या स्थानकाच रिकामपण आणि तिथली शांतता मला एकदम आवडली. जणू ती माझ्यात झिरपली. मी एकटी होते तरी मला भीती नाही वाटली. स्टेशन असं निर्मनुष्य नसेल, कोणीतरी रेल्वेची माणस असतील इथच कुठतरी असा विश्वास होता मला कदाचित. मी दोन तीन दीर्घ श्वास घेतले. पहाटेच्या त्या ताज्या हवेने मला एकदम बर वाटल, डोळ्यातली झोप निघून गेली. मग मला एका बाकड्यावर झोपलेलं एक कुत्र दिसलं. माझी चाहूल लागल्यावर त्याने क्षणभर डोळे उघडले, आणि निर्विकारपणे माझ्याकडे पाहिलं. परत त्याने डोळे मिटले – माझी अजिबात दखल न घेता!

आसमंतात फक्त शांतता होती. फलाटावरच्या घड्याळाची टिकटिक आणि माझ्या हृदयाचे ठोके एवढाच काय तो आवाज होता. कुत्री भुंकत नव्हती, पाखर झोपली होती, माणसं नव्हतीच तिथ. मी एका नव्या जगात; एका गूढ विश्वात गेल्यासारखं वाटत होत मला त्या क्षणी! सगळ माहितीच असूनही नवं वाटाव असं काहीतरी विचित्र होत! एक प्रकारच मृगजळ, मायावी दृश्य होत ते! आता यातून नवं जग उदयाला येईल आपल्या नजरेसमोर अस वाटाव अशी परिस्थिती होती. एक परिपूर्ण आणि असीम शांतता होती माझ्या भोवताली आणि तिच प्रतिबिंब माझ्या आतही होत! माणसांनी निर्माण केलेल्या रचना, वास्तू यांच्यातही एक वेगळ सौंदर्य आणि शांती असते असं मला त्या पहाटे प्रकर्षाने जाणवलं. माणसाच आणि निसर्गाच नात कधीही तुटणार नाही असा दिलासा मिळाला मला तेव्हा – का कुणास ठावूक!

शिवाजीनगर स्थानकावर भल्या पहाटे एकटीने व्यतीत केलेल्या त्या क्षणांनी मला नकळत पुष्कळ बळ दिलं. भौतिक विकास, भौतिक प्रगती आणि आंतरिक विकास हे किती परस्पर संबधित असतात, किती परस्पर विरोधी असतात, त्यांच्या नात्याचे ताणेबाणे काय असतात .... असा काहीसा असंबद्ध विचार त्या काळात मी करत होते .... त्या सगळ्या प्रश्नांची एकदम उत्तर मिळाल्यागत झालं त्या अनुभवातून. जणू सगळे प्रश्न संपून गेले.

असाच अर्धा पाऊण तास गेला. मग चहाचा काउंटर उघडला. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. पेपर विकणारा आला. त्यानेही माझ्याकड पाहिलं. लोक आले. आवाज वाढला. तोवर शांत झोपलेलं कुत्र एक आळस देऊन नाहीस झालं. कावळे-चिमण्यांचे आवाज यायला लागले. गाडी आली. त्यात लोक चढले – उतरले कोणीच नाहीत. कारण पुणे स्थानकातून लोणावळ्याला जाणारी पहिली लोकल होती ती. एका मिनिटासाठी ती गाडी चुकलेल्या लोकांची गर्दी झाली. दिवस उजाडला. तोवर ते गूढ वाटणार जग आता रोजच्यासारख झालं. मला त्या सगळ्या बदलाशी जुळवून घ्यायला थोडे कष्ट पडले. हातातून काहीतरी अमूल्य निसटतय अस वाटल ..... पण तसं नाही हेही कळलं.

आजवर शेकडो वेळा मी आले गेलेले हे स्टेशन. त्या पहाटे रिकामपणातल पूर्णत्व, काही नसल्यातलं असलेपण .... याचा मला एक वेगळाच अनुभव आला. वरवर दिसणा-या विरोधाभासात एक धागा असतो सातत्याचा हे समजून आतून एकदम शांत झाले मी.

