ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, June 15, 2015

२२९: भीतीच्या भिंती: ८. मॉक ड्रिल

भाग १, २ .....७

एक दिवस सकाळी सहा वाजता मजिदचा फोन आला. “आज तुला घ्यायला गाडी अर्धा तास उशिरा येईल, चालेल का?” असं विचारायला. त्यादिवशी मला काही अमुक ठिकाणी अमुक वाजता पोचायचं नव्हतं; ऑफिसमध्ये बसून एक रिपोर्ट पूर्ण करायचा होता फक्त; त्यामुळे अर्धा तास उशीर झाल्याने काही बिघडणार नव्हतं. मी होकार दिला आणि सहज ‘अडचण काय आहे’ ते विचारलं. माझ्या एका सहका-याला ‘ग्रामीण विकास आणि पुनर्वसन मंत्रालयात’ प्रशिक्षणासाठी जायचं होतं; त्याला पोचवून गाडी मला घ्यायला येणार होती. हा सहकारी माझ्याच हॉटेलमध्ये राहत होता. मला एकदम सुचलं. मी मजिदला म्हटलं, “हरकत नसेल तर मी त्याच्याबरोबर जाते आणि त्याला तिथं सोडून ऑफिसमध्ये येते.” माजिदला गंमत वाटली. सहका-यासाठी सुरक्षा सोपस्कार आधीच पार पडले असल्याने काही अडचण नव्हती. “ट्रॅफिक जाम असला तर नंतर तक्रार करू नकोस” अशी सूचना मला देऊन तो पुढच्या कामाला लागला. आणि ‘आज नवा रस्ता पाहायला मिळणार’ म्हणून मी खूष झाले.
“दारूल अमन” रस्ता मला ऐकून माहिती होता. या रस्त्यावर बरेच बॉम्बस्फोट होतात आणि बरेचदा निदर्शनं होतात हे आजवर आलेल्या अनेक ‘सुरक्षा संदेशां’मुळे मला माहिती होतं. हा रस्ता ज्याअर्थी तालिबानचं सतत ‘लक्ष्य’ असतो, त्याअर्थी तो दिल्लीच्या 'राजपथ' सारखा महत्त्वाचा रस्ता असणार हे लक्षात आलं होतं. अनेक महत्त्वाची मंत्रालयं, राष्ट्राध्यक्ष निवास, संसद या रस्त्यावर आहेत. "दारूल अमन" म्हणजे "अल्लाचं निवासस्थान". या शब्दांचा “शांतीचं स्थान” असाही एक अर्थ सांगितला जातो. तिथं इतका रक्तपात होत रहावा हा एक विरोधाभास.
याच रस्त्यावर “दारूल अमन राजवाडा” आहे. १९२० च्या आसपास राजा अमानुल्ला खानने काबूल शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर हा राजवाडा बांधला. हा राजवाडा अफगाणच्या सुधारणेचा एक भाग होता. पण अमानुल्लाला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं आणि राजवाडा दुर्लक्षित झाला. १९६९ साली या राजवाड्याला मोठी आग लागली. मग १९७० ते १९७८ या काळात 'संरक्षण मंत्रालय' तिथ कार्यरत होतं. १९७९ च्या कम्युनिस्ट आक्रमणात ही इमारत पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मग रशियनांचा पराभव करण्यसाठी मुजाहिद्दिन आणि त्यांचा पराभव करायला तालिबान या राजवाड्याचा उपयोग करत राहिले. आज हा राजवाडा भग्नावस्थेत आहे. त्याची पुनर्बांधणी करून अफगाण संसद तिथं भरेल अशी योजना आहे; पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राजवाड्यात जाण्याची मला परवानगी नसल्याने (पुढेही अनेकदा या रस्त्यावर गेले तरी प्रत्येक वेळी) मी हा राजवाडा फक्त लांबून पाहिला!
या रस्त्यावर भिंती कमी होत्या आणि पसरत जाणा-या काबूल शहराचं एक वेगळं (रोजच्यापेक्षा वेगळं) दर्शन मला झालं. नवख्या माणसाला हे शहर नॉर्मल वाटावं इतकी गर्दी रस्त्यावर होती. भोवतालच्या टेकड्यांवर घरं दाटीवाटीने उभी होती. 
लोक तिथं कसे पोचत असतील, त्यांच्यासाठी किमान सोयी तरी तिथं असतील का असे अनेक प्रश्न मनात आले. कोणत्याही शहरात ग्रामीण भागातून माणसं येतात ती मुख्यत्वे ‘जगायला’ हा आपल्याकडचा प्रवाह तिथंही आहेच. गावातून इथं लोक येतात ते जीव वाचवण्यासाठीही – शब्दश: जगायला!. इतक्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांना स्थानिक कर्मचारी घ्यावे लागतातच, त्यामुळेही इथं गर्दी आहे. श्रीमंत लोक जिथं असतील त्या परिसरात जवळच गरीबांची वसाहत असते (कारण ‘चीप लेबर’) हा ‘शहरीकरण’ या विषयाच्या अभ्यासात शिकलेला सिद्धान्त इथं पुन्हा एकदा प्रत्ययास आला.
आता काबूलमध्ये बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत ख-या पण त्याच्या किंमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहेत. 


