ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, January 28, 2013

१४८. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग २ (अ) पाऊलखुणा



'व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतात असे आपण म्हणतो आणि त्यात तथ्यही आहे. पण एखाद्या व्यक्तीचे विचार जाणून घेताना त्या व्यक्तीवर आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला आहे हे जाणून घेणेही आवश्यक आहे. त्यातून त्या व्यक्तीची जडणघडण आपल्या ध्यानात येते. श्री. अरविंद आश्रमाच्या माताजींनी सामान्य माणसाबाबत केलेले एक विधान येथे उदधृत करण्याचा मोह मला होतो आहे.  माताजी म्हणतात, “One believes he has his own way of thinking. Not at all. It depends totally upon the people one speaks with or the books he has read or on the mood he is in. It depends also on whether you have a good or bad digestion; it depends on whether you are shut up in a room without proper ventilation or whether you are in the open air; it depends on whether you have a beautiful landscape before you; it depends on whether there is a sunshine or rain! You are not aware of it; but you think all kinds of things; completely different according to a heap of things which have nothing to do with you!” तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत किती तंतोतंत खरे आहे हे!

विवेकानंदांसारखे महापुरुष अर्थातच बाहय प्रकृतीचे असे गुलाम नसतात. पण कोटयवधींची लोकसंख्या असलेल्या या देशात जेंव्हा एखादाच विवेकानंद जन्माला येतो तेंव्हा त्यांच्या आयुष्याच्या, परिस्थितीच्या  त्यांना भेटलेल्या माणसांच्या अभ्यासातून विवेकानंद अधिक चांगले समजायला मदत होते. विवेकानंदांच्या विचारांइतकेच त्यांचे चरित्र समजून घेणेही म्हणून मला महत्त्वाचे वाटते.

जॉर्ज विल्यम्स (George Williams) यांनी Swami Vivekananda: Archetypal Hero or Doubting Saint? या त्यांच्या लेखात विवेकानंदांच्या आयुष्याची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे -
      I.      Wondrous Child: Visions, Meditations
      II.      Exceptional College Student: Master of Western thought, Independent Thinker
     III.      Carefully trained by Sri Ramakrishna
     IV.      Warrior Monk: Conquers West, Awakens India

विवेकानंदांचे सर्वच चरित्रकार तपशीलातील बदल सोडल्यास सर्वसाधारणपणे याच प्रकारे त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना दिसून येतात. मी विवेकानंदांच्या चरित्राची मांडणी करताना पहिल्या दोन टप्प्यांना फारसे महत्त्व देणार नाही. पण विल्यम्स यांनी न मांडलेला 'परिव्राजक काळ मला स्वत:ला महत्त्वाचा वाटतो. त्याचा विचार येथे केला जाईल. स्वामीजींच्या वेदान्तविषयक विचार वगळून इतर विचारांचाही येथे मी थोडक्यात परामर्ष घेतला आहे.

पहिली काही वर्षे

विवेकानंदांचे मूळ नाव नरेन्द्रनाथ दत्त. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील विश्वनाथबाबू दत्त हे प्रख्यात वकील होते. आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. नवसायासाने झालेल्या या मुलाचे फाजील लाड मात्र त्या दोघांनीही अजिबात केले नाहीत. प्रत्येक प्रसंगातून आपल्या मुलाला चांगले शिक्षण कसे देता येईल हेच त्यांनी सदैव पाहिले.

नरेन्द्राचे लहानपण मजेत गेले. त्याच्यातील आध्यात्मिक भूक, मनाचा मोठेपणा, साहस, निर्भयता, विरक्तता या मोठेपणी विशेषत्वाने दिसून आलेल्या गुणांची चाहूल त्याच्या बालपणीच्या अनेक प्रसंगांतून दिसून येते.

उघडया डोळयांनी जग पाहणे हे नरेन्द्राचे आणखी एक वैशिष्टय! ब्रिटीश राजवटीच्या निमित्ताने पाश्चात्त्य जडवादी विचारांचे आक्रमण भारतावर झाले होते. कलकत्ता ही तर त्या वेळची भारताची राजधानी. पण परंपरागत संस्कार आणि उपजत आध्यात्मिक प्रेरणा नरेन्द्राला वेगळे काही सांगत होत्या. त्यावेळच्या सर्व युवकांप्रमाणेच नरेन्द्रही नेमका कोणता रस्ता निवडायचा या द्वंद्वात सापडला व काही काळ तो सुधारणावादी 'ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाला. पण अनुभवाची आस काही त्याला स्वस्थ बसू देईना. पाश्चिमात्य विचारवंतांचे वाचन त्याने केले. पण त्यातील उणीवांमुळे त्याची भूक भागू शकली नाही. 'देव आहे का? न् असला तर तो मला दिसलाच पाहिजे या विचारांनी नरेन्द्र झपाटला गेला. साधुसंन्याशांनी गजबजलेल्या या देशात वास्तविक ईश्वराची अनुभूती घेतलेले खूप लोक असायला हवेत. पण नरेन्द्राची निराशाच झाली!

