ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, February 24, 2013

१५३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग ४. केवलाद्वैत (२)

भाग , २(अ) , २ (आ), , ४(१)

मागील भाग

'ब्रह्म हे अविकृतच राहते. मात्र त्याच्यामुळे सृष्टीची प्रचिती येते असे शंकराचार्य मानतात. हा सिद्धान्त 'विवर्तवाद या नावाने ओळखला जातो...... (पुढे चालू)

सत्तात्रय

हे सगळे तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान म्हणून ठीक आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला जेंव्हा साप दिसतो, तेंव्हा 'ते ब्रह्म आहे असे म्हणून स्वस्थ बसून कसे चालेल? याबाबत शंकराचार्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो. वाराणसीच्या एका अरुंद गल्लीत हत्ती अंगावर आला असताना शंकराचार्य पळू लागले. ते पाहून एकाने खोडसाळपणे विचारले की, 'किं पलायनम्? गजोSपि मिथ्या:’ - पळताय कशाला? हत्ती ही तर माया आहे. त्यावर हजरजबाबी शंकराचार्य उत्तरले, 'गजोSपि मिथ्या - पलायनमपि मिथ्या जशी हत्ती ही माया आहे तसेच माझे पळणे ही देखील मायाच आहे. शंकराचार्य केवळ चतुर होते म्हणून त्यांनी हे उत्तर दिलेले नाही. त्यामागे त्यांचा सत्तात्रयाचा सिद्धान्त आहे. शंकराचार्यांचा मायावाद समजावून घेताना त्यांचा सत्तात्रयाचा सिद्धान्तही समजावून घेणे आवश्यक ठरते.

शंकराचार्यांच्या मते जग पूर्णत: त्’ नाही तसेच ते पूर्णत: असत्’ ही नाही. जे कधीच कोणाच्या अनुभवास येत नाही त्याला असत्’ म्हणायचे. उदाहरण सांगायचे तर वंध्यापुत्र हा शब्द घ्या. वंध्येला पुत्र झाला की ती वंध्या राहत नाही आणि त्यामुळेच वंध्यापुत्र ही संज्ञा असत्’ - कधीही घडून न येणारी - या वर्गात येते. चौकोनी वर्तुळ’ पण याच सदरात मोडेल. जग असत्’ नाही कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्या अनुभवास येते.

सत्तात्रयापैकी पहिली जी सत्ता आहे तिला 'प्रातिभासिक सत्ता असे म्हटले जाते. दोरीवर दिसणारा साप, मृगजळ, आपल्याला पडणारी स्वप्ने ही वंध्यापुत्रासारखी असत्’ नव्हेत. पण ती  भास आहेत – ‘त्’  नव्हेत - हे तर आपण सर्वजण मान्य करतो. स्वप्नाला त्याच्या जागी ठेवण्याचे, त्याची रोजच्या कामात सरमिसळ न करण्याइतके व्यावहारिक ज्ञान आपण सर्वजण दाखवतो. स्वप्नात आपल्या अंगावर धावून येणारा अक्राळविक्राळ राक्षस त्या क्षणापुरता खरा असला तरी डोळे उघडता क्षणी तो नष्ट होतो.

हे जग म्हणजेही एका प्रकारचे स्वप्नच आहे. जगाची सत्यता प्रतीत होते ती केवळ व्यावहारिक पातळीवर. म्हणून त्याला 'व्यावहारिक सत्ता म्हणायचे. माझे नाव, माझा व्यवसाय, माझा देश या सगळयाला व्यावहारिक सत्यत्व आहे. ज्या नाना पदार्थांचा आपल्याला प्रत्यय येतो, ज्यांचा आपण उपभोग घेतो, त्या सा-या गोष्टी व्यावहारिकदृष्टया सत्यच आहेत. सर्पाचा जिच्यावर आपल्याला भास होतो ती दोरी सत्यच आहे. सर्प आणि दोरी या दोन्ही ज्ञानात जेंव्हा आपण सर्पाची सत्ता दोरीवर अध्यासित करतो तेंव्हा ती प्रातिभासिक सत्ता होते. जेंव्हा आपण दोरीची सत्ता मान्य करतो तेंव्हा ती व्यावहारिक सत्ता असते. व्यावहारिक सत्तेने प्रातिभासिक सत्तेचा बाध होतो म्हणून त्या दोहोंत व्यावहारिक सत्ता वरच्या पातळीवरची आहे.

शंकराचार्यांच्या मतांवर आधारित तर्क चालवायचा तर ब्रह्मसाक्षात्कार होईपर्यंत व्यवहारातील भेद, लौकिक प्रमाणे, मोक्षशास्त्र या सर्व गोष्टी सत्यच ठरतील. पण अंतत: त्या सत्य असतात काय? रामगोपाल मोहता शंकराचार्यांचया सत्तात्रयासंबंधी म्हणतात की, In the state of watchfulness also it is equally illogical to consider ourselves subject to differeing reactions such as pain and pleasure, freedom or bondage. In the acceptance of this variety as opposed to the realization of oneness, lies embedded all our sorrows, our helplessness in being victims of actions, reactions and counter actions, for we forget even in the state of wakefulness, as in the dream state, that the apparent spectacles, changes of scenes, are entirely imaginary, much as the mirage in a desert is to the thirsty traveler who has gone off his track and gets confused.”

एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाला की मग कसलेच भेद उरत नाहीत. कारण 'ब्रह्मविद् ब्रह्रौव भवति! मग त्या पातळीवर व्यावहारिक ज्ञानही स्वप्नमयच भासते. ही आहे सर्वोच्च अशीपारमार्थिक सत्ता! 'विद्याविनयसंपन्ने ब्राह्राणे गवि हस्तिनि, शुनि चैव श्वपाके च पंडिता: समदर्शिन: असा गीतेमध्ये एक श्लोक आहे. याचा अर्थ असा नव्हे की पंडित’ (म्हणजे ज्ञानी माणूस) गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ (हा शब्द  ज्या काळात वापरतात तो काळ इथे लक्षात घ्यायला हवा) यांना एकाच प्रकारचे अन्न देईल किंवा एकाच प्रकाराने तो त्यांच्याशी व्यवहार करेल! व्यावहारिक पातळीवरच्या त्याच्या वागणुकीत भेद असेल (जो आवश्यक आहे – उदाहरणार्थ हत्ती आणि कुत्रा यांची अन्नाची गरज वेगवेगळी आहे) पण तत्त्वत: मात्र असणार नाही. पारमार्थिक सत्तेच्या प्रकाशात तो जगाकडे पाहतो. तो ज्ञानी असतो, मूर्ख नव्हे. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेल्या एका गोष्टीतही  पिसाळलेल्या हत्तीने भिरकावून दिलेल्या एका शिष्याला (हत्ती मस्तवाल झालेला असला तरी अखेर तो ब्रह्म आहे या भावनेतून शिष्य बाजूला होत नाही) त्याचे गुरु म्हणतात की, 'अरे बाबा, माहुताच्या तोंडातूनही साक्षात ब्रह्मच तुला पळ काढायला सांगत नव्हते का? माहूत ब्रह्माचे का नाही ऐकलेस तू?

ब्रह्मात्मैक्याचा अनुभव एकदा आला की तो कशानेही बाधित होत नाही. म्हणून ते सर्वोच्च सत्य आहे. सर्वसाधारणपणे ज्ञानाच्या, सत्याच्या शंकराचार्यांनी सांगितलेल्या या तीन पातळया लक्षात न घेताच आपण मायावादाची चर्चा करतो आणि त्यामुळेच आपला गैरसमज होतो, गोंधळ वाढतो.

जीवो ब्रह्मैव

शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानातील मायावाद आणि सत्तात्रय हे दोन मुलभूत सिद्धान्त आपण पाहिले. त्यांचा तिसरा सिद्धान्त म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य! जीव तर अनेक आहेत आणि ब्रह्म तर एकमेव आहे. मग जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य कसे शक्य आहे असा प्रश्न स्वाभाविकपणेच आपल्या मनात येतो.

शंकराचार्यांच्या मते जीव हा साक्षी आणि अंत:करण या दोहोंचा मिळून बनलेला आहे.
जागृतावस्था = साक्षी + अंत:करण + इंद्रिये
स्वप्नावस्था = साक्षी + अंत:करण
सुषुप्ति अवस्था = साक्षी ( अंत:करण अविद्येत विलीन)
या तिस-या अवस्थेचे वर्णन करताना पी. नागराज राव म्हणतात, ”In this state there is the concealment of the One but not the projection of the many. Individuality still persisits. After waking up we are able to recollect the experience of the happiness in the sleep.”

व्यवहारात आपण ज्याला जीव समजतो, आणि वस्तुत: तो जसा आहे त्यातील भेद आपण नीट समजावून घेणे गरजेचे आहे. स्वप्न, जागृति, सुषुप्ति अशा जीवाच्या निरनिराळया अवस्था असतात. आत्म्याला मात्र अवस्थाभेद स्पर्श करु शकत नाहीत. जीवाला विकार असतात. आत्मा विकारांच्या पलिकडे आहे. जीव हा ज्ञानाचा विषय होऊ शकतो. आत्माच फक्त स्वत:ला जाणू शकतो आणि म्हणून तो ख-या अर्थाने ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. जीव हा वास्तविक आत्मतत्त्वाशी म्हणजे ब्रह्मतत्त्वाशी एकरुप असतो. पण उपाधींमुळे तो भिन्न वाटतो. पाणी एकच पण त्याला ज्या भांडयात ठेवावे तसा आकार ते धारण करते तसेच जीवाचेही असते.

जीवाच्या अनेकत्वासंबंधी तीन सिद्धान्त प्रचलित आहेत. आभासवादाच्या मते स्फटिकाशेजारी जास्वंदीचे फूल ठेवल्यास स्फटिकावर जडलेला रक्तवर्ण तेथे जसा भासतो, त्याचप्रमाणे अज्ञान आणि त्याचे कार्य अंत:करण या उपाधीमुळे शुद्धचैतन्यस्वरुप ब्रह्मावर ईश्वरत्व आणि जीवत्व यांचा आभास होतो. दुसरे मत आहे प्रतिबिंबवाद! आकाशातील चंद्राची असंख्य प्रतिबिंबे ज्याप्रमाणे आपण पाहतो, त्याप्रमाणे जीव ही ब्रह्माचीच प्रतिबिंबे होत. तिसरे मत आहे अवच्छेदवाद! आकाश एकच असते. पण ते घट-मठांनी अवच्छेदित झालेले असते इतकेच! हे तीन मतप्रवाह शंकराचार्यांच्या शिष्यामध्ये आढळून येतात.

