ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 25, 2023

२६५. वारसा जलव्यवस्थांचा: भाग २

 (भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)

जेजुरी. खंडोबाची जेजुरी. आपल्यापैकी अनेक लोक एकदा तरी जेजुरीला जाऊन आले असतील. मीही पूर्वी गेले होते. आज जेजुरीला जाऊनही आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो नाही. जलव्यवस्थापन हा या अभ्यास दौऱ्याचा विषय असल्याने आम्ही गेलो पेशवे तलावकडं. भोर तालुका सोडून आम्ही आता पुरंदर तालुक्यात आलो होतो.


जेजुरीच्या पूर्वेला हा विशाल तलाव आहे. आपण साधारणपणे तलाव पाहतो ते एक किंवा दोन बाजूंनी बांधलेले असतात. हा तलाव वर्तुळाकार नसून अष्टकोनी आहे आणि पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.

पहिले बाजीराव पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात (इसवी सन १७३४ ते १७४०) हा तलाव बांधला म्हणून याला पेशवे तलाव असे नाव  आहे. तलावाचे क्षेत्र सदतीस एकर आहे अशी माहिती एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी तो एकोणीस एकर क्षेत्रात आहे असं म्हटलं गेलं आहे. डोंगररांगातून येणारं पाणी निर्विघ्नपणे तलावात यावं म्हणून तलावाच्या अनेक बाजूंना छिद्रं आहेत. गाळ-दगड न येता फक्त पाणी तलावात यावं यासाठी ही रचना असावी. 

आम्ही गेलो तेव्हा सुदैवाने तलावावर फारशी गर्दी नव्हती. तलावावरून मल्हारगड (खंडोबा आणि महादेवाचे मंदिर असलेले प्रसिद्ध देवस्थान) स्पष्ट दिसतो. 

पाण्यावर किंचित तरंग उमटत होते. तलावाच्या बांधावर मोट बांधण्यासाठीची व्यवस्था स्पष्ट दिसते. तलावाच्या भिंतीवर ठराविक अंतरावर एकामागून एक असे चार जिने (दगडी पायऱ्यांचे आहेत, म्हणजे पुरेसे जुने आहेत हे जिने) भिंतीमध्ये उतरताना दिसले. ते पाहुन कुतुहल वाटलं. पण जिने उतरण्यापूर्वी जरा मागं जाऊन बघूयात म्हणून उतरून भिंतीच्या खालच्या बाजूला आलो. तर समोर दिसलं जमिनीत उभं केलेलं बल्लाळेश्वर मंदिर.


सुमारे पंचवीस पायऱ्या उतरल्या की समोर एक कुंड आहे. 

त्या कुंडाभोवती एका वेळी एक व्यक्ती चालत जाऊ शकेल असा दगडी मार्ग आहे. त्या मार्गाने चालत गेलं की उतरून आलेल्या पायऱ्यांच्या अगदी समोर तीन कमानी दिसतात आणि त्यातल्या मधल्या कमानीत शिवलिंग आहे. शिवलिंगाकडं जाताना त्याच्या डाव्या (आणि नंतर परत येताना उजव्याही) बाजूला पाणी वाहत येताना दिसलं. हे पाणी कुंडात जातं. आधी वाटलं की शिवदर्शन करण्यापूर्वी भाविकांना पाय धुता यावेत म्हणून नळ बसवला आहे की काय. पण पाण्याच्या स्रोताचा वेध घेता डावीकडे एक जिना दिसला. त्यातून पाणी अखंड वहात होतं. हे धरणातून येणारं पाणी होतं. स्थानिकांच्या माहितीनुसार या कुंडातल्या पाण्याचा स्तर कधीही कमी-जास्त होत नाही. या कुंडाच्या तळाशी एक लाकडी दरवाजा असून तो बंद आहे. पण याच दरवाज्याच्या आसपास कुठंतरी पाणी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. जमिनीखालून हे पाणी वाहतं आणि शेतीसाठी वापरलं जातं. १९८० पर्यंत हे पाणी शेतीसाठी वापरलं जात होतं, ते आम्ही पाहिलं आहे, वापरलं आहे – असं सांगणारे शेतकरी भेटलो. त्यांनीच आम्हाला थोडं दूरवर नेऊन शेतात जिथं पाणी बाहेर येत होतं, तो भाग दाखवला.

पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी या जिन्यात पूर्वी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर दट्टे बसवले होते. (हे दट्टे दगडी होते की लाकडी याविषयी वेगवेगळी माहिती आढळते.) आता हे दट्टे काढून टाकले आहेत आणि दट्ट्यांची जागा सिमेंटने बंद केलेली आहे. तसाच जिना शिवलिंगाच्या उजव्या बाजूलाही आहे. हे दोन्ही जिने चढून थेट धरणाच्या भिंतीवर आजही जाता येतं. भिंतीवरून दिसलेल्या चारपैकी दोन जिन्यांचं रहस्य इथं लक्षात आलं.

बल्लाळेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी डाव्या आणि उजव्या बाजूला छोटे बंदिस्त दगडी मार्ग आहेत. त्यातून चालत गेलं की खालच्या शिवलिंगाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला परत जिने आहेत – ज्यातून धरणाच्या भिंतीवर जाता येतं. थोडक्यात सांगायचं तर हे दुमजली मंदिर आहे आणि ते धरणाच्या भिंतीत साठ फूट खोल आहे. प्रत्येक मजल्यावर दोन जिने आहेत. या मंदिराची आणि धरणाची जोडरचना हे वास्तूशास्त्रातलं एक आश्चर्य तर आहेच, पण पाणी व्यवस्थापनातलंही एक उत्तम उदाहरण आहे. पाण्याच्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरांची स्थापना करणं यातून जनमानसाचा अभ्यासही दिसून येतो. देवाच्या प्रेमाने (अथवा भयाने – कोण कशाने प्रभावित असेल ते सांगता येत नाही) लोक पाण्याचीही काळजी घेत असत असं दिसतं.

मोरगाव-सुपे रस्त्यावर एके ठिकाणी चविष्ट भोजन करून आम्ही काही काळ तिथल्या अंगणात स्थिरावलो तेव्हा आकाशात ढग दाटून आले होते. रस्त्यावरची रहदारी थंडावली होती.  मोकळी हवा, शांतता, झोपाळा ....सकाळी हलकासा शिडकावा झाला होता. आता  पाऊस येणार असं वाटत असतानाच दहा मिनिटांत ते ढग निघून गेले.  आम्ही लोणी-भापकरच्या दिशेने निघालो. आता आम्ही आलो होतो ते बारामती तालुक्यात. पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांचं या अभ्यास सहलीच्या निमित्ताने वेगळंच दर्शन होतंय. 

लोणी भापकर गाव तसं मोठं असावं असं वाटेत दिसलेल्या ग्रामपंचायतीच्या दुमजली इमारतीवरून वाटलं. पाच रूपयांत दहा लीटर आरओ  फिल्टर पाणी मिळेलअसं ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका भिंतीवर लिहिलेलं दिसलं, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असावा. 

