रोहित, उजनी जलाशय परिसर, डिसेंबर २०१२

Wednesday 22 May 2013

१६७. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १३ जगत्

भाग १२. ब्रह्म

सगुण आणि निर्गुण हे दोन्ही प्रकारचे ब्रह्म स्वीकारले म्हणजे जगाबाबतचा प्रश्न मिटला असे मात्र नाही! उलट तो अधिकच गुंतागुंतीचा बनतो. या जगाची निर्मिती कोणी केली? सगुण ईश्वराने? कधी? मग त्याआधी काय होते? ही निर्मिती कशापासून केली?  दुस-या एखाद्या वस्तूपासून? मग या दुस-या वस्तुचे स्थान ईश्वराच्या बरोबरीचे होते का? ईश्वर तर सर्वव्यापी आहे मग ईश्वरापासून भिन्न अशी ही दुसरी वस्तू कोठे होती?

की ईश्वराने ही सृष्टी स्वत:तूनच निर्माण केली? ‘सृष्टी निर्माण करावीअशी इच्छा त्याला कशी काय निर्माण झाली? अशी इच्छा निर्माण झाली याचाच अर्थ तो 'अकामहत्’ नाही. शिवाय हे जग जर ईश्वरापासूनच बनले असेल तर मग त्याच्यात वाईट गोष्टी आल्या कोठून?

या जगाला खरे म्हणजे काही अस्तित्वच नाही, ते केवळ भासमान होते (त्याचा आपल्याला भास होतो)  असे तर नाही? ते वास्तवात नाही पण केवळ आपल्याला प्रतीत होते असे तर घडत नाही ना? पण मग माणसांची सेवा वगैरे सगळया गोष्टीही भासमान नाहीत का? माणसे भूकंपाने मरोत अथवा अपघाताने, प्लेगने मरोत अथवा दुष्काळाने ..................या भासमान जगात सेवाकार्य करणे म्हणजे वेडेपणाच आहे. त्या सेवाकार्याने असे काय मोठे साधले जाणार आहे? पण विवेकानंद तर त्यांच्या गुरुबंधुंना आणि अनुयायांना अशा सेवाकार्यांसाठी सतत उद्युक्त करत. प्लेगग्रस्त भागातील मदतकार्यासाठी पैसा कमी पडतो म्हणून हेच विवेकानंद रामकृष्ण मठासाठी घेतलेली जमीनही विकायला तयार होतात!! .... या सगळया परस्परविरोधी विचारांची संगती कशी लावायची? जगाविषयी विवेकानंदांचे नेमके मत तरी काय आहे?

शंकराचार्यांचे जगाविषयी मत समजून घेणे तुलनेने सोपे आहे. त्यांनी सृष्टीच्या प्रक्रियेची चर्चा केली आहे. पंचीकरणाविषयी सांगितले आहे. पण शंकराचार्यांची जगाविषयीची चर्चा केवळ व्यावहारिक’ (पारमार्थिक, प्रातिभासिक आणि व्यावहारिक या सत्तात्रयाचे विवेचन आपण आधी पहिले आहे) पातळीवरुनच सत्य आहे. या जगाविषयीची आपली जाणीव, त्यातला आपला व्यवहार, त्यातील आपली सुखदु:खे ...... हे सारे काही खरे आहे पण कोठवर? जोवर आपण व्यावहारिक पातळीवर आहोत तोवरच! परमार्थिक पातळीवरुन पाहता या जगाला मुळी वास्तविकताच नाही. पारमार्थिक सत्तेच्या दृषिटकोनातून बोलायचे झाले तर 'अगा जे घडलेचि नाही, तयाची वार्ता पुससी कायि?  अशीच ही स्थिती  आहे!

विवेकानंदांना केवलाद्वैत वेदान्ताची, निर्गुण ब्रह्माची, पारमार्थिक सत्तेची कल्पना पूर्णत: मान्य आहे. पण त्याचबरोबर जगाची सत्ता - त्याची सत्यताही त्यांना मान्य आहे. जगाचा विचार करताना रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांच्या संकल्पना विवेकानंदांना जास्त जवळच्या वाटतात असे दिसते. ब्रह्म (किंवा विष्णु किवा श्रीहरी) सर्वशकितमान आणि सत् आहे. त्याची निर्मिती असणारे हे जग मिथ्या अथवा असत् कसे बरे असेल? त्’पासून असत्’ कसे निर्माण होईल?

