ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, December 29, 2009

१५. काही कविता: ७ प्रवाही

तशी ही वर्षाअखेरची कविता वाटावी असेच तिचे शब्द आहेत. ती कदाचित जीवनाअखेरची कविता असेल असं म्हणायला मी धजत नाही, कारण मी नेहमी कविता लिहीन याची मला कधीच खात्री वाटत नाही. प्रत्येक कविता लिहून झाल्यावर 'अरे वा! आपण अजूनही कविता लिहू शकतो’ हे जसं समाधान असतं, तशीच 'ही कदाचित शेवटचीच कविता असणार नाही ना’ अशी एक भयावह शंका पण मनात असते.

कधी वरवर पाहता सगळं काही संपून गेलं आहे असं वाटत असतानाच 'अजून शब्द आहेत जागे आत’ याची अचानक सुखद जाणीव होते. उजाड भासणा-या जमिनीत पावसाच्या एका सरीने लाखो अंकुर तरारून यावेत त्याच धर्तीचा हा चमत्कार असतो. निसर्गाचं आणि मनाचं मला अद्याप न उलगडलेलं हे एक कोडंच! नाहीतर ऐन मे महिन्यात मला अशी जगण्याच्या निरंतर सुरेल प्रवाहाची जाणीव का बरं व्हावी?

जाउ द्या! मी आपली समीक्षकाच्या भूमिकेत शिरायला लागले तर नकळत!


पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;

पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;

जे झाले , ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;

तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!


९ मे २००८ प्रवासात

Monday, December 7, 2009

१४. तुझे माझे धागे

जगताना अनेक अनुभव येतात. खरं तर ते सगळ्यांनाच येतात या दुनियेत. पण फक्त कवीच अशा अनुभवांना नेमक्या शब्दांत पकडतात. यातून दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात असं मला वाटतं. 

एक म्हणजे अत्यंत व्यक्तिगत असा अनुभव (तो नेमका कवीचा स्वतःचाच असायला पाहिजे अशी गरज अर्थातच नाही) सार्वजनीन बनून जातो. म्हणजे जी जी व्यक्ती या विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून गेली असेल, तिला तिचा अनुभव शब्दबद्ध केला आहे असं वाटतं. 

दुसरं म्हणजे कविता वाचताना दुस-या कोणाचातरी अनुभव नकळत आपला होऊन जातो. तो आपल्याला आला नसला तरी त्या अनुभवाबद्दल एक जागा मनात निर्माण होते.

कदाचित या दोन्ही प्रक्रिया वाचकाच्या मनात एकाच वेळी घडतात, त्यात श्रेणीबद्धता असतेच असं नाही. हो. आणि आणखी एक. हे फक्त दुःखाच्या भावनेबाबत घडतं असं नाही, ते सुखाच्या बाबतही घडतं. 

वासंती मुझुमदारांची ही कविता वाचताना मला असाच काहीसा अनुभव येतो. हातातून निसटलेले कितीतरी क्षण आठवतात. काही नकळत निसटले तर काही कळत असतानाही काही करता आलं नाही. गंमत म्हणजे अशा निसटलेल्या क्षणांचे दुःखही कालांतराने नाहीसं होतं. जे चिरंतन आहे असं वाटत असतं ते सर्व क्षणजीवी ठरतं. काही बदलेलं नाही तरी हळूहळू सारं काही बदलत जातं जगण्याच्या प्रवाहात! मग अट्टाहास मागे पडतो. समांतर रेषांच्या वाढत जाणा-या अंतराचा स्वीकार होतो स्वतःसमवेत. 

तुझे माझे धागे 
कधी नाही वाटे जुळायचे;

नाही अमा-पॊर्णिमेने 
रंग माझे पुसायचे. 

चाललेल्या मुकेपणी 
रेषा दोन समांतर ;

श्वास रोधियेला तरी 
राही वाढत अंतर. 

 वासंती मुझुमदार ’सहेला रे’ काव्यसंग्रहातून