ज्येष्ठ नागरिक संघाचीही पाटी दिसली. गावात बरीच मंदिरं आहेत असं दिसतंय.  कालभैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. तिथं काही आम्ही गेलो नाही. सरदार भापकरांच्या गढीचे अवशेषही पाहिले नाहीत. सोनजी भापकर हे पेशवेकाळात मोठे सरदार होते. हा पराक्रमी सरदार पानिपतच्या लढाईत (१७६१) मारला गेला.  एके काळी हे बरंच महत्त्वाचं गाव किंवा स्थान असावं हे नक्की. अशा ऐतिहासिक स्थानी राहणाऱ्या लोकांना त्या त्या गावाबद्दल काय वाटत असावं याचं कुतूहल वाटतं. पण अर्थात त्याचा अंदाज मी माझ्यावरून आणि माझ्या ओळखीच्या माणसांवरून करू शकते म्हणा 😀

आम्ही गेलो ते थेट मल्लिकार्जुन मंदिरात. हा परिसर आता दत्त मंदिर या नावाने ओळखला जातो. पण दत्त मंदिर तिथं गेल्या दीडेकशे वर्षांत आलं असावं. परिसरातले सगळे गाभारे बंद होते, त्यामुळे देवतांच्या मूर्ती पाहता आल्या नाहीत. पण नंदी बाहेर होता, त्यावरून (आणि मल्लिकार्जुन नावावरुन) हे शिवमंदिर आहे हे सहज कळतं.

परिसरात प्रवेश करतानाच दोन – नाही तीन – गोष्टी तत्काळ नजरेत भरल्या. एक, मोकळ्या जागेत ठेवलेलं वराहशिल्प. दुसरी पुष्करिणी. आणि तिसरं म्हणजे मंदिराचं शिखर.  या मंदिराच्या वरच्या भागाची पडझड झाली असल्याने, बाकी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भाविकांना आत जाता येत नाही असं समजलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दरवाजे उघडे असत असं आंतरजालावरच्या काही लेखांवरून दिसून आलं. पण सुरक्षितता महत्त्वाची, तिच्याशी तडजोड नकोच.

भारतीय हिंदू परंपरेत वराह हा विष्णूचा तिसरा अवतार मानला जातो. हिरण्यक्ष राक्षसाने पृथ्वी समुद्राच्या तळाशी ओढून नेली. विष्णूने वराहाचं रूप धारण करून. एक हजार वर्ष राक्षसाशी लढाई करून पृश्वीला वाचवलं ...ही कथा आपण अनेकांनी लहानपणी ऐकली-वाचली असेल. वराहावताराचं काम संपल्यावर विष्णून ते शरीर त्यागलं, आणि मग त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगं बनली अशी कथा विष्णुपुराणात आहे. महावराहाचं किंवा यज्ञवराहाचं शिल्प काहीसं भग्नावस्थेत असलं तरी विलक्षण देखणं आहे. वराहाचं शिल्प आपल्याला आवडू शकेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पुष्करणीसमोरच्या मोकळ्या अंगणात आता हा असला तरी पूर्वी तो पुष्करिणीतल्या मंडपात असावा असा अंदाज लावता येतो. तिथं श्रीदत्त या देवतेचं आगमन झाल्यावर वराहाला बाहेर हलवण्यात आलं असावं. वराहाच्या पाठीवर जी झूल दिसते, त्यात विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. फोटोतल्या वराहाचे पायही पाहा. तिथंही शंख, गदा ही विष्णूची आयुधं दिसतील.
 

मल्लिकार्जुन मंदिर पांडवकालीन आहे असा समज लोकांमध्ये प्रचलित आहे. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीवरून हे मंदिर यादवकालीन (तेराव्या किंवा चौदाव्या शतकातलं) असावं असं म्हणता येईल. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिरात दोन शिवलिंगं आहेत. एक शंकराचं आणि दुसरं पार्वतीचं.


मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर दगडी बांधकाम असलेली पुष्करणी आहे. एका नजरेत तिचं समग्र दर्शन होत नाही, इतकी ती मोठी आहे. 

या पुष्करणीचा फोटो काढण्यासाठी ड्रोन वापरायला हवं असं मला वाटलं. पुष्करणीत खाली उतरून पाण्याच्या चारी दिशांना फिरता येते. उतरण्यासाठी एका बाजून पायऱ्या आहेत. ठिकठिकाणी लहान कोनाडे दिसतात, त्यातल्या काहींमध्ये मूर्तीही दिसतात, त्या नव्या असाव्यात. पाणी वापरात नसल्याने भरपूर शेवाळ साठलं आहे. इथं असं वाटलं की जुन्या काळी काय भव्यता असेल या वातावरणात. आणि मग असंही वाटलं की जुन्या काळी कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसांना (त्यातही स्त्रियांना) दिवसाढवळ्या इथं निवांत येऊन बसण्याची चैनही कदाचित करता आली नसती. असो. हा जर-तरचा विचार बिनकामाचा आहे. 

पुष्करिणीतल्या मंडपासमोर आता दत्ताचं मंदिर आहे. या दत्ताला दहा हात आहेत असं कळलं.  या मंडपातील खांबांवर सुंदर कोरीवकाम दिसतं. या कोरीवकामात काही कामशिल्पंही दिसली. 

छतावरची नक्षीही सुंदर आहे. आता इथं नंदी नाही, पण पूर्वी या मंडपात नंदी असावा. आणि आता जिथं दत्तमंदिर आहे तिथं शिवमंदिर असावं – आणि कदाचित शिवमंदिराच्या पूर्वी विष्णूचं मंदिर होतं की काय असा एक प्रश्न मनात आला. इथं जात्यासारखा एक मोठा दगड दिसला. ते जातं वगैरे नसून चुन्याच्या घाणीचा एक भाग होता असं अभिजित घोरपडे यांनी सांगितलं. त्याविषयी अधिक पुढच्या भागात पाहू. 

परतीच्या वाटेवर सोमेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली ती इथले 'वीरगळ' पाहण्यासाठी. 

देवळाच्या नामफलकावर विर्घळ असा शब्द दिसतो खरा, पण ते वीरगळ आहे. मराठी विश्वकोश प्रथमावृत्तीनुसार युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे 'वीरगळ' होय. 'वीराचा दगड' ह्या अर्थाच्या 'वीर-कल' ह्या कन्नड शब्दावरून 'वीरगळ' हा शब्द आलेला आहे. वीरगळाला 'वीराचा दगड' किंवा केवळ 'वीर' म्हणूनही संबोधतात. 'वीरगळां' चा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते. इथली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकाच मंदिरात अदमासे चौदा-पंधरा वीरगळ आहेत. लढाईचे विविध प्रसंग या वीरगळांवरती कोरलेले आहेत. हे वीरगळ जमिनीत पक्के रोवलेले आहेत. किती खोल आहेत, ते मला माहिती नाही.

सुप्याजवळच्या शिवकालीन पाणपोयीच्या दिशेने मग आम्ही निघालो तेव्हा मनात अनेक नवे प्रश्न होते. इतिहासातल्या या दालनांकडं आजवर कधी पाहिलं नव्हतं, आता त्यातली जादू कळायला लागली आहे. अर्थातच त्या त्या काळचा सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ नीट समजून घेतल्याविना केवळ वास्तुतून इतिहास समजत नाही. पण वास्तू, प्रतीकं, स्मारकं आपल्याला दिशा दाखवतात. शेवटी वाट कुठलीही असो, ती आपली आपल्यालाच चालावी लागते. 

