ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, December 29, 2013

१८३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १८: मोक्षविचार (भाग २)



'मी आणि माझे हेच सा-या दु:खाचे मूळ होय. मालकीच्या भावनेतून स्वार्थ उदभवत असतो आणि हा स्वार्थीपणा दु:खाला जन्म देतो. स्वार्थीपणाची प्रत्येक क्रिया, स्वार्थीपणाचा प्रत्येक विचार आपल्यात त्या त्या वस्तूविषयी आसक्ती उत्पन्न करतो आणि लगेच आपण त्या वस्तूचे गुलाम बनून जातो. पण ज्याच्या मनात मुक्तीची इच्छा निर्माण झाली आहे तो या गुलामीत अडकणारच नाही.

ही मुक्ती मिळणार कोठे?  The Song of Sanyasin या त्यांच्या कवितेत स्वामीजी म्हणतात,
तू कुठे शोधिसी? नाही कधी मित्र रे,
मुक्तता लब्ध ही मर्त्य लोकी।
अन्य लोकांतही ग्रंथी की मंदिरी,
शोध तुझा असे हा व्यर्थ की।।

आत्मशोधाच्या विविध अवस्था आहेत. त्यातील टप्पे विभिन्न आहेत. त्यात खरे-खोटे, चांगले-वाईट काही नाही. मुक्तीचा शोध हा सर्व धर्मांचा प्रयत्न आहे. निसर्गाचे नियम मोडू शकेल अशा कोणत्यातरी 'आदर्शाच्या शोधात मानवजात नेहमी आहे. आपले देव बघा! हवेतून उडतात, पाण्यावर चालतात, वाघ-सिंह-सर्पावर बसतात. त्यांनी मनात आणले तर ते भूक नियंत्रित करु शकतात. माणसाला जे जे काही अशक्य आहे ते ते सारे त्याचे देव करतात. पण आत्म्याचा हा शोध काहीही झाले तरी ठरतो मात्र बाहेरचाच! कारण आपण पूर्ण मुक्त होऊ शकणार नाही असेच तेंव्हा माणसाला वाटत होते.

नंतर हळूहळू त्याला असे वाटू लागले की, या देवता भिन्न नसून त्यांच्यात एकत्व आहे, आणि या देवत्वाशी सर्व माणसांचे अगदी जवळचे नाते आहे. या देवता म्हणजे त्याचे स्वत:चेच प्रतिबिंब, हेही नंतर त्याच्या ध्यानात आले. त्यातूनच अंतरात्म्याची कल्पना त्याच्या हृदयात उगम पावली. जो अनंत परमात्मा आहे तोच सान्त जीवात्मा आहे असे ज्ञान होणे हा या शोधाचा सर्वोच्च आणि अंतिम टप्पा होय. पण त्यामुळे इतर टप्पे कनिष्ठ दर्जाचे अथवा खोटे ठरत नाहीत, हे विवेकानंदांचे म्हणणे आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवे. सर्वांना मुक्तीची आशा आहे. सर्वजण या प्रवासाच्या कोठल्या ना कोठल्या वळणावर आहेत. त्यामुळे कोणीही निराश व्हायचे कारण नाही, खचून जायचे तर अजिबात कारण नाही. प्रत्येकाने प्रवासास प्रारंभ केलेला आहेच. मुक्कामी कोणी आज पोहोचेल, कोणी उद्या, कोणी कालांतराने - पण पोहोचणार तर  प्रत्येकजणच आहे. 'आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति  सागरम् - आकाशातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जसा अंती सागरालाच जाऊन मिळणार आहे तसा प्रत्येकच जीव मुक्तावस्थेला पोहोचणार आहे. मुक्तीच्या या परिक्रमेची गती वाढविणे नक्कीच त्या त्या जीवाच्या हाती आहे.

