ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, August 31, 2011

८७. रामलीला मैदानावर


वर्ष: १९८७. ठिकाण: राळेगण सिद्धी. अण्णा हजारे तेव्हाही प्रसिद्ध होते, पण आजच्यासारखे प्रसारमाध्यमांच्या गराड्यात नव्हते. त्या वर्षी मला अण्णांना अनेकदा भेटायची संधी मिळाली होती. आम्ही आठ दिवसांच एक युवक शिबीर राळेगणमध्ये घेऊ इच्छित होतो. त्याच्या परवानगीसाठी, पूर्वतयारीसाठी आणि प्रत्यक्ष शिबिरात अण्णांना मी अनेकदा भेटले, त्यांच्याशी बोलले. शिबिराच्या काळात आठही दिवस अण्णा राळेगणमध्ये होते; रोज एक तास ते आमच्या युवकांशी बोलायचे. एरवीही ते आमच्या आसपास, हाकेच्या अंतरावर असायचे. कधीही त्यांच्याकडे गेले तर ते बोलायचे. त्यांच बोलण सौम्य, मृदू, कधीही आवाज चढला नाही की कधी कपाळावर आठी उमटली नाही. शांतपणे समजून घेऊन बोलायची त्यांची पद्धत होती तेव्हा. मी खूप केलय, मला सगळ कळतंय असा त्यांचा अविर्भाव अजिबात नव्हता. पण हा माणूस विरोधाला नमणार नाही, संकटाला घाबरणार नाही अशी साक्षही मिळत होती त्यांच्याशी होणा-या संभाषणातून. 
  
ते आठ दिवस राळेगणमध्ये आम्ही लाडक्या पाहुण्यांसारखे राहिलो. तसं पाहिलं तर अण्णांच्या समोर आम्ही तेव्हा नगण्य होतो – धडपडणारे युवक यापलीकडे आमच काही कर्तृत्व नव्हत. पण अण्णांनी आमची खूप काळजी घेतली. त्यांच्या साधेपणाने, त्याच्या त्यागाने, त्यांच्या मृदू स्वभावाने त्यांनी आमच्या शिबिरातल्या सगळ्यांची मन जिंकून घेतली. मी तशी कोणाच्या पाया वगैरे कधी पडत नाही. पण राळेगणमधून निघताना मी अण्णांना वाकून नमस्कार केला होता हे आजही मला आठवत.
*****
वर्ष २०११. ठिकाण: दिल्ली. रविवार, २८ ऑगस्टची सकाळ. सगळ्या देशाच लक्ष आज इथ असण स्वाभाविक होत. अण्णा हजारे सकाळी दहा वाजता उपोषण सोडणार हे प्रसारमाध्यमांनी आधीच जाहीर केल होत. गर्दी असणार भरपूर हा अंदाज येणा-या लोकांनाही होता – आणि बसायला पुढे जागा मिळावी म्हणून लोक लवकर आले होते. मागच्या शनिवारी मी इथे येउन गेले होते – त्यावेळची रांग लक्षात घेऊन मीही आज लवकर आले होते. 

नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर फारशी गर्दी नव्हती – म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होती. बहुतेक सगळे बाहेर गावाहून आलेले प्रवासी होते. स्थानकाच्या बाहेर कमला मार्केटच्या परिसरात बसेस उभ्या होत्या, हातात अवजड सामान घेतलेले नवखे प्रवासी नेमकी कोणती बस पकडायची या चिंतेत होते. कोणत्याही रेल्वे स्थानकाबाहेर रोज जे दृश्य दिसत, त्यापेक्षा वेगळ इथे काहीही नव्हत. मी चुकून दुस-याच ठिकाणी तर नाही ना उतरले अशी माझ्या मनात आलेली शंका क्षणभरात विरून गेली कारण तिरंगा आणि ‘मी अण्णा आहे’ अस इंग्रजी-हिंदीत लिहिलेल्या टोप्यांची विक्री करणारे लोक, मुख्यत्वे लहान मुल आणि स्त्रिया लगेचच समोर आल्या. आज आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे हे त्यांना माहिती होत अस दिसलं – कारण आज मिळेल त्या भावात हातातला माल विकून मोकळ व्हायची त्यांची लगबग दिसत होती. रस्त्यावर सामोसे आणि इतर खादय पदार्थही विकले जात होते. जर आंदोलनाचा मुद्दा एखाद्याला माहिती नसेल तर एकंदर वातावरण एखादया राजकीय सभेच वाटलं असत! 

मागच्या शनिवारी मला बराच वेळ रांगेत उभ राहायला लागल होत. म्हणून रविवारचा दिवस असूनही मी लवकर इकडे आले होते. यावेळी रांग फार मोठी नव्हती – मी पाच मिनिटांतच रामलीला मैदानावर पोचले, पावसाने निम्म मैदान अजून चिखलात होत; त्यामुळे ‘मुंगीला शिरायलाही जागा नसण्याइतकी गर्दी असल्याची’ वृत्तपत्रांची बातमी दुस-या दिवशी वाचून मला हसायला आलं. माध्यम किती अतिशयोक्ती करतात – चांगली आणि वाईटही हे अशा प्रसंगीच माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या लक्षात येत.

रामलीला मैदान अर्थात प्रचंड मोठ आहे. त्यामुळे अर्ध्या भरलेल्या मैदानात सकाळी आठ वाजताच त्यादिवशी हजारोंची गर्दी होती. मी आपली गर्दीच्या एका भागात स्वत:साठी जागा करून घेत होते, तेवढयात ‘स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था असल्याच’ मला सांगण्यात आलं. धक्के कमी खावे लागतील या अपेक्षेने मी तिकडे गेले खरी पण अण्णा दिसल्यावर गर्दी त्यांना बघायला जागा सोडून उन्मादाने उभी राहिली तेव्हा स्त्रियांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेभोवतीचे बांबू कोसळून पडले आणि गर्दीत पुरुषांचे धक्के खाण काही चुकल नाही. पण ही अर्थातच पुढची गोष्ट झाली.

सभास्थानीच वातावरण एकदम भावूक होत. जिकडे तिकडे तिरंगा लहरत होता, देशभक्तीपर गाणी होती, घोषणा होत्या. स्त्रिया बसल्या होत्या त्या भागातही घोषणा चालू होत्या. कोणी उभ राहिलं की, स्वयंसेवक ताबडतोब येऊन ‘बसून घ्यायला’ सांगत होते. सगळ कस बराच काळ शिस्तीत चालल होत. बसायची सवय आता लोकांना फारशी राहिली नसल्याने, नऊच्या आसपास चुळबूळ सुरु झाली. तेवढयात टी.व्ही. कॅमेरे इकडे वळले आणि एवढा वेळ शिस्तीत बसलेली जनता उधळली. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीची लोकांना किती हाव असते, त्याच एक विलक्षण दर्शन त्या तासाभरात मला झालं. वय विसरून स्त्रिया धावत होत्या (याचा अर्थ फक्त स्त्रिया अस वागत होत्या असा मात्र नाही, पुरुषांच्या बाबतीतही हेच घडत असणार, मी ते त्यावेळी पाहिलं नाही इतकच!), देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर नाचत होत्या. पुढे बसलेल्या गर्दीला ढकलत मागून पुढे येत कॅमेरासमोर जाण्याची अहमहिका शिसारी आणणारी होती. तीच अवस्था पिण्याच्या पाण्याचे पाउच (अर्थातच फुकट) मिळवण्यासाठी झाली. प्रसंग कोणताही असो, लोकांचा स्वार्थ काही सुटत नाही हे पुन्हा एकदा लक्षात आलं!  गर्दीच्या वेडेपणाची ही केवळ सुरुवात होती.

अण्णा आल्यावर ती सगळी गर्दी एकदम पुढे झेपावली. सगळा गोंधळ माजला. संसदेला ‘जन संसद’ पुरून उरेल याची ग्वाही मला पुन्हा एकदा त्या सकाळी मिळाली. ‘इतक्या लांबून काही नीट दिसणार नाही, सगळे बसले तर सगळ्यांना व्यासपीठ नीट दिसेल’ अस सांगता सांगता आमचा काही जणींचा घसा सुकून गेला. पण इथ अगदी भारतीय मनोवृत्तीच दर्शन झालं – ती खाली बसत नाही तर मी तरी का बसू? – असा प्रत्येकीचा प्रश्न होता. नियम पालनाची, स्वयंशिस्तीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, इतर कोणी नियम पाळत नसेल तेव्हाही स्वत:चे जीवनमूल्य म्हणून काही गोष्टी पाळायला हव्यात हे कोणाच्या गावीही नव्हते. लोकपाल आला तरी ‘इतर भ्रष्टाचार करतात, मग मीच का नुकसान करून घेऊ माझ पैसे न देऊन?” असा प्रश्न विचारणारे लोक तरीही संख्येने अगणित असतील हे लक्षात येऊन मला फार निराश वाटलं.

