ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, April 20, 2011

७०. सूत्र


एप्रिल महिन्यातल्या भर दुपारी एक वाजता जेव्हा समोरचा तो उजाड रस्ता मला दिसला तेव्हा मला क्षणभर माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला. या गावात काम सुरु करायचं का नाही यावर आमची भली मोठी चर्चा झाली होती. मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावरच हे एक छोट गाव – जेमतेम शंभर घर असतील नसतील! त्यात बरेचजण वस्तीवर – म्हणजे त्यांच्या शेतात – राहायचे आणि सुगीनंतरच गावात यायचे. पाच किलोमीटर डांबरी सडक होती – पण त्यावरून सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा महामंडळाच्या फक्त दोन बस यायच्या.

गावातली काही पोर दहा किलोमीटर दूर असणा-या ‘सूत गिरणीत’ कामाला होती. त्यातल्या एका दोघांकडे मोटारसायकल होती. पण बरेचजण सायकलवरून जायचे यायचे – एका सायकलवर तीन तीन जण! काही मुख्य रस्त्यापर्यंत येऊन गिरणीकडे जाणारी बस पकडायचे. गावात प्राथमिक शाळा होती. पाचवीच्या पुढची मुल मुली पाच किलोमीटर चालत यायचे शाळेत – पाउस असो, थंडी असो वा उन्ह असो!

गाव तसं गरीबच म्हणायला हव! शेतकरीच होते सगळे. त्यांची शेती पावसाच्या कृपेवर अवलंबून. त्यामुळे सहा महिने बाप्ये बाया रस्ता तुडवत कामावर जायचे. जनावर होती घरात अनेकांच्या. पण दुधदुभत विकून पैसा कमावण्याकडे त्यांचा स्वाभाविक कल होता. शांत होते गावातले लोक. बाजारच्या दिवशी तालुक्याच्या गावातून काही जण दारू पिऊन यायचे – पण तो त्रास आठवड्यातून एकदाच असायचा!

या परिसरातल्या दहा गावांत आम्ही काम करत होतो. पुण्यातून येऊन दर महिन्यातला एक आठवडा मी या परिसरात असे. या गावात पोचायच तर पाच किलोमीटर चालत येण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी पुढच्या गावात जायला शेवटची बस असायची किंवा गावातून दुधाचे कॅन नेणारी गाडी – तिथल्या भाषेत ‘कॅन्डची’ गाडी - हमखास यायची. आणि तीही नाहीच आली तर कोणीतरी तरुण मोटरसायकलवरून मला सोडायचा. संध्याकाळी गावातून परत येण्याचा फार मोठा प्रश्न नव्हता – एक सोडून तीन पर्याय होते. पण दुपारी गावात पोचताना मात्र पायी चालणे ही एकच पर्याय होता.

म्हणून माझ्या टीमच मत होत की या गावात सध्या काम सुरु करू नये. पण मला वाटलं की जिथं माणस रोज चालतात तिथ महिन्यातून एक वेळ चालायला आपल्याला काय हरकत आहे? या गावात नियमित मी येणार होते, चालाव मला लागणार होत, त्रास काय व्हायचा तो मला झाला असता .. अशा माझ्या युक्तिवादापुढ (खर तर हटटापुढ!) इतरांनी शरणागती पत्करली आणि मी या गावात चालत यायला लागले – त्याला आता एक वर्ष होत आलं होत!

सुरुवातीचे दिवस मस्त गेले. बहुतेक वेळा त्या रस्त्यावर मी एकटीच असायचे .. रस्त्याच्या कडेची झाड शांत उभी असायची. त्यांची पानगळ, नवी पालवी, पावसाच्या शिडकाव्याने न्हाऊन निघणारी झाड .. हे सगळ चक्र जवळून पाहायला मिळाल. आकाशाच्या निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा मी त्या वर्षभरात पाहिल्या. शेतात पीक असण्याच्या काळात माणस काम करताना दिसायची – मला बघून थांबायची. सुरुवातीला ‘कुणाची पाहुणी बाई तू?’ अस विचारणारे लोक मला पाहिल्यावर आता ‘आज बायांची मीटिंग’ अस आधी एकमेकाना आणि मग मला म्हणायला लागले. दिवाळी संपली की शेळ्या चारणारी बारकी पोर पोरी आणि म्हातारी माणस दिसायला लागली. त्यातल कोणी मग थांबून गप्पा मारायचे – म्हणजे ते एका जागी थांबलेलेच असत – मीच दोन मिनिट थांबायचे त्याच्याशी बोलायला.

पाउस आणि थंडी या भागात जेमतेमच. उन्हाचा तडाका जोरदार असायचा – पण माझी त्याबद्दल काही तक्रार नव्हती. त्या काळात माझ्या आयुष्यात माणसांची फार जास्त गर्दी होती; त्यामुळे मला तासाभराचा तो एकटेपणा आवडायचा. पाच किलोमीटर चालायला मला पन्नास एक मिनिट लागायची. आधी सुरुवातीला रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसणार एक झाड त्याच्या जवळून जाताना मात्र रस्त्याच्या डाव्या बाजूला असायचं – तो वळणारा रस्ता नेहमी गंमतीदार वाटायचा मला! दूरवरून पाण्याची टाकी दिसली की गाव आता पाच दहा मिनिटांवर राहिल असा दिलासा मिळायचा.

