ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, April 14, 2018

२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)




मागे कधीतरी मी तडिंजु' (Thadingyut) या म्यानमा पारंपरिक उत्सवाबाबत सविस्तर लिहिलं होतं. म्यानमामध्ये दर पौर्णिमेला काही ना काही धार्मिक महत्त्व असणारा कार्यक्रम असतोच. पण तडिंजुइतकाच महत्त्वाचा दुसरा सण म्हणजे तिंज्या’ (Thingyan). हा शब्द तिंज्या असा लिहिला जात असला तरी प्रत्यक्षात याचा उच्चार अनेक लोक तज्या असाही करतात.
बर्मी सण हे चांद्रगणनेनुसार असतात, त्यामुळे दरवर्षी ते एकाच तारखेला असत नाहीत- थोडे पुढेमागे होतात. पण साधारणपणे हा सण एप्रिल महिन्यात येतो. चार ते पाच दिवस हा सण असतो. जेव्हा सण पाच दिवसांचा असतो तेव्हा त्यातला एक दिवस बहुतेक भाकड असतो. या काळात पाचही दिवस सरकारी आणि अन्य कार्यालये बंद असतात. मागच्यावर्षीपर्यंत (२०१७) ही सुट्टी दहा दिवसांची असे. एनएलडी (National Democratic League) सरकारने मागच्यावर्षी ही सुट्टी कमी करण्याची योजना जाहीर केल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. अनेकांचे प्रवासाचे बेत खूप आधी ठरले होते आणि आयत्यावेळी सरकारी निर्णय आल्याने लोक नाराज झाले होते. सरकारने नमतं घेतलं आणि सुट्टी पूर्ववत दहा दिवसांची केली. २०१८ च्या दिनदर्शिकेत मात्र सरकारने पाचच दिवसांची सुट्टी जाहीर केली – त्यातही दोन दिवस शनिवार-रविवारचे गेले – आणि कर्मचाऱ्यांनी ते मान्यही केलं. १३ ते १७ एप्रिल या काळात २०१८ मधला तिंज्या महोत्सव आहे.
या उत्सवाला जलोत्सव’ (Water Festival) असंही म्हटलं जात. या काळात लोक एकमेकांच्या अंगावर पाणी फेकतात-टाकतात, म्हणून हा जलोत्सव. या सणाचा शेवटचा दिवस हा म्यानमा नववर्षाचा पहिला दिवस असतो. लाओस आणि थाईलँड देशांमध्येही अशाच प्रकारचा उत्सव Songkran नावाने साजरा होतो. संक्रमण या संस्कृत शब्दापासून Songkran हा शब्द आला असावा.
सणाच्या चार-पाच दिवस आधीपासूनच वातावरणनिर्मिती झाली होती. कार्यालयातल्या सहकारी डोक्यात पटाव (Padauk) ची फुलं माळून आल्या होत्या. (पटाव हे genus Pterocarpus मधलं एक झाड आहे.)



एक दिवस तिंज्याचे खास पदार्थ मॉलोयोबा (Mont Lone Yay Baw – तांदळाच्या पीठाचे गोळे करून त्यात गूळ भरतात आणि तळतात – काहीसा मोदकासारखा पदार्थ) आणि माजिफ्योये  (चिंच पाण्यात उकळायची आणि त्यात गूळ घालायचा) कार्यालयात करून (आणि खाऊन) झाले.



मग दुसऱ्या दिवशी आणखी काही पदार्थ दर तासादोनतासांनी येत राहिले. मी सध्या ज्या मंत्रालयात काम करते तिथं एकाच इमारतीत मंत्रालयाची अनेक खाती आणि उपखाती आहेत (Departments and Divisions.) मग प्रत्येक टीम इतर  सर्वांसाठी काही ना काही खाद्यपदार्थ बनवून पाठवत होती. एकूण उत्सवी वातावरण होतं.
सुट्टीच्या काळात नेपिडॉत (ही म्यानमाची राजधानी, सध्या मी इथं राहते) फारसं काही घडत नाही कारण बहुसंख्य सरकारी कर्मचारी आपापल्या गावी जातात. शिवाय नेपिडॉत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. कुठं जायचं तर टॅक्सीशिवाय पर्याय नाही आणि ती मिळेल याची काही खात्री नाही. यांगोंच्या शहरी गोंधळात मला जायचं नव्हतं. म्हणून मग मी कलौ (Kalaw – लो आणि लौ यांच्यामधला उच्चार) शहरात आले.
इथं मी मागच्या वर्षी एकदा कामानिमित्त येऊन गेले होते. ऐन मार्च महिन्यातली इथली हवा मला आवडली होती. ब्रिटिशांनी विकसित केलेलं हे एक हिल-स्टेशन. गाव छोटं, सुबक, स्वच्छ, शांत आणि सुरक्षित. म्हणून मग कलौला आले.