श्री. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची सुरुवात ‘आभार प्रदर्शनाने’ झाली. गेल्या काही महिन्यांत त्यांच्याबद्दल बरच काही वाचलं होत आणि म्हणून मी त्यांना ऐकायला उत्सुक होते. पण माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. म्हणजे ‘प्रसारमाध्यमांचे आभार’ मला आवडले नाहीत तरी मी समजू शकते. पण ‘अनेक दिल्ली पोलिस दिवसभर गणवेषात काम करत आणि संध्याकाळी गणवेष उतरवून आंदोलनात सामील होत’ हे तिथ सांगणारे केजरीवाल मला तरी प्रगल्भ वाटले नाहीत. आता बिचा-ऱ्या त्या पोलीसांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणजे झालं!

आणखी एक गोष्ट म्हणजे अण्णांसोबत उपोषणाला बसलेले तीस लोक कुणाच्याच खिजगणतीत नव्हते. त्यांच नाव घेऊन त्यांच कौतुक करण तर दूरच, त्यांचा उल्लेखही सगळ्यात शेवटी घाईघाईने (बहुधा कोणीतरी लक्षात आणून दिल्यावर) केजरीवालांनी केला तेही खटकल. अनाम वीरांना जनता ‘नंतर’ विसरते अस नाही तर त्यांच्या जीवनकाळातही विसरते हेच दिसलं तिथ! शिवाय ‘आम्ही काही सगळे राजकीय नेते वाईट आहेत अस म्हटल नव्हत कधी’ अशी सफाई द्यायची काय गरज होती? विशेषत: आदल्या संध्याकाळी सरकारच्या ज्या प्रतिनिधींबरोबर व्यासपीठावर सगळे उभे होते, त्यातून अण्णांच्या     सहका-यांच मतपरिवर्तन जगजाहीर झालं होतच की!

केजरीवालांनी ‘संध्याकाळी इंडिया गेटवर विजय साजरा करायला जमा’ सांगितलं ते मला विनोदी वाटलं. कसला आणि कोणाचा विजय झाला होता? मला तर वाटत की रोजच्या सवयीने केजरीवालांनी ती घोषणा केली असेल. अन्यथा दिल्लीच्या वर्तुळात वावरणा-या केजरीवाल आणि किरण बेदी यांना मागच्या चार पाच दिवसांतल्या घटनांचा अर्थ समजला नसेल अस मानण म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत शंका घेण्यासारखच आहे!

तिथ जमलेल्या लोकांमध्ये ‘अण्णांनी उपोषण सोडलं एकदाच, बर झालं’ अशीच भावना जास्त होती. चेंगराचेंगरी होताना स्त्री पुरुषांच्या गर्दीतले संवाद केजरीवाल आणि सहका-यांनी अवश्य ऐकायला हवे होते. नंतर बाहेर पडतानाही “अण्णांनी उपोषण सोडल ते बर केलं, उगाच या म्हाता-या माणसाला मारलं असत यांनी’ अस लोक म्हणत होते आणि सहमतीचे सूर उमटत होते. एकजण म्हणाला, “अण्णा हुशार आहेत. जन लोकपाल पास होवो अथवा न होवो, आपल्यासारख्या फालतू लोकांसाठी जीव गमावण्यात शहाणपण नाही हे त्यांना एकदाच लक्षात आलं ते चांगल झालं!” भ्रष्टाचार, जन लोकपाल हे मुद्दे मागे पडून अण्णांची तब्येत हाच मुद्दा होता. अण्णा इतक्या खणखणीत आवाजात बोलत होते याबद्दल अनेकांना आनंद वाटत होता पण आश्चर्यही वाटत होत!

अण्णा उपोषण सोडताना व्यासपीठावर दोन लहान मुली होत्या त्यांच्या सोबत – सिमरन आणि इकरा. सिमरन दलित आहे आणि इकरा तुर्कमान गेट परिसरात राहते (म्हणजे मुस्लिम आहे) हे केजरीवालांनी प्रसारमाध्यमांच लक्ष वेधून घेत अधोरेखित केल. सात वर्षाच्या मुलींचा असा वापर पूर्ण अयोग्य वाटला मला. भ्रष्टाचार म्हणजे काय, संसद म्हणजे काय, लोकपाल म्हणजे काय .. हे सगळ कळण्याच त्यांच वय नाही. ती आत्ता त्यांची जबाबदारीही नाही. केवळ राजकीय नेते अशी ‘सहभागाची’ नाटकं करतात अस माझ आजवर मत होत! जात आणि धर्म यांच्या नावावर माणसांना ओळखण्याच, त्यांना स्थान देण्याच आपण टाळू शकलो नसतो का या आंदोलनात? दलित समाज बाबासाहेब आंबेडकरांच नाव घेतलं की खूष होतो अस समजण म्हणजे आंबेडकर केवळ दलितांचे आहेत असा संदेश देण आणि दलितांना मूर्ख समजण! ‘आम्ही लाच देणार नाही आणि घेणार नाही’ ही सार्वजनिक शपथ इतकी निर्जीव होती, की ती कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर तो चमत्कार मानावा लागेल या शतकातला! एकदा लोकानुनय करायचा म्हणला की कशी तडजोड करतात माणस याचा उत्तम नमुना मला रामलीला मैदानावर त्या सकाळी पहायला मिळाला.

गर्दी इतकी अनावर होती की ती ना स्वयंसेवकांच्या ताब्यात होती ना केजरीवालांच्या नियंत्रणात होती! “तुम्ही आता शांत बसला नाहीत तर अण्णा उपोषण सोडणार नाहीत, इतके दिवस केल तसं आणखी काही तास ते उपोषण करू शकतात’ ही केजरीवालांची धमकी त्यांची हतबलता दाखवणारी होती. तिथ आलेले ‘समर्थक’ कसे होते याची झलक दाखवणार वाक्य होत ते! या गडबडीत अण्णांनी उपोषण कधी सोडलं ते अनेकांना कळलच नाही. अण्णांच भाषण संपल तरी ‘ते कधी सोडणार उपोषण?’ अशी चौकशी लोक करत होते.

अण्णा काय बोलले ते आधीच पेपरमध्ये येऊन गेलय – त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही मी. अण्णांच भाषण चालू असताना गर्दीचा एक लोंढा मंडपाच्या बाहेर पडत होता आणि नवा लोंढा आत येत होता.  जाणारा लोंढा ‘अण्णा की रसोई” आणि ‘अण्णा की मुफ्त चाय’ या दोन ठिकाणी रांगेत उभ राहत होता. उपोषण करणा-या लोकांच्या समर्थकांसाठी फुकट खाण आणि चहा वाटण्याच  काय प्रयोजन होत हे समजण माझ्या अल्प मतीच्या पल्याड होत! या समर्थकांना आंदोलनाच्या पुढच्या दिशेत, कार्यक्रमात काही गम्य नव्हत! चेंगराचेंगरीत बाजूला होत होत मीही तोवर मंडपाच्या शेवटच्या टोकाला येऊन पोचले होते. येणारी गर्दी घोषणा देत होती आणि जाणारी गर्दी त्यांना प्रतिसाद देत होती; अण्णा काय बोलत होते त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हत. मला मात्र अण्णांनी एकदाही ‘वंदे मातरम’ म्हटलं नाही त्यांच्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात हे जाणवलं.

‘जंतर मंतर’ आंदोलनाच्या काळात एका संध्याकाळी ‘वंदे मातरम’ म्हणणारा मुस्लिम तरुणांचा एक गट मला भेटला होता, मी त्यांच्याशी या विषयावर बोललेही होते. “हम भी तो इस मिटटीसे पले हुये है” हे त्यांचे भावूक आणि हृदयातून आलेले उद्गार आजही मला आठवतात. अशा सगळ्या तरुणांना – मग ते हिंदू असोत की मुसलमान – आपण पुन्हा एकदा धर्ममार्तन्डाच्या ताब्यात देणार आहोत का? – अशी मला शंका येते. युवकांची जागृती वगैरे सगळ सुरुवातीलाच संपून जाईल अशा आपल्या वागण्याने.
******
राळेगणमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी मला भेटलेले आणि कळलेले अण्णा बदलले आहेत का असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत राहिला. म्हणजे एका बाजूने अण्णा तसेच आहेत – साधे, सौम्य बोलणारे, निश्चयी, सरळ, काहीसे भोळेभाबडे, दुस-यांसाठी त्याग करणारे, विरोधाला न नमणारे. त्यांच्या या गुणांवर तर देशातले इतके लोक फिदा झाले. कधी नाही ते निस्वार्थी नेतृत्व लाभलेय अशी अनेकांची भावना झाली – ज्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.