आता कधी जेव्हा एखाद्या द्वंद्वात सापडते मी मनाच्या – भावनांच्या, विचारांच्या, मूल्यांच्या – त्यावेळी रिकामपणातल्या त्या पूर्णत्वाची मला आठवण येते .. आणि हरवली आहे असं वाटणारी वाट पुन्हा एकदा नव्याने गवसते मला.
**

Thursday, December 8, 2011

१०३. . भायर वचपाची वाट

अलिकडे मला एक नवीनच जाणीव झाली आहे.  किंबहुना जाणीवेची जाणीव झाली आहे असं म्हणावं लागेल.
ती म्हणजे: शब्द, माणसं, रस्ते, प्रवास ... या सगळ्यात फार मोठ साम्य आहे.
म्हणजे कोण कधी भेटतील; कोण सोबत राहतील; कोण मागे पडतील; कोण लक्षात राहतील; कोण विसरले जातील; कोण सुखावतील आणि कोण दुखावतील; कोण ओळखीचे असून अनोळखी होतील; कोण अनोळखी असतानाही आपले वाटतील; कोण कधी परके होतील ....... कशाच काही गणित नाही. सगळच बेभरवशाचं!
नागपूर – अमरावती – मुंबई असा प्रवास करत करत – प्रत्येक ठिकाणी कामं करत -  मी त्या सकाळी गोव्यात डाबोलीम विमानतळावर उतरले तेव्हा खर तर मी ब-यापैकी दमलेली होते. पुढच्या चार दिवसांच काम समोर दिसत होत. बाहेर पडताना मला बोर्ड दिसला ‘भायर वचपाची वाट’ आणि मी एकदम स्तब्ध झाले.
कितीतरी रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर, कार्यालयांत ... ही सूचना वाचलेली. ‘बाहेर पडण्याचा मार्ग’ – त्यात नवं काहीच नाही – कोणत्याच अर्थाने. शब्द जुने, त्यांचा प्रचलित अर्थ जुना, त्यातून काय करायचे हेही स्पष्ट – कोठेच अनिश्चितता नाही. तरी मला एकदम ते शब्द काहीतरी सांगताहेत असं वाटल.
मग कितीतरी गोष्टी आठवल्या.
सिंहाच्या गुहेत आत जाताना दिसणारी पावलं पण बाहेर न पडणारे प्राणी ...
बाहेर पडायचं कस हे माहिती नसताना चक्रव्यूहात शिरणारा आणि प्राण गमावणारा अभिमन्यू ....
भूकंपात ढिगा-याखाली गाडले गेलेले लोक ....
पर्याय नसल्याने दु:खाची नाती निभावत राहणारे लोक ....
कांही प्रसंग निसर्गाने, नियतीने दिलेले ...काही ओढवून घेतलेले ...
प्रत्येक वेळी मी ‘भायर वचपाची वाट’ शोधताना माझी झालेली तगमग आठवली; त्यातली उत्सुकता आठवली; त्यातला साहसाचा भाव आठवला; त्यातला आनंद आठवला; त्यातलं नाविन्य आठवल; जे नवं होत ते जुनं होत जाताना झालेला भ्रमनिरास आठवला ...
खरं तर प्रत्येक गोष्टीतून ‘भायर वचपाची वाट’ असतेच .. पण कधी ती दिसत नाही, कधी ती सुरक्षित वाटत नाही, कधी अडकून राहण्यातच मनाला समाधान वाटत राहतं .. तर कधी नवे धोके पत्करायची आपली तयारी नसते ...कधी इच्छा असते पण शरीराची ताकद नसते .... कधी ‘असू दे असंच’ अशी मानसिकता असते.
पण ‘भायर वचपाची वाट’ आहेच ... ही जाणीवच बराच  दृष्टिकोन बदलून टाकते हे मी पुन्हपुन्हा अनुभवलं आहे हे मात्र खरंच!
‘भायर वचपाची वाट’ शोधत राहण्याचा हा एक चक्रव्यूह  आहे आणि त्यातून ‘भायर वचपाची वाट’ नाही असं तर नाही ना हे अखेर ? – अशी एक शंकाही  आत्ता हे लिहिताना माझ्या मनात डोकावली आहे .....