शान राज्यातलं हे एक महत्त्वाचं शहर. पहिल्या दिवशी संध्याकाळी गावात फेरफटका मारला. इथं नेपाळी समाज मोठ्या संख्येने आहे त्यामुळे नेपाळी जेवण (पोळी-भाजी-भात-डाळ वगैरे) मिळतं.
माझी मंडलेमधली एक मैत्रीण रात्री दोन वाजता येऊन पोचली. आल्यावर तिच्या लक्षात आलं की तिचा फोन सापडत नाहीये. आपल्या भारतीय अनुभवावरून फोन गेला असं मी समजले. पण तरीही माझ्या मोबाईलवरून तिचा फोन नंबर फिरवला तर समोरून तो चक्क उचलला गेला. फोन बंद करून सिमकार्ड फेकून द्यायची कला इथल्या लोकांना अजून अवगत नाहीये. बसच्या मालकाकडे फोन होता आणि तो व्यवस्थित होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून फोन घेऊन यायचा असं ठरलं. म्यानमा लोकांची ही निरागसता किती काळ टिकून राहील असा प्रश्न मला नेहमीच पडतो. यांगों, मंडलेसारखी मोठी शहरं आणि उर्वरित देशात हा फरक आत्ताही दिसतो आहेच. तो एक वेगळाच विषय.
तिंज्याचा पहिला दिवस उजाडला. कलौ परिसरात दर पाच दिवसांनी एका गावात बाजार भरतो. (म्यानमामध्ये अनेक ठिकाणी ही पाच दिवस पाच गावांत बाजार ही पद्धत अस्तित्त्वात आहे.) सकाळी तिकडं चक्कर मारली. भरपूर गर्दी होती. तिंज्यानिमित्त पुढचे चार दिवस बाजार बंद राहणार आहे आणि सर्वांनाच सणासाठीची विशेष खरेदी करायची आहे, त्यामुळे गर्दी प्रचंड होती. पण कुठंही धक्काबुक्की नव्हती हे विशेष.

                              

तिंज्याचा पहिला दिवस अच्यो (a-kyo) या नावाने ओळखला जातो. पूर्वी खरं तर या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत पाणी फेकलं जात नसे. या दिवशी लोक फक्त एक वेळा जेवत असत आणि पगोडात आणि मठात जाऊन दानधर्म करत असत. शहाळं आणि कच्ची केळी देण्याला विशेष महत्त्व आहे असं दिसतं. संध्याकाळी पाण्याचा खेळ सुरू होतो.

कलौच्या बाजारानंतर आम्ही टाँजीच्या दिशेने रवाना झालो. शान राज्याची ही राजधानी कलौपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही तिथं गेलो ते मैत्रिणीचा फोन आणण्यासाठी. इथं रस्त्यांवर मोठमोठे मंडप उभारून आणि पाणी साठवण्याची व्यवस्था करून जोरदार तयारी चालली होती. महापालिकेतर्फे मोठा मंडप घातलेला दिसला.



जिकडंतिकडं पोलीसही मोठ्या संख्येने हजर होते. शासनातर्फे अधिकृतरीत्या हा उत्सव साजरा केला जातो. (म्यानमा अधिकृतरीत्या बौद्ध धर्मीय राष्ट्र आहे.) काही पोलीस मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने परिसर पिंजून काढण्याच्या कामात मग्न होते. ते पाहताना शान राज्यात चालू असलेल्या संघर्षाची आठवण पुन्हा एकदा झाली. (म्यानमा लष्कर आणि शानमधले काही सशस्त्र गट यांच्यात अनेक दशकांपासून अविरत संघर्ष चालू आहे.) लहान मुलांना दम धरवत नसल्याने रस्त्याने येणाऱ्याजाणाऱ्यांवर पाणी फेकणं चालू झालं होतं. आपल्याकडच्या रंगपंचमीची आठवण करून देणारं वातावरण होतं.



टाँजीतल्या सुलामुनी पगोड्यामध्ये येणाऱ्या सर्वांचं या मैत्रिणी असं स्वागत करत होत्या. यानमामधली अनेक कुटुंब सणांच्या-उत्सवांच्या दरम्यान असं अन्नदान करत असतात. दुसऱ्या दिवशी कलौमध्येही तीन-चार ठिकाणी आम्हाला खाद्यपदार्थ आणि फळांचे रस दिले गेले. अनोळखी माणसांनाही हे दिलं जातं.