(क्रमश:)

Thursday, September 21, 2023

२६४. वारसा जलव्यवस्थांचा: भाग १

(भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)

चार दिवसांपूर्वी मला जर कुणी विचारलं असतं की रांझे-कुसगाव-जेजुरी-लोणी भापकर-सुपे-मोगराळे-लिंब या गावांमध्ये काय साधर्म्य आहे; तर कदाचित ही सर्व गावं आहेत, तिथली अर्थव्यवस्था शेतीप्रधान असणार, शिक्षण-आरोग्य-रोजगाराचे प्रश्न.... असे काही मुद्दे मला सुचले असते. पण १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवसभवतालच्या चमुसोबत या परिसरात भटकायची संधी मिळाली आणि वर उल्लेख केलेल्या गावांना जोडणारा आणखी एक दुवा स्पष्ट झाला. तो आहे ऐतिहासिक जलव्यवस्था’- पाणी साठवण्याच्या, वितरणाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण इतिहासकालीन जागा. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधली ही गावं आहेत.

प्रवासाच्या दोन दिवस आधी आमची एक ऑनलाईन मीटिंग झाली होती. तेव्हा आमचा गट फार मोठा नाही हे लक्षात येऊन मला बरं वाटलं होतं. अभिजीत घोरपडे आणि वनिता पंडित हे भवतालचे मार्गदर्शक धरून आम्ही चौदा लोक होतो. त्यात शेतकरी होते, शिक्षक होते, वास्तुरचनाकार होते, इंजिनिअर होते, आणि विद्यार्थी होते.  बारामती, सांगली, मुंबई अशा विविध ठिकांणाहून लोक या पर्यावरण-अभ्यास सहलीत सामील झाले होते. माझा ना इतिहासाचा अभ्यास आहे, ना पाण्याचा. पण आपल्या परिसरात आहे तरी नेमकं काय या उत्सुकतेने मी या सहलीत सामील झाले. भवतालबरोबर मी पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे कार्यक्रमातून काही शिकायला मिळेल का नाही, याबाबत मनात सुरूवातीला थोडी शंका होती, ती अर्थातच अनुभवाअंती दूर झाली.  

सकाळी सात वाजता पुण्यातून निघून, वाटेत चहा-नाश्ता करून आम्ही भोर तालुक्यातल्या रांझे गावी पोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलांना केलेल्या शिक्षेची कथा आपल्याला आठवत असेलच, तेच हे रांझे. काही ठिकाणी गावाचं नाव रांजे असं लिहिलेलं दिसलं. गाव लहान दिसतंय, तीनेकशे कुटुंबं आहेत. लोकसंख्या अंदाजे पंधराशे ते अठराशे असेल. गंमत म्हणजे या गावाहून तालुक्याचं ठिकाण (भोर) ३५ किलोमीटर दूर आहे, तर जिल्ह्याचं ठिकाण (पुणे) ३० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यात लोकांना कामासाठी तीसेक किलोमीटर सहज हिंडावं लागत असेल, तो भाग वेगळा.

अंगणवाडी केंद्र बंद होतं. पण इमारत सुबक होती आणि बाहेरून तरी छान सजवलेली दिसली. 

गावात वीज आहे, पण ती अर्थातच अनेकदा नसते. गावात प्राथमिक शाळा आहे, पुढच्या शिक्षणासाठी मात्र गावाबाहेर जावं लागतं. या परिस्थितीतही २०११च्या जनगणनेनुसार गावातले ७५ टक्के लोक साक्षर आहेत. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र नाही. रस्ते तसे ठीकठाक वाटले, ऐन पावसात ते कसे असतात याची कल्पना नाही. गावात बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम या सोयी नाहीत. जवळचा पेट्रोल पंप चार किलोमीटर अंतरावर आहे.  हे सगळं वर्णन पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचं आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून प्रामुख्याने ऊस आणि फळभाज्या घेतल्या जातात. विहिरी आणि कूपनलिका यांच्या साहाय्याने शेतीला पाणीपुरवठा होतो.

इथल्या रांझेश्वर मंदिरात प्रवेश करताच एक मोठं वडाचं झाडं दिसलं. झाडाच्या खोडावर बांधलेले दोरे सांगत होते की वटपौर्णिमा नुकतीच होऊन गेली आहे. वडाभोवतीचा मजबूत दगडी पार स्वच्छ होता. डाव्या बाजूच्या कमानीही लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामपंचायतीमधले कर्मचारी श्री. बाबासाहेब भणगे आम्हाला माहिती द्यायला हजर होते. परस्पर ओळखींचे एक छोटे सत्र पार पडल्यावर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.

हे मंदिर शिवपूर्वकालीन आहे, दादोजी कोंडदेव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा ऐतिहासिक पुरावा आहे. म्हणजे हे मंदिर चारशे वर्ष किंवा  त्याहूनही जुनं असावं. पायऱ्या उतरून आम्ही मुख्य मंदिराजवळ आलो तेव्हा समोर नंदी दिसले. शिवलिंगासमोर नंदी असणं काही नवं नाही, पण इथं एक सोडून तीन नंदी आहेत. या तिन्ही नंदींचे आकार वेगवेगळे आहेत. त्यामागे काय कथा आहे हे काही कळलं नाही. शिवलिंगाभोवती सापाचं वेटोळं स्पष्ट दिसतं. मंदिर परिसर बराच मोठा आहे आणि स्वाभाविकपणे त्याची पडझडही झाली आहे. खूप मोठं मंदिर असावं हे स्पष्ट होण्याइतके अवशेष टिकून आहेत.

इथं आमच्या भेटीचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे तीन कुंडं पाहणं. वरवर पाहता अगदी साधी व्यवस्था आहे असं दिसतं. इथं तीन कुंडांची साखळी आहे - एकाला एक जोडून अशी तीन कुंडं आहेत. त्यांची खोली अनुक्रमे २.०, १.४ आणि १.२ फूट अशी आहे. फोटो पाहून कुंडांच्या लांबी-रूंदीची तुम्हाला कल्पना येईल. पहिल्या कुंडाला देवकुंड असं म्हटलं जातं. इथं झऱ्याचं पाणी थेट कुंडात येतं. या कुंडातलं पाणी देवाच्या पूजेसाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातं. या कुंडातल्या पाण्याचा स्तर वाढला की पाणी दुसऱ्या  कुंडात जाईल अशी व्यवस्था आहे. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अशा रीतीने केली आहे की दुसऱ्या कुंडातलं पाणी कधीही पहिल्या कुंडात परत येणार नाही (आणि तिसऱ्या कुंडातलं पाणी कधीही दुसऱ्या कुंडात परत येणार नाही.) पाणी वाहून जाण्यासाठी असलेली छिद्रं पहिल्या कुंडात स्पष्टपणे दिसतात, पाणी वाहण्यासाठी काही कलाकारीची गरज नसते. पण जे काम करायचं ते सौंदर्यपूर्ण, नेटकं, आकर्षक करायचं हे तत्कालीन कारागिरांचं वैशिष्ट्य दुसऱ्या कुंडातलं गोमुख पाहून लक्षात येतं. यातलं पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं. दुसऱ्या कुंडातून पाणी तिसऱ्या कुंडात येतं तेव्हा कपडे धुणे, भांडी धुणे अशा कामासांठी ते वापरलं जातं. आता गावात नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकरी या कुंडांचा क्वचितच वापर करतात. केवळ देवळाचे पुजारी कुंडात आंघोळ करताना दिसले.


