ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, October 31, 2012

१४०. निमित्त कॉफीचं ...

वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.

वैभवने मला हुकूम सोडला. साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.

छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही. वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना करते.

आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘ वर्षाची नाही, महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने ‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय? वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – जाऊ दे, तुला नाही कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.

काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.

अरे, हे कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीचं घेणार ना, दुसरं काय? माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.

वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस.

मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी माझी आणखी एक अडचण असते.  ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन आला ते माझ्यासाठी.

आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा, ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.

मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.

तिथल्या तरुण मुलाने विचारलं, काय घेणार?
कॉफी, मी सांगितलं.
"कोणती?" 
मी एक नाव सांगितलं.
साखर हवी की नको? त्या मुलाने विचारलं.
पाहिजे, मी सांगितलं.
किती? पुढचा प्रश्न – त्याचंही उत्तर मी दिलं.
दूध? आणखी एक प्रश्न.
हो माझं उत्तर.
गरम का थंड? प्रश्न – त्याचंही उत्तर दिलं.
क्रीम हवं? प्रश्न काही संपेनात.

अरे बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला? मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.

काउंटरवरच्या त्या मुलाला माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर  ...

मला त्याच्या या उत्तराचं आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या         चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका विद्यार्थ्याला इथं सांगत होते ... तो हसून पुढच्या ग्राहकाकडे वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं , हे माझ्या लक्षात आलं.

एक तर प्रश्न माहिती पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही शिकण्यापासून सुटका नाही.

या प्रसंगानंतर काही महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी – अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत (साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.

कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक  मिळत नाही, पण इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!

माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते. कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.

मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ...
**

Thursday, October 18, 2012

१३९. एकटीची मीटिंग

आम्ही सगळेजण हैराण होतो. आणि आमची अडचणही मजेदार होती. आम्हाला नको इतक्या संख्येने, आम्ही बोलावलेलं नसतानाही स्त्रिया येत होत्या. 

'स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण' असे भारदस्त नाव असलेला तो एक प्रकल्प होता. त्या आदिवासी क्षेत्रात आमच्या संस्थेचं आधीपासून काम होतं, त्यामुळे स्त्रियांसोबत काम करायला फार अडचणी नाही आल्या. गावोगावी स्त्रियांचे गट तयार झाले, त्यांच्या नियमित बैठका व्हायला लागल्या, पैसे बचत आणि कर्ज याव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांतही स्त्रियांचा चांगला सहभाग होता. दर वर्षाचं नियोजन असायचं कार्यक्रमांचं, त्यानुसार कार्यक्रम व्यवस्थित व्हायचे. या कार्यक्रमांची आखणी करताना सगळ्या नाही, तरी काही स्त्रियांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नांनाही थोडंफार यश येत होतं.  

हं, आता गावांत जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, पाऊस खूप पडायचा .. असली कारणं होती अनेक. पण लोकांकडून आम्हाला सहकार्य मिळत होतं. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही उत्साह होता भरपूर. आता तसं 'अजिबात अडचणी न येणं' प्रत्यक्षात शक्य नसतं. अडचणी यायच्या पण त्या सोडवता यायच्या - कधी सहज, कधी कष्ट घेऊन. पण दर अडचणीतून शिकत शिकत पुढं जात होतो. 

स्त्रियांना तोवर 'मीटिंग' हा शब्द माहिती झाला होता आणि तो त्यांनी सरसकट वापरायला सुरुवात केली होती. 'बैठक' शब्द वापरला तर तो कुणालाच कळायचा नाही. आम्ही गावात प्रवेश केला की पोरंसोरंही 'आज मीटिंग आहे बायांची' असं एकमेकांना ओरडून सांगायचे. पुरुषमाणसंही आम्हाला पाहिलं की 'मीटिंगच्या ताई आल्या बरं का' अशी घोषणा करायचे. गटाची मीटिंग, पंचवीस तीस गटांच्या अध्यक्ष- सचिवांची मीटिंग म्हणजे क्लस्टरची मीटिंग हे एव्हाना सर्वांना माहिती होतं. तालुक्याच्या दुस-या गावांत गटांच 'फेडरेशन'ही झालं होतं. त्यामुळे 'आपलीही फेडरेशनची मीटिंग लावा बघू एकदा' अशी मागणीही अधूनमधून व्हायची. 