गावात पोचले की ठरलेल्या घरी ‘बायांची मीटिंग’ असायची. त्या घराच्या अंगणात पिंपळाच छान झाड होत. बाया गोळा होईपर्यंत मी निवांत त्या झाडाकडे पहात बसायचे. मला पाहून पोरासोरांना पळवायच्या बाया एकमेकीना हाका मारायला, निरोप द्यायला. कोणी भांडी घासत असायच, कोणी शेतातून नुकतच येऊन भाकरी खात असायचं, कोणी गप्पा मारत असायचं, कोणी मीटिंग आहे हे विसरून शेतात गेलेल असायच .. वीस बायांच्या तीस त-हा होत्या अस म्हणल तर अतिशयोक्ती होणार नाही.

एखादी नवी गोष्ट जेव्हा मी करते तेव्हा कितीही त्रासदायक असली तरी किमान वर्षभर ती करून पाहायची, त्याच्या आत ती बंद करायची नाही असा माझा प्रयत्न असतो. आता वर्षच का? पाच वर्ष का नाहीत? एक तर वर्षभराचा काळ म्हणजे एक पुरेशी संधी असते, हा काळ शिकण्यासाठी पुरतो आणि आपल्या चिकाटीचा आणि सहनशक्तीचा पुरेसा कस वर्षभरात लागतो. आपण पुरेसा वेळ दिला नाही अशी अपराधी भावना मग रहात नाही मनात! या काळात जे रुजत - ते रुजत आणि वाढत; आणि त्याच्यासह जगता येत आनंदान! जे वर्षभरात रुजत नाही, ते नाही आपल्याला जमत करायला; ते आपल्यासाठी नाही - हे मान्य करून पुढे जाव लागत. आणि वर्षभरात आलेल्या वैतागान दूर होण्याची प्रक्रिया सोपी होते!

आता या गावात वर्ष होत आल होत मला ...आणि कामाच गणित काही नीट बसलेल नव्हत हे मला सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नव्हती! तशी अडचण काही नव्हती – लोक चांगले होते, मला मदत करायचे, माझ्याशी चांगल वागायचे. बायांचा स्वयंसहायता गट तसा व्यवस्थित चालला होता – म्हणजे बचत होत होती वेळेत, कर्ज घेतल जात होत आणि वेळेत परतही केल जात होत; गटात भांडण वगैरे काही नव्हती! पण सगळ ‘ठीकठाक’ या सदरात मोडेल असच होत! विशेष काही घडत नव्हत!

साधी वेळेवर मिटींगला किंवा कार्यक्रमाला येण्याची गोष्ट घेतली तरी प्रश्न होता. मी पाच किलोमीटरची रपेट करून पोचायचे तर कोणीच जागेवर नसायचं. मी आल्यावर गोळा व्हायचे लोक – मिटींगला किंवा कार्यक्रमाला! गावातल्या लोकांच्या हातात घडयाळ नसत हे मला माहिती आहे – त्यामुळे पाच दहा मिनिटांचा उशीर ठीक आहे. पण अनेक लोक पूर्ण विसरून गेलेले असत त्या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल! मला कधीच उशीर झाला नव्हता आजवर! मी पोचायच्या आधी लोक पोचले आहेत अस एकदाही घडल नव्हत! सगळ काम आपल्यावर अवलंबून असण्यान आपला अहंकार सुखावतो हे खर – पण मी तोवर पुरेस अनुभवलं होत! या त-हेने हे काम टिकणार नाही आणि वाढणार नाही हे मला माहिती होत! मी काही या गावाला जन्मभर पुरणार नव्हते – त्यांच्यापैकी काहीनी पुढाकार घ्यायला हवा होता, जबाबदारी घ्यायला हवी होती. एकदा ते आले की खूप काम करत – मला काही करावं लागत नसे – पण ते कधीच ठरलेल्या वेळी नसत जागेवर ही अडचण होती! त्या सगळ्या लोकांना कार्यक्रमाशी बांधून ठेवणारा धागा मी होते आणि त्याच मला ओझ व्हायला लागल होत!

या गावात येण्याची वेळ बदलून पाहली होती, दिवस बदलून पाहिला होता, कार्यक्रमांचे स्वरूप बदलून पाहिलं होत .. आमच्या भाषेत बोलायचं तर वेगवेगळ्या strategies वापरून झाल्या होत्या! ‘माणूस बदलण्याची – म्हणजे कार्यकर्ता बदलण्याची’ एक पद्धत असते अशा वेळी – पण इतक चालत यायला दुसर कोणी तयार नव्हत! शिवाय मी त्यावेळी त्या संस्थेची एकमेव ‘पूर्ण वेळ कार्यकर्ती’ होते – मी सोडून बाकी सगळे घरदार सांभाळून काम करत होते. शिवाय या गावात काम चांगल चालल असत तर कुणीही दुसर हसत आलं असत ते पुढे करायला – पण अपयशाच ओझ कुणालाच नको असत. मलाही माझ अपयश दुस-यांच्या ओंजळीत ते तयार नसताना टाकायचं नव्हत. त्यामुळे याचा शेवट आपणच करायला हवा असा मी निश्चय केला होता. अर्थात तो एकदम करून चालणार नव्हत – काम बंद करण्याचीही एक पद्धत असते हे मला माहती होत!

आज मी याच गावात मुक्काम करणार होते. दुपारची बायांची मीटिंग झाली की रात्री गावक-याबरोबर आणखी एक मीटिंग होती – ज्यात स्त्रिया, पुरुष असणार होते. ग्रामसेवक, सरपंच, शिक्षक, अंगणवाडीच्या ताई अशीही मंडळी असणार होती. काम सुरु करताना जसं सगळ्याना विश्वासात घ्यायचं तसच काम बंद करतानाही घ्यायला हव! माझ्या मागे त्यांच्यात उगीच गैरसमज नको होते मला! आज हे सगळ करायचं होत – त्यांना नाउमेद न करता, त्यांना धक्का न देता, त्यांना पुरेसा वेळ देऊन – ही कसोटीच होती माझी! या रस्त्यावरून आता फार कमी वेळा आपण चालणार आहोत हे लक्षात येऊन मी काहीशी भावूक झाले होते.