विवेकानंद म्हणतात, जाणता किंवा अजाणता या मुक्तीचा शोध घेणे म्हणजेच प्रत्येक मनुष्याचे जीवन होय..... ज्ञानी मनुष्य जाणीवपूर्वक याचा शोध घेतो तर अज्ञानी मनुष्य अजाणताच शोध घेतो. एखाद्या सूक्ष्म अणूपासून ते एखाद्या विशाल ता-यापर्यंत प्रत्येकाची मुक्त होण्याची धडपड चालू असते.  ज्ञान हे आपले अंतिम लक्ष्य नाही तर मुक्ती हे आपले अंतिम लक्ष्य आहे याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे.

काहीजणांना वाटते की, आपण काहीही केले तरी आपण मुक्त होणारच आहोत. विवेकानंदांच्या वेदान्तानुसार सर्वांना मुक्ती आहे. मग आपण काही साधना केली किंवा न केली तरी काय फरक पडतो? आहे ते जीवन यथेच्छ उपभोगून घेऊ या. मुक्ती काय आहेच नंतर! कोठे जाते आहे ती?

पण आपण विसरतो की या जगात निखळ चांगली अशी गोष्टच नाही. जग हे सुखदु:खांचे मिश्रण आहे. या जगात गुंतताना आपण कर्माची शृंखला वाढवत असतो. आसक्तीने केलेले कोणत्याही प्रकारचे कर्म - मग ते चांगले असो का वाईट - आपल्याच दु:खाला कारणीभूत ठरत असते. धुळीने माखलेला चेहरा आपण धुळीनेच पुसत नाही. आसक्तीने कर्म करुन आपण मुक्तीचा मार्ग स्वत:साठी अधिकच अवघड करुन घेतो. वाटेल तसे आचरण करुन तुम्हाला मुक्तीची अपेक्षा करता येणार नाही. मुक्तीचा मार्ग प्रत्येकासाठी खुला असला तरी तो तितका सोपा नाही. या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी त्यागाची अगदी जरुरी आहे. हा त्याग बाह्यरुपाने नव्हे तर आतून हवा. जनकासारखी, श्रीकृष्णासारखी, शुकासारखी वृत्ती हवी. बाह्य पातळीवर सारे सुखोपभोग घेताना त्यांच्या मनावर कशाचाही परिणाम घडून येत नव्हता. कर्मातून अधिक कर्म निर्माण होऊ न देण्याची युक्ती ज्याला कळली तो मुक्तच आहे. 'सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा अमृतस्वरुपाच अशी भक्ती जो करु शकतो तो मुक्तच आहे. ज्याला 'नेति नेति म्हणत केवळ ब्रह्मच आकळले आहे तोही मुक्तच आहे. आणि ज्याने स्वत:च्या चित्तवृत्तींचा पूर्णत: निरोध केला आहे तोही मुक्तच आहे!

जीवन्मुक्ती आणि विदेहमुक्ती असे मुक्तीचे दोन प्रकार विवेकानंद मानतात. जीवन्मुक्त परमेश्वरी इच्छेनुसार कार्य करीत राहतो. या जगात त्याची स्वत:ची, स्वत:साठी म्हणून काहीही इच्छा नसते. या ठिकाणी श्रीमद्भगवदगीतेतील 'स्थितप्रज्ञाची वाचकांना आठवण येणे स्वाभाविक आहे. 'यदा संहरते चायं कूर्मोङानीव सर्वश:। इन्द्रियाणीनिद्रयार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।। असाच हा जीवन्मुक्त असतो.

मुक्ती म्हणजे रुक्षता, कशाबददलच काहीही न वाटणे - अशी भिती काहीजणांना वाटते - अशी  उदासीन अवस्था काय कामाची? पण विवेकानंद म्हणतात की, ही मुक्ती रुक्ष भावावस्था नसून आनंदाची सर्वोच्च स्थिती  आहे. 'आशिष्टो दृढिष्टो बलिष्ठ:। यस्येयं पृथिवी सर्वं वित्तस्य पूर्णास्यात’ अशा युवकाच्या आनंदापेक्षा हा आनंद शतपटींनी अधिक आहे. (उपनिषदांच्या नेमकया शब्दांत सांगायचे तर १0 च्या १८व्या घाताइतका मोठा आनंद!) लहान मुले जगातील प्रत्येक वस्तूचे मूल्यमापन त्या वस्तूपासून किती मिठाई मिळेल या मापदंडातून करत असतात. आपलीही मुक्तीची अपेक्षा 'इन्द्रियसुखांच्या आनंदासारखी स्थिती' अशीच असेल तर मग आपण बालिश बुद्धीचे आहोत असे समजावे.

