ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, November 26, 2011

१०१. केंद्र परिघाचं नातं

वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते.

तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात. स्वत:च नाव सांगायची प्रत्येकीची त-हा वेगळी. कोणी घाईघाईने नाव सांगून मोकळी होत होती; तर कोणी आधी हसावं की नाव सांगावं या संभ्रमात. एखादी दुसरीलाच नाव सांगायचा आग्रह करत होती – तेंव्हाचा त्यांचा संवाद ऐकण्याजोगा होता.

त्यांनी सहा सात महिन्यांपूर्वी हा बचत गट स्थापन केला होता. महिन्यातून एकदा त्या सगळ्या नियमित भेटतात आणि बचत करतात. बॅंकेच दर्शन त्यातल्या एक दोघींनीच घेतलेलं – तेही या गटामुळे. बचत गटाच वैयक्तिक पासबुक त्या अगदी जपून ठेवतात. प्रत्येकील मी तिच पासबुक पहावं असं वाटतं. खरं तर एक दोन पासबुकं पाहिली की कळतो त्या गटाचा एकंदर आर्थिक व्यवहार आणि शिस्त. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी प्रत्येक पासबुक पाहते, त्यावर काहीतरी बोलते /विचारते आणि हसून ते परत करते.

मी त्यांच्याकडून गट बांधणीच्या प्रक्रियेची माहिती घेते आहे. ती घेताना त्यांच जगणं, त्यांचा संदर्भ मी समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. मी इतके सगळे प्रश्न का विचारतेय हे त्याही समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत हे माझ्या लक्षात येतं.

खरं तर जगण्याबद्दल विचार करत बसण्याची चैन त्यांना परवडणारी नाही. दारिद्र्याशी झुंजण्यात त्यांची सारी शक्ती खर्च होते. हंडाभर पाणी आणायचं तर अर्ध्या तासाची पायपीट केल्याविना त्यांना ते मिळत नाही. घरात खाणारी सहा सात तोंडं आहेत – त्याची तजवीज करावी लागते. लाकूडफाटा, धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई, शेणगोठा – ही त्यांचीच कामं! गेली दोन वर्ष पावसानं ओढ दिलीय खरी, पण शेत तयार तर करावं  लागतं आशेनं!

गावातल्या अनेक गोष्टींबद्दल आम्ही बोलतो. इतर गावातील गटांचे अनुभव मी त्यांना सांगते तेव्हा त्यांच्या नजरेत नव्या स्वप्नांचं बीज रुजताना मला दिसतं.

“ताई, रसायन घ्यायला आवडेल का तुम्हाला?” रखमाताई विचारतात आणि मी दचकते. फार वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशाच्या भटकंतीत तिथल्या आदिवासींच्या भावनांचा मान राखण्यासाठी मी ‘अपांग’(तांदळाची दारू) चाखली होती. तसाच प्रसंग दिसतोय आज. माझा गोंधळ चेह-यावर दिसला असणार. कारण नीता (सोबत असलेली संस्थेची कार्यकर्ती) हसून म्हणाली, “घाबरू नका, रसना पिणार का  असं विचारताहेत त्या!”

रखमाताई आधीच माझ्याशी बोलताना जरा बावरलेल्या होत्या. नीताच्या बोलण्यावर जमलेल्या सगळ्या बाया हसतात तेव्हा त्या आणखीच खजील होतात. मला एरवी रसना आवडत नाही. पण आत्ता रखमाताईंना बरं वाटावं म्हणून मी उत्साहाने होकार देते.

रखमाताईंच घर छोटसं आहे. पुरेसा उजेड पण नाही. रसना येतं. मी ग्लासातलं रसना कमी करायचा प्रयत्न करते तो एकमुखाने हाणून पाडला जातो.

मग गावात एक फेरफटका मारायला आम्ही निघतो. गुलाबताईंच घर दूर आहे. पाण्याचा टिपूस नसलेल्या नदीच्या पात्रातून आम्ही चाललो आहोत. भर दुपारी दोन वाजता वाळूतून चालणं सोपं नाही. आम्ही दोघी तिघी सोडल्या तर कोणाच्याच पायात चप्पल नाही. पण जणू एखादा आनंदसोहळा असल्यागत सर्वांचा उत्साह!

एक चढण चढून आल्यावर समोर एकदम हिरवाई आहे. गुलाबताई बायफ संस्थेच्या शेती विकास कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. खड्डे कसे खणले, लांबून पाणी आणून लेकराच्या मायेनं आंबा आणि काजू कसे जगवले, त्यापायी शरीर कसं हलकं झालं ... असं बरंच काही गुलाबताई बोलतात. त्यांचं घर त्यामानाने मोठं वाटलं मला. एका दोरीवर काही कपडे टांगलेले होते; एका कोप-यात चूल – दोन तीन पातेली आणि तीन चार ताटल्या फक्त दिसल्या. दुस-या कोप-यात दोन मध्यम आकाराच्या कणग्या. आणि तिस-या कोप-यात एक मध्यम आकाराची पेटी. घरात फक्त एवढंच सामान.

