उंच स्टुलावर चढून घरातले पंखे, माळे... पूर्वी मी अनेक वर्ष साफ केले आहेत. पण आता ते काम करता येईल असं वाटेनासं झालं. मग "अर्बन कंपनी"च्या ऍपवर घराच्या सफाईसाठी पैसे भरले.
अब्द शब्द
Sunday, February 4, 2024
२६९. गृहितक? अनुभव?
Friday, January 12, 2024
२६८. कातरवेळी ...
झोपेतून जागी झाले आणि क्षणभर ‘ही सकाळ आहे की संध्याकाळ आहे’ या संभ्रमात पडले. कधी कधी तर “मैं कहा हूं” असं फिल्मी थाटात स्वत:ला विचारण्याची वेळ येते. हल्ली प्रवास कमी झालाय, त्यामुळे तो फिल्मी संभ्रमदेखील कमी झालाय. पण ते असो. सांगत होते ते कातरवेळी जाग आल्यावर येणाऱ्या अनुभवाबाबत. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव येत असणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे काळजी न वाटता हसू येईल याचीही कल्पना आहे. 😊
संध्याकाळी झोपणं अशुभ आहे असं काही लोक मानतात.
शुभ-अशुभावर माझा विश्वास नसला तरी संध्याकाळी झोपले, तर उठते तेव्हा प्रत्येकवेळी
मला उदास, खिन्न वाटतं हा अनुभव आहे. त्यामुळे कितीही दमले तरी संध्याकाळी पाचनंतर (किमान रात्री दहापर्यंत तरी) झोपायचं मी टाळते. पण त्यादिवशी खूप दमणूक झाली होती, बरेच दिवस ‘वर्क फ्रॉम होम’मुळे झोप पुरेशी झाली नव्हती. त्यामुळे कितीही अनुभव
गाठीशी असला तरी त्यादिवशी मी संध्याकाळी पाच वाजता झोपलेच.
पाऊण तासाने उठले. गजर लावला होता, नाहीतर मी थेट
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले असते. तर मग अपेक्षेप्रमाणे अतिशय उदास वाटायला लागलं.
काही सुचेना. काही हालचाल करावी वाटेना. अगदी परत झोपावं असंही वाटेना. म्हटलं चला,
कुणालातरी फोन करू. फोनवर गप्पा मारून बरं वाटेल. ‘कुणाला बरं फोन करावा’ असा विचार करायला लागले.
तसे माझ्या संपर्कयादीत (म्हणजे कॉन्टक्ट लिस्टमध्ये) चारेकशे
लोक आहेत. त्यातले काही नंबर विविध सेवांच्या ‘कस्टमर केअर’चे आहेत,
म्हणजे ते अशा अनौपचारिक संवादासाठी बाद. काही अन्य सेवांचे आहेत – जसे की
फार्मसी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वाहन दुरूस्ती वगैरे. त्यांचाही उपयोग नाही. काही
नंबर कामाच्या ठिकाणचे आहेत. माझ्या कामाच्या ठिकाणचे लोक दुसऱ्या देशांत आहेत,
त्यामुळे सहज म्हणून फोन होत नाहीत. वेळ ठरवून ते करावे लागतात. त्यांच्याशी होणाऱ्या
अनौपचारिक संवादातही मुख्य भर फोनऐवजी चॅटिंगवर असतो. काही नंबर मी पूर्वी ज्या
लोकांसोबत काम केलं, त्यांचे आहेत. ते कधीतरी कामासाठी अजूनही फोन करतात, त्यामुळे
ते अद्याप काढून टाकलेले नाहीत. फक्त फॉरवर्ड पाठवणाऱ्या लोकांचे (आणि अनेक
व्हॉट्सऍप गटांचे) नंबर archive
करण्याची
युक्ती मला अलिकडेच समजली आहे. त्यामुळे माझी अजिबात चौकशी न करता फक्त स्वत:चे लेख, फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणं वगैरे
पाठवणारे सध्या तिकडं आहेत. या लोकांचे आणि माझे काही कॉमन ग्रुप्स असल्याने यांना
यादीतून काढून टाकणं जरा अवघड असतं.
काही नंबर अशा लोकांचे आहेत, की जे मरण पावले आहेत. आता
तो नंबर ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये, हे माहिती असूनही त्यांचे नंबर मात्र काढून
टाकावेसे वाटले नाहीत, तसा विचारसुद्धा कधी केला नाही. पण या लोकांना काही फोन करता येत नाही.
काही लोकांशी वर्षानुवर्ष काहीही संवाद नाहीये. १
जानेवारीला “नववर्षाच्या हार्दिक
शुभेच्छा” आणि दिवाळीला “लक्ष लक्ष दिव्यांची…” छापाचे फॉरवर्डेड मेसेजेस ते मला पाठवतात, यापल्याड
आमच्यात काहीही संवाद नाही. काही लोक मला फक्त व्हॉट्सऍप फॉरवर्ड पाठवतात,
व्यक्तिगत संवाद साधण्यात त्यांना काही रस नसतो. मग बहुतेक “अशा” वेळी मी त्यातले दोन-चार नंबर डिलीट करून टाकते. तो या
कातरवेळच्या उदासीनतेचा एक फायदा.
या गाळणीतून काही ठरलेली नावं मागे राहतात. हे लोक अनेक
वर्ष माझ्या संपर्कात आहेत ही जमेची बाजू. यातल्या सर्वांची वर्ष दोन वर्षांतून
एकदा तरी निवांत भेट होते, गप्पागोष्टी होतात. त्यांच्या घरी माझं जाणं आहे. मी
फार कमी लोकांना घरी बोलावते, मात्र हे लोक कधीही माझ्या घरी येऊ शकतात, येतातही. त्यांच्या
घरातली माणसं मला ओळखतात. मला काही अडचण आली तर यातले अनेक लोक धावत येतात, मदत
करतात. वेळी-अवेळी, पूर्वनियोजित नसलेला फोन करण्यासाठी खरं तर एवढं पुरेसं आहे.
पण त्यातल्या कुणालाही मी लगेच फोन करायला तयार होत नाही.
काहीजण काही मिनिटांनंतर त्यांच्या आध्यात्मिक गुरूविषयी बोलायला लागतात. हे मला
ओळखतात का खरंच -असा प्रश्न पडावा इतकं ते अध्यात्मिक बोलतात. यातले काहीजण फक्त
तक्रार करतात. कुणाबद्दल तक्रार हे महत्त्वाचं नाही, फक्त तक्रार करतात. मला या
तक्रारखोर लोकांबाबत नेहमी एक प्रश्न पडतो. ज्या लोकांबाबत हे तक्रार करताहेत,
त्यांच्याशी तर यांचे चांगले संबंध आहेत, ते एकंदर एकमेकांच्या सहवासात सुखी
दिसतात. मग माझ्याकडेच तक्रार का? आणि दुसरं
म्हणजे मी फोन केलाय. तरीही माझी जुजबी चौकशी करून मग हे लगेच आपल्या तक्रारीच्या
विषयाकडं वळतात. सुखाच्या काही गोष्टी सांगायला यांना जमतच नाही. मी फक्त उदास
वाटल्यावर नाही, तर चांगलं घडल्यावरही या लोकांना फोन करत असे. हल्ली मात्र मी टाळते.