विवेकानंदांची भूमिका थोडक्यात खालील प्रकारे मांडता येईल. ' ब्रह्म सत्यं, जगत् सत्यं, जीवो ब्रह्रौव नापर: निर्माता आणि निर्मिती यांच्यातील भेद कायम स्वरुपाचा नाही. पारमार्थिक पातळीवर ब्रह्म आणि जगत् असा काही भेद नसतोच - कारण 'सर्व खल्विदं ब्रह्म. पण विवेकानंदांच्या मते केवळ ब्रह्मच नव्हे तर जगदेखील सत्य आहे.

हे जग काय आहे? तर अनंत, अनिर्वचनीय, निर्गुण, निराकार ब्रह्माची सान्त रुपातील अभिव्यक्ती आहे. 'अनंत सान्त कसे होईल? हा प्रश्न तर्कदृष्टया चुकीचा आहे. जे अनंत आहे ते आपल्या इच्छेने सान्त रुप का बरे धारण नाही करु शकणार? सान्त रुप ही त्याची पूर्ण अभिव्यक्ती नाही याचा मात्र आपल्याला कदापि विसर पडता कामा नये. समुद्रातले पाणी जर आपण एखाद्या वाटीत भरुन घेतले तर त्या पाण्याची चव थोडीच बदलते? तसेच काहीसे हे अनंत-सान्ताचेही आहे. एखाद्या राजाला एके दिवशी विनाकारणच भिकारी बनून राज्यात भटकायची इच्छा होते. आता राज्याचा मालकच तो! त्याच्या इच्छापूर्तीसाठी त्याला काही कोणाची परवानगी वगैरे घेत बसावे लागत नाही! त्याला अडवणार तरी कोण? पण म्हणून काही हा राजा एखाद्या खरोखरच्या भिका-यासारखा तहान-भुकेने व्याकूळ होत नाही. पण सोंग घेतलेल्या काळापुरता तो भिकारी खोटाही ठरत नाही.

हे अनंत ब्रह्म सान्त जगात कसे परिणत, परिवर्तित झाले हा प्रश्न आता समोर उभा राहतो. ज्ञानयोगावरील प्रवचनांमध्ये विवेकानंदांनी या परिवर्तनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. विवेकानंद म्हणतात की, या जगाला भौतिक अस्तित्व आहे असे मानण्याची चूक आपण सारेचजण करतो! पण वास्तविक पाहू गेल्यास या जगाचे अस्तित्व  मानसिक आहे!

विवेकानंद पुढे म्हणतात की, या जगाला निरपेक्ष अस्तित्व नाही, याला फक्त सापेक्ष अस्तित्व आहे. केवळ तुमच्या, माझ्या नि इतर प्रत्येकाच्या मनाच्या बोधाच्या सापेक्षानेच या जगाला अस्तित्व आहे. सारांश, त्याचे अस्तित्व आमच्या मनावर अवलंबून आहे. आपल्या पाच इंद्रियांच्या द्वारा आपल्याला या जगाचा प्रत्यय येत असतो. पण तेच जर आपल्याला आणखी एखादे इंद्रिय असते तर हेच जग मग आणखी काही निराळेच भासले असते.

यावरुन काय निष्कर्ष निघतो? हाच की, या जगाला निरपेक्ष, शाश्वत असे अस्तित्व नाही - त्याला न बदलणारे, न चळणारे, न संपणारे अस्तित्व नाही. पण त्याचबरोबर त्याला अस्तित्वच नाही असेही म्हणता यायचे नाही. कारण हे जग आहे हे आपण प्रत्यक्ष बघतो, अनुभवतो. या जगात राहून त्यातूनच आपल्याला मार्ग काढतच आपल्याला जगायचे असते. मग हे जग नाही असे म्हणणे ही एक प्रकारची स्वत:चीच फसवणूक केल्यासारखे होईल. म्हणजेच काय तर हे जग आहेही आणि नाहीही - ते आहे नाहीचे, त् असत् यांचे मिश्रण आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा विवेकानंद शंकराचार्यांच्या विचारसरणीच्या निकट आलेले दिसतात. पण विवेकानंदांचा मार्ग शंकराचार्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. विवेकानंदांच्या माया संकल्पनेचा आपण नंतर विचार करु. तत्पूर्वी  त्यांच्या मते अनंताचे सान्त कसे होते या मुद्याकडे वळू.

निर्गुण ब्रह्मातून जगाच्या निर्मितीची विवेकानंदांची कल्पना आपल्याला पुढील प्रकारे सांगता येते. जगत हे काल, देश, कारणातून आपल्याला दिसते, अन्यथा ते अनंत ब्रह्मच आहे या विवेकानंदांच्या विधानाचा अर्थ आपण आता पाहू . 