जीव जगात उपभोक्ता म्हणून वावरतो. तो सुखावतो आणि दुखावतोही. बाहय जगतावर जीवाचे नियंत्रण नसते. मायेमुळे जगत् भासमान होते तर जीव मात्र अविद्येमुळे भासमान होतो. ज्या क्षणी ही अविद्या नष्ट होते त्या क्षणीच जीव ब्रह्माशी एकरुप होतो. जीव अल्पज्ञ असतो. 'तत्त्वमसि हे छांदोग्य उपनिषदातील वाक्य वेदान्त विचारसरणीत महावाक्य म्हणून प्रसिद्ध आहे. अविद्येचा विद्येने नाश करुन जीवाची ब्रह्मत्वाशी एकरुपता साधली जाते असे शंकराचार्यांचा वेदान्त मानतो. ब्रह्मत्वाशी एकरुपता साधणे हेच जीवाचे ध्येय होय.

ईश्वर

शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात ईश्वर कसा असणार - अशी शंका वाचकांच्या मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. पण येथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शंकराचार्यांनी निर्गुण ब्रह्माप्रमाणेच सगुण ब्रह्मालाही मान्यता दिलेली आहे. मूळ उपनिषदांमध्ये ब्रह्मामध्ये सगुण आणि निर्गुण असा भेद केलेला आढळत नाही. निर्गुणातून सगुणाची निर्मिती हा विरोधाभास नाही का? निष्कल, निराकार, निरवयव, निर्गुण, निरंजन अशा ब्रह्माला सृष्टीचे कर्तृत्व द्यायचे म्हटले की विरोधाभास निर्माण होतो. सगुण व निर्गुणाच्या विरोधी वाटणा-या विधानांचा समन्वय साधताना शंकराचार्यांनी असे म्हटले आहे की, उपनिषदातील काही वाक्ये सगुण ब्रह्माची तर काही वाक्ये निर्गुण  ब्रह्माची द्योतक आहेत.

सगुण ब्रह्म म्हणजे मायेच्या उपाधीसह असलेले ब्रह्म. ब्रह्मसाक्षात्कारासाठी चित्तशुद्धीची आणि चित्तशुद्धीसाठी उपासनेची गरज आहे असे शंकराचार्यांचे प्रतिपादन आहे. निर्गुण ब्रह्माची उपासना कशी करणार? उपासनेला सोयीस्कर जावे म्हणून मग उपनिषदांनी ब्रह्माचे सगुण वर्णन केले आहे असे शंकराचार्य मानतात.

या सगुण ब्रह्मालाच शंकराचार्य ईश्वर असे म्हणतात. ईश्वर आणि जीव एका स्तरावर नाहीत. ईश्वर म्हणजे मायेच्या उपाधीत असलेले ब्रह्म हे आपण वरील उता-या त पाहिले आहेच. पण ईश्वर मायेच्या पाशात गुंतलेला नसतो - जीव मात्र मायेच्या आधीन असतात हा फरक आपण प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे. पण ईश्वर हे ब्रह्माला समांतर असे शक्तीकेंद्र आहे असा मात्र याचा अर्थ नाही. ब्रह्म आणि ईश्वर एकच आहेत. मायेतून, मायेच्या चष्म्यातून निर्गुण ब्रह्माकडे पाहिल्यावर जे दिसते त्याला ईश्वर म्हणायचे. तो जगाचा निर्माता आहे. इतकेच नव्हे तर तो धारक, तारक आणि संहारकही आहे.

पी. नागराज राव शंकराचार्यांच्या ईश्वराचे स्पष्टीकरण देताना म्हणतात की,  “The God of Shankara lasts as long as there is even a single finite soul. He is coequal with all souls and the world. Maya is the interpolating principle between Brahman and Ishwara and in fact between all that exists and Brahman. Shankara’s God is the absolute in the world context. Shankara’s God is the Absolute in the world context. He is the Supreme from the Cosmic end. He is the logical highest as Ishwara and Brahman is the intuitive highest. Brahman is the philosophical ideal. Ishwara is the religious goal. We can never realize Brahman by denying and eschewing God. Only by realizing and transcending Him, we can have Brahman realization. God is necessary step in the Advaita discipline for Brahman realization. ”

शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात ईश्वराला काहीच स्थान नाही किंवा असले तरीही ते फारच गौण आहे असा आपला समज आता नक्कीच दूर झाला असेल.