रात्रीची मीटिंग जोरदार दिसत होती – आख्ख गाव जमा झालं होत! आजचा ‘माझा’ विषय काय होता ते त्याना कुणालाच माहीत नव्हत! नेहेमीप्रमाणे मागच्या तीन महिन्यांच्या कामाचा आढावा घेऊन झाला आणि सगळेजण कुतुहलाने माझ्याकडे पहायला लागले. मी सगळ्यांचे वर्षभराच्या त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले आणि अजून साधारण सहा एक महिन्यांनी मी काही तुमच्या गावात नियमित येऊ शकणार नाही अस सांगितलं! सगळे एकदम शांत झाले. वातावरणातला ताण हलका व्हावा म्हणून मी पुस्ती जोडली – ‘अधूनमधून कधीतरी येईन मी, पण दर महिन्यात काही जमणार नाही; आणखी नव्या गावांमध्ये काम सुरु केले आहे; तिकड जावं लागणार आता. पण तुमची आठवण आली की मी येईन तुम्हाला भेटायला!’ तरीही शांतताच. सगळे मान खाली घालून बसले होते. आपला या गावातल काम बंद करण्याचा निर्णय भयंकर चुकलेला आहे अस मला तोवर (नेहमीसारखच!) वाटायला लागल होत!

मी पुढे बोलत राहिले. ‘पण काम तर पुढे चालू राहायला हव. कोण काय काय जबाबदा-या घेणार, कशी व्यवस्था ठेवायची कामाची ते ठरवू आता आपण. मागच्या अनुभवावरून काही बदल करायचे असतील तर करू’ या माझ्या वाक्यावर पण कोणी काही बोललं नाही. सगळे एकमेकांची आणि माझी नजर चुकवत होते. अनेकांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह होत; अनेकजण गोंधळले होते; अनेकांना मी काय बोलले त्याचा अर्थच कळला नव्हता. “तुम्ही आमच्यावर रागावलात का? आमच काही चुकल का?” कोणीतरी विचारल. मला त्या रस्त्यावर गाडी जाऊ द्यायची नव्हती. मग घाईघाईने आम्ही एकेका उपक्रमाची सविस्तर चर्चा केली. प्रत्येक उपक्रमासाठी एक छोटी समिती सर्वानुमते नेमली. दर तीन महिन्यांनी आढावा बैठकीला मी आलच पाहिजे अस त्यांनी मला ठासून सांगितलं आणि मी ते मान्यही केल!

योगायोग असा झाला की पुढचा महिना काही कारणाने मला त्या भागात जायला जमल नाही. तेव्हा फोनच काही प्रस्थ नव्हत – त्यामुळे गावक-यांना मी पत्र पाठवून कळवली होती अडचण. ‘तुम्ही काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे सगळ व्यवस्थित चाललय. मात्र तुमच काम संपल की नक्की चक्कर टाका – दोन दिवस राहायलाच या’ अस मला त्यांच उत्तरही आलं. मला हा सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित नव्हता. त्यामुळे मला बर वाटलं. काय रहस्य आहे ते जाणून घ्यायचं कुतुहलही वाटल!

दोन महिन्यांनी मी गावात गेले आणि मला चमत्कारच पाहायला मिळाला. बायांच्या स्वयंसहायता गटाच्या बैठकीला सगळ्या बाया वेळेवर हजर होत्या – एकही उशीरा आली नाही. हा एक अनुभवच होता नवा! मुलांचा वर्ग, युवकांच अभ्यास मंडळ, रात्रीची गावसभा .... सगळ वेळेत पार पडल. एका महिन्यात नेमका काय चमत्कार घडला आहे हे मला समजेना. वर्षभर मी धडपड करूनही हे सगळे कधी वेळेत येत नसत, विसरून जात असत – मग नेमक मागच्या महिन्यात काय घडल? माझी कामाची पध्दत चुकत होती का? लोक मला घाबरत होते का? काही लोकाना मी आवडत नसेन म्हणून ते यायचं टाळत होते का? – माझ्या मनात प्रश्नांमागून प्रश्न होते. या गावातल काम बंद कराव लागणार नाही याचा आनंद होता. सर्व उपक्रम समित्यांनी चांगल काम केल होत दोन महिन्यांत – खर्चाची नोंद पण व्यवस्थित ठेवली होती. गावात एक प्रकारचा उत्साह दिसत होता. मला बर वाटलं!

गावसभा संपताना पुढची सभा कधी ते साधारण ठरत असे नेहमीच. आजही ते ठरत होते. ते ऐकताना मला काहीतरी वेगळ जाणवलं. मला लक्षात आलं, की दुपारपासूनच हा वेगळा शब्दप्रयोग मी ऐकते आहे – त्याचा अर्थ तोवर मला लक्षात आला नव्हता – पण तो आता येऊ लागला. आजवर मी पुढची मीटिंग ठरवताना बोलायचे ती तारीख असायची – म्हणजे पाच तारीख, किंवा सात तारीख. आता जो तरुण बोलत होता तो तारखेच्या भाषेत बोलत नव्हता – किंबहुना गावातले कोणीच आज तारखेच्या भाषेत बोलत नव्हते. ‘पहिल्या एकादशीच्या दुस-या दिवशी बायांची मीटिंग’; ‘पौर्णिमेच्या दुस-या दिवशी गावसभा’, ‘चतुर्थीच्या आदल्या दिवशी युवक मंडळाची बैठक’ ही भाषा मी दुपारपासून ऐकत होते.