 ब्रह्मामध्ये देश, काल, कारण यांचा अंतर्भाव होत नाही. ब्रह्मामध्ये कोठल्याही प्रकारचे परिवर्तन होऊन जगत् अस्तित्वात येत नाही - ब्रह्म अनंत आणि सर्वव्यापी असल्याने त्याचे परिवर्तन होणार तरी कशात?  ब्रह्माच्या 'बाहेर असे काहीच नसते. ब्रह्माहून वेगळे असे 'दुसरे काहीही नसते. त्यामुळे ब्रह्मामध्ये परिवर्तन होण्याचा प्रश्नच  उदभवत नाही.

वेळेची कल्पना विचारांच्या सापेक्ष असते हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला असेलच. वेळ सापेक्ष आहे हा आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांताचा एक महत्त्वाचा पैलू आहे. बसची वाट पाहत आपण जेंव्हा रांगेत उभे असतो तेंव्हा पाच मिनिटे एका तासासारखी वाटतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात 'एक पल जैसे; एक युग बीता अशी आपली अवस्था होते. पृथ्वीवरची वेळ, चंद्रावरची वेळ या सा-या  भिन्न गोष्टी आहेत. वेळेचे आणि अवकाशाचे - मितींचे जवळचे नाते आहे हेही आपण जाणतो. ब्रह्मामध्ये असा कोणत्याही प्रकारचा बाहय विचार अथवा बल नसल्याने ब्रह्म कालातीत आहे.

ब्रह्म हे एकमेवाद्वितीय असल्याने कारण कार्य असा भेद त्याच्याबाबतीत संभवत नाही. ब्रह्म स्वजातीय, विजातीय व स्वगत भेदांच्या पलिकडे असल्याने कोठले कारण अन कोठले कार्य ?
म्हणून सृष्टीक्रियेचा उदय झाल्यावरच देश-काल-कारण यांचा उदय झाला असे आपल्याला म्हणावे लागते.

यातून काही प्रश्न नव्याने उदभवतात. देश-काल-कारण हे कोठून येतात? कशातून उगम पावतात? जर ते ब्रह्मामध्ये नसतील तर मग ते कोठे असतात? त्यांची अशी काही स्वतंत्र सत्ता आहे की काय? मग ब्रह्माच्या अविचिछन्न सत्तेचे काय?

विवेकानंद या प्रश्नाचे उत्तर अतिशय सहजपणाने देतात. ते असे म्हणतात की, देश-काल-कारण हे वास्तविकरीत्या नाहीत, तर ती केवळ रुपे आहेत. त्यांची स्वतंत्र अशी सत्ता नसल्याने त्यांना वास्तविक अस्तित्व आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. काळ ही संकल्पना तर, वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते (म्हणजे प्रत्यक्ष काळ नाही, कारण त्याबाबत काही सर्वमान्य नियम आपण बनवले आहेत – पण त्या काळाविषयीचा आपला अनुभव). तीच स्थिती  देशाची. इथं देश या शब्दाचा अर्थ भारत देश असा नसून दिक्, अवकाश अथवा  space असा घ्यायचा आहे. आगगाडीचे समांतर धावणारे रुळ दूरवर एकमेकांना जोडले गेले आहेत असे आपल्याला दिसते. विमानातून पाहिले असता जमिनीवरील माणसे मुंग्यांसारखी दिसतात. आगगाडीतून प्रवास करताना जमीन आणि झाडे धावत आहेत असे आपल्याला वाटते.

देश-काल-कारण यांना स्वतंत्र अस्तित्व  नाही याचे दुसरे एक कारण असे की त्यांना फक्त 'स्वत:चे असे अस्तित्व नाही. कोठल्यातरी वस्तूच्या संदर्भातच त्यांना अस्तित्व  असते. आपण नुसत्या अवकाशाचा विचार करु शकत नाही, तो नेहमीच कोणत्यातरी वस्तूच्या सापेक्षच असतो. आपण नुसत्या वेळेचा विचार करु शकत नाही, तो नेहमीच कोणत्यातरी घटनेच्या अथवा प्रसंगाच्या सापेक्ष असतो - मग तो भूत, वर्तमान, भविष्य कोणताही काळ असो! कार्यकारणभावालाही तोच तर्क लागू होतो.

