ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, December 29, 2013

१८३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १८: मोक्षविचार (भाग २)



'मी आणि माझे हेच सा-या दु:खाचे मूळ होय. मालकीच्या भावनेतून स्वार्थ उदभवत असतो आणि हा स्वार्थीपणा दु:खाला जन्म देतो. स्वार्थीपणाची प्रत्येक क्रिया, स्वार्थीपणाचा प्रत्येक विचार आपल्यात त्या त्या वस्तूविषयी आसक्ती उत्पन्न करतो आणि लगेच आपण त्या वस्तूचे गुलाम बनून जातो. पण ज्याच्या मनात मुक्तीची इच्छा निर्माण झाली आहे तो या गुलामीत अडकणारच नाही.

ही मुक्ती मिळणार कोठे?  The Song of Sanyasin या त्यांच्या कवितेत स्वामीजी म्हणतात,
तू कुठे शोधिसी? नाही कधी मित्र रे,
मुक्तता लब्ध ही मर्त्य लोकी।
अन्य लोकांतही ग्रंथी की मंदिरी,
शोध तुझा असे हा व्यर्थ की।।

आत्मशोधाच्या विविध अवस्था आहेत. त्यातील टप्पे विभिन्न आहेत. त्यात खरे-खोटे, चांगले-वाईट काही नाही. मुक्तीचा शोध हा सर्व धर्मांचा प्रयत्न आहे. निसर्गाचे नियम मोडू शकेल अशा कोणत्यातरी 'आदर्शाच्या शोधात मानवजात नेहमी आहे. आपले देव बघा! हवेतून उडतात, पाण्यावर चालतात, वाघ-सिंह-सर्पावर बसतात. त्यांनी मनात आणले तर ते भूक नियंत्रित करु शकतात. माणसाला जे जे काही अशक्य आहे ते ते सारे त्याचे देव करतात. पण आत्म्याचा हा शोध काहीही झाले तरी ठरतो मात्र बाहेरचाच! कारण आपण पूर्ण मुक्त होऊ शकणार नाही असेच तेंव्हा माणसाला वाटत होते.

नंतर हळूहळू त्याला असे वाटू लागले की, या देवता भिन्न नसून त्यांच्यात एकत्व आहे, आणि या देवत्वाशी सर्व माणसांचे अगदी जवळचे नाते आहे. या देवता म्हणजे त्याचे स्वत:चेच प्रतिबिंब, हेही नंतर त्याच्या ध्यानात आले. त्यातूनच अंतरात्म्याची कल्पना त्याच्या हृदयात उगम पावली. जो अनंत परमात्मा आहे तोच सान्त जीवात्मा आहे असे ज्ञान होणे हा या शोधाचा सर्वोच्च आणि अंतिम टप्पा होय. पण त्यामुळे इतर टप्पे कनिष्ठ दर्जाचे अथवा खोटे ठरत नाहीत, हे विवेकानंदांचे म्हणणे आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवे. सर्वांना मुक्तीची आशा आहे. सर्वजण या प्रवासाच्या कोठल्या ना कोठल्या वळणावर आहेत. त्यामुळे कोणीही निराश व्हायचे कारण नाही, खचून जायचे तर अजिबात कारण नाही. प्रत्येकाने प्रवासास प्रारंभ केलेला आहेच. मुक्कामी कोणी आज पोहोचेल, कोणी उद्या, कोणी कालांतराने - पण पोहोचणार तर  प्रत्येकजणच आहे. 'आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति  सागरम् - आकाशातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जसा अंती सागरालाच जाऊन मिळणार आहे तसा प्रत्येकच जीव मुक्तावस्थेला पोहोचणार आहे. मुक्तीच्या या परिक्रमेची गती वाढविणे नक्कीच त्या त्या जीवाच्या हाती आहे.

विवेकानंद म्हणतात, जाणता किंवा अजाणता या मुक्तीचा शोध घेणे म्हणजेच प्रत्येक मनुष्याचे जीवन होय..... ज्ञानी मनुष्य जाणीवपूर्वक याचा शोध घेतो तर अज्ञानी मनुष्य अजाणताच शोध घेतो. एखाद्या सूक्ष्म अणूपासून ते एखाद्या विशाल ता-यापर्यंत प्रत्येकाची मुक्त होण्याची धडपड चालू असते.  ज्ञान हे आपले अंतिम लक्ष्य नाही तर मुक्ती हे आपले अंतिम लक्ष्य आहे याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे.

काहीजणांना वाटते की, आपण काहीही केले तरी आपण मुक्त होणारच आहोत. विवेकानंदांच्या वेदान्तानुसार सर्वांना मुक्ती आहे. मग आपण काही साधना केली किंवा न केली तरी काय फरक पडतो? आहे ते जीवन यथेच्छ उपभोगून घेऊ या. मुक्ती काय आहेच नंतर! कोठे जाते आहे ती?

पण आपण विसरतो की या जगात निखळ चांगली अशी गोष्टच नाही. जग हे सुखदु:खांचे मिश्रण आहे. या जगात गुंतताना आपण कर्माची शृंखला वाढवत असतो. आसक्तीने केलेले कोणत्याही प्रकारचे कर्म - मग ते चांगले असो का वाईट - आपल्याच दु:खाला कारणीभूत ठरत असते. धुळीने माखलेला चेहरा आपण धुळीनेच पुसत नाही. आसक्तीने कर्म करुन आपण मुक्तीचा मार्ग स्वत:साठी अधिकच अवघड करुन घेतो. वाटेल तसे आचरण करुन तुम्हाला मुक्तीची अपेक्षा करता येणार नाही. मुक्तीचा मार्ग प्रत्येकासाठी खुला असला तरी तो तितका सोपा नाही. या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी त्यागाची अगदी जरुरी आहे. हा त्याग बाह्यरुपाने नव्हे तर आतून हवा. जनकासारखी, श्रीकृष्णासारखी, शुकासारखी वृत्ती हवी. बाह्य पातळीवर सारे सुखोपभोग घेताना त्यांच्या मनावर कशाचाही परिणाम घडून येत नव्हता. कर्मातून अधिक कर्म निर्माण होऊ न देण्याची युक्ती ज्याला कळली तो मुक्तच आहे. 'सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा अमृतस्वरुपाच अशी भक्ती जो करु शकतो तो मुक्तच आहे. ज्याला 'नेति नेति म्हणत केवळ ब्रह्मच आकळले आहे तोही मुक्तच आहे. आणि ज्याने स्वत:च्या चित्तवृत्तींचा पूर्णत: निरोध केला आहे तोही मुक्तच आहे!

जीवन्मुक्ती आणि विदेहमुक्ती असे मुक्तीचे दोन प्रकार विवेकानंद मानतात. जीवन्मुक्त परमेश्वरी इच्छेनुसार कार्य करीत राहतो. या जगात त्याची स्वत:ची, स्वत:साठी म्हणून काहीही इच्छा नसते. या ठिकाणी श्रीमद्भगवदगीतेतील 'स्थितप्रज्ञाची वाचकांना आठवण येणे स्वाभाविक आहे. 'यदा संहरते चायं कूर्मोङानीव सर्वश:। इन्द्रियाणीनिद्रयार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।। असाच हा जीवन्मुक्त असतो.