मुक्तावस्थेचे काही लोकांना भयही वाटते. आपण ब्रह्मरुप झाल्यावर मग आपल्या व्यक्तिमत्वाचे काय होणार याची त्यांना धास्ती वाटते. 'मी मोठा झाल्यावर माझ्या बाहुल्यांचे काय होईल? - असा प्रश्न केवळ लहान मुलेच विचारतात. स्वत:ची, कुटुंबाची, गावाची, तालुक्याची, जिल्हयाची, राज्याची, देशाची, खंडाची, विश्वाची ...... अशी तुझी जाणीवेची कक्षा विस्तारत गेली तर त्यात तुझ्या व्यक्तिमत्वाचे काय बिघडले? खरोखर संकोच झाला का त्याचा?

आणि अखेर तुझे स्वतंत्र व्यकितमत्व म्हणजे तरी काय? मी-माझे म्हणत तुझ्या अहंकाराने जमवलेले, जपलेले, घटट पकडून ठेवलेले सारे संस्कारच ना? सारे आहेत का खरेच तुझे? तू तरी तुझा आहेस का? मग कसले भय? कसली भीती? मुक्तावस्थेत आपले परके असे भेदच नसतात, मग कुठला अहंकार? कुठले व्यकितमत्वदुसरे असणारच काय त्या अवस्थेत अखंड, एकरस जाणिवेशिवाय?

श्री अरविंद आणि डा राधाकृष्णन यांच्यासारखे तत्त्वचिंतक नंतरच्या काळात सर्वमुक्तीची (Masss Liberation) संकल्पना मांडतात. त्या दोघांच्या मते व्यक्तिगत मोक्ष हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय नसून सार्वजनीन मुक्ती होईपर्यंत प्रत्येक जीवाला पुन:पुन्हा जन्म घ्यावाच लागतो.

पण विवेकानंदांना हे मत मान्य असल्याचे दिसत नाही. बोधिसत्वाप्रमाणे जीवन्मुक्त इतरांसाठी काम करीत राहील. इतरांच्या मुक्तीसाठी तो त्यांना दिशा दाखवेल हे खरे. पण इतर सर्वजण मुक्त झाल्याविना त्याची मुक्ती पक्की होत नाही असे म्हणणे जरा विचित्र वाटते. ज्या भेदांवरुन आपण जीवांच्या विविध भावावस्था पाहतो ते भेदच मुळी प्रातिभासिक आहेत असे विवेकानंदांचे मत आहे. सर्व जीवांचा जर आपण विचार केला तर मग मानवप्राण्यात मनसुद्धा विकसित व्हायला नकोच होते - कारण पाषाणांमध्ये, जडद्रव्यांमध्ये चेतनेचा इवलासाही विकास दिसून येत नाही. सर्वजण मुक्त होऊ शकतात - नव्हे ते मुक्तच आहेत - अशा अर्थाने सर्वमुक्तीची कल्पना त्यांना मान्य आहे. पण समष्टि अवस्थेस व्यष्टि अवस्था बांधून ठेवणे मात्र त्यांना मान्य नाही!

क्रमश: 

Tuesday, December 24, 2013

१८२. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १७: मोक्षविचार (१)


या जगाचे वर्णन गौतम बुद्धाने दोनच शब्दांत अत्यंत समर्थपणे केले आहे. आपल्या सर्वांनाच ते एकदम मान्य होईल. बुद्ध म्हणतात, 'सर्वं दु:खम्’.  तत्त्वज्ञानाचा उदय जगाच्या या दु:खस्वरुपामुळेच झाला आहे असे काहीजण गंमतीने म्हणतात. त्यात तथ्य आहे की काय असेही कधीकधी वाटते. त्यामुळेच कदाचित सध्याच्या युगात 'गुरु होणे हा सर्वात किफायतशीर धंदा होताना दिसतो आहे.