देश-काल-कारण ही केवळ अशी रुपे आहेत की ज्यांच्या माध्यमातून ब्रह्म या जगाची निर्मिती करते. देश-काल-कारणाला कायमचे अस्तित्व नसते हे जितके खरे तितकेच हेही खरे की ती संपूर्णतया खोटी असत नाहीत. समुद्राचेच उदाहरण घ्या ना! समुद्राच्या लाटा ख-याच असतात, पण त्या लाटा म्हणजे समुद्र नव्हे. उसळत्या लाटा हे त्या अथांग सागराचे केवळ एक रुप असते. समुद्राचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्याला केवळ लाटांवर अवलंबून राहावे लागत नाही - लाटांविनाही समुद्र समुद्रच असतो.
हे जगही या सागरासारखेच आहे. ते नामरुपात्मक ब्रह्म आहे आणि म्हणून ते सत्यच आहे. हे नामरुप लयास जाऊन जग ब्रह्मात विलीन होईल तेंव्हा होईल, तोवर हे जग सत्यच आहे. अन् या जगात आणि या जगासाठी आपल्याला अविरतपणे काम केलेच पाहिजे.

एका अर्थी शंकराचार्यांचे 'जगन्मिथ्या’ हे प्रचलित असलेले मत विवेकानंदांना मान्य नाही असेही म्हणता येईल. कारण जगाचे मिथ्यत्व मान्य केल्याने आपल्यापुढचे जगातले व्यावहारिक प्रश्न नष्ट होत नाहीत याची विवेकानंदांना जाणीव आहे. जगन्मिथ्या’ ही त्यांना एका दृष्टीने पळवाट वाटते किंवा व्यवहाराचे भान सोडून अती ताणलेली तर्ककठोर भूमिका वाटते. शंकराचार्यांची ‘जगन्मिथ्या’ ही भूमिका त्यांच्या अनुयायांना नीट समजली नाही आणि त्यांनी ती चुकीच्या पद्धतीने राबविली असेही विवेकानंदांचे मत आहे. सत्तात्रयाची शंकराचार्यांची भूमिका नीट समजावून न घेताच इतर आचार्यानी त्यांच्यावर टीकेची झोड उडविली अशी विवेकानंदांची धारणा आहे.

'ईश्वराने सहा दिवस जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली अशा प्रकारचे मत विवेकानंदांना निव्वळ हास्यास्पद वाटते. जगाची निर्मिती करुन देव दमला असे म्हणणे म्हणजे ईश्वराची थटटाच केल्यासारखे आहे. वस्तुत: जगाची उत्क्रांती चालूच आहे, जगाची प्रगती चालूच आहे. जग पूर्ण तयार, एखादे final product नाही असे विवेकानंदांचे ठाम मत आहे.

अर्थात डार्विनच्या उत्क्रांतीवादापेक्षा विवेकानंदांचा उत्क्रांतीवाद भिन्न स्वरुपाचा आहे. 'पहिला जीव कसा निर्माण झाला?’ याचे उत्तर डार्विनकडे नाही. विवेकानंदांना वाटते की, “The story of the world is the story of the unfolding of the rudimentary elements into their more clearly expressed forms.”

हे जग खरे आहे आणि म्हणूनच यात आपण कार्य केले पाहिजे. जोवर या जगातील सुखदु:खांनी आपण पोळले जात आहोत तोवर ब्रह्माच्या अन मायेच्या व्यर्थ गप्पा मारुन उपयोग नाही. आपल्याला काम हे केलेच पाहिजे, ईश्वराचे कार्य म्हणून केले पाहिजे. श्री मुजुमदार याबाबत लिहितात, For Swami Vivekananda, the world was real so long as his mission in his life was to be fulfilled. After his work was done, the Swami was convinced that he would transcend the material world and merge in the Supreme Oneness.‟ 

क्रमश: 

Sunday 12 May 2013

१६६. फुस्स ...


दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.

आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.

दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.

दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते.
आताशिक सकरात आली जवळ.
मंग आताबी पयलीतच –हाणार की!

म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला”
दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”.

येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!