माझ्या डोक्यात एकदम उजेड पडला. गावातले लोक घडयाळ वापरत नाहीत तसच कॅलेंडरही वापरत नाहीत – किंवा वेगळ्या उद्देशाने ते कॅलेंडर वापरतात हे तोवर माझ्या लक्षातचं आल नव्हत! एकादशी, चतुर्थी, अमावास्या, पौर्णिमा कधी असतात हे मला सांगताही येणार नाही – पण गावाच आयुष्य त्याभोवती केंद्रित होत. त्यांनी ती भाषा कळत होती – पाच तारीख, सात तारीख ही भाषा त्यांची नव्हती. पहिला सोमवार किंवा दुसरा बुधवार; हनुमान जयंती किंवा रामनवमी ही भाषाही त्यांना सोयीची होती – पण ती भाषा आहे हेच तोवर मला कळत नव्हत! लोक कार्यक्रमाची ‘तारीख’ विसरून जायचे कारण तारीख त्यांच्यासाठी महत्त्वाची नव्हतीच तोवर कधी!

जेव्हा लोकांच्या 'भाषेत' लोकांचे निर्णय व्हायला लागले, तेव्हा त्यांचा सहभाग वाढला. जोवर माझी शहरी भाषा (आणि त्याच्या अनुषंगाने येणा-या शहरी संकल्पना) मी वापरत होते तोवर त्यांच्या सहभागात अडचणी होत्या. मी हे कधी नीट समजूनच घेतलं नव्हत. लोकांच्या भाषेत निर्णय व्हायचे तर सूत्र लोकांकडेच असली पाहिजेत ख-या अर्थाने – मी करत होते तशी नावापुरती नाही!

“त्रैमासिक आढावा बैठक कधी घेऊयात? तुम्हाला कसे सोयीचे आहे?” मला कोणीतरी विचारल.
मी मनातल्या मनात विचार केला आणि म्हटल, “ नागपंचमीच्या दुस-या दिवशी चालेल का तुम्हाला?”

त्यावर क्षणभर अविश्वासाने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांची थट्टा तर करत नाही ना याची त्यांनी खातरजमा केली. आणि मग सगळे जे काही खुशीत हसले – ते मला अजून आठवत! आणि ते आठवून मी स्वत:शीच हसते!

मला एक नवीनच सूत्र गवसल त्यादिवशी!

Monday, April 11, 2011

६९. ‘जंतर मंतर’लेल्या संध्याकाळी

‘इंडिया गेट’ पासून आम्ही ‘जंतर मंतर’ ला परत येत आहोत. आयोजकांनी ‘घोषणा नको’ अशी सूचना दिली आहे. म्हणजे मौन नाही; पण घोषणाही नाहीत. मला आयोजकांच्या शहाणपणाच कौतुक वाटत. लोक दमले आहेत हे त्यांनी बरोबर ओळखलय. आधी जंतर मंतरपासून इंडिया गेटकडे जाताना आम्ही असंख्य घोषणा दिल्या आहेत. आज मिरवणुकीत मेणबत्त्या नाहीत; त्याऐवजी थाळी आणि चमचा आहे. त्यांच्या आवाजाने, लोकांच्या आवाजाने सरकार जागे व्हावे अशी आंदोलनाची अपेक्षा आहे.

गेला पाऊण तास आम्ही सगळे विश्रांती न घेता सलग ‘वंदे मातरम’ म्हणत आहोत. ‘इन्किलाब झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ या आणखी दोन लोकप्रिय घोषणा आहेत. आणखी एक घोषणा म्हणताना सगळ्यांच्या चेह-यावर हसू दिसतंय – ती घोषणा आहे “सोनिया जिसकी मम्मी है, वर सरकार निकम्मी है” ! फक्त तरुण वर्गच नाही तर मध्यम वयाचे स्त्री पुरुषही मोठया संख्यने मिरवणुकीत सामील झाले आहेत.


पण आता घोषणा बंद असल्याने लोक आपापसात बोलत आहेत. मी एकटीच चालते आहे. माझ्यासोबत कोणी दुसरे नसल्याने मी कोणाशी बोलायचा प्रश्न नाही. त्यामुळे मला इतरांचे आपापसातले संभाषण ऐकू येतय – माझ्या बाजूला, पुढे, मागे – सगळीकडे लोकांचे छोटे गट गप्पा मारताहेत. हे बोलणे ‘कॅमे-या’ समोर असते तसे नाही. मी त्यांचे बोलणे ऐकतेय हे त्यांना माहितीही नाही.

कॉलेज विदयार्थ्यांचा एक गट आहे. एक मुलगा म्हणतो, “ मी पहिल्यांदाच अशा निषेध मोर्चात सामील झालोय. नेहमी फक्त टीव्हीवर आणि यु ट्युबवर पाहिल होत! आज मला फार ग्रेट वाटतय!”
त्यावर गटातल कोणीतरी हसलं असणार. कारण हा पहिला आवाज विचारता झाला, “हसताय का तुम्ही? मी काही विनोदी बोललो नाही.”
मग त्याचा मित्र म्हणाला, “अरे, तू निषेध मोर्चाच बोललास. मला तर आठवतय तसं मी आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर इतका वेळ चालतोय. मला फार बर वाटतय. असे खूप लोक असतील की ज्यांना रोज नाईलाजाने चालाव लागत असेल. त्यांच जगण कस असेल याची मी कल्पना करतोय!”