काहीजणांना फक्त गॉसिप करण्यात आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यात
रस असतो – तेही नको वाटतं. ‘क्ष’ या व्यक्तीचं माझ्याबद्दल किंवा माझं ‘क्ष’ या व्यक्तीबद्दल काहीही मत असलं तरी त्याने माझ्या
किंवा ‘क्ष’च्या जगण्यात काय फरक पडतो? काहीच नाही. मग असू द्यावं ज्यांचं मत त्यांच्यापाशी.
काहीजण लगेच खूप काळजी करत भरमसाठ सल्ले द्यायला लागतात. कुणी जेवणाखाणाचा उपदेश
करायला लागतं. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. एरवी मी त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्याचा,
वेगळेपणाचा आनंद घेते. त्यांच्या व्यक्तिमत्वासकट ते माझे मैत्रीण-मित्र असतात,
त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे याबद्दल मी कृतज्ञही असते. पण यावेळी मात्र फोन
करायला नको वाटतं.
काहीजण त्यांच्या व्यापात खोलवर बुडालेले आहेत हे माहिती
असतं. मग त्यांना असा अवेळी फोन केला जात नाही. काहीजण ऑफिसच्या कामात किंवा
परतीच्या प्रवासात असतील म्हणून फोन करायला नको वाटतो.
असं मी एकेक नाव पहात जाते. पुढं जाते. फोन कुणालाच करत
नाही. आपल्या उदासीनतेला काही कारण नाही, ती आपोआप नाहीशी होईल हे मला माहिती आहे.
बोलण्यासारखं आपल्याकडं काही नाहीये हेही मला कळतं. आणि या क्षणी कुणाचं काही ऐकत
बसण्याइतका उत्साह मला नाहीये, हेही मला माहिती आहे. खरं सांगायचं तर त्या निरर्थक,
पोकळ वाटणाऱ्या त्या क्षणांमध्ये एक अद्भूत असं काहीतरी असतं. त्याच्या मोहात मी
त्या क्षणी असते, त्यामुळे माणसांची सोबत नकोशी वाटते.
शेवटचा नंबर नजरेखालून गेल्यावर मी स्वत:शीच हसते. उरतो तो फक्त
आपलाच नंबर. आपणच आपल्याशी संवाद साधणं, राखणं महत्त्वाचं असतं याची आठवण करून
देणारा तो आपलाच नंबर.
मग “O Mister Tambourine man” लावते.
किंवा “हृदयसूत्र” ऐकते.
किंवा मग ‘आमि शुनेछि शेदिन तुमि’ हे बंगाली गीत ऐकते.
उन्हाळ्याचे दिवस असतील तर कपाटातली दुर्बिण काढते. गॅलरीतून दिसणारे पक्षी पाहते. पावसाळा
असेल तर पाऊस पहात बसते.
कुठल्यातरी पुस्तकातलं एखादं वाक्य आठवून संग्रहातलं ते
पुस्तक शोधते. एखादी कविता, गाणं गुणगुणत बसते.
डोळे मिटून निवांत श्वासाकडे बघत बसते. झोपाळ्याच्या हालचालीसोबत
वाजणाऱ्या छोट्या घंटेच्या किणकिणाटाच्या नादाने स्तब्ध होऊन जाते.
मग कधीतरी विनाकारण आलेली खिन्नता विनासायास निघून जाते.
रिकामपणाचा तो एक क्षण मात्र सोबत राहतो. बाहेर कितीही
गर्दी असली तरी तो क्षण सोबत राहतो. तो वेदनादायी वगैरे अजिबात नसतो, फक्त वेगळा असतो.
क्वचित कातडी सोलून काढणारा असतो आणि तरीही वेदनादायी नसतो. अधुनमधून असा क्षण
अनुभवता येणं ही एक चैनच आहे एका अर्थी. ती वाट्याला येईल तेव्हा मी ती करून घेते.
मग कुणाचातरी फोन येतो. गप्पा सुरू होतात.
आत्ताच मला हे असं वाटतं होतं - वगैरे इतकं सगळं काही मी
त्या मैत्रिणीला-मित्राला सांगत बसत नाही. आपल्याला फोन आला की आपण ऐकायचं हे
सूत्र उभयपक्षी लाभदायक असतं हे मला अनुभवाने माहिती आहे.
मी कन्याकुमारी स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या
रेल्वेने प्रवासाला निघाले आहे असं स्वप्नं मला अनेक वर्ष पडायचं. कन्याकुमारी कायमचं
सोडण्याचा तो क्षण मी स्वप्नांमध्ये अनंत वेळा पुन्हापुन्हा अनुभवला होता. एकदा
कधीतरी मी त्याबद्दल लिहिलं आणि मग मला कधीच ते स्वप्न पडलं नाही.
मला आत्ता भीती वाटतेय की रिकामपणाच्या, निरर्थकतेच्या
अनुभवाबद्दल मी लिहिते आहे, तर कदाचित ते क्षण मला परत कधाही अनुभवता येणार नाहीत.
लिहिणं हे भूतकाळाचं ओझं कमी करण्याचा माझ्यासाठी तरी एक रामबाण उपाय आहे.
बघू, आगे आगे क्या होता हैं 😊
Saturday, December 23, 2023
२६७. रातरागिणी
शीर्षक वाचून गोंधळात पडणारे तुम्ही काही एकटेच नाही. मीही हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा गोंधळले. झालं असं की व्हॉट्सऍपवरच्या अनेक निरर्थक फॉरवर्ड्सच्या मांदियाळीत मला हा शब्द दिसला. रणरागिणी शब्द माहिती होता, पण रातरागिणी?
नवं काहीतरी दिसंतय म्हणून पाहिलं. ‘लोकमत’ दैनिकाच्या वतीने ‘सखी रातरागिणी नाईट वॉक’ आयोजित करण्यात आल्याची ती बातमी होती. २२ डिसेंबरची रात्र ही वर्षातली सर्वात मोठी रात्र असते. या रात्री पुणे शहरात एक छोटा वॉक ‘दैनिक लोकमत’ने आयोजित केला होता.
रात्री दहा
वाजता अलका टॉकीज (हा शब्द आता वापरातून गेलाय, पण अलका टॉकीज हे अलका टॉकीजच आहे)
चौकात जमायचं आणि तिथून शनिवारवाड्यापर्यंत चालत जायचं असा कार्यक्रम होता. अलका
चौक ते शनिवारवाडा म्हणजे फार फार तर दोन किलोमीटरचं अंतर. अगदी रमतगमत चालत गेलं
तरी अर्ध्या तासात पार पडणारं. पण कार्यक्रम तर दोन-अडीच तास चालेल असं संयोजकांनी
सांगितलं होतं. तर रस्त्यात गाणी, पथनाट्य, तारपा नृत्य, खाण्याचे आणि चहाचे
स्टॉल्स असणार होते. रात्रीचं असं निरुद्देश भटकून मला कितीतरी वर्ष उलटली होती. तसं
भटकण्याची ही एक नामी संधी चालून आली होती.