Saturday, December 3, 2011

१०२. रस्ते


परवा सहज लक्षात आलं की मागच्या वर्षभराचे फोटो तसेच पडून आहेत कॅमे-यात.
मग तो एक नादिष्टपणा झाला. वेळ मिळाला की फोटो उघड; तो ठेवायचा की नाही ते ठरव; त्याला नाव दे; त्याचा आकार कमी करून घे, तो योग्य त्या फोल्डरमध्ये टाक ....इत्यादी,
वर्षभरात किती नवे रस्ते मी पाहिले तेही लक्षात आलं.
राजस्थानच्या बाडमेरमधले वाळवंटी रस्ते, पानिपतच्या क्षेत्रातले इतिहासाशी नाळ जोडणारे रस्ते; कर्नाटकातल्या हरीसंद्रा गावातली कोणत्यातरी देवाची मिरवणूक दाखवणारे रस्ते; आंध्रातला गोळकोंडा किल्ल्यापर्यंत नेताना अचानक अरुंद होणारा रस्ता; बंगलोरच्या लालबागेतले हिरवेगार थंड रस्ते; त्रिपुरातले देशांच्या सीमा अधोरेखित करणारे रस्ते; मेघालयातले निळ्या डोंगरांच्या साथीने निवांत असणारे रस्ते; कारेकलमध्ये  त्सुनामीच्या आठवणी सांगणारे रस्ते; उत्तराखंडमधले वळणावळणांचे धुक्यात हरवलेले रस्ते; मार्थंडममधले झाडांनी सावली धरलेले रस्ते; छत्तीसगडमधले बाजार भरलेले रस्ते; पंजाबमधले आमच्यासाठी खास मोकळे केलेले रस्ते; कन्याकुमारीतले जुन्या आठवणी जागवणारे रस्ते; उत्तर प्रदेशातले उजाड रस्ते; रांचीतले पर्यायी रस्ते; समुद्राची जाण करून देणारा दमणमधला रस्ता; दुधनीचा मधुबनी धरणाच्या काठाने जाणारा रस्ता; त्रिवेंद्रमचे सौम्य रस्ते; गोहाटीकडून शिलॉंगकडे जाणारा स्वत:त रमलेला  रस्ता; चंदिगढमधले व्यवस्थित रस्ते, मुंबईतले पावसाने बुडवून टाकलेले रस्ते; नागपूरमधले कधीच माहिती नसलेले रस्ते.
दिल्लीतले खर तर नवे पण तरीही जुने वाटणारे रस्ते ...
पुण्यातले जुने आणि तरीही आता विस्मरणात गेलेले रस्ते ....
काही ओळख विसरून गेलेले रस्ते.....
आयुष्यात काही नव्यानेच आलेले रस्ते ...
काही जाणीवपूर्वक बंद केलेले रस्ते ...काही हरवून गेलेले रस्ते
काही सुटलेले रस्ते .. काही विस्कटलेले रस्ते ..
काही चुकलेले रस्ते .. काही योगायोगाने गवसलेले रस्ते ....
काही जमिनीवरचे रस्ते, काही मनातले रस्ते ...
काही दिसणारे रस्ते ... काही फक्त स्वप्नातले रस्ते ...
काही टिकणारे ... काही नामशेष होणारे ...असे हे असंख्य रस्ते ...
आणि त्यावरून तितक्याच नवलाईने, उत्साहाने चालणारी मी
चालते मी? की मी स्थिर असून रस्तेच चालत आहेत? -  असा भास निर्माण करणारे रस्ते ...

असा हा अविरत वाटणारा पण एक निश्चित शेवट असणारा प्रवास.
त्या शेवटापर्यंत नेणारे हे रस्ते ...