Monday 29 April 2013

१६५. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १२. ब्रह्म

भाग ११ 

सगुण आणि निर्गुण

विवेकानंदांचा ब्रह्मविषयक विचार जर सांगायचा झाला तर तो 'सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण अशा शब्दांत सांगता येईल. निर्गुण ब्रह्म विवेकानंदांना भयावह अथवा राक्षसी वाटत नाही. पण मानवी मनाला सगुण ब्रह्माची, ईश्वराची गरज आहे हेही ते जाणतात. या दोन्ही स्वरुपांना एकाच वेळी स्वीकारण्यात विवेकानंदांना कसलीही विसंगती, विरोधाभास वाटत नाही. कारण त्यांच्या मते हे दोन्ही शब्द म्हणजे एकाच अंतिम सत्याकडे पाहण्याचे दोन विभिन्न दृष्टिकोन होत. ज्याची जी गरज, त्याने तो मार्ग चालावा - यात भांडण्याचा प्रश्न येतोच कुठे?

एखाद्या व्यक्तीला तिचा मुलगा बाबा म्हणून हाक मारेल, तर भाची मामा म्हणेल. बाबा, मामा हे त्या व्यक्तीशी हाक मारणाराचे नाते दर्शवितात. ती व्यक्ती मात्र एकच असते. कोणी ब्रह्म सगुण आहे असे सांगेल तर कोणी म्हणेल की ब्रह्म निर्गुणच आहे असे म्हणेल. यामुळे आपण गडबडून गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण सगुण आणि निर्गुण हे दोन्ही शब्द अंतिम सत्तेशी त्या व्यक्तीचे असणारे नाते दाखवितात. सगुण आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे एकच असा अर्थातच या उदाहरणाचा अर्थ नाही. याचा सविस्तर उहापोह आपण यापुढच्या विवेचनात करणार आहोत.

ईश्वर

सगुण ब्रह्म म्हणजे विवेकानंदांचा ईश्वर. खरोखर देव आहे का? असा प्रश्न जर आपण विवेकानंदांना केला तर ते आपल्यावर रागावणार नाहीत. कारण कोणे एके काळी हाच प्रश्न घेऊन विवेकानंद भिरीभिरी हिंडले होते. आणि दक्षिणेश्वरचा तो पुजारी जेंव्हा  होय! मी तुला पाहतो त्याहून कैक पटींनी स्पष्टपणे ईश्वराला पाहतो”, असे म्हणाला; तेंव्हा अवाक् झाले होते.

आपली ईश्वरावर खरीखुरी श्रद्धा आहे का? - असा प्रश्न विवेकानंद आपल्याला आवेशाने विचारतात. रस्त्यावरील कोणत्याही माणसावर आपण विश्वास ठेवतो. जगातील कोणत्याही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो. पण ईश्वरावर मात्र आपला विश्वास नसतो अशी खंत विवेकानंद व्यक्त करतात. आपण तोंडाने ईश्वरावर विश्वास असल्याचे बोलतो. पण प्रत्यक्षात मात्र आपण त्या विश्वासाला जागून जगत नाही. म्हणजे आपला विश्वास हा उगाचच, केवळ शब्दांपुरता असतो. म्हणूनच विवेकानंद आपल्याला विचारतात, 'ईश्वरावर विश्वास असून त्याच्या प्राप्तीसाठी वेडे न होणे तुला शक्य आहे का? मला वाटते की स्वामीजींच्या या प्रश्नातील गर्भितार्थ आपल्याला आत्मपरीक्षणास उद्युक्त करेल.

रामकृष्णांना ईश्वराविषयी अवास्तव चर्चा करणे, वाद घालत बसणे आवडत नसे. ते म्हणत,  ''साक्षात्कार करुन घ्या. विवेकानंदांचेही तेच म्हणणे होते. कशाकरता आपण नुसतेच व्यर्थ बोलत राहायचे? विवेकानंद म्हणतात, आमचे ईश्वरत्व हेच खुद्द ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण होय. किती प्रगाढ वेदान्तनिष्ठा आहे ही! (हे वाक्य थोडे गोलांकारी आहे – म्हणजे आम्ही ईश्वर आहोत हे आधी मानायचे आणि मग त्यावरून ईश्वर आहे हे मानायचे! पण इथे तर्क बाजूला ठेवून भावनेतून बघितले तर या वाक्याचा अर्थ सोपा वाटतो – असे माझे मत!)

विवेकानंदांना सगुण ब्रह्म (ईश्वर) आणि निर्गुण  ब्रह्म यांचा एकाच वेळी स्वीकार करण्यात काहीच वावगे वाटत नाही. ब्रह्माच्या या दोन्ही संकल्पना एकमेकींना पूरक आहेत असे त्यांना वाटते. आता आपण ईश्वराच्या असितत्वाचे समर्थन त्यांनी कोणकोणत्या प्रकारे केले आहे ते पाहू.