एका कुंडातून दुसऱ्या कुंडात पाणी वाहतं ठेवणं ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अभिनवच होती - आहे. पण तत्कालीन नेतृत्व तिथंच थांबलं नाही. तिसऱ्या कुंडातलं पाणी वापरून झालं की जमिनीत जिरून जात नाही. जमिनीखाली दगडी पाट बांधून त्याद्वारे हे पाणी मंदिराबाहेर वळवण्यात आलं आहे आणि तिथून ते शेतीसाठी वितरित होतं. हा दगडी पाट – दगडी भुयार-पाट म्हणायला पाहिजे खरं तर – अगदी प्रशस्त आहे. त्यातून आजही पाणी वाहतंय. आमच्या गटातले काही सहकारी या पाटातून (किंचित वाकून) चालत गेले आणि मंदिराबाहेर आले. त्यांच्या चाहुलीने आतली शेकडो वटवाघळं उडून बाहेर आली. ती पाहून मग मी भुयार-पाटात चालत जाण्याचा बेत रद्द केला.

पाणी अजिबात वाया न जाऊ देता पाण्याचा वापर जास्तीत जास्त लोकांना कसा करता येईल आणि पाण्याचा परिणामकारक पुनर्वापर कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवणारी ही व्यवस्था आहे. आता काळ बदलला, सोयी झाल्या, नवं तंत्रज्ञान आलं, लोकांच्या गरजा बदलल्या म्हणून ही व्यवस्था वापरली जात नाही. पण ती व्यवस्था अजूनही चांगल्या स्थितीत आहे, ती बंद पडलेली नाही हे फार महत्त्वाचं आहे. ही व्यवस्था टिकली म्हणून आपल्यार्यंत पोचली. सस्टेनेबल डेवलपमेंट (शाश्वत विकास किंवा चिरंजीवी विकास) बाबत विचार करताना असं भूतकाळातूनही शिकायला मिळतं हे नक्की.

मंदिर परिसरातली शांतता, दगडी बांधकामाने त्या वातावरणात असलेली एक स्थिरता, पडझड झालेल्या भिंतीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य .... हे सगळं सोबत घेऊन आम्ही पुढं निघालो ते कुसगावकडं.

आम्ही गावात न जाता मुख्य रस्ता सोडून आत गेलो. साधारण दहाएक मिनिटं चालल्यावर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. रांझे आणि कुसगाव यांच्या हद्दीवर असलेलं हे छोटेखानी धरण (किंवा आजच्या भाषेत मोठा बंधारा) अजूनही मजबूत आहे. जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवगंगा नदीवर हा बंधारा बांधला गेला आहे. (पुण्यात राहण्याची सोय होण्यापूर्वी जिजाऊ लहानग्या शिवरायासह खेड शिवापूरमध्ये काही काळ राहिल्या होत्या.) चारशे वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या बंधाऱ्यात पाणी साठलेलं दिसलं. बंधाऱ्याची उंची दहा फुटांपेक्षा जास्त असावी. किती लांबीचा बंधारा आहे हे मला माहिती नाही,


पण नदीच पात्रं बऱ्यापैकी रुंद आहे. भिंतीची रुंदी (जाडी) पाच ते  सहा फूट असावी असा माझा अंदाज आहे. पाणी बंधाऱ्यातून पुढं वाहण्यासाठी जो भाग केला आहे, त्याच्या दोन्हीबाजूंना बुरूजासारखी रचना आहे.

पाण्याच्या प्रवाहाने बंधारा वाहून जाऊ नये म्हणून ही व्यवस्था असते का असा प्रश्न पडला. नदीचं पात्र फार खोल नसावं (बहुधा गाळ साठला असावा), कारण आमच्यापासून थोड्या अंतरावर बंधाऱ्याने अडलेल्या पाण्यात एक माणूस मासे पकडत होता आणि मध्येच तो चालत नदी ओलांडून गेला.

या परिसरात पाऊस भरपूर होत असला, तरी दिवाळी उलटली की पाण्याची कमतरता भासत असणार. लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने अतिशय दूरदृष्टी दाखवून जिजाऊंनी शिवगंगा नदीवर बंधारे बांधले. त्यांनी तीन बंधारे बांधले आहेत, आम्ही त्यापैकी फक्त हा एक पाहिला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दीर्घकाळ टिकणारं काम कसं उभं करावं याचा हा एक आदर्श आहे. जिजाऊंनी केलेल्या या कामाची मला फारशी कल्पना नव्हती हे सखेद नमूद करते. आता या विषयावर आणखी वाचलं पाहिजे हे लक्षात आलं.

(क्रमश:)

भाग २


Sunday, July 9, 2023

२६३. पुण्यातला 'मणिपूर शांति मोर्चा'

मणिपूर मेरी कोम आणि मीराबाई चानू यांच्यामुळे आपल्याला माहिती असलेलं मणिपूर. इरोम शर्मिलामुळे आपल्याला माहिती असलेलं मणिपूर. मणिपूरमध्ये आणखीही अनेक लोक राहतात हे जणू आपण विसरूनच जातो. आपली भारतीयांची एक जुनी सवय आहे. कुणीही यशस्वी ठरलं की ते लगेच 'आपले' ठरतात. इतर वेळी आपल्याला त्यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. मणिपूर काही त्याला अपवाद नाही.

तर मणिपूर २७ एप्रिलपासून पेटलेलं आहे. मैतेयी समुदाय आणि अन्य समुदायातला संघर्ष संपायची चिन्हं दिसत नाहीत. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या दोन महिन्यांत मणिपूरमध्ये ११५ लोक दंगलीत मरण पावले आहेत, सुमारे १००० लोक जखमी झाले आहेत,  तर ६०,००० पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत.

'आपण मणिपूरच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे' असं वाटत होतं, पण नेमकं काय करायचं ते समजत नव्हतं. त्यामुळे पुण्यात 'मणिपूर शांति मोर्चा' आहे असं कळल्यावर निदान त्यात सहभागी होऊयात – अगदी ती फक्त प्रतिकात्मक कृती असली तरीही – असं ठरवलं. यातून प्रत्यक्ष कृती करणाऱ्या लोकांशी भेट होईल असा मला विश्वास वाटत होता. 

