त्या सकाळी एक एसएमएस आला. “आज विशेषांक पोस्ट करायचं काम आहे. काम
जास्त आहे म्हणून जास्त लोकांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही येऊ शकाल का?”
निरोप एका संघटनेच्या कार्यकर्त्याचा होता.
अनायासे रविवार होता. मला दुपारी थोडा वेळ मोकळा होता. तीनेक तास या
कामासाठी देणं मला सहज शक्य होतं. म्हणून मी गेले. अगदी नेमकी दोन वाजता.
अपेक्षेप्रमाणे अजून कुणी आलेलं नव्हतं. पण पाच-दहा मिनिटांत इतर लोक यायला
सुरुवात झाली आणि अडीचच्या सुमारास आमचं काम जोमाने सुरु झालं होतं.
काम तसं सोपं होतं. एक पाकीट घ्यायचं, त्याला दोन तिकीटं लावायची.
त्यासाठी दोन लोकांची टीम बनली. अशा खरं तर तीन जोड्या बनल्या. एक जोडी तिकीट
लावलेल्या पाकिटात अंक घालून पाकीट नीट बंद करायला लागली. पाचव्या जोडीने बंद
पाकिटांवर पत्ते चिकटवायला सुरुवात केली. आणि सहाव्या जोडीने त्या अंकांचे पोस्टात
पाठवण्याजोगे गठ्ठे बांधायला सुरुवात केली.
त्या बाराजणांमध्ये मीच नवीन होते. बाकी सगळे अनुभवी, नेहमी हे काम
करणारे. त्यामुळे अगदी दोन मिनिटांत कसलाही गोंधळ न होता शिस्तशीर काम सुरु झालं.
एकदा ते मार्गी लागल्यावर लोक मग आपापसात गप्पा मारायला लागले. काम मुख्यत्वे
‘हाताचं’ होतं; ‘डोक्याचं’ नव्हतं त्यामुळे ‘सिनेमा’पासून ‘आप’पर्यंत;
‘फेसबुक’पासून ‘लता मंगेशकर’पर्यंत ...कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मधेच चहा आणि खाण्याचे
पदार्थही आले. दोन-तीन चांगली गायक मंडळी होती सोबत, त्यांच्या सुस्वर गायनाचा आस्वाद घेतला.
जो अंक पाठवला जात होता त्याच्या मुखपृष्ठाविषयी लोकांचं अगदी
सुरुवातीलाच आपापसात बोलणं झालं. त्याची रंगसंगती, ते तयार केलेला कलाकार,
त्यावरच्या मुख्य ओळीतून जाणारा संदेश – यावर सविस्तर बोलणं झालं. या अंकाची मी
‘आजीव सदस्य’ असले तरी मी अंक ‘ऑनलाईन’ वाचते – त्यामुळे मी छापील अंकाकडे पाहिलं
नाही. शिवाय माझ्या कामातला ८०% वेळ तिकीटं लावण्यात गेला, आणि फक्त थोडा वेळ मी
अंक पाकिटात घालण्याचं काम केलं. शेवटी काम संपवायची घाई असल्याने (मी तीन तास
थांबणार होते, ती प्रत्यक्षात साडेचार तास थांबले होते – त्यामुळे मला निघायची
घाई होती) मी अंक पहिलाच नाही.
“एक अंक घेऊन जा आणि पाहून सांगा कसा झालाय तो” असं संपादकीय काम
करणा-या व्यक्तींनी दोन-तीन वेळा म्हटल्याने मग निघताना एक अंक मी सोबत घेतला. पुन्हा
एकदा चहापान झालं, ‘पुन्हा भेटूयात’ असं एकमेकांना-एकमेकींना म्हणून झालं आणि मी
तिथून (एकदाची) निघाले.
घरी आले. इतर कामं झाली. दुस-या दिवसाची तयारी करताना हा अंक पिशवीतून
काढून टेबलावर ठेवला. सहज म्हणून मी त्यावर नजर टाकली आणि मी चमकले.
कारण अंकावर ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २०१४’ ऐवजी ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २१०४’ असं छापलं होतं.
माझी पहिली प्रतिक्रिया ‘माझी नजर मला धोका देतेय’ अशी होती. तिथं
इतक्या लोकांनी हा अंक पाहिला होता की त्यांना हे दिसलं नसेल असं शक्यच नाही.