Saturday, November 26, 2011

१०१. केंद्र परिघाचं नातं

वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते.

तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात. स्वत:च नाव सांगायची प्रत्येकीची त-हा वेगळी. कोणी घाईघाईने नाव सांगून मोकळी होत होती; तर कोणी आधी हसावं की नाव सांगावं या संभ्रमात. एखादी दुसरीलाच नाव सांगायचा आग्रह करत होती – तेंव्हाचा त्यांचा संवाद ऐकण्याजोगा होता.

त्यांनी सहा सात महिन्यांपूर्वी हा बचत गट स्थापन केला होता. महिन्यातून एकदा त्या सगळ्या नियमित भेटतात आणि बचत करतात. बॅंकेच दर्शन त्यातल्या एक दोघींनीच घेतलेलं – तेही या गटामुळे. बचत गटाच वैयक्तिक पासबुक त्या अगदी जपून ठेवतात. प्रत्येकील मी तिच पासबुक पहावं असं वाटतं. खरं तर एक दोन पासबुकं पाहिली की कळतो त्या गटाचा एकंदर आर्थिक व्यवहार आणि शिस्त. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी प्रत्येक पासबुक पाहते, त्यावर काहीतरी बोलते /विचारते आणि हसून ते परत करते.

मी त्यांच्याकडून गट बांधणीच्या प्रक्रियेची माहिती घेते आहे. ती घेताना त्यांच जगणं, त्यांचा संदर्भ मी समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. मी इतके सगळे प्रश्न का विचारतेय हे त्याही समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत हे माझ्या लक्षात येतं.

खरं तर जगण्याबद्दल विचार करत बसण्याची चैन त्यांना परवडणारी नाही. दारिद्र्याशी झुंजण्यात त्यांची सारी शक्ती खर्च होते. हंडाभर पाणी आणायचं तर अर्ध्या तासाची पायपीट केल्याविना त्यांना ते मिळत नाही. घरात खाणारी सहा सात तोंडं आहेत – त्याची तजवीज करावी लागते. लाकूडफाटा, धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई, शेणगोठा – ही त्यांचीच कामं! गेली दोन वर्ष पावसानं ओढ दिलीय खरी, पण शेत तयार तर करावं  लागतं आशेनं!

गावातल्या अनेक गोष्टींबद्दल आम्ही बोलतो. इतर गावातील गटांचे अनुभव मी त्यांना सांगते तेव्हा त्यांच्या नजरेत नव्या स्वप्नांचं बीज रुजताना मला दिसतं.

“ताई, रसायन घ्यायला आवडेल का तुम्हाला?” रखमाताई विचारतात आणि मी दचकते. फार वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशाच्या भटकंतीत तिथल्या आदिवासींच्या भावनांचा मान राखण्यासाठी मी ‘अपांग’(तांदळाची दारू) चाखली होती. तसाच प्रसंग दिसतोय आज. माझा गोंधळ चेह-यावर दिसला असणार. कारण नीता (सोबत असलेली संस्थेची कार्यकर्ती) हसून म्हणाली, “घाबरू नका, रसना पिणार का  असं विचारताहेत त्या!”

रखमाताई आधीच माझ्याशी बोलताना जरा बावरलेल्या होत्या. नीताच्या बोलण्यावर जमलेल्या सगळ्या बाया हसतात तेव्हा त्या आणखीच खजील होतात. मला एरवी रसना आवडत नाही. पण आत्ता रखमाताईंना बरं वाटावं म्हणून मी उत्साहाने होकार देते.

रखमाताईंच घर छोटसं आहे. पुरेसा उजेड पण नाही. रसना येतं. मी ग्लासातलं रसना कमी करायचा प्रयत्न करते तो एकमुखाने हाणून पाडला जातो.