आणखी एक गट आहे मुला-मुलींचा.
एक मुलगा म्हणतो, “तुम्हाला माहिती आहे का, या म्हाता-या माणसाला घर, कुटुंब वगैरे काही नाही.”
“म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?’ एका मुलीचा प्रश्न.
“आपण सगळे त्यांच्या घरातलेच आहोत,” आणखी एकजण भावूकतेने म्हणतोय.
“अरे ऐक तर यार! मला अस म्हणायच्य की त्यांना काही मुलगा, मुलगी, नातवंड, जमीन, इस्टेट नाही. ते स्वत:साठी हा संघर्ष करत नाहीत. ते लढताहेत आपल्यासाठी – आपल् जगण भल व्हावं म्हणून!”
“वा! याहून चांगल आजवर तू काही बोलला नव्हतास” त्याचे सहकारी त्याला शाबासकी देतात.

आणखी एक गट.
एक मुलगी म्हणते, “वर्ल्ड कप सेलेब्रशन बेस्ट होत, पण आज आपण जे काही करतोय ते बेस्टेस्ट आहे!”
‘का?” तिच्या मित्र मैत्रिणीना कुतुहल आहे.
“कारण क्रिकेट खेळतात ते सचिन, युवी, एम एस, झाक, भज्जी वगैरे – आपण नुसतेच ओरडतो त्यांच्या विजयानंतर. आपला त्यात वाटा शून्य असतो. पण इथे मात्र आपण राष्ट्राच्या एका कामात प्रत्यक्ष सहभागी होतोय,” ती स्पष्टीकरण देते.
“ उपोषणाला बसलेले ते ३०० लोक खरे सहभागी आहेत, आपण काय नुसते चालतोय” गटातला कोणीतरी जमिनीवर पाय असणारा त्यांना आठवण करून देतो.
“ते तर आहेच – ते ३०० लोक खरे हिरो आहेत यात वादच नाही. पण आपणही खारीचा वाटा उचलतो आहोत ना! माझ्या आयुष्यातला हा अगदी अविस्मरणीय प्रसंग आहे,” कोणीतरी म्हणते आणि त्यावर सगळे सहमत होतात – अगदी तो जमिनीवर पाय असणारासुद्धा!




आणखी एक गट.
“आपण १३च्या जेल भरोत सामील होऊया.” एक मुलगी सुचवते.
“पण त्यांनी आपल्याला खरच जेलमध्ये टाकल तर? पोलिस मारहाण तर करणार नाहीत आपल्याला? आणि कॉलेजने काढून टाकल तर?” दुसरी मुलगी नुसत्या विचारांनीही घाबरली आहे.
“काय काळजी करतेस एवढी? पोलिस मारणार वगैरे नाहीत काही. हजारो लोक येतील तुरुंगात जायला – तेवढी जागा कुठे आहे तुरुंगात?” एक मुलगा तिला समजावतो.
दुसरा मुलगा आपल्या गटाला प्रोत्साहित् करतो. तो म्हणतो, “आपण भगतसिंग आणि इतर स्वातंत्र्य योद्ध्यांबद्दल वाचले आहे. त्यांनी आपल्यासाठी बलिदान केले. ही आपली वेळ आहे, हा आपला क्षण आहे, ही आपली जबाबदारी आहे. आता या वेळी पळ काढून चालणार नाही.”
“हो, आपण यात सहभागी होऊ” ते सगळे एकमुखाने म्हणतात.

एक मध्यम वयीन स्त्री एकटीच चालताना दिसते. मी तिच्याशी बोलायला जाते. तरुणाईच्या प्रतिसादांनी – त्यांच्या संख्यने आणि त्यांच्या उत्साहाने ती भारावली आहे. ती माझ्याशी सविस्तर बोलते. “इथल वातावरण फारच चांगल आहे. दिल्लीची गर्दी स्त्रियांशी बहुधा नेहमीच वाईट वागते. पण इथे मात्र मुलींची आणि स्त्रियांची काळजी घेताहेत. एखाद्याचा चुकून धक्का लागला तर तो लगेच मनापासून माफी मागतो. चांगले काम, चांगले वातावरण लोकांमध्ये कसा बदल घडवते याचे हे एक उदाहरण आहे.”

मी त्या स्त्रीशी पूर्ण सहमत आहे. तुम्हाला माहिती आहेच की जंतर मंतर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे त्यांच्या सहका-यासह ‘जन लोकपाल बिलाच्या’ मागणीकरता आमरण उपोषण करत आहेत (होते). मी येथे अनोळखी लोकांच्या गर्दीत आहे, संध्याकाळचे काही तास आहे. रात्रीचे दहा वाजले तरी असुरक्षित वाटत नाही. एक चांगले वातावरण आहे भोवती – आपण सगळे एक आहोत असा दिलासा देणारे. ही दिल्ली माझ्या आजवरच्या अनुभवापेक्षा अगदीच वेगळी आहे.

******
अण्णा हजारे; लोकपाल आणि जन लोकपाल; सामाजिक संस्थांची आणि संसदेची भूमिका, जंतर मंतरचा पडद्यामागचा गट, सरकारला कसा अंदाजच आला नाही; सगळ्या स्तरातल्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग; गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग; लोकांचा राजकीय नेतृत्वावरचा उडालेला विश्वास; या आंदोलनाची रणनीति, मीडियाचा वापर, लोकशाही प्रक्रियांचे संस्थात्मिकीकरण – अशा अनेक मुद्द्यावर बरेच काही लिहिले गेले आहे आणि आणखीही बरेच लिहिले जाईल.

चर्चा आणि वाद आता नुकताच सुरु झाला आहे.
*****
या छान वाटणा-या चित्राची दुसरीही एक बाजू आहे. ती मी सांगितली नाही तर तुम्हाला मी अर्धसत्य सांगितल्यासारख होईल.

लोक मोठया संख्येने जंतर मंतरला येतात. कशासाठी? तर उपोषणाला बसलेल्या लोकाना पाठिंबा देण्यासाठी. आणि ते – सगळे नाही तरी बरेचसे – काय करतात?