पण इथे व्यासपीठावर बसलेले, कॅमेऱ्याच्या गराड्यात लोकांपासून दूर असलेले अण्णा वेगळे वाटत होते. ‘मी अण्णा आहे’ हे छापलेले स्वीकारणारे; स्वत:चा चेहरा तिरंग्याच्या मध्यभागी टी शर्टवर छापायला परवानगी देणारे; स्वत:वर रचलेल गाण रामलीला मैदानावर इतरजण गाताना विनातक्रार ऐकणारे; ज्यांच्याबद्दल भ्रष्टाचाराची तक्रार आहे अशा लोकांबरोबर व्यासपीठावर उभे राहणारे (भले मग ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे असोत!); उपोषण करणा-या सहका-यांना विसरणारे: एके काळी विवेकानन्दाबद्दल भरभरून बोलणारे पण आता ‘युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती’ आहे अस म्हणताना विवेकानन्दान्चा साधा उल्लेखही न करणारे; हे अण्णा तेच आहेत का असा मला संभ्रम पडला. हजारोंच्या, लाखोंच्या गर्दीत मला अण्णा एकदम परके, अनोळखी वाटले. माझ्या बाजूने त्यांच्याशी माझ जे नात होत, मी जे आजवर जपल होत  – ते एकदम तुटून गेल्यासारख वाटलं मला त्या क्षणी! 

परत एकदा राळेगणमध्ये जाऊन अण्णांना भेटायला हव. माझ्या या असल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर १९८७ मध्ये  देत होते, तशीच  पुन्हा एकदा अण्णा हसत, शांतपणे, विचारपूर्वक देतील अशी मला आशा आहे. निदान त्यापूर्वी मी त्यांच्याबद्दलच माझ मत बदलण्याची घाई करू नये. माणसाच मूळ जिथं रुजलेल असत, तिथ तो माणूस खराखुरा कळतो. तिथच त्या माणसाला शोधायला हव – रामलीला मैदानावरची गर्दी ही काही योग्य जागा आणि वेळ नाही त्यांना समजून घेण्याची!


या विषयावरच्या आणखी काही पोस्ट्स : मतभिन्नतेतून, जंतर मंतरलेल्या संध्याकाळी 

Monday, August 22, 2011

८६. मतभिन्नतेतून …..

पुन्हा एकदा सगळा  देश मतामतांच्या  गल्बल्यात अडकला आहे. यावेळचा विषय आहे ‘जन लोकपाल' अर्थात देशातल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन!


पण माझ्या मते या मत- मतमतांतराबाबत  जास्त काळजी करण्याचे काही कारण नाही. कोणताही विषय घेतला तरी त्यावर टोकाची वेगवेगळी मत आणि दृष्टिकोन असण्याची आपली परंपरा फार प्राचीन आहे. किंबहुना मतभिन्नता हे आपल्या  देशाच, आपल्या समाजाच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. आपला देश, आपला समाज एकमुखाने बोलतो आहे अशी घटना इतिहासाला आठवते तशी शेवटची कधी घडली होती? 

गेल्या काही वर्षांतल्या अनेक बॉम्बस्फोटानंतर ? दंगलींनंतर ? कोसीच्या महाप्रलयात? नक्षलवादी हल्ल्यात? सुनामीने माजवलेल्या हाहाकारात? भूकंपात?  आणीबाणीच्या काळात? त्यांनतर ? १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यात आणि फाळणीत? १९४२ सालच्या ‘चले जाव' आंदोलनात? १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीत? शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत? राणा प्रतापच्या काळात? गौतम बुद्धाच्या वेळी?  शंकराचार्यांच्या काळी? श्रीकृष्णाच्या काळात? रामाच्या राज्यात? उपनिषदांच्या वेळी? सिन्धु संस्कृतीच्या काळात? आर्यांच्या काळात? कधी आपण एकमुखाने बोलत होतो?

कोणत्याही सुधारणा घ्या – सामाजिक असोत, शैक्षणिक असोत, राजकीय असोत किंवा धार्मिक असोत – त्याला पाठिंबा  देणारे लोक समाजात असतात तसेच त्याबाबत शंका उपस्थित करून त्याला विरोध करणारेही सर्व काळात असतात. कोणता बदल आजवर १०० टक्के लोकांच्या सहभागाने आणि पूर्ण सहमतीने झाला आहे? नवा विचार नेहमी उपेक्षिला जातो, त्याची थट्टा होते, त्याला विरोध होतो आणि त्या विचाराचा प्रसार करणा-यांना धमक्या दिल्या जातात – हे अगदी याच क्रमाने घडते असे नाही, पण टप्पे सगळे असतात जवळजवळ हेच. हे पुन्हपुन्हा घडताना दिसते. मोठी माणसे या सगळ्याला तोंड देत त्यांचा विचार पुढे नेत राहतात – जोवर मोठ्या संख्येने समाज त्या विचाराचा स्वीकार  करत  नाही तोवर! फार कमी लोकांना  त्यांचा विचार समाजाने स्वीकारला आहे हे पाहण्याचे समाधान लाभते, अनेकानां त्याविना काळाच्या पडद्याआड जावे लागते. काही तर पूर्णपणे समाजाच्या स्मरणातून जातात – त्यांचे जगणेही एकाकी असते आणि मरणेही. ते गेल्यावर अनेक वर्षांनी समाजाला त्यान्चे मोठेपण समजते. असा हा आपला आजवरचा इतिहास असल्यामुळे एकदम कधी नाही ते भ्रष्टाचार निर्मूलनासारख्या मुद्यावर आपल्या देशात वैचारिक एकवाक्यता असावी अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरेल.

गेले काही महिने माझ्या आसपास अण्णा हजारे आणि त्यांचे आंदोलन या विषयावर सतत चर्चा चालू आहे.             महाराष्ट्रातल्या माझ्या ओळ्खीच्या अनेक लोकांना वाटत, की या आंदोलनाचा केंद्रबिंदू (म्हणजे अण्णांच उपोषण) दिल्लीत आहे – आणि मी सध्या दिल्लीत आहे - त्यामुळॆ मी त्यात सहभागी होत असणारच. दुस-या बाजूने दिल्लीतल्या माझ्या ओळखीच्या लोकांना वाटत की, अण्णा हजारे मराठी आहेत आणि मीही मराठी आहे; त्यामुळॆ मी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असणार. (श्री. अरविन्द केजरीवाल हरयाणात वाढले म्हणून दिल्लीतल्या प्रत्येक हरयाणवी माणसाने यात सामील व्हावे अशीही दिल्लीकर अपेक्षा करतात की नाही हे मला माहिती नाही! ) त्यामुळॆ गेल्या काही महिन्यांत मी दर दहा संवादांत किमान तेरा वेळा 'जन लोकपाल आणि  अण्णा हजारे' याबद्दल बोलत असते – हो, तेरा वेळा; कारण आपल्याकडे लोकांना तोच तोच मुद्दा घोळवत बसायला आवडत!

****
मी रामलीला मैदानाकडे चालले आहे – जिथे अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी ‘जन लोकपालच्या’ मागणीसाठी उपोषण करत आहेत. नवी दिल्ली मेट्रो स्थानकात शेकडो, नाही हजारो लोक आहेत – ते सगळॆ रामलीला मैदानावर चालले आहेत. गर्दीचा लोंढा मला आपसूक बाहेर पडण्याची दिशा दाखवतो आहे . स्थानकात प्रचंड  गर्दी आहे. मेट्रोने व्यवस्था नीट चालावी म्हणून जास्तीचे लोक स्थानकात नेमले आहेत. एवढ्या गर्दीला सांभाळण्याचे काम ते चांगले करत आहेत. मेट्रो स्थानकात घोषणा देणारा जनसमूह हे एक अनोखे द्रुश्य आहे. स्थानकात प्रवेश करणारे आणि स्थानकातून बाहेर पडणारे लोक ‘वन्दे मातरम' , ‘इन्किलाब झिन्दाबाद' अशा घोषणानी एकमेकांना प्रेरित करत आहेत. ती जणू ‘खूण पटवण्याची’ एक पद्धत आहे. स्थानकाबाहेर पडल्यावर “रामलीला मैदान कोणत्या बाजूला आहे हो?” अस मला कुणाला विचारण्याची गरज नाही – सगळी गर्दी त्याच दिशेने चालली आहे. सगळे रस्ते जणू रामलीला मैदानाला जाऊन मिळताहेत!