मोक्ष

सर्व भारतीय विचारप्रवांहाप्रमाणेच (अपवाद चार्वाकांचा) मोक्ष हे अद्वैत वेदान्ताचे ध्येय आहे. वास्तविक पाहता मोक्ष ही काही प्राप्त करुन घेण्याची वस्तू नाही. आपण खरे तर मुक्तच आहोत. पण अविद्येमुळे  आपल्याला आपण बंधनात आहोत असे भासते. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तापत्रयांनी माणूस पोळून निघतो तो या अज्ञानामुळे, विद्येमुळेच! आपण सारेजण वास्तविक नित्य शुद्ध, बुद्ध आणि मुक्तच आहोत. मग कुठल्या यातना? कोठले दु:ख? आत्म्याच्या या सच्चिदानंद स्वरुपाचा साक्षात्कार म्हणजेच मोक्ष होय.

शंकराचार्यांची मोक्षविषयक संकल्पना वैशिष्टयपूर्ण आहे. मोक्ष हा शोध नाही तर साक्षात्कार आहे. येथे साक्षात्कार हा शब्द असलेल्या स्वरुपाची जाणीव होणे याच अर्थाने वापरला आहे. जोवर आपण मायेच्या, अविद्येच्या आवरणाखाली असतो तोवर आपण सर्वत्र भेदच पाहतो. सर्वव्यापी चैतन्य हे माझेच रुप आहे अशी निरंतर भावावस्था म्हणजे मोक्षावस्था असेही म्हणता येईल.

मोक्ष उत्पाद्य नाही. तो आहेच. अनादि आहे. शाश्वत आहे. मोक्ष संस्कार्य अथवा विकार्य नाही. मोक्ष म्हणजे अधिक काही मिळवणे नव्हे तर स्वस्वरुप जाणणे. या संदर्भातील 'दशमस्त्वमसि ही गोष्ट प्रसिद्ध आहे. काही माणसे आपल्या दहाच्या गटातील सर्वांची गणती करत होती. तेंव्हा मोजणारा प्रत्येक जण स्वत:ला वगळत असल्याने त्यांची संख्या नऊच भरत होती. उरलेला एक जण कोठे आहे याची सर्वजण चिंता करत होते. मोजणारा स्वत:च दहावा आहे हे त्रयस्थाने दाखवून दिले व मोजणा-याला  स्वत:ची  ओळख पटली!

मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी अवस्था असा काही लोकांचा गैरसमज असतो. पण याच जीवनात, याच देहात मुक्तीचा लाभ घेणे शक्य आहे. जे लोक या स्थितीला पोहोचतात त्यांना 'जीवनमुक्त म्हटले जाते. गीतेतील दुस-या अध्यायातील स्थितप्रज्ञाचे वर्णन हे जीवनमुक्ताचेच वर्णन आहे. ज्यांना देहनाशानंतर मोक्ष मिळतो त्यांना 'विदेहमुक्त म्हटले जाते.

जीवनमुक्तीचा अधिकार कोणाला आहे? अर्थातच मोक्षावस्था साधणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी नैतिक, व्यावहारिक व आध्यात्मिक शुचितेचे व अधिकाराचे जीवन जगावे लागते. ज्ञानानेच मोक्ष मिळतो असा अद्वैत वेदान्ताचा ठाम सिद्धान्त आहे. ज्ञान म्हणजे माहितीचे भेंडोळे नव्हे तर आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, अपरोक्षानुभूति.......

'मी ब्रह्मरुप आहे अशी खरीखुरी जाणीव होण्यासाठी चित्तशुद्धीची आवश्यकता आहे. कर्म आणि भक्तीने ही चित्तशुद्धी होते असे शंकराचार्य मानतात. पण कर्माने आणि भक्तीने मोक्ष मात्र मिळणार नाही असेही ते सांगतात. कर्म आणि भक्ती यांचे साधन म्हणून मोक्षमार्गावर महत्त्वाचे स्थान आहे पण मोक्षसाधनेतील अखेरचा आणि सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे त्यांच्या मते ज्ञानच आहे.

'मोक्षाचा अधिकारी कोण? या प्रश्नाच्या उत्तरार्थ शंकराचार्य आपल्याला साधनचतुष्टय सांगतात. मोक्षाची ही चार साधने पुढीलप्रमाणे आहेत: १ नित्यानित्यवस्तुविवेक -नित्य काय आणि अनित्य काय, शाश्वत काय आणि विनाश पावणारे काय यासंबंधीचा विवेक २ इहामुत्रार्थफलभोगविराग - स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणच्या फळांच्या भोगाविषयी वैराग्यभावना ३ शमदमादिसाधनसंपद - शम, दम, उपरति, तितिक्षा, समाधान व श्रद्धा या सहा साधनांची संपदा ४ मुमुक्षत्व - मोक्षाची जबरदस्त इच्छा. अर्थात या चार साधनांच्या जोडीला श्रवण, निदिध्यास, गुरुंचे मार्गदर्शन हेही आवश्यक आहेच.