थोडया घोषणा देऊन झाल्या, फोटो काढून झाले (मुख्यत्वे स्वत:चेच) की समोरच्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांकडे ते मोर्चा वळवतात. उपोषणाला बसलेल्या लोकांसमोर ते निर्लज्जपणे खात असतात. उपोषणाला बसलेल्या लोकांना पाठिंबा देताना काही तासदेखील ते आपल्या भुकेवर नियंत्रण राखू शकत नाहीत. त्यांच्या पाठिंब्यांचा नेमका अर्थ काय असतो?

कचरापेटी भरून वाहते आहे. उपोषणकर्त्यांच्या भोवतालचे वातावरण अस्वच्छ होते आहे पण त्याची कोणाला फिकीर नाही, त्यामुळे उपोषणकर्ते आजारी पडण्याचा धोका वाढतो – पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही. स्वयंसेवक बहुधा रात्री सगळा भाग साफ करतात. ते त्यांचे काम आहे का?

जवळजवळ प्रत्येकाकडे कॅमेरा आहे. ते ठीक आहे. पण बहुतेक सगळे स्वत;चेच फोटो काढण्यात मग्न आहेत. कॅमेरा आणायला बंदी केली तर इतके लोक येतील का?

घोषणा देणे ही देशभक्तीचे एकमेव प्रतिक बनले आहे. अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत असतानादेखील या घोषणाबाजानां शांत बसवत नाही. संयोजक सूचना देतात की, एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली आहे – त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यासाठी वाट दया. त्यावर एक तरुण ‘भारत माता की ..” ओरडतो. मी त्याच्या खांद्यावर थाप मारून त्याला सूचना नेमकी काय होती ते सांगते. तो खजील होते, माफी मागतो आणि निघून जातो. घोषणा देता येत नसतील तर त्याला तिथे थांबण्यात रस नाही.

एक गट ‘मनमोहन सिंग भारत छोडो’ अशी घोषणा देतो आहे. मनमोहनसिंगसुद्धा त्यांच्याइतकेच भारतीय आहेत ही वस्तुस्थिती त्यांच्या गावीही नाही. ‘भ्रष्टाचा-यांना गोळी मारा’ अशी घोषणा ऐकून आमच्यापैकी काहीजण ‘हिंसात्मक भाषा नको वापरायला. हे आंदोलन अहिंसेच्या तत्त्वावर उभारले आहे’ असे सांगतात तेव्हा तो गट आमच्यापासून दूर जातो.

काही युवक रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकतात तेव्हा त्याना कचराकुन्डीचा वापर करण्याची आठवण करून द्यावी लागते.

एक पत्रकार अण्णांना ‘तुम्ही सरकारला वेठीस धरले आहे’ असे म्हणते. आता त्या बाईना common sense कमी होता हे उघडच आहे. असा निराधार आरोप, पूर्ण आत्मविश्वासाने, हजारो समर्थकांसमोर करताना त्यांनी जरा विचार करायला हवा होता. जमलेल्या गर्दीने आरडाओरडा करत त्या बाईना बोलूच दिल नाही. अण्णांनी तिच्या प्रश्नच उत्तर दिल हा भाग वेगळा. पण गर्दीचे वागणे अजिबात समर्थनीय नव्हते. पत्रकार काही देव नव्हेत आणि त्यांनी तारतम्य राखावे हे खरे. पण दुस-यांचे काही ऐकून घ्यायचे नाही अशी मानसिकता आपल्या भविष्यात कुठे नेणार याची चिंता वाटलीच.
*****
लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल माझ्या मनात अनेक शंका आहेत.

हा आणखी एका प्रकारचा mass hysteria तर नाही? ‘सचिन, सचिन’ ऐवजी देश आता ‘अण्णा हजारे, अण्णा हजारे’ अस ओरडत नाही ना? अण्णांना देवत्व बहाल करण्याची मानसिकता अंगावर शहारे आणणारी आहे. आणि त्यांना खाली खेचून मूर्तिभंजन करायलाही आम्हाला वेळ लागणार नाही. त्यांच्या लढ्याचा मुद्दा लोकांनी फार उथळपणे समजून घेतला आहे अस दिसत. म्हणजे अनेकांना ‘जन लोकपाल’ आलं की जादूने एका रात्रीत सगळ काही बदलून जाईल अशी अपेक्षा आहे – जे वास्तवापासून फार अंतरावर आहे. आणि आम्ही फक्त घोषणा देऊ, त्या म्हाता-या माणसाने लढावे अशीच आमची अपेक्षा आहे. अनेकांना ही एक वेगळी करमणूक, वेगळी excitement आणि चर्चेला वेगळा विषय इतकाच या घटनेचा अर्थ!

India Against Corruptionचळवळीत सामील व्हायचं? एक missed call दया, किंवा फेसबुक किंवा Twitter वर एक क्लिक करा. जंतर मंतर किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही मोर्चात सामील होऊ शकलात तर उत्तम. मी हे सगळ केल आणि त्यातला फोलपणा मला जाणवला. किती सहजपणे तुम्ही ऐतिहासिक घटनेत सामील होऊ शकता! पण माझा अनुभव सांगतो की एखाद्या विचाराला, एखाद्या चळवळीला सामील व्हायचं ही इतकी सोपी गोष्ट नाही. तो एक अवघड मार्ग आहे. त्यासाठी बरच काही सोडाव लागत, बरच काही नव शिकावं लागत, समाजाला बदलण्याआधी स्वत:ला बदलाव लागत! जीवनमूल्य न बदलता माणस कस काय एका नवीन विचारधारेत सामील होऊ शकतात?