मुक्ती म्हणजे रुक्षता, कशाबददलच काहीही न वाटणे - अशी भिती काहीजणांना वाटते - अशी  उदासीन अवस्था काय कामाची? पण विवेकानंद म्हणतात की, ही मुक्ती रुक्ष भावावस्था नसून आनंदाची सर्वोच्च स्थिती  आहे. 'आशिष्टो दृढिष्टो बलिष्ठ:। यस्येयं पृथिवी सर्वं वित्तस्य पूर्णास्यात’ अशा युवकाच्या आनंदापेक्षा हा आनंद शतपटींनी अधिक आहे. (उपनिषदांच्या नेमकया शब्दांत सांगायचे तर १0 च्या १८व्या घाताइतका मोठा आनंद!) लहान मुले जगातील प्रत्येक वस्तूचे मूल्यमापन त्या वस्तूपासून किती मिठाई मिळेल या मापदंडातून करत असतात. आपलीही मुक्तीची अपेक्षा 'इन्द्रियसुखांच्या आनंदासारखी स्थिती' अशीच असेल तर मग आपण बालिश बुद्धीचे आहोत असे समजावे.

मुक्तावस्थेचे काही लोकांना भयही वाटते. आपण ब्रह्मरुप झाल्यावर मग आपल्या व्यक्तिमत्वाचे काय होणार याची त्यांना धास्ती वाटते. 'मी मोठा झाल्यावर माझ्या बाहुल्यांचे काय होईल? - असा प्रश्न केवळ लहान मुलेच विचारतात. स्वत:ची, कुटुंबाची, गावाची, तालुक्याची, जिल्हयाची, राज्याची, देशाची, खंडाची, विश्वाची ...... अशी तुझी जाणीवेची कक्षा विस्तारत गेली तर त्यात तुझ्या व्यक्तिमत्वाचे काय बिघडले? खरोखर संकोच झाला का त्याचा?

आणि अखेर तुझे स्वतंत्र व्यकितमत्व म्हणजे तरी काय? मी-माझे म्हणत तुझ्या अहंकाराने जमवलेले, जपलेले, घटट पकडून ठेवलेले सारे संस्कारच ना? सारे आहेत का खरेच तुझे? तू तरी तुझा आहेस का? मग कसले भय? कसली भीती? मुक्तावस्थेत आपले परके असे भेदच नसतात, मग कुठला अहंकार? कुठले व्यकितमत्वदुसरे असणारच काय त्या अवस्थेत अखंड, एकरस जाणिवेशिवाय?

श्री अरविंद आणि डा राधाकृष्णन यांच्यासारखे तत्त्वचिंतक नंतरच्या काळात सर्वमुक्तीची (Masss Liberation) संकल्पना मांडतात. त्या दोघांच्या मते व्यक्तिगत मोक्ष हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय नसून सार्वजनीन मुक्ती होईपर्यंत प्रत्येक जीवाला पुन:पुन्हा जन्म घ्यावाच लागतो.

पण विवेकानंदांना हे मत मान्य असल्याचे दिसत नाही. बोधिसत्वाप्रमाणे जीवन्मुक्त इतरांसाठी काम करीत राहील. इतरांच्या मुक्तीसाठी तो त्यांना दिशा दाखवेल हे खरे. पण इतर सर्वजण मुक्त झाल्याविना त्याची मुक्ती पक्की होत नाही असे म्हणणे जरा विचित्र वाटते. ज्या भेदांवरुन आपण जीवांच्या विविध भावावस्था पाहतो ते भेदच मुळी प्रातिभासिक आहेत असे विवेकानंदांचे मत आहे. सर्व जीवांचा जर आपण विचार केला तर मग मानवप्राण्यात मनसुद्धा विकसित व्हायला नकोच होते - कारण पाषाणांमध्ये, जडद्रव्यांमध्ये चेतनेचा इवलासाही विकास दिसून येत नाही. सर्वजण मुक्त होऊ शकतात - नव्हे ते मुक्तच आहेत - अशा अर्थाने सर्वमुक्तीची कल्पना त्यांना मान्य आहे. पण समष्टि अवस्थेस व्यष्टि अवस्था बांधून ठेवणे मात्र त्यांना मान्य नाही!

क्रमश: 

Tuesday, December 24, 2013

१८२. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १७: मोक्षविचार (१)


या जगाचे वर्णन गौतम बुद्धाने दोनच शब्दांत अत्यंत समर्थपणे केले आहे. आपल्या सर्वांनाच ते एकदम मान्य होईल. बुद्ध म्हणतात, 'सर्वं दु:खम्’.  तत्त्वज्ञानाचा उदय जगाच्या या दु:खस्वरुपामुळेच झाला आहे असे काहीजण गंमतीने म्हणतात. त्यात तथ्य आहे की काय असेही कधीकधी वाटते. त्यामुळेच कदाचित सध्याच्या युगात 'गुरु होणे हा सर्वात किफायतशीर धंदा होताना दिसतो आहे.

या जगात तीन प्रकारची दु:खे आहेत असे तत्त्ववेत्ते सांगतात. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशी ती तीन प्रकारची दु:खे आहेत. सर्वसामान्यपणे लोक आधिभौतिक आणि आधिदैविक दु:खांनी व्याकूळ होऊन ईश्वराकडे वळताना दिसतात. मुक्ती म्हणजे या दोन्ही प्रकारच्या दु:खांपासून सुटका असाच त्यांचा समज असतो.

वेदान्ताचा मात्र मुक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. इतर दर्शनांची मुक्तीची संकल्पना काहीशी नकारात्मक - म्हणजे दु:खापासून सुटका - अशी आहे. वेदान्त मात्र मुक्तीकडे सकारात्मक दृष्टया बघतो. मुक्ती म्हणजे केवळ तापत्रयातून सुटका नाही तर आनंदाची, परमानंदाची साक्षात अनुभूती! विवेकानंदांच्या संपूर्ण मोक्षविचारांत हा आनंदघन स्वर लागलेला दिसतो.

आपल्या आयुष्याबददल आपल्याला अनेक प्रश्न पडतात. मानवी जीवनाचा हेतू काय असावा? - हा प्रश्न आपल्याला नेहमीच गोंधळात टाकतो. आपण इतक्या विविध साखळयांमध्ये अडकलेलो आहोत की, यातून सुटका होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मग ईश्वराने आपल्याला जन्माला घालून, आपल्याभोवती अशी परिस्थिती  निर्माण करुन आपली थटटा का केली असेल या विचारांनी आपण बेचैन होऊन जातो. 'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय हे माहिती असतानाही आपण गुंतत जातो .... गुंतत राहतो!

आपली ही असली गुंतवणूक विवेकानंदांना पूर्णत: अमान्य आहे. ते म्हणतात, प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म होय. बाहय आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करुन स्वत:चे हे अव्यक्त ब्रह्मस्वरुप व्यक्त करणेच जीवनाचे परम उदिदष्ट होय!

जार्ज विल्यम्स त्यांच्या Swami Vivekananda: Archetypal Hero or Doubting Saint? या लेखात म्हणतात, Swami Vivekananda’s Vedanta proceeded from the epistemological questions: What is by realizing which everything is realized? This question sets the goal of the belief system and directs it toward a special kind of knowledge. It affirmed that the goal is that of unity in which everything is realized.