मग गावात एक फेरफटका मारायला आम्ही निघतो. गुलाबताईंच घर दूर आहे. पाण्याचा टिपूस नसलेल्या नदीच्या पात्रातून आम्ही चाललो आहोत. भर दुपारी दोन वाजता वाळूतून चालणं सोपं नाही. आम्ही दोघी तिघी सोडल्या तर कोणाच्याच पायात चप्पल नाही. पण जणू एखादा आनंदसोहळा असल्यागत सर्वांचा उत्साह!

एक चढण चढून आल्यावर समोर एकदम हिरवाई आहे. गुलाबताई बायफ संस्थेच्या शेती विकास कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. खड्डे कसे खणले, लांबून पाणी आणून लेकराच्या मायेनं आंबा आणि काजू कसे जगवले, त्यापायी शरीर कसं हलकं झालं ... असं बरंच काही गुलाबताई बोलतात. त्यांचं घर त्यामानाने मोठं वाटलं मला. एका दोरीवर काही कपडे टांगलेले होते; एका कोप-यात चूल – दोन तीन पातेली आणि तीन चार ताटल्या फक्त दिसल्या. दुस-या कोप-यात दोन मध्यम आकाराच्या कणग्या. आणि तिस-या कोप-यात एक मध्यम आकाराची पेटी. घरात फक्त एवढंच सामान.

शेजारचे लहान-मोठे सगळे मला पहायला येतात. पुन्हा एकदा ‘परिचयाचा’ कार्यक्रम होतो. एक पोरगेलासा तरुण पुन्हा एकदा मला नाव विचारतो. नवा शब्द सापडल्यागत तो स्वत:शी हसतो आणि एका अंधा-या कोप-यात दिसेनासा होतो. दोन मिनिटांत तो लगबगीने परततो. “माझ्या लग्नाला यायचं बरं  का ताई,” असं म्हणत माझ्या हातात पत्रिका देतो. त्याचा निरागस आनंद पाहून “लग्नाच्या योग्य वयाबाबत” काही बोलायचा मोह मी निग्रहानं टाळते.

तेवढ्यात टोपलीभर बटाटे घेऊन एक आजीबाई येतात. इतके स्वच्छ आणि तुकतुकीत बटाटे मी आजवर कधी पाहिले नव्हते. त्या बाजारात बटाटे विकायला निघाल्या आहेत असं समजून मी विचारते, “किती किलो बटाटे आहेत, आजी?” त्यावर आजीबाई हसत म्हणाल्या, “ मापून थोडेच आणलेत? तुझ्यासाठी घेऊन आलेय मी. घरी घेऊन जा.”  

सकाळपासून या गावात मला आदराची आणि प्रेमाची वागणूक मिळते आहे. या गावात मी आयुष्यात पुन्हा कधी कदाचित पाऊलही टाकणार नाही. या स्त्रियांकडून खास वागणूक मिळावी असं वास्तविक मी काही केलेलं नाही. मी या स्त्रियांशी फक्त गप्पा मारायला आलेय. मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय -  आशेनं त्या माझ्या पुढेपुढे करताहेत अशातलाही भाग नाही. मला भरून आलं – माझ्या डोळयांत पाणी तरारलं.

पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते वास्तवही स्वीकारतं. सकाळपासूनच्या भारावून टाकणा-या आदरातिथ्यासमवेत नकळत नजरेआड केलेली वास्तवाची काही प्रखर रुपंही होती – ती आता ठळकपणे नजरेसमोर येऊ लागली.

शहर असो की खेडं, माणसांच्या मूळ स्वभावात आणि परस्परनातेसंबंधात फारसा फरक आढळत नाही. व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी माणसं यांत नेहमीच अंतर राहतं. मी या गावातली – त्यांच्यातलीच एक - असते; तर रखमाताईंनी मला ग्लास भरून रसना दिल नसतं; आपलं काम सोडून या स्त्रिया माझ्याशी अशा गप्पा मारत बसल्या नसत्या; गुलाबताईंनी मला आग्रहाने त्यांच्या घरी नेलं नसतं आणि त्या पोरगेल्या युवकाने मला इतक्या लगबगीने त्याच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नसतं.