आमच्या प्रकल्पाच्या रचनेत दर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पात सहभागी असणा-या स्त्रियांची मुलाखत घ्यायची (खरं तर ते सर्वेक्षण होतं - पण ते कुणीतरी प्रश्न विचारायचे आणि माहिती लिहून घ्यायची अशा प्रकारे करायचं होतं - म्हणून टीममध्ये त्याला नावं पडलं ते 'मुलाखत'!)  आणि प्रकल्पाची परिणामकारकता तपासून पाहायची असं अपेक्षित होतं.  या मुलाखतींच्या आधारे आम्ही आमचा सहामाही अहवाल तयार करत असू. आमचा हा प्रकल्प पाच राज्यांत नऊ वेगवेगळ्या ठिकाणी चालू होता.  प्रकल्पात सहभागी स्त्रियांची संख्या पाच हजारांच्या आसपास होती.  प्रत्येक वेळी एवढ्या सगळ्या स्त्रियांची मुलाखत घेणं शक्य नव्हतं हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे दर सहा महिन्यांनी तेच तेच प्रश्न ऐकून स्त्रियांनी 'आम्हाला जी अपेक्षित आहेत' ती उत्तरं दिली असती अशी शक्यता जास्त.  तसंचं त्यांना कंटाळा येऊनही चालणार नव्हतं आम्हाला. 

त्यावर एक उपाय असा की दर वेळी प्रश्न बदलायचे. पण मग एका सहामाहीची तुलना दुस-या सहमाहीशी करता येत नाही. शिवाय प्रकल्पाचे उद्देश स्पष्ट होते - त्यामुळे दरवेळी आम्ही काही प्रश्न बदलायचो पण मुलाखतींच स्वरूप मुख्यत्वे तेच असायचं. प्रश्न अगदी साधे असायचे आणि त्या विषयांवर पुरेसं प्रशिक्षण दिलेलं असायचं त्या स्त्रियांना. म्हणजे - भाजी आधी चिरण्याआधी धुवावी की चिरून धुवावी, पाणी शुद्धीकरणाची पद्धत, जुलाबावरचे घरगुती उपाय, लसीकरणाचे वेळापत्रक  - अशा थाटाचे प्रश्न. त्या त्या सहामाहीत जे आम्ही काम करणार आणि प्रशिक्षण देणार त्यावर आधारित प्रश्न. काही बदलायचे, तर काही कायम असणार होते. अर्थात हे प्रश्न विचारताना केवळ माहितीवर भर नव्हता तरप्रकल्पात सहभागी स्त्रियांचा व्यवहार आणि दृष्टिकोन यात काही बदल झाले का यावरही भर होता. 

ही मुलाखत गटाच्या बैठकीत घ्यायची नाही, कारण मग ते सामूहिक उत्तर होतं. ही मुलाखत त्या स्त्रीच्या घरात घ्यायची नाही, कारण घरातील इतर माणसांना ती त्या स्त्रीची परीक्षा वाटू शकते. ही मुलाखत संस्थेच्या तालुक्याच्या कार्यालयातही घ्यायची नाही - कारण तिथं स्त्रिया थोड्या दडपून जायच्या, गप्प बसायच्या. प्रकल्पाच्या दहा गावांना केंद्रस्थानी असणारी एक जागा  स्त्रियांच्या गटांच सामूहिक ऑफिस म्हणून तयार केली होती एका गावात. तिथं आमची प्रशिक्षणं आणि मीटिंग व्हायच्या नेहमीच्या. प्रकल्पातील गावं तिथून चारी दिशांना विभागलेली होती. तालुक्याच्या ठिकाणी जायचं तर याच गावातून जावं लागायचं सगळ्यांना. कुणालाही निरोप द्यायचा असेल पंचक्रोशीत, तर तो या गावात दिला की पोचत असे. 

