ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, February 23, 2017

२४८. धोंडा

“आपल्याकडं दिवाळीला नंदाताई येणार आहे राहायला. तिला त्रास द्यायचा नाही बरं का”, जेवण करताना आईनं सांगितलं. कैतरी म्हत्त्वाचं असलं की जेवणाच्या येळी समद्यांना सांगायची आईला सवय हाये. म्हणजे नंदाताई म्हत्त्वाची असणार.
पण ही नंदाताई कोण? म्या तर कंदी बगितली नव्हं.
“ही कोनाय?” म्या दादाला हळूच इचारलं.
माजं हळू म्हंजे आज्जीच्या भाषेत ‘जाहीरनामा’ – म्हंजे बोंबाबोंब.
“आपल्या सुमन आत्त्याची मुलगी,” दादा म्हन्ला.
“म्हंजे मेलेल्या आत्त्याची?” म्या इचारलं.
येकदम लई कायकाय झालं.
आज्जीनं माज्या पाटीत गुद्दा घातला. दादानं एक चिमटा काढला. आईनं ड्वाळं वट्टारलं. आण्णांनी माज्याकडं लईच रागानं पायलं. म्या मान खाली घातली. उरावर धोंडा बसला बगा.
मेलेल्या आत्त्याची पोरगी.
कशी आसंल ती?
***
आण्णा घिऊन आले नंदाताईला.
मला नाय आवडली.
तशी म्याबी गोरी न्हाई, पर ती पारच काळीढुस्स.
म्या तिच्यासंगट जास्ती बोल्ले नाय.
दादाचंन तिचं मातुर झ्याक जमलं. कायबाय हसायचे-बोलायचे सारके.
म्या गपचिप त्यांच्या मागंमागं र्‍हायची. नंदाताईला लई कायकाय म्हैती. गाणी काय, गोष्टी काय, खेळ काय, चा काय – इचारू नगा. त्या दिशी तिनं केलेली शाबुदाणा खिचडी येकदम बेश. मंग मला नंदाताई आवडाया लाग्ली. तिचा हात धरून म्या गावभर हिंडाया लाग्ली.
पंदरा-इस दिसांनी नंदाताईला तिच्या घरला पोचवायचा विषय निगाला. आज्जीनं डोळ्यास्नी पदर लावला. नंदाताईबी सारकी रडाया लागली. राती माजा हात गच्च पकडून बोल्ली, “आन्जे, मला नाही जायचं घरी. कधीच नाही. मामा-मामीला सांग तू."
***
म्या लगी आज्जीकडं. आज्जी बोल्ली की आई-आण्णा दुसरं काय म्हणत न्हाईत.
“नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्याचं” म्या आज्जीला लाडानं बोल्ली. तर आज्जी “ती परक्याची पोर” असलं कायबाय बोलाया लाग्ली.
फुस्स! आज्जीचा येळंला कायबी उपेग नसतोयच.
आण्णांकडं ग्येले, “नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्यायचं” बोल्ले तर आण्णा “बरं” म्हन्ले. पर मला काय त्यात रामसीतामाय वाटलं न्हाय.
आईला बोल्ले तर म्हन्ली, “आपल्या गावात शाळा कुठंय नंदाताईसाठी? आपला दादाच शहरात राहून शिकतो ना? तू हट्ट केलास तर शाळा बुडेल तिची. शहाणी मुलगी ना तू.”
पोरींनी शाळा शिकाया पायजे हे बरोबर हाय. गुर्जीबी सांगतेत.
म्या नंदाताईला बोल्ली, “न्हाय जमायचं. शाळा बुडंल की तुजी.”
नंदाताई येकदम गप झाली.
****
आमी वड्यापल्याडच्या मळ्यात फिराया गेल्तो.
नंदाताई एकलीच हाये. तिला ना भैण, ना दादा.
ती आप्पांसंगट राहते. आप्पा म्हंजे तिचे वडील.
तिची आज्जी – म्हंजे आप्पांची आई – कंदीमंदी येऊन जाते त्यांच्याकडं.
आमची आज्जी कंदी तिकडं जात नाय. आण्णाबी नाय. म्याबी नाय.
तीबी येत न्हाय. या दिवाळीला पैल्यांदा आली.
म्या नंदाताईला इचारलं, “तुला करमत न्हाय का येकलीला? तुला का नाय परत जायाचं तुज्या घरला?”
नंदाताई रडाया लाग्ली. म्हन्ली, “आमचे आप्पा फार वाईट आहेत. आईला मारायचे नेहमी. आता मला मारायला लागलेत सारखे. आन्जे, मला जर परत तिकडं पाठवलं ना तर मी जीव देईन आईसारखा.”
सुमन आत्त्यानं जीव दिलता?
पुन्यांदा माज्या उरावर धोंडा पडल्यागत झालं.
****
घरी आलो तर दत्तुमामा आलते. आमच्या पुण्याच्या आत्याचा नवरा.
मला येकदम भारी सुचलं.
दत्तुमामा येकलेच पेपर वाचित व्हते.
म्या म्हन्लं, “ओ, तुमी पोलिस आहात नव्हं?”
दत्तुमामा हसले, म्हन्ले, “होय बाईसाहेब. कोण त्रास देतं तुला, नाव सांग. तुरुंगात टाकू आपण त्याला.”