या जगात तीन प्रकारची दु:खे आहेत असे तत्त्ववेत्ते सांगतात. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशी ती तीन प्रकारची दु:खे आहेत. सर्वसामान्यपणे लोक आधिभौतिक आणि आधिदैविक दु:खांनी व्याकूळ होऊन ईश्वराकडे वळताना दिसतात. मुक्ती म्हणजे या दोन्ही प्रकारच्या दु:खांपासून सुटका असाच त्यांचा समज असतो.

वेदान्ताचा मात्र मुक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. इतर दर्शनांची मुक्तीची संकल्पना काहीशी नकारात्मक - म्हणजे दु:खापासून सुटका - अशी आहे. वेदान्त मात्र मुक्तीकडे सकारात्मक दृष्टया बघतो. मुक्ती म्हणजे केवळ तापत्रयातून सुटका नाही तर आनंदाची, परमानंदाची साक्षात अनुभूती! विवेकानंदांच्या संपूर्ण मोक्षविचारांत हा आनंदघन स्वर लागलेला दिसतो.

आपल्या आयुष्याबददल आपल्याला अनेक प्रश्न पडतात. मानवी जीवनाचा हेतू काय असावा? - हा प्रश्न आपल्याला नेहमीच गोंधळात टाकतो. आपण इतक्या विविध साखळयांमध्ये अडकलेलो आहोत की, यातून सुटका होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मग ईश्वराने आपल्याला जन्माला घालून, आपल्याभोवती अशी परिस्थिती  निर्माण करुन आपली थटटा का केली असेल या विचारांनी आपण बेचैन होऊन जातो. 'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय हे माहिती असतानाही आपण गुंतत जातो .... गुंतत राहतो!

आपली ही असली गुंतवणूक विवेकानंदांना पूर्णत: अमान्य आहे. ते म्हणतात, प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म होय. बाहय आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करुन स्वत:चे हे अव्यक्त ब्रह्मस्वरुप व्यक्त करणेच जीवनाचे परम उदिदष्ट होय!

जार्ज विल्यम्स त्यांच्या Swami Vivekananda: Archetypal Hero or Doubting Saint? या लेखात म्हणतात, Swami Vivekananda’s Vedanta proceeded from the epistemological questions: What is by realizing which everything is realized? This question sets the goal of the belief system and directs it toward a special kind of knowledge. It affirmed that the goal is that of unity in which everything is realized.

बृहदारण्यक उपनिषदात विचारलेल्या 'येन इदं सर्वं विजानाति ते केन  विजानीयात्' या प्रश्नाचा हा नव्या युगात उमटलेला प्रतिध्वनी होता. अर्थात त्याचे उत्तरही होते, 'तद्  ब्रह्रोति असेच!

मुक्ती म्हणजे काय? तर स्वामीजी म्हणतात, मुक्ती म्हणजे अपूर्णता, जन्ममुत्यू, आधिव्याधि वगैरेंच्या कचाटयातून सुटका! ईश्वराची कृपा झाली तरच केवळ आत्म्याचे बंधन गळून पडू शकते. मुक्ती हेच आत्म्याचे अंतिम लक्ष्य आहे. अनंत स्वरुपावर त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आपल्या भोवतालच्या  परिवर्तनशील गोष्टी केवळ आपल्या अनुभवासाठी, आपल्या शिक्षणासाठी आहेत. ज्या पाय-यांनी आत्म्याचे अनंतत्व अभिव्यक्त होते, ते सारे आपले पूर्वजन्म होत. आपण जणू काही खालच्या श्रेणीचे एक शरीर घेतो आणि त्याद्वारे स्वत:ला अभिव्यक्त करायचा प्रयत्न करतो. ते शरीर अपुरे वाटले की आणखी उच्च प्रतीचे शरीर धारण करतो. मुक्तीपर्यंत त्याचा हा क्रम चालूच राहतो.