रामकृष्ण ...... रामकृष्ण

'ज्याअर्थी देव दिसत नाही त्याअर्थी तो नसावाच अशा पक्क्या नास्तिकतेकडे नरेन्द्र झुकत असतानाच दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिराच्या पुजा-याशी त्याची भेट झाली. हे पुजारी म्हणजेच श्री. रामकृष्ण परमहंस. नरेन्द्राचे हृदय उर्वरित आयुष्यात याच माणसाचे गीत गाणार होते! ही भेट केवळ नरेन्द्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातही महत्त्वाची ठरली. 'होय, ईश्वर आहे आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो त्याहून कैक पटींनी स्पष्टपणे मी ईश्वराला पाहतो या त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांनी नरेन्द्र आश्चर्यचकित आणि आनंदितही झाला! अंधश्रद्धाळू भक्ती नरेन्द्राच्या स्वभावात अर्थातच नव्हती. पण रामकृष्णांबद्दलच्या त्याच्या प्रत्येक संशयाचे निराकरण झाले अन वरवर रुक्ष दिसणा-या नरेन्द्राच्या अंतरंगातील कोमलता प्रकट होऊ लागली.

रामकृष्णांच्या परिसस्पर्शाने नरेन्द्राचे जीवन उजळून निघाले. रामकृष्ण-नरेन्द्राच्या सहवासाचा चार वर्षांचा हा कालावधी (१८८२ ते १८८६) मला सर्वार्थाने विलोभनीय वाटतो. नरेन्द्राच्या रुक्ष वादविवादांनी रामकृष्णांचे हळवे अंत:करण घायाळ होई; तर नरेन्द्राच्या वैज्ञानिक दृष्टीला रामकृष्णांच्या अनेक कृती, त्यांचे अनेक अनुभव सहजासहजी पचनी पडत नसत. पुढे अनेक वर्षांनी स्वामीजी भगिनी निवेदितांना म्हणाले,  “Let none regret that they were difficult to convince! I fought my Master for six long years, with the result that I know every inch of the way! Every inch of the way!!”

रामकृष्णांचे नरेन्द्रावरील नितांत प्रेम, मातेचे कार्य करण्यासाठीच नरेन्द्र जन्माला आला आहे हा त्यांचा दृढ विश्वास आणि रामकृष्णांचे खुले अंत:करण, त्यांच्या भावातीत अवस्थेचे वेळोवेळी घडणारे दर्शन, त्यांच्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती आणि त्यानुसार घडणारे आचरण यामुळे याच गुरुकडून आपल्याला मोक्षप्राप्ती मिळेल असा नरेन्द्राचा दृढ विश्वास .......!! या परस्पर विश्वासाच्या आधारावरच दोघांचे एकमेकांशी नाते टिकून राहिले! नरेन्द्र खूप मोठे काम करणार आहे अशी रामकृष्णांची खात्री (स्वत: नरेन्द्रला मात्र तसे अजिबात वाटत नसे) त्यामुळे त्यांनी नरेन्द्रच्या विरोधात एक चकार शब्दही कधी कोणाकडून ऐकून घेतला नाही.

रामकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करीत असतानाच अचानक नरेन्द्रचे वडील मृत्युमुखी पडले. मायेचे छत्र तर गेलेच शिवाय आर्थिक सुरक्षितताही गेली. आईचे अन भावंडांचे पोट भरण्यासाठी नरेन्द्र वणवण फिरु लागला. सुस्थितीतून अचानक दारिद्र्यात फेकले गेल्याने अवाक् आणि हताश बनलेली नरेन्द्रची आई ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल साशंक झाली आणि ही साशंकता नरेन्द्रच्या मनापर्यंत पोहोचली. पण त्याचवेळी रामकृष्णांनी अद्वैताचा असा एक अनुभव नरेन्द्रला दिला की, उर्वरित आयुष्यात नरेन्द्रने प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वराबददल कधीच शंका घेतली नाही.

रामकृष्णांचे आजारपण वाढले आणि १८८६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोवळया नरेन्द्रवर हा दुसरा मोठा आघात होता. पण त्याचे उपजत नेतृत्व इथे सिद्ध झाले. त्याच्या अभ्यासाची धार इथे लखलखीत झाली. त्याच्यामधले संघटन कौशल्य इथे दिसून आले. समवयस्क संन्यासी बांधवांना गुरुच्या मृत्युनंतर एकत्र बांधून ठेवणे, त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल हे पाहणे, एकत्रित साधनेबरोबरच आर्थिक व्यवहार सांभाळणे ही सगळी कामे त्याने इतक्या तयारीने केली की 'नरेन्द्र तुम्हाला शिकवेल हे रामकृष्णांचे उद्गार त्याने सार्थ ठरविले.