इकडंतिकडं कुणी नवतं. तरी दत्तुमामांच्या अगदी जवळ जाऊन कानात बोल्ले, “आप्पा”.
“आप्पा? कोण आप्पा?” त्यांनी इचारलं.
या मोट्या मानसास्नी समदं समजून सांगावं लागतंय.
“नंदाताईचे आप्पा. तिला तरास देतेत, मारतेत.” म्या बोल्ली.
दत्तुमामा माज्याकडं पाहातच रायले.
“नंदाताई आत्त्यासारका जीव दीन म्हणती. त्या आप्पाफप्पांना पकडा तुमी.” म्या रडाया लाग्ली.
“रडू नकोस. मी बघतो काय करायचं ते,” दत्तुमामा म्हन्ले.
माजं रडू काय थांबचना.
***
लई त्हान लाग्ली व्हती. डोस्कं ठणकत व्हतं. डोळे उगाडले. उटाया जमंना.
आज्जी माज्याजवळ व्हती.
दादानं लगी माजं कपाळ फडक्यानं पुसलं.
“नंदाताई कुटंय,” म्या इचारलं.
“आन्जे, मी इथंच आहे. तुला बरं वाटल्याशिवाय मी कुठं जाणार नाही. लवकर बरी हो तू,” नंदाताई बोल्ली तशी म्या तिचा हात पकडून ठिला.
डोळे बंद करून द्येवाला म्हन्लं, “लई दुखतंय मला, पर बरं न्हाई क्येलंस तरी चालतंय. म्हंजे मंग नंदाताई जीवबीव न्हाई द्यायची.”
किती दिस गेले म्हाईत न्हाई.
दादा, आज्जी, नंदाताई, आई, आण्णा सगळे व्हते.
येक दिवस येष्टीत घालून तालुक्याला नेलं मला.
डॉक्टरकाकांनी कडूझार औषाद दिलं. ताप कायी कमी व्हईना.
नंदाताई हितंच व्हती ते बेश.
***
येके दिवशी सकाळी सकाळी जोराजोरात आवाज यायला लाग्ले.
आमच्या घरात असलं आरडाओरडीचं भांडाण कंदी नसतंय.
आज्जी जवळ नव्हती. नंदाताई रडत व्हती. दादा तिला समजौत व्हता.
दत्तुमामांचाबी आवाज आला. आण्णा चिडलेले.
आईबी कायतरी बोलत व्हती.
येक आवाज पुण्याच्या आत्याचा व्हता. दुसरा फलटणच्या आत्याचा.
समदे कशापायी आलेत?
दादानं औषाद दिलं. म्या झोप्ली.
राती जाग आली तवा आण्णा, आई, आज्जी कुजबुजत व्हते.
आई आणि आज्जी रडत व्हत्या. आण्णा कधीबी रडतील की काय असं दिसत व्हतं.
“माझ्या सुमीला काय भोगावं लागलं, तिचं तिलाच माहिती. आन्जीनं धोसरा घेतला म्हणून नंदाच्या वेळी तुम्ही सगळे जागे झालात हे नशीबच...” आज्जी म्हणत व्हती.
म्या गपचिप झोपली परत.
***
येके दिवशी जागी झाले तवा कायबी दुखत नव्हतं.
एका हातात दादाचा हात आणि दुसर्‍या हातात नंदाताईचा हात व्हता.
दोघंबी माज्याकडं पाहून हसत व्हते. आज्जी देवापुडं बसली व्हती.
आण्णा खुर्चीवर बसून हासत होते. आई डोळे पुसत व्हती.
मला लई भूक लागली व्हती.
तूप-मेतकूट-भात खाल्ला.
म्या बरी झाली म्हंजे नंदाताई आप्पांकडं जाणार? जीव देणार?
म्या हळूच तिच्याकडं पायलं. ती हसत व्हती.
आण्णा म्हन्ले, “आन्जाक्का, आता फटाफट बरं व्हायचं. आपण सगळे तालुक्याच्या गावाला राहायला जाणार.”
मला काय बरं वाटलं न्हाई.
“आणि नंदाताई?” म्या इचारलं.
“नंदाताई जाईल तिथं दादाच्या शाळेत, आणि तू दुसर्‍या शाळेत,” आई म्हन्ली.
“नंदाताई आता कायमची आपल्यासोबतच राहणार आहे.” आज्जीनं सांगितलं.
***
“आप्पा? त्यास्नी तुरुंगात घातलं का न्हाय दत्तुमामांनी? ” मी दादाला एकट्याला गाठून इचारलं.
“छे! तुरुंगात नाही टाकलं. पण नंदाताईला मारणार नाही असं सगळ्यांसमोर कबूल केलं त्यांनी. दत्तुमामांनी दम दिला आप्पांना,” दादा म्हन्ला.
झ्याक जिरली. नंदाताईला मारतेत होय?
म्हंजे आता दादापण घरी राहणार, हॉटेलात नाई. नंदाताई आमच्याकडं राहणार. म्या शेरातल्या शाळंत जाणार.
म्या पयल्यासारकी टुणटुणीत झाली.
पळत बायेर जाऊन “म्या शेरात जाणार” वराडले.
अंगणात मोत्या होता. तो शेपटी हालवत माझ्यासंगं गोलगोल फिरायला लाग्ला.
अंक्या, निम्मी, भान्याला सांगितलं, गुर्जींना सांगून आले.
समदे मला तालुक्याच्या गावाचं कायबाय विचारत व्हते, ‘आमालाबी घिऊन जा’ म्हणत व्हते.
पळापळीत उरावरचा धोंडा भौतेक कुटंतरी पडला.
ग्येला येकदाचा.
***