पण बाहेरून पाहिलं, की तेच जग वेगळं दिसतं!

आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी  वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते. रोजच्या संबंधातील व्यक्तींना गृहित धरून चालताना आपलं काही चुकतंय असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्यातील एका व्यक्तीला नेम धरून एकटं पाडणं – हा समाजातल्या रंजनाचा सर्वमान्य नमुना. कोणाच्याही अनुपस्थितीत भलतेसलते शेरे मारत त्या व्यक्तीच्या वागण्याचा अनर्थ काढण्यात आपली सारी हुशारी खर्ची पडते. रोजचे संबंध आले की, काही वाटून घेणं, काही सोडून देणं, काही स्वीकारणं भाग असतं. ते आपण सहज करू शकत नाही. क्रिया-प्रतिक्रियांच्या जंजाळात सोप्या गोष्टी अवघड करून घेण्यात, दुस-यांच्या माथी खापर फोडण्यात धन्यता वाटायला लागते. आपल्यात मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच दुर्दैवाने उरते!

परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते. कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं  असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा होईलही!

वैशाखाच्या रणरणत्या उन्हात कधीतरी आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली बसण्याच सुख जरूर उपभोगावं! पण रोजचीच गोष्ट असेल तर आपली सावली आपल्याला आतच शोधायला हवी!

पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २००४           

Friday, November 18, 2011

१००. कौतुक


मी तिच्याकडे पाहून सहज हसले. उत्तरादाखल तीही मोजकं हसली.
“वा! चहा फार छान झालाय, मला आवडला” मी म्हणाले. मला तिला ते सांगायचं होतंच म्हणून तर मी सुरुवात केली होती संवादाची.

मी शहादयातून पुण्याला चालले होते. चौदा तासांच ते अंतर एरवी बसने जाताना कठीणंच असतं – आत्ता मी ऑफिसची गाडी घेऊन आले होते पण अंतर तर तेवढं काटायचं होतंच. एरवी एकटीने प्रवास करताना सहसा चारचाकी घेऊन जात नाही  मी. पण यावेळी हात दुखावला होता, डॉक्टरांनी प्रवासाला परवानगी दिलेली नव्हती. पण हा इथला कार्यक्रम नवा होता, त्याची आखणी मी केली होती त्यामुळे मला यायचं होतं – मग पर्याय म्हणून – सुखाचा प्रवास म्हणून – गाडी घेऊन इथवर आले होते मी आणि आता परत चालले होते पुण्याला.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या परिसरात वाहनचालकाला चहा प्यायची लहर आली आणि म्हणून आम्ही इथं थांबलो होतो.

रस्त्याच्या कडेला चहाची एक टपरी होती. लक्ष वेधून घेणारं त्या टपरीत काही विशेष नव्हतं. दोन प्लास्टिकची टेबलं, काही मोडक्या आणि रंग उडालेल्या तशाच खुर्च्या, एका खोक्यावर चहाचं सामान – तिथंच दोन बरण्यांत बिस्कीटं, क्रीम रोल आणि खारी, स्टोव्हचा भर्रकन येणारा आवाज, रॉकेलचा वास. तिशीतली एक स्त्री त्या टपरीची सर्वेसर्वा दिसत होती – चहा ती बनवत होती, ऑर्डर घेत होती, पैसे घेत होती, कप विसळत होती, गिऱ्हाईकांशी बोलत होती. ती एकटीच सगळं सांभाळताना दिसत होती. कामाने तिचा चेहरा रापलेला दिसत होता. दुपारचे साडेतीन वाजत आले होते त्यामुळे तिथं फारशी गर्दी दिसत नव्हती.

मी चहा प्यायला फार उत्सुक नसते. बरेचदा घशाला काही तरी गरम हवं म्हणून मी चहा पिते. मी पिते त्यातले बरेच चहा ‘गरम असणं’ ही माझी गरज पुरवतात – इतकंच. पण चांगला चहा मिळाला तर त्याला दाद कशी द्यायची हेही मला माहिती आहे. असे प्रसंग अपवादानेच येतात पण आज तो अपवाद होता.