क्वार्टर गेटजवळच्या Ornellas School पासून ८ जुलै रोजी सकाळी दहा वाजता 'मणिपूर शांति मूक मोर्चा'ची सुरवात होणार होती. गुगल मॅप्सचा उपयोग करून मी साडेनऊच्या सुमारास तिथं पोचले. साधारणपणे अशा कार्यक्रमांना गर्दी जेमतेमच असते असा अनेकदा अनुभव येतो. इथं मात्र शाळेचं आवार सर्व वयोगटातील लोकांनी भरलं होतं. अनेकजण गटांनी आले होते. एक बाई एकट्याच दिसल्या म्हणून मी त्यांच्याशी बोलू लागले तर त्यांचा पहिलाच प्रश्न होता – तुम्ही कुठल्या पॅरिशमधून आला आहात?” मी कुठल्याही चर्चची अनुयायी नाही हे कळल्यावर त्यांना आधी आश्चर्य आणि मग कौतुक वाटलं. हा फक्त ख्रिश्चन धर्मियांचा मोर्चा आहे की काय अशी एक शंका आली, पण तसं नव्हतं. व्यासपीठावरून 'सर्व धर्मांच्या' लोकांचंही स्वागत करण्यात आलं.  काही सूचना पुन्हापुन्हा सांगितल्या जात होत्या तोवर आम्ही थोड्या गप्पा मारल्या.

अनेक तरूण स्वयंसेवक-सेविका जमलेल्या लोकांमध्ये फिरत होते आणि प्रत्येकाला मोर्चात चालताना धरायला छोटे फलक देत होते. अनेक गटांनी त्यांचे बॅनर्सही आणले होते. फलक मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये होते. आम्ही मणिपूरच्या सोबत आहोत’; ‘शांतीच्या मार्गाने प्रश्न सुटतात, हिंसेने सुटत नाहीत’; ‘Peace is the Goal as we march with our Soul’; ‘Walking for Peace, Healing the Wounds’; ‘मणिपूर वाचवा’; ‘आम्ही शांतीचे राखणदार’; ‘India is a secular nation and all have a place in this country’; ‘Give peace a chance’; ‘शांतीचे दूत बना’; ‘जगा आणि जगू द्या असे संदेश फलकांवर लिहिले होते.



मोर्चात सामील होणाऱ्या लोकांना व्यासपीठावरून सूचना दिल्या गेल्या. चार रांगांमध्ये सगळ्यांनी चालायचं होतं. मूक मोर्चा असल्याने कुठल्याही घोषणा द्यायच्या नव्हत्या, इतकंच नाही तर मोर्चा चालू असताना आपापसातही बोलायचं नव्हतं. कुठल्याही राजकीय चिन्हांचा, प्रतिकांचा वापर करायचा नव्हता (राजकीय संदेश असणारे टोपी, टीशर्ट वगैरे). एक महत्त्वाची सूचना होती ती म्हणजे मीडियाशी (प्रसारमाध्यमांशी) कोणीही बोलायचं नव्हतं. संयोजकांनी मीडियाशी बोलायला काही लोक निवडले होते आणि तेच फक्त मीडियाशी बोलणार होते. वास्तविक हा मूक मोर्चा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठरला होता. पण आधी परवानगी काढूनही आयत्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तो रद्द झाला होता. संयोजक त्यामुळे जरा जास्तच सावध होते हे समजण्याजोगं होतं. कुणी काही सहज बोललं आणि त्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले तर संपूर्ण समुदायाला त्याची किंमत मोजावी लागेल अशी त्यातून व्यक्त होणारी भीती फार वेदनादायी होती. 

जमलेल्या गर्दीवर एक नजर टाकली तर बहुतांश ख्रिश्चनधर्मीय लोक होते (नन्स आणि फादर्सही होते मोठ्या संख्येने). मैतेयी आणि नागा-कुकी यातल्या एका समूहाचं तर हा मोर्चा प्रतिनिधित्व करत नाहीये ना अशी मला शंका आली. पण व्यासपीठावरून संयोजकांपैकी जे जे बोलले त्यांच्या बोलण्यातून ही शंका लगेच दूर झाली. हा मोर्चा हिंसेच्या विरोधात आहे, हिंसेने प्रश्न सुटत नाहीत यावर विश्वास असणारे लोक इथं जमले आहेत ही दिलासा देणारी गोष्ट होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला काही लोक बोलले – सर्वांची नावं लक्षात नाहीत. बिशप जॉन रॉड्रिग्ज, बिशप थॉमस डाब्रे, आणि फादर माल्कम एवढी तीनच नावं माझ्या लक्षात राहिली. बोलणारे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलत होते, एक-दोघांच्या बोलण्याचा मराठी अनुवाद एक ताई सफाईदारपणे करत होत्या. कार्यक्रमाची सुरूवात साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म या गीताने झाली याचं मला आश्चर्य वाटलं हे कबूल करायला हवं. मग काही वेळाने आपल्याला आश्चर्य वाटलं याचंच मला आश्चर्य वाटलं. महाराष्ट्रातले लोक मराठी गीताने कार्यक्रमाची सुरूवात करणार नाहीत तर कशाने करणार? पण आपल्या डोक्यात धर्म आणि भाषा यांची एक सांगड बसलेली असते – ती जाणीवपूर्वक काढावी लागते याचं भान आलं. (कार्यक्रम संपल्यावर बसची वाट पहात असताना एक मुस्लिम स्त्री – हे परत कपड्यांवरून कळतंच – पण तिथं होती. मी तिच्याशी नकळत हिंदीत बोलायला लागले. त्या ताई माझ्याशी मराठीत बोलायला लागल्यावर मी परत भानावर आले.) शहरांमध्येही एका प्रकारे जाती-धर्मावर आधारित वस्त्या होत आहेत आणि त्यामुळे आपल्या रोजच्या जगण्यात इतर धर्मीय माणसं कमीच असतात हेही पुन्हा एकदा लक्षात आलं.

मणिपूर दंगलीत होरपळलेल्या लोकांसोबत असणं, संवादातून प्रश्नांचा गुंता सोडवण्याचं महत्त्व अधोरेखित करणं हे मोर्चाचे दोन मुख्य उद्देश होते. भारताची विविधता ही भारताची ताकद आहे आणि एकमेकांशी सद्भावाने आणि सलोख्याने आपण एकत्र राहू शकतो हेही वक्त्यांनी ठामपणे सांगितलं. आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि मग ख्रिश्चन आहोत; भारताची समृद्धी आणि विविधतेतली एकता टिकली पाहिजे; हिंसेची साखळी तोडणं आवश्यक आहे असे वेगवेगळे मुद्दे वक्त्यांनी मांडले. गांधींजी आणि मार्टिन लुथर किंग यांचेही समयोचित उल्लेख झाले.


त्यानंतर प्रार्थना आणि ‘Make me channel of your Peace’ हे गीत एकाने गायलं आणि त्याला समूहाने साथ दिली. एक बाब विशेषत्वाने लक्षात आली की संपूर्ण कार्यक्रमात वातावरण पूर्णपणे स्वयंशिस्तीचं होतं. व्यासपीठावरून वक्ते बोलत असताना लोक आपापसात बोलताहेत, किंवा मोबाईलवर मग्न आहेत असं अजिबात दिसलं नाही. साधारण पंचेचाळीस मिनिटं ते एक तास लोक शाळेच्या अंगणात उभे होते. पण कुणी पाय दुखताहेत किंवा कंटाळा आलाय म्हणून खाली बसलेलं दिसलं नाही. पावसाची सर आली तेव्हाही शांतपणे छत्र्या उघडल्या गेल्या, कसलीही पळापळ न करता. एवढ्या हजारो लोकांना चारच्या रांगेत उभं करणं हेही अतिशय लगेच आणि कसलीही धावपळ, गडबड न होता झालं. सगळे लोक एकमेकांना ओळखत नसतानाही ही शिस्त होती हे विशेष.

मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी पाळलेली शिस्त, ठिकठिकाणी संयोजकांनी उभे केलेले स्वयंसेवक-सेविका यामुळे पोलिसांचं काम सोपं झालं होतं. पोलिसांनीही व्यवस्थापनात काही कसूर ठेवली नाही. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास झाला असणार. काही शाळकरी मुलांनाही मोर्चा ओलांडून पलिकडे जायचं होतं. अशा वेळी मोर्चेकरी चालणं थांबवून वाहनांना, मुलांना, पालकांना जागा देत होते. एक भटका कुत्राही जायला वाट शोधत होता, त्यालाही आम्ही वाट दिली.

क्वार्टर गेट ते जिल्हा परिषद कार्यालय आणि पुढं जिल्हाधिकारी कचेरी असं दीड ते दोन किलोमीटरचं अंतर (आम्ही वळसा घालून गेल्याने कदाचित थोडंस जास्त असेल) चालताना दोनदा वळलो. दोन्हीही वेळा मोर्चाचं पुढचं आणि मागचं दर्शन होईल तितके लोक दिसत होते. पाचेक हजार लोक असावेत असा माझा अंदाज आहे – पण नेमकं सांगता येणार नाही.


मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपला. आभारप्रदर्शन झालं आणि हम होंगे कामयाब हे गाणं सर्वांनी मिळून म्हटलं. संयोजकांचे प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आत गेले आणि मोर्चेकरी आपापल्या घराकडं निघाले. माझ्या मागं चालणाऱ्या लोकांचा एक मजेदार संवाद कानावर आला. एकजण म्हणाला, अरे चल, बिर्याणी खाऊ आता. दुसरा उत्तरला, नको यार बिर्याणी. सध्या आमच्याकडं रोज भात-पुलाव-बिर्याणीच होतेय. पहिल्याने विचारलं, काय विशेष?” त्यावर दुसरा उत्तरला, अरे, बायकोचा हात मोडलाय, त्यामुळे सध्या स्वैपाकाचं खातं माझ्याकडं आहे. भात सोडून मला दुसरं काहीच येत नाही ना करता!” गंभीर प्रसंग असूनही तो संवाद ऐकताना मला हसू आलं.

कॅम्प परिसरात मी फारशी कधी गेले नाही, त्यामुळे रस्ता चुकले. मग आता चुकलाच आहे रस्ता तर हिंडूयात कॅम्पमध्ये थोडं म्हणून एकटीच भटकले. वाटेत एका अंध गृहस्थाला रस्ता ओलांडून देताना त्याच्याशी गप्पा झाल्या. ते एका कपड्यांच्या दुकानात शिलाईचं काम करतात. दोन महाविद्यालयीन विद्यार्थी माझ्याशी बोलायले आले. ते उद्योजक महिलांसाठी एक बाजारपेठ मेळावा करताहेत आणि त्यासाठी त्यांना काही पैसे हवे होते. मग त्यांच्याशी थोडं बोलणं झालं.

घरी आल्यावर सहज पुणे मणिपूर मोर्चा असे शब्द इंटरनेटवर टाकले आणि लक्षात आलं की मणिपूरसाठी हा काही पुण्यातला पहिला मोर्चा नव्हता. १० मे रोजी औंध परिसरात पुण्यात वास्तव्यास असलेल्या मणिपूरच्या लोकांनी शांति मेळावा घेतला होता. २७ जून रोजी मैतेयी समुदायाने (Meitei Nupi Lup तर्फे आयोजित) पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं धरलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं होतं. पुणे शहर विस्तारलं आहे, आणि मणिपूरचा प्रश्न अजून सुटलेला नाही, त्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मणिपूरवासियांसाठी कार्यक्रम करणं चांगलं आहे. फक्त यात मैतेयी आणि नागा-कुकी असे दोन वेगळे कार्यक्रम होत नाहीत ना याबाबत अधिक माहिती घ्यायला लागेल.

केंद्र शासन आणि मणिपूर राज्य शासन लवकरात लवकर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होवो आणि मणिपूरसाठी कुणालाही आणखी एखादा शांति मोर्चा काढण्याची वेळ न येवो ही सदिच्छा.

Wednesday, June 21, 2023

२६२. एक दिवस वारीचा

 वारी. पंढरीची वारी. आषाढी वारी. मराठी माणसाच्या भावविश्वातला एक महत्त्वाचा उत्सव.

पण भक्ती’ – म्हणजे ईश्वरावर, कोणा गुरूवर भक्ती - हा माझा प्रांत नाही. (भक्तीहीनत  या माझ्या एका जुन्या पोस्टमध्ये मी याबाबत सविस्तर लिहिलं आहे, तेच पुन्हा लिहित नाही.) मी एखाद्या भागात कामासाठी अथवा फिरायला गेले तर देवळात जाते. तिथं चार लोक हात जोडतात म्हणून मीही जोडते. पंढरपूरलाही एक-दोनदा जाऊन आले आहे. विठ्ठलाशी संतांच्या नात्यांच्या अभिव्यक्त झालेल्या लोककथा विलक्षण आहेत. मला वाटतं मला देवापेक्षा जास्त पाहायला आवडतं ते देवाचं आणि त्याच्या भक्तांचं नातं. जोवर त्यात शोषण नाही, तोवर मला त्याचा काही त्रास होत नाही.

कदाचित यामुळेच असेल पण पुण्यात अनेक वर्ष राहूनही मी कधी वारीत सहभागी झाले नव्हते. माझ्या तीन मैत्रिणी वारीत जाऊन आल्या. त्यांचे अनुभव ऐकूनही मला काही वारीत जाण्याची प्रेरणा मिळाली नाही. इतकं चालणं जमेल का (साधारणपणे साडेचारशे किलोमीटर) असा एक प्रश्न नेहमीच असायचा. चालणं एकवेळ जमेल, पण दिवसभर अभंग आणि हरिपाठ वगैरे जमणार नाही याची मला खातरी होती.

२०२२-२३ मध्ये राहुल गांधी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांच्या भारत जोडो यात्रेत मी पंचेचाळीस दिवस चालले. (त्याबद्दल मी फेसबुकवर लिहिलं आहे, ब्लॉगवर मात्र अद्याप काही लिहिलेलं नाही.) त्यामुळे चालण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल मला जबरदस्त आत्मविश्वास आला. दर दिवशी दहा तरी अनोळखी माणसांशी बोलायचं असं मी ठरवलं होतं आणि ते करताना मला फार चांगला अनुभव आला. चालण्याची तशीही मला आवड आहेच. चालताना नेहमीचं जग वेगळं दिसतं हेही आजवरच्या चालण्यातून ध्यानात आलं होतं. एरवी आपल्या जगात (म्हणजे आपल्या आसपास) नसणाऱ्या माणसांशी बोलायची एक उत्तम संधी चालताना मिळते. आणि म्हणून यावर्षी वारीच्या बातम्या जेव्हा प्रसारमाध्यमांत यायला लागल्या, तेव्हा आपण वारीत जाऊन बघूया असा एक विचार डोक्यात आला. पंधरा दिवसांसाठी त्यात एकदम उडी मारण्याऐवजी एखादा दिवस जाऊन बघूयात असा विचार केला.