पण नुसत्या अभ्यासाने नरेन्द्रचे मन शांत होत नव्हते! आयुष्यात नेमके आणि नक्की काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना नसल्याने त्याच्या मनाची तगमग होत होती. गुरुने मुक्त हस्ते उधळलेले ज्ञान आपल्यापर्यंत का पोहोचले नाही याची त्याला खंत होती. अन नरेन्द्र भारतभ्रमणाला बाहेर पडला.

भारतभ्रमण

हा परिव्रजनाचा काळ नरेन्द्रच्या आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला यात शंकाच नाही. हिमालय ते कन्याकुमारी या प्रवासात नरेन्द्र समाजाच्या विविध अंगांना, व्यक्तींना, घटनांना सामोरा गेला. एक साधा संन्यासी या प्रवासातच झपाटून गेला. जडवाद आणि चैतन्यवाद, पाश्चात्य विज्ञान आणि भारताची आध्यात्मिकता यांची एकमेकांना ओळख झाली नाही तर माणसाचे माणूसपण हरवून जाईल, या दोहोंना जोडणे हेच आपले काम आहे याचीही या तरुण संन्याशाला या प्रवासातच जाणीव झाली.

स्वामीजींनी भारतभ्रमंतीच्या काळात जी दैन्यावस्था पाहिली त्यामुळे ते व्याकूळ झाले. धर्माच्या नावाखाली इथल्या दीनदलितांचे जे शोषण उच्चवर्णीयांनी चालवले होते, त्याची जाणीव त्यांना झाली. 'अहो, भारतातील उच्चवर्णीयांनो! या मायामय जगात तुम्हीच खरोखर आभासमय आहात, गूढ आहात, वाळवंटातील मृगजळ आहात! तुम्ही भूतकाळाचे प्रतिनिधी आहात. भूतकाळातील विविध प्रकारांचे तुम्ही नुसते प्रतिनिधी आहात..............भविष्याच्या दृष्टीने तुम्ही नुसते शून्य आहात.......प्राचीन भारताच्या मृत शरीराच्या रक्तमांसहीन अस्थिपंजरांनो, तुम्ही ताबडतोब धुळीला मिळून हवेत विलीन का नाही होत? एक गोष्ट मात्र खरी, अजून तुमच्या बोटांच्या हाडांवर तुमच्या पूर्वजांनी सांभाळलेल्या हि-याच्या अमूल्य अंगठया झळकत आहेत...... आता तुमचा तो खजिना अगदी झटपट आपल्या वारसदारांना देवून टाका बघू...... या त्यांच्या घणाघाती उद्गारांमागे भारतभ्रमणाचा जिवंत अनुभव होता!

धर्म हा मूठभर लोकांसाठी सत्तासाधन म्हणून उपयोगात आणला जातो आहे हेही त्यांनी पाहिले. ज्या देशामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचा उद्घोष झाला त्याच देशात तत्त्वज्ञान पोपटपंचीसाठी आणि व्यवहार मात्र माणुसकीला काळीमा फासणारा............. हा विरोधाभास पाहून त्यांचे अंत:करण हळहळले. वर्षानुवर्षे अंध:कारात खितपत पडलेल्यांना या समाजरचनेत अंध:कार, अन्याय आणि शोषण याव्यतिरिक्त काही मिळणार नाही हीही वस्तुस्थिती  त्यांनी उघडया डोळयांनी पाहिली.

समाजाच्या अवनतीचे मुख्य कारण म्हणजे धर्मातील कर्मकांडांना दिलेले अवाजवी महत्त्व. एखादी गोष्ट माणूस कशी वापरतो यावरच त्या वस्तुची उपयुक्तता व उपद्रवता अवलंबून असते. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आपण हेच पाहत आहोत. स्वामीजींच्या हे प्रकर्षाने लक्षात आले होते. म्हणूनच त्यांच्या उर्वरित आयुष्यातील विचारांचा आणि कृतींचा धागा माणसाची फक्त बाहय परिस्थिती बदलविणे हा कधीच नव्हता, तर माणसाला स्वत:मधील सत्प्रवृत्तींची ओळख करुन देणे त्यांनी स्वत:चे जीवितकार्य मानले. धर्म हा मुळात वाईट नाही, आपण त्याला वाईट पद्धतीने वापरतो. आपल्या समाजरचनेतील काही रुढी या सद्यस्थितीत योग्य नसतील तर आपण नव्या परंपरा निर्माण केल्या पाहिजेत असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला.