मग कधी नव्हे ते
व्हॉट्सऍप मेसेज फॉरवर्ड करण्याचा गुन्हा मीही केला. अर्थात फक्त पुणे शहरातल्या
स्त्रियांना मी हा निरोप पाठवला. काही ओळखीच्या पुरूषांनाही पाठवला – त्यांच्या घरातल्या
स्त्रियांना सामील व्हायचं असलं तर या विचारांनी. मला आलेल्या प्रतिसादांमध्ये
वैविध्य होतं. कुणी ‘यांना विचारून सांगते’ असं म्हणालं, तर कुणी ‘वेळ फारच
उशिराची आहे, पुढच्या वेळी संध्याकाळी सहा ते आठ घ्यायला सांगा म्हणजे मी येईन’ असं म्हणालं. कुणाची मुलं लहान होती, तर कुणाच्या घरी आजारी माणूस होतं.
कुणाला इतक्या रात्री परत यायला रिक्षा-टॅक्सी मिळणार नाही याची खात्री होती. तर
कुणाला ‘स्त्री-पुरूष समानता मानणाऱ्यांनी असं खास
स्त्रियांसाठीच्या कार्यक्रमात सामील व्हावं का’ अशी अत्यंत प्रामाणिक शंका होती.
शेवटी आम्ही चौघीजणी तयार झालो. तसंच बाणेरमधून एक मैत्रीण तिच्या सासूबाई
आणि लहान मुलीसह निघाली. एका मैत्रिणीचा दुसरीतला मुलगा घरातून निघायच्या अगदी दहा मिनिटं आधी झोपी
गेला. घरात दुसरं कुणी नसल्याने तिचं येणं रद्द झालं.
अलका चौकात आम्ही पोचलो तेव्हा व्यासपीठावरून गाणं गायलं जात होतं आणि जमलेल्या स्त्रियांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. हळूहळू गर्दी वाढत गेली. स्त्रियांचीच गर्दी असल्याने नकोशी धक्काबुक्की नव्हती. सार्वजनिक ठिकाणी अंग चोरून वावरावं लागण्याच्या अनुभवातून काही काळ तरी मुक्ती मिळाली. (अर्थात स्त्रियांचीही अती गर्दी असती तर तेव्हाही अंग चोरावं लागलं असतं म्हणा.) रातरागिणीचं थीम साँग ऐकायला मला आवडलं. ‘वस्त्रहरण आता होणे नाही, अपहरणाचा मुद्दाच नाही, रस्त्यावर आज उतरल्या नव्या वाघिणी, अंधारावर चालून जाणार रातरागिणी….’ अशा त्या गाण्याच्या सुरूवातीच्या ओळी होत्या. त्या गाण्याची लय छान आहे. सोबत "बादल पे पाव है, छोटासा गाव हैं, अब तो चल पडी, अपनी नाव हैं" यासारखी काही लोकप्रिय गाणीही होती.
‘अंधाराला घाबरत नाय, अंधाराला घाबरत नाय,’ ‘होऊ दे कितीही अंधार, आम्ही मागे नाही फिरणार’ अशा वेगवेगळ्या घोषणाही चालू होत्या. फुलगावच्या लोकसेवा शाळेतल्या मुली मोठ्या संख्येने आल्या होत्या. त्यात ढोलवादक पथकही होतं, एनसीसी कॅडेट्स होते, आणि नृत्याचा पोशाख धारण करून आलेला मुलींचा एक गट होता. हे सगळे गट एकाच शाळेतले होते की वेगवेगळ्या शाळांमधले हे मात्र माहिती नाही.
गाणी चालू होती तोवर आजूबाजूच्या (अनोळखी) स्त्रियांशी गप्पा झाल्या.
बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात रहात असलेल्या एक आजी एकट्याच आल्या होत्या. ‘माझ्यासोबत यायला कुणी मैत्रीण नव्हती, पण इथं आलं की काय मग सगळ्या मैत्रिणीच’ असं त्या हसतहसत म्हणाल्या. ‘लोकमत सखी मंच’चा मोठा गट आहे हे काहीजणींशी बोलताना कळलं. या गटात अनेक
साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम चालतात असंही कळलं. हळूहळू ढोल वाजायला लागले आणि त्याच्या
त्रासाने आम्ही गर्दीपासून दूर जायला लागलो. शनिवारवाड्याच्या दिशेने चालायला
लागलो.
आम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होतो आणि उजव्या बाजूला बऱ्याच
रिक्षा उभ्या होत्या. रिक्षाचालक हातात फलक घेऊन उभे होते. पुणे शहर स्त्रियांसाठी
सुरक्षित असावे यासाठी हे रिक्षाचालक कटिबद्ध असल्याचं सांगत होते. त्यांच्याशी
थोड्या गप्पा मारून पुढं निघालो.
एका ठिकाणी कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वांसाठी गुळाचा
चहा ठेवला होता. तिथं दोन महिला पोलिसांशी गप्पा झाल्या. एक महिला पोलिसाला तिची
दोन वर्षांची मुलगी घरी झोपली आहे का नाही याची काळजी होती. रात्रीची ड्युटी
नेहमीच असते (शिफ्ट्स असतात) असं त्या सांगत होत्या.
बऱ्याच काळाने रात्री असं निवांतपणे, कसलीही घाई न करता चालायला मजा आली.
सोबत मैत्रिणी होत्या, त्यांच्याशीही गप्पा झाल्या. त्यांच्या मुलांशीही गप्पा
झाल्या. अनेक फोटो काढून झाले. नदीपात्रातल्या रस्त्यातून रात्री जाताना
ओंकारेश्वर देऊळ फार मोठं आहे असा साक्षात्कार झाला. डेक्कन आणि संभाजी उद्यान
मेट्रो स्थानकं इतकी जवळ आहेत, की ट्रेनला एक डबा जास्त जोडला की दोन्ही स्थानकं
जोडली जातील असा विनोद करून झाला.
शनिवारवाड्यावर पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. नाही म्हणता
म्हणता आम्ही दोन तास चाललो होतो तर. शनिवारवाडा सजवला होता. एका मैत्रिणीचा
तिसरीतला मुलगा शनिवारवाडा आत जाऊन पाहता येईल या आशेने आमच्यासोबत आला होता.
वाड्याचा दरवाजा बंद आहे हे कळल्यावर तो खूपच निराश झाला 😊
एकूण मजा आली तरी
बारकाईने पाहताना काही गोष्टी मात्र खटकल्या
ध्वनी प्रदूषणाचा खूप
मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असताना पुन्हा याही कार्यक्रमात ढोल वाजले.