शेजारचे लहान-मोठे सगळे मला पहायला येतात. पुन्हा एकदा ‘परिचयाचा’ कार्यक्रम होतो. एक पोरगेलासा तरुण पुन्हा एकदा मला नाव विचारतो. नवा शब्द सापडल्यागत तो स्वत:शी हसतो आणि एका अंधा-या कोप-यात दिसेनासा होतो. दोन मिनिटांत तो लगबगीने परततो. “माझ्या लग्नाला यायचं बरं  का ताई,” असं म्हणत माझ्या हातात पत्रिका देतो. त्याचा निरागस आनंद पाहून “लग्नाच्या योग्य वयाबाबत” काही बोलायचा मोह मी निग्रहानं टाळते.

तेवढ्यात टोपलीभर बटाटे घेऊन एक आजीबाई येतात. इतके स्वच्छ आणि तुकतुकीत बटाटे मी आजवर कधी पाहिले नव्हते. त्या बाजारात बटाटे विकायला निघाल्या आहेत असं समजून मी विचारते, “किती किलो बटाटे आहेत, आजी?” त्यावर आजीबाई हसत म्हणाल्या, “ मापून थोडेच आणलेत? तुझ्यासाठी घेऊन आलेय मी. घरी घेऊन जा.”  

सकाळपासून या गावात मला आदराची आणि प्रेमाची वागणूक मिळते आहे. या गावात मी आयुष्यात पुन्हा कधी कदाचित पाऊलही टाकणार नाही. या स्त्रियांकडून खास वागणूक मिळावी असं वास्तविक मी काही केलेलं नाही. मी या स्त्रियांशी फक्त गप्पा मारायला आलेय. मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय -  आशेनं त्या माझ्या पुढेपुढे करताहेत अशातलाही भाग नाही. मला भरून आलं – माझ्या डोळयांत पाणी तरारलं.

पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते वास्तवही स्वीकारतं. सकाळपासूनच्या भारावून टाकणा-या आदरातिथ्यासमवेत नकळत नजरेआड केलेली वास्तवाची काही प्रखर रुपंही होती – ती आता ठळकपणे नजरेसमोर येऊ लागली.

शहर असो की खेडं, माणसांच्या मूळ स्वभावात आणि परस्परनातेसंबंधात फारसा फरक आढळत नाही. व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी माणसं यांत नेहमीच अंतर राहतं. मी या गावातली – त्यांच्यातलीच एक - असते; तर रखमाताईंनी मला ग्लास भरून रसना दिल नसतं; आपलं काम सोडून या स्त्रिया माझ्याशी अशा गप्पा मारत बसल्या नसत्या; गुलाबताईंनी मला आग्रहाने त्यांच्या घरी नेलं नसतं आणि त्या पोरगेल्या युवकाने मला इतक्या लगबगीने त्याच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नसतं.

पण बाहेरून पाहिलं, की तेच जग वेगळं दिसतं!

आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी  वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते. रोजच्या संबंधातील व्यक्तींना गृहित धरून चालताना आपलं काही चुकतंय असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्यातील एका व्यक्तीला नेम धरून एकटं पाडणं – हा समाजातल्या रंजनाचा सर्वमान्य नमुना. कोणाच्याही अनुपस्थितीत भलतेसलते शेरे मारत त्या व्यक्तीच्या वागण्याचा अनर्थ काढण्यात आपली सारी हुशारी खर्ची पडते. रोजचे संबंध आले की, काही वाटून घेणं, काही सोडून देणं, काही स्वीकारणं भाग असतं. ते आपण सहज करू शकत नाही. क्रिया-प्रतिक्रियांच्या जंजाळात सोप्या गोष्टी अवघड करून घेण्यात, दुस-यांच्या माथी खापर फोडण्यात धन्यता वाटायला लागते. आपल्यात मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच दुर्दैवाने उरते!

परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते. कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं  असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा होईलही!

वैशाखाच्या रणरणत्या उन्हात कधीतरी आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली बसण्याच सुख जरूर उपभोगावं! पण रोजचीच गोष्ट असेल तर आपली सावली आपल्याला आतच शोधायला हवी!

पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता, ६ नोव्हेंबर २००४           

Friday, November 18, 2011

१००. कौतुक


मी तिच्याकडे पाहून सहज हसले. उत्तरादाखल तीही मोजकं हसली.
“वा! चहा फार छान झालाय, मला आवडला” मी म्हणाले. मला तिला ते सांगायचं होतंच म्हणून तर मी सुरुवात केली होती संवादाची.

मी शहादयातून पुण्याला चालले होते. चौदा तासांच ते अंतर एरवी बसने जाताना कठीणंच असतं – आत्ता मी ऑफिसची गाडी घेऊन आले होते पण अंतर तर तेवढं काटायचं होतंच. एरवी एकटीने प्रवास करताना सहसा चारचाकी घेऊन जात नाही  मी. पण यावेळी हात दुखावला होता, डॉक्टरांनी प्रवासाला परवानगी दिलेली नव्हती. पण हा इथला कार्यक्रम नवा होता, त्याची आखणी मी केली होती त्यामुळे मला यायचं होतं – मग पर्याय म्हणून – सुखाचा प्रवास म्हणून – गाडी घेऊन इथवर आले होते मी आणि आता परत चालले होते पुण्याला.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या परिसरात वाहनचालकाला चहा प्यायची लहर आली आणि म्हणून आम्ही इथं थांबलो होतो.