प्रत्येकाला त्याने अथवा तिने इच्छा व्यक्त करताक्षणीच ईश्वरसाक्षात्कार होणे शक्य नाही ही व्यावहारिक अडचण विवेकानंद जाणतात. ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा देताना एखाद्याची डळमळीत झालेली श्रद्धा पुन्हा स्थिर व्हावी आणि माणसांनी ईश्वरसाक्षात्काराचा मार्ग चोखाळावा असाही त्यांचा एक सुप्त हेतू असावा. कदाचित त्यामुळेच 'ईश्वर अनिर्वचनीय आहे, त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणून भागणार नाही असे त्यांना वाटत असावे.

आपल्या अवतीभोवती जर आपण पाहिले तर भोवतालच्या जगात एक प्रकारचा नियमितपणा आढळून येतो. सृष्टीचे चक्र एका विशिष्ट त-हेने चाललेले आपण पाहतो. हे विश्व इतके विशाल आहे की साध्या मानवी शक्तीला त्याचे नियमन करता येणे अशक्य आहे. कोणी उच्च प्रकारचा देवच या जगावर नियंत्रण ठेवून असेल. तोच ईश्वर.

कार्यकारणभावाचा सिद्धान्त व्यवहारातही आपण मानतो. एखादी घटना घडली की 'ती याच प्रकारे का घडली असावी? असा विचार आपल्या मनात येतोच. जगत् हेही एक प्रकारचे कार्यच आहे. त्याचे कारण म्हणजेच ईश्वर.

वरवर दिसणा-या  विविधतेच्या अंतरंगात जर आपण डोकावून पाहिले तर आपल्याला एकतेचा प्रत्यय येतो. जगात किती विविध रंगांची, वर्णांची, वंशांची, रक्तांची, भाषा बोलणारी माणसे आहेत! पण या सर्वांमध्ये मनुष्यत्व नामक एक समान गोष्ट आहे. इतर वस्तू आणि माणसे यांच्यातही अस्तित्वाचे एक समान तत्त्व आहेच असे म्हणता येईल. जगात जे जे काही आहे ते एकाच शक्तीच्या वेगवेगळया स्पंदनांमुळे वेगवेगळे प्रतीत होते. ती एक सर्वव्यापी शक्ती म्हणजेच ईश्वर!

प्रेमातूनही विवेकानंद ईश्वरापर्यंत पोहोचतात. एक व्यक्ती दुस-या व्यक्तीवर का बरे प्रेम करते? कारण दुस-या व्यक्तीमध्ये प्रत्येक जण स्वत:लाच शोधत असतो. बहुतेक लोकांना आपल्यातील या सुप्त भावनेची जाणीव नसते हे खरेच! पण आपल्या सर्वांमध्ये समान असणारे ते सुप्त प्रेममय तत्त्व म्हणजेच ईश्वर.

ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विवेकानंद शब्दप्रामाण्याचाही आधार घेतात. हा आधार उपनिषदांचा आहे तसाच गीतेचाही आहे. अर्थात येथे एक समस्या अशी येते की सर्व हे सर्व प्राचीन ग्रंथ ईश्वरनिर्मित असल्याने आपण त्यांचे प्रामाण्य मानले पाहिजे असे आधी सांगितले जाते. आणि मग हे ग्रंथच ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करतात. म्हणजे 'अ चा आधार 'ब आणि 'ब चा आधार अशी स्थिती  निर्माण होते. पण या तार्किक विसंगतीकडे विवेकानंद साफ दुर्लक्ष करतात.

ईश्वर हा या जगाचा चित्रकार आहे अन हे जग म्हणजे त्याने काढलेले एक चित्र आहे अशी कल्पना विवेकानंद मांडतात. चित्रकार असल्याविना चित्र कोठून निर्माण होणार?  कवीशिवाय कविता जशी अशक्य तसेच हे जग ईश्वराविना अशक्यच आहे. या जगाच्या निर्मितीचे सारे श्रेय ईश्वराकडेच जाते.

ईश्वरसंकल्पनेची आवश्यकता हाही मुददा त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विवेकानंदांना पुरेसा वाटतो. मानवी जाणीवेच्या क्षेत्रात ज्याअर्थी ईश्वर नावाची संकल्पना आहे, त्या अर्थी ईश्वर आहेच असेही एक विधान विवेकानंद करतात.