विधायक क्रांती

स्वामीजींचे वैशिष्टय हे की, क्रांतिकारक विचार मांडताना त्यांना कसल्याही विध्वंसाचा आधार घ्यावा लागला नाही. धर्मावर आघात करुन सुधारणा आणू पाहणा-या समकालीन सुधारकांबद्दल, त्यांच्या प्रामाणिक हेतूंबद्दल त्यांना आदर होता. पण त्यांनी स्वत: मात्र तो मार्ग कधीही चोखाळला नाही. पाश्चात्यांची भ्रष्ट नक्कल म्हणजे सुधारणा असे मानण्याइतके उथळ विचारवंत विवेकानंद कधीच नव्हते. सर्व प्रकारची प्रगती ही आतूनच होत असते असे त्यांचे ठाम मत होते. 'Each soul is potentially Divine’ ही औपनिषदिक तत्त्वाची त्यांनी केलेली घोषणा इतर कोणत्याही वादाच्या जाहीरनाम्यापेक्षा मला श्रेष्ठ वाटते. कारण त्यामधून जात, प्रांत, भाषा, इतकेच नव्हे तर धर्म, लिंग आणि देश यांच्याही पल्याड जाऊन सर्व माणसांना विकासाची समान संधी असल्याचे शाश्वत सत्य विवेकानंद आपल्या समोर मांडतात.

सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे तर पुनर्बांधणी’ हा नवा दृष्टिकोन त्यांनी सुधारकांना दिला. आणि त्याच वेळी पुराणमतवाद्यांवर त्यांच्याइतकी प्रखर टीका त्या काळात तरी अन्य कोणीच केली नसेल. विवेकानंद म्हणतात, 'आमचा धर्म स्वयंपाकघरातल्या सोवळया-भांडयांमध्ये गुदमरुन जात आहे. आम्ही वेदान्ती कसले, पौराणिक कसले नि तांत्रिक कसले! आम्ही आहोत 'शिवू नको वादी! आमचा धर्म आहे स्वयंपाकघरात, देव आहे चुलीवरच्या भांडयात.........

गूढवाद आणि अंधश्रद्धा यांचा आधार घेऊन उभ्या असलेल्या धर्मावर त्यांनी कठोर प्रहार केले. आपल्याकडच्या जुनाट, भ्रामक समजुती आणि युरोपीयनांचा भोगवाद नि जडवाद - दोन्हीही आपल्याला नको आहेत - या दोन्हींमधूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भारताचा स्वभाव 'अध्यात्म हाच आहे आणि त्याला यात्किंचितही धक्का न लावता, किंबहुना त्याचाच योग्य तो उपयोग करुन आपण आपल्या राष्ट्रीय जीवनाचा स्तर कसा उंचावू शकतो याचे स्पष्ट चित्र विवेकानंदांनी रंगविले.

भारतभ्रमणात स्वामीजींना जे अनेक अनुभव आले त्यातून अध्यात्म हाच भारताला एकसंध राखणार दुवा आहे याबाबत त्यांची खात्री पटली होती. भारताची मर्मस्थळे कोणती याची त्यांना जाणीव झाली. अंधार आहे म्हणून नुसतेच उसासे टाकत राहण्यापेक्षा 'आपण प्रकाश आणण्याचा प्रयत्न करु याअशा विधायक भूमिकेतून विवेकानंद अंतापर्यंत काम करत राहिले.

क्रमश: 

Monday, January 21, 2013

१४७. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १ : मागोवा


स्वामी विवेकानंदांची ओळख होउन तशी बरीच वर्षे उलटली. प्राथमिक शाळेत शिकत असताना, इयत्ता तिसरीत 'थोरांची ओळख या पुस्तकात विवेकानंदांच्या शिकागो परिषदेतील दिग्विजयाचे वर्णन वाचल्याचे मला आठवते. शाळेच्या वाटेवर भेटलेल्या अनेक गोष्टी कालांतराने विस्मरणात जातात हा नेहमीचा अनुभव! पण सुदैवाने आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत विवेकानंद मला पुन्हा भेटले. 