 राजकारणी (त्यातही सत्ताधारी) आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातल्या नातेसंबधांच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकायला मिळाल्या. इथं येण्यापूर्वी ‘अतिशय कठीण परिस्थितीत देशाची जबाबदारी निभावून नेणारा नेता’ म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष श्री. हमीद करझाई यांचं मला कौतुक वाटायचं. इथं आल्यावर मात्र त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी कळल्या, की स्वत:च्या भाबडेपणाचं हसू आलं. भारतीय नागरिक या नात्याने इथल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांना नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार मला नाही याची मला अर्थातच जाणीव होती; आजही आहे.
वाटेत दिसणा-या या कालव्याजवळ ‘खुदा गवाह’ या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं आणि ते दाखवायला एक वाहनचालक मला घेऊन गेला होता. २०१५ मधली ही  दुर्दैवी घटना या कालव्याच्या साक्षीने झाली! 

एक दिवस ऑफिसमधून घरी येताना गाडी वेगळ्या रस्त्याने येत होती आणि त्या रस्त्यावर राहणारे काही सहकारी सोबत होते. एचआरने केलेल्या ओळखपरेडमध्ये यांच्याशी फक्त जुजबी ओळख झाली होतं. किरकोळ बोलणं झालं आणि ‘आज रस्ता का बदलला आपण’ असं मी विचारल्यावर एकाने “आम्ही तुझं अपहरण करतोय” असं म्हटलं. त्यातली गंमत जाणून मीही हसत “माझ्या घरचे लोक काही तुम्हाला पैसे देऊन मला परत घेणार नाहीत. मला तुमच्याकडून परत घेण्यासाठी कदाचित ते तुम्हालाच पैसे मागतील” अशी पुस्ती जोडली. त्यावर दुसरा म्हणाला, “तुझ्या घरच्या लोकांना थोडेच मागणार आम्ही? आम्ही युएनकडे मागू पैसे. तुझा जीव वाचवण्यासाठी युएन देईल हवे तितके पैसे.” पुढे तिसरा म्हणाला, “शिवाय आम्ही तुला पाकिस्तान तालिबानला विकू अशी धमकी दिली, की तुमचं सरकारही दबाव टाकेल युएनवर”. त्यावर सगळे हसले आणि असं काही होऊही शकतं याची मी नोंद घेतली. मग मी शहाणपणा दाखवत विषय बदलला. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ गोष्टीतले वाटावेत असे मोट्ठे रांजण मला दिसले.
यात ‘नान’ बनवले जातात असं कळलं.
अर्थात अपहरणाची घटना घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था नको इतकी काळजी घेते याचा अनुभव मला लगेच आला. एकदा मी शहराच्या दुस-या टोकाला दुस-या एका आंतरराष्ट्रीय संस्थेत एका अधिका-याला भेटायला गेले. साधारण तासभराची मिटिंग, त्यासाठी रीतसर परवानगी घेतली होती. मी तिथं पोचून पाचेक मिनिटं झाली असतील–नसतील, जॉर्जचा फोन आला.
“तू कुठे आहेस?” त्याने विचारलं.
मी ऑफिसचं नाव – जे जॉर्जला माहिती होतं – ते पुन्हा सांगितलं.
“तू त्या ऑफिसमध्ये आहेस का गेटमध्ये?” त्याने विचारलं.
“आत आहे. पाच मिनिटं झाली. एक तास लागेल अजून.” मी सांगितलं.
“तुझी मिटिंग कुणाबरोबर आहे?” त्याचा पुढचा प्रश्न.
त्या अधिका-याचं नाव मी जॉर्जला सांगितलं. “त्याला फोन दे,” जॉर्ज म्हणाला, मी दिला. अर्धा मिनिट जॉर्ज बोलला, तो अधिकारी फोन माझ्या हातात देत म्हणाला, “सॉरी, मला एक तातडीचं काम आहे. आपण पुन्हा कधीतरी भेटू.”