ही लढाई ‘खरी’ होईल तेव्हा इतके समर्थक असतील का? हा उत्साह टिकेल का? एकी टिकेल का? आताच विरोधाचे स्वर तीव्र होऊ लागले आहेत. पोलिस सावध होते पण त्यांनी बळ वापरल नाही. उदया शासनाने ही चळवळ बळाचा वापर करून मोडायची ठरवलं तर (सुदैवाने तसं आता घडल नाही) – तर समाजाला, समर्थकांना अहिंसक मार्गाने चालण्याची प्रेरणा नेतृत्त्व देऊ शकेल का? गोष्टी सोप्या न राहता अवघड झाल्या तर काय? खरच त्याग करावा लागला तर काय?

काळच याच उत्तर देईल.
****

जी गर्दी कालपर्यंत ‘वन डे मातरम’ गात होती ती अचानक ‘वंदे मातरम’ गाताना पाहून बर वाटलं. अभिमान वाटला. उत्साह वाटला.

जे वाईट क्षण आहेत त्याना क्षणभरासाठी विसरल, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल तर मला असे शेकडो, हजारो प्रेरणादायी क्षण आठवतात. कॅमेरा नसताना लोक जे बोलले, जे वागले, त्यातून समाजाच्या शक्तीच, निश्चयाच, साहसाच, निष्ठेच एक वेगळ दर्शन मला झालं. हे नाव नसलेले, चेहरा नसलेले अनामिक नागरिक होते – पण त्यांच्यात एक अनोखी शक्ती आहे याचा मला प्रत्यय आला. आज आम्हाला गरज आहे विश्वासार्ह, प्रामाणिक आणि सृजनात्मक नेतृत्त्वाची. ते मिळेल का?

आमचा बदललेला दृष्टिकोन टिकेल का? आमच्या निष्ठा आमच्या नवा उत्साह जागवतील का? कर्तव्य आणि जबाबदारीचे आमचे भान टिकेल का? संवेदनशीलता टिकेल का?

मी आंधळी अपेक्षा ठेवत नाही बदलाची. पण जंतर मंतरवरच्या त्या संध्याकाळच्या अनुभवानी माझ्यातला आशावाद वाढवला आहे. ‘India Shining’ वर माझा कधीच विश्वास नव्हता पण ‘भारत पुन्हा एकदा जागा होतो आहे’ अस मात्र मला नक्की वाटलं. जंतर मंतरने मला तो एक विश्वास दिला आहे.
**
प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, २४ एप्रिल २०११

Tuesday, April 5, 2011

६८. गजर


‘लवकर उठे लवकर निजे त्याला सुखसमृद्धी भेटे’ अशा अर्थाचा सुविचार लहानपणी शाळेत असताना वाचला होता आणि असंख्य वेळा तो मला ऐकवला गेला होता. ‘कळत पण वळत नाही’ या सदरात ज्या अनेक गोष्टी आहेत माझ्या; त्यातली ही एक! लवकर उठण्याचे फायदे माहिती असले तरी माझ जीवशास्त्रीय घडयाळ मात्र ब-यापैकी उलट चालत! म्हणजे रात्री दोन वाजता मी उत्साहात असते, त्यावेळी मी अगदी मजेत आणि कितीही आव्हानात्मक काम करू शकते. ऑफिसच्या कामाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी असण्याऐवजी दुपारी एक ते रात्री अकरा अशी असली तर मला जास्त सोयीचं होईल – पण अर्थातच तसं काही होत नाही.

खर तर मला कितीतरी नवीन कल्पना, विचार अस ‘जग शांत झोपलेले’ असताना सुचतात. दिवसा गर्दी, भोवतालचे आवाज, माणसांशी औपचारिकता म्हणून काहीबाही बोलाव लागण ... अशा गोष्टींत बराच वेळ वाया जातो, विचारांची साखळी अनेकदा तुटते. “या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:’ हा गीतेतला श्लोक पहिल्यांदा वाचताना मला एकदम समजल्यासारखा वाटला होता! त्या श्लोकाचा खरा अर्थ वेगळाच आहे आणि आपण काही केवळ उशीरा झोपण्याच्या सवयीमुळे ‘स्थितप्रज्ञ’ बनत नाही हे कळल्यावर भ्रमनिरास झाला होता माझा आणि गीतेला नंतर बरेच दिवस मी हातही लावला नव्हता!

त्यामुळे कन्याकुमारीला पहिल्यांदा गेले तेव्हा एक नवीनच संकट माझ्यासमोर उभ ठाकल – ते म्हणजे पहाटे साडेचार वाजता उठण्याचं! एखादया दिवशी नाही तर रोज पहाटे! साधारणपणे पहाटे तीन साडेतीन ही माझी तोवर झोपी जाण्याची वेळ होती – तीच नेमकी इथ उठायची वेळ होती! अनेकदा ‘जाग आली नाही तर’ काही अडचण नको म्हणून पहाटे तीन साडेतीनला मी परिसरातल्या रस्त्यावर फे-या मारत असे. परिसर सुरक्षित होता त्यामुळे अडचण नाही यायची. रात्रपाळीच्या सुरक्षा कर्मचा-यांना सुरुवातीला जरा अजब वाटलं ते – पण अजब गोष्टींची पण लोकांना सवय होते. एरवी अशा जाग्रणातून ‘साठलेली’ झोप दुपारी पुरी करता यायची. कन्याकुमारीतही तसा दुपारी थोडा मोकळा वेळ असायचा. पण मला उगीच आपली दहा वीस मिनिटांची झोप म्हणजे स्वत:ची समजूत घातल्यासारख वाटत! त्यापेक्षा न झोपलेल परवडल! मी त्या काळात जास्त वेळ बहुतेक ‘नीट झोपायला कधी मिळेल’ याच विचारांत घालवले – अस म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही.