शंकराचार्यांच्या मोक्षविषयक विचारांचे वैशिष्टय म्हणजे, मोक्षाची संधी सर्वांना आहे. शंकराचार्यांच्या काळी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार जरी नव्हता तरीही वरील व्याख्येनुसार त्यांचा मोक्षाचा अधिकार शंकराचार्यांना अप्रत्यक्षपणे मान्य होता असे म्हणता येईल. प्रत्यक्षात त्या काळच्या समाजव्यवस्थेत तसा अधिकार खरोखरच सर्वांना नव्हता हेही सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव आपल्या समोर आहेच. एका अर्थी मोक्ष ही व्यकितगत बाब असल्याने समाजव्यवस्थेचा आणि मोक्षाचा काही संबंध जोडण्याचा प्रयत्न पूर्णत: अतार्किक वाटू शकतो. पण एखाद्या व्यक्तीला काय करता येईल आणि काय करता येणार नाही यासंबधीचे सामाजिक संकेत त्या काळी कडक होते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.  मोक्ष हे ‘व्यक्तिगत ध्येय समाजासमोर ठेवणा-या शंकराचार्यांना सामाजिक भान नव्हते असाही एक आरोप आधुनिक विचारवंत त्यांच्यावर करु शकतात. पण प्रत्येक गोष्टीला सामाजिक आणि वैज्ञानिक निकषांवर तपासून पाहण्याच्या आपल्या सवयीसंबंधीच आपण आता आत्मपरीक्षण करायची वेळ आली आहे.

शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना पुन्हा एकदा मला पी. नागराज राव यांचे शब्द उदधृत करण्याचा मोह होतो आहे. ते म्हणतात,  “The philosophy of Shankara can best be described as the best type of Spiritual Humanism. It is rationalistic in its approach to the problems of philosophy and experimental in its confirmation of the truth. It is the only religion that has the chance of being accepted by our generation who are the children of science and reason. As religion, it is least dogmatic, most universal and least secterian. It is at once a philosophy of values and a good metaphysics. Shanakara’s imposing and inspiring system of metaphysics is the greatest contribution of India to the world thought and religion.”

शंकराचार्यांच्या विचारांचा इतका सविस्तर विचार आपण दोन कारणांस्तव केला. एक म्हणजे विवेकानंदांच्या विचारांवर शंकराचार्यांच्या वेदान्ताचा फार मोठा प्रभाव आढळून येतो. अर्थात अनेक ठिकाणी विवेकानंद शंकराचार्यांपेक्षा वेगळया मार्गाने जातात. त्याचा उहापोह आपण पुढील काही प्रकरणांमध्ये करणार आहोतच.

दुसरे म्हणजे एकदा का शंकराचार्यांचा विचार नीटपणे समजला की, इतर आचार्यांचा वेदान्तविषयक विचार समजावून घेणे तुलनेने सोपे जाते. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य आणि वल्लभाचार्य हे सगळेच मायावादावर टीका करतात. शंकराचार्य प्रच्छन्न बौद्ध असल्याची काहींची टीका मात्र अतिरंजित आणि एकांगी वाटते. अर्थात गौतम बुद्धाचे हृदय आणि शंकराचार्यांची बुद्धी या दोन्हींची आज आपल्याला गरज आहे असे म्हणणारे विवेकानंद जन्माला यायला अजून ब-या च वर्षांचा कालावधी होता!

क्रमश: भाग ५ 

Thursday, February 21, 2013

१५२. बांधिलकी?

एका संस्थेचा कार्यक्रम.
संस्थापकांची जयंती. इथं तसं माझ्यासारखा एखादा अपवाद वगळता बाहेरचं कुणी नसतं.

विद्यार्थ्यांचं संचलन. बघायला ब-यापैकी गर्दी.
आम्ही बरेच लोक उभे. पण झाडाभोवतीच्या कट्ट्यावर काहीजण बसलेले.
मला किंचित ढकलत आणि मग ओशाळून ‘सॉरी’ म्हणत एक आठ वर्षांचा मुलगा माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. मी हसून थोडी मागे सरकले. 

दहा पंधरा मिनिटांचा तर कार्यक्रम.
त्याची सांगता ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाने.  
आम्ही सगळेजण – अगदी तो आठ वर्षांचा मुलगाही- सोबत गातो. मला बरं वाटतं.

कट्ट्यावरचे मात्र लोक बसून. उभेही राहत नाहीत.
वयस्कर? वेगळ्या क्षमतेचे? आजारी? छे! तरुण लोक आहेत ते सगळे.

विचारांशी बांधिलकी असणा-या ठिकाणी हे असं.
बांधिलकी नसेलच – तिथं काय? 

(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द-  अनुभव मांडण्याचा हा प्रयोग. या मालिकेत आणखीही काही सांगण्याचा विचार आहे.)

Sunday, February 17, 2013

१५१. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग ४: केवलाद्वैत (१)

भाग ३ 

शंकराचार्यांचा वेदान्त हा सर्वात प्रसिद्ध व लोकमान्य असा वेदान्त आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कालडी या गावी इसवी सन ७८८ मध्ये झाला व इसवी सन ८२0 मध्ये त्यांनी समाधी घेतली याबाबत सर्वसाधारणपणे एकमत आढळते. (ठाणे शहरातील प्रसिद्ध अभ्यासक श्री. श्री. द. कुलकर्णी यांच्या मते मात्र हा कालावधी इसवी सन पूर्व ५0९ ते ४७७ असा आहे.) बालपणीच पितृछत्र गमावलेल्या शंकराने वयाच्या आठव्या वर्षीच चारी वेदांचे अध्ययन पूर्ण केले. वेदान्तमताचा म्हणजेच अद्वैतमताचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. द्वारका, ज्योर्तिमठ, पुरी व शृंगेरी या चार ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केली. आचार्यानी लिहिलेली मधुर स्तोत्रे आजही लोकांना आवडतात. त्यांना मायावादाच्या केलेल्या आग्रही प्रतिपादनामुळे काही विद्वान त्यांच्यावर ते 'प्रच्छन्न बौद्धअसल्याचाही त्यांच्यावर आरोप करतात. त्याचा विचार आपण पुढील विवेचनात करणार आहोत.