बृहदारण्यक उपनिषदात विचारलेल्या 'येन इदं सर्वं विजानाति ते केन  विजानीयात्' या प्रश्नाचा हा नव्या युगात उमटलेला प्रतिध्वनी होता. अर्थात त्याचे उत्तरही होते, 'तद्  ब्रह्रोति असेच!

मुक्ती म्हणजे काय? तर स्वामीजी म्हणतात, मुक्ती म्हणजे अपूर्णता, जन्ममुत्यू, आधिव्याधि वगैरेंच्या कचाटयातून सुटका! ईश्वराची कृपा झाली तरच केवळ आत्म्याचे बंधन गळून पडू शकते. मुक्ती हेच आत्म्याचे अंतिम लक्ष्य आहे. अनंत स्वरुपावर त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आपल्या भोवतालच्या  परिवर्तनशील गोष्टी केवळ आपल्या अनुभवासाठी, आपल्या शिक्षणासाठी आहेत. ज्या पाय-यांनी आत्म्याचे अनंतत्व अभिव्यक्त होते, ते सारे आपले पूर्वजन्म होत. आपण जणू काही खालच्या श्रेणीचे एक शरीर घेतो आणि त्याद्वारे स्वत:ला अभिव्यक्त करायचा प्रयत्न करतो. ते शरीर अपुरे वाटले की आणखी उच्च प्रतीचे शरीर धारण करतो. मुक्तीपर्यंत त्याचा हा क्रम चालूच राहतो.

मुक्ती म्हणजे आत्म्याचे यथार्थ रुप! आत्मा स्वयंप्रकाशी आहे, स्वयंज्योती आहे. कार्य-कारण संबंध आत्म्याला स्पर्श करु शकत नाही. आणि त्या विदेह अवस्थेचे नाव आहे मुक्ती!

'आत्म्याची स्वत:च्या बंधनाविषयी जागृती व त्याचा वर उठण्याचा आणि स्वत:चा प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न याचेच नाव जीवन आहे. या संघर्षात यश येणे हाच क्रमविकास आहे”, असे स्वामीजी आपल्याला सांगतात. आत्म्याचा हा शोध तुम्ही कोठे घेणार? तुमच्या बाहेर? का म्हणून? आपण आपल्याबाहेर मुक्तावस्थेचा शोध घेणे म्हणजे एखाद्या राजाने स्वत:ला विसरुन त्या राज्याचा राजा शोधण्यासारखेच आहे. आता तो स्वत:च राजा असताना त्याला त्याच्याविना दुसरा राजा भेटणार कसा?

आपण सर्वजण नेमकी हीच चूक करत असतो. आपल्या आत दडलेल्या देवदत्त वारशाचा आपल्याला पत्ताच नाही, आणि आपण जातो आहोत या मठात अन त्या मंदिरात! या प्रवचनाला आणि त्या सत्संगाला! सतत बाहेर शोध घेणे आणि तेथे काही मिळत नाही म्हणून अस्वस्थ होणे हा माणसाचा स्वभावच बनला आहे.

मुक्ती म्हणजे काही कमावणे नाही, काही घडवायचे नाही आणि काही व्हायचे देखील नाही. फक्त आपण जे काही आहोत ते सरळपणे जाणायचे आहे. आपल्या आरशावर बरीच धूळ बसली आहे, ती पुसून टाकली की झाले काम! नवा आरसा आणायला नको की नवा चष्मा आणायला नको! आपल्याला मुक्त व्हायचे नसून आपण मुक्तच आहोत, आपण बद्ध असल्याचे सारे विचार भ्रमात्मक आहेत”, असे विवेकानंद पुन:पुन्हा सांगतात. मोक्ष प्राप्य, उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य यांपैकी काहीही नाही या शंकराचार्यांच्या मताशी ते पूर्णत: सहमत आहेत.

मुक्तीची ही भूक अजिबात कृत्रिम नाही, तर ती नैसर्गिक, अगदी जन्मजात आहे. आपल्या कोणा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की, जीवनाची नश्वरता, क्षणभंगुरता आपल्याला जाणवते. 'याचे/हिचे पुढे काय झाले असेल बरे? असा प्रश्न आपल्या मनात एकदा तरी येतोच. आपले हे स्मशानवैराग्य काही फार काळ टिकत नाही हा भाग वेगळा. पण आत्म्यासंबंधी, मुक्तीसंबंधी, मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच जीवनात कधी ना कधी वेढून टाकतात.

एका अर्थी तुमची आमची मुक्तीची कल्पना ही अमरत्वाची कल्पना असते. माणसाला सर्वात जास्त भय कशाचे वाटत असेल तर ते मृत्यूचे! मृत्यू अटळ आहे ही गोष्ट समजून उमजूनही त्याच्या सावलीत भयशंकित अवस्थेत माणसे जगतात. मृत्यू नक्की आहे पण तो येणार कधी हे अनिश्चित असल्याने असे घडत असावे. म्हणूनच मुक्तीच्या अवस्थेत मरण नाही ही कल्पना माणसाला खूप चांगली वाटते. मुक्ती म्हणजे जन्मही नाही हे तो सोयिस्करपणे विसरुन जातो.

अमरत्वात अविनाशित्वाची ग्वाही असते. माणूस स्वत:मध्ये इतका गुंतलेला असतो की, स्वत:चे अस्तित्व  रुजविण्यात त्याला फारच रस असतो. वंशसातत्याची कल्पना यातूनच इतकी प्रभावी ठरली असावी. 'जबतक सूरज चांद रहेगा ... तेरा नाम रहेगा' .... असल्या राजकीय घोषणाबाजीतही हीच मनोवृत्ती प्रकट होते. पण नामे - रुपे अमर नसतात. त्यांचा विनाश अटळ असतो ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही.

कर्म आणि पुनर्जन्माचे चक्र संपणे म्हणजे मुक्ती! जन्म मृत्यूच्या संसाराचे बंधन संपणे म्हणजे मुक्तावस्था!

मुक्तीचे स्वरुप काय आहे? तिचे लक्षण काय आहे? कशावरुन ओळखायची ही अवस्था? एखाद्याच्या बाहय अभिव्यक्तीवरुन त्याची आंतरिक अवस्था ओळखणे ही फार कठीण गोष्ट आहे. त्याला तसाच अंत:चक्षू विकसित झालेला माणूस हवा!

गीतेच्या बाराव्या अध्यायात जीवनमुक्ताचे सविस्तर वर्णन आहे. 'सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:। शीतोष्ण सुखदु:खेषु सम: सङ्गविवर्जित:।। असे अठराव्या श्लोकात सांगितले आहे. विवेकानंद म्हणतात, कशाच्या मागेही लागू नका, काही टाळण्याचाही प्रयत्न करु नका, सा-यालाच सादर असा, त्याज्य-ग्राहय भावनारहित होऊन जा,  यदृच्छालाभसंतुष्ट व्हा. जेंव्हा काही म्हणता काहीच तुम्हाला ढळवू शकणार नाही तेंव्हाच तुम्ही मुक्त झाला आहात, तुम्हाला स्वाधीनतापद लाभले आहे असे म्हणता येईल. नुसते सहन करुन चालणार नाही, अनासक्त व्हा. ही अनासक्ती हेच मुक्तीचे लक्षण!