माझ वाक्य ऐकून त्या स्त्रीचा चेहरा एकदम उजळला. ती मनापासून हसली. तिचे डोळे चमकले. तिचा चेहरा सैलावला. तिने थेट माझ्या नजरेत नजर मिळवून मी किती प्रामाणिक आहे हेच जणू तपासून पाहिलं. कशामुळे कुणास ठावूक पण तिची खात्री पटलेली दिसली.

 “ताई, अजून एक कप चहा घ्या”, तिने आमची जुनी ओळख असल्यागत फर्मान सोडलं.

आता याबाबतीत मी अगदीच वाईट आहे. म्हणजे एखादा पदार्थ आवडला म्हणून मी तो जास्त खाऊ शकत नाही कधीच. खाणं ही इतर अनेक कृतींसारखी  ‘गुणात्मक’ कृती असते असं  माझं मत – त्याचा पदार्थाच्या दर्जाशी संबंध असतो पण संख्यात्मक असं त्यात काही नसतं.

“चहा मस्त झालाय, पण अजून एक कप नाही घेता येणार मला – जास्त पीत नाही चहा मी, “ मी नम्रपणाने तिचा आग्रह धुडकावून लावला.

“तुम्ही काळजी करू नका ताई. हा चहा माझ्याकडून तुम्हाला फ्री आहे – म्हणजे पैसे नाही मागणार मी तुमच्याकडून या चहाचे.” तिन स्पष्टीकरण दिलं.

हे काहीतरी वेगळं घडत होतं. एक गरीब बाई तिच्यापेक्षा ब-या परिस्थितीतल्या बाईला काही कारण नसताना फुकट चहा पाजत होती – काही ओळखदेख नसताना.

“तुमचा हट्टच असेल, तर दया मग एक कप चहा,“ मी माघार घेतली – मला जास्त ताणता येत नाही. पैसे तर देईनच मी त्याचेही. ती आणखी मोकळेपणान हसली आणि उत्साहाने आणखी एक कप चहा तिने मला दिला.

मी खुर्चीवर ऐसपैस बसले. वाहनचालकाला माझ्याबरोबर असण्याची सवय होती – त्यामुळे तोही निवांत होता. मग आम्ही गप्पा मारल्या – तिचा चहाचं दुकान, तिचं घर, तिची मुलं, तिचं जगणं, तिचे अनुभव, तिचं दु:खं .. असं आम्ही बरंच काही बोललो. तिलाही प्रश्न होते माझ्याबद्दल – मी नोकरी करते का, ही चारचाकी माझी होती का वगैरे. मी तिच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली.

मी तिला पैसे दिले तेव्हा तिने या आग्रहाच्या चहाचे पैसे खरंच घेतले नाहीत माझ्याकडून – मला जरा संकोच वाटत होता त्याचा. निघतानिघता मी तिला सहज विनोदानं म्हटलं, “असा सगळ्या येणा-या जाणा-यांना फुकट चहा पाजला तर पैसे कसे सुटणार तुला यातून?”

ती एक क्षण गप्प बसली. माझ्याशी बोलावं की नाही याचा ती विचार करत होती बहुधा. तिच्या कसल्यातरी रहस्याला मी नकळत हात घातला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला – तिची नजर आता क्षितिजापल्याड होती. त्या क्षणी ती मला काहीशी दु:खी भासली – भासच असावा तो कदाचित!

मग ती पुन्हा हसली आणि हळुवारपणे म्हणाली, “ माझ्या दुकानात रोज दोनशेच्या आसपास लोक येतात चहा प्यायला. त्यातले बरेचजण अगदी रोज येतात. मी मागची पाच वर्ष इथं चहा विकतेय. पण ताई, माझ्या चहाचं कौतुक करणा-या तुम्ही पहिल्याच! मी इतकं काम करते त्याचं चीज झाल्यागत वाटलं मला तुमचे कौतुकाचे शब्द ऐकून.”