मूळ सिद्धान्त

वास्तविक शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान हा आयुष्यभराच्याच अभ्यासाचा विषय आहे. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार त्यांनीच दोन ओळींत पुढीलप्रमाणे सांगितले आहे:
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभि: । ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्रौव, नापर: ।।
(कोटी ग्रंथांनी जे सांगितले आहे, ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्य आहे, जगत् मिथ्या आहे, जीव आणि ब्रह्म एक आहेत, वेगळे नाहीत.)

शंकराचार्यांचा पहिला महत्त्वाचा सिद्धान्त म्हणजे ब्रह्म हेच काय ते सत्य होय. आणि सत्य म्हणजे काय? तर ज्याचा कधीही विनाश होत नाही ती वस्तू. 'नाभावो विद्यते सत: असे भगवद्गीतेतही त्याचे वर्णन आहेच. हे सत्य एकमेव आहे. त्यालाच ब्रह्म म्हणायचे! त्याशिवाय दुसरे काहीही विद्यमान नाही. 'सर्वं खल्विदं ब्रह्म या औपनिषदिक महावाक्याचे शंकराचार्य पूर्णत: समर्थन करतात.

ब्रह्म स्वयंप्रकाशी आहे. ते चिन्मय आहे. 'सत्यं ज्ञानमन्तं ब्रह्म किंवा 'सच्चिदानंद’ असे त्याचे शब्दांत वर्णन केले जाते. पण वस्तुत: ब्रह्माचे शब्दांत कधीही वर्णन करता येणार नाही. ते अनिर्वचनीय आहे. 'यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसा सह (जिथून वाणी माघारी येते, मनालाही त्याचा थांग लागत नाही) से उपनिषदातही त्याचे वर्णन आहेच. ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. सत्, चित्, आनंद हे काही ब्रह्माचे गुणधर्म नव्हेत. ब्रह्म हे दुस-या कशामुळचे निर्माण झालेले नाही. ते आहेच. अनादि आहे आणि अनंतही आहे. ते कोणत्याच मर्यादेने बांधले गेलेले नाही. म्हणून शब्दांत त्याचे वर्णन करताना ' ब्रह्म म्हणजे अमुक नाही अन तमुक नाही - नेति नेति (न इति – हे नाही)’ असे म्हणावे लागते.

शंकराचार्यांच्या मते ब्रह्म हे भेदरहित आहे. हे भेद तीन प्रकारचे असतात - विजातीय, स्वजातीय व स्वगत. गाय आणि घोडा यांच्यातील भेद विजातीय स्वरुपाचा आहे. काळी गाय आणि पांढरी गाय हा स्वजातीय स्वरुपाचा भेद झाला. गायीचे शिंग, शेपूट, पाय हे स्वगत भेद दर्शवितात. ब्रह्माशिवाय येथे दुसरे काहीच विद्यमान नसल्याने विजातीय, आणि स्वजातीय भेदाचा प्रश्नच उदभवत नाही. ब्रह्म निर्गुण असल्याने त्यात स्वगत भेदही नाही. ब्रह्माचे वर्णन करताना शंकराचार्य 'स्वरुपलक्षण आणि 'तटस्थलक्षण असे दोन शब्दप्रयोग करतात. हे दोन शब्द समजून न घेता आपण पुढे गेल्याने सध्याच्या चर्चेत फार मोठा अडथळा येणार नाही, त्यामुळे आपण त्याची चर्चा करणार नाही.

आता हे ब्रह्म आहे हे तरी कशावरुन? तर श्रुतिंवरुन! शंकराचार्य श्रुतिप्रामाण्य, शब्दप्रामाण्य मानतात. 'अहं ब्रह्मास्मि’ सारखी वाक्ये ज्या अर्थी श्रुतिंमध्ये आहेत, त्या अर्थी ब्रह्म आहेच. अर्थात शंकराचार्यांचे शब्दप्रामाण्य म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. 'जरी शतश्रुतिंनी सांगितले की अग्नी शीत आहे तरी त्यावर विश्वास ठेवू नका असेही शंकराचार्य सांगतात! प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, उपलब्धि ..... या सर्व प्रमाणांची स्वत:ची अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत असे शंकराचार्यांचे मत आहे. म्हणून 'प्रत्यक्षाद्वारे ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करणे शंकराचार्यांच्या मते व्यर्थ ठरते!

