ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, January 12, 2014

१८५ . विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १९: मोक्षमार्ग (१)


मोक्ष हा प्राप्य नाही, उत्पाद्य नाही, विकार्य नाही आणि संस्कार्यही नाही हे खरे. मग माणसाने काय करायचे? एक गोष्ट सांगतात की, एकदा एक माणूस झाडाखाली निवांत झोपला होता. ते पाहून दुस-याने त्याला उठून काही काम करायला सांगितले. तो जे काही सांगेल त्यावर पहिल्याचा 'मग त्याने काय होईल? असा प्रश्न तयारच असे. बरीच लांबण लागता लागता ' तुला उद्योग करुन, भरपूर पैसे मिळवून निवांत बसता येईल असे दुसरा माणूस म्हणाला. त्यावर मग आळशी माणूस हसून म्हणाला, 'मग आत्ता मी निवांत बसलोच आहे की! त्यासाठी एवढी सगळी दगदग करायची काय गरज?

तमस आणि सत्व हे दोन्ही गुण टोकांनी पाहिले असता एकाच प्रकारचे दिसतात. जनकासारखा कार्यरत माणूस मुक्त असेल हा विचार आपल्या सहजी पचनी पडत नाही, हा एक भाग झाला. दुसरे असे की, ही आंतरिक अवस्था नेमकी मिळवायची कशी या प्रश्नाला नेमके एक असे सार्वजनीन उत्तर नाही. त्यामुळे संभ्रम पैदा होतो. जर आम्ही स्वरुपत: मुक्तच आहोत अन प्रत्यक्षात आम्ही स्वत:ला बंधनामध्ये पाहतो तर मुक्तीचा काही ना काही मार्ग, काही ना काही प्रक्रिया असलीच पाहिजे असे आपल्याला वाटत राहते.

विवेकानंद म्हणतात, जगातील माणसांची सर्वसामान्यपणे चार गटांत विभागणी होते. ते म्हणजे बुद्धिवादी, भावनाशील, साक्षात्कारवादी आणि कर्मशील. आता या सर्वांना एकाच प्रकारचा मार्ग देवून चालणार नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचे नुकसान करणे होय. एकाच मार्गाचे अनुसरण करण्यात सर्वांचे भले नाही. ज्याच्या त्याच्या स्वभावाला अनुसरुन, त्याला साहायक ठरतील असाच मार्ग प्रत्येक व्यक्तीसाठी असला पाहिजे असा विवेकानंदांचा आग्रह आहे .

अर्थात वेगवेगळे असणारे हे सर्वच मार्ग महत्त्वाचे आहेत - पण साधन म्हणून! त्यांच्याद्वारे प्राप्त होणारे गन्तव्यस्थान एकच असल्याने या मार्गांचे आपापसात भांडण असण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या व्यक्तीला मुंबईहून दिल्लीला जायला अनेक गाडया आणि साधने आहेत. त्याने आपली सोयीची वेळ, दिवस, ऐपत आणि तिकीटाची किमत...इत्यादी पाहून गाडी ठरवावी व जावे - आपण दिल्लीला पोहोचणारच याबाबत कसलीही शंका न बाळगता! एकदा एका विशिष्ट गाडीत बसल्यावर मात्र अमूक एक स्थानक या मार्गावर आलेच नाही अशी तक्रार करत बसू नये. कारण महत्त्व मार्गावरील स्थानकांना नाही तर महत्त्व आहे मुक्कामास पोहोचण्याला!

स्वामीजी म्हणतात, धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग म्हणतो. या योगाचे चार मार्ग आहेत. १. कर्मयोग - या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्ये यांच्याद्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. २. भकितयोग - या पद्धतीनुसार सगुण ईश्वरावर प्रेम करुन आणि त्याची भक्ती करुन मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ३. राजयोग- या पद्धतीनुसार मन:संयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ४. ज्ञानयोग - या पद्धतीनुसार ज्ञानाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. त्या एकमेव स्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत.


स्वामीजींनी सांगितलेले हे चार मार्ग बरेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ.
क्रमश: 

No comments:

Post a Comment