इतकी आधी ठरवलेली मिटिंग हा माणूस जॉर्जच्या फोननंतर रद्द करतोय हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. काहीतरी गडबड होती हे नक्की. तरीही मी म्हटलं, “मी थांबू शकते थोडा वेळ. तुम्ही तुमचं काम आटोपून या. किंवा मी तुमच्या असिस्टंटशी बोलते.”
“नाही. तुम्ही निघा,” असं म्हणून तो उभा राहिला, त्याने कुणालातरी हाक मारली. एक सैनिक माझ्याजवळ आला आणि त्याने मला दाराकडे येण्याची विनंती केली. खरं तर त्या क्षणी ‘हे लोक मला हाकलून देताहेत’ असं मला जाणवत होतं. राग, अपमान, आश्चर्य, वैताग अशा मिश्र भावना काबूत ठेवत सैनिकासोबत मी गाडीजवळ आले. मी येण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरु केली होती त्याअर्थी जॉर्जचा त्यालाही फोन आला होता. परत जॉर्जचा फोन. “गाडीत बसलीस का तू” हे विचारण्यासाठी. चालकाने गाडी सुसाट सोडली. ज्या रस्त्याने आम्ही आलो, त्यापेक्षा वेगळ्या रस्त्याने परत जात होतो आम्ही. “काय झालं?” मी चालकाला विचारलं. “कुठे काय? आपण ऑफिसमध्ये परत जातोय,” चालक म्हणाला. एरवी भरपूर गप्पा मारणारा चालक आज बोलायला तयार नव्हता, मी सोडून दिलं विचार करणं.
ऑफिसमध्ये आल्यावर जॉर्जला विचारलं, “काय झालं?” तो म्हणाला “कुठे काय? काही नाही”. “Only those who MUST know, SHOULD know” हे ‘सुरक्षा तत्व’ मला माहिती होतं. आपल्याला काही सांगितलं जाणार नाही हे जाणून मी गप्प बसले. योगायोगाने दुपारच्या जेवणाच्या टेबलावर अचानक दोन श्रीलंकन सेनाधिकारी भेटले. सुचिथमुळे यांच्याशी मैत्री झाली होती. एकाने विचारलं, “आज काय विशेष?”. मी काही उत्तर द्यायच्या आत दुसरा पहिल्याला म्हणाला, “ओके सगळं?” त्यांच्या आपापसातल्या बोलण्यात असे काही शब्द आले, की मी कान टवकारले. मी सकाळी ज्या भागात होते, ते नाव आलं आणि मला संदर्भ लागला.
मी सकाळी ज्या भागात होते, तिथं भारतीय स्त्रीचं अपहरण होण्याच्या शक्यतेचा ‘रेड अ‍ॅलर्ट’ मिळाला होता. म्हणून जॉर्जने मला त्या भागातून तातडीने बाहेर काढलं होतं तर! एक पोलीस गाडी आमच्या गाडीच्या सतत मागे का होती तेही समजलं. अर्थात मीच लक्ष्य असेन असं नाही. माझ्या चेह-याकडे पाहून ते अधिकारी काय समजायचं ते समजले. पहिला अधिकारी म्हणाला, “इंटेलिजन्सला जी माहिती मिळते ती १००% खरी ठरते अशातला भाग नाही, पण आपण धोका पत्करत नाही कधीच. आपल्या सिक्युरिटी व्यवस्थेवर विश्वास ठेव. ओके. काय घेणार आहेस तू? इथं पिज्झा मस्त मिळतो. आजचं जेवण माझ्यातर्फे.” मग आम्ही इतर गप्पा मारत राहिलो. हा धोका खरा होता की फक्त एक मॉक ड्रिल? हे मला कधीच कळणार नाही.
इथं आल्यापासून माझ्यात परिस्थितीवश झालेला एक बदल म्हणजे “सदैव जाण्याच्या (म्हणजे पळून जाण्याच्या) तयारीत असणं!” लॅपटॉप आणि फोन सतत पूर्ण चार्ज्ड ठेवणं, बॅग नेहमी भरलेली ठेवणं, अगदी मध्यरात्रीही एका मिनिटात बाहेर पडता येईल अशा रीतीने पासपोर्ट, युएन ओळखपत्र आणि पुरेसे डॉलर्स जवळ बाळगणं इत्यादी .
माझ्या खोलीच्या समोर चोवीस तास सुरक्षारक्षक असायचाच. हे सगळे भारतीय गुरखा पलटणीतले निवृत्त सैनिक. जातायेता आमच्या गप्पा व्हायच्या. काडतुस काढून त्यांनी मला बंदूक हाताळायला दिली. तिचं वजन न पेलता आल्याने बंदूक चालवायला शिकण्याचा माझा उत्साह मावळला. हे उमदे गुरखा अत्यंत सभ्य होते, त्यांचा आधार वाटायचा. पण चोवीस तास ते समोर नको वाटायला लागले. वरच्या मजल्यावर कोप-यातली, आकाश दिसणारी खोली मला एक दिवस मिळाली खरी पण काही तासांत माझी रवानगी परत जुन्या खोलीत केली गेली. का? माहिती नाही.
 एका शनिवारी दोन गुरखांशी बराच वेळ गप्पा मारत बसले होते. मी सहज विचारलं, “शत्रूला तुम्ही मारता, तेव्हा....?” मला प्रश्न पूर्ण न करू देता माझ्यावर नजर रोखत एकजण शांत आवाजात म्हणाला, “हम किसी को मारते नहीं; हम तो केवल आप जैसे बेगुनाह लोगों की रक्षा करते है”.
सैनिक ही काय चीज असते याचा साक्षात्कार घडवून आणणारा क्षण होता तो.
मी आल्यावर पहिले दोन तीन दिवस जॉर्ज “बंकर पाहिलास का” अशी सारखी विचारणा करत होता. तो अखेर एकदाचा पाहिला. ती एक दहा बाय बाराची खोली, त्यात दोन सोफा, दोन खुर्च्या एक पाण्याचं भांडं आणि दोन ग्लास. विशेष काही वाटलं नाही मला. समोर सुरक्षारक्षक असल्याने माझी खोली सुरक्षित आहे आणि इथून पळत जायला बंकर जवळ आहे हे बंकर भेटीनंतर लक्षात आलं.
एक दिवस सकाळी ऑफिससाठी बाहेर पडताना पहा-यावरच्या सैनिकाने एक कागद हातात दिला. आज संध्याकाळी साडेसात वाजता ‘बंकर मॉक ड्रिल’ होती. ऑफिसमध्ये पोचल्यावर मी सगळ्या सूचना व्यवस्थित वाचून काढल्या. ही ड्रिल एक रुटीन दिसतंय इथलं असं म्हणून मी निवांत बसले.
संध्याकाळी सातच्या सुमारास जिममध्ये व्यायाम करून, येताना रिसेप्शनवरच्या मुलीशी गप्पा मारत उभी होते. तितक्यात सायरन वाजला. मी गोंधळून तशीच उभी होते ते पाहून ती म्हणाली, “बंकरमध्ये पळा.” मी पळत तिकडं गेले. आम्ही सगळे बुलेटप्रुफ जाकिट, कागदपत्रं वगैरे न घेताच रिकाम्या हातांनी तिथं पोचलो होतो. काही लोकांनी तर यायला पाच मिनिटं घेतली तर काही निवांत फोनवर बोलत चालत आले. रशीद, जो आमचा वॉर्डन होता, त्याने आमचं जोरदार बौद्धिक घेतलं – सूचनांचं काटेकोर पालन कसं गरजेचं आहे यावर. “पण ड्रिल तर साडेसातला होती, तुम्ही ती अचानक सात वाजता घेतलीत” – आमच्यातल्या काहींनी (मीही होते त्यात, खोटं कशाला बोला) तक्रारवजा समर्थन करण्याचा प्रयत्न केला.
“दहशतवादी तुमची अपॉइन्टमेंट घेऊन हल्ला करतील याची कुणाला खात्री आहे?” रशीदने आक्रमक शांतपणे विचारलं. आम्ही गप्प बसलो. “हा संगणकावरचा खेळ नाही, हे इथलं वास्तव आहे. हे सगळं तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. सगळे नियम पाळले गेलेच पाहिजेत, चोवीस तास. त्याबाबत कुणाची तक्रार असेल तर एकच पर्याय आहे. पहिल्या फ्लाईटने आपल्या घरी जाणं!”
रशीद पोटतिडीकीने बोलत होता त्याचा आम्हा सगळ्यांवर अपेक्षित परिणाम झाला. सूचनांची उजळणी करून आमची ड्रिल संपली. गंभीर होऊन आम्ही त्या परिस्थितीत जगण्यास सज्ज झालो.
ती मॉक ड्रिल ही एक चुणूक होती भविष्याची.
क्रमशः

Sunday, June 7, 2015

२२८. भीतीच्या भिंती: ७. कोपरा

भाग ६

स्त्री-पुरुष समतेच्या प्रवासात ‘खास स्त्रियांसाठी असणा-या सोयी’ हा विरोधाभास नसतो, तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो – हे भाषणातलं वाक्य वाटतं खरं; पण तसं नाही. अनेक प्रवास एकटीने करताना ‘प्रश्न फक्त माझ्या क्षमतेचा नसून सभोवतालच्या लोकांच्या संवेदनशीलतेचा देखील असतो’ असा आजवरचा अनुभव. त्यामुळे दिल्लीत मी राहायला गेल्यावर आठवडाभरात ‘दिल्ली मेट्रो’ स्त्रियांसाठी वेगळं कंपार्टमेंट (मेट्रोचा ‘डबा’ हे काही योग्य वाटेना म्हणायला!) घोषित केलं; तेव्हा मला आनंद झाला होता. स्वत:च्या मर्यादा ओळखायची ही सवय जाचक असते अनेकदा, पण किंमत मोजायची तयारी नसते माझी; तेव्हा इलाज नसतो.
रोज फक्त ऑफिस ते घर; ठराविक रस्ता; तेच सुरक्षा रक्षक; तीच माणसं; बोलायचे तेच विषय; रस्त्यात दिसणारे तेच रणगाडे; ऑफीसच्या कोप-यातून दिसणारा आकाशाचा तोच तुकडा; भिरभिरणारी तीच हेलिकॉप्टर्स; तेच सायरन आणि रोजचे तेच ते सुरक्षा संदेश! संध्याकाळी ‘पाचच्या आत घरात’. नाविन्य काही ते नाहीच.
शिवाय सोबत आणिक एक वेगळंच द्वंद्व. आजवरचं आयुष्य भेदभाव जोपासणा-या रूढी-परंपरांशी झगडण्यात गेलं; इथं मात्र ‘स्थानिक संस्कृतीबद्दल आदर’ म्हणत डोकं “हिजाब”मध्ये झाकून वावरत होते – त्याचाही मानसिक ताण होता. ‘हिजाब’ म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर ‘डोकं आणि छाती झाकणारं वस्त्र’. ओढणी वापरायची सवय असल्याने तसा त्रास नव्हता म्हणा. पण ‘हिजाब’ म्हणजे स्त्रीच्या सभ्यतेचं प्रतिक – असलं एक संभाषणवजा भाषण ऐकून एक दिवस वैतागाच्या भरात मी “हिजाब” वापरला नाही; तर गाडीच्या काचेवर सणसणीत दगड आला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी खाली वाकले. गाडी बुलेटप्रुफ नसती, तर माझ्या डोक्याचा नेम अचूक साधला गेला असता. तिथल्या वातावरणात ही अगदीच किरकोळ गोष्ट. पण क्षणभर मी हादरले, हे कबूल करायला हवं.
माझ्यासमोर पर्याय असतात तेव्हा निर्णयस्वातंत्र्याची शेखी मला मिरवता येते. पण नियम मोडायची किंमत “मृत्यू” असेल तर? विचार आणि व्यवहाराचं स्वातंत्र्य ही आज अनेकांसाठी फक्त एक कविकल्पना आहे हे भयावह सत्य काबूलमधील वास्तव्यात समोर आलं आणि तिथल्या स्त्रियांची (आणि एकंदर समाजाचीही) कोंडी काही अंशी मला समजली.  
एक दिवस “हंगामा”शी (ही माझी सहकारी) बोलत होते. “मला काही उद्योग/व्यवसाय करणा-या स्त्रियांना भेटायचं आहे” असं मी तिला सांगत होते. ती म्हणाली, “तू अजून बाग-ए-जनानात गेली नाहीस का? असं करू, परवा सकाळी जाऊया. मीही खूप दिवसांत गेले नाही तिकडे. परवानगी वगैरे मी काढते सगळी, तू फक्त तयार राहा नऊ वाजता.”
काहीतरी नवं घडणार तर इथल्या आयुष्यात याचा मला आनंद झाला. मी हनीफला (हा बांगलादेशचा) म्हटलं, “तुला पण यायचं असलं तर चल तर माझ्या सोबत बाग-ए-जनानात.” त्यावर हंगामा हसून म्हणाली, “त्याला नाही इतक्या सहज येता येणार तिथं. त्याचं काही काम असलं तरच त्याला प्रवेश मिळेल, तोही ‘महिला मंत्रालया’च्या लेखी पूर्वपरवानगीने. ही बाग फक्त स्त्रियांसाठी आहे.” ही माहिती मला रोचक वाटली.
*****
नेहमीप्रमाणे बंदूकधारी सैनिकांच्या पहा-यातून आम्ही बागेत प्रवेश केला. संबंधित खात्याच्या शासकीय अधिकारी सोबत असल्याने आमची ‘सुरक्षा तपासणी’ झाली नाही कदाचित त्यामुळेच आम्हाला प्रवेशिकाही विकत घ्यावी लागली नाही. अन्यथा दहा अफगाण (आणि स्त्रियांच्या सोबत येणा-या १२ वर्षांपेक्षा लहान मुलींना आणि मुलांना पाच अफगाण) प्रवेश शुल्क आहे. गुरुवार-शुक्रवारी इथं गर्दी असते, आज मंगळवार असल्याने  गर्दी कमी आहे पण अगदी शुकशुकाट नाही. तरुण मुलींचे, प्रौढ स्त्रियांचे छोटे गट दिसताहेत; हसण्याचे आवाज येताहेत; संगीत कानांवर पडतंय. वातावरणात एक निवांतपण आणि मोकळेपणा आहे. या भिंतीच्या शहरात अशीही एक जागा आहे तर! अशी एक जागा जिथं स्त्रियांना चेहरा लपवण्याची गरज नाही. माझ्याही नकळत मी एक दीर्घ श्वास घेतला.

प्रथमदर्शनी बाग मला खूप आवडली. स्वच्छता आहे, शांतता आहे, सावली आहे, बसायला पुरेसे बाक आणि तेही चांगल्या स्थितीत आहेत. भरपूर झाडं आहेत. शिवाय उगीच शेरेबाजी करणारे, विखारी नजरेनं पाहणारे पुरुष (कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येणारा हा सर्वसामान्य अनुभव- मात्र जगातल्या सर्व पुरुषांबद्दलची ही नोंद नाही) नाहीत. पुस्तक वाचत बसायला, नुसतं निवांत बसायला  मस्त जागा आहे ही! तेरा एकरांची ही जागा. चारी बाजूंनी बंदिस्त; पण आता भवताली उभ्या राहणा-या इमारती या जागेच्या मूळ उद्दिष्टासाठी प्रश्नचिन्हं ठरताहेत.


ही जागा एके निसर्गरम्य स्थळ होतं काबूलमधलं. पण मुजाहिद्दीन, तालिबान, यादवी या काळात त्याची प्रचंड नासधूस झाली आणि कालांतराने तिथं कचरा डेपो झाला.
मुजाहिद्दीन आणि तालिबान या दोन्ही काळांत स्त्रियांच्या सार्वजनिक वावरावर, स्त्रियांच्या जगण्यावर अनेक निर्बंध लादले गेले. स्त्रियांनी शिकायचं नाही, अर्थार्जन करायचं नाही, संगीत ऐकायचं नाही, कुटुंबातील प्रौढ पुरुषाची सोबत असल्याविना रस्त्यावर यायचं नाही, पुरुष डॉक्टरकडून तपासून घ्यायचं नाही (आणि स्त्रियांनी वैद्यकीय व्यवसाय करायला बंदी!), शरीर नखशिखान्त झाकणारा बुरखा वापरायचा, सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर बंदी, क्रीडासहभागावर बंदी..... – असले अमानुष नियम. (इथं सविस्तर यादी आहे). स्त्रियांसाठी पूर्ण देशच तुरुंग झाला. नियमाविरुद्ध बंड करण्याची शिक्षा एकच – मृत्यू. तुम्ही, तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचा नवरा, तुमचा मुलगा यांपैकी कुणीही – कदाचित सगळेही मारले जाऊ शकतात. आहे तयारी?
२००२-०३ च्या सुमारास युएसएड (USAID) च्या आर्थिक मदतीतून या जागेचं पुनरुज्जीवन झालं. यात पुढाकार घेतला तो ‘महिला मंत्रालयाने’ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदत केली. इथं काम करणा-या मजूरांत ५० टक्के स्त्रिया होत्या. हंगामासारख्या अनेक स्त्रिया झाडं लावण्याच्या कामात (विनावेतन) सहभागी झाल्या. विध्वंसातून झालेल्या या निर्मितीशी स्थानिक स्त्रियांचं एक हृद्य नातं आहे याचा प्रत्यय हंगामाच्या चेह-याकडे पाहून येत होता.
‘बाग-ए-जनाना’त स्त्रिया विविध कारणांसाठी येतात. कुणी संगणक शिकायला येतं (फेसबुक वापरणा-या अफगाण मुलींचे चमकणारे डोळे मला आजही आठवतात); तर कुणी ड्रायव्हिंग शिकायला. कुणी साक्षरता वर्गात येतं; तर कुणी शिवणकाम शिकायला, तर कुणी इंग्लीश शिकायला. कुणी व्यायामशाळेचा लाभ घेतं तर कुणी इथल्या खाद्यपदार्थांच्या आस्वादात मग्न असतं; कुणी मैत्रिणींच्या घोळक्यात ‘मन की बात’ सांगत असतं. काही शैक्षणिक उपक्रम मोफत आहेत आणि बाकीच्यांसाठी नाममात्र शुल्क आहे.
बाजार
स्त्रिया आणखी एका गोष्टीसाठी इथं येतात – ती म्हणजे खरेदी! या बागेत वीस दुकानं आहेत, आणि ती सर्व स्त्रियाच चालवतात. विक्रेत्याही स्त्रिया आणि ग्राहकही स्त्रिया. कपडे, लाकडी खेळणी आणि शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधनं, घरगुती वापराच्या अनेक वस्तू (पायपुसणी, झाडू, हँगर इत्यादी), गालिचे अशा विविध वस्तू आकर्षकरीत्या मांडलेली दुकानं आहेत. काही शिलाई दुकानं आहेत. इथल्या सर्व कर्मचारी स्त्रियाच आहेत. कच्चा माल आणला जातो तो मुख्यत्वे दिल्ली आणि कराचीतून. सकाळी साडेसातला दुकानं उघडतात आणि दुपारी चार वाजता बंद होतात. दिवसभर इथं थांबायचं असल्याने या स्त्रिया दुपारचं जेवण इथं बनवतात – त्यामुळे वातावरण एकंदर ‘सहली’ सारखं वाटत होतं मला. ‘आम्ही आमच्या कुटुंबासाठी कमावतोय’ असा सार्थ (आणि सकारण) अभिमान त्यांच्याशी बोलताना जाणवला – एक मस्त अनुभव होता तो.
महिला मंत्रालयाकडे या जागेचे प्रशासकीय अधिकार आहेत. वीस दुकानदार स्त्रिया सरकारला भाडं देतात – ते महिना २५०० ते ३६०० अफगाण आहे. त्यात पाणी आणि सुरक्षा व्यवस्था आहे, विजेचं बील आपापलं भरायचं. बरीच दुकानं दहा वर्षांपासून इथं आहेत. ब-याच स्त्रिया इथं दुकान चालवतात आणि त्यांच्या घरचे पुरुष खुल्या बाजारात दुकान चालवतात. गरीब आणि दुसरी कोणतीही उपजीविका नसलेल्या स्त्रीला इथं दुकान चालवायला मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य. स्पर्धेत इथली मोक्याची जागा टिकवून ठेवायचं म्हटलं की भ्रष्टाचार होणं ओघानं आलं. इथल्या स्त्रियांशी पुढं तीन-चार वेळा चर्चा झाल्या तेव्हा हा मुद्दा ठासून मांडला गेलाही.
सरकारतर्फे जी विविध प्रदर्शनं भरवली जातात त्यात या स्त्रिया सहभागी होतात. काबूलमधले शेकडो-हजारो परदेशी कर्मचारी हे यांचं मुख्य ग्राहक. त्यामुळे इथल्या बहुसंख्य दुकानदार स्त्रियांकडे ‘विजीटिंग कार्ड’ आहेत. त्यावर फोन नंबर आणि ईमेल आयडीही आहेत. इमेल अर्थात घरातले पुरुष वापरतात. मोबाईल मात्र सर्वजणी वापरताना दिसल्या. २०१४च्या निवडणुकीनंतर बहुतेक विदेशी कर्मचारी परत जातील, मग खरेदी कोण करणार – ही व्यावसायिक चिंता इथं सगळ्यांना भेडसावते आहे. या स्त्रियांपुढेही हा प्रश्न आहेच.
इथं ‘बाग-ए-खजाना’चं कार्यालय आहे. अफगाणिस्तानमधल्या महिला उद्योजकांची ‘सबाह’ (सभा) ही असोसिएशन २००५ पासून कार्यरत आहे. 

शिवणकाम, एम्ब्रॉयडरी आणि फूड प्रोसेसिंग अशा तीन क्षेत्रांत त्यांनी आजवर सुमारे दोन हजार स्त्रियांना प्रशिक्षण दिलं आहे. प्रशिक्षणोत्तर प्रत्यक्ष व्यवसाय करण्यातही ‘सभा’ स्त्रियांना मदत करते. मी ‘इंदी’ (म्हणजे हिंदी) आहे हे कळल्यावर इथल्या तरुण प्रशिक्षक माझ्याशी उत्साहाने ‘सिवा’ प्रॉजेक्टबद्दल बोलायला लागल्या. मला काही केल्या ‘सिवा’ शब्दाचा संदर्भ लागत नव्हता. काही काळाने उजेड पडला. त्या इलाबेन भट यांच्या ‘सेवा’ संस्थेबद्दल बोलत होत्या. ‘सार्क’ देशांच्या अंतर्गत जे अनेक कार्यक्रम  चालतात त्यात अफगाण स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उत्तम कार्य ‘सेवा’ करते. इथल्या अनेक प्रशिक्षक अहमदाबादमध्ये राहून आल्यात; त्यांना ढोकळा आणि खाकरा माहिती आहे. पुढे मझार-ए-शरीफमध्ये एकीने मला तिचं  प्रमाणपत्रही दाखवलं. ते पाहताना मला खूप बरं वाटलं.


बाग-ए-जनानात एकाही दुकानदार स्त्रीने मला फोटो काढायला परवानगी दिली नव्हती (मी त्यांच्या निर्णयाची कारणमीमांसा समजू शकते.) इथं मात्र या तरुण मुलींनी मला आग्रहाने फोटो काढायला लावला.
 

मग  आम्ही तिथल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खास माझ्यासाठी बनवलेली शाकाहारी बलोनी (किंवा बलुनी - balooni) खाल्ली.

प्रतिकूल परिस्थितीत केवळ तग धरायची नाही; तर आनंदाने जगायची कला अनेकांना अवगत असते हे खरं. अफगाण स्त्रियांच्या सकारात्मक वृत्तीला तोड नाही. त्यांना खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे हे सतत जाणवत राहतं.
जागतिकीकरणाच्या रेट्यात त्या कशा टिकतील? अफगाणिस्तान सरकार प्रत्येक प्रांतात एक ‘बाग-ए-जनाना’ निर्माण करतेय ही चांगली बाब आहे, पण ती पुरेशी नाही. प्रश्न फक्त या स्त्रियांच्या क्षमतांचा नाही. खुल्या स्पर्धेला तोंड द्यायला या स्त्रिया तयार आहेत, खुला बाजार त्यांना सामावून घ्यायला, त्यांना स्पर्धेत उतरू द्यायलाही तयार नाही असं दिसतं. तो बदल कसा घडवून आणणार? स्त्रियांना उपदेश करणं सोपं आहे तुलनेनं; जे स्त्रियांच्या वाटचालीत बाधा आणतात त्यांच्याबाबत आपण काय करणार आहोत?
हा प्रश्न अफगाणिस्तान सरकारला आणि समाजाला जितका आहे तितकाच तो भारतीय सरकारला आणि भारतीय समाजालाही आहे. स्त्रियांसाठी असा ‘खास कोपरा’ जेव्हा निर्माण करावा लागतो तेव्हा आपला पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. तोवर ‘बाग-ए-जनाना’ गरजेचा आहे. तोही बंदिस्त आहे, तरीही! पूर्ण शहरात तो फक्त एक कोपरा आहे; जिथवर कदाचित सगळ्या स्त्रिया पोचू शकत नाहीत, तरीही!!
 क्रमशः