एकविसाव्या शतकात जग पुढे जात असताना मागे वळून विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणे यात एक विशेष औचित्य आहे. ११ सप्टेंबरच्या त्यांच्या विश्वबंधुत्वाच्या हाकेला शंभराहून जास्त वर्षे झाली आहेत. आता तर ११ सप्टेंबर म्हटले की विवेकानंद न आठवता अमेरिकेवरचा भीषण दहशतवादी हल्लाच आठवतो; आपण जणू विश्वबंधुत्व विसरलोच आहोत. पण विवेकानंद वाड्मय वाचणे हे फक्त वरवरचे वाचन राहत नाही. विवेकानंदांचे शब्द अत्यंत जिवंत, रसपूर्ण, चैतन्यमयी आहेत हा माझा आणि अनेकांचा अनुभव आहे. अर्थात त्यांचे शब्द केवळ वाचकांवर मोहिनी घालतात म्हणून सर्वश्रेष्ठ आहेत अशातला भाग नाही. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होउन लक्षावधी माणसे समाजाच्या भल्याकरिता कृतिशील झाली हे विवेकानंदांच्या शब्दांचे मला सर्वात मोठे वैशिष्टय वाटते.
जगात सर्वसाधारणपणे दोन प्रकारची माणसे आढळतात. एक म्हणजे 'जुने तेच सोने असा अटटहास धरुन बसणारी माणसे. काळ बदलला की व्यवहार बदलतो हा साधा नियम हे लोक विसरतात. याउलट काही लोक सतत नव्याचा हव्यास धरुन जगतात. त्यात काही फायदे जरुर आहेत. माणसांसाठी सोयीची साधने निर्माण करण्यात या प्रकारच्या लोकांचा मोलाचा वाटा आहे. पण कधीकधी निव्वळ बदलालाच प्रगती मानण्याची चूक ते करतात. जुन्या झालेल्या विवेकानंदांकडे वळून पाहणे हे त्यांच्या दृष्टीने मागासलेपणाचे लक्षण ठरते. विवेकानंदांच्या मृत्युलाही आता शंभरपेक्षा जास्त वर्षे लोटली आहेत. मग त्यांच्या विचारांना सामोरे ठेवून आपण काळाची पावले तर मागे फिरवायचा प्रयत्न करत नाही ना? - अशी शंका काहींच्या मनात येते.

सद्यस्थितीतील प्रश्न

भारताचे सध्याचे जे प्रश्न आहेत त्याला धर्माची वाट सोडून वेगळया मार्गांनी उत्तरे शोधण्याची गरज जर कोणाला वाटली तर ते फारच स्वाभाविक आहे. स्वातंत्र्य मिळविण्याचा काळ, त्यासोबत आलेली फाळणी, धार्मिक दंगे आणि त्यापायी उध्वस्त झालेली लाखो लोकांची आयुष्ये हा इतिहास सहजासहजी विसरता येण्यासारखा नाही. त्याची वर्णने आजही अंगावर येतात. बाबरी मशिदीचा पाडाव व त्यानंतर उसळलेले दंगे, मुंबईतील बॉम्बस्फोट, पंजाब, जम्मू-कश्मीर, गोध्रा ..............असे सारे उद्रेक अनुभवताना आपण होरपळून गेलो आहोत. आणि हे सगळे कशासाठी तर ज्यांच्यात्यांच्या धर्माचा अभिमानासाठी! त्यामुळे 'मरो तो धर्म अशी अनेकांची तीव्र भावना आपण समजू शकतो – ती अगदी स्वाभाविक आहे.

गरीबी, वाढती महागाई, बेकारी, जागतिकीकरणाचे आक्रमण, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, ढासळलेली कायदा व सामाजिक व्यवस्था, राजकारण्यांचे व गुंडांचे साटेलोटे, कशाशी काहीही देणे घेणे नसल्यागत स्वत:च्याच विश्वात रमलेला समाज, शिक्षणाचे व्यापारीकरण, प्रसार माध्यमांचे आक्रमण, निरक्षरता, व्यसनाधीनता, प्रदूषण, भाषिक तंटे, पाणी वाटपावरुन होणारे राज्यांमधले वाद, विस्थापितांचे पुनर्वसन .................. असे असंख्य राष्ट्रीय प्रश्न आपल्यापुढे आहेत. दिवसेंदिवस ते अधिकच उग्र रुप धारण करत आहेत. त्याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर घडत आहेतच. पूर, दुष्काळ, सुनामी, भूकंप, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीही काही आपली पाठ सोडत नाहीत.

या सर्व प्रश्नांची साधकबाधक चर्चा करुन त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्मावर चर्चा करणे ही एक पळवाटच आहे असे काहींना वाटू शकते. कारण खरे सांगायचे तर, कोणी पाहिला आहे ईश्वर? कोणाला माहिती आहे मोक्ष म्हणजे काय ते? असल्या खुळचट समजुतींमुळेच तर भारत आजवर मागासलेला राहिला आहे. भौतिक प्रगती साधण्याला खरे तर पर्याय नाही, ती न जमली की समाज असल्या खुळचट समजुतींच्या आहारी जातो असे दिसते – असे मत अनेक लोक मांडताना आढळतात.

हे असे प्रागतिक आणि बुद्धिवादी विचार मांडणा-या लोकांच्या प्रामाणिकपणाविषयी, त्यांना वाटणा-या तळमळीविषयी आदर व्यक्त करुनही असे म्हणावे लागते की,  भारतीय समाजाच्या मनाची नस कदाचित या लोकांना अदयाप गवसलेली नसावी!

हिंदुत्ववादाची लाट?

