ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, January 24, 2011

६०. काही कविता: १५

कविता लिहिण्याची प्रक्रिया नेमकी काय असते – हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला आहे. तो माझ्यासाठी एक ‘यक्षप्रश्न’च आहे म्हणा ना! लिहायचं का नाही हा पर्याय नसतो अस मी समजून चालते – पण हे केवळ मी साक्षर आहे म्हणून! अक्षरांची आणि माझी ओळख नसती तर मी स्वत:ला कस व्यक्त केल असत – असाही विचार मनात येतो.
कविता कशाची असते? सुखाची? दु:खाची? समाधानाची? उदासीनतेची? वैतागाची?
मुळात कविता अनुभवांची असते? का विचारांची असते? का भावनाची असते? की त्याही पलीकडची असते?
कविता गूढ असते? की ती आपल्याला कळत नाही म्हणून गूढ वाटते?
कवितेला या सगळ्याशी काही देणे घेणे नसते .. ती येते आणि जाते ... आपल्याच नादात ..

उजाडले
रुजलेही
प्राणांतिक
उठसूट;


घेता माघार
मध्यात
राहे झाकली
ती मूठ;

तीर
मौनाचा गाठता
शब्दांची ही
लयलूट;

भग्नतेचा
शाप कोरा
निरंतर
ताटातूट!

दिल्ली, २२ जानेवारी २०११  २.०० 

Thursday, January 13, 2011

५९. निमित्तमात्र दिल्ली: भाग ३

आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक....

तिच्या येण्याबद्दल बरीच चर्चा होती, इशारे होते. कोणाचाही फोन आला, की पहिला मुद्दा तिच्या आगमनाविषयीचा असायचा. तिच्यापासून मी स्वत:ला जपल पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, फाजील आत्मविश्वास नको .. असा सल्ला जवळजवळ सगळ्यांनी दिला. एका नव्या मित्राने डिसेंबरच्या सुरुवातीस मला पहिली मेल पाठवली. त्यात ‘Warm Regards’ असा मेलचा शेवट करताना ‘दिल्लीच्या थंडीत तुला याची गरज भासेल’ अस लिहील होत – ते वाचून मला हसायला आल!

मग एकदाची ती प्रसिद्ध, बहुचर्चित थंडीची लाट दिल्लीत आली.

दिवस धुक्यात गुरफटले. सूर्यदर्शन अप्राप्य झालं. ‘तोंडची वाफ दवडू नये’ या वाक्प्रचाराचा (की म्हण? हल्ली मी जरा वाक्प्रचार आणि म्हणींवर विचार करायला लागल्यामुळे माझा गोंधळ वाढला आहे!) प्रत्यय आला. लोक एकदम ‘सेल्सियस’च्या भाषेत बोलायला लागले. आग्रा, सिमला अशा शहरांशी तुलना व्हायला लागली. रस्त्यांवरच्या झाडांच्या फांद्या तोडून जागोजागी शेकोट्या पेटायला लागल्या. स्कार्फ, स्वेटर्स, शाली, कानटोप्या.....यांच्या रंगांची उधळण भोवताली दिसू लागली.

मागचे तीन महिने थोडीफार माहिती झालेली दिल्ली एकदम जणू बदलून गेली. एका बाजूने ती अधिक खुलली आहे अस वाटत असताना तीच गूढ अधिक गहिर झालं! पान गळून गेलेल्या झाडांमध्ये जसा जीव तगून असतो, तस दिल्लीचही आहे हे माझ्या लक्षात आल ...म्हणजे वर काही का दिसेना, आतल रहस्य अजून अबाधितच आहे माझ्यासाठी!