दर सहा महिन्यानी ज्या मुलाखती घ्यायच्या आहेत स्त्रियांच्या; त्या या गावातल्या ऑफिसात घ्यायच्या असं आम्ही ठरवलं. ठरलेल्या पद्धतीने आम्ही स्त्रियांची नावं निवडली. त्यांना मुलाखतीला बोलावायचं कसं हा प्रश्न पडला. अगदी पहिल्या वेळी स्त्रिया एकट्या गावातून इथवरही येणार नाहीत हे माहिती होतं. शिवाय हे 'मुलाखत' प्रकरण नवीन असल्याने त्या घाबरणार नाहीत, बिचकणार नाहीत हेही  आम्हाला पहायचं होतं. म्हणून आम्ही एक युक्ती केली. एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला - त्यात 'प्रत्येक गटातून कमीत कमी तीन तरी स्त्रियांनी यावं' असं आम्ही त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांपैकी एक दोघींनी प्रशिक्षण घ्यायचं आणि दोघींनी निवडलेल्या  स्त्रियांच्या मुलाखती घ्यायच्या असं ठरलं. कागदावर तरी आमची योजना परिपूर्ण वाटत होती. 

पण प्रत्यक्षात ती फसली. एकीकडे प्रशिक्षण चालू असताना मुलाखतीसाठी एकेका स्त्रीला बोलावून न्यायचं ठरलं होतं. अशी स्त्री तिला हाक मारल्यावर तत्परेतेने उठत होती - पण ती दोन मिनिटांत परत येत होती मुख्य सभागृहात. एका मुलाखतीला कमीत कमी दहा मिनिटांचा वेळ लागायला पाहिजे होता. पण कुणीच दहा मिनिटं आत थांबताना मला दिसत नव्हतं. मुख्य कार्यक्रम सोडून मग मी तिकडं गेले तर माझ्या दोन सहकारी कपाळाला हात लावून बसल्या होत्या. जी ती बाई, 'हे काय, कारेक्रम संपू दया तो तिकडला, मग सांगते मी' असं म्हणून बाहेर पळ काढत होती. तीन तासांत आम्हाला एकाही स्त्रीची मुलाखत घेता आली नाही. आणि कार्यक्रम संपल्यावर त्या तीस स्त्रिया - 'हं, विचारा मघा काय विचारत होता ते' म्हणत बसल्या आणि उरलेल्या पस्तीस-चाळीस स्त्रियाही तिथंच ठाण मांडून बसल्या. "आता उशीर होईल तुम्हाला घरी जायला, पुढच्या वेळी बोलू" असं म्हणत आम्ही तो विषय संपवला. 

पण सहामाही अहवाल देण्यासाठी आम्हाला या मुलाखती लवकर घेणं आवश्यक होतं. इतर आठ ठिकाणचे वृत्तांत यायलाही लागले होते तोवर आमच्याकडे. आम्ही बरीच चर्चा केली. मग गावा-गावात जाऊन त्या ठराविक तीन स्त्रियांच्या मुलाखती शाळेत अथवा ग्रामपंचायतीत त्यांना बोलवून करायच्या असं ठरलं. पण तिथंही गावातल्या ब-याच स्त्रिया जमा झाल्या. "अगं, तुम्हाला तिघी जणींना फक्त बोलावलं होतं ना? बाकीच्या गेल्या तरी चालतील" अस म्हटल्यावर "नाही, तुम्ही एवढ्या आमच्या गावात आलात, आहे की आम्हाला वेळ" असं म्हणत सगळ्याजणी बैठक मारून बसल्या. त्याही दिवशी आमचं काम झालं नाही. 