आणि अनेक संतमहात्म्यांना झालेला ईश्वरसाक्षात्कार! तो तर ईश्वराच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा!! श्री. अमितकुमार मुजुमदार या संदर्भात असे लिहितात, Direct experience of God is the only positive proof of God’s existence, not only because other proofs leave a gap between the prover and the proved, but because religion is not a dogma with Hindus, but realization of potential divinity of man, since every man is potentially divine, or to put it in a different way, man and God – the Individual soul and the Universal soul are basically identical, no proof of God short of realization of this identity is of any value.

सगुण आणि निर्गुण या दोन्हीही संकल्पना माणसांच्या आध्यात्मिक विकासाला आवश्यक आहेत. किंबहुना मानवाचा आध्यात्मिकदृष्टया विकास व्हावा म्हणूनच सगुण ईश्वराची संकल्पना आली आहे. एका अर्थी पाहायला गेले तर सारे देव 'मानवनिर्मित आहेत. माणसांचा देव माणसासारखाच लढाया करतो, त्याला राग येतो आणि खुषीत असला की, तो समोरच्याला हवे ते तो उदारपणे देतो.

निर्गुण ब्रह्माची संकल्पनाच अतिशय सर्वोच्च आहे, श्रेष्ठ प्रतीची आहे, हे विवेकानंद स्पष्टपणे सांगतात. फक्त ईश्वराचीच म्हणजे सगुण ब्रह्माचीच कल्पना आपण मान्य केली तर त्यातून अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक आणि व्यावहारिक समस्या उदभवतात. सगुण ईश्वर हा अनंत कल्याणमय असतो, दयाळू असतो, सद्गुणांचे भांडार असतो. पण मग या त्याच्या जगात सारे काही चांगले कोठे आहे? सैतानी आणि पाशवी प्रवृत्ती आपल्या सभोवताली आहेतच. खून आहेत, दरोडे आहेत, अपघात आहेत, दंगली आहेत, घातपात आहेत, बलत्कार आहेत, युद्ध आहे .....................थोडक्यात काय तर हे जग म्हणजे चांगले आणि वाईट यांची एक सरमिसळ आहे!

आपण जर फक्त सगुण ईश्वराचेच अस्तित्व मानले तर त्याच्यातून वर उल्लेख केलेल्या सा-या  गोष्टी आपल्याला बाजूला कराव्या लागतील. कारण ईश्वर दयाळू आहे - तो क्रूर गोष्टी कशा करेल? मग आपल्याला चांगले आणि वाईट, शुभ आणि अशुभ अशा दोन्ही गोष्टींचे अस्तित्व एकाच वेळी मान्य करावे लागते. ईश्वर आणि सैतान यांची सत्ता एकाच वेळी मान्य करणे याचा अर्थ असा होतो की ईश्वराचे अस्तित्व , त्याची सत्ता मर्यादित आहे. मग त्याचे अनंतत्व, सर्वव्यापित्व नाहीसे होते. या समस्येची उकल करण्यासाठी सगुण ईश्वराच्या पलिकडे जाणे आवश्यक ठरते.

एकदा का आपण निर्गुण ब्रह्माची संकल्पना स्वीकारली की मग हा प्रश्न उरतच नाही. सर्वशक्तिमान  ईश्वर सैतानाला हाकलून का देवू शकत नाही किंवा त्याने सैतानाला कोठे हाकलून द्यावे अशा प्रकारचा वाद निर्गुण ब्रह्माच्या स्तरावर निर्माणच होऊ शकत नाही. कारण चांगले-वाईट हे सापेक्ष जगाच्या पातळीवरचे, व्यावहारिक पातळीवरचे असते. पारमार्थिक पातळीवरुन व्यावहारिक पातळीवरचे सत्य (आणि म्हणून सर्व काही) बाधित होते हे आपण शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेल्या सत्तात्रयाचा अभ्यास करताना सविस्तर पाहिले आहेच. निर्गुण  ब्रह्म स्वत: चांगले किंवा वाईट नसते तर ते त्या दोहोंच्याही पलिकडचे असते. ते त्रिगुणातीत असते.

हे सगळे ठीक आहे! पण सामान्य माणसाची भावनिक आणि आध्यात्मिक भूक भागवायला निर्गुण  ब्रह्म अगदीच निरुपयोगी आणि निकामी असते. माणसाने मग कशावर श्रद्धा ठेवायची असाच मूलभूत प्रश्न अशा परिस्थितीत समोर येतो. ब्रह्म केवळ निर्गुणच असेल तर माणसाने कोणाची प्रार्थना करायची? कोणाची भक्ती करायची? त्याने कोणाचे गुणवर्णन गायचे? कोणावर विश्वास ठेवायचा? कोणाला पाहायचे? ब्रह्म केवळ निर्गुणच असेल तर माणसाचे सारे भावविश्वच नाहीसे होऊन जाईल.