                      


या सणामागे नेमकी काय पारंपरिक कथा आहे असं मी आमच्या चालकाला आणि माझ्या मैत्रिणीला विचारत होते. पण त्यांना नेमकं काही सांगता येत नव्हतं. आंतरजालावर शोध घेतल्यावर काही संदर्भ सापडले आणि त्यावरून समजलं ते असं :-
बौद्ध धर्मामध्ये शक्र अथवा सक्क (पाली शब्द) नामक एक देवता आहे. ही हिंदू धर्मातली इंद्रदेवता होय. पण बौद्ध परंपरेतला इंद्र युद्धं कमी करतो आणि अर्थातच भगवान बुद्धाची पूजा करतो. सक्क जरी देवांचा राजा असला तरी जन्म-व्याधि-जरा-मरण या चक्रातून त्याचीही सुटका नाही. त्याचीही टिंगलटवाळी होते आणि मानहानीचे प्रसंग त्याच्याही आयुष्यात येतात. ऐरावत नामक धवल हत्ती हे सक्काचं वाहन आणि ऐरावताला एक नाही तर तीन डोकी आहेत.
एकदा इंद्र आणि एक राजा यांच्यातली पैज (किंवा तो जुगार होता असं वाटतं, अजून फारसे संदर्भ मिळाले नाहीत मला) इंद्राने जिंकली. आधी ठरलेल्या अटीनुसार इंद्राने त्या राजाचा शिरच्छेद केला आणि त्या राजाच्या शरीरावर हत्तीचं शिर बसवलं. तो झाला गणपती. पण त्या राजाची ताकद इतकी मोठी होती की त्याच्या शिराचं काय करायचं ही समस्या तयार झाली. ते शिर समुद्रात टाकलं तर समुद्र आटून गेला, जमिनीवर ठेवलं तर जमीन हलायला लागली (भूकंप झाला असं म्हणायचं आहे की काय ते कळत नाही) आणि आकाशात फेकलं तर आकाश ज्वाळांनी भरून गेलं.
सक्काने मग आदेश दिला की एकेका राजकन्येने या मृत राजाचं शिर वर्षभर धारण करावं. नवीन वर्ष येतं म्हणजे त्या दिवशी हे शिर धारण करण्याची जबाबदारी एका राजकन्येकडून दुसऱ्या राजकन्येकडं जाते. आता या सगळ्या कहाणीत राजपुत्रांऐवजी राजकन्या का आल्या, त्या किती होत्या वगैरे काहीही मला माहिती नाही. एखाद्या जाणत्या भिक्षुशी या विषयावर संवाद साधायला पाहिजे, मग कदाचित सविस्तर कळेल कथा. दुसऱ्या एका संदर्भानुसार या राजकन्या नव्हत्या तर नट होते. नट म्हणजे कोण हे पुढच्या परिच्छेदात आहे.
ही पहिली कथा. ही गोष्ट वाचून मला बर्मी नव्या वर्षाबद्दल थोडंस कळलं. पण तरी पाण्याचं यात काय काम हे कळत नव्हतं.
बर्माच्या थेरवाद बौद्ध धर्मात नटही अतिशय महत्त्वाचे आहेत. ३७ मुख्य नट आणि इतर अनेक गौण नट आहेत. यांच्यामध्ये अमानवी भौतिक-आध्यात्मिक शक्ती असते अशी धारणा आहे. पगोडांमध्ये मुख्य मूर्ती बुद्धाची असली तरी (त्या बहुतेक वेळा चारी दिशांना एकेक अशा असतात), तरी भवताली नटही असतात आणि त्यांचीही उपासना केली जाते. पारंपारिक धार्मिक समजुती आणि बुद्धाची शिकवण यांचा असा अनोखा संगम म्यानमामध्ये दिसतो.
इंद्रदेवता किंवा सक्क हा पुढे परंपरेत दिसतो तो तज्यामिं नामक नट म्हणून. हा बदल नेमका कधी आणि कसा झाला हेही मला माहिती नाही. याच्या एका हातात शंख असून याचं वाहन तीन डोक्यांचा पांढरा हत्ती आहे. याचा संबंध आहे तिंज्या सणाच्या दुसऱ्या दिवसाशी – जो अच्या (a-kya) नावाने ओळखला जातो. या दिवशी तज्यामिं (उर्फ सक्क उर्फ इंद्र) स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतो असं मानलं जातं. ठरलेल्या वेळी लोक रस्त्यावर पाणी ओतून तज्यामिंची प्रार्थना करतात. तज्यामिं कोणत्या वाहनावरून येतो आणि त्याच्या हातात काय असतं यावरून येणाऱ्या वर्षाबद्दलचं भाकित shaman मंडळी (देव-नट आणि माणूस यांच्यात संवाद साधणारी माध्यममंडळी- भगत) करतात. (आता त्यांना तज्यामिं कसा काय दिसतो वगैरे तार्किक प्रश्न बाजूला ठेउयात.) चांगलं वागणाऱ्या मुला-मुलींचं नाव तज्यामिं सोनेरी पुस्तकात लिहितो असं मानलं जातं.
माझ्या बमा बौद्ध मैत्रिणीला पहिली कथा माहिती नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार दुसरी कथा तिंज्यासाठी जास्त योग्य आहे, कारण म्यानमामध्ये तीच जास्त प्रचलित आहे.
आम्ही दुसऱ्या दिवशी (अच्या) फिरत फिरत कलौमधल्या Hnee Pagoda मध्ये गेलो होतो. Hnee या शब्दाचा बर्मी भाषेत अर्थ होतो बांबूची पट्टी. इथली बुद्धाची मूर्ती बांबूपासून बनवलेली आहे. पगोडामध्ये अनेक लोक होते.