पूर्वप्रसिद्धी - 'मिसळपाव' दिवाळी अंक २०१६

Wednesday, February 15, 2017

२४७. ‘लेटर्स फ्रॉम बर्मा’ (पुस्तक परिचय)


   १९९५ च्या नोव्हेंबर महिन्यात ऑंग सान सू ची (Aung San Suu Kyi) यांनी जपानच्या एका वृत्तपत्रात दर आठवड्याला एक पत्र लिहायला सुरूवात केली. ही पत्रमालिका एक वर्षभर चालू राहिली. ही पत्रं पेंग्विनने पुढं पुस्तकरूपात प्रकाशित केली. तेच हे पुस्तक - लेटर्स फ्रॉम बर्मा. प्रत्येक आठवड्याचं एक अशी ५२ पत्रं या पुस्तकात आहेत.
    ऑंग सान सू ची यांचा परिचय नव्याने करून द्यायची गरज नाही. १९९१ मध्ये शांतता नोबेल पुरस्कार मिळालेल्या सू ची यांनी बर्मा उर्फ म्यानमार देशात लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी १९८८ ते २०१५ अशी सत्तावीस वर्ष अविरत लढा दिला. त्यातला सुमारे पंधरा वर्षांचा काळ त्या यांगों (Yangon – पूर्वीचं रंगून) मधल्या घरात स्थानबद्धतेत होत्या. नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ (National League for Democracy – एनएलडी) या पक्षाला बहुमत मिळालं. २००८ च्या राज्यघटनेनुसार सू ची राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. परंतु एनएलडीने त्यांच्यासाठी स्टेट कौन्सेलर हे नवं पद निर्माण केलं. एप्रिल २०१६ पासून सू ची परराष्ट्र मंत्री आणि स्टेट कौन्सेलर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतात.

पण १९९५ मध्ये मात्र चित्र खूप वेगळं होतं. देशात लष्करी सत्ता होती. लोक दबलेले होते. सू ची यांची नुकतीच म्हणजे जुलै महिन्यात सहा वर्षांच्या स्थानबद्धतेतून सुटका झाली होती, पण सगळ्या हालचालींवर लष्कराची कडक नजर होती. देशात सातत्याने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जात होतं आणि लष्करी सरकार आंतरराष्ट्रीय दबावाला भीक घालत नव्हतं. सू ची यांचे सहकारी विनाकारण तुरूंगात डांबले जात होते. लोकांना बदल हवा होता.

सू ची यांनी लिहिलेल्या पत्रांत एनएलडीचे विविध कार्यक्रम, एनएलडीमधले त्यांचे सहकारी आणि तत्कालीन लष्करी सरकारच्या दडपशाहीचा यांच्याबाबत अनेक उल्लेख असले तरी हा पत्रसंग्रह फक्त राजकीय विषयावर नाही. बर्माचं सास्कृतिक वातावरण, इथले सण आणि उत्सव, इथला निसर्ग, इथले खाद्यपदार्थ, इथले मठ, अशा अनेक नोंदी पत्रांत आहेत. त्यामुळे या पत्रातून केवळ राजकीय लढ्याची नव्हे तर देशातल्या लोकांचीही ओळख होते. निवांत बसून कुणीतरी आपल्याला त्यांच्या देशाबद्दल सांगावं अशी पत्रांची शैली आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही सू ची यांना इतकं अभिनिवेशरहित कसं काय लिहिता आलं असेल याचं नवल वाटत राहतं.