अर्थात याला काही दिवस, काही प्रसंग अपवाद होते. कन्याकुमारीत असताना काही दिवस हे विशेष ‘Rock’ दिवस असायचे. नाही; याचा संगीत अथवा नृत्याशी काही संबंध नाही. ब-याच ‘शुभ’ दिवसांना (आणि असे दिवस बरेच आहेत आपल्याकडे!) पहाटे उठून ‘विवेकानंद शिला स्मारकावर’ (म्हणजेच Rock!) जाण्याचा कार्यक्रम असायचा. भल्या पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही तेथे पोचायचो. त्याआधी कन्याकुमारी देवीच्या गाभा-यात जाऊन तिला (म्हणजे तिच्या मूर्तीला – हो, उगीच गैरसमज नको!) पाहणे मला आवडायचे. समुद्रावरून येणारी वा-याची थंड झुळूक, लाटांचा अव्याहत नाद, समुद्र आणि आकाशाचा एकरूप होऊन गेलेला निळा रंग, पूर्व क्षितिजावर सूर्याच्या आगमनाची हळूवार उमटत जाणारी पदचिन्ह...सगळ गूढ वातावरण 'आपल' वाटायचं! मला कधीही जिथं परक वाटलं नाही - आजही वाटत नाही - अशी ती एक जागा! त्यात भर पडायची तिथल्या ध्यान कक्षातल्या शांततेची. आपण फार भाग्यवान आहोत अस तेव्हा वाटायचं .. ही संधी मिळणार असेल तर आणखी एकदा ‘मनुष्य जीवनाच्या चक्रातून’ जायला माझी काहीही हरकत नाही! मला खात्री आहे, आत्ताही ज्यांना ही संधी मिळते ते स्वत:ला भाग्यवान समजत असतील! Rock ला जायचं असल की मी भल्या पहाटे उठायला उत्साहाने तयार असायचे नेहमीच!

मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, की काही विशेष करायचं असेल तर मला पहाटे कितीही वाजता उठायला चालत – माझी त्याबाबत काही तक्रार नसते. म्हणजे आजही टेकडी चढायला जायचय, सायकलवर गावात फेरी मारायचीय, पक्षी पाहायचेत, पाउस पडतो आहे, प्रवास करायचा आहे, मीटिंग आहे, काही लिहायला सुचलं आहे, फोन करायचाय .. अशा अनंत कारणांसाठी मला कितीही वाजता उठायला आवडत. सकाळची गाडी अथवा बस पकडायला मला आजवर कधी गजर लावावा लागलेला नाही. माझा प्रवासाचा बेत दोनच वेळा बारगळला आहे. एकदा दुपारी दोनची गाडी चुकली माझी! कारण त्यावेळी ऐन मे महिन्यात, भर दुपारी, पावसाची चिन्ह नसतानाही पुण्यात पेशवे पार्कमध्ये एक मोर नाचत होता आणि आम्ही ते दृश्य पहात बसलो! दुस-या वेळी संध्याकाळी पाचची गाडी चुकली कारण मैत्रिणीकडे एक पुस्तक मिळाल आणि ते वाचण्याच्या नादात मी किती वाजलेत ते विसरले. मैत्रिणीला अर्थात मला गाडी पकडायची आहे हे मी सांगायचं विसरले होते. अन्यथा विशेष कार्यक्रमांच्या वेळी मला घडयाळाच्या गजराची कधीच गरज भासत नाही.

पण एरवी जेव्हा काहीच विशेष घडणार नसेल त्यादिवशी मात्र मला झोपेतून उठण्यासाठी गजर लावावा लागतो. केवळ एकाच गजराने काम भागत नाही; म्हणून दोन किंवा तीन गजर लावावे लागतात. मोबाईलच्या जमान्यात असे तीन तीन गजर एकाच वेळी लावून ठेवण्याची मोठी सोय आहे. अर्थात त्या गजरांचाही एक कार्यक्रम असतो – ऋतुनुसार किंवा स्थानानुसार तो बदलतो! म्हणजे पुण्यात असताना पहिल्या गजर झाला की घराच्या खिडक्या आणि बाल्कनीचे दार उघडायचे. दुसरा गजर झाला की पाणी भरायचे, तिस-यानंतर व्यायाम करायचा .. असे ठरलेले कार्यक्रम असत. ते ते काम आटोपून दोन गजरांच्या मध्ये मला स्वप्न पडण्याइतकी गाढ झोप लागतेही. मी सहसा कधीच रात्री दोनच्या आत झोपत नाही – त्यामुळे सकाळचा गजर म्हणजे माझ्यासाठी ‘अजून झोपायला इतका वेळ शिल्लक आहे’ याचा निर्देश असतो.

ही माझी एक गंमतच आहे. साधारणपणे लोक उठण्यासाठी गजर लावतात .. मी मात्र तो ‘अजून’ झोपण्यासाठी वापरते! विशेष गोष्ट करायची असते तेव्हा साधारणपणे लोक गजर लावून उठतात. मला मात्र विशेष गोष्ट करायची असली की अगदी पहाटे तीन वाजताही आपोआप जाग येते. ठरलेल्या दिनक्रमासाठी फार कमी लोकांना मी गजर लावताना पाहिल आहे. मला मात्र रोजच्या ठरीव साच्याच्या जगण्यासाठी गजर लावून उठावं लागत!

आणि बहुतेक सगळ आयुष्य अनेकदा ठरीव साच्याचचं असत – त्यामुळे मला कायमच गजराची गरज भासते!
**