मान्य आहे, की मुलींचंच पथक होतं. पण उत्सव म्हणला की ढोल गरजेचा आहे का? गणेशोत्सवातले ढोल बंद करणं अवघड आहे. पण
निदान नवे उत्सव, त्या उत्सवांच्या परंपरा निर्माण करताना आपण काही भूमिका घेणार
आहोत? की नवे उत्सव फक्त
बाह्य स्वरूपातच नवे असणार आहेत? सौम्य
संगीताचेही अनेक पर्याय आहेत (जसं तारपा, तुतारी, सनई) ते पाहता येतील.
प्रखर दिवे डोळ्यांवर
येत होते. सगळं काही व्हिडिओसाठी करायची गरज नाही. सौम्य दिवे लावूनही कार्यक्रम
चांगला करता आला असता. प्रकाश प्रदूषण ही गोष्ट तर आपल्या गावीही नाही. माईकचा
कर्कश आवाजही नियंत्रणात ठेवता आला असता. रात्री बारा वाजता शनिवारवाड्यावर माईक
लावून कार्यक्रम करण्याने परिसरातल्या लोकांना त्रास झाला असणारच. 'एक दिवस काय
होतंय' असं म्हणून चालणार नाही. वर्तमानपत्रांकडून अजूनही आशा असणारे अनेक लोक
समाजात आहेत. चांगले पायंडे पाडायची जबाबदारी आपलीही आहे, आपल्या कार्यक्रमातून
आपण उत्सव साजरे करण्याचे पर्याय उभे केले पाहिजेत.
शिवाय कार्यक्रम
स्त्रियांचा आणि स्त्रियांसाठी असताना व्यासपीठावर सातत्याने पुरुष बोलत होते. कार्यक्रम
जर महिलांसाठी आहे तर व्यासपीठावरही महिलांना(च) जागा मिळू द्या. पुरुषांसाठी अन्य
अनेक जागा आहेत. स्त्रियांनी फक्त गाणी म्हणायची, घोषणा द्यायच्या आणि त्यांना
मार्गदर्शन वगैरे करायची वेळ आली की पुरूष पुढं येणार.... ही नेहमीचीच पद्धत याही
कार्यक्रमात दिसली.
स्त्रियांच्या
विकासासाठी स्त्रियांनी अमुक केलं पाहिजे आणि तमुक केलं पाहिजे (घाबरायला नाही
पाहिजे, रात्री बाहेर पडायला पाहिजे .... वगैरे) हे पण आता कंटाळाच नाही तर उबग
यावा इतकं जुनं झालंय. प्रश्न फक्त स्त्रियांच्या क्षमतांचा नाहीये. तसा असलाच तर
तो फार कमी आहे. स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली
आहेच. प्रश्न आहे समाजाच्या संवेदनशीलतेचा. ती वाढवण्यासाठी स्त्रियांसोबत पुरूषही
सहभागी असले पाहिजेत. सामाजिक वागणुकीत बदल घडून आला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक ते
पाठबळ प्रशासनाकडूनही मिळालं पाहिजे (कायदे, धोरणं, प्रशासकीय व्यवस्था, मूलभूत
सोयी वगैरे). या तिन्ही पातळ्यांवर काम झालं तरच स्त्रियांना खऱ्या अर्थाने
अंधारावर मात करायला आणखी बळ मिळेल.
अर्थात ही सगळी कामं 'लोकमत' या दैनिकाने केली पाहिजेत असं मला म्हणायचं नाहीये. त्यांनी त्यातला एक भाग केला. तो करताना या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची जाणीवही अधिक ठळक असली तर जास्त चांगलं होईल. पुणे शहरातील अनेकींसाठी हा एक नवा अनुभव होता. या अनुभवाची प्रासंगिकता कायम राखायची असेल तर आत्मपरीक्षणाला, बदलांना पर्याय नाही – ‘लोकमत’लाही आणि आपल्यालाही! नाहीतर कार्यक्रम फक्त प्रतिकात्मक होऊन जाण्याचा धोका राहतो.
Monday, December 11, 2023
२६६. दुवा
अनोळखी माणसांसोबत बोलायला उत्सुक असणारी तीन माणसं – खरं तर तीन स्त्रिया, एक पुरूष, आणि एक आठेक वर्षांची मुलगी - एका दिवसात मला भेटले. समोर दिसलेल्या अनोळखी माणसाला कुठल्याही शिक्क्यांविना स्वीकारणं मोठ्या माणसांना जमतच नाही की काय असं वाटण्याजोगे अनुभव होते ते.
पहिल्या
ताई बसमध्ये भेटल्या. पुणे शहरातली बस. शनिवारची कलती संध्याकाळ. त्यामुळे की काय
गर्दी जराशी कमी होती. पण सवयीने मी स्त्रियांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर जाऊन
बसले. तिकिट काढलं. शेजारी बसलेल्या ताईंनीही काढलं. त्या खिडकीतून बाहेर पहात
होत्या, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा माझा इरादा थंडावला. तितक्यात त्यांच्या
हातातलं तिकिट खाली त्यांच्या पायाशी पडलं. त्यांनी पायांच्या बोटांनी ते तिकिट
उचलून घेण्याचा प्रयत्न केला खरा. पण बसच्या त्या तिकिटाला जाडी अशी काही नसतेच,
त्यामुळे ते तिकिट काही उचललं जाईना. मग मी जागेवरून उठले, खाली वाकून तिकिट घेतलं
आणि त्यांच्या हातात दिलं. त्या हसल्या. ते धन्यवाद, आभार वगैरे शब्द माणसं सरसकट
वापरत नाहीत ते बरं आहे.
त्यांचा
पहिला प्रश्न होता, “तुमचं आडनाव काय?” अनेक लोकांना आडनावावरून जात कळते हे मला माहिती
आहे. शिवाय माझं आडनाव काही त्यावरून जात कोणती ते कळू नये या प्रकारातलं नाही. मी
मुद्दामच फक्त माझं नाव सांगितलं. मग त्या म्हणाल्या, “हो, पण आडनाव काय?” फार
आढेवेढे न घेता ते मग मी त्यांना सांगितलं. मग त्यांचा चौकशीचा सूर लागला तो त्या
काही थांबायचं नाव घेईनात. कुठं राहता, काय करता, घरी कोण असतं, आत्ता कुठं
चाललात, तिकडून परत कधी येणार .... वगैरे वगैरे.
पाच-सहा
स्टॉपनंतर मला उतरायचं होतं. त्यामुळे एवढ्या चौकशीची काही गरज नव्हती. आम्ही
एकमेकींना आधी कधीच पाहिलेलंही नव्हतं. मी त्यांना एकही व्यक्तिगत प्रश्न विचारत
नव्हते. अर्थात त्या ताई मला काही विचारायला वावही देत नव्हत्या हा भाग वेगळा. पण
संधी मिळाली असती तरी मी काही त्याना खोलात जाऊन त्यांची माहिती घेतली नसती.