दिल्ली मला अजून नीट माहिती न होण्याच एक मुख्य कारण म्हणजे मी रोजचा प्रवास ‘मेट्रो’ ने करते. त्याचा मला भरपूर फायदा होतो – वेळ वाचतो, गर्दी कमी असते, दगदग वाचते, प्रवास तुलनेने आरामदायी आहे .. वगैरे वगैरे. पुणेकरांना मेट्रोच महत्त्व पटवून द्यायला आता माझ्याकडे भरपूर मुद्दे आहेत. पण त्यामुळे एक गोष्ट अशी झालीय की दिल्लीची फारशी चित्र माझ्या मनावर उमटत नाहीत. दिल्लीत मेट्रोचे आता सहा वेगवेगळे मार्ग आहेत. त्यांना Yellow Line, Red Line, Violet Line, Green Line, Blue Line आणि Orange Line अशी नाव आहेत. यातले काही मार्ग जमिनीवर आहेत, तर काही जमिनीच्या वरून (elevated) आहेत. रस्त्याने गेले तर इमारती दिसतात, माणस दिसतात, आकाश दिसत, वाहन दिसतात ..... पण माझा रोजचा प्रवास भुयारी मार्गावर असतो. त्यामुळे मला यातल माणसं वगळता काही दिसत नाही. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा माझा रोजचा प्रवास म्हणजे जणू एका गुहेतून दुसऱ्या गुहेपर्यंतचा माझा अखंड प्रवास. त्याला अपवाद अर्थात सुट्टीच्या दिवसांचा. तेव्हा मी भरपूर भटकते, चालते – पण माझी मजल अजून तरी फार दूर गेलेली नाही. त्यादिवशी संध्याकाळी चांदणी चौकात गेले होते भटकायला. तेव्हा दोन तीन तासांत हजारो माणसं बघताना, त्यांचे स्पर्श चुकवत गर्दीतून चालताना आपण या महानगरात कस आपल्यापुरत एक बेट बनवून घेतलं आहे हे जाणवल! आता अधूनमधून बसने, चालत निरुद्देश दिल्लीत फिरायचा बेत आहे. सध्या सगळे बेत ‘थंडी कमी झाली की’ या एका मुद्द्यावर येऊन थबकले आहेत!

दिल्लीत आल्यापासून माझ्या काही सवयी बदलल्या आहेत हे नक्कीच!

तुमच्यापैकी जे मला ओळखतात त्यांनी दिल्लीत मला चालताना पाहिलं तर मी फार नम्र झाले आहे अस तुम्हाला वाटेल – कारण रस्त्यावरचा सगळा काळ मी मान खाली घालून चालत असते. पण याच कारण नम्रता अजिबात नाही! मग का?

तर दिल्ली हे एक घाण शहर आहे. मी मुख्यत्वे दिल्लीच्या चांगल्या समजल्या जाणाऱ्या भागात फिरते – राष्ट्रपती भवन, चाणक्यपुरी वगैरे. तरीही माझ हे मत बनल आहे! कॉमनवेल्थच्या बाकी भानगडी काहीही असोत, त्यामुळे दिल्लीत सुधारणा झाल्या अस काही दिल्लीकरांना वाटत! (अनेकांना त्या काही ठराविक भागात झाल्या आहेत अस वाटत!) मला मात्र दिल्ली हे अनेक खेडयांच एक कडबोळ वाटत! जिकडे तिकडे कचरा असतो, रस्त्यांवर पाणी वाहत असत, चिखल असतो, माणस थुंकत असतात, कुत्री भटकत असतात, खाऊन माणस कचरा तिथेच टाकत असतात, प्राण्यांचे माणसांचे मल –मूत्र रस्त्यांवर असते. मेट्रो स्टेशन स्वच्छ असत – कारण एक म्हणजे त्यात खाण्यापिण्याची सोय नाही आणि तिथ थुंकण हा ‘दंडनीय अपराध’ आहे (काही अपराध कायदेशीर असतात अस ते ऐकताना, वाचताना वाटत राहत!) पण एकदा स्टेशनच्या बाहेर पडल की घरात पोचेपर्यंत सगळा बकालपणा आहे. त्यामुळे मला ‘खाली मान घालून’ चालण्याविना पर्यायाच नाही!

याच अर्थातच एक कारण आहे. महानगराला एक शाप असतो – ते कोणाच नसत आणि त्याच कोणी नसत. जो तो स्वत:ला येथे उपरा समजतो – आणि त्यामुळे या शहराच्या भल्याबुऱ्याशी कोणाला फार काही देणघेण नसत!

दिल्लीत कोणाशीही गप्पा मारा – पाच मिनिटांत ती व्यक्ती तुम्हाला सांगते: “तसं पहायला गेल तर आम्ही मुळचे ....” हे गाव, शहर, प्रांत दिल्ली सोडून कोणताही असतो.

माझ्या एका टीममध्ये तीन जण बंगालचे (त्याला आपण अजून ‘पश्चिम’ का म्हणतो, हे एक कोडच!), दोन जण ओरिसाचे, दोन पंजाबचे, एक बाई हरियाणाच्या. दुसऱ्या टीममध्ये एक पाटण्याची, एक देहारादुनची, एक आसामचा, एक उत्तर प्रदेशची. तिसऱ्या टीममध्येही कमी अधिक परिस्थिती अशीच. यातले अनेक जण मागची पंधरा वीस वर्षे तरी दिल्लीत आहेत – पण ते दिल्लीचे नाहीत. निदान मनाने तरी नाहीत. मनाने ते जे सोडून आले आहेत, आणि जेथे ते परत जाण्याची शक्यता कमी आहे तेथेच आहेत. माणसाच्या या स्वभावाची मला गंमत वाटते. जे आहे त्याचे किंमत नाही आणि जे नाही त्याचा ध्यास, त्याचे स्वप्न!

दिल्ली सुरक्षित नाही – विशेषत: स्त्रियांसाठी म्हणून माझे लोक माझी जरा जास्त काळजी करतात. दिल्लीतले आणि दिल्लीच्या बाहेरचेही. तसं पाहायला गेल तर कोणत शहर, कोणती जागा आज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे हा एक प्रश्नच आहे. पुण्यात काय बलात्काराच्या कमी घटना घडतात का? घरातच हिंसेचा सामना करावा लागणाऱ्या अनेक स्त्रियांना कामाच्या निमित्ताने मी भेटलेले आहे. घरगुती हिंसा (Domestic Violence) हा आपल्या समाजातला फार मोठा प्रश्न आहे. माझ्या परीने ‘चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या माणसांबरोबर’ मी असू नये याची मी काळजी घेते – मी फक्त इतकचं करू शकते!

मी अशी दिल्ली शहरापासून हातभर अंतर राखून राहिल्यावर हे शहर मला परक राहण – ही स्वाभाविक गोष्ट आहे. थोडा धोका पत्करून शहर पाहायला लागत – तरच ते समजत. त्या समजण्यात मलाच पुढाकार घ्यावा लागेल हे नक्की! दिल्लीला माझे काही अप्रूप नाही – इथे अशी लाखो माणस येतात आणि जातात. दिल्लीच्या आयुष्यात माझ्यामुळे काही फरक होत नाही. दिल्लीमुळे माझे आयुष्य मात्र बदलते – आणि म्हणून दिल्लीशी नाते जुळवण्यात मीच पुढाकार घेतला पाहिजे इतके भान मला आले आहे. आता जे कळले आहे ते वळते का, कसे वळते हे काही दिवसांत कळेल!

Thursday, January 6, 2011

५८. सलाम

गेल्या काही दिवसांपासून ती गोष्ट रोज घडत होती; अगदी माझ लक्ष वेधून घेण्याइतपत नित्यनेमाने घडत होती. आणि मी त्यावर स्वत:शीच हसत होते.

त्याच अस झाल होत:

या कार्यालयात मी काम करायला लागून जवळजवळ आठ वर्षांचा काल लोटला होता. तोवर मी एका जागी राहून, म्हणजे एका कार्यालयात बसून कधी काम केल नव्हत. माझी नेहमी भटकंती चालू असायची. रोज वेगळ गाव आणि रोज वेगळ कार्यालय अशी ती एक वेगळीच मजा होती कामाची. आधीच्या कोणत्याच कार्यालयात मी नोकरी करत नव्हते – जरी मी काम करत असले तरी ती नोकरी नव्हती. इथे मी भरपूर भटकत असले तरी ती एक नोकरी होती अखेर!

इथे नोकरीला लागल्या लागल्या मी शहरातून बसने इथवर यायचे. मग सुमारे तीन वर्षे मी संस्थेच्या क्वार्टर्समध्ये राहिले – त्यामुळे बाहेरून कुठून मी ऑफिसात येण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. त्यानंतर मी स्वत;चे घर घेतले ते ऑफिसच्या अगदी जवळ – चालत पंधरा मिनिटांच्या अंतरावर. मला चालायला आवडत आणि रोज चालायलाही आवडत, अगदी कामासाठी चालायलाही आवडत. त्यामुळे गरज म्हणून, हौस म्हणून, पर्याय नाही म्हणून, वेळ आहे म्हणून, चालावास वाटतं म्हणून .. अशी अनेक कारण घेऊन, त्यांच निमित्त करून मी भरपूर चालते.