कारण देशातील सर्वच माणसे विचारवंतांच्या या बुद्धिवादी मताशी सहमत आहेत असे दिसत नाही. किंबहुना चित्र दिसते ते वेगळेच - समाजातील अधिकाधिक लोकांवर धर्माचा पगडा वाढतो आहे असे दिसते. आणि याचे सर्वात साधे कारण म्हणजे धर्म हा या देशाचा स्वभाव आहे!

'आपण पाहिले आहे की आपले तेज, आपले सामर्थ्य, एवढेच नव्हे तर आपल्या राष्ट्राचे जीवन - या सर्वांचा आधार धर्मच आहे. धर्माला आपल्या जीवनाचा आधार बनविणे हे बरोबर आहे की चूक आहे, चांगले आहे की वाईट आहे, परिणामी कल्याणकारक आहे की अकल्याणकारक आहे याची चर्चा मी आज करीत नाही, पण चांगले असो वा वाईट असो धर्मच आपल्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार आहे. तो तुम्ही टाळू शकत नाही. तो नेहमीच तुमच्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार राहणार आहे. आणि म्हणून आपल्या धर्मावर माझ्याइतकी तुमची श्रद्धा नसली तरीही तुम्हाला याचा आश्रय घ्यावाच लागेल. या धर्माने तुम्ही निबद्ध आहात आणि जर तुम्ही त्याचा त्याग केला तर तुमचा सर्वनाश होईल. आपल्या जातीचा तोच जीवनाधार आहे व तो सुदृढ केला पाहिजे. ........................... राजकीय व सामाजिक सुधारणा आवश्यक नाही असे सांगण्याचा माझा आशय नाही - माझे सांगणे हेच आहे, आणि ते तुम्ही नीट लक्षात ठेवा की या गोष्टी भारतात गौण आहेत व धर्म हीच मुख्य गोष्ट आहे........ असे विवेकानंद म्हणतात.

भारतात गेल्या काही वर्षांत हिंदुत्त्ववादाची लाट आली आहे की काय अशी मनात शंका येते. 'तुमचा धर्म कोणता? या प्रश्नावर 'मानवधर्म असे उत्तर अभिमानाने देणारी एक पिढी आता जणू लयाला गेली आहे. 'गर्व से कहो हम हिंदु है असे स्टिकर्स मधल्या काळात कित्येक घरांमध्ये लावलेले दिसत असत. पण त्या आधी या देशात मध्यंतरीचा एक काळ असा होता ,की स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याची सामान्य माणसाला लाज वाटत होती. विवेकानंदांनी आपल्या या असल्या प्रवृत्तीवर सडकून टीका केली आहे. 'आज हिंदू शब्दाने जरी काही वाईट अर्थबोध होत असेल तरी हरकत नाही. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकात अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊ या. असे अत्यंत रचनात्मक आवाहन स्वामीजी करतात. त्यामुळे हिंदू जनजागरणाचा भारतीयांना अभिमान वाटणेही स्वाभाविकच आहे, हे देखील समजून घेण्याची गरज आहे.

पण अर्थातच विवेकानंदांना अजिबात अभिप्रेत नसणारा जागरणाचा एक पैलूही येथे आहे. आजचा हिंदुत्ववाद, हिंदुत्ववादाची ही लाट निव्वळ राजकीय स्वरुपाची आहे. हिंदू धर्माच्या मूळ तत्वज्ञानाशी या जागरणाचे आणि तिच्या दुराग्रही पाईकांचे फारसे देणेघेणे नाही. त्यामागे मतांचे, सत्तेचे आणि स्वत:चा प्रभाव शाबूत राखण्याचे राजकारण आहे. समाजाचे जीवन सुरळीत राखण्याचा किंवा व्यक्तींना आध्यात्मिक मूल्ये देण्याचा यात काही विचारच केला जात नाही, असे माझे मत आहे.

हिंदुंच्या राजकीय अस्मितेचा प्रश्न महत्त्वाचा नाही असे मला म्हणायचे नाही. पण हिंदुत्वाचा ध्वज उंच राखण्याच्या नावाखाली गेली काही दशके जे राजकारण केले जात आहे त्यात अभिमान वाटण्याजोगे काहीही नाही, हे राजकीय नेते आणि त्यांचे धुंद अनुयायी सोयिस्करपणे विसरत आहेत.

हिंदू जनजागरणाच्या आंदोलकांनी स्वामी विवेकानंदांना आपले मार्गदर्शक, नेता, गुरु, नायक या स्वरुपात स्वीकारले आहे. अनेक पत्रकांमध्ये, जाहिरातींमध्ये, सभांमध्ये विवेकानंदांची वचने सर्रास उदधृत केली जात आहेत. विवेकानंदांना केवळ राजकीय हिंदुत्व अभिप्रेत नव्हते हे जाणूनबुजून नजरेआड केले जात आहे, यात फार मोठा धोका आहे. विवेकानंदांच्या, हिंदुत्वाच्या नावाने भावी पिढयांपुढे जर आपण हिंसेचा, अतिरेकाचा, असहिष्णुतेचा आदर्श ठेवणार असू तर आपण आपल्या पायावर धोंडा घालून घेत आहोत यात शंका नाही. या राजकीय चळवळीला आपण जर तत्त्वचिंतनाची जोड दिली नाही तर कालांतराने आपला समाज आणि देश अधिकच दुर्बल होईल. समाजाला ख-या तेजोमयी हिंदुत्वाची ओळख करुन घ्यायची असेल तर आपल्याला विवेकानंदांचे बोट धरुन चालले पाहिजे.