पुन्हा कधी भेटलो तर कदाचित विचारेन, पण पहिल्याच भेटीत या माहितीची मला काही गरज वाटत
नव्हती.
त्यांच्या
प्रश्नांना उत्तरं द्यायच्या नादात मी एक स्टॉप पुढं आले. गुगल मॅप चालू करून मी
इच्छित ठिकाणाच्या दिशेने चालायला लागले. आधीच पोचायला थोडा उशीर झाला होता. त्यात
मी एक स्टॉप पुढं येऊन चालण्याचं अंतर दहा मिनिटांनी वाढवलं होतं. नकाशावर मला
दिसलेल्या एका जवळच्या रस्त्याकडं (म्हणजे शॉर्ट कट) मी वळले. एकूणच दिशांबाबत
माझं अज्ञान अगाध आहे. त्यामुळे ‘जीवनाची
दिशा’ वगैरे शब्दांपासून मी लांब राहणं
स्वाभाविक आहे. ते असो.
तात्पर्य
काय तर पुणे शहरातल्या एरवी फक्त नावानेच माहिती असलेल्या एका वस्तीत मी घुसले.
८५० मीटर अंतरावरचं माझं पोचण्याचं ठिकाण मग ९५० मीटर झाल्याचं माझ्या लक्षात आलं
आणि मी दिशा बदलली. एकमेकांनी चिकटून असेलली असंख्य छोटी घरं, घरांच्या दारात
बसलेल्या स्त्रिया-मुली, रस्त्यावर खेळणारी मुलं (मुलगे खेळत होते, आणि त्याच
वयाच्या मुली आईजवळ बसून होत्या). समोरसमोरच्या घरांमध्ये तीन-चार फुटांचं अंतर
असेल-नसेल, त्यातूनही वाट काढत जाणारे दुचाकीस्वार होते. माझ्याकडं काही जणांनी
आश्चर्याने पाहिलं, पण मी काही न बोलल्याने तेही काही बोलले नाहीत. मी चालत असलेला
रस्ता मुख्य रस्त्याला जाऊन मिळतो आहे ना याची मी वाटेत एका घरात बसलेल्या स्त्रियांबरोबर
खातरी करून घेतली. पण मी जितकी जास्त चालत होते, तितकी मी माझ्या पोचण्याच्या
ठिकाणाहून दूर जात होते. आपण भूलभुलय्यात फसलो आहोत की काय असं मला वाटायला लागलं.
मला काही कुणी त्रास देत नव्हतं, किंवा मला काही असुरक्षित वगैरेही वाटत नव्हतं.
मला फक्त वेळेत माझ्या ठिकाणी पोचायचं होतं.
वाटेतल्या
एका घराच्या दारात एक ताई उभ्या होत्या. मग मी थांबले. त्यांना मी म्हणलं, “मी रस्ता चुकलेय असं दिसतंय. मी तुमच्या वाडीतच
गोल गोल फिरतेय बहुतेक. मला .....सोसायटीत जायचं आहे. इथून कसं जायचं? सांगाल का मला?” मीही अर्थात प्लीज, कृपया वगैरे शब्द वापरले नाहीत.
बोलताना असे शब्द अनेकदा औपचारिक वाटतात. त्या ताई हसल्या, म्हणाल्या, “इथं सोसायटी वगैरे काही नाही. ही अशी घरं
दिसताहेत ना, तशीच वस्ती आहे इथं. तुम्ही चुकलायत रस्ता.” बाजूलाच आठ-नऊ वर्षांची एक मुलगी उभी होती, तिला
म्हणाल्या, “जा गं, मावशीला त्या
रस्त्यापत्तुर सोडून ये.”
मुलगीही
लगेच तयार झाली. मला जरा संकोच वाटला. मी म्हणलं, “अहो, सांगा मला, मी जाईन. तिला कशाला त्रास.” ताई हसल्या. म्हणाल्या, “दिवसातून दहा वेळा जातेय ती. शिवाय तुम्हाला नाही
सापडायचा रस्ता, तुम्ही पुन्हा चुकाल.”
नाव नाही, गाव नाही, जात नाही, धर्म नाही .... मला मदत
करायला त्यांना माझ्या अशा कोणत्याच ओळखीची गरज पडली नाही.
छोटी पोरगी बडबडी होती. ती एकदम तिच्या मैत्रिणीशी तिचं
काही भांडण झालं होतं, त्याबद्दल सांगायला लागली. कुठल्यातरी बोळकांडातून डावी-उजवीकडं
वळून तिने मला तीन मिनिटांत मुख्य रस्त्यावर आणून सोडलं. “आता तुम्ही जा” असा मला
आदेश देऊन ती सुसाट तिच्या घराकडं पळाली.
त्या सोसायटीतलं काम आटोपून पत्रकार नगरमध्ये एका
कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम संपल्यावर निवांत चालत आले ती जवळजवळ लॉ
कॉलेजपर्यंत. रोजची ठराविक पावलं चालायची असतात तीही पूर्ण झाली त्या निमित्ताने. चालताना
सभोवतालच्या जागा, आकाश, माणसं काहीशी वेगळीच भासतात हा नेहमी येणारा अनुभव पुन्हा
एकदा आला.
सिग्नलसाठी थांबले असताना कोपऱ्यावर एक नवा कॅफे दिसला,
म्हणून तिकडं गेले. शनिवारची संध्याकाळ असूनही कॅफे पूर्ण रिकामा होता याचं नवलं
वाटलं. (नंतर लक्षात आलं की तिथं वाहनांच्या पार्किंगची सोय नाही.) मी ऑर्डर देऊन
बसत होते तेवढ्यात एका ताईंनी प्रवेश केला. आमची नजरानजर झाली आणि मी हसून मोबाईल
उघडला. त्यांनी दोन मिनिटं वाट पाहिली आणि म्हणाल्या, “तुम्ही एकट्याच असाल तर या ना इकडं माझ्या टेबलावर.” मी उठून त्यांच्या टेबलाकडं गेले, बसले.
त्यांनीही नाव, आडनाव, कुठं राहता, वय किती, घरी कोण असतं, इकडं कुठं आला होता,
आता घरी परत कसं जाणार ... अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्या ... भागात
राहतात, गाडी (चारचाकी) नाही आणली ते बरं झालं ... अशी स्वत:बद्दलची माहिती त्या कळत-नकळत पुरवत होत्या.
मी सँडविच मागवलं होतं आणि त्यांनी समोसा. शेअर करायला
चालेल का असं त्यांनी विचारल्यावर मी हो म्हटलं. गप्पा मारत राहिलो. वाहतूक
व्यवस्थेबद्दल, देशातल्या सध्याच्या स्थितीबद्दल वगैरे. त्यांनी त्यांचं बील दिलं,
त्या बाहेर पडल्या. आता वेळ होती काउंटरवच्या पुरूषाची. आम्ही दोघींची ओळख
आधीपासून होती का असा त्याचा मुख्य प्रश्न होता. त्याने अर्थात नाव-गाव काही
विचारलं नाही मला. मीही हा कॅफे कधी सुरू झाला, गर्दी कोणत्या वेळी जास्त असते ...