ज्या गोष्टीची आपल्याला आवड नाही त्या गोष्टीबाबत अनासक्त होणे फारच सोपे असते कारण ते आपल्या सोयीचे असते. खूप वेळा असल्या दांभिक अनासक्तीलाच आपण खरी अनासक्ती मानण्याची चूक करत असतो. कोल्हयाला द्राक्षे आंबट असाच प्रकार म्हणायचा हा! ज्या गोष्टी आपल्याजवळ नाहीतच, त्यांचा आपण त्याग केला असे म्हणण्यात तरी काय अर्थ?

ब्रह्मदृष्टीखेरीज अन्य दृष्टीने जगाकडे न पाहणे हे मुक्तावस्थेचे लक्षण आहे. तशी तर एका अर्थी सर्वच माणसे ब्रह्म जाणतात, कारण प्रत्येक जण जाणतो की 'मी आहे. परंतु हा 'मी खरोखर कोण आहे हे मात्र आपण जाणत नसतो. सर्व भ्रमांतून, त्यांच्या तावडीतून सुटका होणे म्हणजेच मुक्ती!

या भ्रमाचे, भासाचे कारण तरी कायविवेकानंद म्हणतात, हे जग आपल्या भोगासाठीच उत्पन्न झाले आहे ही पराकाष्ठेची ओंगळ धारणाच आपल्याला बद्ध करुन ठेवते. तीच अध:पाताचे मूळ होय. हे जग आपल्यासाठी नाही. प्रतिवर्षी लक्षावधी, कोटयवधी लोक या जगातून निघून जातात, जगाचे तिकडे लक्षदेखील नसते. त्यांच्या जागी दुसरे लक्षावधी पुरवले जात आहेत.


आपल्यापैकी प्रत्येकाच्या ठायी मुक्तीची प्रेरणा आहे हे विशेष! आपला अंतरात्मा मुक्त आहे आणि तोच आपल्या ठायी मुक्तीची प्रेरणा निर्माण करतो असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे 'मुक्तीचा अधिकारी कोण? असा प्रश्नच उदभवत नाही. मुक्तीसाठी वेदाध्ययन केलेच पाहिजे अशी आवश्यकता नाही. मुक्तीसाठी अमुक एका विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडाची आवश्यकता नाही. योग, ध्यानधारणा, प्राणायामाचीही आवश्यकता नाही. यांपैकी काही केले तर ते वाया जाणार नाही, किंबहुना मुक्तीच्या मार्गावर चालण्याचे बळ त्यातून मिळेल. पण ही सारी साधने मुक्तीची अपरिहार्य अट नाही. 

क्रमश: 

Saturday, December 7, 2013

१८१. शोध स्वत्वाचा ....

१९६७ ची गोष्ट.
एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार.
मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत.
लग्न होतं.

पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा  तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं.
पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी.
कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही.
कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ...

तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.
तोवर मुलीच्या गर्भात बाळ रुजतं; ते जन्माला येतं.
आपल्या विधवा आईला अजून दोन लहान बहिणींची लग्न करायची आहेत; त्यांची आयुष्यं आपल्यामुळे बिघडायला नकोत म्हणून ही मुंबईला परत येते.

मुलगी विचारांत पडते. मुलगी दैवाला दोष देते. वेदनांना मुरड घालायचा प्रयत्न करते. संसार सुखाचा असल्याची बतावणी पुरेपूर निभावते.

पण मुलगी गोंधळलेली आहे. मारहाण झाली की नव-याचा “प्रेमाचा अंक” चालू होते.
आणखी दोन मुली जन्माला येतात.

घरात कधी खाण्याची चंगळ तर कधी उपासमार. हिच्या हातात पैसा नाही, या शहरात तिला कुणी मैत्रिणी नाहीत. नातेवाईक आहेत काही, पण घराची लाज कुठे उघडी करायची त्यांच्यासमोर?

मुलगी सोसत राहते. तिच्या शरीराला जखमा होतच आहेत, मन मोडून गेलंय तिचं. ती जीव संपवत नाही फक्त मुलांकरता.

घर सोडून जायचं आणि परत यायचं – असं अनेकदा घडतं. कधी मुलांसह घर सोडायचं तर कधी मुलांविना.
अशा परिस्थितीत सुरु होतो एक शोध – स्वत्वाचा शोध ....

*****
२०१३ ...
या आहेत  फ्लेविया अ‍ग्नेस.
‘मजलिस’च्या संथापिका आणि संचालिका.

काय आहे 'मजलिस'?
शब्दश: बघितलं तर  “एकत्र येणं” – सल्लामसलतीसाठी एकत्र येणं.

ही आहे स्त्रियांच्या हक्कासाठी कार्यरत असणारी एक संस्था. स्त्रीविषयक कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणणं, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित स्त्रियांना कायद्याची लढाई लढून त्यांचे अधिकार मिळवून देण्यात मदत करणं, कायदेविषयक साक्षरता वाढवणं..... अशी अनेक कामं! 'मजलिस'कडे वकिलांची एक फौज आहे – आणि या सर्व वकील स्त्रिया कोर्टात पीडित स्त्रियांच्या अधिकाराची लढाई त्यांच्या वतीने लढत आहेत.

‘मजलिस’चं कार्यालय मुंबईत असलं तरी पूर्ण महाराष्ट्रात त्यांच नेटवर्क आहे. जिल्हा न्यायालयांत स्त्रियांच्या बाजूने लढणा-या वकिलांना – ज्यात स्त्रिया जास्त असतात; पण पुरुषही असतात – प्रशिक्षण तर दिलं जातंच; पण त्यातल्या निवडक १५ लोकांना (प्रामुख्याने स्त्रिया) वर्षभराची फेलोशिपही दिली जाते. हा कार्यक्रम २००३ पासून चालू आहे. अशा संवेदनशील आणि जाणकार स्त्रिया वकील जिल्ह्याच्या स्तरावर असण्याचा पीडित स्त्रियांना फायदा होतो. जात –धर्म- वय- शिक्षण  अशा भेदांचा विचार न करता स्त्रियांना मदत केली जाते.

 “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण  कायदा २००५” च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य शासनासोबत “मोहीम” (Monitoring of  Himsa (PWDV Act) in Maharashtra) चालवली जात आहे. लैगिक छळ/शोषण अशा घटनांनी ग्रस्त असणा-या स्त्रियांसाठी सामाजिक आणि कायद्याच्या मदतीचा “राहत” कार्यक्रम “महिला आणि बालक विकास” मंत्रालयाच्या सोबतीने चालू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहरात हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

१९८० च्या आसपास फ्लेविया अ‍ग्नेस ही एक “पीडित महिला” होती. आज फ्लेविया अ‍ॅग्नेस स्त्रियांचे हक्क जपणारी कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यक्षेत्रातलं एक सर्वार्थाने मोठं नाव आहे. अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न झालं होतं फ्लेवियाचं. प्रतिकूल परिस्थितीत, कष्टाने, जिद्दीने त्यांनी कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि एम. फिल. देखील केलं आहे.

१९८५ मध्ये फ्लेविया अ‍ग्नेस यांचं छोटेखानी आत्मकथन प्रसिद्ध झालं ते इंग्रजी भाषेत. १९८५ मध्येच श्री प्रकाश बुराटे यांनी त्याचा “अंधारातून प्रकाशाकडे” या नावाने केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. आठ अन्य भाषांतही हे पुस्तक आता उपलब्ध आहे.



“ हे खरंय की या पुस्तकामुळं कौटुंबिक हिंसेमुळे होरपळणा-या स्त्रियांचा संघर्ष कमी तीव्र किंवा कमी वेदनादायक होत नाही. प्रत्येक महिलेला आयुष्याच्या संघर्षाचे परिणाम स्वत:च भोगावे लागतात, स्वत:च वेदनेची ओझी वाहावी लागतात. परंतु या पुस्तकामुळं त्यांना नवीन जीवन उभारणं शक्य कोटीतलं वाटतं, त्यांची जिद्द जिवंत राहते आणि आशेचा किरण दिसत राहतो ..."  हे फ्लेविया यांचे प्रस्तावनेतले उद्गार हे आत्मकथनाचा संदर्भ आजही किती महत्त्वाचा आहे हेच सांगून जातात.

*****

मी अनेक वर्षापासून फ्लेविया अ‍ग्नेस यांचं नाव ऐकत आले आहे; त्यांचे लेख वाचले आहेत अनेकदा. त्यांची पुस्तकं सगळी नाही; पण दोन वाचली आहेत. स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रीविषयक कायदे या क्षेत्रातलं त्यांच योगदान नावाजलेलं आणि महत्त्वाचं आहे ते केवळ त्या पीडित स्त्री आहेत म्हणून नाहीत तर पीडित स्त्रियांबाबत त्यांनी केलेल्या कामामुळे.  ‘मजलिस’च्या  एका कार्यक्रमात सामील झाल्यामुळे मला त्यांची आणि त्यांच्या कामाचीही जवळून ओळख झाली.

‘मजलिस’चे काही मुद्दे मला “अनपेक्षित” होते. उदाहरणार्थ “समान नागरी कायद्या”ला असणारा त्यांचा विरोध. त्यामागची त्यांची भूमिका “भावनिक” नसणार हे माहिती असल्याने मी त्यांचा “विचार” समजून घेण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. माझे अनेक विचार मी बदलायची गरज कदाचित असेलही!

एका व्यक्तीचा 'स्वत्वाचा शोध' किती अनेकांना  उपयोगी पडतो याचा अनुभव  फ्लेविया यांना भेटल्यावर मला आला असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

Thursday, November 21, 2013

१८०. गपचिप

आमची आई येकदम वाईट.
च्या काय देत नाही कदी.
ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई.
आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”

त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं.
मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.”
आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी!

पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता.
म्या पिऊन टाकला तो गपचिप.
येकदम झ्याक.

तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ...
प्या च्या.....

पावणे नाय आले तर?
म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान.
आई करतेच च्या.
म्याबी पिते.
उलिसा.

गपचिप. 

शतशब्दकथा

Thursday, October 31, 2013

१७९. विवेकानंदांचा वेदान्त विचारः भाग १६: आत्मविचार (२)

माणसाचे ईश्वरत्व

आपली माणसांची मने गंमतीदार आहेत.'आपण अमर आहोत’ असे म्हटले की, माणसांना वाटते की आपण याच शरीरासह, याच नात्यांसह, याच स्वप्नांसह अमर राहणार आहोत. या सा-या गोष्टी मिथ्या आहेत याची जाणीवच आपल्याला नसते. सामान्यत: माणूस 'मी शरीर आहे’ याच्या पलिकडे जाऊन विचारच करु शकत नाही याची विवेकानंदांना जाणीव आहे. 'नित्यता कोठे वसते? या प्रश्नाचे ते दोनच शब्दांत उत्तर देतात: 'स्वाधीनतेच्या भावनेत’. 

स्वामीजी सांगतात, “मनुष्याची स्वाधीनता त्याच्या मनामुळे नसते, कारण ते बद्ध आहे. त्याच्या ठायी स्वाधीनता नाही. मनुष्य म्हणजे मन नव्हे. तो आत्मा होय. आत्मा हा नेहमी मुक्त, अनंत, शाश्वत आहे. या आत्म्यातच मनुष्याची स्वाधीनता आहे. आत्मा सदैव स्वाधीन आहे.”

आपल्या या स्वाधीनतेचा, या मुक्ततेचा एक अगदी साधा पुरावा आहे. जरी ही मुक्तीची अवस्था तर्काने जाणणे शक्य नाही, तरीही उदाहरण म्हणून याचा विचार केल्यास आपले तार्किक समाधान होऊ शकेल. आपण स्वत:बद्दलच्या अनेक कल्पना करु शकतो. या कल्पना कधी खूप चांगल्या असतात, कधी कधी खूप सामान्य असतात तर क्वचित कधी (की बरेच वेळा?) खूप वाईटही असतात. पण एक चित्र तुम्ही नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणालाही ते जमणार नाही - ते म्हणजे स्वत:च्या विनाशाचे चित्र समोर आणण्याचा प्रयत्न करा! स्वामीजी म्हणतात, “माझ्या स्वत:च्या विनाशाची नुसती कल्पना करावयाची झाल्यास, मला तिच्यापासून दूर उभे राहून साक्षी या नात्याने तिचे अवलोकन करावे लागेल. म्हणजे आपला विनाश पाहण्यासाठीही आपल्यातले काहीतरी मागे राहावेच लागते. आपल्या नाशाची  पूर्ण कल्पना आपल्याला कधीही करता येणार नाही. कारण माणसाच्या जाणीवेच्या प्रांतातील ही अगदी अशक्यप्राय घटना आहे.”

त्याचबरोबर  दुसरे असे की, माणसाला नेहमी दिव्यभव्यतेची एक उपजत आकांक्षा असते. आकाश, सागर, पाऊस, निसर्ग या गोष्टींचे मानवाला जणू जन्मत:च एक प्रकारचे वेड असते. माणूस व्यवहारात अगदी साध्या गोष्टी करत असतो. पण उच्च ध्येयाने झपाटलेली माणसे मात्र खडतर, हालअपेष्टांचे जीवन जगतानाही सुखात असतात. या ठिकाणी कविवर्य बोरकरांच्या एका कवितेच्या ओळी मला आठवतात – (संदर्भ मात्र नेमका आठवत नाही) - ते म्हणतात,
चालले हे उंट कोठे तप्त रेताडातुनी
स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी कोठुनी? 
का निघाले टाकुनी हे बायकापोरे घरे?
ना जरी वाटेत कोठे पान, पाणी, पाखरे?
पाणियाला पाठमोरी कोणती यांची तृषा?
आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा?

मानव असा पुढेच जातो. यशाकडे, सुखाकडे पाठ फिरवून वाटचाल करण्याची ही प्रेरणा माणसाला कोठून मिळते? तर ती त्याच्या आत्म्याची हाक असते. ही साद येते याचा अर्थच असा की, अंतर्यामी काही शक्ती विराजमान आहे. गांधीजींचा 'आतला आवाज’, अरविंदांचा 'दैवी आदेश’ या गोष्टी महापुरुषांच्या जीवनातच केवळ घडतात असे समजून आपण त्याला दैवी चमत्काराचे रुप देण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात असे प्रसंग, अशा घटना घडतात. आपण त्याला सहजप्रवृत्ती instinct म्हणतो. त्यावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ती खरोखर आत्म्याची साद असते. दिव्यत्वाची, नि:स्वार्थीपणाची उपजत प्रवृत्ती आपल्याला आपल्यातील ईश्वरत्वाची ग्वाहीच देत असते. 

स्वामीजी म्हणतात, “आपण स्वत: एक फार मोठे रहस्य आहोत. मी म्हणजे एक लांबच लांब शृंखला आहे की काय कोण जाणे! .... सतत प्रवाही अशी जाणीव म्हणजेच 'मी’ की काय? की मी त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे? ... आत्मा म्हणजेच जाणिवेच्या असंबद्ध अशा अवस्थाचा समुदाय आहे की तो एकरस पदार्थ आहे? .....”

आपण पापी आहोत ही कल्पनाच चुकीची आहे. जर आपण वस्तुत: पापी असू तर मग आपल्याला उत्थानाची आशाच नको!  कशाला हवेत मग तुमचे ते सामाजिक नियम अन सामाजिक नीतिमत्ता? 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ हा चार्वाकमार्गच मग अनुकरणीय नव्हे काय?

केवळ सामाजिक नीतिमत्ता शिकावी या सद्हेतूने विवेकानंद माणसाच्या ईश्वरत्वासंबंधी बोलतात असा अपसमज कोणी करुन घेऊ नये. आधी माणसांना वाटेल ते पाप करु देणारा आणि मग शेवटच्या दिवशी त्यांचा न्यायनिवाडा करणारा ईश्वर विवेकानंदांना बालीश वाटतो. “पावित्र्य हेच आपले खरे स्वरुप आहे, म्हणून आपण पुन्हा पवित्र होऊ शकतो.” असा त्यांचा विश्वास आहे. धर्म हा त्या पूर्वस्थितीकडे जाण्याचा एक मार्ग होय. एखादा हिरा धुळीत पडलेला असतो. पण म्हणून जाणकार व्यक्ती काही तो हिरा कच-याच्या पेटीत फेकून देत नाही. धूळ झटकली की झाले! तद्वतच एखादा माणूस सध्या काही दुष्कृत्ये करत असेल तर तो काही चिरंतन काळापर्यंत, शाश्वत रुपाने पापी ठरत नाही. त्याचे अज्ञान दूर करा, की तो आत्मस्वरुपात, तेजस्वी रुपात प्रकट होईल. आपण मेंढरे नाही तर सिंहाचे छावे आहोत. माणसाच्या दुबळेपणातून धर्माचा उगम झाला आहे असे म्हणणे म्हणजे माणसाच्या आत्मिक शक्तीवर अविश्वास ठेवण्यासारखेच आहे! विवेकानंदांना ते मान्य नाही. 

आज माणूस स्वत:ला दुबळा समजतो आहे. पण त्याने जर मानवी जीवनाकडे नीटपणे पाहिले, नुसते डोळेच नव्हे तर मनही उघडे ठेवून पाहिले, तर त्याच्या लक्षात येईल की, “आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया, मग ती अत्यंत स्थूल वा भौतिक स्वरुपाची असो, किंवा अत्यंत सूक्ष्म, उच्च वा आध्यात्मिक स्वरुपाची असो, ती आपल्याला त्या एकाच ध्येयाकडे नेणारी असते. ते ध्येय म्हणजे एकत्वाचा शोध होय.” माणसाची ही सारी गती भेदाकडून अभेदाकडे चालली आहे. विज्ञानशाखा, मानववंशशास्त्र, सामाजिक शास्त्रे, भाषाशास्त्र .......... या सा-या  गोष्टींनी भेदांवर भर देत त्यांच्या कार्याला सुरुवात केली होती. आज ते सारे अभेदाचाच संदेश देत आहेत, निदान एकमेकांशी असलेले नाते तरी नक्कीच सांगत आहेत. 

मग माणसाच्या, इतिहासाच्या, समाजाच्या या विविध अवस्थांना काय म्हणायचे? त्यापैकी कुठली अवस्था नेमकी अंतिम सत्याची समजायची? कुठल्या अवस्था असत्य आहेत म्हणून त्यांचा त्याग करायचा? काय सांगतात विवेकानंद याबाबत? 

असे म्हणता येईल की, विवेकानंदांचा एका अर्थी क्रांतीवर विश्वास नव्हता. एका छान सकाळी जगात सारे काही आलबेल असेल असे मानणे हा एक भाबडा आशावाद आहे. सत्य हे उत्क्रान्त होत असते. ते हळूहळू अधिकाधिक अभिव्यक्त होत आहे. दिसत असणा-या  सा-या च अवस्था सत्याच्या आहेत. विवेकानंद या ठिकाणी जे उदाहरण देतात, ते वाचताना त्यांच्या वैज्ञानिक दृषिटकोनाबाबत आपल्याला आदर वाटल्यावाचून राहत नाही. ते म्हणतात, “एकाच गोष्टीकडे पाहण्याचे जवळजवळ विरोधी असे दृष्टिकोन असू शकतात. पण ते सर्व ती एकच गोष्ट अभिव्यक्त करत असतात. आपण अशी कल्पना करा की, कोणी एक मनुष्य सूर्याकडे प्रवास करीत आहे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर तो सूर्याचा फोटो घेत आहे असे समजा. प्रवासातून तो परत आल्यावर त्याच्याजवळचे सूर्याचे अनेक फोटो तो आपल्यासमोर ठेवतो. त्यापैकी कोणतेही दोन फोटो सारखे नाहीत हे आपल्याला दिसते. तथापि हे सर्व फोटो त्या एकाच सूर्याचे, पण निरनिराळया स्थानांतून घेतलेले आहेत हे कोणाला नाकारता येईल?”

ईश्वर सर्व माणसांमध्ये सारख्याच प्रमाणात का बरे अभिव्यक्त नाही याचे हेच अगदी स्पष्ट आणि शास्त्रीय उत्तर आहे. आपण जे जग पाहतो ते आपल्या चष्म्यातून पाहतो. एका विशिष्ट प्रकारच्या मानसिक भूमिकेवरुन आपण हे जग आता पाहत आहोत म्हणून ते आपल्याला तसे दिसते आहे. जर आपण सर्वत्र ईश्वराला पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वत्र ईश्वरच दिसेल. 'तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति’ असा साक्षात भगवंतांचा दृष्टान्त आहे.

मानवजात आपले हे मूळचे स्वरुप विसरलेली नाही याची विवेकानंदांना खात्री आहे. यातच त्यांची मानवी भवितव्याविषयीची आशाही एकवटलेली आहे. ते म्हणतात, “आतापर्यंत असा एकही मानववंश निर्माण झाला नाही की, ज्याने कोणत्या ना कोणत्या धर्माचे अनुसरण केले नाही आणि ईश्वराची किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या देवदेवतांची उपासना केली नाही. ईश्वर किंवा देवदेवता आहेत की नाही हा प्रश्न नाही. पण या मानसशास्त्रीय घटनेचे विश्लेषण काय दर्शविते? सर्व जग जणू ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे .... तो का? कारण जरी आपण बंधनात आहोत, जरी प्रकृती आणि तिचे शक्तीशाली नियम आपल्याला भरडून टाकत आहेत, जरी ते आपल्याला इकडेतिकडे थोडेदेखील हलू देत नाहीत, जरी प्रकृतीचे सर्वव्यापी नियम आपल्या मार्गामध्ये, आपल्या कार्यामध्ये भयंकर अडथळे निर्माण करतात, तरी आपला आत्मा स्वत:चे मूल स्वरुप कधीही विसरत नाही. आणि ते शोधण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो.....”