त्यामुळे अनेक वर्षे पुण्यात अपरिहार्य समजली जाणारी दुचाकी माझ्याकडे नव्हती. एक तर मी आधी सांगितल्याप्रमाणे घर आणि ऑफिस चालत जाण्यायेण्याच्या अंतरावर असल्याने दुचाकीची गरज नव्हती, दुसर म्हणजे कामानिमित्त मी बराच काळ पुण्याच्या बाहेर असायचे – ‘अनिवासी पुणेकर’ होते मी एका अर्थी. तिसरी गोष्ट म्हणजे पुण्यातल्या भर गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवायला मला काही मजा येत नव्हती. गर्दी, एकेरी दुहेरी वाहतुकीचे बदलते नियम, रस्त्यांबाबातच मर्यादित ज्ञान – अशा अनेक गोष्टींमुळे पुण्यात गाडी चालवायचा माझा उत्साह मावळला होता बऱ्यापैकी. शिवाय पर्यावरण प्रेमही मधल्या काळात जागृत झाल होत – तेही एक ‘तात्त्विक अधिष्ठान’(!) होतच!

ऑफिसच्या प्रवेशद्वारात दोन तीन सुरक्षा रक्षक असतात येथे. चालत जाता येता कधी कधी त्यांच्याशी एक दोन वाक्यांची देवाणघेवाण व्हायची. ‘जेवण झाला का?’; ‘गावाला जाऊन आलात का?’; किंवा ‘आज थंडी जरा जास्तच आहे नाही!’ – अशा थाटाची वाक्ये! कधीतरी घरच्या गोष्टी सांगायाचे ते लोक – मुलगा पास झाला, वडील आजारी आहेत वगैरे. या सगळ्या संभाषणात विशेष काही नसायच. ते बोलण नसत झाल तरी काही बिघडलं नसत!

असे दिवस मजेत चालले होते. दुचाकीच्या मोहाला मी बळी पडत नव्हते.

मग एक दिवस लक्षात आलं, की आता दुचाकी नाही चालवली तर ती चालवण्याच कौशल्य आपण एकदम विसरून जाऊ आणि कधी गरज पडली तर गाडी चालवता येणार नाही. पुण्यात राहायचं तर पुण्यातल्या वाहतुकीला तोंड देता यायला पाहिजे असही जाणवलं! आपल्या बुद्धीचं एक बर असत – कोणत्याही निर्णयाच्या समर्थनार्थ ती तर्काचे इमले रचू शकते. माझ्या बुद्धीनही तेच केल – आणि ‘दुचाकी घेतली पाहिजे’ – एवढेच नव्हे तर ती कशी गरजेची आहे – अशा निष्कर्षाप्रत मी आले! मग काय, गेले दुकानात आणि घेतली दुचाकी. चालवायला वगैरे मी काही विसरले नव्हते हे दहा मिनिटांतच माझ्या लक्षात आल! आता गाडी आहेच हाताशी, ती नुसती पडून राहून चालत नाही – तिला चालवायला लागत अधूनमधून – आणि पुण्यात तर मी महिन्यातले पंधरा दिवस नसायचेच. म्हणून मग पुण्यात असेन तेव्हा ‘चालत जाण्याजोग्या अंतरावर’ असलेल्या ओफिसात मी दुचाकी घेऊन जायला लागले! सवयी बिघडायला आणि तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवायला मला काही वेळ लागला नाही!

आणि मग ती गोष्ट घडायला लागली. आधी ती काही माझ्या लक्षात आली नाही. लक्षात आल्यावरही मी तिच्याबद्दल फारसा विचार केला नाही. पण ती गोष्ट तशीच होत राहली. आठवडाभरात तिने माझे लक्ष वेधून घेतलं!

प्रवेशद्वारावारचे ते सुरक्षारक्षक या गोष्टीचे नायक होते. मी त्यांच्याशी आपण होऊन बोलले तर ते बोलायचे, एरवी जाता येता आम्ही एकमेकांकडे पाहून हसायचो आणि मी पुढे जायचे. पण आजवर त्यांनी मला कधी ‘सलाम’ केला नव्हता. तेच आता मी ऑफिसमध्ये जाता येता सलाम करायला लागले. हा सलाम ‘ओळखीचा’ नव्हता, अधिकाराची उतरंड दाखवणारा होता, मला तर आधी एकदोन वेळा वाटले आमचे कोणी वरिष्ठ सहकारी माझ्या मागून येत असतील – त्यांना असेल सलाम हा! मग मला वाटल की एरवी मी चालत यायचे इतकी वर्षे, आता गाडीवरून येते मी तर हे लोक मला कोणीतरी वेगळी बाई समजून सलाम ठोकत असतील. मी गोंधळले होते. कारण असे घडायचं कारण नव्हत. गाडीचे पेढे मी आवर्जून ऑफिस मधल्या सर्वांना – सफाई कामगारांना आणि या सुरक्षारक्षकांनाही दिले होते. असले पेढे वगैरे वाटायला मला आवडत नाहीत – पण माझ्या एका शिपाई सहकाऱ्याच्या आग्रहाला मी बळी पडले होते. त्यामुळे या लोकांना मी गाडी घेतली आहे (पुण्यात दुचाकीला गाडी म्हणतात – उगाच गैरसमज नसावा!), कोणती घेतली, केवढ्याला घेतली या गोष्टी माहिती होत्या. ते आधी मला सलाम मारत नव्हते – मग आता का? तसाही मला कोणी कोणाला सलाम ठोकत ते विनोदी वाटत – पण माझ्याबाबतीत ते घडायला लागल्यावर मला वैताग आला.