असे माझ्या उपयोगाचे प्रश्न विचारले, बील दिलं आणि बाहेर पडले.
आपली सर्वांचीच ओळख (आयडेंटिटी) अनेक पदरी असते.
नाव-गाव-जात-धर्म-भाषा या काही ठळक ओळखी. माणसं आपल्यासारखी माणसं शोधत असतात. सार्वजनिक
जीवनात आपल्यासारख्या माणसांसोबत – ती अनोळखी असली तरी – आपण जास्त आरामात असतो.
आपली मतं एकसारखी असणार याची आपल्याला काहीशी खातरी (किमानपक्षी अपेक्षा) असते. आपलं
अनुभवविश्व सारखं असणार या गृहितकावर आधारित ही अपेक्षा असते.
समजा मी मराठी बोलणारी नसते, समजा मी स्त्री नसते, समजा
मी अमुक एका वयाची नसते, समजा माझं नाव-गाव-धर्म काही वेगळाच असता तर मला हाच अनुभव
आला असता का? कदाचित मला रस्ता
दाखवणाऱ्या वाडीतल्या त्या आई-मुलगी माझ्याशी वेगळ्या वागल्या नसत्या. पण बसमधल्या
ताई आणि कॅफेमधल्या ताई?
समजा बसमधल्या आणि कॅफेमधल्या ताई मराठी बोलणाऱ्या
नसत्या, स्त्रिया नसत्या, अमुक एका वयाच्या नसत्या .... तर मीही त्यांना माझी व्यक्तिगत
माहिती सांगितली असती का?
अनेकपदरी ओळखींमधला काहीतरी दुवा आपण सगळेच शोधत असतो.
हा दुवा नसेल्यांशी आपला संवाद होऊ शकेल असं आपण (आणि
समाजही) बदललो तर ......
Monday, September 25, 2023
२६५. वारसा जलव्यवस्थांचा: भाग २
जेजुरी. खंडोबाची जेजुरी. आपल्यापैकी अनेक लोक एकदा तरी जेजुरीला जाऊन आले असतील. मीही पूर्वी गेले होते. आज जेजुरीला जाऊनही आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो नाही. जलव्यवस्थापन हा या अभ्यास दौऱ्याचा विषय असल्याने आम्ही गेलो ‘पेशवे तलाव’कडं. भोर तालुका सोडून आम्ही आता पुरंदर तालुक्यात आलो होतो.
जेजुरीच्या पूर्वेला हा विशाल तलाव आहे. आपण साधारणपणे तलाव पाहतो ते एक किंवा दोन बाजूंनी बांधलेले असतात. हा तलाव वर्तुळाकार नसून अष्टकोनी आहे आणि पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.
पहिले बाजीराव पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात (इसवी सन १७३४ ते १७४०) हा तलाव बांधला म्हणून याला ‘पेशवे तलाव’ असे नाव आहे. तलावाचे क्षेत्र सदतीस एकर आहे अशी माहिती एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी तो एकोणीस एकर क्षेत्रात आहे असं म्हटलं गेलं आहे. डोंगररांगातून येणारं पाणी निर्विघ्नपणे तलावात यावं म्हणून तलावाच्या अनेक बाजूंना छिद्रं आहेत. गाळ-दगड न येता फक्त पाणी तलावात यावं यासाठी ही रचना असावी.
आम्ही गेलो तेव्हा सुदैवाने तलावावर फारशी गर्दी नव्हती. तलावावरून मल्हारगड (खंडोबा आणि महादेवाचे मंदिर असलेले प्रसिद्ध देवस्थान) स्पष्ट दिसतो.
पाण्याचा
प्रवाह नियंत्रित करण्यासाठी या जिन्यात पूर्वी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर दट्टे
बसवले होते. (हे दट्टे दगडी होते की लाकडी याविषयी वेगवेगळी माहिती आढळते.) आता हे
दट्टे काढून टाकले आहेत आणि दट्ट्यांची जागा सिमेंटने बंद केलेली आहे. तसाच जिना
शिवलिंगाच्या उजव्या बाजूलाही आहे. हे दोन्ही जिने चढून थेट धरणाच्या भिंतीवर आजही
जाता येतं. भिंतीवरून दिसलेल्या चारपैकी दोन जिन्यांचं रहस्य इथं लक्षात आलं.
बल्लाळेश्वर
मंदिराच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी डाव्या आणि उजव्या बाजूला छोटे बंदिस्त दगडी
मार्ग आहेत. त्यातून चालत गेलं की खालच्या शिवलिंगाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला
परत जिने आहेत – ज्यातून धरणाच्या भिंतीवर जाता येतं. थोडक्यात सांगायचं तर हे
दुमजली मंदिर आहे आणि ते धरणाच्या भिंतीत साठ फूट खोल आहे. प्रत्येक मजल्यावर दोन जिने आहेत. या मंदिराची आणि धरणाची
जोडरचना हे वास्तूशास्त्रातलं एक आश्चर्य तर आहेच, पण पाणी व्यवस्थापनातलंही एक
उत्तम उदाहरण आहे. पाण्याच्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरांची स्थापना करणं
यातून जनमानसाचा अभ्यासही दिसून येतो. देवाच्या प्रेमाने (अथवा भयाने – कोण कशाने
प्रभावित असेल ते सांगता येत नाही) लोक पाण्याचीही काळजी घेत असत असं दिसतं.
परिसरात प्रवेश करतानाच दोन – नाही तीन – गोष्टी तत्काळ नजरेत भरल्या. एक, मोकळ्या जागेत ठेवलेलं वराहशिल्प. दुसरी पुष्करिणी. आणि तिसरं म्हणजे मंदिराचं शिखर. या मंदिराच्या वरच्या भागाची पडझड झाली असल्याने, बाकी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भाविकांना आत जाता येत नाही असं समजलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दरवाजे उघडे असत असं आंतरजालावरच्या काही लेखांवरून दिसून आलं. पण सुरक्षितता महत्त्वाची, तिच्याशी तडजोड नकोच.
भारतीय हिंदू परंपरेत वराह हा विष्णूचा तिसरा अवतार मानला जातो. हिरण्यक्ष राक्षसाने पृथ्वी समुद्राच्या तळाशी ओढून नेली. विष्णूने वराहाचं रूप धारण करून. एक हजार वर्ष राक्षसाशी लढाई करून पृश्वीला वाचवलं ...ही कथा आपण अनेकांनी लहानपणी ऐकली-वाचली असेल. वराहावताराचं काम संपल्यावर विष्णून ते शरीर त्यागलं, आणि मग त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगं बनली अशी कथा विष्णुपुराणात आहे. महावराहाचं किंवा यज्ञवराहाचं शिल्प काहीसं भग्नावस्थेत असलं तरी विलक्षण देखणं आहे. वराहाचं शिल्प आपल्याला आवडू शकेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पुष्करणीसमोरच्या मोकळ्या अंगणात आता हा असला तरी पूर्वी तो पुष्करिणीतल्या मंडपात असावा असा अंदाज लावता येतो. तिथं श्रीदत्त या देवतेचं आगमन झाल्यावर वराहाला बाहेर हलवण्यात आलं असावं. वराहाच्या पाठीवर जी झूल दिसते, त्यात विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. फोटोतल्या वराहाचे पायही पाहा. तिथंही शंख, गदा ही विष्णूची आयुधं दिसतील.