लोक शांतपणे बसले होते, वस्तू देणगी म्हणून बुद्धाच्या मूर्तीपुढे ठेवत होते. अशा सर्व प्रसंगी पगोडा येणाऱ्या सर्व भक्तांसाठी चहापाण्याची व्यवस्था करतो. लोकसहभागातून आणि लोकश्रमातून हे काम बिनबोभाट चालू असतं. भाविकांना मार्गदर्शन करण्याचं काम भिक्षु करत होते तर चहापाण्याची जबाबदारी भिक्षुणी सांभाळत होत्या – हे पाहून मी आणि माझी मैत्रीण एकमेकींकडे पाहून फक्त हसलो. अर्थात ती बमा (म्यानमामधला एक गट) बौद्ध असल्याने तिला हे नवीन नव्हतं – तिने मग तिच्या लहानपणच्या मठांच्या आणि अशा उत्सवांच्या अनेक आठवणी मला सांगितल्या.
जुन्या काळी Padauk च्या डहाळीने पाणी एकमेकांवर फक्त शिंपडलं जायचं. जुनी पापं वाहून जावीत, तन-मन स्वच्छ व्हावं आणि नव्या वर्षाची सुरूवात लोकांनी नव्याने करावी अशी त्यामागची संकल्पना होती. पण आता मात्र पिचकाऱ्या आणि पाईप यांचा सर्रास वापर केला जातो.
तिसरा दिवस आहे अच्च्या (a-kyat). Leap year मध्ये दोन दिवस असतो. चौथा दिवस आहे अट्टे (a-tet) – या दिवशी तज्यामिं स्वर्गात परत जातो. जलमहोत्सवाची सांगता होते. एका संदर्भानुसार या तीन दिवसांत तज्यामिंने पृथ्वीतलावर चांगलं काम करून काही पुण्य कमवावं लागतं, अन्यथा त्याचं स्वर्गातलं स्थान डळमळीत होईल.
पाचवा दिवस म्हणजे म्यानमा नववर्षदिन – न्हिह्सांटय्ये - hnit hsan ta yet. पूर्वी या दिवशी घरातल्या ज्येष्ठांचे केस लहानांनी धुवायचे अशी प्रथा होती. लहान जलाशयांतून मासे मोठ्या जलाशयांमध्ये सोडले जातात. लहान मुलांना बौद्ध धर्माच्या शिक्षणाची दीक्षाही या दिवशी दिली जाते. या समारंभानंतर मुलं काही काळ तरी (किमान तीन दिवस) मठात राहतात.
बदलत्या काळानुसार या पारंपारिक उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. शहरात आणि ग्रामीण भागांत उत्सवाचं स्वरूप भिन्न आहे हे कलौ आणि टाँजी या दोन शहरातल्या अनुभवांवरून मला स्पष्ट दिसलं. छोट्या शहरांत, ग्रामीण भागात अजूनही परंपरेला महत्त्व आहे आणि उत्सवाचं स्वरूप काहीसं निरागस आहे. कलौमध्ये लोक आपापसात स्पर्धा करताना दिसले नाहीत. टाँजीमध्ये मात्र प्रायोजकांच्या मदतीने उत्सवाचं बाजारीकरण घडताना दिसलं. कुणाचा मंडप मोठा, कुणाकडं पाण्याचा साठा जास्त, कुणाकडं वाटायचे खाद्यपदार्थ जास्त चांगले ... हे हळूहळू आकार घेऊ लागलं आहे असं स्थानिक लोकांशी बोलताना कळलं.
रोजच्या जगण्यातले प्रश्न काही काळापुरते विसरून जाण्याला, त्या प्रश्नांना नव्याने सामोरं जायला असे उत्सव ताकद देतात असं मला वाटलं खरं. पण कितीही म्हटलं तरी हा माझा पहिलाच तिंज्या (मागच्या वर्षी मी भारतात आले होते) आणि तोही वरवर पाहिलेला. त्यामुळे त्याचे सगळे ताणेबाणे माझ्या लक्षात आलेच असतील असं अजीबात नाही. एकंदर मला मजा आली इतकंच काय ते खरं.
यावर्षीच्या तिंज्याचे अजून तीन दिवस बाकी आहेत, त्याकडे कुतुहलाने पाहते आहे.
संदर्भWikipedia, The Myanmar Times,  The Irrawaddy,  स्थानिक लोकांशी झालेला संवाद