रस्त्याच्या कडेला चहाची एक टपरी होती. लक्ष वेधून घेणारं त्या टपरीत काही विशेष नव्हतं. दोन प्लास्टिकची टेबलं, काही मोडक्या आणि रंग उडालेल्या तशाच खुर्च्या, एका खोक्यावर चहाचं सामान – तिथंच दोन बरण्यांत बिस्कीटं, क्रीम रोल आणि खारी, स्टोव्हचा भर्रकन येणारा आवाज, रॉकेलचा वास. तिशीतली एक स्त्री त्या टपरीची सर्वेसर्वा दिसत होती – चहा ती बनवत होती, ऑर्डर घेत होती, पैसे घेत होती, कप विसळत होती, गिऱ्हाईकांशी बोलत होती. ती एकटीच सगळं सांभाळताना दिसत होती. कामाने तिचा चेहरा रापलेला दिसत होता. दुपारचे साडेतीन वाजत आले होते त्यामुळे तिथं फारशी गर्दी दिसत नव्हती.

मी चहा प्यायला फार उत्सुक नसते. बरेचदा घशाला काही तरी गरम हवं म्हणून मी चहा पिते. मी पिते त्यातले बरेच चहा ‘गरम असणं’ ही माझी गरज पुरवतात – इतकंच. पण चांगला चहा मिळाला तर त्याला दाद कशी द्यायची हेही मला माहिती आहे. असे प्रसंग अपवादानेच येतात पण आज तो अपवाद होता.

माझ वाक्य ऐकून त्या स्त्रीचा चेहरा एकदम उजळला. ती मनापासून हसली. तिचे डोळे चमकले. तिचा चेहरा सैलावला. तिने थेट माझ्या नजरेत नजर मिळवून मी किती प्रामाणिक आहे हेच जणू तपासून पाहिलं. कशामुळे कुणास ठावूक पण तिची खात्री पटलेली दिसली.

 “ताई, अजून एक कप चहा घ्या”, तिने आमची जुनी ओळख असल्यागत फर्मान सोडलं.

आता याबाबतीत मी अगदीच वाईट आहे. म्हणजे एखादा पदार्थ आवडला म्हणून मी तो जास्त खाऊ शकत नाही कधीच. खाणं ही इतर अनेक कृतींसारखी  ‘गुणात्मक’ कृती असते असं  माझं मत – त्याचा पदार्थाच्या दर्जाशी संबंध असतो पण संख्यात्मक असं त्यात काही नसतं.

“चहा मस्त झालाय, पण अजून एक कप नाही घेता येणार मला – जास्त पीत नाही चहा मी, “ मी नम्रपणाने तिचा आग्रह धुडकावून लावला.

“तुम्ही काळजी करू नका ताई. हा चहा माझ्याकडून तुम्हाला फ्री आहे – म्हणजे पैसे नाही मागणार मी तुमच्याकडून या चहाचे.” तिन स्पष्टीकरण दिलं.

हे काहीतरी वेगळं घडत होतं. एक गरीब बाई तिच्यापेक्षा ब-या परिस्थितीतल्या बाईला काही कारण नसताना फुकट चहा पाजत होती – काही ओळखदेख नसताना.

“तुमचा हट्टच असेल, तर दया मग एक कप चहा,“ मी माघार घेतली – मला जास्त ताणता येत नाही. पैसे तर देईनच मी त्याचेही. ती आणखी मोकळेपणान हसली आणि उत्साहाने आणखी एक कप चहा तिने मला दिला.

मी खुर्चीवर ऐसपैस बसले. वाहनचालकाला माझ्याबरोबर असण्याची सवय होती – त्यामुळे तोही निवांत होता. मग आम्ही गप्पा मारल्या – तिचा चहाचं दुकान, तिचं घर, तिची मुलं, तिचं जगणं, तिचे अनुभव, तिचं दु:खं .. असं आम्ही बरंच काही बोललो. तिलाही प्रश्न होते माझ्याबद्दल – मी नोकरी करते का, ही चारचाकी माझी होती का वगैरे. मी तिच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली.

मी तिला पैसे दिले तेव्हा तिने या आग्रहाच्या चहाचे पैसे खरंच घेतले नाहीत माझ्याकडून – मला जरा संकोच वाटत होता त्याचा. निघतानिघता मी तिला सहज विनोदानं म्हटलं, “असा सगळ्या येणा-या जाणा-यांना फुकट चहा पाजला तर पैसे कसे सुटणार तुला यातून?”

ती एक क्षण गप्प बसली. माझ्याशी बोलावं की नाही याचा ती विचार करत होती बहुधा. तिच्या कसल्यातरी रहस्याला मी नकळत हात घातला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला – तिची नजर आता क्षितिजापल्याड होती. त्या क्षणी ती मला काहीशी दु:खी भासली – भासच असावा तो कदाचित!

मग ती पुन्हा हसली आणि हळुवारपणे म्हणाली, “ माझ्या दुकानात रोज दोनशेच्या आसपास लोक येतात चहा प्यायला. त्यातले बरेचजण अगदी रोज येतात. मी मागची पाच वर्ष इथं चहा विकतेय. पण ताई, माझ्या चहाचं कौतुक करणा-या तुम्ही पहिल्याच! मी इतकं काम करते त्याचं चीज झाल्यागत वाटलं मला तुमचे कौतुकाचे शब्द ऐकून.”

त्यावर काय बोलावं ते मला सुचेना. कुणाकडून कौतुकाचा शब्द कानी न येणा-या पण आयुष्यभर राबणा-या या बाईची मन:स्थिती मला चांगलीच समजली. लोक त्या चहाचे पैसे देतात हे खरं, आणि त्या पैशांची त्या स्त्रीला गरज आहे हेही खरं – पण सगळा देवघेवीचाच व्यवहार असतो का फक्त? कामाचा दर्जा सदोदित चांगला ठेवणं हे किती कमी लोक करतात – मग त्याबद्दल एखादा कौतुकाचा शब्द उच्चारायला लोकांना एवढं जड का जातं?

प्रसंगाचं गांभीर्य हलकं करण्यासाठी मी हसत म्हटलं, “एकदा चहाला छान म्हटलं की एक कप चहा फुकट मिळतो हे एकदा कळलं की सगळे लोक तुझ्या चहाला छान म्हणायला लागतील आणि मग तुझी पंचाईत होईल...”

“ताई, खरं मनापासून केलेलं कौतुक आणि स्वार्थासाठी केलेली तरफदारी यातला फरक ओळखता यायला पाहिजे .. तीच तर खरी मेख आहे ...” तिनं मला सांगितलं.

मला तिचं म्हणण समजलं नाही. मी तिला म्हटलं, “अग, समजलं नाही मला तू काय म्हणतेस ते, जरा समजून सांगशील का मला?”

तिन परत एकदा माझ्याकड पाहिलं. मग समजावणीच्या सुरात ती म्हणाली, “लोक फार कमी वेळा मनापासून कौतुक करतात. ब-याचदा आपल्याकडून काहीतरी साधून घ्यायचं असलं तर लोक आपलं तोंडावर कौतुक करतात. आपण जे सहजासहजी करणार अथवा देणार नाही ते कौतुकाला बळी पडून करू असा त्यांचा अंदाज असतो – आणि आपण बरेचदा फसतोही तसे! काही वेळा स्वत:ची चूक लपवायला लोक आपलं कौतुक करतात – मग आपण त्यांच्यावर पटकन रागावू शकत नाही ना! म्हणजे एका अर्थी आपलं कौतुक करून लोक आपल्याला त्यांचं गुलाम बनवून टाकतात – थोडा वेळ का असेना! पण जुन्या काळाची राजहंसाची गोष्ट आहे ना – तो पक्षी ज्याला पाणी आणि दूध वेगळ करता येतं – तसं आपल्याला जमलं पाहिजे. खोट कौतुक कोणतं आणि खर मनापासून केलेल कौतुक कोणतं – आपल्याकडून काहीतरी काम करून घेण्यासाठी केलेल कौतुक कोणतं आणि काही स्वार्थ नसणार कौतुक कोणतं – यातला फरक कळला पाहिजे. खरं कौतुक घ्यायचं आणि खोटं कौतुक टाकून द्यायचं असं करावं लागतं. जे आपलं सुख पाहत नाहीत त्यांच्या वरवरच्या शब्दांना कधी भुलून नाही जायचं ताई “ ती स्वत:शीच बोलत होती .. मी त्या क्षणी निमित्तमात्र होते खरी!

मला त्या स्त्रीचं मनापासून कौतुक वाटलं आणि तिच्या जगण्यातून आलेला अनुभव मला तिनं दिला म्हणून तिच्याबद्दल आदरही वाटला.  त्यादिवशी मला फक्त चांगला चहा नाही मिळाला .. एक अविस्मरणीय धडाही मिळाला.  मला वाटतं तिनं मला इतकं सगळं सांगणं – ओळखीविना, कसल्याही अपेक्षेविना -  हे एका प्रकारे माझं केलेल कौतुकच होतं अस मी मानते..

मला अजून तिनं सांगितलेल्या वाटेवर चालायला नीट जमलेलं नाही. कधीतरी जमेल तेही अशी आशा मात्र आहे.
**

Saturday, November 12, 2011

९९. बोच


मुंबईत मी राहायला आले, ती थेट दादरमधेच. तस पाहायला गेलं तर गर्दी, धावपळ मला मानवत नाही. माझ्या स्वभावात एक प्रकारचा ’निवांतपणा’ आहे . त्यामुळे मुंबईत किंबहुना कुठल्याच मोठ्या शहरात जाण्याची महत्त्वाकांक्षा मला कधीच नव्हती. पण हाती घेतलेल्या कामाने मला मुंबईत आणलं.आपण या अफाट गर्दीत हरवून जाऊ अशी भीती एका बाजूने वाटत होती. तर दुस-या बाजूने मुंबई म्हणजे स्वत:च जगणं; स्वत:ची मूल्य तपासून पाहण्याची एक आव्हानात्मक  संधीही वाटत होती
.
पहिल्या दिवशी मी प्रशांतला विचारलं, “दादर स्टेशन किती लांब आहे इथून?” त्याने प्रश्नार्थक नजरेन माझ्याकडं पाहिल,  म्हणाला, “आज इथच काम आहेत सगळी. बाहेर नाही जायचय.” घाईने मी स्पष्टीकरण दिलं, “काम नाही म्हणूनच तर सहज चक्कर मारून येते तिथवर. जरा मुंबईची ओळख करून घेते. पाहू आमच दोघींच जमतय का ते!”

प्रशांतने मग मला नकाशा काढून दिला. गडकरी चौक, शिवसेना भवन, प्लाझा (थिएटर), आयडियल (पुस्तकांचे दुकान) अशा ठळक खुणांच्या मदतीने माझ दैनंदिन जाणं –येणं सुरु झालं. जरा आत्मविश्वास बळावल्यावर टिळक पुलावरचा जिना उतरून आयडियलच्या गल्लीत उतरणं, प्लाझाच्या बाजूने बादल-बिजलीच्या (ही आणखी दोन चित्रपटगृहे!) दिशेने आत शिरून कार्यालयात परत येणं असे उद्योग मी सुरु केले. आता गंमत वाटते, पण तेव्हा मला ते नवे रस्ते शोधण्याचे काम फार सर्जक वाटायचे. ठरलेल्या ठिकाणी पोचायला अनेक मार्ग उपलब्ध असले की मला बरं वाटतं! कंटाळा टाळण्यासाठी असले छोटे ’शोध’ फारच उपयुक्त ठरतात!

हळूहळू माझ मुंबईत बस्तान बसलं. घडयाळाच्या काटयावर मी देखील स्वत:चं जगणं आखायला शिकले. कार्यालयातून दादर रेल्वे स्थानकापर्यंत जायला बरोबर चौदा मिनिटं लागतात – असाही हिशेब मनात पक्का झाला. अंगावर येणारी गर्दी चुकवत, स्वत:ची गती अबाधित ठेवून चालण्याचं मुंबईतलं म्हणून एक खास तंत्र आहे – तेही मी ब-यापैकी आत्मसात केलं.

पण का कोणास ठावूक; मुंबईत मी ब-यापैकी स्थिरावल्यावर मात्र माझ हे चौदा मिनिटांचं गणित चुकायला लागलं! ठाण्याला, बोरिवलीला जायच असेल, तर ही चूक महागात पडायची नाही. कारण एक गाडी चुकली तरी पाठोपाठ दुसरी गाडी असायचीच. पण चार दिवसांच्या अंतराने माझ्या कर्जत आणि कसारा गाडया चुकल्या तेव्हा मात्र घोटाळा झाला बराच. दोन्ही ठिकाणी मला पोचायला दीड-दोन तासांचा उशीर झाला आणि कार्यक्रमाची गडबड झाली होती.

कसा-यात झालेला गोंधळ निस्तरून परत येताना मी विचार करत होते नेमक काय चुकत होत याचा. वेळ का चुकत होते मी गाडीची? माझ घडयाळ माग पडलं होत का? का माझी चाल मंदावली होती? की आणखी काही? ….कार्यालयातून निघाल्यापासूनच्या घटनांचा मी आढावा घेत होते.

आज दादर स्थानकात येता येता वाटेत दोन-तीन लोक भेटले होते. “मी घाईत आहे, नंतर वोलू” असे म्हणण्यातही दोन मिनिटं तर गेलीच होती. परवाही तर असच झालं होतं. माझ्या एकदम लक्षात आलं, की मुंबईत येऊन आता मला बरेच दिवस झाल्याने ओळखी वाढल्या होत्या. रस्त्यावर सारखे कोणी ना कोणी भेटत होते. त्यांच्याशी जुजबी एखादे वाक्य बोलतानाही वेळॆचं आणि अंतराचं माझ गणित चुकत होत!!

पाहता पाहता ओळखी अधिकच वाढल्या. नाती अधिक पक्की झाली. चौदा मिनिटांचं ते अंतर कापायला मला तीस  आणि कधी कधी तर चाळीस मिनिटांचा वेळ सहज लागायला लागला. घाईने कधी मी माणसांना चुकवून पुढे जाऊ लागले.

कालांतराने मी मुंबई सोडली.

परवा ब-याच वर्षांनी दादरला उतरले. हाताशी थोडा मोकळा वेळ होता म्हणून गडकरी चौकापर्यंत चालत गेले. चालायला सुरुवात करताना नकळत मोबाईलवर नजर टाकली होती – किती वाजलेत ते पाहायला. गडकरी चौकात पोचल्यावर परत एकदा घडयाळ पाहिलं  - मोजून चौदा मिनिट लागली होती मला!! अचूकतेचा आग्रह धरणारं मन सुखावलं!

पण त्याचबरोबर मन दुखावलही गेलं!! हे अंतर चालायला तीस मिनिटांचा वेळ लागेल अस कुठतरी गृहित धरल होत मी जुन्या सवयीने ! पण या रस्त्यावर आता कुणीही ओळखीच भेटल नाही! वर्षानुवर्ष जिच्याशी मैत्री होती त्या जागेला आपण परकं होऊन बसलो आहोत हे स्वीकारणं त्या क्षणी अवघड गेल मला!

नवे रस्ते चालायचे तर जुने सोडावे लागतात हे कळत मला.

पण ते कळूनही  कसलीतरी बोच राहते मागे … निदान काही काळ तरी ….

Monday, November 7, 2011

९८. प्रवाह: सामाजिक कार्याचा: भाग २

(’साप्ताहिक विवेक’च्या २०११च्या दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा उत्तरार्ध. पहिल्या भागात स्वयंसेवी संस्थांच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा आपण घेतला. आता  या दुस-या भागात विचार करू ’बिगर सरकारी संस्था’ आणि संस्था –कार्यकर्ते यांच्यातल्या नात्याचा.)

बिगर सरकारी संस्था
ज्या सामाजिक संस्था सरकारी मदतीवर अवलंबून रहात नाहीत, ज्या शासकीय रचनेचा भाग नसतात त्या बिगर सरकारी संस्था असे साधारणपणे मानले जाते. पण अर्थातच हे काही पूर्णत: बरोबर नाही. अनेक बिगर सरकारी संस्था तर केवळ सरकारने त्यांना योजना राबवण्यासाठी दिलेल्या पैशांवर चालतात असे आजचे चित्र आहे. त्यांच्या नेमके उलटेही चित्र अनेकदा दिसते. बिगर सरकारी संस्था सरकारच्या धोरणांना विरोध करतात, त्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतात. काही संस्था सरकारचे लक्ष अनेक नव्या विषयांकडे आणि प्रश्नांकडे वेधून घेतात आणि सरकारला त्याची दखल घ्यायला भाग पाडतात.

सामाजिक क्षेत्रातली सेवेची आणि त्यागाची वृत्ती हळूहळू लोप पावत गेली आणि सामाजिक काम हे उपजीविकेचे एक साधन बनत गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘विकासाची’ संकल्पना जसजशी बदलत गेली त्यानुसार या संस्थांचे स्वरूप बदलले. सामाजिक कामाचे शिक्षण देणा-या संस्था निघाल्या आणि त्यातून बाहेर पडलेल्या पदवीधरांनी ‘करीअर’ म्हणून हे क्षेत्र व्यापून टाकले. सामाजिक काम ‘व्यावसायिक वृत्तीने’ केले पाहिजे असे मत मांडले गेले. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी फक्त इच्छा आणि तळमळ पुरेशी  नाही, विशिष्ठ कौशल्येही हवीत याबाबत दुमत नसावे. सामाजिक काम केवळ भावनेच्या भरावर दीर्घकाळ करता येत नाही हेही खरे आहे. पण या बदलत्या विचारसरणीत आपली उपजीविका मुख्य ठरते: समाज आणि त्याचे प्रश्न दुय्यम ठरतात. सामाजिक काम हे आज इतर कोणत्याही क्षेत्रासारखे स्पर्धेचे क्षेत्र बनले आहे. आपल्या कामाचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी आता केवळ समाजशास्त्रातले पदवीधर पुरत नाहीत तर व्यवस्थापन आणि मार्केटिंग क्षेत्रातलेही मनुष्यबळ लागते. काय केल्याने लोकांचे जगणे अधिक चांगले होईल या विचारांइतकेच (आणि कधी कधी जास्तही) पैसे आणि शक्ती माझ्या संस्थेचे नाव कसे होईल यावर खर्च होते.

साधारणपणे १९६०च्या सुमारास ‘का’ सामाजिक काम करायचे याचा विचार होता.  त्या सुमारास उभ्या झालेल्या कामांना तात्त्विक बैठक होती असं म्हटलं तर फारसं चुकीच ठरू नये! १९७०च्या सुमारास मात्र ‘sectoral approach’ आला – म्हणजे सामाजिक प्रश्नांचा तुकड्या-तुकड्यांत विचार करायचा – त्यांचा परस्पर संबंध विसरून जायचा. मग शेतीच्या विकासासाठी रासायनिक खतांचा प्रसार करताना त्यांचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार शेती तज्ञांनी करण्याचे प्रयोजन उरले नाही. पुढे तर विशिष्ट सामाजिक प्रश्न, सामाजिक समस्या नेमकी कोठे आहे यावर भर आला. म्हणजे समस्या खेड्यात आहे का शहरात, भर वस्तीत आहे का झोपडपट्टीत वगैरे. आणि नंतर तर समस्या कशी आली याचा विचार मागेच पडला आणि समस्या सोडवणे या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित झाले. इथं मग अर्थातच विचारांपेक्षा कौशल्यांचे महत्त्व आले, ध्येय आणि बांधिलकी यापेक्षा व्यवस्थापन महत्त्वाचे ठरले.

शिवाय बिगर सरकारी  संस्था आणि गावातले लोक ज्याला अनेक संस्था ‘लाभार्थी' म्हणतात – यांच्या नात्यात अलिकडे फरक पडत चालला आहे. हे नाते कळत – नकळत ‘देणारा आणि घेणारा’ असे स्वरूप धारण करत आहे. बिगर सरकारी  संस्था अनेकदा लोकांसाठी ‘सरकारचे' रुप असते; कारण ब-याच बिगर सरकारी संस्था सरकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक गावात जाउन लोकांमधे राहायचे. पण आता जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहायचे, चारचाकी घेऊन गावात जायचे, एखादी बैठक घ्यायची, थोडे काम हिंडून पहायचे असा एक प्रकारचा Development Tourism प्रचलित आहे. कोठेही जायचे झाले तर आजकाल तिथे Internet Connectivity आहे का, Mobile Range आहे का, खाण्याची  सोय कशी आहे, टी. व्ही. असेल का -  असेच प्रश्न लोक विचारताना दिसतात. थोडा हवाबदल होतो, ग्रामीण भागाची माहिती होते, त्या माहितीच्या आधारे नवे प्रकल्प लिहून संस्थेकडे पैसा आणता येतो अशा अनेक गोष्टी होतात. पण ग्रामीणांचे, आदिवासींचे शोषितांचे, पीडितांचे खरे जीवन कळते का?  त्यांच्यातला सत्तेच्या श्रेणीक्रम लक्षात येतो का?  अशातून लोकांचे परवलंबित्व वाढते की ते खरोखर अधिकाधिक सबल होत जातात – अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला गेल्यास चित्र निराशाजनक दिसते.

पण  आज या क्षेत्रात तरुण  मोठया संख्येने येत आहेत, त्या निमित्ताने त्यांना खरा भारत कळत आहे, त्यातून काही चांगले काम उभे रहात आहे  – असे सकारात्मक परिणाम घडत आहेत.

छोटया संस्था आणि मोठया  संस्था

साधारणपणे बहुतेक लोक त्यांच्या सामाजिक कामाची किंवा सामाजिक क्षेत्रातल्या  कामाची सुरवात छोटया  संस्थेपासून करतात. छोटया संस्थेत काम करण्याचे अनेक फायदे असतात. एक तर अनेक विषयांवर चर्चा होते, वातावरण बरेचसे अनौपचारिक असते. सगळ्याना सगळ्या प्रकारची कामं  करावी लागतात, ज्यातून नव खूप काही शिकायला मिळतं. कामाबद्दल आपुलकी वाढते, सगळ्या प्रकारच्या कामांत सहभागी होण्याची संधी मिळते. या अनुभवातून भावनिक पातळीवर कार्यकर्ता कामाशी जोडला / जोडली जाते आणि त्याचा – तिचा वैचरिक विकासही होतो.

पण  अनेकदा  छोटया संस्थेचं कार्यक्षेत्र मर्यादित असतं, काही  ठराविक काळानंतर कामात तोचतोचपणा निर्माण होतो. माणस तीच तीच असल्याने संवादाचा साचा होतो. नव्या कल्पना सुचल्या तरी त्या राबवायला पुरेसं मनुष्य्बळ नसतं किंवा अर्थिक बळ नसतं – खरं तर  अनेकदा दोन्हीही नसतं. अशा  परिस्थितीत  नेतृत्वाशी  वादविवाद  झाला  काही  निमित्ताने,  तर  तिथं  जगणं  अवघड  होतं.  क्षितिज अपुरं वाटायला लागून माणसं मोठया संस्थेत जाण्याचा निर्णय घेतात.

मोठया संस्थांमध्ये काम करण्याचे अनेक फायदे असतात.संस्थेचं नाव असतं, जनमानसात एक प्रतिमा तयार झालेली असते, हितचिंतकांची संख्या लक्षणीय असते, विचार पक्के असल्यामुळे कार्यक्रमांची कमतरता नसते, पर्यायी नेतृत्व असते. एकाशी तुमचे पटले नाही, तर दुस-याबरोबर काम करता येते, एका  विषयाचा कंटाळा  आला तर दुस-या विषयावर काम  करता येते. कामात सातत्यही  असते  आणि नाविन्यही असते.  

पण अनेकदा अशा मोठया संस्थांमध्ये नवं काही घडवणं अवघड असतं. परंपरेला, नियमांना, वहिवाटीला  चिकटून राहण्याची साधारणपणे सगळयांना सवय असते - आणि संस्था तरी त्याला अपवाद कशा असतील? शिवाय निर्णय घेण्याची श्रेणीबद्ध रचना ठरलेली असल्याने निर्णय व्हायला फार जास्त वेळ लागतो. तुमचा  थेट उच्च         अधिका-यांशी संपर्क असेल तर ठीक नाहीतर उतरंडीत वाट पाहण्यात वेळ जातो. छोट्या गोष्टी नव्याने करण्याचे, छोटे बदल घडवून आणण्याचे स्वातंत्र्य मोठ्या संस्थांमध्ये नक्कीच जास्त असते. पण फक्त वरवरचे बदल होत राहतात. तुम्ही मूलभूत प्रश्न उपस्थित करायला लागलात की तुमच्या निष्ठेबाबत शंका येतात इतरांच्या मनात. मोठ्या संस्थांमध्ये ‘Some are More Equal’ अशी स्थिती कोणी मान्य करो अथवा अमान्य पण असतेच. 

मोठया  संस्थेत नियम आणि रचना जास्त कडक असतात – लवचिकता कमी असते. माणूस परिघावर राहतो आणि नियम  केंद्रस्थानी येतात. त्याचा सृजनशीलतेवर परिणाम होतो. एका चक्रात अडकल्यासारखं लोकांना वाटतं. त्यांची वाढ खुंटते. कोणत्याही प्रकारच्या संधीसाठी अनेक लोक  असतात  आणि गुणवत्तेपेक्षा रांगेतल्या नंबराची वाट पहात बसावे लागते. त्यामुळे अनेकदा असे दिसते की दहा पंधरा वर्ष काम करून माणसं संस्था सोडून जातात.  अस चित्र स्वयंसेवी संस्थेतही दिसतं आणि  बिगर सरकारी  संस्थांतही!  

माणस संस्था सोडतात, तेव्हा ते बरोबर अनुभव घेऊन जातात – पण नव्या  ठिकाणी त्या अनुभेवांचा काही फायदा होतो का? जुन्या संस्थेला अशा अनुभवांच्या नाहीसे होण्याने काही नुकसान होते का? कामाचे क्षेत्र बदलल्याने कार्यक्षमता वाढते की कमी होते? असे अनेक प्रश्न  अनुत्तरित आहेत.

भवितव्य

गेल्या दहा वीस  वर्षांत सामाजिक कामामागची विचारप्रणाली जवळजवळ नाहीशी होत चालली आहे असं मी म्हणते तेव्हा अनेकांना राग येतो. India Agaisnt Corruption मधला लोकांचा सहभाग माझ्या या विधानाला छेद देणारा आहे असे अनेक जण म्हणतील. पण याचं खरं उत्तर आपल्याला काही काळाने मिळेल, आत्ताच उत्तर  या सहभागाचा काय ’परिणाम’ दिसतो त्यावरून बदलेल. उदारीकरण (Liberalization), जागतिकीकरण (Globalization) आणि खासगीकरण (Privatization) या लाटेचा  परिणाम आपल्या विचार करण्याच्या शक्तीवर आणि पद्धतीवर झाला आहे. आपल्याला आता सगळ काही ‘झटपट’ हव असतं. शारीरिक कष्ट तर नको असतातच पण वैचारिक ताण (डोक्याला ताप) ही नको असतो. मूल्य, निष्ठा अशा शब्दांना फारसा अर्थ राहिलेला नाही. जे बाजारात विकलं जातं ते करण्याकडे आणि तेच मिळवण्याकडं आपला कल आहे.

अनेक माणसं आजही संघर्ष करताना दिसतात – पण यातले अनेक संघर्ष व्यक्तिगत पातळीवर राहिले आहेत. यातून त्या त्या व्यक्तींची निष्ठा दिसून येते, चिकाटी दिसून येते, त्यांची तळमळ जाणवते. समविचारी माणसं नसतीलच कोणी भोवताली अस नेहमीच घडत नाही – अशी माणसं शोधावी लागतात, नसतील तर निर्माण करावी लागतात आणि जपावी लागतात. कोणीच परिपूर्ण असत नाही पण अनेकांची बलस्थान एकत्रित करून पुढं जाता येतं. एक अधिक एक दोन न राहता चारही होऊ शकत खर तर! पण ‘माणसं जपणं’ ही संकल्पना आता जुनाट झाली आहे. मतभेदाचे सूर आता आपल्याला सहन होत नाहीत. कोणी वेगळं मत मांडलं की त्याला – तिला हुसकून लावण्याची तयारी सुरु होते. त्या व्यक्तीला काम करणं अशक्य व्हावं असं वातावरण निर्माण केलं जातं. गटबाजी करून माणसाना एकटं पाडण्याचे अनेक प्रसंग अगदी ‘वैचारिक निष्ठेवर आधारित’ असलेल्या संस्था- संघटनांमध्येही वारंवार घडताना दिसतात. आत्मसन्मान राखण्याचा शेवटचा मार्ग म्हणून माणस संस्था – संघटना सोडून जातात – ती सहजासहजी दुस-या ठिकाणी रुजत नाहीत. म्हणजे अखेर त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजाला होतच नाही.

या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष या देशातल्या सामाजिक कामाचे भवितव्य अंध:कारमय आहे असा आहे का? सुदैवाने इतक्या सा-या अनुभवानंतरही मला तस वाटत नाही.  सामाजिक कामात सहभागी होणा-या लोकांची संख्या नेहमीच नाममात्र होती; सगळा समाज  कधीच त्यात सहभागी नसतो हे  वास्तव आपण लक्षात घेतलं तर आजचं चित्र तितकं निराशाजनक नाही असं म्हणावं लागेल. ’सामाजिक  काम’ ही आजही नव्या जगाची ओळख करून घेण्याची एक मोठी संधी आहे. माणसांचे माणसांशी नातं जुळलं जाण्याची एक अनोखी प्रक्रिया यातून घडत असते. त्यातून स्वत:च्या विचारांचा दुराग्रह, अभिनिवेश कमी होतो. जगण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि लोकांची निवड वेगवेगळी असते याचं भान येणं माणूस म्हणून फार महत्त्वाचं आहे. ही संधी घेण्यास उत्सुक असलेले लोक  – तरुण  लोक – आजही कमी नाहीत. गरज आहे  त्यांना हेरण्याची, त्यांना सामावून घेण्याची, त्यांना  नवे  काम  करण्याचे स्वातंत्र्य देण्याची, त्यांना जबाबदारी घेण्याची संधी देण्याची. जुन्या पिढीने केवळ आपण ’जास्त पावसाळे पाहिले आहेत म्हणून आपल्याला जास्त कळतं’ हा अभिनिवेश सोडला पाहिजे.

समाज  जोवर आहे तोवर समाजात प्रश्न,  समस्या राहणारच. तसेच या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी भावना असणारे लोकही राहणारच – ती जमात या पृथ्वीतलावरून पूर्ण नाहीशी होईल अस मला तरी वाटत नाही.  आणि शेवटी असं आहे  की,  दुसरं कोणी करो ना करो, आपल्याला आतून वाटतं तेव्हा आपण ती गोष्ट, ते काम करतोच... पुढेही लोक  करत राहतील. सामाजिक कामाचे स्वरुप बदलते हे लक्षात घेतले तर ते समजून घेण्याची आपली  क्षमताही वाढेल. ‘जनांचा प्रवाहो चालला ‘हे जुन्या काळी जितकं खरं होतं, तितकच पुढेही असणार आहे. 
***