विवेकानंद म्हणतात, आपल्याला भगवंताचे दर्शन फक्त या मानवी रुपामधूनच होणे शक्य आहे. ते पुढे असेही म्हणतात की, आपण जोवर मनुष्य आहोत तोवर ईश्वरालाही मनुष्य समजण्यापेक्षा त्याच्यापेक्षा अन्य कोणतीही उच्च धारणा करणे आपल्याला शक्य नाही. ..................मानवी मन आणि बुद्धीला गोचर होऊ शकणारी निर्गुणाची सर्वोच्च धारणा सगुण ईश्वर हीच होय.

विवेकानंदांच्या मते एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. त्यात फक्त एखाद्या सर्वशक्तिमान स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुरपणा दिसून येतो. यावर उपाय काय? तर सगुण आणि निर्गुण दोन्हीही ब्रह्म मान्य करायचे! निगर्ुणाने सगुणाला बाधा येत नाही उलट निर्गुणामुळे सगुण समजायला सोपे जाते. स्वामीजी म्हणतात, निर्गुणाच्या धारणेमुळे सगुण धारणेचा नाश होईल असे मात्र नाही. निर्गुणाद्वाराच सगुणाचे यथार्थ आकलन होऊ शकते.

याचा अर्थ ईश्वर दोन आहेत असा नाही. अंतिम सत्ता एकच आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, निर्गुण आणि सगुण ब्रह्म म्हणजे पाणी आणि बर्फ यांच्यासारखे आहे. बर्फ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गोठलेले पाणीच असते आणि बर्फ वितळले की त्याचे पाणी होते. म्हणजे एकाच तत्त्वाच्या या दोन बाहयत: भिन्न अशा अभिव्यक्ती आहेत इतकेच!

ईश्वर सर्वव्यापी आहे. ईशावास्य उपनिषदात सांगितले आहेच की, 'ईशावास्यमिदम सर्वम - या सर्वामध्ये ईश्वराचा वास आहे. अर्थात या जाणीवेतून जगणे हे आपल्याला पहिल्या क्षणी जमणार नाही. पण क्रमाक्रमाने अथवा टप्प्याटप्प्याने आपण या सत्याचे आकलन करु शकतो. आपले कुटुंबीय, आपले शेजारी, आपले शहरवासी, आपले राज्य, आपला देश, आपले जग आणि आपले विश्व यांच्यात सर्वत्र आपण ईश्वर पाहू शकतो. पुढची पन्नास वर्षे हा देश म्हणजेच तुमचा ईश्वर. बाकी सा-या  देवतांकडे काही लक्ष देवू नका असे आवाहन स्वामीजी आपल्याला करतात तेंव्हा त्यामागे केवळ राष्ट्रवादाची भूमिका नसते तर ईश्वराच्या सर्वव्यापकत्वाची एक प्रखर जाणीवही असते.

विवेकानंदांचा ईश्वर मानवी स्वरुप् धारण करतो याबाबत आपल्याला काही आश्चर्य वाटायला नको. कारण वस्तुत: (प्रत्यक्षात नव्हे!) प्रत्येक माणूस ईश्वर नाही काय? सगुण ईश्वरामुळे मानवी मनाचे उत्थान होते आणि तोच त्याचा सर्वात मोठा फायदा आहे.

अर्थात सगुण ईश्वराच्या संकल्पनेचा भरपूर तोटाही या जगाने सोसला आहे म्हणा! मानवी मनाच्या पंथाभिमानाला धुमाकूळ घालायला सगुण ईश्वराचे एक चांगलेच निमित्त मिळाले आहे. माझाच देव किती चांगला, माझाच देव किती श्रेष्ठ यावरुन जो तो भांडत आहे. जगात सर्वात जास्त हिंसा आणि क्रौर्य हे ईश्वराचे नाव घेत, ईश्वरासाठीच झाले आहेत याची विवेकानंद आपल्याला आठवण करुन देतात. त्याउलट निर्गुण  ईश्वराच्या उपासकांत प्रचंड कर्मवीर, प्रचंड नीतिवीर उपजले आहेत. म्हणून निर्गुण  ब्रह्म हेच आपले ध्येय आहे.  सगुण ईश्वराचा आधार घेऊन अंतत: आपल्याला निर्गुण  ईश्वराप्रतच पोहोचायचे आहे याचा विसर पडता कामा नये. 

क्रमश: