Humayun Tomb, World Heritage Site, Delhi, December 11

Thursday 26 January 2012

११०. पडले तरी ...

फोन वाजला. गप्पा सोडून बाहेर गेले. 
एक फोन, त्यातून दुसरा, त्यातून तिसरा असं करत मी चांगली अर्ध्या तासाने आत आले. 
मी आल्यावर क्षणभर शांतता.
अंदाज होताच मला, तरीही मी निरागसपणे विचारलं, "काय बोलत होतात एवढ?" 
"मी आल्यावर शांत  का झालात?" हा मी स्पष्ट न विचारलेला प्रश्न अगदी स्पष्ट होता. 
"तुझ्याबद्दलच बोलत होतो अर्थात" धनश्री म्हणाली.
मी अनेक किस्से देते त्यांना बोलायला त्यामुळे त्यात मला काही नवं नव्हत, त्यांनांही नव्हत! 

आज मी चुकीच्या ठिकाणी उतरले होते. जागेची खात्री न करताच चारचाकी सोडून दिली होती.  
मग रिक्षावाले नाही म्हणाले  - कारण मला बरोबर विरुद्ध दिशेला जायचं होत. 
त्यावर रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता.
किंवा त्याहून म्हणजे एक फोन केला तर कोणीही मला तिथवर घ्यायला आलं असत - अगदी आनंदाने.
पण मी चालायला सुरुवात केली.
रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. सुनसान होता रस्ता. 
आजूबाजूला घरं - दुकान नव्हती. माणसही नव्हती. 
एकदम शांतता. 
पण हवा मस्त होती. 
मला चालायला मजा येत होती. 
सामान हातात थोड कमी असत तर चाललं असत - पण त्याने फार काही बिघडत नव्हत.

अशा रीतीने मी पाउण तास उशीरा पोचले होते. 
आणि त्यावरच माझ स्पष्टीकारण जेमतेम देऊन झालं होत, तोवर मी फोनमुळे बाहेर गेले होते.

"तुझा दृष्टिकोन फार सकारात्मक आहे , मला हेवा वाटतो तुझा ..." प्रिया  म्हणाली. 
"आणि कोणत्या अडचणींना घाबरत नाहीस तू" अनुराधा म्हणाली.
"असलं बोलून तुम्ही तिला बिघडवून टाकताय अजून" जयेश एकदम वैतागला होता. 
"का रे बाबा?" अमित बोललाच.
"अरे, ही चुकून भलतीकडे उतरली .. म्हणजे हिला इतक्यांदा इथ येऊनही रस्ता कळला नाहीये..." जयेश म्हणाला. 
"त्यात भर म्हणजे रिक्षा करावी किंवा आपल्याला फोन करावा हे तिला सुचलं नाही. ..." जयेशच चालूच.
"हो रे बाबा, पण मला चालायचं होतच .. कितीतरी दिवसांत मी अशी एकटी चालले नव्हते .. मग घेतली संधी ..." मी त्याला जरा शांत करायचा प्रयत्न केला. 
"तुला अंदाज होता तू किती मागे उतरली आहेस ते?" त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं.
"मला वाटल पंधरा मिनिटांत पोचेन मी इथवर .. " मी सांगायचा प्रयत्न केला.
"हेच मला तुझ आवडत नाही ..." आता संतोष खेळात सामील झाला.
"अरे बाबांनो,  माहिती आहे ना तुम्हाला हिचा स्वभाव ...." कीर्ति माझी बाजू घेत म्हणाली. 
"बदलायला नको का हा हिचा स्वभाव?" जयेश  मला आज एवढ्या गांभीर्याने का घेत होता, माहिती नाही. 


मग बराच काळ सगळ्यांनी एकेमेकांना सुनावण्यात गेला. मी शांत होते. मला अशी चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची सवय नाही. एरवी मी विषय बदलला असता .. पण आज मला कोणी दाद देत नव्हत. 


काही काळाने एक गोष्ट - जी बहुतेक जयेश, अमित, संतोष. ऋतुजा. मेघना  मघापासून सांगायचा प्रयत्न करत होते  - माझ्या लक्षात आली. 


एखाद्या प्रसंगात सकारात्मक दृष्टिकोन असण ही बाब वेगळी.
पण मी प्रत्येक प्रसंगातून  - मला काहीतरी शिकायला कसे मिळालं, मला त्यात कशी मजा आली  यावरच लक्ष केंद्रित करत असते!  हा माझा एक स्वभाव बनला आहे. 
ज्याच वर्णन आणखी एका प्रकारे करता येईल. ते म्हणजे 'पडले तरी नाक वर...' 
सकारात्मक दृष्टिकोनाच्या गोंडस नावाखाली मी केवळ बदलायला नकार देत आहे असं नाही तर मी माझ्या अहंकाराला पण खतपाणी घालते आहे. 


मी हसून म्हणाले, "बरोबर. एकदम कबूल. मला माझा स्वभाव बदलायला पाहिजे हे मला पटलं आहे ..." 
त्यावर सगळ्यांनी निश्वास टाकला.


त्यांचा आनंद क्षणभरच टिकला पण.
कारण पुढच्याच क्षणी मी मूळ पदावर जात म्हणाले, "आता यावर एक लेख लिहायला हरकत नाही ...." 

Wednesday 18 January 2012

१०९. इडली आणि पनीर


‘तू जाशील का चेन्नैला एका सेमिनारसाठी’ अस मला विचारलं, तेंव्हा मी लगेचच तयार झाले. चेन्नैला जायची संधी आली की मी एका पायावर तयार असते. तशी या शहरात मी एखाद्या रात्रीपुरता मुक्काम वगळता फारशी कधी राहिलेली नाही. पण अनेकदा कन्याकुमारीला जाण्यासाठी मुंबईहून थेट तिकीट नाही मिळालं; की चेन्नैला यायच आणि पुढची गाडी पकडायची असा खात्रीचा पर्याय असायचा. पुदुच्चेरीला जायची वाटही इथूनच आणि एकदा मी रमण महर्षी आश्रमात गेले तीही इथूनच. म्हणून चेन्नैची माझी फार ओळख नसली तरी या शहरावर माझ प्रेम आहे. चेन्नैवरच्या प्रेमाच आणखी एक छुपं कारण म्हणजे मला फिल्टर कॉफी आवडते आणि ती तिथं सहजगत्या मिळते, भरपूर मिळते. दहीभात खावा तर तिथलाच! आज ते शहर बदललं आणि मी तर त्याहून अधिक बदलले – पण चेन्नैच माझ नातं मात्र मजबूत आहे.

चेन्नैला पहिल्या रात्री जेवणात उत्तर भारतीय (म्हणजे पंजाबी) पदार्थ पाहून मी चकित झाले. त्या हॉटेलमधले वेटर्स छान हिंदी बोलत होते. दहीभात नाही हे ऐकल्यावर मी वेगवेगळे पर्याय देत गेले आणि दुर्दैवाने त्यापैकी एकही मिळत नव्हता. वेटरला माझ्या मागणीच नवल वाटत होतं, हे उघड होत. शेवटी त्यांच्यातला (बहुधा वरिष्ठ) वेटर येऊन मला म्हणाला, मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट उत्तर भारतीय जेवण देतोय, ते खाऊन तर बघा, तुम्ही दही- भात विसरून जाल .. खाण्याचे माझे फारसे नखरे नसतात. त्यामुळे मग मी पनीर, पराठा, आलू असे काहीबाही खाल्ले आणि भूक निभावून नेली.

दुस-या दिवशी सकाळच्या नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स, डबाबंद फळांचा रस, ब्रेड, बटर, ऑम्लेट, पुरी -भाजी  ... असे ठराविक पदार्थ होते आणि त्याच्या जोडीला होती नेस कॉफी. पुढचे दोन दिवस नेस कॉफीच मिळत राहिली – फिल्टर कॉफीची नामोनिशाणी नव्हती कोठेच. मी चेन्नैमध्ये आलेय की दिल्लीत असा प्रश्न मला पडला. माझ्या सोबतचे बहुतेक लोक तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतले होते आणि ते हे पंजाबी पदार्थ आवडीने खात होते – त्यांची कोणाचीच काही तक्रार नव्हती.

मग मी वेटर्सशी गप्पा मारल्यावर मला गंमतीदार माहिती मिळाली. या हॉटेलचा मालक होता पाटणा शहरातला एक माणूस. बहुतेक सारे वेटर्स पाटणा आणि इलाहाबादमधून आलेले होते. त्यामुळे ते पंजाबी – उत्तर भारतीय पदार्थ देत होते. त्यांनी कामचलाऊ तामिळ शिकून घेतले होते. ते अडीच तीन दिवस चेन्नैत मी भरपूर हिंदी बोलले, आणि मी बरेच पनीरही खाल्ले. मला शेवटपर्यंत तिथे ना इडली मिळाली, ना दहीभात ना फिल्टर कॉफी.

या अनुभवानंतर सुमारे दोनेक महिन्यांत मला कामानिमित्त पाटण्याला जावं लागलं. जिथं मी राहात होते, तिथं स्वाभाविकपणे दाल, रोटी, पनीर, आलू ..  अस उत्तर भारतीय खाणं मिळत होतं! त्यांच उपाहारगृह फारसं स्वच्छ नव्हतं आणि तिथली गर्दीही मला आवडली नाही. मी एकटीच होते आणि एकटया स्त्रीला पाटणा शहरात हॉटेलमध्ये एकटीने जाऊन खायला काय अडचण येते, याबाबत माझे सहकारी अगदीच अनभिज्ञ होते! असो.

एका संध्याकाळी कामावरून आल्यावर मला खूप भूक लागली होती. साधारण रात्री साडेआठच्या सुमारास मी बाहेर पडले. मला बाजूलाच एक दाक्षिणात्य पदार्थ मिळणारं हॉटेल दिसलं. तिथं गर्दी दिसत होती पण ती चांगली गर्दी वाटत होती. आत डोकावून पाहिलं, तर स्वच्छताही दिसली. मी आत गेले, निवांत बसून खाल्लं आणि तिथं मी झकास फिल्टर कॉफीही प्याले. पुढचे तीन दिवस रोज सकाळी आणि रात्री माझी तिथं फेरी होत राहिली. पाटणा शहरात राहून मी पनीर टाळू शकले; इतकच नाही तर मी तिथं माझ्या आयुष्यातले काही चविष्ट दाक्षिणात्य पदार्थही खाल्ले.

एक काळ असा होता, की तुम्ही ज्या भागात असाल, तिथं फक्त तिथलेच पदार्थ मिळत. देशाच्या दक्षिण भागात वावरताना समोरच्या माणसांच्या ताटातला ढीगभर भात पाहताना हसू यायच खरं; पण दोन तीन दिवसांत आपणही ढीगभर भात खातोय हे लक्षात यायचं. उत्तरेत वावरताना कधी ताटात न पडणारी जिलबी अन तीही दह्याबरोबर मी मजेत खायला लागले. समोसा, कचोरी आवडते की नाही  हा प्रश्न नव्हता, कारण तेवढे दोन पदार्थ सर्वत्र मिळायचे सहज. एका प्रकारे त्या त्या ठिकाणच अन्न खाण म्हणजे स्थानिक संस्कृतीशी नातं जुळलं जाण्याचा भाग होता. ज्या समाजात मिसळायचं, त्याच्या आवडी-निवडीशी एकरूप होण्याची ही प्रक्रिया होती. ‘अशी इडली/ असा समोसा/ असं पनीर / अशी दाल / अशी जलेबी ....’ तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही अस सांगत लोक आग्रहाने खाऊ घालायचे. आणि त्यांच्या या अभिमानात बरचसं तथ्यही असायचं.

जागतिकीकरणाच्या झपाट्यामुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे आता सगळी शहरं एकसारखीच वाटतात मला. शहरांचे चेहरे जणू हरवून गेले आहेत, त्यांची ओळख विसरली आहे. सगळ्या शहरात आता MacDonald, Reliance Fresh, Café Coffee Day  अशी तीच तीच नावं दिसतात. कोणी झोपेत आपल्याला एका शहरातून दुस-या शहरात नेलं, तर जाग आल्यावर फरक कळणही दुरापास्त आहे. शहरांना आता स्वत:च वेगळ व्यक्तिमत्त्व म्हणून काही राहिलेलं नाही – त्या शहराचा एक वास असतो, तोही विरून गेला आहे. सगळ जग फक्त एक ‘बाजार’ झालं आहे.

चेन्नैत पनीर आणि पाटण्यात इडली ही बदलत्या काळाची आणि हरवलेल्या दिवसांची चिन्हं आहेत. आपण आपल्याजवळ जे नाही त्याची कशी हाव धरतो ते यातून कळतं. आपली बलस्थानं, आपलं वैभव विसरून आपण दुस-यांची कशी नक्कल करण्यात मग्न आहोत हेही लक्षात येतं. आपण बाहेर वावरताना आपलं आतलं जग सोडायला तयार नाही – त्यामुळे बाहेरच जगही खरं तर आपल्याला कधी नीट समजत नाही. दुस-या काही शक्यता अजमावून न पाहण्याचा आपला हटटही त्यातून पुन्हापुन्हा सामोरा येत राहतो.

हे बरं की वाईट हे मला नाही सांगता येणार.
पण चेन्नैत चेन्नै सापडत नाही आणि पाटण्यात पाटणा सापडत नाही तेंव्हा मला आपणच या जगात हरवून गेलो आहोत असं मात्र वाटत राहत ....

**

Thursday 12 January 2012

१०८. उदघाटन


नमस्कार एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
कोण आहेत हे? मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले. त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळ मी नेहमीच करते. आणि त्यामुळे अनेकदा मी पत्रकार असल्याचा समज फैलावतो. आजही तसच झालेलं दिसतंय. म्हणून त्या खासदारांनी ओळख नसताना मला नमस्कार केला होता.

तिकडे व्यासपीठावर बसलेले खासदार माझ्याकडे पहात होते. ‘नमस्कार तर केला पण ही बाई आहे कोण’ असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. त्यांनी एकाला बोलावून काहीतरी विचारलं. त्याने दुस-याला. त्याने तिस-याला. मला काही काम नव्हत. त्यामुळे मी ती साखळी लक्ष देवून पाहत होते. अखेर त्याची सांगता मघाच्या माझ्या शेजा-याने मला ‘तुम्ही पत्रकार आहात का? अस विचारण्यात झाली. मी कोण आहे (आध्यात्मिक अर्थाने नाही तर लौकिकार्थाने) ते सांगितलं. आलेल्या वाटेने निरोप परत गेला. माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही याची खात्री पडून खासदार महोदय सैलावले.

राजस्थानमधल्या एका गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’च्या रस्त्याच उदघाटन होत – त्याच्याशी माझा खर तर काही संबंध नव्हता. पण अनेक वेळा खेडयापाडयात भटकताना ‘सडक, वीज, पाणी’ लोकांसाठी किती महत्त्वाचे असतात हे पाहिलं होत. विशेषत: जिथ मुल-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आजा-यांना वेळेत उपचार मिळत नाहीत, शेतातला भाजीपाला सडून जातो किंवा जनावरांना खायला घालावा लागतो – तेव्हा गावक-यांच्या मनात जे येत ते फक्त त्यांनाच कळेल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल माझ मत चांगल आहे. आणि शिवाय मी कधी रस्त्याच उदघाटन बघितलं नव्हत. म्हटल चला, हेही एक पाहू काय असत ते.


आम्ही मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळलो तेंव्हा
मोहरीची फुललेली शेत समोर आली. सरकारी कार्यक्रम असल्याने गाडयांचा ताफा होता. रस्त्यावर जो तो थांबून कुतुहलाने त्याकडे पहात होता. काही अंतर पक्क्या सडकेन गेल्यावर आम्ही डावीकडे वळलो तर तिथ एक मोठा मंडप दिसला. त्याच्या आत कोणी नव्हत. आधी मला वाटलं गावात कोणाच तरी लग्न असणार – पण तस काही नव्हत. हा मंडप रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी होता हे मला दोन तासांनी कळलच.


आम्ही मंडपापाशी न थांबता कच्च्या रस्त्याने पुढे गेलो. जिकडे तिकडे पुरुष निवांत बिडया फुंकत बसले होते. दोन दिवसांपूर्वी पाउस झाला होता त्यामुळे शेतात काम नव्हत. थंडीही होती चांगलीच. आम्ही एका विशाल महालवजा घरापाशी उतरलो. सुटाबुटातले एक गृहस्थ पुढे आले – त्यांनी आमच स्वागत केलं. हे या गावातले गृहस्थ – आता दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. एवढया छोटया गावातून येऊन दिल्लीत स्वत:च एक स्थान निर्माण करण ही काही सोपी गोष्ट नाही. मला त्या गृहस्थांच कौतुक वाटलं.

रस्ता या गृहस्थांच्या घरावरून जाणारा – किंबहुना त्यांना घरापर्यंत आणणारा असल्यामुळे बरेच अधिकारी हजर होते. सिमेंटची गुणवत्ता, इंटरलॉकिंग टाईल्स, रस्त्याची रुंदी, त्याची भारवाहक क्षमता, स्थानिक शेतक-यांच्या पाईप टाकून पाणी नेण्याचा गरजा लक्षात घेऊन केलेली रस्त्याची रचना .... अशी देशातल्या ज्येष्ठ इंजिनीअर्स केलेली चर्चा शिक्षणदायी होती.  तसे काम प्रत्यक्षात होते का हा प्रश्न वेगळा अर्थातच!

चहापान झालं आणि ट्रे घेऊन आणखी एक माणूस आला. आमच्या ग्रुपमधल्या कोणीच त्यातल काही घेतलं नाही तेव्हा माझ तिकडे लक्ष गेलं. जमलेल्या गर्दीत जाऊन तो माणूस परत आला तेव्हा मी त्याचा हा फोटो काढला.

 धूम्रपानाच्या धोक्यांबाबत इतक सगळ सांगितलं जात; ते किती व्यर्थ आहे याचा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी.


मग आम्ही सगळे परत त्या मंडपात गेलो. खासदार आले आणि तो रिकामा मंडप क्षणात भरून गेला. मग अनेकजण बोलले – सगळे अगदी थोडक्यात – दोन शब्दांच्या बरच जवळ पोचेल इतकच – बोलले. त्यात बरीच माहिती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ या योजनेत एक किलोमीटर रस्ता बनवायला अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च होतात. या योजनेच्या माध्यमातून देशात रोज १५६ किलोमीटर रस्ता निर्माण होतो – हे उद्दिष्ट मला आठवत तस आधी बरच जास्त होत – ते होत नाही असं दिसल्यावर हुशारीने उद्दिष्टच खाली आणलं गेलं. राजस्थानमध्ये मागच्या अकरा वर्षांत (२००० मध्ये ही योजना आली.) ८८६० नवे रस्ते निर्माण केले गेले. या रस्त्यांची लांबी ३४, ७९५ किलोमीटर आहे आणि यातून १०७०३ गावे जोडली गेली.

ही सगळी माहिती ऐकत असताना मला त्या अनामिक गावातील अनामिक चेहरे दिसत होते. विकासाच्या किमतीबद्दल आपण – ज्यांनी विकासाची फळे चाखली आहेत – बोलणे आणि त्यामुळे इतरांना संधी नाकारणे हा एक प्रकारचा दांभिकपणा आहे. रस्ते शहरात लागतात तसेच खेडयातही लागतात – फायदे आपण भोगायचे आणि त्यांच्या फायद्याची गोष्ट समोर आल्यावर मात्र पर्यावरण प्रेम जागे व्हायचे हे बरोबर नाही. 

कार्यक्रम संपला. मंडपाच्या बाहेर अनेक स्त्रिया उभ्या होत्या – त्यांची जागा नेहेमी अशी परिघाबाहेर का – हा प्रश्न मला पडलाच. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.




आम्ही जेवलो.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.






परत निघालो. तोवर मघाचा मंडप उतरवण्याचे काम जवळजवळ उरकलं होत. दोन तासांपूर्वीच्या कार्यक्रमाची नामोनिशाणी दाखवणारा उदघाटनाचा फक्त फलक तिथ होता.

इथ रस्ता नक्की होणार का – अशी शंका माझ्या मनात आली.
होईल इथ बहुतेक.
कारण दिल्लीचे ते अधिकारी. त्यांचे भाऊ इथ राहतात आणि त्यामुळे या अधिका-याच इथ नियमित येण असत.

उदघाटन झालेले सगळेच रस्ते इतके भाग्यवान असतात का पण? 

Thursday 5 January 2012

१०७. काही कविता: १८

जाग आली 
तेंव्हा व्यक्त 
बहराची रास; 
              
               पेटलेले काही
               विझे, हळुवार
                झाले श्वास;


भाव आहे
म्हणूनच
क्षणोक्षणी भास; 
                
                जग बुडताना
                उरे अल्प 
                जगण्याची आस;  


खूण नाही 
काही मागे,
असा रोजचा प्रवास; 
           
             मैत्र तुझे माझे 
             त्याने नवे
             निर्मियले पाश. 


पुणे, २४ नोव्हेंबर, २००४ 

Friday 30 December 2011

१०६. धागा


आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का? एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.
मी फोटो काढला.

मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाही दाखवला.
ते सगळे खूष झाले एकदम.
आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला.
हा फोटो मी तुम्हाला कसा पाठवू मी विचारलं. त्यावर ते सगळे गोंधळले, एकमेकांकडे पहायला लागले.
ठेव तुझ्याकडे आमच्या गुरुंची; आमच्या धर्माची आठवण म्हणून आजोबांनी निर्णय दिला. सगळ्यांनी मान डोलावली.
पोस्टाने पाठवते फोटो, ई-मेलने पाठवते.... असले विचार मी मनातच ठेवले.
****
खूप वर्षांपूर्वी कधीतरी दुस-या राज्यातल्या कोणीतरी ‘ये सावित्रीबाई कौन थी?’ असं मला विचारलं होत, तेव्हा मला राग आला होता –शिकल्यासवरल्या माणसांना काही माहिती नसत म्हणून! त्यानंतर कामानिमित्त मला भरपूर भटकता आलं – उत्तराखंडपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचलपासून गुजरातपर्यंत. या सगळ्या प्रवासात आपल्याला आपला देश किती कमी माहिती आहे हे पुन्ह्पुन्हां लक्षात आलं. पण त्यामुळे एक नक्की झाल. आपलं जग दुस-या कोणाला माहिती नसलं, तर ते त्यांच घोर अज्ञान ....आणि आपल्याला दुस-या कोणाच जग माहिती नसलं, तर ते मात्र स्वाभाविक – अशा मानसिकतेतून मी बाहेर पडले – निदान अस मला तरी वाटत.
परवा चंदीगडकडून सिरसाला निघालो तेव्हा आधीच उशीर झालेला होता. सकाळची मीटिंग अपेक्षेपेक्षा लांबली होती. पण त्यात अनेक मुद्दे - जे मला सांगायचे होते त्यावर चर्चा झाली होती, निर्णयही झाले होते त्यामुळे समाधान होत. पण या सगळ्याच्या नादात एरवी शहराकड मी ज्या पद्धतीन पाहते, त्यावर विचार करते त्यासाठी वेळ मिळालेला नव्हता.
प्रवास सुरु झाला तेव्हा मग फोनही सुरु झाले. फोन हे अस एक साधन आहे की ज्याद्वारे आपण समोर जे आहेत त्यापेक्षा समोर जे नाहीत त्यांच्यासाठी असतो. पण मला मी ज्यांच्याबरोबर असते  - त्यांच्यासाठी वेळ द्यायला आवडत. सकाळपासून फोन ‘शांत’ (silent mode) ठेवला होता तो मी – त्यावर अनेकांच्या हाका (missed calls)  दिसले – मग त्यांच्याशी बोलण झालं. या नादात आम्ही एक तासभर तरी पुढे आलो होतो पतियाळाच्या दिशेने. 
सगळ काम आटोपून मी जरा निवांत झाले. रस्ता मस्तच होता – खड्ड्यांविना. बरीच गर्दी दिसत होती. Tractor मध्ये बसून जाणारी माणस दिसत होती अनेक. आधी मला वाटल शेतमजूर असतील. पण ते थकलेले दिसत नव्हते, उलट मजेत बसले होते. म्हणून वाटल लग्नाच व-हाड असेल. पण असे एकामागून एक ते दिसतच राहिले तेव्हा प्रकरण काहीतरी वेगळ आहे हे लक्षात आलं. दरम्यान रस्त्यात लाल झेंडे फडकवत अनेक ठिकाणी तरुण मुलं गाडया थांबवायचा प्रयत्न करत होती. तिथ मोठे मंडप दिसत होते आणि ध्वनिवर्धकावर काहीतरी चालू होत – काही ठिकाणी बोलण तर काही ठिकाणी गाणी! लक्ष देवून ऐकलं तर संदर्भाने आता मला पंजाबी कळत – पण आम्ही सतत पुढे चालत होतो त्यामुळे नीट समजून घेता येत नव्हत. पण रस्ता अडवून गावगुंडांनी गणपतीची, साईबाबाची, नवरात्राची, होळीची, जीर्णोद्धाराची वर्गणी मागण्याचा (खर तर वसूल करण्याचा) आपल्या महाराष्ट्रातला नेहमीचा अनुभव. त्याच प्रकारच हे काहीतरी असणार अस समजून मी सोडून दिलं.
दोनशेवा Tractor पाहिल्यावर मी सोबत असलेल्या गृहस्थांना विचारलं – इतके सगळे लोक कुठून कुठे चाललेत म्हणून. त्यावर काका (हे आमच्या वाहनचालकाच नाव. पंजाबीत काका म्हणजे ‘छोटा’ हे नव्यानच समजलं) म्हणाला – ते सगळे फतेह्गड साहिबवरून येताहेत. महिन्याभरापूर्वी मी फतेहगड साहिबच्या परिसरात जाऊन आल्यामुळे मी माझ ज्ञान पाजळलं – ‘हो, तिथ एक मोठं गुरुद्वार आहे ना. तिकडे काय आहे आज?
मग त्याने मला सांगितलं की गुरु गोविंदसिंहाच्या दोन कोवळ्या मुलांना आणि गुरुंच्या आईला जिथ कैद करून ठेवलं होत आणि त्या दोन मुलांनी धर्मांतर करण्यापेक्षा क्रूर मरण स्वीकारलं होत (ही घटना १७०५ मधली) तो परिसर आता फतेहगड साहिब गुरुद्वार या नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणी २८ डिसेंबरला मोठा कार्यक्रम असतो. हे सगळे Tractor मधले लोक तिथल्या कार्यक्रमातून आपापल्या गावी परत होते. ते अर्थातच स्वखर्चाने गेले होते. त्यांना बोलावण कोणा व्यक्तीच नव्हत तर गुरुंच होत, धर्माच होत. या Tractor ची मोजदाद करायच मी सोडून दिल. सगळा पंजाब आज वेगळ्या भावनेत होता तर! धर्मात (ती नीट वापरली तर) समाजाला प्रेरित करण्याची, बांधून ठेवण्याची किती अफाट ताकद आहे हे जाणवून मी स्तब्ध झाले होते.
पण मग रस्त्यावर गाड्या अडवून हे तरुण काय करत होते आजच्या पवित्र दिवशीही? आणि एक दोन ठिकाणी नाही तर दर दोन मैलांवर? मी काकाला विचारल.
काका म्हणाला, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे तरुण मागत काही नाहीत. आज साहिबजाद्यांच्या(फतेहसिंह आणि झोरावरसिंह ही ती गुरु  गोविंदसिंहांची दोन मुलं) स्मरणार्थ गावागावात लंगर आहे. ते आपल्याला थांबून प्रसाद घ्यायचा आग्रह करताहेत
नीट माहिती न घेताच त्या मुलांबद्दल मत बनवण्याची चूक मी केल्यामुळे मी जरा खजील झाले. काका म्हणाला, आमच्या गावात पण असतो मोठा लंगर. पण आता आज मी तुमच्याबरोबर आहे ना, मग राहून गेलं ते ...
मी काकाला म्हटलं, थांबू आपण एका गुरुद्वारात. तिथ प्रसाद घेऊ आणि पुढे जाऊ
उशीर तर नाही व्हायचा आपल्याला पोचायला? त्यान साशंकपणे विचारलं. पण सिरसात जाऊन पोचायचच होत फक्त आज रात्री – काम उद्या होत. अर्धा तास उशीरा पोचल्याने काहीच फरक पडणार नव्हता.
संगरूर जिल्ह्यात प्रवेश करून एका गुरुद्वारासमोर आमची गाडी थांबली. आम्हाला दहा तरुणांनी वेढा घातला. त्यांच्या हातात चहा होता, पुरी होती, हलवा (शिरा) होता, बरेच पदार्थ होते. खरं तर आत जावून बसून जेवायची व्यवस्थाही होती – पण ज्यांना ते करायला वेळ नसतो त्यांच्यासाठी ही ‘जलद सेवा’ होती. मी न मागताच हलव्याचा द्रोण माझ्या हातात आला, चहाचा ग्लासही आला. एक प्रौढ सरदारजी आमची चौकशी करायला आले. काकाने सांगितलं असणार त्यांना मी दिल्लीतून आले आहे वगैरे – कारण दोन मिनिटांत ध्वनिवर्धकावरून मला माझ ‘स्वागत’ ऐकू आलं.
मला ते वातावरण विलक्षण वाटलं. ‘देण्याघेण्याच्या’ जमान्यात कोणीतरी कोणाला फक्त देत असलं की मला कौतुक वाटत. मी सरदारजींशी गप्पा मारायला सुरुवात केली. साहिबजाद्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दर वर्षी २७, २८ आणि २९ डिसेंबर असे तीन दिवस या गावात लंगर चालतो. एक समिती नेमली जाते – जी देखरेख करते. पण मुख्य काम करतात ते शेकडो – हजारो स्वयंसेवक – कारसेवक. किती माणसं तीन दिवसांत जेऊन जातात याची काही गणती नाही. मागच्या वर्षी चार लाख खर्च आला होता. हा सगळा खर्च गावातले लोक स्वयंप्रेरणेने करतात. पैसा येतो, गहू येतो, साखर येते, लाकड येतात, भाजी येते, सामान येत .... राबायला माणसही येतात. इथ राबायला हा शब्द चुकीचा आहे खर तर – सेवा करायला म्हणायला पाहिजे.
एक फोटो काढला तर चालेल का? मी विचारल. मी फोटो काढल्यावर सगळेजण परत माझ्याकड पहायला लागले. मग आणखी दोन सरदारजी आले. म्हणाले, ‘चला, तुम्हाला सगळ व्यवस्थित दाखवतो. मग ते मला आत घेऊन गेले – जिथ पदार्थ शिजत होते. वेगेवेगळे विभाग होते आणि शिस्तीत काम चाललं होत – आरडाओरडा नाही. स्वच्छता होती. मी शिरा    बनवणा-याचा फोटो काढला. मग पोळया बनवणा-या विभागात गेलो – तिथ प्रामुख्याने बायकाच काम करत होत्या. यांचा पण काढा फोटो सरदारजींनी मला हुकूम सोडला. त्यांचा स्वर प्रेमळ होता त्यामुळे मी त्यांच ऐकल लगेच. दहा मिनिटांनी आम्ही निघालो, तोवर रात्रीच जेवण त्यांनी आम्हाला बांधून दिल होत.


वर उल्लेख केलेला कमिटीचा फोटो निघताना अगदी शेवटी काढला.
त्यावर मी विचार करत राहिले आणि लक्षात आलं की हा सगळा अनुभव त्यांना काही ‘देण्यासाठी’ नव्हताच मुळी .... तो माझ्यासाठी होता....मला काही समजावून सांगणारा ...

मी लक्षात ठेवावी धर्माची सकारात्मक ताकद ...
मी विसरून जाऊ नये माणसांच साधेपण ...
मी मत बनवू नये अर्धवट माहितीच्या आधारे ...
मी ठेवावी इतिहासाची जाण....
मी कुठेही असले तरी फटकून राहू नये समाजाशी कधीही ....
एक धागा आहे या सगळ्याचा माझ्या जगण्याशी ...
तो अतूट ठेवण ही माझीही जबाबदारी आहे. 

Thursday 22 December 2011

१०५. तिचा एक दिवस

शारदा एकदम दचकून जागी झाली. आपण कुठे आहोत आणि हा कसला आवाज आहे असा तिचा गोंधळ क्षणभरच टिकला. पहाटे पाणी आल्याआल्या लगेच भरलं तरच मिळतं, नाहीतर त्याचा काही भरोसा नसतो, म्हणून रात्री झोपताना नळ चालू ठेवून झोपायची तिने स्वतःला सवय लावून घेतली आहे. तरीही तिचे हे रोजचे दचकून जागे होणे मात्र काही संपत नाही.

खरे तर आज शारदा खूप दमली आहे. शेजारी प्रकाश - तिचा नवरा - घोरत पडला आहे. रात्रीच्या जोर जबरदस्तीनंतर त्याचे हे निवांत झोपणे आणि तिची दमणूक हेही आता नेहमीचे झाले आहे. पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा मनात आलेला विचार तिने लगेच झटकून टाकला. पाणी राहायचे बाजूला, आणि त्याचे पुन्हा लगटणे चालू व्हायचे! त्या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारा आला. तिचे मन आणि तिचे शरीर आजकाल त्याच्या मागणीला तयार नसते. पण एकदा लाडीगोडीत ’जरा हळू’ असे तिने म्हणताच ’कोण असेल तसा, त्याच्याकडे जा मग’ असे म्हणत त्याने तरातरा बाहेरची वाट धरली होती. आपण थोडे जरी ताणले तरी हा लगेच दुस-या बाईकडे जाईल याची शारदाला तेव्हा खात्रीच पटली होती. मग बाहेरची काही लागण त्याने घेऊन येण्यापेक्षा त्याच्या इच्छेला निमूट शरण जाणे तिने स्वीकारले होते. “नाहीतरी लग्नाची बायको आहे मी त्याची, म्हणजे या शरीराचा मालकच की तो" असा कडवट विचार तिच्या मनात आला आणि तिचे अवसान आणखीच गळून गेले.

या विचारांत पाच एक मिनिटे गेली असतील नसतील, शारदा उठली. शारदाला फक्त तीन बादल्या पाणी मिळाले. आता त्यातच कपडे धुवायचे, अन्न शिजवायचे, भांडी घासायची आणि आंघोळ करायची इतकी कामे तिला उरकावी लागणार तर! खरे तर तिच्या डोळ्यांमध्ये अजून झोप रेंगाळते आहे. पण आज कामाला दांडी मारून पण चालणार नाही, देसाई बाई चांगल्याच रागावतील, नाही गेले तर तिचे कामही सुटेल. आज देसाई बाईंच्या लेकाचा वाढदिवस आहे, बरेच पाहुणे येणार आहेत. शारदाला ’थोडा जास्त वेळ कामाला ये’ असं त्यांनी मागच्या आठवडयातच सांगितलं आहे. चार तास जातील पण त्याचे पन्नास रूपये द्यायचे त्यांनी कबूल केले आहे. घरात आज शिजवायला दाणा नाही. त्या पन्नास रूपयांच्या आशेने शारदाला थोडा उत्साह येतो.

स्टोव्ह पेटतच नाही. बाटलीत केरोसीनचे जेमतेम चार थेंब दिसतात. म्हणजे चहाचा विचार बाजूलाच ठेवणे भाग आहे. तशीही घरातली साखर पण संपलीच आहे. निदान चपात्या भाजी करायचे काम वाचले याचाच शारदाला आनंद आहे. कालची रात्रीची थोडी भाजी आणि एक भाकरी शिल्लक आहेत. प्रकाशचे सकाळचे खाणे त्यात भागेल कसेबसे. नव-याची झोप उडू नये अशा सावधपणाने शारदा दार हलकेच लोटून लगबगीने घराबाहेर पाऊल टाकते.

प्रकाश बरा असतो तेव्हा त्याच्या त्या जुनाट मोपेडवरून तो शारदाला ’श्रीराम’ सोसायटीपर्यंत सोडतो. पण चहासाठी तकतक नको म्हणून तिने आज त्याला उठवले नाही. कालची त्याची अजून उतरली नसणार म्हणजे आज काम बुडवून तो घरातच बसणार हे शारदाला आता अनुभवाने माहिती झाले आहे. आता त्यामुळे पुढची वीस मिनिटे शारदाला चालत जावे लागणार. सकाळी रस्त्यावर तितकीशी गर्दी नाही. पण शारदाच्या अंगात भरभर चालण्याइतकी ताकद नाही या क्षणी!

शारदाला कामाच्या पहिल्या घरी पोचायला दहा मिनिटे उशीर झाला. मोकाशी बाई त्यामुळे रागावल्या आहेत. शारदावर त्या थेट ओरडायला सुरूवात करतात. खर तर दिवसभर मोकाशी बाई घरातच असतात. त्यांना काही कुठे कामाला जायचे नसते, त्यामुळे पाच दहा मिनिटे इकडे तिकडे झाल्याने तसा काही त्यांना फरक पडायला नको. पण त्या घडयाळावर नजर ठेवून बसलेल्या असतात. त्यांना काही सांगण्यात अर्थ नाही हे आता शारदाला अनुभवाने माहिती आहे. मोकाशी बाईंना काही ऐकून घ्यायची सवय नाही. शारदा काही न बोलता कामाला लागते, याचा मोकाशी बाईंना आणखी राग येतो. त्यांच्या तोंडचा पट्टा आता जोरातच सुरू आहे.

रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरातले बेसिन खरकटया भांडयांनी गच्च भरले आहे. लोक खायचे नसताना, भूक नसताना इतके अन्न ताटात वाढून कशासाठी घेतात हा नेहमीचा प्रश्न आजही शारदाला पडतो. त्या खरकटयाच्या वासाची तिला खरे तर शिसारी येते. बाथरूममध्येही ढीगभर कपडे आहेत. मोकाशी बाईंना शारदाच्या मागे मागे हिंडायची वाईट खोड आहे. एक मिनिट त्या काही शांत बसत नाहीत. ’असेच कर, तसे करू नकोस’ असा सूचनांचा सारखा भडिमार चालू असतो त्यांचा. त्या शांत राहिल्या तर शारदाला भरभर काम उरकता येईल. पण मोकाशी बाई बोलत राहतात. शारदाने ’हो, नाही, बरोबर’ अशा थाटाचे काही उत्तर दिले, की त्यांना जणू प्रोत्साहन मिळून त्या नव्याने सुरूवात करतात. जोवर शारदा काही बोलत नाही, तोवर मोकाशी बाई तेच तेच बोलत राहतात. त्यांनी दिलेल्या दोन चार जुन्या साडयांवर शारदाचं वर्ष निभावत, आत्ताही शारदाच्या अंगावर त्यांनी दिलेलीच साडी आहे. म्हणून शारदा त्यांच ऐकून घेते. मोकाशी बाई तशी मनाने चांगली आहे, वेळप्रसंगी अडचण भागवते. त्यांना तोडून आपल्याला चालणार नाही याची शारदाला जाणीव आहे.

पुढच काम जोशी बाईंच! शारदाने बेल वाजवल्यावर लगेच दार उघडत. दारात जोशी बाबा हसत उभा असलेला पाहून शारदाच्या हृदयाचा ठोका चुकतो. जणू तॊ शारदाची वाटच पाहत होता. जोशी बाई आठवडाभरासाठी त्यांच्या बहिणीकडे गेल्या आहेत, हे ती विसरलीच होती. जोशी बाईंची आई आजारी आहे, त्यामुळे त्यांना परत यायला दोन चार दिवस जास्तही लागू शकतात, तसे त्या शारदाला सांगून गेल्या आहेत. जोशी बाई चांगल्या आहेत, पण त्यांचा नवरा मात्र आगावू आहे. एरवीही त्याची नजर शारदावर असते. एक दोनदा तर त्याने चुकून लागला असं भासवत शारदाच्या अंगाला नको तिथे हात लावायचाही प्रयत्न केला होता. आता त्याचे हसणे पाहून दोन्ही पोरही घरात नाहीत हे शारदाला नीटच समजल. “मी तासाभराने येते त्या काकूंच काम आटोपून" असं शारदा शेजा-यांना ऐकू जावं अशा बेताने मोठया आवाजात म्हणते. त्यावर जोशी साळसूदपणे म्हणतो, "मला काय दुसरे उद्योग नाहीत की काय? लवकर काम आटोपून घे. मला कामाला जायचय. आई घरात नसताना कोणाला दार उघडायचं नाही असं मी मुलांना सांगून ठेवलय, म्हणजे तुला सुट्टीच पाहिजे म्हण की!”

शारदाचा नाईलाज होतो. शारदा पुढच दार उघडच ठेवते आणि स्वयंपाकघराच्या खिडकीतून शेजारच्या बाईंशी मोठमोठयाने गप्पा मारते. जोशी तिच्या मागेमागे फिरायला लागल्यावर "साहेब, उगी एका जागी निवांत बसा पाच मिनिटं. माझ काम झाल की मग काय आवरायच ते आवरा’ असं मोठया आवाजात म्हणते. ते ऐकून शेजारची राणी मॅडम दार उघडून "काय जोशी, काय म्हणतेय सासूबाईंची तब्येत?” अशी चौकशी करायला लागते. जोशीला चडफडत पण हसतमुखाने राणीशी बोलावे लागते. कधीकधी शारदाला वाटते की तिची आणि जोशीबाईंची कहाणी खरे तर सारखीच आहे. आपल्या नव-याचे रंगढंग शारदा चांगली ओळखून आहे. जोशी बाई मात्र भोळीभाबडी आहे, इतकाच काय तो फरक. शारदा गरीब आहे, आणि जोशी बाई श्रीमंत आहे हे खरे, पण बाई म्हणून दोघींचेही जगणे तितकेच अभागी आहे असे शारदाला नेहमीच वाटते. क्षणभर जोशी बाईबद्दल शारदाच्या मनात कणव दाटून येते.

उद्यापासून दुपारी जान्हवीताई घरी असेल तेंव्हा कामाला यायच असं स्वत:च्या मनाशी ठरवून शारदा बाहेर पडते आणि समोरच्या राणीच्या घरात शिरते. तिथे गरम चहाचा कप आणि चार बिस्किटे शारदाची वाट पाहत असतात. दोन मिनिटे निवांत बसून तो आयता चहा पिताना शारदा सुखावते.

राणी शारदाला एक कागद देते. “नीट वाच आणि मग सही कर. काही शंका असली तर न लाजता मला विचार,” असं म्हणत ती शारदाच्या हातात पेनही देते. राणीची कोणीतरी एक मैत्रीण ’घरकाम करणा-या बायांची’ म्हणजे मोलकरणींची संघटना चालवते हे शारदाला माहिती आहे. एकदा ती बाई राणीकडे आली असताना तिने शारदाला कामाबद्दल खूप प्रश्न विचारले होते ते शारदाला आठवलं. राणी मोलकरणींच्या हक्कांबाबत शारदाशी नेहमी बोलते. आजही तिने नियमित आणि चांगला पगार, पगारी रजा, बोनस, आठवडयाची हक्काची सुट्टी अशा गोष्टी शारदाशी बोलायला सुरूवात केली. अशा गोष्टी बोलायला काय ऐकायलाही चांगल्याच वाटतात.

पण शारदाला राणीच्या भोळेपणाचं नवल वाटतं. बाहेर काम मिळवायला आणि एक एक काम टिकवायला जीवाचा कसा आटापिटा करावा लागतो, हे राणी मॅडमला नाही समजायच. कामाला बाया कमी नाहीत, बाईलाच काम मिळत नाहीत अशी बाहेर परिस्थिती आहे. एका बाईने एका घरच काम सोडलं तर ते मिळवायला दहा बाया टपलेल्या आहेत. पोटापाण्याला रोजच्या पैसे लागतात आणि व्यसनी नव-याच्या बाईला ते स्वत: कमवावे लागतात, तिथं ही हक्कांची भाषा करायची म्हणजे पायावर धोंडा पाडून घ्यायचा म्हणा ना! राणी मॅडम बोलताहेत, त्यातली एक गोष्ट जरी बाहेर एखाद्या घरात बोलली तर त्या दिवशी लगेच ते काम सुटेल. या सगळ्या हक्कांशिवाय काम करायला अनेक बाया तयार आहेत. बायांची एकी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या एकीमुळे तांदूळ आणि साखर थोडीच स्वस्त मिळणार आहे, असा कडवट विचार शारदाच्या मनात येतो.

पण राणीशी हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाही. आपण बाई आहोत म्हणून शारदासारख्या गरीब बायांच दु:ख आपल्याला समजत, असा राणीचा समज आहे. राणी चांगली आहे, पण आपल्या जगण्याची दुर्दशा राणीला कधीही समजणार नाही, हे शारदाला मनातून माहिती आहे. शारदाला राणीचा चांगुलपणा समजतो, म्हणून ती राणीला कधी उलटून काही बोलत नाही. आजही ती नुसती मान डोलावते पण कागदावर काही सही करत नाही. राणी वैतागते आणि रागावून शारदाशी काही न बोलता पेपर वाचायला लागते. शारदाला वाईट वाटतं पण तिचा काही इलाज नाही. कागदावर सही केली नाही म्हणून राणी तिला कामावरून काढून टाकणार नाही याची शारदाला खात्री आहे
.
सोसायटीतल्या दुस-या इमारतीपाशी पोलिस उभे आहेत. सोबत त्यांचा वास घेणारा कुत्रा पण दिसतो आहे. म्हणजे सोसायटीत आणखी एक चोरी झाली आहे तर! असा काही प्रकार झाला की शारदासारख्या हातावर पोट असणा-या लोकांवर पोलिसांची वाकडी नजर फिरलीच म्हणून समजायचे, हे आता शारदाला अनुभवाने चांगल माहिती झालं आहे. अर्थात पोलिसांना काही चोर पकडायचा असतो अशातला भाग नाही, गरीबांकडून पैसे उकळायला त्यांना चांगल निमित्त मिळतं इतक मात्र नक्की. पैसे दिले नाहीत तर पोलिस मग उगाच घरी चौकशीला येणार, कामे बुडवून चौकीत फुकटच्या चकरा मारायला लावणार, हे पाहून शारदाच्या नव-याचं डोक फिरणार आणि तो शारदावर भलतेसलते आरोप करणार. शिवाय कामाला दांडी मारली की ज्या त्या घरी ऐकून घ्याव लागणार, पोलिसांनी चौकीत बोलावल होत हे कळताच जी ती बाई संशयाने पाहणार. हे सगळ टाळायचं तर आज देसाई बाईंकडून जास्तीच्या कामाचे जे पन्नास रूपये मिळतील, ते या पोलिसांना द्यावे लागतील.... शारदाचा कामाचा उत्साह मावळतो. आता या सोसायटीत चो-या नेहमीच्याच झाल्या आहेत. पन्नासाच्या ऐवजी वीस रूपयांत पोलिसांना पटवता आलं तर आजच्या खर्चासाठी थोडे पैसे हातात राह्तील असाही विचार शारदाच्या मनात येतो.

आणखी तीन घरचं काम आटोपून शारदा देसाई बाईंकडे पोचते तेंव्हा घडयाळाचा काटा बाराकडे झुकलेला असतो. लवकर यायला सांगितलेलं असतानाही शारदा नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर उशीराच पोचली आहे, म्हणूने देसाई बाईंचा पारा चढलेला आहे. त्यांचा आरडाओरडा सुरू होतो. शारदाला खरे तर कोणी तिच्याशी असे चढया स्वरांत बोललेले आवडत नाही, पण आत्ता या क्षणी तर शारदाला मुकाटयाने ऐकून घेण्यावाचून पर्याय नाही. देसाई बाईंसाठी आजचा दिवस खास आणि म्हणून वेगळा असेल. पण शारदाला त्याचे काय? तिच्यासाठी हा नेहमीचाच आहे. कोणाच्या घरी वाढदिवस असो, लग्न असो, लग्नाचा वाढदिवस असो, बारसे असो की आणखी काही सण समारंभ असो, शारदाला काय फरक पडतो? या सगळ्याचा अर्थ शारदासाठी तरी ’अधिक राबणे’ इतकाच असतो. तिला या जास्तीच्या कामाचे चार पैसे जास्त मिळतात हे खरे. पण राबण्याच आणि हातात पडणा-या पैशांच गणित तिच तिलाच माहिती आहे!

शारदा खोल्या झाडते, फरशी पुसून घेते. शारदा भांडी घासते. शारदा कपडे धुते. रोजची कामे उरकल्यावर – आज पाहुणे असल्यामुळे हेही काम जास्त आहे - शारदा स्वयंपाकघरात मदत करते. भाजी चिरणे, नारळ खोऊन देणे, कणीक मळणे, भाजी फोडणीस टाकणॆ, चपात्या लाटणे … शारदा कामावर काम करत राहते, उसंत कसली ती नाहीच तिला. एखाद्या यंत्रासारखी शारदा सकाळपासून गरागरा फिरते आहे. तिचे मन बंड करते. तिच्याभोवती देसाई बाईंच्या घरातली माणसे निवांत बसली आहेत. खाणे, पिणे, गप्पा सारे काही मजेत चालले आहे. मधूनच काहीतरी विनोद झाल्यावर सगळेजण खो खो हसत आहेत. सगळे मजेत दिसताहेत. त्यांच जगण चांगलं चाललेलं दिसतय.

शारदाला वाटतं, यांच्याकडे पैसा आहे म्हणून केवळ माझ्यासारख्या गरीबाला हे लोक राबवून घेऊ शकतात. शारदाला सगळ्या जगाचाच राग येतो. ’माझ्यात काय कमी आहे?’ असा दिवसातून दहादा तिला पडणारा प्रश्न परत एकदा तिच्या मनात फणा काढून उभा राहतो. शारदा शाळेत असताना हुषार होती, चांगले मार्कही मिळायचे तिला. दहावीनंतर शिकायची स्वप्नं पाहिली होती तिनेही! शिकून नोकरी करायची, पैसे कमवायचे तिचे बेत हवेतच विरले कारण घरच्यांनी सोळाव्या वर्षीच तिच लग्न लावून दिल! शारदा नुकतीच अठराची झाली - ती अद्याप तिची स्वप्न विसरलेली नाही. आपली स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत याची तिला जाणीव झालेली आहे. कदाचित म्हणूनच आजकाल तिला शिकल्या सवरल्या माणसांना असं निवांत बसलेलं पाहून त्यांचा राग येतो. शारदच्या डोळ्यात पाणी तरारून येत. आता या ठिकाणी या वेळी असे डोळे भरून येण चांगलं नाही हे जाणवून ती हलकेच पदराने आसवं पुसते.

देसाई बाईंच्या घरच काम संपतं तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत. आता देसाई बाईंकडे पोराच्या वाढदिवसासाठीचे पाहुणे येतील. शारदाने सगळ तयारच केलेल आहे, आता तिच्या मदतीची गरज संपलेली आहे. “उद्या लवकर ये बर का" असं शारदाला दहा वेळा बजावायला मात्र देसाई बाई एवढया गडबडीतही विसरत नाहीत. शारदाला आपण ना दिवसभर काही खायला दिले, ना एवढया पदार्थांमधले दोन तिला बांधून देत आहोत – हे देसाई बाई सोयिस्करपणे विसरल्या आहेत.

सकाळी राणी मॅडमकडे मिळालेल्या चहा बिस्किटांव्यतिरिक्त दिवसभरात शारदाच्या पोटात दुसरे काही गेलेले नाही. आता काम संपल्यावर भुकेच्या जाणीवेने ती व्याकूळ होते. दिवसभर कामात गर्क असल्याने जे जाणवले नव्हते ते सारे तिच्या नजरेसमोर येते. घराकडे वळाणारी तिची पावले जड झाल्याचे तिला जाणवते. घरात केरोसिनचा थेंब नाही, डाळ नाही, तांदूळ नाही, हे तिला आठवते. वाटेत पोलिस हप्त्यासाठी वाट पाहत असणार त्याच्या हातात काहीतरी टिकवल्याशिवाय आजची रात्र सुखाची जाणार नाही याचे तिला भान येते. शारदाजवळ वेळप्रसंगी लागली तर असावी म्हणून नव-यापासून लपवून ठेवलेली केवळ एक दहाची नोट आहे. तेवढयाने त्या पोलिसांची भूक थोडीच भागणार आहे? आणि समजा चुकून त्यांची भागली, तरी शारदाचे काय? प्रकाशचे काय?

शारदाच्या मनात एक विचार येतो. जिन्यातून परत येऊन ती देसाई बाईंकडे पैसे मागते. तसेही देसाई बाईंनी आजच्या जास्तीच्या कामाचे पन्नास रूपये द्यायचे कबूल केलेले आहेच. शारदासाठी आज ते पन्नास रूपये लाखमोलाचे आहेत. पण शारदाच्या तोंडचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच देसाई बाईंचा आरडाओरडा सुरू होतो. “ मी काय तुझे पन्नास रूपये ठेवून पळून जाणार आहे की काय? पैशांच्या बाबतीत जेवढा चोखपणा दाखवतेस तेवढा कामाच्या वेळेबाबत बरी दाखवत नाहीस ती! आजचेच बघ, एवढे हजार वेळा तुला सांगूनही दोन तास उशीरा येऊन माझा खोळंबा केलासच ना? अगदी हजार रूपये मी देणे लागत असल्यासारखी घाई का करतेस? आलेल्या पाहुण्यांसमोर माझी अशी लाज का घालवतेस बाई? महिन्याचा पगार देताना देईन तुझे पन्नास रूपये. जा आता, उद्या मात्र लवकर ये, आजच्यासारखी कारणं नको सांगू मला." असे म्हणत दे़साई बाई शारदाची रिकाम्या हाती बोळवण करतात.

देसाई बाईंच्या घरातले लोक, आलेले पाहुणे, शेजारीपाजारी विचित्र नजरेने शारदाकडे पाहतात. कानकोंडी होऊन शारदा निमुटपणे माघारी फिरते. आता आणखी काही बोलले तर हे काम सुटेल याची शारदाला जाणीव आहे. देसाई बाई पैसे काही बुडवणार नाही हे शारदालाही माहिती आहे. पण आपण देसाई बाईची आणि तिच्यासारख्या या ब-या घरातल्या बायांची नड जाणतो आणि त्यांच्या वेळेला कामात मदत करतो. आपल्या मदतीला, आपल्या वेळेला मात्र या कोणी उपयोगी पडत नाहीत अशा कडवट विचाराने शारदाला निराश वाटते. आपल्या कामाचे, हककाचे पैसे मागावे लागतात आणि ते हातात न पडता फुकटचा अपमान तेवढा होतो याचे शारदाला वाईट वाटते.

घराकडे परतताना शारदाला केरोसिनची मोकळी बाटली दिसते, मोकळे डबे दिसतात. आज शिजवायचे काय आणि पोटात ढकलायचे काय याची शारदाला चिंता आहे. घरात प्रकाश कालच्या त्या शिळ्या भाकरीवरच असेल, म्हणजे त्याच्याही पोटात वणवाच पेटला असेल एव्हाना. अन त्याला तर भूक सहन होत नाही. कालची दारू अजून नीट उतरली नसेल तोवर भुकेच निमित्त त्याला मिळाल म्हणजे आज त्याच्या हातचा मार आहेच ठरलेला. देसाई बाईच्या कामामुळे आज घरी जायला उशीरच झालाय. म्हणजे संध्याकाळचही पाणी येऊन गेलं असणार. शेजारणीकडून काही उसन आणायची पण सोय नाही. त्यांच्याही घरात कमी अधिक हेच असणार. आता त्यांच्या घरातली पुरूषमाणसं कामावरून आली असतील, त्यांच्यासमोर काही उसन मागणही अवघड. त्यांच्यातल्या कोणाकोणाशी प्रकाशची कधी ना कधी काहीतरी शिवागीळ, बाचाबाची झालेली आहे. पुरूषांची आपापसातली भांडणं घरातल्या बाईची इच्छा असो वा नसो, तिला निभावून न्यावी लागतात. दुकानदारांची आधीचीच बाकी आहे, शारदाला कोणी दारात उभदेखील राहू देणार नाही, त्यांना चुकवतच तिला घराची वाट चालावी लागते अलिकडे. काय करायच? कुठे जायचं? - शारदाच्या डोक्यात विचारांच चक्र अविरतपणे चालू आहे. सकाळपासून नाही, गेल्या दोन वर्षांपासून!

दिवसभर राब राब राबून शेवटी पोटात फक्त भूक उरावी या परिस्थितीमुळे शारदाला अगदी असहाय्य वाटतं, तिला स्वत:ची कीव येते. कशासाठी काम करायचं? कशासाठी जगायचं? या सगळ्याला कधी अंत तरी असणार आहे का? एक दिवस पोटभर अन्न नाही की एक दिवस सुखाची झोप नाही. कशासाठी राबायच मग इतक परक्यांच्या घरात, त्यांच वेडवाकडं ऐकून घेत? - या प्रश्नांनी शारदा गांजून गेली आहे.

शारदाला वाटतं हे शहर म्हणजे लहानपणी आपण पुस्तकात वाचलं होत तशा एखाद्या राक्षसासारख आहे. दूरवरून याची भूल पडते, पण एकदा त्याच्या जवळ आलं की हे शहर आपल्यालाच गिळून टाकतं हे शहर आपल्याला हतबल करतं, आपली नामोनिशाणी मिटवून टाकतं. हे सगळं आपण एका क्षणात कां संपवू नये? नाहीतरी माहेरच्यांना आपली काही किंमत नाही, आपण मेलो तर प्रकाश आनंदाने दुसरं लग्न करेल; मोकाशी बाईला काय आणि देसाई बाईला काय दुसरी कोणीतरी बाई मिळेलच की कामाला. आपण नसल्याने कोणाचच काही अडणार नाही या विचाराने शारदा उद्विग्न होते. रस्त्यावर पुष्कळ मोठया इमारती आहेत. कोठल्यातरी गच्चीवर जाऊन खाली उडी टाकली की खेळ खलास होईल. हे रोजचे काम नको, की डोक्याला ताप नको.

पण या शहरात शारदाला मरायचीही सोय नाही. सगळया उंच इमारतींच्या दारात वॉचमन बसलेले आहेत. त्यांच्य पन्नास प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. आणि एकदा आतमध्ये समजा गेल तरी गच्चीला कुलूप असत. या शहरात जीव द्यावा अशी एकही विहीर नाही. इथल्या नदीला पावसाळ्यातसुद्धा पाणी नसत. शारदाला या शहराचाच राग येतो. इथं धड जगायची सोय नाही आणि मरायचीही सोय नाही. हे जगणं रेटत नेण्याविना शारदाला काही पर्यायच नाही.

शारदाच्या डोळ्यांतून अश्रू झरताहेत. आपल्या रडण्यालाही काही किंमत नाही, या आसवांत काही बुडवण्याची ताकद नाही हे शारदाला माहिती आहे. भुकेची कासाविशी, घरापासूनच तुटलेपण, दमणूक, एकाकीपणा, अपमान, भीती .. ….. या सगळ्याला सामोर जात शारदाचा एक दिवस पार पडला. असे आणखी किती दिवस तिला रेटून न्यायचे आहेत? जमेल का तिला हे निभावून नेणं? या प्रश्नाच उत्तर शारदाकडे नाही. आज नाही, कदाचित कधीही असणार नाही!

**
ही कथा ‘मिळून सा-याजणी’ मासिकाच्या डिसेंबर २०११ च्या अंकात 'तिचे जगणे' या नावाने प्रसिद्ध झाली आहे.