Saturday, March 3, 2018

२५२. म्यानमा डायरी: १: बसप्रवास


जून २०१६ पासून मी म्यानमामध्ये (Myanmar) राहते. इथल्या वास्तव्यातल्या या काही नोंदी. या नोंदी विस्कळीत आहेत, कालानुक्रमानुसार नाहीत.
**************
या देशातला हा काही माझा पहिला बसप्रवास नव्हता. गेल्या दीड वर्षात कामानिमित्त अनेक प्रवास बसने केले, काही प्रवास भटकंतीसाठी केले. पण या प्रत्येक प्रवासात माझ्या स्थानिक सहकारी माझ्यासोबत असायच्या. त्यामुळे भाषेचा प्रश्न मला कधी आला नाही.
आजचा बसप्रवास मात्र वेगळा होता. मी कया (Kayah) राज्यात बसने निघाले होते आणि माझ्यासोबत होती माझी एक ब्रिटिश सहकारी. आम्हा दोघींचही बर्मी (म्यानमार) या स्थानिक भाषेचं ज्ञान अगदी कामचलाऊ. पण बसचं तिकिट काढलंय, लॉयकॉ (Loikaw) मध्ये यांगोंच्या मैत्रिणीने हॉटेल बुकिंग करून ठेवलंय, तिथल्या टूरिस्ट गाईडशी फोनवर बोलणं झालंय, त्यामुळे काही अडचण येण्याची शक्यता नाही असं समजून मी निर्धास्त होते.
बस सकाळी सहा वाजता सुटणार होती. साडेपाचला पोचा बरं का नक्कीअसं तिकिट देणाऱ्याने बजावून सांगितलं होतं. पाचेक घरं पलीकडं राहणाऱ्या टॅक्सीचालकाला दोन दिवस आधी सांगून आणि आदल्या रात्री आठवण करून देणारा निरोप देऊन झालं होतं. पहाटे चारला उठून, आवरून, ठरल्याप्रमाणे पाच वाजता आम्ही टॅक्सीची वाट पाहू लागलो, पण टॅक्सीचालकाचा काही पत्ता नव्हता. मग फोन केला तर तो उचलला गेला नाही. टेबलावरच्या कागदपत्रांतून त्याचा दुसरा नंबर शोधून काढला, पण तिथंही प्रतिसाद नाही. मग माझी मैत्रीण सायकलवर त्याच्या घरी गेली आणि तिच्या मागोमाग तो हजर झाला.
साडेपाचच्या मानाने बसस्थानकावर बऱ्यापैकी गर्दी होती. मग लोकांना विचारत विचारत हिंडत असताना एका ट्रॅवलर टेम्पोच्या छतावरून एकाने ओरडून सांगितलं - लॉयकॉवाले इकडं या. दहा आसनी वाहन पाहून 'आता पुढचे सात तास आपण कसा प्रवास करणार' असा मनात आलेला प्रश्न न उच्चारता सामान टपावर चढवून आम्ही आतमध्ये बसलो.
साधारणपणे पंचेचाळीस मिनिटांनी गाडी थांबली आणि गाडीतले सगळे खाली उतरले. टपावरचं सामान काढायला लागले. मग मीही उतरून चौकशी केली तर कळलं की इथल्या मोठ्या बसस्थानकावरून मोठी बस जाणार आहे. मग सामान या टपावरून त्या टपावर स्थानांतरित झालं, तिकिटं तपासून झाली. तिकिटं तपासणाऱ्या मुलीने दोन खुर्च्या आणून दिल्या आणि आम्हाला बसायला सांगितलं.
अर्धा तास बसून राहिल्यावर आम्ही कंटाळलो आणि इकडंतिकडं हिंडायला लागलो. तर आमच्या बसमध्ये पानांच्या (खायच्या पानांच्या) मोठ्या टोपल्या चढवल्या जात होत्या.