म्हणजे माझीच नजर मला धोका देतेय. बरं ती सगळी जाणकार मंडळी आहेत – त्यामुळे इतकी
ठळक चूक त्यांच्या नजरेतून निसटेल हे अशक्य आहे. त्यांनी मुखपृष्ठावर चर्चा केली
होती माझ्यासमोरच; त्यामुळे ‘हे पाहायचं राहून गेलंय’ हेही शक्य नव्हतं.
मनाची कशी पळवाट शोधायची घाई असते बघा. वरचं सगळा तर्क खरा असला तरी
माझ्या समोरच्या अंकावर ‘२१०४’ दिसत होतंच मला – मग माझ्या मनात असा विचार आला की
‘एवढ्या एकाच प्रतीवर चुकीने तसं छापलं गेलं असेल, बाकी प्रतींवर बरोबर २०१४
असेल’. माझा हा विचार हास्यास्पद होता. कारण प्रत्येक मुखपृष्ठ काही हाताने तयार
करत नाहीत – सगळी एकदम छापली असणार; त्यामुळे एका प्रतीवर जी चूक आहे ती सगळ्या
प्रतींवर असणार.
मी थोडी संकटात सापडले. आम्ही तिथून निघताना ‘काम लवकर संपल्याचा
आनंद’ संयोजकांनी व्यक्त केला होता. अंक उद्या पोस्टात टाकायचे आहेत. आता ही चूक
कळवली तर त्यांना सगळे अंक पाकिटातून पुन्हा बाहेर काढावे लागणार, त्यावर नवीन
स्टीकर लावून पुन्हा अंक भरावे लागणार - म्हणजे त्यांची आजची रात्र बरबाद होणार.
हा अंक मी तिथे पाच तास होते तेव्हाच का नाही पहिला, अशी हळहळ वाटत
राहिली. तेव्हा अनेक लोक होते, काम वाटून घेता आलं असतं, दुरुस्ती लगेच झाली असती.
आता मी उशीरा अंक पहिल्याने आधीचे पुष्कळसे श्रम वायाच गेले म्हणायचे.
एक शक्यता अशीही आहे की, ही चूक लक्षात येउनही त्यांनी ‘ती दुरुस्त
करायची नाही’ असं ठरवलं असेल तर? मी कोण त्यांना काही सांगणारी?
पण त्या गटाला मी जेवढी ओळखते, त्यावरून चूक अशी दडपून टाकण्याचा
मार्ग ते स्वीकारतील असं वाटत नाही. त्यांना अधिक काम करावं लागेल, पण ते करतील.
त्यांच्या नजरेतून सुटलेली एखादी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली नाही तर ते योग्य
ठरणार नाही.
मग मी ठरवलं – मुखपृष्ठावर चुकीचा मजकूर छापला गेला आहे हे सांगण्याचं
आपलं काम आपण करावं; त्यावर काय निर्णय घ्यायचा ते संबधित लोक ठरवतीलच. त्यांनी
निर्णय काय घ्यावा याबाबत आपल्या इच्छेचा काही प्रश्न उद्भवत नाही! पण आपण काय
करावं हे मात्र आपण ‘इतर काय करतील/म्हणतील’ यावर अवलंबून ठेऊ नये.
घेतला फोन आणि केला एसएमएस. त्यावर उत्तर आलं एका शब्दाचं – त्यावरून
मला निर्णयाचा अर्थबोध काही झाला नाही. पण निर्णयाचा विचार मी करण्याचं कारण
नव्हतं – हे मी स्वत:ला आधीच सांगितलं होतं.
दुस-या दिवशी सकाळी फोन आला तेव्हा कळलं की चूक दुरुस्त करण्याचं काम
काल रात्रीच हाती घेतलंय टीमने. ते ऐकून मला आनंद झाला.
मुख्य मुद्दा तो नाही.
मुख्य मुद्दा आहे की: जे इतर दहा लोकांना दिसलं नाही, ते मलाच का
दिसलं?
का दिसतं नेहमीच?
अशी ‘नजर’ असली की जबाबदारी वाढते.
असली कसली नजर लाभली आहे मला?