मुक्ती म्हणजे आत्म्याचे यथार्थ रुप! आत्मा स्वयंप्रकाशी आहे, स्वयंज्योती आहे. कार्य-कारण संबंध आत्म्याला स्पर्श करु शकत नाही. आणि त्या विदेह अवस्थेचे नाव आहे मुक्ती!

'आत्म्याची स्वत:च्या बंधनाविषयी जागृती व त्याचा वर उठण्याचा आणि स्वत:चा प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न याचेच नाव जीवन आहे. या संघर्षात यश येणे हाच क्रमविकास आहे”, असे स्वामीजी आपल्याला सांगतात. आत्म्याचा हा शोध तुम्ही कोठे घेणार? तुमच्या बाहेर? का म्हणून? आपण आपल्याबाहेर मुक्तावस्थेचा शोध घेणे म्हणजे एखाद्या राजाने स्वत:ला विसरुन त्या राज्याचा राजा शोधण्यासारखेच आहे. आता तो स्वत:च राजा असताना त्याला त्याच्याविना दुसरा राजा भेटणार कसा?

आपण सर्वजण नेमकी हीच चूक करत असतो. आपल्या आत दडलेल्या देवदत्त वारशाचा आपल्याला पत्ताच नाही, आणि आपण जातो आहोत या मठात अन त्या मंदिरात! या प्रवचनाला आणि त्या सत्संगाला! सतत बाहेर शोध घेणे आणि तेथे काही मिळत नाही म्हणून अस्वस्थ होणे हा माणसाचा स्वभावच बनला आहे.

मुक्ती म्हणजे काही कमावणे नाही, काही घडवायचे नाही आणि काही व्हायचे देखील नाही. फक्त आपण जे काही आहोत ते सरळपणे जाणायचे आहे. आपल्या आरशावर बरीच धूळ बसली आहे, ती पुसून टाकली की झाले काम! नवा आरसा आणायला नको की नवा चष्मा आणायला नको! आपल्याला मुक्त व्हायचे नसून आपण मुक्तच आहोत, आपण बद्ध असल्याचे सारे विचार भ्रमात्मक आहेत”, असे विवेकानंद पुन:पुन्हा सांगतात. मोक्ष प्राप्य, उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य यांपैकी काहीही नाही या शंकराचार्यांच्या मताशी ते पूर्णत: सहमत आहेत.

मुक्तीची ही भूक अजिबात कृत्रिम नाही, तर ती नैसर्गिक, अगदी जन्मजात आहे. आपल्या कोणा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की, जीवनाची नश्वरता, क्षणभंगुरता आपल्याला जाणवते. 'याचे/हिचे पुढे काय झाले असेल बरे? असा प्रश्न आपल्या मनात एकदा तरी येतोच. आपले हे स्मशानवैराग्य काही फार काळ टिकत नाही हा भाग वेगळा. पण आत्म्यासंबंधी, मुक्तीसंबंधी, मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच जीवनात कधी ना कधी वेढून टाकतात.

एका अर्थी तुमची आमची मुक्तीची कल्पना ही अमरत्वाची कल्पना असते. माणसाला सर्वात जास्त भय कशाचे वाटत असेल तर ते मृत्यूचे! मृत्यू अटळ आहे ही गोष्ट समजून उमजूनही त्याच्या सावलीत भयशंकित अवस्थेत माणसे जगतात. मृत्यू नक्की आहे पण तो येणार कधी हे अनिश्चित असल्याने असे घडत असावे. म्हणूनच मुक्तीच्या अवस्थेत मरण नाही ही कल्पना माणसाला खूप चांगली वाटते. मुक्ती म्हणजे जन्मही नाही हे तो सोयिस्करपणे विसरुन जातो.