पण मी नुकतीच Connaught Place परिसरात जाऊन आले आहे आणि तिथलही दृश्य माझ्या नजरेसमोर आहे. राजीव चौक मेट्रो स्थानकात शेकडो, नव्हे हजारो लोक आहेत. ते स्थानकात प्रवेश करत आहेत आणि स्थानकातून बाहेर जात आहेत. त्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाशी, परिसरात चालू असलेल्या उपोषणाशी काही देणे घेणे नाही. मी त्या परिसरात अर्धा तास फिरते. हजारो लोक मला वेगवेगळ्या चमचमत्या  दुकानांपाशी दिसतात. त्यांचे ‘संघर्षाचे’ मुद्दे वेगळे आहेत – McDonalds  मध्ये  जाव की Subways मध्ये? कोल्ड कॉफी प्यावी, की मिल्क शेक? आईसक्रीम आत्ता खाव, की सिनेमानंतर? सोनीचा laptop घ्यावा आधी, की रीबोकचे बूट? ते सगळे भारतीयच आहेत – पण India Against Corruption त्यांच्या विषयपत्रिकेवर नाही, त्यांच्या विचारांच्या परिघात नाही. मी एक दोन जणांना ‘के’ block पासून निघणा-या मोर्चाविषयी विचारते – पण त्यांना अर्थातच काहीही माहिती नाही.


****
तर रामलीला मैदानाकडे!  रस्त्याच्या दोन्ही बाजूला  तिरंगा विक्रीला आहे. तो वेगवेगळ्या आकारांत आणि वेगवेगळ्या स्वरूपांत उपलब्ध आहे.म्हणजे  wristband आहे, बिल्ला आहे, खिशाला लावायचे छोटे ध्वज आहेत आणि हवेत लहरवण्यासाठीचे मोठे ध्वजही आहेत,उपरण्यासारखे गळ्याभोवती लटकवायचे पट्टे आहेत, आणि नव्या रीतीचे hair bands आहेत. . जशी तुमची इच्छा आणि ऐपत, तशी तुम्ही खरेदी करू शकता. गांधी टोप्या (तिला खर तर नेहरु टोपी म्हणायला पाहिजे अस मला नेहमी वाटत!) – ज्यावर ‘मी अण्णा आहे' असा मजकूर हिन्दी आणि इन्ग्रजी भाषेत लिहिलेला आहे – विक्रीला आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर या वस्तू खरेदी करताहेत. ते पाहून विक्री करणारी लहान मुले आणि    स्त्रियांचे चेहरे फुलले आहेत. भारत  भ्रष्टाचारमुक्त होवो अथवा न होवो, या विक्रीतून त्याना दोन वेळचे पोट भरण्याइतके पैसे मिळत आहेत हे महत्त्वाचे! त्यांच्या दृष्टीने एखादी राजकीय सभा अथवा धार्मिक कार्यक्रम आणि हे आंदोलन यात काहीच फरक नाही. जेथे जे विकते तेथे ते विकायचे असे त्यांचे धोरण आहे . दोन चार दिवस धंदा बरा होतो आहे हेच त्यांचे सुख आणि समाधान.

मैदानात प्रवेश करायचा तर मोठी रांग आहे. एप्रिल महिन्यात जंतर मंतरमध्ये जाणे – येणे फार सोपे होते, गर्दीही इतकी नसायची. तेव्हा पोलिस होते हजर, पण पडद्याआड  होते जणू. आता इथे मात्र सुरक्षा व्यवस्था जास्त कडक आहे. bag  मशीनद्वारे तपासल्या जाताहेत आणि माणसान्चीही सुरक्षा तपासणी होते आहे. काही दुर्घटना होण्यापेक्षा आधीच काळ्जी घेणे हे जास्त चांगले. तशीही दिल्लीतल्या लोकांना पदोपदी सुरक्षा तपासणीची आता सवय झाली आहे म्हणा. हे आपल्या भल्यासाठी आहे हे लोक जाणतात त्यामुळे सगळे जण पोलिसांना सहकार्य करत आहेत.

काही लोकाना इतका वेळ रांगेत थांबायची सवय नाही. ते रांग मोडून मधेच पुढे घुसतात. माझ्यासारखे काही लोक त्याना ‘अशी रांग मोडून पुढे जाणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे’ असे सुनावतात. त्यावर ते थोडे कसनुसे हसतात पण पुढची जागा काही सोडत नाहीत. आम्ही तो विषय लावून धरतो तेव्हा रांगेतले इतर लोक “जाऊ द्या हो, एवढ्या तेवढ्याने काय फरक पडतो" अशी आमची ‘समजूत' घालतात.  मनमानी करणारे लोक आणि ती मुकाट्याने स्वीकारणारे लोक, साधे नियम मोडणारे लोक आणि तो हसत स्वीकारणारे लोक – अशा समर्थकांच्या बळावर हे आंदोलन कसे काय दीर्घकाळ चालणार असा मला प्रश्न पडतो! India Against Corruption ची ‘ जन लोकपालच्या ‘पुढे जाऊन काही नक्की विचारप्रणाली तरी आहे का हे जरा बघावे लागेल.

मैदानात मला तीन तरूण मुली आणि दोन तरुण दिसतात. ते स्वत:च्या पिशवीतून प्लास्टिक bag  काढतात आणि भोवतालचा कचरा त्यात भरायला लागतात. ते ‘आय ए सी’ चे स्वयंसेवक आहेत का अस मी त्यांना विचारल्यावर ते ‘नाही' म्हणून सांगतात. पण या ठिकाणी असा कचरा पसरणे योग्य नाही या भावनेतून ते आपण होऊन स्वच्छतेचे काम करताहेत. मला त्या तरूणांच, त्यांच्या स्वयंप्रेरणेच, त्यांच्या समजूतदारपणाच  मनापासून कौतुक वाटत. 

मला  आणखी एक रांग दिसते. कसली आहे ती – मोर्चासाठी नाव नोदवायची आहे की काय - म्हणून मी चौकशी करते. मग कळत की, कोणीतरी तिथ बिस्किटांचे पुडे वाटतय – अर्थात फुकट! लोकांची मोठी रांग आहे तिथ आणि एकापेक्षा जास्त पुडे मिळवायचा अनेकांचा प्रयत्न आहे.  गरज नसताना जास्त पुडे जमा करणारे लोक कसे काय भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहणार असा मला पुन्हा प्रश्न पडतो. पाण्याचे विनामूल्य वितरण मी समजू शकते अशा प्रसंगी  – पण बिस्किटांचे काय प्रयोजन?
***
काही तासानंतर मी रामलीला मैदानाच्या बाहेर पडते. मेट्रो स्थानकाबाहेर मला एक ‘फूड प्लाझा’ दिसतो. मी कॉफी प्यायला तिथ जाते. बरीच गर्दी आहे तिकडे. एका टेबलापाशी दोन स्त्रिया बसल्या आहेत – तिथ दोन खुर्च्या रिकाम्या आहेत. मी त्यांची  परवानगी घेऊन तिथ बसते. मी सहज विचारते, “तुम्ही पण रामलीला मैदानवर जाऊन आलात का?” “छे, नाही गेलो,” त्या हसत उत्तरतात. त्या दोघी आई आणि मुलगी आहेत. आई पुढे म्हणते, “जाईन म्हणते मी एखाद्या दिवशी. काही interesting आहे का तिथ?” मला तिच्या प्रश्नाचा अर्थ कळत नाही; interesting  म्हणजे  काय  म्हणायचय  त्यांना?  मी नुसतीच हसते.  तरूण मुलगी म्हणते, “कामधंदा नसलेले रिकामटेकडे लोक जातात तिकडे, मला नाही वेळ असल्या गोष्टींसाठी .” मग मी नुकतीच तिकडून येते आहे हे लक्षात येऊन ती चपापून गप्प बसते.