दोन दिवसांनी आमचे लोक त्या त्या स्त्रियांच्या घरांत गेले- तिथंही तेच झालं पुन्हा एकदा. सभोवतालच्या बायांची गर्दी जमा झाली. "कशाला सगळ्यांना बोलावतेस?" असं मी शेवंताला म्हटलं तर गोड हसून म्हणाली, "तुम्ही काही तरी महत्त्वाचं सांगितलं आन त्या बाया नसल्या तर त्यांच नुस्कान नाही का व्हायचं?" तिचा उदात्त हेतू पाहून मला काय बोलावं ते सुचेना. 

शेवंता हुशार होती एकदम. त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे तिच्या लगेच लक्षात आलं. मीटिंग झाली, बाया आपापल्या घरी गेल्या, आम्ही निघालो. तेव्हा शेवंता आपणहोऊन म्हणाली, "चला, मी येते तुमच्याबरोबर तिथवर." लांब झाडाखाली आमची गाडी होती तिथवर ती आली. "ताई, काय झालंय? बाया गोळा होताहेत चांगल्या तर तुम्हाला का नको आहेत त्या? मागच्या आठ-धा दिवसात तिस-यांदा असं होतंय. काही चुकलं का आमच्या बायांच? " शेवंता अगदी काळजीत पडली होती. 

"नाही गं शेवंता, चुकलं वगैरे काही नाही बायांच. पण त्याचं काय आहे ..." असं म्हणत मग मी तिला निवडल्या गेलेल्या बाईने एकटीने प्रश्नांची उत्तरं देणं कसं गरजेचं आहे, दर सहा महिन्यांनी वेगळ्या बाईला ही संधी कशी मिळेल, असे प्रश्न विचारण्याचा काय उद्देश आहे - हे सगळं सोप्या भाषेत समजावून सांगितलं. ती एकदम जोरजोरात हसायला लागली. ते पाहून चिंतेत असलो तरी आम्ही पण हसायला लागलो.

 मी म्हटलं, "आता कसं करायचं तूच सांग. आपणच मागे पडलोय सगळ्यात."  
"तुम्ही चार दिवसानी या. तोवर कोण बाया हव्यात तुम्हाला त्यांची नावं मला दया. मी करते बरोबर काय करायचं ते", शेवंता म्हणाली. 
आम्ही शेवंताला त्या तीस बायांची नावं दिली. त्यापैकी बहुतेक स्त्रियांना शेवंता ओळखत होतीच. 

आमची वेळ संपत आली होती. आता काहीही करून चार दिवसांत मुलाखती संपवयाला हव्या होत्या आम्हाला. आता बघू शेवंता काय चमत्कार करतेय ते म्हणून पुढचे तीन दिवस आम्ही तो विषय डोक्यातून काढून टाकला. 

चौथ्या  दिवशी आम्ही आमच्या त्या गटाच्या ऑफिसात परत आलो. पाच-सहा स्त्रिया होत्या. शेवंताही होती. "ताई, यादीतल्या नंबरानिशी नाहीत बाया हजर" तिचा स्वर काळजीचा होता. पण मुलाखत नंबरानुसार घेतली पाहिजे असं काही आमच्यावर बंधन नव्हतं. ज्या आहेत त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केला. एकेका बाईची ती मुलाखत पंधरा-वीस मिनिटं चालली. त्या उत्तरांतून आम्ही काय चांगलं केलं आणि आमचे कोणते प्रयत्न फसले, नवे प्रयत्न कसे करायला हवेत याचं स्पष्ट दर्शन होत होतं आम्हाला. मी एकदम खूष झाले. 