अमरत्वात अविनाशित्वाची ग्वाही असते. माणूस स्वत:मध्ये इतका गुंतलेला असतो की, स्वत:चे अस्तित्व  रुजविण्यात त्याला फारच रस असतो. वंशसातत्याची कल्पना यातूनच इतकी प्रभावी ठरली असावी. 'जबतक सूरज चांद रहेगा ... तेरा नाम रहेगा' .... असल्या राजकीय घोषणाबाजीतही हीच मनोवृत्ती प्रकट होते. पण नामे - रुपे अमर नसतात. त्यांचा विनाश अटळ असतो ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही.

कर्म आणि पुनर्जन्माचे चक्र संपणे म्हणजे मुक्ती! जन्म मृत्यूच्या संसाराचे बंधन संपणे म्हणजे मुक्तावस्था!

मुक्तीचे स्वरुप काय आहे? तिचे लक्षण काय आहे? कशावरुन ओळखायची ही अवस्था? एखाद्याच्या बाहय अभिव्यक्तीवरुन त्याची आंतरिक अवस्था ओळखणे ही फार कठीण गोष्ट आहे. त्याला तसाच अंत:चक्षू विकसित झालेला माणूस हवा!

गीतेच्या बाराव्या अध्यायात जीवनमुक्ताचे सविस्तर वर्णन आहे. 'सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:। शीतोष्ण सुखदु:खेषु सम: सङ्गविवर्जित:।। असे अठराव्या श्लोकात सांगितले आहे. विवेकानंद म्हणतात, कशाच्या मागेही लागू नका, काही टाळण्याचाही प्रयत्न करु नका, सा-यालाच सादर असा, त्याज्य-ग्राहय भावनारहित होऊन जा,  यदृच्छालाभसंतुष्ट व्हा. जेंव्हा काही म्हणता काहीच तुम्हाला ढळवू शकणार नाही तेंव्हाच तुम्ही मुक्त झाला आहात, तुम्हाला स्वाधीनतापद लाभले आहे असे म्हणता येईल. नुसते सहन करुन चालणार नाही, अनासक्त व्हा. ही अनासक्ती हेच मुक्तीचे लक्षण!

ज्या गोष्टीची आपल्याला आवड नाही त्या गोष्टीबाबत अनासक्त होणे फारच सोपे असते कारण ते आपल्या सोयीचे असते. खूप वेळा असल्या दांभिक अनासक्तीलाच आपण खरी अनासक्ती मानण्याची चूक करत असतो. कोल्हयाला द्राक्षे आंबट असाच प्रकार म्हणायचा हा! ज्या गोष्टी आपल्याजवळ नाहीतच, त्यांचा आपण त्याग केला असे म्हणण्यात तरी काय अर्थ?

ब्रह्मदृष्टीखेरीज अन्य दृष्टीने जगाकडे न पाहणे हे मुक्तावस्थेचे लक्षण आहे. तशी तर एका अर्थी सर्वच माणसे ब्रह्म जाणतात, कारण प्रत्येक जण जाणतो की 'मी आहे. परंतु हा 'मी खरोखर कोण आहे हे मात्र आपण जाणत नसतो. सर्व भ्रमांतून, त्यांच्या तावडीतून सुटका होणे म्हणजेच मुक्ती!

या भ्रमाचे, भासाचे कारण तरी कायविवेकानंद म्हणतात, हे जग आपल्या भोगासाठीच उत्पन्न झाले आहे ही पराकाष्ठेची ओंगळ धारणाच आपल्याला बद्ध करुन ठेवते. तीच अध:पाताचे मूळ होय. हे जग आपल्यासाठी नाही. प्रतिवर्षी लक्षावधी, कोटयवधी लोक या जगातून निघून जातात, जगाचे तिकडे लक्षदेखील नसते. त्यांच्या जागी दुसरे लक्षावधी पुरवले जात आहेत.