मल्लिकार्जुन मंदिर पांडवकालीन आहे असा समज लोकांमध्ये प्रचलित आहे. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीवरून हे मंदिर यादवकालीन (तेराव्या किंवा चौदाव्या शतकातलं) असावं असं म्हणता येईल. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिरात दोन शिवलिंगं आहेत. एक शंकराचं आणि दुसरं पार्वतीचं.
छतावरची नक्षीही सुंदर आहे. आता इथं नंदी नाही, पण पूर्वी या मंडपात नंदी असावा. आणि आता जिथं दत्तमंदिर आहे तिथं शिवमंदिर असावं – आणि कदाचित शिवमंदिराच्या पूर्वी विष्णूचं मंदिर होतं की काय असा एक प्रश्न मनात आला. इथं जात्यासारखा एक मोठा दगड दिसला. ते जातं वगैरे नसून चुन्याच्या घाणीचा एक भाग होता असं अभिजित घोरपडे यांनी सांगितलं. त्याविषयी अधिक पुढच्या भागात पाहू.
परतीच्या वाटेवर सोमेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली ती इथले 'वीरगळ' पाहण्यासाठी.
(क्रमश:)
Thursday, September 21, 2023
२६४. वारसा जलव्यवस्थांचा: भाग १
(भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)
चार
दिवसांपूर्वी मला जर कुणी विचारलं असतं की रांझे-कुसगाव-जेजुरी-लोणी भापकर-सुपे-मोगराळे-लिंब या
गावांमध्ये काय साधर्म्य आहे; तर कदाचित
ही सर्व गावं आहेत, तिथली अर्थव्यवस्था शेतीप्रधान असणार, शिक्षण-आरोग्य-रोजगाराचे
प्रश्न.... असे काही मुद्दे मला सुचले असते. पण १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस‘भवताल’च्या चमुसोबत या परिसरात भटकायची संधी मिळाली आणि
वर उल्लेख केलेल्या गावांना जोडणारा आणखी एक दुवा स्पष्ट झाला. तो आहे ‘ऐतिहासिक जलव्यवस्था’- पाणी साठवण्याच्या, वितरणाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण इतिहासकालीन
जागा. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधली ही गावं आहेत.
प्रवासाच्या दोन दिवस आधी आमची एक ऑनलाईन मीटिंग झाली
होती. तेव्हा आमचा गट फार मोठा नाही हे लक्षात येऊन मला बरं वाटलं होतं. अभिजीत
घोरपडे आणि वनिता पंडित हे ‘भवताल’चे मार्गदर्शक धरून आम्ही चौदा लोक होतो. त्यात
शेतकरी होते, शिक्षक होते, वास्तुरचनाकार होते, इंजिनिअर होते, आणि विद्यार्थी
होते. बारामती, सांगली, मुंबई अशा विविध
ठिकांणाहून लोक या पर्यावरण-अभ्यास सहलीत सामील झाले होते. माझा ना इतिहासाचा
अभ्यास आहे, ना पाण्याचा. पण आपल्या परिसरात आहे तरी नेमकं काय या उत्सुकतेने मी
या सहलीत सामील झाले. ‘भवताल’बरोबर मी पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे
कार्यक्रमातून काही शिकायला मिळेल का नाही, याबाबत मनात सुरूवातीला थोडी शंका होती, ती अर्थातच अनुभवाअंती दूर झाली.
सकाळी सात वाजता पुण्यातून निघून, वाटेत चहा-नाश्ता करून
आम्ही भोर तालुक्यातल्या रांझे गावी पोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या
पाटलांना केलेल्या शिक्षेची कथा आपल्याला आठवत असेलच, तेच हे रांझे. काही ठिकाणी
गावाचं नाव रांजे असं लिहिलेलं दिसलं. गाव लहान दिसतंय, तीनेकशे कुटुंबं आहेत.
लोकसंख्या अंदाजे पंधराशे ते अठराशे असेल. गंमत म्हणजे या गावाहून तालुक्याचं
ठिकाण (भोर) ३५ किलोमीटर दूर आहे, तर जिल्ह्याचं ठिकाण (पुणे) ३० किलोमीटर अंतरावर
आहे. पुण्यात लोकांना कामासाठी तीसेक किलोमीटर सहज हिंडावं लागत असेल, तो भाग
वेगळा.
अंगणवाडी केंद्र बंद होतं. पण इमारत सुबक होती आणि बाहेरून तरी छान सजवलेली दिसली.
गावात वीज आहे, पण ती अर्थातच अनेकदा नसते. गावात प्राथमिक शाळा आहे, पुढच्या शिक्षणासाठी मात्र गावाबाहेर जावं लागतं. या परिस्थितीतही २०११च्या जनगणनेनुसार गावातले ७५ टक्के लोक साक्षर आहेत. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र नाही. रस्ते तसे ठीकठाक वाटले, ऐन पावसात ते कसे असतात याची कल्पना नाही. गावात बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम या सोयी नाहीत. जवळचा पेट्रोल पंप चार किलोमीटर अंतरावर आहे. हे सगळं वर्णन पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचं आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून प्रामुख्याने ऊस आणि फळभाज्या घेतल्या जातात. विहिरी आणि कूपनलिका यांच्या साहाय्याने शेतीला पाणीपुरवठा होतो.
इथल्या रांझेश्वर मंदिरात प्रवेश करताच एक मोठं वडाचं झाडं दिसलं. झाडाच्या खोडावर बांधलेले दोरे सांगत होते की वटपौर्णिमा नुकतीच होऊन गेली आहे. वडाभोवतीचा मजबूत दगडी पार स्वच्छ होता. डाव्या बाजूच्या कमानीही लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामपंचायतीमधले कर्मचारी श्री. बाबासाहेब भणगे आम्हाला माहिती द्यायला हजर होते. परस्पर ओळखींचे एक छोटे सत्र पार पडल्यावर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.
हे मंदिर शिवपूर्वकालीन आहे, दादोजी कोंडदेव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा ऐतिहासिक पुरावा आहे. म्हणजे हे मंदिर चारशे वर्ष किंवा त्याहूनही जुनं असावं. पायऱ्या उतरून आम्ही मुख्य मंदिराजवळ आलो तेव्हा समोर नंदी दिसले. शिवलिंगासमोर नंदी असणं काही नवं नाही, पण इथं एक सोडून तीन नंदी आहेत. या तिन्ही नंदींचे आकार वेगवेगळे आहेत. त्यामागे काय कथा आहे हे काही कळलं नाही. शिवलिंगाभोवती सापाचं वेटोळं स्पष्ट दिसतं. मंदिर परिसर बराच मोठा आहे आणि स्वाभाविकपणे त्याची पडझडही झाली आहे. खूप मोठं मंदिर असावं हे स्पष्ट होण्याइतके अवशेष टिकून आहेत.