मायावाद

'सर्व जग म्हणजे ब्रह्म आहे असे म्हणणे तर फारच सोपे! पण प्रत्यक्षात जगताना आपण या जगात भेदच पाहतो. अगदी हरघडीला पाहतो. सगळेच ब्रह्म असेल तर दंगली, खून, मारामारी, हत्याकांडे होतीलच कशी? आणि कशासाठी? चोरही जर ब्रह्मच असेल तर त्याला किंवा तिला शिक्षा करण्याचा इतरांना काय अधिकार? उपनिषदांच्याच भाषेत सांगायचे तर ' सारे ब्रह्मच असल्यावर कोण कोणाला पाहणार? .. वगैरे. आता हे सगळे तत्त्वज्ञान म्हणून चर्चा करायला, भाषणे द्यायला आणि लेख लिहायला म्हणून ठीक आहे. पण खरे सांगायचे झाले तर हे जग आणि ब्रह्म यांच्या एकत्वावर विश्वास ठेवायचा म्हणजे वेडेपणाच आहे असे आपल्याला वाटते, जे स्वाभाविक आहे.

आता यावर एक उपाय असा की, ब्रह्माचा आणि जगाचा काही संबंधच नाही असे मानायचे! पण मग ब्रह्माच्या एकमेवाद्वितीयत्वाचे काय? जग ही दुसरी एक सत्ता मानली की ब्रह्म आपोआपच सान्त, सीमित आणि मर्यादित होते.

शंकराचार्यांना मात्र ही अडचण जाणवत नाही. 'जगत् मिथ्या असे त्यांनी आधीच आपल्याला सांगून ठेवले आहे. या मिथ्या शब्दाबाबत आपण फार घोळ घातला आहे. केवळ या एका शब्दामुळे 'शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान पलायनवादी आहे असे म्हणण्याइतपत काही टीकाकारांची मजल गेली आहे. पण शंकराचार्यांचा मायावाद जर आपण नीट समजावून घेतला तर आपला गोंधळ दूर होईल.

मिथ्या म्हणजे खोटे नव्हे, तर मिथ्या म्हणजे अशाश्वत, परिवर्तनीय! जग सत् नाही कारण ते सतत बदलत राहते. जगात अनेक गोष्टींचा नाश होतो आणि अनेक नव्या गोष्टी जन्माला किंवा उदयाला येतात. जगाला अस्तित्व आहे हेही खरेच. कारण जर जग पूर्णत: खोटे असेल तर त्याचा आपल्याला बोध होणार नाही. पण जगाच्या आपल्याला झालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण दैनंदिन व्यवहार करत असतो. म्हणून जग पूर्णत: खोटे नाही. पण जग शाश्वत आणि अपरिवर्तनीय पण नाही. जग त्’ नाही आणि ते असत्’ ही नाही - ते मिथ्या आहे.

मग हे जग नेमके आहे तरी काय? तर हे जग ब्रह्मावरील विवर्त आहे. जगाचा आधार, जगाची प्रतिष्ठा, जगाचा पाया ब्रह्मच आहे. ब्रह्म नसतेच तर जगही नसते. पण जग असले काय अन नसले काय, त्याचा ब्रह्मावर मात्र काहीही परिणाम होत नाही. जगाच्या असण्याने ब्रह्मत्वाच्या मुकुटात काही तुरा घातला जात नाही आणि जगाच्या नसण्याने त्यात काही उणीव निर्माण होत नाही. सर्प-रज्जूचे शंकराचार्यांचे उदाहरण अगदी प्रसिद्ध आहे. रात्रीच्या काळोखात रस्त्यावर पडलेल्या निरुपद्रवी दोरीला साप समजून आपण घाबरतो. आपण ओरडतो, आपल्या हृदयाची धडधड वाढते, आपल्याला घाम फुटतो ...... आपल्याला असे कितीही आणि काहीही वाटले तरी त्यामुळे प्रत्यक्षात त्या दोरीचे काही सर्पात रुपांतर होत नाही. आपल्या भाव-भावनांच्या अविष्कारांचा त्या दोरीवर काहीही परिणाम होत नाही.

अर्थात हे उदाहरण केवळ संकल्पना समजावून घेण्यापुरतेच ठेवायचे. कारण दोरी आपल्या नेहमीच्या अर्थाने अचेतन आहे तर ब्रह्म चैतन्यमय आहे. दोन्ही परिस्थितींमध्ये एक साम्य मात्र नक्कीच आहे. ते म्हणजे अज्ञानामुळे आपण एका वस्तूला दुसरीच काहीतरी समजतो. दोरीला साप समजून प्रतिक्रिया देतो तसेच ब्रह्माला जग समजतो. अविद्येमुळे आपण ब्रह्मावर जगाचा 'अध्यास करत असतो, आरोप करत असतो. जे त्या वस्तूचे (इथे वस्तू म्हणजे entity असे म्हणायचे आहे मला, कदाचित हा शब्द चुकीचा आहे, पण अन्य योग्य शब्द आठवत नसल्याने तोच वापरते आहे) वास्तविक स्वरुप नाही, त्या प्रकारे वस्तूला समजणे म्हणजे त्या वस्तुवर दुस-या वस्तूचा आरोप करणे! प्रथम पाहिलेल्या वस्तूचे दुस-या वस्तूच्या ठिकाणी होणारे स्मरणाच्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजे अध्यास होय! ब्रह्म अविकारी, निश्चल, निरवयव असल्याने जगातील दोषांनी अथवा गुणांनी ब्रह्म लिप्त होत नाही.