सर्व पत्रं अत्यंत रसाळ शैलीत लिहिली आहेत. बावन्न पत्रांमधून एक किंवा दोन पत्रांतला एखादाच परिच्छेद निवडणं हे महाकठीण काम आहे. त्यामुळे नमुन्यादाखल इथं फक्त दोन परिच्छेद देते.

पान १७ वर सू ची लिहितात (पत्र क्रमांक चार) : Some have questioned the appropriateness of talking about such matters as metta ( loving-kindness) and thissa (truth) in the political context. But politics is about people and what we had seen in Thamanya proved that love and truth can move people more strongly than any form of coercion. (Thamanya इथल्या मठाने अनेक लोकोपयोगी कामं लोकसहभागातून केली. याबद्दल सविस्तर माहिती पुस्तकात आहे.)

पान क्रमांक ६५ वर (पत्र क्रमांक १६) युनियन डेच्या निमित्ताने सू ची लिहितात: Unity in diversity has to be the principle of those who genuinely wish to build our country into a strong nation that allows a variety of races, languages, beliefs and cultures to flourish in peaceful and happy co-existence. Only a government that tolerates opinions and attitudes different from its own will be able to create an environment where people of diverse traditions and aspirations can breathe freely in an atmosphere of mutual understanding and trust.

म्यानमामध्ये येऊन चार महिने उलटून गेल्यावर मी लेटर्स फ्रॉम बर्मा वाचायला घेतलं हे एका अर्थी ठीकच झालं. हे पुस्तक म्यानमामध्ये येण्यापूर्वी किंवा आल्यावर लगेच वाचलं असतं तर कदाचित मला ते तितकं भावलं नसतं. सू ची यांच्या घराकडं जाणारा रस्ता, त्यापल्याड असलेला इन्या लेक, बगोकडं जाणारा रस्ता हे परिसर आता पायाखालून घातले असल्याने सू ची यांनी केलेल्या वर्णनाची मला नेमकी कल्पना आली.

गेले काही महिने मी सू ची यांच्या देशोदेशीच्या दौ-यांबद्दलची माहिती वाचते आहे, त्यांच्या भाषणांचे अहवाल वाचते आहे, त्यांच्या सरकारने घेतलेल्या (आणि न घेतलेल्या) विविध निर्णयांबद्दल टीकाटिप्पणी वाचते आहे. एनएलडीअंतर्गत एकवटलेल्या सत्तेबाबत वाचते आहे. एथनिक गट कसे नाराज आहेत याबद्दल वाचते आहे. मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत सू ची कशा मौन राखून आहेत याबद्दल वाचते आहे. सू ची यांच्याकडं पाहताना मला त्या एक कर्तव्यकठोर राजकीय नेत्या वाटतात. त्यांचं एक राजकीय उद्दिष्ट आहे आणि त्यापल्याड काही नाही अशी शंका येण्याजोगा त्यांचा वावर (आणि त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया) मला वाटतो.

लेटर्स फ्रॉम बर्मा वाचल्यानंतर सू ची एक आहेत का दोन आहेत असा प्रश्न मला पडला. सध्याच्या सू ची यांच्यात मला न दिसणारा (कदाचित त्यांच्या राजकीय पदाची ती मागणी असेलही) एक भावनिक ओलावा या पत्रांमध्ये मला दिसला. त्यांची नर्मविनोदी शैली आणि इतकं सोसूनही कडवटपणाचा लवलेश नसणं हे मला फार भावलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माणूस किती आशावादी असू शकतो हे या लेखनावरून कळतं. ही पत्रं मी वाचली नसती तरीही कदाचित मला म्यानमा देश आणि इथले लोक थोडेफार समजले असते. पण ही पत्रं मी वाचली नसती तर मी सू ची यांना समजून घेण्यात चूक केली असती हे मात्र नक्की.  

१९९५-९६ साली लिहिलेल्या या पत्रांनंतर एरावडी (इरावती) नदीतून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळेच या पत्रांचं ऐतिहासिक मूल्य अधिकच अधोरेखित होतं. पुस्तक एकदा तरी वाचावं इतकं नक्कीच महत्त्वाचं आहे.  
*****

संबंधित पोस्ट : राजबंदिनी