ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, June 28, 2010

३२. माझिया मना...

परवा पुन्हा एकदा मुंबई-पुणे प्रवास करावा लागला. सुट्टी सुरू होण्याचा अवकाश, की मुंबई -पुणे गाडया भरभरून वाहायला लागतात. आरक्षण एक तर मिळत नाही आणि चुकून मिळालेच तर त्याचा फारसा उपयोग होत नाही असा आजवरचा अनुभव! त्यामुळे गाडीत सुट्टी - गर्दी - आरक्षण – भ्रष्टाचार – रेल्वे - सरकार – लोकसंख्या या संदर्भात एक तरी चर्चासत्र नक्की असते. नियमित प्रवाशांच्या चेह-यावर ’हे असेच चालायचे’ असा स्थितप्रज्न्य भाव असतो किंवा ’ही गर्दी म्हणजे काहीच नाही’ असा अनुभवी आव असतो.

मराठी माणसांना चर्चा करायला आवडते. मतैक्य असणा-या बाबींमध्येही आपण उत्साहाने चर्चा करतो. हवामानानुसार, परिस्थितीनुसार मतैक्याचा मुद्दा बदलतो इतकेच! त्या दिवशीही गाडीत ’यंदा फारच उन्हाळा आहे बुवा/बाई’ याबाबत मतभेद नसल्याने जोरदार चर्चा चालू होती. उन्हाळ्याबाबत फारसा मतभेद दिसत नाही म्हणा.

पूर्वी उन्हाळा हा विषय थोडक्यात संपायचा. कारण तो उन्हाळा नुसताच कमी - जास्त – असह्य अशा गुणवत्तेचा उन्हाळा असायचा. हल्ली चिमण्या पोरीही ’अगं, पुण्यात काल ३९ होतं बर का, आपली मुंबईच बरी - फक्त ३४!’ अशा नेमक्या आकडेवारीत बोलतात. ही २४ तास बातम्या देणा-या वाहिन्यांची कृपा! तशा कोणत्याही वाहिनीवरच्या बातम्या हा मला नेहमी विनोदी कार्यक्रम वाटतो. पण अशा प्रकारच्या सामूहिक चर्चांमध्ये लोक त्यांचा हवाला अगदी गंभीरपणे देतात हेदेखील खरे!

एकीकडे या गप्पा चालू असताना जो तो घामाच्या धारांमध्ये वाहून निघत होता. शीतपेयांच्या किंमती ऐकून घाम वाढत होता. उन्हाळ्याच्या अनुषंगाने ’पिण्याचे पाणी’ हा विषय समोर आला. मागील वर्षी लांबलेल्या पावसाची आठवण मग आपोआप निघाली. पाऊस कमी होण्यामागच्या कारणांची यथासांग चिकित्सा झाली. आणि ’यंदा मात्र पावसाने लवकर आले पाहिजे’ अशी सदिच्छाही व्यक्त झाली.

चर्चा चालू होती. कल्याण – कर्जत स्थानके ओलांडून गाडी व्यवस्थितपणे पुढे धावत होती. कधी नव्हे ती गाडी वेळेत असल्याने पुण्यातील कार्यक्रमांचे मनसुबे माणसे रचत होती. बाहेर सूर्य तळपत होता. डोंगर उजाड, रखरखीत होते. सारेजण प्रवास संपायची वाट पाहत होते.

मंकी हिल स्थानकाच्या परिसरात वातावरणात एकदम बदल झाला. सोसाटयाच्या वा-याचा धुमाकूळ आम्हा सर्वांपर्यंत पोहोचला. काळ्या ढगांमुळे आकाश काही वेगळेच दिसत होते. सूर्य ढगांआड लपून बसला होता. मातीचा वास आसमंतात दरवळत होता.... आणि बाहेर पावसाचा मनसोक्त धिंगाणा चालू होता!

मला पाऊस फार आवडतो. त्याच्या नुसत्या चाहुलीनेही मन प्रसन्न आणि टवटवीत होतं! जणू माझ मन पावसाच्या संगतीत त्याचाच एक हिस्सा बनतं!

मी आनंदाने सहप्रवाशांकडे नजर टाकली. पण काय आश्चर्य! कोणीही त्या कोसळणा-या पावसाचा थेंब झेलायला उत्सुक नव्हते. सर्व खिडक्यांच्या काचा फटाफट बंद झाल्या. हळूहळू गाडी रखडायला लागली. खंडाळा स्थानकात दहा मिनिटे, खंडाळा ते लोणावळा वीस मिनिटे अशा कूर्म गतीने गाडी आता पुढे जात होती. प्रवासी अस्वस्थ होऊ लागले. दर दोन मिनिटांनी कळत नकळत घडयाळाकडे नजरा वळू लागल्या. गाडीला जसजसा उशीर होऊ लागला, तसतशी प्रवाशांची पावसाबद्दलची कुरकूर वाढत चालली. कुरकुरीचे रुपांतर तारस्वरातील तक्रारीत झाले. बघता बघता ’काय हा पाऊस, त्याला वेळ नाही, काळ नाही’ यावर सर्वांचे एकमत झाले. ’पाऊस फक्त शेतावरच पडला तर बरे होईल’ असेही एकाने कल्पक धीटपणे सुचवले.

या बदलत्या दृष्याची मला मोठी गंमत वाटली. परिस्थितीबाबत नेहमी असमाधान बाळगायला आपण कोठून शिकतो? उन्हाळ्यातील तापत्या सूर्याबद्दल तक्रार न करता आपण कधी त्याच्याकडे हसून बघितले आहे काय? उन्हाळ्यात उन्हाबद्दल तक्रार, हिवाळ्यात थंडीबद्दल कुरकूर आणि पावसाळ्यात पावसाला शिव्याशाप – असे आपण का करतो? ’पावसाबद्दल शेतक-याने आनंद मानावा फार तर’ हा दृष्टिकोन आपल्याला शोभतो का?

मला जे हवे, तेच जगाकडून मिळाले पाहिजे, असा आग्रह कशासाठी? आणि मुळात आपल्याला काय हवे आहे, ते आपल्याला तरी कळले आहे का? जे नाही, त्याची ओढ, त्याचे वेड ….... आणि जे आहे त्याचा त्रास, त्याचा उबग.. हा कसला खेळ आपण मांडून बसलो आहोत? या खेळाला कधी तरी अंत असणार आहे का?
*

पूर्वप्रसिध्दी: ३ जुलै १९९६, मुंबई तरूण भार

2 comments:

  1. छान लिहिलं आहेत. !!

    असाच 'कल्पक धीट'पणा असणाऱ्या एकाचं हलकंफुलकं मनोगत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे इथे. जमलं तर डोकावू जा :)

    http://www.harkatnay.com/2010/06/blog-post_17.html

    ReplyDelete
  2. हेरंब, या विषयावर आपली मतं फारच वेगळी आहेत तर! चालायचचं :-(

    ReplyDelete