अर्थात हा शोधाचा, स्व-शोधाचा, आत्मशोधाचा प्रवास सरळ रेषेत कधीही होत नाही. पण आत्मा मुळात सच्चिदानंद स्वरुप असल्याने कोणाचाही नाश होणार नाही. पुन्हा उत्थानाची उषा उजाडणारच नाही इतक्या अवनत स्थितीला कोणी कधीच जाणार नाही. एका अर्थी माणसाची, जीवाची ही गती वर्तुळाकार आहे. आपण सारे एकाच केंद्रापासून म्हणजे अर्थातच ईश्वरापासून निघालो आहोत. अगदी नीचातला नीच प्रतीची जीवसुद्धा ईश्वरापासून निघाला आहे याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे. जो माणूस दगडातही देव पाहतो त्याला माणसातले सुप्त देवत्व पाहणे अजिबात कठीण जाऊ नये. जीवामधील ईश्वत्वाच्या विचारांचे दूरगामी पडसाद भारताच्या भावी काळातील क्षेत्रात  उमटलेले आपल्याला दिसून येतील. “मानवसेवा हीच माधवसेवा” या स्वामीजींच्या उदगारांच्या अनुषंगाने देशात एक नवेच वारे गेल्या शतकात वाहत राहिले आहे. मरगळलेल्या देशात या नवचेतनेने जणू नवीन प्राणच फुंकले आहेत.

स्वामीजी निर्गुण आणि सगुण (ईश्वर) अशी ब्रह्माची दोन्ही रुपे स्वीकारतात हे आपण यापूर्वी पाहिले आहेच. “आत्मा हाच ब्रह्म” अशीही त्यांची स्पष्ट धारणा आहे, ती ते कशा पद्धतीने मांडतात याचा आपण आता मागोवा घेऊ.

ब्रह्मैव आत्मा

प्रत्येक जीव हा ईश्वरस्वरुप आहे हे स्वामीजींचे मत आपण याआधीच पाहिले आहे. “सर्व व्यक्तित्वांची समष्टि म्हणजे ईश्वर. परंतु ईश्वरही एक व्यक्ती आहे. जसे शरीर हे सर्व विभिन्न पेशींची समष्टि असूनही ते एक वस्तू आहे, तसेच ईश्वराचे आहे. समष्टि म्हणजे ईश्वर व व्यष्टि म्हणजे जीवात्मा. म्हणूनच ज्याप्रमाणे पेशींच्या अस्तित्वावर शरीर व शरीराच्या अस्तित्वावर पेशी अवलंबून असतात, त्याचप्रमाणे जीवात्म्यांच्या अस्तित्वावर ईश्वराचे व ईश्वराच्या अस्तित्वावर जीवात्म्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. जीव व ईश्वर हे दोन्ही बरोबरच अस्तित्वात असतात. त्यांच्यापैकी एकजण जोवर अस्तित्वात आहे तोवर दुस-या चे अस्तित्व असलेच पाहिजे” असे विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे. 

या ठिकाणी जीव व आत्मा यातील फरक नीटसा स्पष्ट होत नाही. पण आणखी एके ठिकाणी विवेकानंद देह म्हणजे प्रातिभासिक आत्मा असे म्हणतात. तसेच इच्छाशक्ती + जाणीव + इंद्रिये + वासना + कामक्रोधादि षडरिपु म्हणजे जीवात्मा (मायेच्या उपाधिद्वारा बद्ध असे परब्रह्म) आणि तिसरा नित्यमुक्त आत्मा अशी विभागणी करतात. त्यावरुन असे म्हणता येते की शंकराचार्यांप्रमाणेच विवेकानंदही आत्मा व जीव यात भेद करतात. 

आत्म्याच्या स्वरुपाविषयी वेगवेगळी मते आहेत. उपनिषदांत म्हटले आहे की, “आत्माच ब्रह्म आहे”. जे काही आहे ते सर्व आत्माच आहे. तो एकच आत्मा विविध रुपांनी प्रकट होतो. बौद्धांच्या मते आत्मा वगैरे काही नाही. जाणीवसुद्धा सतत बदलत असते. 'स्व’ची कल्पनाच मुळी भासमय आहे. ईश्वरापेक्षा भिन्न स्वरुपाचे असंख्य आत्मे असून ते त्यापासून रुप इत्यादीबाबत सर्व बाबतीत सर्वदा पृथक् असतात असे द्वैत तत्त्वज्ञान सांगते. तर विशिष्टाद्वैताच्या मते आपला आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे. याबाबत विवेकानंदांना वाटते की, - “मी अनंताचे स्फुल्लिंग आहे वगैरे काव्यात्मक भाषा, भाषा म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही अनंताचे विभाजन कसे करणार?” - हा प्रश्न मनात उदभवतोच. संपूर्ण ब्रह्म आपणच आहोत हा शंकराचार्यांचा सिद्धान्त विवेकानंदांना जास्त आपलासा आणि तर्कशुद्ध वाटतो. 

हा आत्मा आहे तरी काय? आत्मा म्हणजे सूक्ष्म शरीर नव्हे. सर्व शरीरे ही सूक्ष्म किंवा स्थूल अशा जडद्रव्यांचीच बनली असली पाहिजेत. जडद्रव्ये म्हटली की, त्याला रुप आणि आकार आले म्हणजे पर्यायाने मर्यादा आली. शिवाय प्रत्येक जड वस्तू परिवर्तनशील असते. म्हणून आत्मा म्हणजे कोणत्याही प्रकारचे शरीर नव्हे.

स्वामीजींच्या मते “आत्मा हे असे एक वर्तुळ आहे की, ज्याचा परीघ कोठेच नाही परंतु ज्याचा मध्यबिंदू शरीरात आहे.” हा आत्मा (वास्तविक 'हा’ शब्द येथे अयोग्यच आहे) अनंत आहे. आत्मा कोठल्याही घटकद्रव्यांचा बनलेला नसल्याने तो अविनाशी आहे. तो अखंड आणि एकरस आहे. तो अनादि आणि अनंत आहे. भगवदगीतेतील दुस-या  अध्यायात आत्म्याचे वर्णन करणारी जी विशेषणे आली आहेत - अजर, अमर, अविनाशी, अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य - अशा सर्व शब्दांचा वापर विवेकानंदही आत्म्याचे वर्णन करताना करतात. आत्मा अवकाशापलिकडे आहे. आत्मा देश व काल यांनी मर्यादित नाही. म्हणजेच आत्मा सर्वव्यापी आहे. आत्मा स्थिर , अपरिवर्तनीय, अचल आणि नित्य असल्याकारणाने तो ब्रह्म होय. आत्मपद हे अभयपद आहे. आत्म्याचे स्वरुप मुक्त होय. मुक्ती म्हणजे आत्मरतीची चिरंतन अवस्था. आत्म्याचे भाग करता येत नाहीत, विभाजन करता येत नाही. विद्या व अविद्या किंवा ज्ञान व अज्ञान ही दोन्ही आहेत, जग या दोहोंचे आहे. परंतु आत्म्यावर अविदयेचा कधीही  परिणाम होत नाही, तो अविदयेने कधीही झाकला जात नाही. 