काउन्टरवरच्या बाईंना मी विचारते, “कस काय चाललय एकंदरीत ?” हा प्रश्न तसा निरर्थकच म्हणायला हवा. पण ती उत्साहाने म्हणाली, “यामुळे जोरात चाललाय आमचा धंदा” – इतक्या प्रामाणिक प्रतिक्रियेवर पुढ काय बोलायच ते मला कळत नाही आणि मी पुन्हा एकदा नुसतीच हसते.

***
एकंदरीत  काय तर विभिन्न दृष्टिकोन असणारे आणि विभिन्न प्राधान्यक्रम असणारे लोक आहेत. वेगवेगळी मत असणारे आणि वेगवेगळ्या विचारांशी संलग्न असणारे लोक आहेत. विविध प्रकारच्या अपेक्षा असणारे लोक आहेत आणि विविध प्रकारची स्वप्न असणारे लोक आहेत. लोकांची गुंतवणूक  वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि उत्तरदायी असण्याच्या त्यांच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. लोकांचे समजून घेण्याचे स्तर वेगवेगळे आहेत आणि जबाबदारी घेण्याची तयारीही वेगवेगळी आहे.

एका बाजूने असे दिसते की अण्णांचे आंदोलन एप्रिल महिन्याच्या एक पाऊलही पुढे गेलेले नाही, आणि दुस-या बाजूने या आंदोलनावर टीकेची झोड उठली आहे. संसदेचे सार्वभौमत्त्व, लोकशाही प्रक्रिया, नागरिक संघटनांची भूमिका याबाबत सगळीकडे चर्चा चालू आहे. 

यातला एक गमतीचा भाग म्हणजे आंदोलनकर्ते आणि विरोधक दोन्हीही बाजू संख्येच्या पाठबळाबद्दल बोलताहेत. म्हणजे आंदोलनकर्ते सांगतात की, आम्हाला इतके इतके missed calls आले  आणि इतक्या मोठ्या संख्येने विविध ठिकाणी लोक मोर्चात सामील झाले. पण ते विसरतात की  missed calls देणे हे श्वासासाठी फुकट मिळणा-या हवेसारखे आहे – त्याचा कोण हिशोब ठेवतो? मोर्चात आणि उपोषणाच्या जागी येणारे लोक दोन तीन तास थांबतात  माझ्यासारखे  आणि मग आपापल्या कामाला निघून जातात. आमच्यासारख्यांच्या निष्ठेची काय खात्री? आंदोलनाचे टीकाकार म्हणतात की यात फक्त मध्यमवर्गाचा सहभाग आहे आणि जे खरे शोषित आणि पीडित आहेत ते यात सामील नाहीत. पण टीकाकार हे विसरतात की, कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात छोटीच असते आणि त्यात कमीच लोक  प्रारंभी सामील असतात . एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या मताला दुस-या कोणाचा पाठिंबा नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की ते मत अथवा तो विचार पूर्णतया  चुकीचा  आहे – कदाचित ती व्यक्ती काळाच्या फार पुढचा विचार करत असण्याचीही शक्यता आहे!

या सगळ्या चित्रविचित्र घटना आणि घडामोडी लक्षात घेऊनही मला असे दिसते आहे की, आंदोलनाला एक वेगळे बळ मिळते आहे. गेले सहा महिने भ्रष्टाचाराचा विषय सातत्याने  लोकांसमोर ठेवणे हे एक मोठे यश मानायला हवे. दोन तीन तासांपुरते का होईना पण तरुण आणि तितक्याच प्रमाणात प्रौढ माणसे आंदोलनात सहभागी होत आहेत हेही एक मोठे यशच आहे. तिरंगा लहरविण्यात लोकाना अभिमान वाटतो  आहे ही चांगली बाब आहे. १५ ऑगस्ट  आणि २६ जानेवरी हे दोन नेहमीचे दिवस वगळता इतर दिवशीही भारताची आठवण लोकांना आहे, त्याबद्दल बोलले जात आहे हे    कौतुकास्पद आहे. संसदेचे सार्वभौमत्त्व, संसदेचे काम, लोक संघटनांची भूमिका, स्वयंशासन अशा गोष्टींवर गांभीर्याने  चर्चा होत आहे हेही एक मोठे यश आहे.  काही लोकांना यामुळे सामाजिक कामात सहभागी होण्याची, योगदान देण्याची संधी उपलब्ध  होत आहे  (असे  त्यांना  वाटते)  हेदेखील महत्त्वाचे आहे.  

आपल्यापैकी काही लोकांचा जन लोकपाल' आंदोलनाच्या पद्धतीला विरोध आहे आणि त्याबाबत ते आवाज उठवत आहेत. अशा लोकांना ‘देशद्रोही’ असे शेलके विशेषण न लावता आपण त्यांचे ऐकून घेत आहोत – आपल्याला  न आवडणा-या मताचाही आदर करत आहोत – हे तर माझ्या मते सर्वात मोठे यश आहे.
  
म्हणून मला अस वाटत, की आमची मत कितीही विभागलेली असोत, त्यातून समाज म्हणून, देश म्हणून, माणूस म्हणून आम्ही अधिक सामर्थ्यशील बनत आहोत!
**                                                                                                                                                                 
तुम्हाला कदाचित 'जंतर मंतरलेल्या संध्याकाळी' वाचायला आवडेल. 

Thursday, August 18, 2011

८५.खासी -गारोंच्या राज्यात : भाग १

आटपाट नगर होत, त्या नगराचा एक राजा होता .. अशी सुरुवात करायला मला आवडला असत आत्ता!  पण एक तर मी होते शिलॉंग  शहरात आणि राजाला नाही भेटले ... पण गेल्या बाजारी निदान गावप्रमुखाला तरी भेटायचं होत मला. एकजण होता असा गावप्रमुख  - एका संस्थेत ग्रंथपालाच काम करणारा. पण  त्याला भेटायची संधी वेळेअभावी चुकली होती.पण आटपाट नगर म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीपल्याडच जगण असा अर्थ घेतला तर मात्र मग मी तो शब्द वापरू शकते. खासी (Khasi), गारो (Garo )  आणि जैंतिया (Jaintia ) अशा तीन मुख्य टेकड्यांनी व्यापलेला भाग आज मेघालय म्हणून ओळखला जातो. जरी मेघालयात  १७  आदिवासी जमाती असल्या तरी या तीनच मुख्य म्हणता येतील. शिलॉंग शहर इस्ट खासी जिल्ह्यात येत  आणि मी जास्त खासी लोकांशी बोलले म्हणून मला मी  'खासी -गारोंच्या " राज्यात आहे अस वाटत राहिलं.

यावेळी वेळ नव्हता म्हणून मी 'विकीबाबाचा' आधार  न घेता. म्हणजे  अक्षरश: को-या पाटीनिशी इथे आले होते. भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान, आदिवासींचे जगणे, निसर्ग .. अशा अनेक क्षेत्रांत नव्याने भर टाकणारा अनुभव आला. पुस्तकातून शिकण्यापेक्षा माणसांकडून शिकायला मला नेहमीच जास्त आवडत. इथ तर एक सोडून सातही जिल्ह्यातली जवळजवळ दीडशे माणस मला शिकवायला उत्सुक होती - त्यामुळे एक बर झाल, की कोणी कंटाळल नाही. मला भरपूर प्रश्न विचारता आले म्हणून मी कंटाळले नाही आणि कोणा एकाला/एकीला माझ्या भडीमाराला तोंड द्याव लागल नाही म्हणून ते कंटाळले नाहीत. 

शिलॉंगबद्दल -तिथे पोचायचं कस- इथपासून सुरुवात झाली. फोनवर चौकशी केल्यावर मला सांगण्यात आलं की, 'गुवाहाटीला उतरा".  तिथे उतरल्यावर कळल की गुवाहाटी -शिलॉंग अंतर साधारण शंभर किलोमीटर आहे. गुवाहाटीतून बाहेर पडताना जोरबाट गावात दुकानाच्या पाट्या पाहून माझा चौकसपणा सुरु झाला. निमित्त तस जोरदार होत. डावीकडे सर्वत्र 'जोरबाट, आसाम' लिहिलेले होत आणि उजवीकडे मात्र 'जोरबाट, मेघालय'! पुन्हा एकदा सीमारेषा अशी समोर आली. वाटेत नंगपोहला (हे गावाच नाव आहे!) चहासाठी थांबलो, तेव्हा एक देखणा डोंगर समोर दिसला .. आणि मग ते डोंगर  असे सतत दिसतच राहिले. आकाशाच निळेपण लपेटून घेतलेल्या मेघालयाच्या  डोंगरांनी  पुढे माझी सतत सोबत केली. ते मला फारच आवडले, इतके की  "तुम्हाला काय आवडल शिलॉंग मधलं?" अस कोणीतरी मला विचारल्यावर मी 'डोंगर, मस्त आहेत ते' अस उत्तर देऊन सगळ्याना कोडयात टाकल काही काळ!

मला गुवाहाटीतून घेऊन जाण्यासाठी एक खासी स्त्री अधिकारी आली होती. तिच्याशी गप्पा मारतांना कळल की 'गुवा' म्हणजे सुपारी. या शहरात पूर्वी (आणि आजही) सुपारीचा मोठा बाजार भरत असे - म्हणून याचे नाव गुवाहाटी. इथे पान, चुना आणि जवळजवळ अर्धी सुपारी खाण्याची प्रथा आहे. त्याला म्हणतात 'क्वाई' (Kowai). हे सारख खातात - अगदी एक दोन तासांनी तल्लफ येतेच इथल्या माणसांना. क्वाई खाण्यात स्त्रिया आणि पुरुष यांच्यात फरक नाही. ही क्वाई तुम्ही नव्या ठिकाणाहून घेत असाल तर त्यात आल्याचा तुकडा देतात - दुकानदार न मागताच देतो. देणा-याची वाईट नजर लागू नये म्हणून ही काळजी घेतात. दुकानदाराला त्यात अपमान वगैरे काही वाटत नाही.

सारख पान तोंडात असल्यामुळे असेल, पण माणस उगाच भसाभस बोलत बसत नाहीत.  सगळा कारभार शांतपणाने चालू असतो. मला इथले सहा लोक आधी एका प्रशिक्षणात भेटले होते चार दिवस - पण तेव्हाही ते शांतच होते. "आता तुम्हाला आमच्या शांततेच रहस्य लक्षात आल असेल" अस एकजण म्हणाला. हैदराबादच्या आठवडाभराच्या वास्तव्यात सगळ्यांना पुरतील एवढ्या क्वाईची तयारी करून आले होते ते! दहा रुपयांना दहा क्वाई मिळतात - ही कोणीही खरेदी करतो तेव्हा बरोबरच्या सगळ्यांसाठी घेतली जाते. आपापले पैसे देण्याची पद्धत नाही. मलाही त्यांनी आग्रह केल्यामुळे मी दोन वेळा क्वाईचा स्वाद घेतला. पान एकदम तिखट होत आणि क्षणार्धात रंगत होत! एका वेळी अर्धी सुपारी मी अर्थातच खाऊ शकत नव्हते! 

खासी समाज स्त्रीप्रधान आहे. गारो आणि जैंतियाही स्त्रीप्रधान आहेत. त्यामुळे मुलीच्या जन्माच इथे दु:ख नसत, मुलगी 'नकोशी' नसते.  अर्थात म्हणून स्त्रियांच्य आयुष्यात काही प्रश्नच नाहीत असा निष्कर्ष काढण चुकीच ठरेल.  स्त्रियांच्या हातात सगळी सूत्र आहेत असही म्हणता येत नाही! बरेचदा जमीनजुमला. स्थावर जंगम, शिक्षण  अशा बाबतीतले निर्णय 'मामा' घेतात - म्हणजे पुरूषच घेतात. सगळ्यात लहान मुलीकडे वारसा हक्क असतो - म्हणजे संपत्ती तिला मिळते आणि कुटुंबाचे पालन पोषणही तिनेच करायचे असते. इथे सून घरात येत नाही तर जावई घरात येतो - आणि मुलगा बायकोच्या घरी रहायला जातो. मला दोन खासी उच्चशिक्षित स्त्रिया भेटल्या - एकीला तीन मुलगे  होते  आणि दुसरीला दोन मुलगे होते. 'आपले म्हातारपणी कोण पाहणार' (कारण मुले बायकोच्या घरी जातील) अशी त्यांना चिंता होती. हे त्या विनोदाने म्हणत नव्हत्या इतक नक्की. कारण  आणखी एक म्हणाली, "सगळ्या काही धाकट्या मुली नसतात, थोरल्याही असतात - तुमच्या मुलांना थोरल्या मुली पाहायला सांगा - म्हणजे त्या तुमच्याकडे येतील."

अर्थात लग्न आणि लैंगिक संबंध, लग्न आणि मुले - यांचा फारसा संबंध नाही. एक २१ वर्षांचा तरुण एका मुलीबरोबर राहतो आहे आणि त्याना दोन वर्षाचे एक मूल आहे - असे चित्र इथ अपवादात्मक नाही. याबाबत धर्मांतरित ख्रिश्चन आणि धर्मांतर न केलेले खासी यांच्यात फरक आढळतो. खासी ख्रिश्चनांना असे वागणे चुकीचे - अनैतिक - वाटते. धर्मांतर न केलेले खासी स्वत:ची ओळख 'नियामी खासी' अशी करून देतात. 'Live in relationship ' हा आपल्याकडे चर्चेचा मुद्दा असताना तिथे मात्र तो अनेकांनी सहज स्वीकारला आहे. कोण मागासलेले आणि कोण पुढारलेले असा एक गंमतीदार प्रश्न माझ्या मनात तेव्हा डोकावून गेला.

साधारणपणे इतर राज्यांत फिरताना मला भाषा अंदाजाने समजते, संदर्भाने समजते. पण खासी आणि गारो या दोन्ही भाषा मला अजिबात म्हणजे अजिबात समजत नव्हत्या. कोणी त्या भाषेत बोलत असेल तर मख्खासारख बसून रहाव लागायचं. मी बोली न म्हणता भाषा म्हणते आहे, कारण त्या त्या भाषेशी बरीच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाळ जुळलेली आहे आजही. मी या आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे खासी, गारो, जैंतिया या भाषांना स्वत:ची वेगळी लिपी नाही, त्या रोमन लिपीत लिहिल्या जातात. खासीत हिंदी आणि बांगला भाषेतून खूप शब्द घेतले आहेत अस म्हणतात - पण  'रास्ता' हा एकच शब्द माझ्या ऐकण्यात आला. बरेच शब्द नेपाळी भाषेतून पण घेतले गेले आहेत. गुवाहाटी आणि मेघालयाचा री- भोई  जिल्हा एकमेकांना लागून आहेत. री-भोईत भोई भाषा बोलली जाते; जी खासीच्या कुळातली आहे. त्यामुळे असममधल्या काही भागात लोक खासी समजू शकतात. खासी आणि जैंतिया भाषा एकमेकींच्या कुळातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यातही संवाद असतो. गारो भाषा मात्र बोडो कुळात मोडते. ती भाषा खासी  लोकांना येत नाही. गारो आणि खासी, गारो आणि जैंतिया यांच्यात आज तरी इंग्रजी भाषेमुळेच संवाद शक्य होतो आहे. पूर्वी काय होत असेल देवाणघेवाण यांची आपापसात हे समजणे अवघड आहे.

खासी भाषेत मी एक दोन वाक्य 'बोलायला' शिकले. 'Nga  bam ja" याचा अर्थ "मी भात खाते" आणि "Ngam  lah kren khaasi " म्हणजे "मला खासी बोलता येत नाही" वगैरे. मी ती वाक्य आता विसरले आहे अस म्हणण्यात काही अर्थ नाही कारण तेव्हाही मला ती येत नव्हतीच!

आमच्या एका सहका-याचे नाव banteliang (हे मराठीत बरोबर कसे लिहायचे हा प्रश्नच आहे!) असे होते. त्याला सगळेजण सारखे 'बाबन, बाबन" अस म्हणत होते. एक दोन दिवसांनी मी आपल सहज त्यांना म्हटल, 'आमच्या मराठी भाषेत पण बबन हे नाव आहे." त्यावर सगळे हसायला लागले. मग त्यांनी सांगितलं की पुरुषांना आदराने "bah "- श्रीयुत या अर्थाने लावल जात आणि banteliang च छोट रूप होत 'बन' म्हणून ते होते -बाबन  - H चा उच्चार स्पष्ट केला जात नसल्यामुळे माझा घोटाळा झाला होता. स्त्रियांना श्रीमती या अर्थाने "kaung " असे संबोधले जाते - त्याचा उच्चार मला अजून नीट करता येत नाही. एकंदर इथली नाव हा एक अडचणीचाच मुद्दा होता माझ्यासाठी! Yumiap, Thubru, Rimpachi, Tengaman ही भारतीय माणसांची नाव आहेत हे मला पुन्हा एकदा लक्षात ठेवाव लागल. हे लोक जेव्हा पुणे, मुंबई, दिल्ली इथ येतात (बरेच जण उच्च शिक्षणासाठी येतात) तेव्हा त्यांना किती अडचणी येत असतील हेही कळल त्या निमित्ताने! 

जवळजवळ सगळ्या माणसांना आपण दुस-यांना आवडाव अस वाटत असत. हे 'आपणपण' व्यापक असत - ते माझ गाव, माझा समाज, माझा देश, माझा धर्म, माझ साहित्य .. अशी वेगवेगळी रूप धारण करत. तुम्ही कोणत्याही ठिकाणी नव्याने आला आहात अस कळल की, लोक विचारतात, "आवडल का आमच गाव? आमच राज्य?" हा प्रश्न मला बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान दिल्ली .. अशा अनेक राज्यांत अनेक लोकांनी पुन्हापुन्हा विचारलेला आहे. शिलॉंग तरी त्याला अपवाद कस असणार? आणि गंमत म्हणजे नुसत 'आवडल' अस उत्तर चालत नाही, काय आवडल तेही सांगाव लागत.

मला शिलॉंगमधली सगळ्यात आवडलेली गोष्ट (तिथला निसर्ग एवढा अप्रतिम असताना माझ्या हेच लक्षात रहाव हा माझा करंटेपणा ) म्हणजे कर्कश आवाज अजिबात न करणारी वाहन! पुढे वाहतूक ठप्प झालेली दिसली की वाहनचालक शांतपणे बसून राहतो - एकदाही हॉर्न न वाजवता! मी गीडीयनला (Gideon) (आमच्या गाडीचा चालक)  त्याबद्दल विचारल तर म्हणाला, "सगळ्यांनाच पोचायचं असत लवकर - पण पुढचे थांबलेत ते काही तरी कारण असणार म्हणून. उगाच कशाला आवाज करायचा?" मला त्यांच्या या शहाणपणाच   फार कौतुक वाटल. शेवटच्या दिवशी मी गुवाहाटीला येतांना तर घाटात तासभर वाहतूक ठप्प होती. त्या तासाभरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहन होती - पण हॉर्न कोणीच वाजवला नाही. अर्थात पोलिसदेखील सर्वत्र हजर होते आणि वाहतूक नियंत्रण करत होते. पोलिस नेहमीच असतात की स्वातंत्र्यदिन जवळ आल्यामुळे जास्त दक्षता होती ते कळायला मात्र आता मार्ग नाही - हा प्रश्न मी विचारायचा विसरले. या लोकांना दिल्लीत  किंवा पुण्यात आणल तर बर होईल अस वाटलं. पण कोण कोणाकडून काय शिकेल याची मात्र खात्री नाही - त्यामुळे असू देत ते चांगले वाहनचालक निदान तिथे तरी!

(खर तर मला दोन किंवा तीन भागांत पोस्ट लिहायला फारस आवडत नाही. उगीच रेंगाळल्यासारख वाटत माझ मलाच .. पण अजून सांगण्याजोग बरच काही आहे.. तेव्हा ते पुढच्या भागात!)
 *

Wednesday, August 10, 2011

८४ सोस


गेले दोन तीन दिवस मी सातत्याने दोन नव्या भाषा  ऐकते आहे. माझ्या भोवतालचे लोक तसे समंजस आहेत,  मला या दोन्ही भाषा बोलता येणे तर दूरचेच, त्या मला समजतही नाहीत हे त्या सर्वाना चांगले माहिती आहे. त्यामुळे शक्यतो इंग्रजी भाषेचा वापर चालू आहे. इथे एक बरे आहे, की शिपाई आणि वाहचालकही मस्त इंग्रजी बोलतात – माझ्यापेक्षाही सफाईने बोलतात. गावातही अनेकांना इंग्रजी बोलता येते.  त्यामुळे मला संवाद साधायला अडचण अशी काही नाही. पण तरी अनेकदा लोक एकमेकांशी ज्या दोन भाषा सहजतेने बोलतात त्या आहेत खासी आणि गारो.

मी सध्या मेघालयात आहे, अजून चार दिवस असणार आहे. इतर वेळी मी त्या त्या भाषेतली कामचलाऊ वाक्य शिकून घेते; इथ मात्र तशी गरज नसल्याने मी तो विनोदी प्रयत्न करत बसले नाही.खासी आणि गारो दोन्ही भाषा रोमन लिपीत लिहिल्या जातात – त्यात वर्तमात्र आणि मासिकही निघतात. आज एकजण खासी भाषेतल वर्तमानपत्र वाचत होती, तेव्हा अक्षर ओळ्खीची दिसूनही त्या शब्दांचा अर्थ लागत नव्हता तेव्हा मजा वाटली.
=====================================

Pyllait im u khynnah 9 snem ialade bad ka pyrsa na u runar ba pyniap ia ka kmie kpa bad para

Wat lada u Bremingstar Mylliem 28 snem rta ula pynjah burom ia ka shnong Mawsaiñ, da kaba pyniap dusmon ia la u jong u kpa ka kmie bad ka para kynthei ha ka shnong Mawsain Mawkyrwat ha ka 2 tarik mynta u bnai, hynrei ha katei ka miet

http://mawphor.com/
======================================

शब्दाना अर्थ असतो तो नेमका कशामुळे? अनेकदा तसा तो आपल्याला शिकवला गेल्यामुळे! उदाहरणार्थ ‘कागद’ या शब्दाने एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते. कागदाचा आकार, त्याचा रंग, त्याचा स्पर्श, त्याचा उपयोग, त्याचे मूल्य --- अशा अनेक प्रकारे ही प्रतिमा आपल्या मनात येते. त्यामागे ‘कागद' या शब्दातून आजवर आपल्याला आलेला अनुभवही असतो जमेस धरलेला. जेव्हा शब्द आणि अर्थ यांची सांगड बसत नाही, तेव्हा एक तर आपण शब्द बदलतो ('मला तस नव्ह्त म्हणायच' ही आपली सफाई असते) किंवा त्याचा अर्थ आपण नव्याने लावतो ('हे माझ्या लक्षात नव्ह्त आल' अस आपण म्हणतो!)

नवीन शब्द आपण शिकतो तेव्हा त्याचा अर्थ समजून घेतो आणि त्यानुसार तो शब्द योग्य  प्रसंगी  वापरतो. असे मग शब्द आपल्या अंगवळणी पडत जातात , सवयीचे होतात.

अगदी आपल्या रोजच्या वापरातले शब्द त्यातली अक्षर सुट्टी करून वापरली की निरर्थक वाटायला लागतात. ‘वापर' हा शब्द घ्या उदाहरणार्थ ‘वा', ‘प' आणि ‘र" अशी तीन अक्षरे वेगवेगळी उच्चारत राहिली; की त्या तीन अक्षरांचा एकत्र प्रयोग जो अर्थ देतो तो नाहीसा होतो; आणि मागे उरतात ती  एकमेकांशी काहीही संबंध नसणारी तीन अक्षरे! अस करत राहिल, की हळूहळू मला बोलण, लिहिण, वाचण या सगळ्या क्रिया नेहमी निरर्थक वाटायला लागतात. अस वाटत, की आपल्याभोवती कसलीतरी भयंकर पोकळी आहे आणि ती जाणवू नये म्हणून आपण उगीच शब्दांचे इमले रचत बसलो आहोत. बोलता न येणारे, वाचता न येणारे , लिहिता न येणारे असंख्य जीव या सृष्टीतलावर आहेत – त्यांच जगण काही पूर्णत: निरर्थक असत नाही! 

शिवाय आपले शब्द आणि त्याचे दुस-यानी काढलेले – लावलेले अर्थ यात अंतर राहणार!
दुस-यांचे शब्द आणि आपण त्याचा लावलेला अर्थ यातही  अंतर राहणार!
हे सगळ मी या ब्लॉगवर लिहिते आहे हा पण एक विरोधाभास आहेच!  शब्दांचा सोस - दुसर काय? 

Wednesday, August 3, 2011

८३. गरज


त्या दिवशी घरी यायला बराच उशीर झाला होता. रात्रीचे दहा वाजून गेले होते. कधी नाही ते मी एका शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गेले होते.. ज्ञानाच्या अभावामुळे आनंदात उणीव राहते हे मला माहिती आहे. संगीतातल मला कळत काहीच नाही, तरीही (की त्यामुळे?) मी जे ऐकल त्याबाबत खूष होते. भूकही लागली होती. तसाही मला स्वयंपाक घरात राहण्याचा उत्साह कमी असतो आणि आता रात्री दहा वाजता तर नक्कीच मी काही करत बसले नसते.