इथं आमच्या भेटीचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे तीन कुंडं पाहणं. वरवर पाहता अगदी साधी व्यवस्था आहे असं दिसतं. इथं तीन कुंडांची साखळी आहे - एकाला एक जोडून अशी तीन कुंडं आहेत. त्यांची खोली अनुक्रमे २.०, १.४ आणि १.२ फूट अशी आहे. फोटो पाहून कुंडांच्या लांबी-रूंदीची तुम्हाला कल्पना येईल. पहिल्या कुंडाला ‘देवकुंड’ असं म्हटलं जातं. इथं झऱ्याचं पाणी थेट कुंडात येतं. या कुंडातलं पाणी देवाच्या पूजेसाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातं. या कुंडातल्या पाण्याचा स्तर वाढला की पाणी दुसऱ्या कुंडात जाईल अशी व्यवस्था आहे. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अशा रीतीने केली आहे की दुसऱ्या कुंडातलं पाणी कधीही पहिल्या कुंडात परत येणार नाही (आणि तिसऱ्या कुंडातलं पाणी कधीही दुसऱ्या कुंडात परत येणार नाही.) पाणी वाहून जाण्यासाठी असलेली छिद्रं पहिल्या कुंडात स्पष्टपणे दिसतात, पाणी वाहण्यासाठी काही कलाकारीची गरज नसते. पण जे काम करायचं ते सौंदर्यपूर्ण, नेटकं, आकर्षक करायचं हे तत्कालीन कारागिरांचं वैशिष्ट्य दुसऱ्या कुंडातलं गोमुख पाहून लक्षात येतं. यातलं पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं. दुसऱ्या कुंडातून पाणी तिसऱ्या कुंडात येतं तेव्हा कपडे धुणे, भांडी धुणे अशा कामासांठी ते वापरलं जातं. आता गावात नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकरी या कुंडांचा क्वचितच वापर करतात. केवळ देवळाचे पुजारी कुंडात आंघोळ करताना दिसले.
एका कुंडातून दुसऱ्या कुंडात पाणी वाहतं ठेवणं ही कल्पना
चारशे वर्षांपूर्वी अभिनवच होती - आहे. पण तत्कालीन नेतृत्व तिथंच थांबलं नाही. तिसऱ्या
कुंडातलं पाणी वापरून झालं की जमिनीत जिरून जात नाही. जमिनीखाली दगडी पाट बांधून
त्याद्वारे हे पाणी मंदिराबाहेर वळवण्यात आलं आहे आणि तिथून ते शेतीसाठी वितरित
होतं. हा दगडी पाट – दगडी भुयार-पाट म्हणायला पाहिजे खरं तर – अगदी प्रशस्त आहे.
त्यातून आजही पाणी वाहतंय. आमच्या गटातले काही सहकारी या पाटातून (किंचित वाकून)
चालत गेले आणि मंदिराबाहेर आले. त्यांच्या चाहुलीने आतली शेकडो वटवाघळं उडून बाहेर
आली. ती पाहून मग मी भुयार-पाटात चालत जाण्याचा बेत रद्द केला.
पाणी अजिबात वाया न जाऊ देता पाण्याचा वापर जास्तीत जास्त लोकांना कसा करता येईल आणि पाण्याचा परिणामकारक पुनर्वापर कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवणारी ही व्यवस्था आहे. आता काळ बदलला, सोयी झाल्या, नवं तंत्रज्ञान आलं, लोकांच्या गरजा बदलल्या म्हणून ही व्यवस्था वापरली जात नाही. पण ती व्यवस्था अजूनही चांगल्या स्थितीत आहे, ती बंद पडलेली नाही हे फार महत्त्वाचं आहे. ही व्यवस्था टिकली म्हणून आपल्यार्यंत पोचली. सस्टेनेबल डेवलपमेंट (शाश्वत विकास किंवा चिरंजीवी विकास) बाबत विचार करताना असं भूतकाळातूनही शिकायला मिळतं हे नक्की.
मंदिर परिसरातली शांतता, दगडी बांधकामाने त्या वातावरणात
असलेली एक स्थिरता, पडझड झालेल्या भिंतीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य .... हे सगळं
सोबत घेऊन आम्ही पुढं निघालो ते कुसगावकडं.
आम्ही गावात न जाता मुख्य रस्ता सोडून आत गेलो. साधारण दहाएक मिनिटं चालल्यावर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. रांझे आणि कुसगाव यांच्या हद्दीवर असलेलं हे छोटेखानी धरण (किंवा आजच्या भाषेत मोठा बंधारा) अजूनही मजबूत आहे. जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवगंगा नदीवर हा बंधारा बांधला गेला आहे. (पुण्यात राहण्याची सोय होण्यापूर्वी जिजाऊ लहानग्या शिवरायासह खेड शिवापूरमध्ये काही काळ राहिल्या होत्या.) चारशे वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या बंधाऱ्यात पाणी साठलेलं दिसलं. बंधाऱ्याची उंची दहा फुटांपेक्षा जास्त असावी. किती लांबीचा बंधारा आहे हे मला माहिती नाही,
पण नदीच पात्रं बऱ्यापैकी रुंद आहे. भिंतीची रुंदी (जाडी) पाच ते सहा फूट असावी असा माझा अंदाज आहे. पाणी बंधाऱ्यातून पुढं वाहण्यासाठी जो भाग केला आहे, त्याच्या दोन्हीबाजूंना बुरूजासारखी रचना आहे.
पाण्याच्या प्रवाहाने बंधारा वाहून जाऊ नये म्हणून ही व्यवस्था असते का असा प्रश्न पडला. नदीचं पात्र फार खोल नसावं (बहुधा गाळ साठला असावा), कारण आमच्यापासून थोड्या अंतरावर बंधाऱ्याने अडलेल्या पाण्यात एक माणूस मासे पकडत होता आणि मध्येच तो चालत नदी ओलांडून गेला.
या परिसरात पाऊस भरपूर होत असला, तरी दिवाळी उलटली की
पाण्याची कमतरता भासत असणार. लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची
सोय व्हावी या हेतूने अतिशय दूरदृष्टी दाखवून जिजाऊंनी शिवगंगा नदीवर बंधारे
बांधले. त्यांनी तीन बंधारे बांधले आहेत, आम्ही त्यापैकी फक्त हा एक पाहिला.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दीर्घकाळ टिकणारं काम कसं उभं करावं याचा हा एक
आदर्श आहे. जिजाऊंनी केलेल्या या कामाची मला फारशी कल्पना नव्हती हे सखेद नमूद
करते. आता या विषयावर आणखी वाचलं पाहिजे हे लक्षात आलं.
(क्रमश:)