                          

एक बस आली, दुसरी आली, तिसरी आली तरी टोपल्या काही संपत नव्हत्या. दरम्यान बसचालकाशी थोड्या गप्पा मारून झाल्या. अखेर एकदाची आठ वाजता आमची बस निघाली.
रस्ता सुंदर होता. एका बाजूला डोंगररांगा, दुसऱ्या बाजूला दरी, मध्येच दिसणारी चिमुकली गावं .. असं सगळं स्वप्नवत चाललं असताना अचानक बस थांबली. पुढचे काही प्रवासी उतरले. मागच्या प्रवाशांच्या आपापसातल्या बोलण्यावरून बसमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे इतपत आम्हाला समजलं आणि पाय मोकळे करायला आम्हीही उतरलो. आमची बस जिथं बंद पडली होती, तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केळीच्या बागा होत्या.

एक स्त्री हिरव्या केळ्यांचे घड वरून तोडून आणून ठेवत होती. ते पुरेसे साठले की एक पुरूष मोटरसायकलवर दोन्ही बाजूंना टांगलेल्या बास्केटमधून ते घेऊन जात होता.

आमचा वाहनचालक आणि त्याचा साहाय्यक मोबाईलवर बोलत होते, गाडीत जाऊन काहीतरी खटपट करत होते आणि पुन्हा मोबाईलवर बोलत होते. सगळे प्रवासी शांतपणे उकिडवे बसले होते. वेळ जसजसा जास्त लागत गेला, तसतशी प्रवाशांनी फक्त सावली शोधली. कुणीही वैतागलेलं दिसत नव्हतं, कुणाचाही चेहरा त्रासिक नव्हता, बस कंपनीवर कुणीही तोंडसुख घेत नव्हतं. लहान मुलं शांतपणे खेळत होती. लोक गप्पा मारत होते.

घड्याळाचे काटे पुढं सरकत होते. अर्ध्या तासाचा एक तास झाला. एका तासाचे दोन तास झाले तरी दृश्य तेच होतं. मोबाईलवर बोलून गाडीत खटपट करून परत मोबाईलवर बोलणारे चालक आणि साहाय्यक, शांतपणे उकिडवे बसून बस दुरूस्त होण्याची वाट पाहणारे प्रवासी. येणारी-जाणारी इतर वाहनं जुजुबी चौकशी करत होती. एक-दोघा वाहनचालकांनी थांबून मदतीचा अयशस्वी प्रयत्न केला.
उन्हाला कंटाळून आम्ही बसमध्ये येऊन बसलो. तर तेवढ्यात एक बस येऊन थांबली आणि आमच्या बसमधले काही प्रवासी पळतपळत तिकडं गेले. आम्हीही उतरलो. ती लॉयकॉच्या दिशेने जाणारी दुसरी बस होती. आमच्या बसमधल्या प्रवाशांनी ती पुढं असणाऱ्या एका उपाहारगृहापर्यंत सोडायला तयार होती. पण लक्षात आलं की त्या बसमध्ये जागा नसल्याने आमच्या बसमधले प्रवासी तिच्या टपावर चढून बसले होते. आमच्यासाठी त्या बसमध्ये जागा नसल्याने आम्ही परत फिरलो.
दोन छोट्या मुली माझ्या मागच्या सीटवर होत्या. आजीबरोबर त्या लॉयकॉला चालल्या होत्या. त्यांच्याशी मोडक्यातोडक्या बर्मीत गप्पा मारायचा प्रयत्न केला. परीक्षा संपून शाळांना सुट्टी लागल्याचं त्यातून समजलं. त्यातली एक लहानगी हुषार होती. तिने मला एबीसीडी म्हणून दाखवलं, माय नेम इज .. असं म्हणत स्वत:चं नाव सांगितलं. बमासगा तै खेटे (बर्मी भाषा फार अवघड आहे) असं मी म्हणताक्षणी ती उस्फूर्तपणे इंग्लेसगा तै खेटे(इंग्रजी भाषा फार अवघड आहे) म्हणाली तेव्हा हसू आलं. तिला अर्थात कया भाषा जास्त आवडते. कयापेक्षा बर्मी अवघड आहे असं तिचं मत होतं. ते ऐकताना राज्यभाषा आणि मातृभाषा याबाबत आपल्याकडं लोकांच्या मनात असणारा गोंधळ आठवला.

बसच्या दारावर मिस्टर बीनचं चित्र होतं. त्या मुलींना बीनचं नाव बरोबर सांगता आलं आणि बीनचं नाव काढताच त्या खुदुखुदू हसायला लागल्या होत्या. म्यानमामध्ये लहान मुला-मुलींमध्ये मिस्टर बीन फार लोकप्रिय आहे. माझ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची मुलं-मुली (शाळेला सुट्टी असल्याने) आईसोबत कार्यालयात येतात. तीही मोबाईलवर मिस्टर बीन पाहताना मस्त हसत असतात.
दोन मुलींनी झाडाच्या सावलीत जाऊन आपला डबा उघडला. बसचालक आणि त्याच्या साहाय्यकालाही त्यांनी डब्यातला खाऊ दिला. मी सकाळी सातपासून बघत होते तो साहाय्यक तर उभाच होता. एक मिनिटही तो बसला नव्हता आणि सतत धावपळ करत होता.
आणखी एक वाहनचालक मदतीला आल्यावर आमची बस सुरू झाली. आणि दहाच मिनिटांत पुन्हा थांबली. पुन्हा काही काळ खटपट सुरू झाली आणि अर्धा तास बस मस्त चालत होती. आता किती वाजता आपण लॉयकॉला पोचू याचा हिशोब करेतोवर बस पुन्हा थांबली. पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उपाहारगृहात गेलो. आमच्या बसमधले दोन तासांपूर्वी इथं येऊन बसलेले प्रवासी जणू काही आपले नातेवाईक घरी आलेत अशा थाटात आमच्या स्वागताला उभे राहिले. कोणी मेन्यूकार्ड आणून दिलं, कोणी गरम चहा आणायला गेलं (इथल्या उपाहारगृहांमध्ये ग्रीन टी कायम टेबलावर असतो आणि तो मोफत असतो, कितीही कप पिता येतो). आम्ही पोटपूजा उरकली. एकेक प्रवासी आणि उपाहारगृहांमधले मालक-कर्मचारी आमच्याशी येऊन बोलत होते. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की इंग्रजी भाषा न जाणणाऱ्या समुहामध्ये कोणाही अनुवादकाच्या मदतीविना मी घालवत असलेला हा पहिलाच दिवस होता.
एव्हाना दुपारचा एक वाजून गेला होता, तरी सहप्रवासी शांतच होते. माझी सहकारी ब्रिटिश आहे, ती म्हणाली, ‘’एव्हाना आमच्या देशात पोलीस येऊन सर्वांना घेऊन गेले असते, इथं मात्र काही सपोर्ट व्यवस्थाच नाहीये’’. लोकांच्या शांत असण्यावर आम्ही बरीच चर्चा केली आणि या निष्कर्षाप्रत आलो की माणसांना जेव्हा पर्याय उपलब्ध असतात तेव्हा माणूस ते शोधण्याची धडपड करतो. इथल्या सर्वसामान्य गरीब माणसांकडं तिकिटाचे पैसे गेले वाया तर जाऊदेत, आपण दुसरी बस पकडून जाऊ असं म्हणण्याइतपत जास्तीचा पैसा नसतो. मी आणि माझी मैत्रीण असे पैसे खर्च करायला (आणि पर्यायाने वेळ वाचवायला) तयार झालो असतो, पण पर्याय कुठं होता? मागच्या तीन तासांत लॉयकॉच्या दिशेने फक्त एक बस गेलो होती, तीही भरलेली होती. मग आम्हीपण काही न करता निवांत बसलो. एवीतेवी चार दिवस सुट्टी होती म्हणून तर लॉयकॉला चाललो होतो. इथल्या लोकांमध्ये मिसळायचं होतं म्हणून तर बसने चाललो होतो. मग आम्ही अगदी बर्मी लोकांप्रमाणे निवांत बसलो. त्यांच्यासारखं तासन् तास उकिडवं बसता येत नव्हतं म्हणून आधी बसमध्ये आणि मग उपाहारगृहांतल्या खुर्चीवर बसलो, इतकाच काय तो फरक.
आम्ही अजिबात कटकट न केल्याचा एक फायदा झाला तो म्हणजे सगळे प्रवासी आमच्याशी मस्त गप्पा मारायला लागले. आमच्या 'फॉरिनरपणाचं' त्यांच्यावरचं दडपण थोडं कमी झालेलं दिसत होतं. आम्ही कोण आहोत, कुठून आलो, घरी कोणकोण असतं, इकडं काय काम करतो, लॉयकॉत काय करणार, अमुक पया (पगोडा)ला जाणार का .... वगैरे सगळ्या चौकशांना आम्ही अनेकदा उत्तरं देऊन झाली. परके लोक आपली भाषा बोलायचा प्रयत्न करताहेत हे पाहून लोक हरखले होते. मग त्यांच्यातले काहीजण एखादा-दुसरा इंग्रजी शब्द बोलायचे, आणि बाकी सगळे त्यावर हसायचे अशी एकंदर धमाल चालू होती.
बघताबघता दुपारचे अडीच वाजले. म्हणजे गेले साडेपाच-सहा तास आम्ही रस्त्यावरच होतो. एकदाची बस सुरू झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला. पंधराएक मिनिटांनी बस पुन्हा थांबली. दोन लोक बसमध्ये चढले, त्यांनी परत काहीतरी खटपट केली. मग चाक त्या नव्या माणसाने ताब्यात घेतलं आणि आमच्या जुन्या चालकाची रवानगी कारमध्ये झाली. ही कार आमच्या बसच्या मागोमाग येत राहिली.
पाच वाजता चहा प्यायला एके ठिकाणी थांबलो तेव्हा आमच्या बसच्या चालकाने सांगितलं की हे नवे चालक त्यांच्या कारने आम्हाला लॉयकॉतल्या आमच्या हॉटेलमध्ये सोडतील. रात्री उशिरा अनोळखी शहरात टॅक्सी कुठं शोधायची हा आमचा प्रश्न मग मिटला. गप्पा मारताना कळलं की हे नवे चालक म्हणजे प्रत्यक्षात बसचे मालक होते. बस बंद पडल्याचं कळल्यावर लॉयकामधून कारने पाचेक तासांचा प्रवास करून ते मदतीला आले होते.
लॉयकॉचा रस्ता म्हणजे डोगंरातला चढ-उताराचा रस्ता होता. तो संपल्यावर मालकांनी वाहनचालकाच्या ताब्यात बस दिली. चला, बसा कारमध्ये. तुम्हाला मी हॉटेलमध्ये सोडतोअसं ते म्हणाल्यावर आम्ही सामान उचलून कारमध्ये बसलो. मला आधी वाटलं की पंधरा-वीस किलोमीटर फक्त बाकी असतील, प्रत्यक्षात साठ-सत्तर किलोमीटरचा रस्ता बाकी होता. कारने आलो म्हणून मग आम्ही आठ वाजता तरी लॉयकॉत पोचलो, बसने आलो असतो तर बहुतेक दहा-साडेदहा झाले असते.
या बसमालकालाही इंग्रजी येत नव्हतं, पण आम्ही भरपूर गप्पा मारल्या. आमचा लॉयकॉत काय करायचा बेत आहे हे त्यांना जाणून घेतलं. तीन दिवसांनी परत जायचं आहे, पण तिकिट नाही म्हटल्यावर त्यांनी लगेच एक फोन फिरवला आणि रविवार सकाळच्या बसमध्ये दोन जागा आरक्षित केल्या. पहाटे साडेसहाला हीच कार तुम्हाला घ्यायला येईल असं त्यांनी आपणहोऊनच सांगितलं. तिकिटाच्या पैशांसंबंधी विचारणा केल्यावर बसमध्ये बसल्यावर द्याअसं म्हणाले. वाटेत एके ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी संत्री आणि पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या. काही गरज लागली तर मला फोन करा म्हणत त्यांनी स्वत:चं कार्डही दिलं. हॉटेलमध्ये पोचल्यावर कारच्या प्रवासाचे पैसे देऊ केले तर त्यांनी ते घेतले नाहीत.
पहाटे पाचपासून ते रात्री आठपर्यंत असे अठरा तास म्यानमामधल्या सर्वसामान्य नागरिकांचं जे दर्शन झालं ते चकित करणारं होतं. इथले लोक नेहमीच मैत्रीपूर्ण वागतात, मदतीला तयार असतात हे माहिती होतं, अनुभवलं होतं अनेकदा यापूर्वीही. तरीही आज त्यांच्याबरोबर घालवलेला हा मोठा दिवस बरंच काही शिकवून गेला. एखाद्या समाजाची संस्कृती पुस्तकांत किंवा देवळांत नसते, तर ती त्या समाजाच्या रोजच्या जगण्यात असते हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
आता मी पुढच्या बसप्रवासासाठी उत्सुक आहे.