मग उजेड पडला!

लोकांना तुम्ही काय आहात यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावरून तुमची ओळख होते. रोज ते लोक मला सलाम करत नव्हते – मी तर पूर्वीही होतेच की – तो सलाम माझ्या गाडीला होता. त्यांच्या दृष्टीने मी आता पुरेशी पैसेवाली झाले होते तर! त्या गाडीने माझ्या प्रतिष्ठेत मोलाची भर पडली होती जणू!

अर्थात मी त्या बिचाऱ्या साध्यासुध्या माणसांना उगाच धारेवर धरायला गेले नाही. माणसांजवळ काय आहे त्यावरून माणसांची किंमत ठरवायची या जगाची रीतच आहे! माझी किंमत माझ्या गुणांवरून होत नाही, माझा किती ‘उपयोग’ आहे त्यावरून होते! म्हणून अनेक गुणवान माणसे तुलनेने मागे पडतात आणि ज्यांच्यात फारसा दम नाही ते बाजी मारतात. आपल्याजवळ जे काही आहे त्याचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे – ती काळाची गरज आहे! कधी कधी – म्हणजे तुमची गरज असते तेव्हा तुम्हाला आतिशय सन्मानाने वागवेले जाते – आणि गरज संपताच तुमची रवानगी कचराटोपलीत होते. म्हणून बहुधा जिकडे पहावे तिकडे माणसे सारखी काहीतरी सिद्ध करण्याच्या अविर्भावात असतात.

तसे पाहायाला गेले तर जगाची ही रीत जरा मजेशीर आहे. पण ते स्वीकारण्याशिवाय आपल्या हातात फारसा पर्याय नाही. स्वीकारायचे म्हणजे त्याला बळी पडायचे असे नाही – पण तुम्ही ते बदलू शकत नाही हे वास्तव स्वीकारायचे!
हे सगळ घडत असताना मला सारखी ती चातुर्मासाची कहाणीच आठवत होती. एका गरीब बहिणीला तिचा भाऊ कधीच मानाने वागवत नाही, तिला तिरस्काराने वागवतो. मग ती बहिण कोणत्यातरी देवतेचे व्रत करून श्रीमंत होते. आता तिचा भाऊ तिला सन्मानाने आमंत्रित करो, जेवायला पाटाचा थाटमाट करतो (गोष्ट जुन्या काळातली आहे!) वगैरे. मग ती बहीण स्वत: पाटावर बसण्याऐवजी दागिने पाटावर ठेवते आणि भावाला सांगते – “तू माझा सन्मान करत नाहीस हे मला माहिती आहे, ज्यांचा मान आहे त्यांनाच बसू दे पाटावर’! मग
अपेक्षेप्रमाणे भाऊ लज्जित होतो आणि कथेचे तात्पर्य वाचकांपर्यंत यथास्थित पोचते! मला ती गोष्ट लहानपणी तितकी आवडली नव्हती – खोटी वाटली होती! पण आज मला ती गोष्ट तिच्या तात्पर्यामुळे – जरी ते फार बाळबोध असले तरी – आवडते. त्यातला गर्भितार्थ आता त्या परिस्थितीतून मी गेल्यामुळे जास्त भावतो.

काळ बदलला, जमाना बदलला असे आपण म्हणतो – पण अनेक गोष्टी, माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती मात्र अनेकदा तशाच राहतात – त्या बदलत नाहीत.

या न बदलणाऱ्या जगाला ‘सलाम’ करताना मात्र मला हसू येते.
**