सर्वांचे विवेकानंद

हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची ताकद फक्त विवेकानंदांमध्येच आहे असे अतिरेकी मत मी मुळीच मांडणार नाही. भगिनी निवेदितांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'स्वामी विवेकानंदांच्या भाषणांतही वेदांमधील व उपनिषदांमधील उद्धरणे सढळपणे विखुरलेली आढळतात. भारताच्या स्वत:च्याच ठायी असलेल्या धनाचे त्यांनी त्याला फक्त स्वरुप समजावून सांगितले, त्याचा त्याला साक्षात्कार करवून दिला एवढेच. त्यांनी प्रचारलेली सत्ये, ते जन्माला आले नसते तरी देखील तितकीच खरी राहिली असती, नव्हे, याहीपेक्षा आणखी म्हणावयाचे म्हणजे ती तितकीच विश्वसनीय, अधिकृत नि अस्सलही असती.

विवेकानंदांच्या बाबतीत असे दिसून येते की समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना ते आपलेसे वाटतात. हिंदुत्ववादी चळवळीप्रमाणे मार्क्सवादी चळवळीलाही विवेकानंदांबददल प्रेम वाटते. (या दोन्ही चळवळी स्वत:च्या सोयीची वचने मागचा पुढचा संदर्भ वगळून वापरतात हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे) युवकांना प्रेरित करण्याची असीम शक्ती विवेकानंदांच्या शब्दांत आहे. केवळ झोपी गेलेल्यांनाच नव्हे तर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्यांनाही विवेकानंदांचे शब्द जागे करतात.

शिकागो सर्वधर्मपरिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने १९९३ च्या सप्टेंबरमध्ये The Week या साप्ताहिकाने विवेकानंदांवर विशेष अंक प्रसिद्ध केला होता. विवेकानंद सर्वांनाच कसे जवळचे वाटतात याविषयी त्या अंकात अनेक लेख होते. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना विवेकानंद आदर्श वाटावेत हे स्वाभाविकच आहे. पण त्याचबरोबर १९०५ मध्ये बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या आंदोलनात अनेक क्रांतिकारकांकडे विवेकानंद  साहित्य सापडल्याचा उल्लेख आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या अनेक सेवाभावी संस्था विवेकानंदांच्या विचारांचे ऋण खुलेपणाने मान्य करतात. ज्याचा ज्या प्रकारचा स्वभाव, ज्याची जी गरज, त्याप्रमाणे अचूक मार्गदर्शन विवेकानंदांच्या लेखनातून आपल्याला मिळते. 'ये यथा मां प्रपद्यन्ते या भगवदगीतेतील वचनाची आठवण विवेकानंद वाचताना येतेच येते.

काळाची गरज

विवेकानंद सर्वांना आवडतात हे काही त्यांचा अभ्यास करण्याचे एकमेव कारण नव्हे. विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार व विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांच्या शब्दांत सांगायचे तर 'विवेकानंदांनी उदघोष केला तो शक्तीच्या – सामर्थ्याच्या उपासनेचा. शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! सर्व क्षेत्रांत बलाची उपासना करणे हीच आजची सर्वात मोठी आवश्यकता आहे. 'मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद! लोखंडांच्या कांबीसारखे स्नायू, बेलाग पोलादाच्या नसा आणि वज्रासारखे अजिंक्य सामर्थ्यवान मन असलेल्या माणसांनी हे राष्ट्र घडले पाहिजे अशी त्यांची आस होती. सामर्थ्य आणि पुरुषार्थाने युक्त असे क्षात्रवीर्य आणि तप:पूत सत्त्वसंपन्न असे ब्राह्रातेज या दोन्हींचा वारसा भारतपुत्रांनी वाढवला पाहिजे असे ते म्हणत. आजच्या या संकटाच्या आणि विनाशाच्या काळात नेमकी याच गोष्टीची आवश्यकता आहे. आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेमक्या याच गोष्टींची आपण उपेक्षा केली आहे. कारण परदेशातून आयात केलेल्या भोगवादी विचारांच्या मायाजालात आपण गुरफटून गेलो आहोत.