रस्त्यावर एक भेळेच दुकान दिसलं आणि मी दुचाकी थांबवली. काउंटरवरून तिथल्या पद्धतीप्रमाणे कूपन घेतलं आणि भेळेच्या काउंटरवर गेले. तिथल्या माणसाला मी भेळ खाणार आहे हे तितकस आवडलेल दिसत नव्हत त्याच्या चेह-यावरून. माझा अंदाज खरा ठरला, कारण तो माणूस म्हणाला, “ताई, रगडा पाटीस आहे गरमागरम. तो देतो तुम्हाला.” माझ्या खाण्यापिण्याच्या विशेष आवडीनिवडी नाहीत. पण आत्ता भेळ खायचं मनात आलं होत म्हणून मला भेळच खायची होती. त्या माणसाने पुन्हा आग्रह केल्यावर मी शांतपणे म्हटल, “काका, आज मला भेळच खायचीय. पुढच्या वेळी नक्की तुम्ही शिफारस कराल ते खाईन.”

आता एवढयावर खर तर ते प्रकरण संपायला हव होत. पण ते काका नाराजीच्या स्वरांत म्हणाले, “ताई, मागच्या वेळी पण तुम्ही असच बोलला होतात ...”

मी चमकून त्या काकांकड पाहिलं. हं! मी आधी दोन तीनदा आले होते या ठिकाणी पण हे गृहस्थ काही मला आठवत नव्हते. मी जरा निरखून पाहिलं. पन्नाशीच्या आसपास वय असणारा गृहस्थ बहुधा बिहारमधून आलेला असावा. बहुतेक रोजंदारीवर काम करत असणार हा माणूस. ‘मी काय खाव’ यात याला इतका रस असण्याच काय कारण? माझ्या चेह-यावरचा संशय त्या काकांना वाचता आला असणार लगेच. कारण ते म्हणाले, “ताई, भेळेपेक्षा मी रगडा पाटीस जास्त चांगल बनवतो. आता एवढया  रात्री तुम्ही इथ खाताय, म्हणजे घरी जाऊन काही खाणार नाही. तुम्ही माझ्या हातची जास्त चांगली डिश खावी इतकच मला वाटतय ..म्हणून म्हणालो तुम्हाला. मागच्या वेळी मी तुमच ऐकून मी तुम्हाला भेळ दिली होती. आज आता तुम्ही माझ ऐका.”

ते  काका इतक बोलल्यावर मला सहा महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवला. त्यावेळीही त्यांनी मला हीच विचित्र विनंती केली होती – भेळेऐवजी रगडा पाटीस खाण्याची. पण तेव्हाही  मी भेळच खाल्ली होती. रोज शेकडो ग्राहक येत असताना या माणसाला नेमकी मीच कशी लक्षात राहिले याच मला कुतुहल वाटलं! मग मी हसून म्हटल, “काका, तुम्हाला भेळ बनवायचा कंटाळा आलाय का?”

“नाही, नाही, तस अजिबात नाही. ताई, तुम्ही एकदा माझ्या हातचा रगडा पाटीस खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल! खूप लोकाना आवडतो तो, एकदा माझ ऐका तर खर!” अस त्यांनी लगबगीने स्पष्टीकरण दिल.

फार तत्त्वाचा मुद्दा नसेल तर मी ताणत नाही. शिवाय त्या संगीतामुळे माझा मूड चांगला होता. मग मी काकांनी दिलेला रगडा पाटीस खाल्ला. ठीकठाक होता तो. ते कौतुक करत होते तितका काही ‘ग्रेट’ नव्हता तो. खाण संपवून मी निघाले तेव्हा ते काका माझ्या टेबलापाशी आले आणि म्हणाले, “मग, ताई, आवडला ना रगडा पाटीस?” मी नुसती हसले आणि होकारार्थी मान डोलावून पुढे निघाले.

मी प्रशंसापर उद्गार न काढल्यामुळे काका काहीसे निराश झाले आणि विचारांत पडले. ते म्हणाले, “तुम्हाला अजून पण भेळ खायची आहे का?” माझ पोट भरल असल्याने अर्थातच आता मला आणखी काही नको होत! पण काका म्हणाले, “ तुम्हाला पाटीस आवडल नसेल तर मी तुम्हाला भेळ पार्सल देतो. नाही, तुम्ही त्याचे काही पैसे देऊ नका. माझ्या बेस्ट डिशचा मी तुम्हाला आग्रह केला आणि म्हणून तुम्ही ती खाल्लीत – पण तुम्हाला ती आवडली नसेल तर मी त्याची भरपाई केली पाहिजे.”

हे बोलताना त्या काकांना त्रास होत होता हे मला जाणवलं. आधी मी थोडी गोंधळले. मग मला माझ्यात आणि त्या काकांच्यात असलेल साम्य जाणवलं.

या माणसाकडे काही विशेष कौशल्य होती, त्याच्या मते ती इतरांपेक्षा चांगल्या दर्जाची होती. आणि त्याच्यासमोर मी होते – जिला त्याच्या विशेष कौशल्याशी काही देण-घेण नव्हत! मी माझ्याच जगात मग्न होते. तो माणूस मला त्याचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न दयायला तयार होता, मी मात्र काहीही, ,कमी गुणवत्तेच चालवून घ्यायला तयार होते. पर्यायाने मी त्याला सांगत होते की ‘इतक चांगल काम करण्याची काही गरज नाही’. वानवा देणा-याची नव्हती, घेणा-याची होती.

अर्थातच त्या काकांना माझ्यासमोर काही सिद्ध करायचे नव्हत. समोरच्याला जे द्यायचे ते सर्वोत्तम या त्यांच्या स्वाभाविक प्रेरणेनुसार ते काम करत होते. त्यांना माझ्या प्रमाणपत्राची गरज नव्हती, ‘आपण चांगल काम करत आहोत’ या समाधानाची गरज मात्र होती. ते कामाकडे एका दृष्टिकोनातून  पहात होते, मी वेगळ्या दृष्टिकोनातून.  ते पदार्थाचे मूल्य वेगळ्या पद्धतीने – त्याच्या दर्जावरून – करत होते आणि मी पदार्थाचे मूल्य वेगळ्या पद्धतीने – पोट भरले म्हणजे झाले, त्याच्या उपयोगितेवरून – करत होते. मी त्यांचा हेतू लक्षात घेतला नाही आणि त्यांच्या गुणवत्तेची मी नोंद घ्यावी असे मला वाटले नाही याबद्दल – म्हणजे आपले काम कमी पडले याबद्दल त्यांना वाईट वाटत होते. मला पदार्थ आवडला नाही म्हणजे त्यांचा कामाचा दर्जा कमी पडला असा अर्थ त्यांनी काढला होता!

मला त्या काकांच मन एकदम समजल्यासारख वाटलं. तुम्ही आम्ही सगळेच अशा जाळ्यात अडकलेले असतो. जगाची रीत वेगळी असते – आपल्याजवळ काय चांगल आहे, आपली बलस्थान काय आहेत त्याच्यानुसार फार कमी वेळा आपल्याला काम करायची संधी मिळते. अनेकदा परिस्थितीशी जुळवून घेत आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाच, कमी गुणवत्तेच काम करत बसाव लागत कारण समोरच्याची अपेक्षा तेवढीच मर्यादित असते. मागणी आणि पुरवठा या चक्रात न बसणार काही विशेष आपल्याकड असेल तेव्हा हे फार प्रकर्षाने जाणवत! आणि ते काहीही असू शकत ... कोणत्याही क्षेत्रातल असू शकत ..कोणाहीकडे असू शकत!

पुढच्यावेळी भेळ खावीशी वाटल्यावर मी त्याच ठिकाणी जाईन आणि कदाचित पुन्हा एकदा भेळच खाईन. कधीतरी त्या काकांना महत्त्वाचा  वाटणारा, त्यांच्या मते ‘बेस्ट’ असणारा  त्यांचा रगडा पाटीस मला आवडेल अशी मी आशा करते. तो आवडला नसताना उगाच त्यांना खूष करायला मी खोट बोलणार नाही....तो दांभिकपणा ठरेल.

त्या साध्या माणसाकडून मी त्यादिवशी एक महत्त्वाचा धडा शिकले .....
लोकांची मागणी काहीही असो, आपल्या सर्वोत्कृष्ट क्षमतेनुसार आपण चांगले काम करत राहण्याची गरज आहे .. ती गरज लोकांची असो वा नसो! 
**