या आत्मस्वरुपाची कल्पना आपल्या सीमित मनाने व या बुद्धीने करता येणे अशक्य आहे हे विवेकानंदांनाही माहिती आहे. पण आत्म्याचे असे सगुण रुपात, शब्दांत वर्णन केल्याशिवाय लोकांना त्याचे आकलन तरी कसे होणार, हा त्यांच्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

ते म्हणतात, “आत्म्याचे ज्ञान होणे शक्य नसते. कल्पनेचा अमर्यादपणा हाच त्याच्या अस्तित्वाचा आधार आहे. उदाहरणार्थ, माझ्या आत्म्याव्यतिरिक्त दुसरे काहीही माझ्या ठायी निश्चितपणे अस्तित्वात नाही. आणि तरीही त्या आत्म्याची मी शरीर वा मन, सुखी वा दु:खी, स्त्री वा पुरुष अशा रुपांतच कल्पना करु शकतो. आत्मा जसा आहे त्याच स्वरुपात त्याची कल्पना करण्याचा मी प्रयत्न करतो. पण त्याला खालच्या पातळीवर ओढून आणल्याशिवाय मला त्याची कल्पनाच करता येत नाही असे मला आढळून येते. तरीही आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल मला खात्री असते.”

आता प्रश्न असा पडतो की, आत्म्याची उत्पत्ती झाली कोठून? आत्मा शून्यापासून निर्माण झाला असे विधान आपल्याला करता येत नाही. कारण शून्यातून इतके शक्तिमान, सामर्थ्यवान असे काही कसे निर्माण होईल? शिवाय ते कसे निर्माण झाले, त्याची प्रक्रिया काय आणि ते कोणी निर्माण केले व कोणत्या उददेशाने - अशी प्रश्नांची साखळी मग या मार्गाने वाढतच जाते. शिवाय यातून अटळ नियतीवाद व क्रूर ईश्वर अशा दोन वेगळयाच व पूर्णत: विसंगत तत्त्वांची प्रस्थापना होते. 

या ठिकाणी पुनर्जन्माचे तत्त्व महत्त्वाचे ठरते. न्यायमतानेही असे म्हटले आहे की, 'आपली कर्मे जरी आपल्याला लुप्त झाल्यासारखी वाटतात, तरी ती 'अदृष्ट’ अवस्थेत विद्यमान असतात. आणि ‘प्रवृत्तीच्या’ रुपात ती पुन्हा प्रकट होतात.’ या अनुषंगाने विवेकानंदांच्या वेदान्तविचारांत कर्मसिद्धान्ताला महत्त्व प्राप्त होते.

आत्म्याविषयीचा आणखी एक विचार असा आहे - आत्मा जर मूलत: व स्वभावत: शुद्ध आहे व पूर्ण आहे आणि जर प्रत्येक आत्मा अनंत व सर्वव्यापी असेल तर मग आत्मे 'पुष्कळ’ आहेत या वाक्याला काही अर्थच उरत नाही. खूप वस्तू 'अनंत असूच शकत नाहीत. 'अनंत’ अशी एकच सदवस्तू असू शकते. या ठिकाणी विवेकानंदांना मुण्डकोपनिषदातील पुढील श्लोकाची आठवण येते:
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानवृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्ति अनश्नन्नन्यो अभिचाकशिति ।।

ज्या नात्याने दोन आत्मे असूच शकत नाहीत, त्याच नात्याने आत्मा व ब्रह्म या दोन भिन्न गोष्टी असूच शकत नाहीत. आत्मा व ब्रह्म एकच होत. याबाबत चर्चा करताना श्री. लाल म्हणतात, “Like a true Vedantist, Vivekananda never hesitates in identifying the true nature of Atman with Brahman itself. His reasons for identifying the two are generally similar to the reasons given by Vedanta. The basic fact to be noted is that unless the two are identified, the strict monistic character of reality cannot be maintained. Soul cannot be said to be an aspect or part of the ONE, because in that case The ONE will become composite having parts or aspects within itself. Souls cannot be conceived also as expressions or manifestations of the Absolute, because even in that case they would become separate realities over and above the Brahman. Then there is only one way of conceiving the relation between the two that the two are basically identical and their difference is only apparent.”

या भासमान भेदामुळे मानवाच्या वास्तविक भेदरुपांत कोठलाही अडसर निर्माण होत नाही अशी विवेकानंदांची धारणा आहे. आभासवाद अथवा अवच्छेदवाद्यांपेक्षा प्रतिबिंबवादाचे उदाहरण ते आत्म्याच्या अनेकत्वाचे - म्हणजे त्याच्या भासमान अनेकत्वाचे - स्पष्टीकरणार्थ देतात. मात्र आभासवाद (फुलामुळे स्फटिक लाल दिसते) आणि अवच्छेदवाद (घटाकाश- मठाकाश) याचे खंडनही ते करत नाहीत. 

गेल्या काही वर्षात माणसाचे तांत्रिक ज्ञानच वाढले अशातला भाग नाही, तर माणसाच्या शारीरिक क्षमताही वाढल्या आहेत असे वाटते. सर्जी बुबकासारख्या अनेक खेळाडूंनी एरवी शरीराने अशक्य वाटणा-या  गोष्टी साध्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत - काही खेळाडू उत्तेजक द्रव्यांचे सेवन करुन ही प्रगती करतात हा भाग वेगळा - ! कार्ल लुईस, मॅजिक जॉन्सन, जॉन्टी -होडस यासारख्या अनेक खेळाडूंचे कौशल्य मानवी शरीरातही अमर्याद क्षमता असल्याचे आपल्याला दाखवून देते. सर्वव्यापी ब्रह्मच आपल्या अंतरी वसत असल्याची ही खूण नव्हे काय? 

आपण सर्वच वस्तुत: ब्रह्मस्वरुप असलो तरीही भौतिक स्थूल शरीराला, अन्नमय कोषाच्या विकासालाही महत्त्व देण्यास  विवेकानंद आपल्याला बजावतात. 'देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ अशीच जणू त्यांचीही भूमिका आहे. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम’ याच्याशी सुसंगत असाच विचार आहे हा! उपनिषदांनीही 'नायमात्मा बलहीनेन लभ्य:।‘ अशी गर्जना केली आहे. दुबळया शरीरातच रोग ठाण मांडून बसतो असे स्वामीजी म्हणतात. आत्म्याचा, ब्रह्माचा, मुक्तीचा विचार, त्यासाठी करावयाची साधना हे येरागबाळयाचे काम नोहे! त्यासाठी सुदृढ, बलवान, सामर्थ्यसंपन्न असे शरीर हवेच. 'तुम्ही फुटबाल खेळून आधी शरीर सामर्थ्यवान बनवा. मगच भगवान श्रीकृष्णांचा तेजोमय संदेश समजण्याची पात्रता तुमच्यात येईल” अशा आशयाचा उपदेश स्वामीजी तरुणांना करतात तो याच विचारांनी! 

हे आत्मरत होणे, ब्रह्मरत होणे म्हणजेच मुक्त होणे. या अवस्थेचे विवेकानंदकृत वर्णन आणि मोक्षमार्गाचे त्यांनी केलेले विवेचन आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत. 

क्रमशः