तेवढ्यात माहिती मिळाली की पुण्यातल्या प्रागतिक विचारांच्या संस्था संघटना एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमाचे आयोजन करतात. (उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे.) तुकोबारायांच्या पालखीत एक दिवस चालणे – असा हा उपक्रम. हे चालणं नुसतं नाही तर संविधान समता दिंडीमध्ये सामील होऊन चालायचं असा हा उपक्रम. या दिंडीचं हे पाचवं वर्ष होतं. 



राज्यघटना आणि वारी, राज्यघटना आणि संतांची शिकवण यांचा एकमेकांशी संबंध जोडणं याविषयी मला कुतूहल वाटलं. रविवारी, १८ जून रोजी गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर असे दहा किलोमीटर चालायचं होतं. मी नाव नोंदवलं.

भारतीय राज्यघटना लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार करते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घटनेला अपेक्षित आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय विकास करण्याची सर्व नागरिकांना समान संधी असावी असं राज्यघटना सांगते.

माझा काही संत साहित्याचा गाढा अभ्यास नाही. परंतु संताच्या शिकवणुकीतून त्यांनीही सामाजिक न्यायावर आणि समतेवर भर दिल्याचं स्पष्ट दिसतं. देव आणि माणूस यांच्या नातेसंबंधातल्या पुरोहितांच्या दलालीला आव्हान देण्याचं काम संतानी केलं आहे (जरी पंढरपूरच्या विठठल मंदिरात आजही बडव्यांचं प्रस्थ असलं तरीही). एक दिवस तरी वारी अनुभवावी या फेसबुक पेजवर मग मला संत साहित्य आणि राज्यघटनेतील कलमे यांच्यातलं साम्य सांगणारी माहिती वाचायला मिळाली. वारीत एकूण ४५ वेगवेगळ्या संतांच्या पालख्या असतात, पालखीचा समावेश वारीत १८६५ मध्ये नारायणबाबांनी (संत तुकाराम यांचा धाकटा मुलगा) केली, दिंडी आणि वारी, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे हे ३३८वे वर्ष आहे, वारी एकूण २२ दिवस चालते, दिंड्यांची संख्या .... अशी माहिती मी वाचत राहिले.

१८ जूनला सकाळी साडेसहाला आम्ही पुण्यातून निघालो. मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, सातारा, नाशिक, नागपूर ... अशा विविध ठिकांणाहून आलेले आणि विविध वयोगटातले सुमारे पावणेदोनशे लोक आले होते. तरूणांची संख्या लक्षणीय होती. गवळ्याची उंडवडी इथं बसमधून उतरून आम्ही २६१ क्रमांकाच्या दिंडीत सामील झालो. 


वारीची चालण्याची स्वत:ची गती असते, नव्या माणसाला ती लय पकडायला जरासा वेळ लागतो. वारकरी त्यांच्या त्यांच्या दिंडीत स्वयंशिस्तीने चालले होते. आमच्यासारखे नवखे लोक कोणत्याही दिंडीत सामील होत होते, पण त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही. वारकऱ्यांच्या प्रथेप्रमाणे सगळेजण एकमेकांना माऊलीम्हणत होते. हे शेरातले नाजूक मावली लई आलेत आज, चालाया जमना त्यास्नी नी आपल्यालाबी पुडं जाऊदीनातअशी एक प्रेमळ तक्रार मला मागून ऐकून आल्यावर मी हसून बाजूला झाले. पण एवढ्या गर्दीत आणि इतक्या कमी पोलिसांच्या उपस्थितीत कुठंही धक्काबुक्की वगैरे नव्हती.

प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स जागोजागी ठेवले होते. वारी मार्गावर पालखीच्या मागून सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक गट दिसला – त्यामुळे वारी मार्गावर फारसा कचरा दिसत नव्हता. अनेक लोक नाश्ता-चहा-फळं-पाणी मोफत वाटत होते. मार्गावर अनेक ठिकाणी सरकारी वैद्यकीय पथकं (रुग्णवाहिकेसह) उपस्थित होती आणि वारकरी त्या सेवेचा लाभही घेताना दिसत होते. फिरत्या शौचालयांची व्यवस्था असल्याचं मी वाचलं होतं, पण वाटेत मला ती कुठं दिसली नाहीत. ती कदाचित फक्त वारीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी असतील – पण मधल्या मार्गावरही खरं तर शौचालयाची व्यवस्था पाहिजेच.

 



निदान मला तरी पायात चप्पल नसलेला वारकरी (पुरूष-स्त्रिया) दिसला नाही. स्त्रियांनी टोप्या आणि उन्हापासून रक्षणासाठी सनकोट घातलेले दिसले. अनेक स्त्रिया त्यांचं सामान डोक्यावर घेऊन चालताना दिसल्या. शेतकरी-कष्टकरी वर्गातून वारकरी येत असल्याने कुपोषित म्हणता येईल इतक्या तोळामासा प्रकृतीचे काही लोक दिसले. नवा महामार्ग तयार करताना झाडं तोडून टाकल्याने आता हा पालखी मार्ग म्हणजे नुसता रखरखीत आणि वैराण प्रदेश झाला आहे. दुपारच्या विश्रांतीच्या वेळात ऐन उन्हात वारकरी डांबरी रस्त्यावर झोपले होते – ते पाहून वाईट वाटलं.

 


कोणताही धार्मिक उत्सव हा एक बाजारदेखील असतो. वारीच्या बाजूला रस्त्यावर असंख्य दुकानं होती – चपला, कपडे, कुल्फी, सोडा वॉटर, पाणी, गोडीशेव-रेवडी-फरसाण असा कोरडा खाऊ, प्लास्टिकची खेळणी, मोबाईल दुरुस्ती, अगदी मोबाईलचा गोरिला ग्लासही तिथं विकायला होते, आणि वारकरी तिथं जाऊन खरेदीही करत होते. अनेक वारकऱ्यांच्या हातात साधे मोबाईल (स्मार्ट नसलेले) दिसले.

दिंडीतल्या अनेकांशी बोलणं झालं. ७४ वर्षांचे एक आजोबा गेली चाळीस वर्ष नियमित वारीत जातात. नियमित वारी करणाऱ्या अनेक स्त्रियांशीही थोडंस बोलता आलं. काहीजणी अनेक वर्ष वारीत येत आहेत. इठ्ठलाचं नाव घेत चलायचं, बाकी काई नाई बगा असं त्यांचं भक्तीचं सूत्र त्यांनी मला सांगितलं. सविस्तर बोलायचं तर जास्त वेळ वारीत सामील व्हायला पाहिजे हे जाणवलं.

वारकऱ्यांची एवढी मोठी संख्या असून कुठंही स्पीकर्सच्या भिंती नव्हत्या हे फार छान वाटलं. टाळ-मृदुंगाच्या साथीने प्रत्येक दिंडीत हरिपाठ-अभंग असं काहीतरी चालू होतं. एकजण पुढं सांगणार आणि उर्वरित दिंडी त्याच्यापाठीमागे गाणार असं त्याचं स्वरूप होतं. तालासुरात पक्के होते वारकरी. फक्त एकाच दिंडीत स्त्रिया गाताहेत आणि बाकी दिंडी त्यांच्यामागे गातेय असं दिसलं – बाकी सर्वत्र मुख्य गायकाचा मान पुरूषांनाच होता. तुळशीवृंदावन फक्त स्त्रियांच्या डोक्यावर दिसलं आणि वीणा फक्त पुरूषांच्या गळ्यात दिसली. स्त्रियांच्या डोक्यावर विठ्ठलाच्या मूर्ती, कलश हेही दिसले.  टाळ-मृदुंग वाजवणारेही फक्त पुरूष होते. पताका (भगवा ध्वज) मला फक्त एका स्त्रीच्या हातात दिसला. पण अर्थात दहा किलोमीटर वारीबरोबर चालताना मला सगळंच दिसलं असा माझा दावा नाही – मी फक्त मला काय दिसंल ते नोंदवते आहे. स्त्रियांच्या आणि पुरूषांच्या संख्येत मात्र फारसा फरक दिसला नाही. 



बुऱ्हाणपूरला आम्ही पालखीसोबत चालणं थांबवून भैरोबानाथ मंदिरात आलो. मंदिराच्या अंगणात प्राथमिक शाळा आहे, तिथं आमच्या जेवणाची व्यवस्था होती. वाटेत आमचा एक सहकारी मंदिराची दिशा विचारता झाला तर ते गृहस्थ आम्हाला त्यांच्याकडं जेवणाचा आग्रह करायला लागले. माऊली, आपल्याकडंही आहे भाजी-भाकरी, कशाला उन्हात तिथंवर जाताय हा त्यांचा आग्रह ऐकून मला तर त्यांच्याकडं जेवायचा मोह झाला होता. पण गटातल्या इतरांना चिंता नको म्हणून त्यांना नम्रपणे नकार देत मीही मंदिराकडं गेले.

पिठलं-भाकरी-ठेचा-भात-आमटी-बुंदी असं आग्रहाने वाढलेलं जेवण झाल्यानंतर सुस्ती येऊ लागली होती. पण तरूण कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण गीतांनी सगळ्यांना जागं केलं. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, वर्षा देशपांडे. शामसुंदर सोन्नर महाराज, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील या सर्वांनी समता दिंडीमागची भूमिका, आणि तिची वाटचाल याविषयी आम्हाला सांगितलं.

एक दिवस तरी वारी अनुभवावी उपक्रमाचं आयोजन अतिशय नेटकं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आम्हा लोकांना कुठंही अडचण आली नाही. नेमक्या सूचना आणि चांगलं नियोजन या दोन्ही गोष्टींमुळेच हे शक्य झालं. या उपक्रमामागे अनेक कार्यकर्त्यांनी श्रम घेतले आहेत, त्या सर्वांचे आभार.

एक दिवसाचा वारीचा माझा अनुभव अतिशय चांगला होता. पण ....

पण तरीही अनेक प्रश्न पडले. वारीचं आता एखाद्या व्हॉट्सऍप ग्रुपसारखं झालंय. एका विशिष्ट उद्देशाने आपण ग्रुप करतो. पण त्या ग्रुपवर मोदींची अमेरिका वारी, पाऊस कसा मोजायचा, पुल देशपांडे यांचे व्हिडिओ, आदिपुरूष सिनेमा बघा (किंवा बघू नका), चीनमधला एखादा पूल, २१ जूनला सर्वात मोठा दिवस का असतो.... असे वाट्टेल ते निरोप येत राहतात. विठ्ठलाच्या नामाचा गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांवरही विविध क्षेत्रातले लोक येऊन माहितीचा भडिमार करत असतात. संविधान आणि वारी प्रथा यांच्यातलं साम्य शोधण्याचा प्रयत्न हा प्रयत्न म्हणून कौतुकास्पद असला तरी तो वारीत कितपत परिणामकारक होत असेल याविषयी मला शंका आहे. एका उद्देशाने जमलेली गर्दी दुसऱ्या प्रकारच्या संदेशांकडे दुर्लक्ष करत असते हा नेहमीचा अनुभव आहे.

व्यक्ती म्हणून एक दिवस वारीत सामील होणं हे मी समजू शकते. पण विचारांचा प्रसार करण्यासाठी समूहाने वारीत सामील होणं हे काही माझ्या तितकंस पचनी पडलं नाही. आपली विठ्ठलावर भक्ती नसताना उगीच लोकानुयय करण्यासाठी एक दुसऱ्यांना आपण माऊली म्हणणं किंवा नमस्कार ऐवजी रामकृष्णहरी म्हणणं हे काही माझ्याच्याने झालं नाही. आणि त्याबद्दल मला खंतही नाही.

धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याच्या नादात जसं छद्मविज्ञानाला (pseudoscience) बळ मिळालं तसाच काहीतरी प्रकार वारी आणि संविधान यांची सांगड घालण्यातून निर्माण तर होणार नाही ना अशी भीती वाटते. संतांचे निवडक अभंग निवडून त्यात संविधान शोधणं मी समजू शकते. अभ्यास म्हणून हे करण्याजोगं आहे. पण केवळ तेवढ्या आधारावर वारी परंपरा राज्यघटनेच्या मूल्यांना आविष्कृत करते असा निष्कर्ष काढणं घाईचं आहे. वारीत सामील होणारे लोक ज्या गावांतून येतात, त्या गावांतल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यावरच काही नेमकं म्हणता येईल. अन्यथा धर्म आणि व्यवहार यांना पूर्ण वेगळं ठेवण्याचं कौशल्य आपला समाज (एकूणच मानवी समाज) नेहमीच दाखवत आला आहे.

राज्यघटना व्यक्तीचं धर्मस्वातंत्र्य मानते – पण ती कुठलाही धर्म मानत नाही. अशा परिस्थितीत एका धार्मिक – सांस्कृतिक उत्सवावर राज्यघटनेने दिलेल्या मूल्यांचं प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न अनेक क्रिया-प्रतिक्रियांना जन्म देण्याची शक्यता आहे.

या साऱ्या प्रयत्नांतून अधिकाधिक वारकरी संविधानाची मूल्ये मानायला लागलेत की उपक्रमात सामील होणारे लोक अधिकाधिक भक्तीमार्गाकडं वळायला लागलेत (किंवा भक्तीमार्गावर श्रद्धा असणारेच उपक्रमात अधिकाधिक सहभागी व्हायला लागलेत) या एका प्रश्नाचं उत्तर शोधलं तरी अशा प्रकारच्या उपक्रमांची प्रासंगिकता (relevance) लक्षात येईल असं वाटतं.

वारीत एक दिवस चालणं हा एकंदर विचारांना चालना देणारा अनुभव होता.