आपल्यापैकी प्रत्येकाच्या ठायी मुक्तीची प्रेरणा आहे हे विशेष! आपला अंतरात्मा मुक्त आहे आणि तोच आपल्या ठायी मुक्तीची प्रेरणा निर्माण करतो असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे 'मुक्तीचा अधिकारी कोण? असा प्रश्नच उदभवत नाही. मुक्तीसाठी वेदाध्ययन केलेच पाहिजे अशी आवश्यकता नाही. मुक्तीसाठी अमुक एका विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडाची आवश्यकता नाही. योग, ध्यानधारणा, प्राणायामाचीही आवश्यकता नाही. यांपैकी काही केले तर ते वाया जाणार नाही, किंबहुना मुक्तीच्या मार्गावर चालण्याचे बळ त्यातून मिळेल. पण ही सारी साधने मुक्तीची अपरिहार्य अट नाही. 

क्रमश: 

Saturday, December 7, 2013

१८१. शोध स्वत्वाचा ....

१९६७ ची गोष्ट.
एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार.
मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत.
लग्न होतं.

पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा  तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं.
पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी.
कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही.
कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ...

तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.
तोवर मुलीच्या गर्भात बाळ रुजतं; ते जन्माला येतं.
आपल्या विधवा आईला अजून दोन लहान बहिणींची लग्न करायची आहेत; त्यांची आयुष्यं आपल्यामुळे बिघडायला नकोत म्हणून ही मुंबईला परत येते.

मुलगी विचारांत पडते. मुलगी दैवाला दोष देते. वेदनांना मुरड घालायचा प्रयत्न करते. संसार सुखाचा असल्याची बतावणी पुरेपूर निभावते.

पण मुलगी गोंधळलेली आहे. मारहाण झाली की नव-याचा “प्रेमाचा अंक” चालू होते.
आणखी दोन मुली जन्माला येतात.

घरात कधी खाण्याची चंगळ तर कधी उपासमार. हिच्या हातात पैसा नाही, या शहरात तिला कुणी मैत्रिणी नाहीत. नातेवाईक आहेत काही, पण घराची लाज कुठे उघडी करायची त्यांच्यासमोर?

मुलगी सोसत राहते. तिच्या शरीराला जखमा होतच आहेत, मन मोडून गेलंय तिचं. ती जीव संपवत नाही फक्त मुलांकरता.

घर सोडून जायचं आणि परत यायचं – असं अनेकदा घडतं. कधी मुलांसह घर सोडायचं तर कधी मुलांविना.
अशा परिस्थितीत सुरु होतो एक शोध – स्वत्वाचा शोध ....

*****
२०१३ ...
या आहेत  फ्लेविया अ‍ग्नेस.
‘मजलिस’च्या संथापिका आणि संचालिका.

काय आहे 'मजलिस'?
शब्दश: बघितलं तर  “एकत्र येणं” – सल्लामसलतीसाठी एकत्र येणं.

ही आहे स्त्रियांच्या हक्कासाठी कार्यरत असणारी एक संस्था. स्त्रीविषयक कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणणं, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित स्त्रियांना कायद्याची लढाई लढून त्यांचे अधिकार मिळवून देण्यात मदत करणं, कायदेविषयक साक्षरता वाढवणं..... अशी अनेक कामं! 'मजलिस'कडे वकिलांची एक फौज आहे – आणि या सर्व वकील स्त्रिया कोर्टात पीडित स्त्रियांच्या अधिकाराची लढाई त्यांच्या वतीने लढत आहेत.

‘मजलिस’चं कार्यालय मुंबईत असलं तरी पूर्ण महाराष्ट्रात त्यांच नेटवर्क आहे. जिल्हा न्यायालयांत स्त्रियांच्या बाजूने लढणा-या वकिलांना – ज्यात स्त्रिया जास्त असतात; पण पुरुषही असतात – प्रशिक्षण तर दिलं जातंच; पण त्यातल्या निवडक १५ लोकांना (प्रामुख्याने स्त्रिया) वर्षभराची फेलोशिपही दिली जाते. हा कार्यक्रम २००३ पासून चालू आहे. अशा संवेदनशील आणि जाणकार स्त्रिया वकील जिल्ह्याच्या स्तरावर असण्याचा पीडित स्त्रियांना फायदा होतो. जात –धर्म- वय- शिक्षण  अशा भेदांचा विचार न करता स्त्रियांना मदत केली जाते.