मधेच रखमाने कोरा चहा आणून दिला. काही काळाने आम्ही नाचणीची भाकरी खाली. मुलाखती चालूच होत्या. शेवंता जागेवरून हलत नव्हती. येणा-या बाईचे नाव लिही, तिला चहा दे, जेवणाची चौकशी कर, मुलाखत संपलेल्या बाईला इतरांशी त्या विषयावर बोलू न देणे - अशी सगळी कामं ती सराईतपणे हाताळत होती. मला तिचं फार कौतुक वाटलं. एक दोनदा तिचं कौतुकही केलं मी जमलेल्या स्त्रियांसमोर आणि आमच्या टीमजवळ. 

सगळ्या मुलाखती संपल्या. पुन्हा एकदा शेवंताचं आम्ही तोंड भरून कौतुक केलं. 
मी तिला विचारलं, "शेवंता, आम्हाला चार वेळा जे जमलं नाही ते आज तू एका फटक्यात करून दाखवलंसं! चमत्कारचं केलास तू आज. काय सांगितलंस तू या स्त्रियांना आणि इतरही स्त्रियांना?" 

"अहो काही नाही ताई, मी प्रत्येक बाईला सांगितलं की आज तिची एकटीची मीटिंग आहे म्हणून!! बाकी कुणी विचारलं तर त्यांचा नंबर पुढच्या वेळी येईल म्हणून सांगितलं", शेवंता सहजपणे म्हणाली.  "एकटीचीच मीटिंग आहे म्हणल्यावर मग एकटीच येणार ना बाई?" तिचा पुढचा प्रश्न. 

एकटीची मीटिंग! 
वा! काय मस्त शब्द शोधला शेवंताने!
एकदम समर्पक.
काय करायचं याची थेट माहिती देणारा शब्द.
आपल्याला कधी हा शब्द सुचला नसता! 
एक नवा शब्दप्रयोग. 
एक नवी संकल्पना.
एक नवा व्यवहार. 

पुढच्या साडेचार वर्षांत आम्हाला त्या सर्वेक्षणात काहीच अडचण आली नाही!! 
आणि एकटीची मीटिंग हा शब्द सगळ्यांच्या तोंडी अगदी रुळून गेला सहजपणे! 

Friday, October 5, 2012

१३८. खान मार्केट

'हे एक अजब शहर आहे ..' हे वाक्य  कोणत्याही शहराला लागू पडेल इतकं आता शहरी जगणं अजब झालं आहे.  म्हणून सहसा हे वाक्य मी म्हणत नाही, पण तरीही  दिल्लीबाबत माझ्या मनात ही भावना नेहमी जागी होते. खरं तर इतर इतक्या शहरांत आणि गावांत राहिले मी! त्या प्रत्येक गावात राहताना आपण इथले 'आजन्म निवासी' आहोत अशा थाटात मी राहिले. दिल्लीत मात्र पहिल्या क्षणापासून आपण इथले पाहुणे आहोत आणि एक ना एक दिवस आपण इथून जाणार आहोत अशी स्पष्ट जाणीव माझ्या मनात आहे. आणि कदाचित म्हणूनच दिल्ली मला एक अजब शहर वाटत असावं! 

उन्हाळ्यामुळे मागचे तीन चार महिने दिल्लीत कुठं भटकले नव्हते. त्यादिवशी सुरेखा नारायणचा निरोप आला की 'अमुक दिवशी खान मार्केटला भेट आहे'. इकडे थोडासा पाऊस पडून गेला असला तरी उकडंत होतंच भरपूर - अगदी ऑगस्ट संपला तरी. मी सुरेखाबरोबर आधी एक दोन ठिकाणं पहिली होती. तिचा गट छोटा असतो आणि ती माहिती सांगते व्यवस्थित. तिने खान मार्केट परिसर निवडला आहे म्हणजे तिथं पाहण्यासारखं नक्कीच काहीतरी असणार.  

मी आधी सहका-यांना विचारलं, "खान मार्केट परिसरात पाहण्यासारखं काय आहे?" त्यावर त्या सगळ्यांनी माझ्याकडेच पाहिलं आणि "मार्केट" असं उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. मग मी विकीबाबाला शरण गेले. तिथं  हे मार्केट १९५१ मध्ये सुरु झाले, त्याला खान अब्दुल गफारखान यांच नाव देण्यात आलं आहे आणि जगातल्या महागड्या बाजारपेठेत याचा क्रमांक २१ वा लागतो - अशी बरीच माहिती मिळाली. ती वाचून मात्र मी चिंतेत पडले आणि खान मार्केटला जावं का नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडले.

Hotel Ambassador, Khan Market, New Delhi 
खान मार्केट मेट्रो स्थानकाच्या बाहेर त्या सकाळी आम्ही आठ वाजता भेटलो तेव्हा सहाच लोक होतो ते पाहून मला बरं वाटलं. शनिवारची सकाळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. समोर एक मोठी इमारत दिसली. हा सगळाच भाग तसा उच्चभ्रू गणला जाणारा. त्यामुळे असेल एखादी निवासी इमारत असं मला आधी वाटलं. पण इतरांच्या बोलण्यातून कळलं की ती अ‍ॅम्बेसेडर (Ambassador) हॉटेलची मागची बाजू आहे.  तासाभराने आम्हाला तिथंही डोकावण्याची संधी मिळाली - त्याबद्दल पुढे सांगते मी. 

Bagwali Masjid, Khan Market, New Delhi
डावीकडे वळून आम्ही पाच एक मिनिटं चाललो आणि पोचलो ते 'बागवाली मशीद' इथं - हो बागवालीच, 'बांगवाली' नाही. या माशितीत दोन तीन लोक (अर्थात पुरुष) प्रार्थना करत होते. स्त्रियांना या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी आहे का नाही याची खात्री नसल्याने आम्ही जरा बिचकतच प्रवेश केला. सावधानता म्हणून प्रत्येकीने डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ ओढून घेतला. दोन लोकांनी आमच्याकडे पाहिलं पण ते आम्हाला काही बोलले नाहीत त्यामुळे आमची भीड चेपली. 

या मशिदीचे घुमट छान दिसत होते. रंग मात्र पांढरा देऊन टाकला होता. परिसरात शांतता होती.  आमच्यातले अभ्यासक लोक ही मोगल कला आहे की आणखी कोणती अशी चर्चा करत होते. पूर्वी ही मशीद चारी बाजूंनी बागेने वेढलेली होती म्हणून ही बागवाली मशीद.  रस्त्यावरून आत मशीद असावी अशी कल्पनाही येत नाही. आता इथली रोपवाटिका प्रसिद्ध आहे. 

नंतर आम्हाला दिसलं ते सुजानसिंग पार्क.  हे दिल्लीतलं पहिलं अपार्टमेंट - ते बांधलं गेलं १९४५ मध्ये. कोण आहेत हे सुजानसिंग? ते आहेत सोभासिंग या बांधकाम ठेकेदाराचे वडील.  कोण आहेत हे सोभासिंग? ते आहेत खुशवंतसिंग यांचे वडील. ब्रिटीशांची नवी दिल्ली बांधण्यात यांचाही मोठा सहभाग होता.एके काळी ते अर्ध्या दिल्लीचे मालक होते असं म्हणतात. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी दिल्ली विधानसभेवर बॉम्ब टाकला होता - त्यांची ओळख पटवून देणारे गृहस्थ. यांची आणखी एक ओळख म्हणजे नवी दिल्ली महापालिकेचे ते चारवेळा अध्यक्ष (महापौर) होते. लोक कुणाला निवडून देतात याचा एक त्रासदायक इतिहास आहे हे त्या निमित्ताने लक्षात आलं माझ्या.

Sujan Singh Park, Khan Market, New Delhi
हे अपार्टमेंट आहे मात्र सुंदर. देखणी वास्तू आहे एकदम. प्रत्येक घराला खुला व्हरांडा दिसत होता. इथं दिल्लीतले अतिश्रीमंत लोक रहात असणार - तिथले सुरक्षारक्षक लगेच धावत आले. पण त्यांना आम्ही फक्त 'पाहायला' आलो आहे, असं सांगितल्यावर ते निमूट आमच्या मागोमाग फिरत राहिले. असे आमच्यासारखे कदाचित बरेच लोक येत असणार ही इमारत पाहायला! या इमारतीची एक विशिष्ट बंदिस्त रचना आहे -  तीन बाजूंना इमारती, समोर प्रवेशद्वार आणि मध्ये छान बाग आहे. एकदम ऐतिसाहिक काळात आपण असल्याचा भास क्षणभरच टिकला - कारण प्रांगणात अत्याधुनिक गाड्याही होत्या. इथल्या सदनिकेची किंमत काय असेल असं एकीने विचारलं - मी त्या चर्चेत अजिबात लक्ष घातलं नाही!!

Old Telephone in Hotel Ambassador, New Delhi 
या इमारतीच्या समोरच्या बाजूला आम्ही गेलो. अ‍ॅम्बेसेडर हॉटेलमध्ये आम्हाला प्रवेश करू देतील का नाही याची कल्पना नव्हती - पण प्रवेश द्वारावरच्या रखवालदारांनी 'सुप्रभात' म्हणत आमचं स्वागत केलं . असं स्वागत करणं हा त्यांच्या कामाचा एक भाग असतो म्हणा. सुरेखाने हॉटेलमधल्या लोकांशी काहीतरी बोलणं केलं आणि आम्हाला आत जाऊन खोली पाहायची परवानगी मिळाली. गेली ३५ वर्ष तिथं काम करणारा एक कर्मचारी पंखे कसे जुने आहेत, पूर्वीच्या लिफ्ट कशा होत्या .. अशा आठवणी सांगत होता. तिथं एक जुन्या काळचा टेलिफोनही दिसला - त्यामुळे एकदम जुन्या हिंदी सिनेमाच्या सेटवर गेल्यासारखं वाटलं मला. हॉटेलच्या भिंती पूर्ण पांढ-या आहेत आणि त्या त्रिकोणी इमारतीच्या मध्यभागी एक घुमट आहे. तो कसला ते कळलं नाही. त्या घुमटाकार जागेत एक उपाहारगृह चालायचं पण आता ते बंद आहे इतकीच बातमी कळू शकली. इतके जास्त पैसे देऊन लोक इथं राहायला का येतात हे मात्र मला कळलं नाही.

पुढची आमची भेट होती ती सिनगॉगला. Synagogue म्हणजे ज्यू धर्मियांच प्रार्थनास्थळ. इथले सचिव आणि राबी (म्हणजे धर्मगुरू - ते मात्र राबा म्हणत होते - म्हणजे आजवर मी ऐकलेला राबी शब्द चुकीचा आहे तर!) आहेत इझिकेल माळेकर. त्यांना मराठी येत असल्यामुळे मी त्यांच्याशी थोडं (थोडंसंचं - कारण इतराना संभाषणातून बाजूला ठेवायचं नव्हतं आम्हाला) मराठी बोलले. त्यांच्या सांगण्यानुसार भारतात फक्त ५००० ज्यू लोक आहेत आणि दिल्लीत तर फक्त पन्नास.  पण विदेशी राजदूत आणि त्यांचे दूतावास यामध्ये ज्यू धर्माचे अनुयायी मोठया प्रमाणावर असतात - ते इथं प्रार्थनेला येतात. "मी आधी भारतीय आहे आणि मग ज्यू" ;" इस्रायल माझ्या हृदयात आहे तर भारत माझ्या रक्तात" अशासारखे त्यांचे उद्गार त्या समूहातल्या आम्हा इन मीन तीन भारतीयांना सुखावून गेले.

श्री. माळेकर यांनी आम्हाला ब-याच गोष्टी विस्ताराने सांगितल्या. राबीने जी शाल वापरून धर्मोपदेश करायचा असतो, त्यात ठराविक संख्येचे गोंडे असतात, ठराविक प्रकारची टोपी त्याने घालायची असते. मेंढीच्या शिंगापासून बनवलेले शोफर (Shofar) वाजवायचे असते. राबी जिथून धर्मोपदेश करतात त्या कोर्टात दिसणा-या लाकडी पिंज-यात अन्य कुणालाही जायची परवानगी नसते. ते  एक ठरलेले परंपरागत कर्मकांड असते. त्यात फार बदल झालेले नव्हते - पण अलिकडे व्हायला लागले आहेत.

या सिनगॉगचा इतिहास आणि तिथे होणारे कार्यक्रम याबाबत त्याच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती आहेच - त्यामुळे ती इथं पुन्हा देत नाही. श्री माळेकर यांनी सांगितलेली इतर माहिती फार रोचक वाटली मला - म्हणजे पारंपारिक ज्यू धर्मात स्त्रियांचे जे स्थान होते (जवळ जवळ नव्हतेच म्हणा ना) ते आता कसे बदलत चालले आहे याची काही उदाहरणे त्यांच्या बोलण्यात आली. या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी एकत्रित प्रार्थना आता होते, ज्यू नसलेले लोकही या प्रार्थनेत सामील होऊ शकतात. पारंपरिक मान्यतेप्रमाणे तोराह (Torah) या धर्मग्रंथाचे वाचन करायचे तर किमान दहा पुरुष उपस्थित हवेत - इथं मात्र तसा काही नियम पाळला जात नाही. स्त्रिया आणि पुरुष मिळून दहा जण असावेत - अशी सुधारणा इथं करण्यात आली आहे.  'शनिवार' हा खर तर पवित्र सुट्टीचा '- साबाथ'चा दिवस पण तरीही आम्हाला माहिती सांगण्यासाठी श्री माळेकर यांनी वेळ काढला. बदल होताहेत धर्मात आणि परंपरेत हे नक्की - असा एक दिलासा त्यातून मिळाला.

Parasi Cemetery, Khan Market, New Delhi 
या मंदिराच्या जवळच  दफनभूमी आहे. तिथून थोड्या अंतरावर पारशी लोकांची दफनभूमी . त्या दोन्ही आम्ही पहिल्या. (वाटेतली ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी मात्र पाहिली नाही). तिथं काही थडगी आकाराने लहान दिसत होती त्यावर माझ्या गटातले लोक चर्चा करत होते. आकाराने लहान असणारी थडगी ही लहान मुलांची आहेत हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर सगळेच हळहळले. पारशी लोकांची आयुर्मान जास्त असते असं एक तिथल्या माहितीवरून जाणवलं....वस्तुस्थिती नीट जाणून घ्यायला पाहिजे.  दहन आणि दफन यावर एक छोटी चर्चा झाली आमच्या समुहात तेव्हा.

दोन-तीन तासांच्या अवधीत तीन पुरातन धर्मांच्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन आलो आम्ही याची गंमत  वाटली. एरवी खान मार्केट म्हणजे खरेदी किंवा खाणे  हे सूत्र दिल्लीत प्रचलित असताना आम्ही काहीच खरेदी न करता आणि काहीही न खाता - पण बरेच काही मिळवून त्या परिसरातून बाहेर पडत होतो हा एक चमत्कारचं होता. दिल्ली शहराच्या अजबपणाचा माणसांवरही परिणाम होतो - हा अनुभव पुन्हा एकदा आला.

तुकडया-तुकड्यांनी माझ्यासमोर आलेल्या या माहितीचं एक सलग चित्र माझ्याही मनात अजून बनलं नाही - ब-याच गोष्टी धूसर आहेत अद्याप माझ्यासाठी! हे सगळं नीट जुळवून पुन्हा एकदा खान मार्केट परिसरात भटकायचा माझा विचार तरी आहे - तो अंमलात कधी येतोय ते पाहायचं!! तोवर या अजब दिल्लीची आणखी कोणती रुपं समोर येताहेत ते कळेलच!!
*