ब्रह्मावर जगाचा जो काही भास आपल्याला होतो, तो मायेमुळे होतो. मायेची कल्पना सर्वप्रथम शंकराचार्यांनी मांडली असे काहीजण मानतात. तर काही तिचा उगम थेट ऋग्वेदापर्यंत नेऊन भिडवतात. मायावादाचा जनक कोण या वादात आपण फारसे लक्ष घालणार नाही. शंकराचार्यांनी मायावादाचा सिद्धान्त अतिशय लोकप्रिय केला इतके खात्रीने म्हणता येईल.

मायेची शक्ती दोन प्रकारची आहे. असलेली दोरी झाकून ठेवणे ही एक - हिला म्हणायचे आवरण शक्ती. आणि असलेल्या वस्तूच्या जागी दुसरीच वस्तू दाखवणे - जसे दोरीच्या जागी साप - तिला म्हणायचे विक्षेपशक्ती. विशेष म्हणजे माया अनादि आहे पण अनंत मात्र नाही. ही दोरी आहे, साप नाही हे व्यक्तीला कळल्यावर सापाच्या भावनेतून व्यक्ती मुक्त होते. ब्रह्मसाक्षात्कार झालेली व्यक्ती मायेच्या पाशातून सुटते म्हणून माया सान्त आहे. यातून ज्या व्यक्तीला साप (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष) माहिती नाही, तिला दोरीच्या जागी साप दिसणार नाही, दोरीच दिसेल – अशी व्यक्ती ब्रह्मज्ञानी मानायची का असा एक तार्किक प्रश्न लगेच येईल. साप आणि दोरी हे उदाहरण आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या जमान्यात कदाचित ही संकल्पना समजण्यासाठी वेगळे उदाहरण द्यावे लागेल – गरज असल्यास.

मायेला शंकराचार्य 'द्द्विलक्षण असे म्हणतात. माया सत् आहे का? तर नाही! कारण तिचा नाश होतो. म्हणजे माया असत् आहे का? तर तसेही नाही. कारण दोरीच्या जागी त्या क्षणापुरता का होईना पण आपल्याला खरोखरच साप दिसतो. तो खोटा आहे हे कळत नाही तोवर आपण घाबरुन पळ काढतोच.

या मायेमुळेच आपण आत्म्यावर देहाचा, भावनांचा, अहंकाराचा अध्यास करतो. ' मी लठठ आहे......मी आंधळा आहे.......मी रागीट आहे ......हे माझे आहे....... हे मला आवडत नाही....... हे सारे भावाविष्कार म्हणजे आपल्या सच्चिदानंद स्वरुपावर आपण केलेले आरोप होत......अध्यास होय.

जग आणि ब्रह्म यांच्या नातेसंबंधात शंकराचार्यांनी हा जो काही सिद्धान्त मांडला त्यालाच 'विवर्तवाद असेही म्हटले जाते. तो थोडा विस्ताराने समजावून घेऊ.

कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी जो मालमसाला लागतो त्याला 'उपादान कारण म्हणायचे. ज्या क्रियेच्या अथवा हालचालीच्या योगाने उपादान कारणात गुणांचा अथवा अवस्थांचा बदल घडून येतो, ते 'निमित्त कारण होय. ब्रह्मच या जगाचे उपादान कारण व निमित्त कारण आहे. माया ही ब्रह्माचीच शक्ती आहे. ज्याप्रमाणे जादुगाराला त्याच्या जादूची कधीही भूल पडत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मही मायेत कधीच अडकत नाही. जग ज्या अर्थी दिसते, भासते, असते त्या अर्थी मायेने ब्रह्मावर कुरघोडी केली असे मानणारांनी शंकराचार्यांचे माया - ब्रह्माचे विवेचन नीटपणे समजावून घेतले पाहिजे.

नैयायिकांच्या मते 'कारण व्यापारानंतर कार्य नव्यानेच उत्पन्न होते. ते पूर्वी नसते. त्याच्या अस्तित्वाला खराखुरा आरंभ असतो. नैयायिकांचे हे मत 'आरंभवाद या नावाने ओळखले जाते. सांख्यकार म्हणतात की, 'प्रत्यक्ष उत्पन्न होण्यापूर्वी कार्य हे अस्तित्वात असतेच. पण फक्त निराळया स्वरुपात! सांख्यांचे हे मत 'सत्कार्यवाद या नावाने ओळखले जाते. 'उपादानकारणाच्या घटकांचा संघात दर क्षणाला संपूर्णपणे नष्ट होऊन त्याच्या जागी दुसरा संघात उत्पन्न होतो असे बौद्ध मानतात. या मताला 'संघातवाद म्हटले जाते. शंकराचार्यांच्या अद्वैतवेदान्तालाही 'जे पूर्वी नव्हते ते नव्याने निर्माण होऊ शकणार नाही हे सर्वस्वी मान्य आहे. पण त्याचबरोबर ब्रह्मामध्ये काही परिवर्तन होऊन सृष्टी घडली हे मात्र त्यांना अमान्य आहे.   'ब्रह्म हे अविकृतच राहते. मात्र त्याच्यामुळे सृष्टीची प्रचिती येते असे शंकराचार्य मानतात. हा सिद्धान्त 'विवर्तवाद या नावाने ओळखला जातो.
क्रमश: भाग ४(२)