द्यस्थितीतील प्रत्येक प्रश्नावर विवेकानंदांकडून आपल्याला तयार उत्तर मिळेल असा आशावाद केवळ भाबडाच नव्हे तर व्यर्थ देखील आहे. अणुध्वम, प्रदूषण, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, बेकारी अशा प्रश्नांवर विवेकानंदांकडून तयार उत्तर मागणे आणि ते मिळत नाही म्हणून विवेकानंदांकडे लक्ष न देणे करंटेपणाचे ठरेल.

विवेकानंद शंभर वर्षांपूर्वी होऊन गेले म्हणून आजच्या प्रश्नांवर त्यांच्याकडून तयार उत्तर मिळणे अवघड आहे असे मला म्हणायचे नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनापेक्षा कितीतरी वेगळया पातळीवरुन विवेकानंद जीवनाकडे पाहतात. त्या विशिष्ट जीवनदृष्टीपर्यंत पोहोचायचे कसे याचे मार्गदर्शन आपल्याला विवेकानंदांकडून निश्चिततपणे लाभते. त्यांची जीवनविषयक दृष्टी एकांगी नसून सर्वसमावेशक आहे हे विशेषत्वाने जाणवते. विवेकानंदांचा मार्ग या जगातील समस्यांनी हैराण होऊन पळ काढणा-यांसाठी नाही, तो शूरांसाठी आहे, झुंजार लोकांसाठी आहे. विवेकानंदांचे वाड्मय उपनिषदातील 'त्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्त्कवयो वदन्ति ।।  या ओळीची आठवण करुन देतात.

विवेकानंदांचा वेदान्त विचार

विवेकानंदांनी शिकागो जागतिक सर्वधर्मपरिषदेत हिंदू धर्माचा ध्वज फडकावला अशा आशयाचे विधान आपण वाचले आणि ऐकले आहे. विवेकानंदांचा धर्म संकुचित नाही तर तो सार्वजनीन धर्म आहे, सनातन धर्म आहे. त्यात पांथिक, सांप्रदायिक अभिनिवेशाला यत्किंचितही जागा नाही; आहे ती उदारता. परमताबददल निव्वळ सहिष्णुता नाही तर आहे खराखुरा स्वीकार! १९ सप्टेंबर १८९३ रोजी त्या परिषदेसमोर विवेकानंदांनी वाचलेला 'हिंदुधर्म हा निबंध आपण मुळातून वाचला पाहिजे.

विवेकानंदांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते, की मनात येते तर ते एका नव्या संप्रदायाची निर्मिती करु शकले असते. पण त्यांच्या मते 'पंथाभिमान, स्वमतान्धता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने हाणून काढली आहे .... पाश्चिमात्य देशांत आणि भारतातही त्यांनी श्रद्धेचा, भक्तीचा, बलाचा संदेश वारंवार दिल्याचे दिसते. इतर सर्व धर्मांबददल आदर राखताना स्वधर्माचे पालन त्यांना महत्त्वाचे वाटे.

विवेकानंदांचा विचार हा मूलत: वेदान्त विचारच आहे असे आपल्याला नि:शंकपणे म्हणता येते. वेदान्त हा केवळ वाचनाचा किंवा मननाचा विचार नसून तो प्रत्यक्ष जीवन जगण्याचा अत्युत्कृष्ट मार्ग आहे अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. ते म्हणतात ' वेदान्तदर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे, त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे.

धर्म, शिक्षण, स्त्रियांचे प्रश्न आणि संघटना या चारही क्षेत्रांमध्ये विवेकानंदांचे विचार प्रभावी योगदान देऊ शकतात. विवेकानंदांच्या विचारांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे 'देश हा देव असे माझा अशी भावना चेतविण्यात त्यांना कमालीचे यश लाभलेले दिसून येते. ईश्वर केवळ मंदिरातच नाही तर तो सर्वत्र आहे ही विवेकानंदांची शिकवण म्हणजे 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक मंत्राचे प्रतिबिंबच होय! दरिद्रीनारायण, मूर्खनारायण, अज्ञानीनारायण याही देवतांची पूजा करण्याचे आदेश त्यांनी आपल्याला दिले. पारमार्थिक आयुष्याबाबत स्वप्ने रचत राहणे हे विवेकानंदांचे जीवनध्येय नव्हते. तर अ‍ॅनी बेझंट यांनी वर्णन केल्याप्रमाणे ते खरेखुरे 'योद्धा संन्यासी होते.

आपण सारे सिंहाचे छावे आहोत पण स्व-स्वरुपाच्या अज्ञानामुळे आपण बकरीचे जिणे जगत आहोत अशी एक कथा विवेकानंद त्यांच्या श्रोत्यांना ऐकवत असत. विवेकानंदरुपी सिंहाच्या गर्जनेला प्रतिसाद देण्याचे ऐतिहासिक काम या जगाने करण्याची वेळ आता आली आहे.