त्यावर काय बोलावं ते मला सुचेना. कुणाकडून कौतुकाचा शब्द कानी न येणा-या पण आयुष्यभर राबणा-या या बाईची मन:स्थिती मला चांगलीच समजली. लोक त्या चहाचे पैसे देतात हे खरं, आणि त्या पैशांची त्या स्त्रीला गरज आहे हेही खरं – पण सगळा देवघेवीचाच व्यवहार असतो का फक्त? कामाचा दर्जा सदोदित चांगला ठेवणं हे किती कमी लोक करतात – मग त्याबद्दल एखादा कौतुकाचा शब्द उच्चारायला लोकांना एवढं जड का जातं?

प्रसंगाचं गांभीर्य हलकं करण्यासाठी मी हसत म्हटलं, “एकदा चहाला छान म्हटलं की एक कप चहा फुकट मिळतो हे एकदा कळलं की सगळे लोक तुझ्या चहाला छान म्हणायला लागतील आणि मग तुझी पंचाईत होईल...”

“ताई, खरं मनापासून केलेलं कौतुक आणि स्वार्थासाठी केलेली तरफदारी यातला फरक ओळखता यायला पाहिजे .. तीच तर खरी मेख आहे ...” तिनं मला सांगितलं.

मला तिचं म्हणण समजलं नाही. मी तिला म्हटलं, “अग, समजलं नाही मला तू काय म्हणतेस ते, जरा समजून सांगशील का मला?”

तिन परत एकदा माझ्याकड पाहिलं. मग समजावणीच्या सुरात ती म्हणाली, “लोक फार कमी वेळा मनापासून कौतुक करतात. ब-याचदा आपल्याकडून काहीतरी साधून घ्यायचं असलं तर लोक आपलं तोंडावर कौतुक करतात. आपण जे सहजासहजी करणार अथवा देणार नाही ते कौतुकाला बळी पडून करू असा त्यांचा अंदाज असतो – आणि आपण बरेचदा फसतोही तसे! काही वेळा स्वत:ची चूक लपवायला लोक आपलं कौतुक करतात – मग आपण त्यांच्यावर पटकन रागावू शकत नाही ना! म्हणजे एका अर्थी आपलं कौतुक करून लोक आपल्याला त्यांचं गुलाम बनवून टाकतात – थोडा वेळ का असेना! पण जुन्या काळाची राजहंसाची गोष्ट आहे ना – तो पक्षी ज्याला पाणी आणि दूध वेगळ करता येतं – तसं आपल्याला जमलं पाहिजे. खोट कौतुक कोणतं आणि खर मनापासून केलेल कौतुक कोणतं – आपल्याकडून काहीतरी काम करून घेण्यासाठी केलेल कौतुक कोणतं आणि काही स्वार्थ नसणार कौतुक कोणतं – यातला फरक कळला पाहिजे. खरं कौतुक घ्यायचं आणि खोटं कौतुक टाकून द्यायचं असं करावं लागतं. जे आपलं सुख पाहत नाहीत त्यांच्या वरवरच्या शब्दांना कधी भुलून नाही जायचं ताई “ ती स्वत:शीच बोलत होती .. मी त्या क्षणी निमित्तमात्र होते खरी!

मला त्या स्त्रीचं मनापासून कौतुक वाटलं आणि तिच्या जगण्यातून आलेला अनुभव मला तिनं दिला म्हणून तिच्याबद्दल आदरही वाटला.  त्यादिवशी मला फक्त चांगला चहा नाही मिळाला .. एक अविस्मरणीय धडाही मिळाला.  मला वाटतं तिनं मला इतकं सगळं सांगणं – ओळखीविना, कसल्याही अपेक्षेविना -  हे एका प्रकारे माझं केलेल कौतुकच होतं अस मी मानते..

मला अजून तिनं सांगितलेल्या वाटेवर चालायला नीट जमलेलं नाही. कधीतरी जमेल तेही अशी आशा मात्र आहे.
**