 “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण  कायदा २००५” च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य शासनासोबत “मोहीम” (Monitoring of  Himsa (PWDV Act) in Maharashtra) चालवली जात आहे. लैगिक छळ/शोषण अशा घटनांनी ग्रस्त असणा-या स्त्रियांसाठी सामाजिक आणि कायद्याच्या मदतीचा “राहत” कार्यक्रम “महिला आणि बालक विकास” मंत्रालयाच्या सोबतीने चालू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहरात हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

१९८० च्या आसपास फ्लेविया अ‍ग्नेस ही एक “पीडित महिला” होती. आज फ्लेविया अ‍ॅग्नेस स्त्रियांचे हक्क जपणारी कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यक्षेत्रातलं एक सर्वार्थाने मोठं नाव आहे. अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न झालं होतं फ्लेवियाचं. प्रतिकूल परिस्थितीत, कष्टाने, जिद्दीने त्यांनी कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि एम. फिल. देखील केलं आहे.

१९८५ मध्ये फ्लेविया अ‍ग्नेस यांचं छोटेखानी आत्मकथन प्रसिद्ध झालं ते इंग्रजी भाषेत. १९८५ मध्येच श्री प्रकाश बुराटे यांनी त्याचा “अंधारातून प्रकाशाकडे” या नावाने केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. आठ अन्य भाषांतही हे पुस्तक आता उपलब्ध आहे.



“ हे खरंय की या पुस्तकामुळं कौटुंबिक हिंसेमुळे होरपळणा-या स्त्रियांचा संघर्ष कमी तीव्र किंवा कमी वेदनादायक होत नाही. प्रत्येक महिलेला आयुष्याच्या संघर्षाचे परिणाम स्वत:च भोगावे लागतात, स्वत:च वेदनेची ओझी वाहावी लागतात. परंतु या पुस्तकामुळं त्यांना नवीन जीवन उभारणं शक्य कोटीतलं वाटतं, त्यांची जिद्द जिवंत राहते आणि आशेचा किरण दिसत राहतो ..."  हे फ्लेविया यांचे प्रस्तावनेतले उद्गार हे आत्मकथनाचा संदर्भ आजही किती महत्त्वाचा आहे हेच सांगून जातात.

*****

मी अनेक वर्षापासून फ्लेविया अ‍ग्नेस यांचं नाव ऐकत आले आहे; त्यांचे लेख वाचले आहेत अनेकदा. त्यांची पुस्तकं सगळी नाही; पण दोन वाचली आहेत. स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रीविषयक कायदे या क्षेत्रातलं त्यांच योगदान नावाजलेलं आणि महत्त्वाचं आहे ते केवळ त्या पीडित स्त्री आहेत म्हणून नाहीत तर पीडित स्त्रियांबाबत त्यांनी केलेल्या कामामुळे.  ‘मजलिस’च्या  एका कार्यक्रमात सामील झाल्यामुळे मला त्यांची आणि त्यांच्या कामाचीही जवळून ओळख झाली.

‘मजलिस’चे काही मुद्दे मला “अनपेक्षित” होते. उदाहरणार्थ “समान नागरी कायद्या”ला असणारा त्यांचा विरोध. त्यामागची त्यांची भूमिका “भावनिक” नसणार हे माहिती असल्याने मी त्यांचा “विचार” समजून घेण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. माझे अनेक विचार मी बदलायची गरज कदाचित असेलही!

एका व्यक्तीचा 'स्वत्वाचा शोध' किती अनेकांना  उपयोगी पडतो याचा अनुभव  फ्लेविया यांना भेटल्यावर मला आला असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.