ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 28, 2011

६४ शिक्का

पुणे मुंबई ब-याचदा सलग प्रवास करायचा होता. मग मी रेल्वेचा महिनाभराचा पास काढला. 'सुपरफास्ट'चा दर खिशाला परवडत नसण्याच्या काळात 'दख्खनच्या राणीचा' प्रवास हे एक स्वप्न होत. आधी आरक्षण वगैरे करून प्रवास करण्याची पद्धत विनोदी वाटण्याच्या वयात मी होते तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यामुळे सगळे प्रवास आटापिटा करून गाडी पकडण्याचे किवा मिळेल ती गाडी पकडण्याचे असत. आता अर्थात मी आरक्षण केल्याविना प्रवास क्वचित करते. आणि मधल्या काळात 'मरे'ने सगळ्याच पुणे -मुंबई गाडया निळ्या रंगात रंगवून टाकल्या आणि दख्खनच्या राणीची शान कमी करून टाकली.

डेक्कन क्वीनने थोर लोक प्रवास करतात हे ऐकून माहिती होत. त्यामुळे त्या गाडीने पहिल्यांदा प्रवास करताना आपल्याला त्यापैकी कोणी भेटेल का, अस कुतुहल मनात होत! माझ्या नियमित प्रवासाच्या तिस-या दिवशी सरोजताई माझ्या शेजारी येऊन बसल्या तेव्हा माझ्यावर एक प्रकारच दडपण आल! त्यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तीला कोण ओळखत नाही?

आठवडाभरात आमची गप्पा मारण्याइतपत ओळख झाली. एकदा तर मला पोचायला थोडा उशीर झाला तर त्यानी माझ्यासाठी जागा पकडून ठेवली होती (मासिक पासच्या डब्यात जागा आरक्षित नसतात - निदान तेव्हा तरी नसायच्या!) वलयांकित मोठ्या माणसांपासून चार पावले दूर राहण्याचा धडा दुर्दैवाने (किंवा सुदैवाने!) मी फार लवकर शिकले होते. त्यामुळे मी आपण होऊन सरोजताईंशी काही बोलायला जायचे नाही. पण त्या फारच साध्या आहेत ... त्यामुळे आमच चांगल जमून गेल!

त्यादिवशी गाडीत सौंदर्यस्पर्धांच्या विरोधात कोणीतरी सह्या गोळा करत होत. मग आपोआपोच त्या विषयावर चर्चा चालू झाली आमची आपापसात. सौंदर्यस्पर्धांच्याद्वारा स्त्रीला 'उपभोग्य वस्तू' म्हणून ठसवले जाते या विचारांशी मी सहमत होते.

माझे मत ऐकून सरोजताई एकदम खूष झाल्या. "वा! मार्क्सवादी दिसते आहेस तू'" - त्या मला एकदम म्हणाल्या. त्या प्रसिद्ध विचारवंत असल्या तरी आठवडाभरात आम्ही एकमेकींशी वैचारिक काही बोललो नव्हतो . त्यांची ही प्रतिक्रिया मला काहीशी अनपेक्षित होती. मी विचार करत म्हणाले, "शोषितांच्या, वंचितांच्या दु;खाची जाणीव मला मार्क्समुळे झाली खरी, पण त्याचे सगळे म्हणणे मला कळले नाही आणि जे काही थोडेफार कळले, त्यातले सगळे पटलेही नाही..."

सरोजताई मार्क्सवादी कार्यकर्त्या आहेत हे मला माहिती होत! पण उगाच समोरच्याला बर वाटाव म्हणून खोट बोलण मला जमत नाही. शिवाय माझा हेतू त्याना दुखावण्याचा नव्हता; तरीही त्या दुखावल्या गेल्याच! "मग काय गांधीवादी आहेस का तू?" अस वरकरणी हसत पण जरास खोचकपणे त्यांनी मला विचारलं. मला त्यांचा खोचकपणा लक्षात आला आणि मी गप्प बसले. पण आता त्या एवढ्यावर समाधानी नव्हत्या. पुन्हा मला त्यांनी तोच प्रश्न विचारला.

क्षणभर बोलाव की नाही असा मला प्रश्न पडला. पण मग मी म्हटल, "गांधीजींच्या काही गोष्टी मला खूप आवडतात - जसे सत्य - पण काही अव्यवहार्य वाटतात - उदाहरणार्थ उपोषण. शिवाय धर्म आणि राजकारण यांच्यात त्यांनी निर्माण केलेला संबंध ..." माझे बोलणे अर्ध्यात तोडत सरोजताई म्हणाल्या, "म्हणजे तू नक्कीच हिंदुत्त्ववादी आहेस..."

आता मला जरा मजा वाटायला लागली होती. मी हसून म्हणाले, " माझे काही अतिशय जवळचे मित्र मैत्रिणी कट्टर हिंदुत्त्ववादी आहेत. वृत्तपत्रांच्या भाषेत बोलायचे तर 'संघ परिवारातले'! पण ते काही मला हिंदुत्त्ववादी समजत नाहीत. म्हणजे मी बहुधा हिंदुत्त्ववादी नसावे - निदान मी असल्याचे प्रमाणपत्र तरी माझ्याकडे नाही!" मी हसत होते ते काही सरोजताईंना आवडले नाही.

त्यानी जरा कुतुहलाने माझ्यावर एक नजर टाकली. मग विषय बदलत त्यानी माझ वय, माझ शिक्षण, माझ काम याविषयी चौकशी केली. मग स्वत:चा नाराजीचा स्वर मला कळेल इतका व्यक्त करत त्या म्हणाल्या, " म्हणजे तुला अजून स्वत:ची ओळख पटलेली नाही तर!" मला जरा आश्चर्य वाटल त्यांच वाक्य ऐकून. कदाचित विचारवंत अशी साधी वाक्य बोलतात हे तोवर मी विसरून गेले होते! 'स्वत:ला ओळखण' ही सगळ्यात अवघड बाब आहे हे त्यांच्यासारख्या विचारवंत बाईंना माहिती असेलच अशी माझी अपेक्षा होती.

सरोजताईंनी पुन्हा एकदा विषय बदलला - पण माझी उलट तपासणी काही सोडली नाही. "तुला काय वाचायला आवडत? " त्यांनी विचारला. मग मधेच प्रश्न बदलत म्हणाल्या, "तुझ्यावर कोणत्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे?"

आता जरा बरी चर्चा होईल अस मला वाटल. मी त्याना सांगितलं, " प्रभाव नाही म्हणता येणार अगदी, पण आकर्षण आहे अनेक विचारांच मला. तुम्हाला जुनाट वाटेल जरा, पण मला उपनिषद आवडतात. शंकराचार्य आवडतात, गौतम बुद्ध आवडतो. चार्वाकसुद्धा मला बराचसा जवळचा वाटतो. ..."

मला पुढे बोलू न देताच सरोजताई म्हणाल्या, " मग तू मायावादी आहेस? की शून्यवादी? की सुखवादी? ...आत्म्याचे अमरत्व पण मानतेस आणि पुनर्जन्म पण मानत नाहीस अस कस? ...."

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. माझ्यावर कोणतातरी एक शिक्का मारला की सरोजताईंच काम सोप होणार होत. त्यानुसार त्यांना ठरीव साच्याच्या क्रिया- प्रतिक्रिया करता- देता येणार होत्या!

आपल मन प्रत्येक घटनेला, भावनांना, विचारांना अशा साच्यात बसवायचा प्रयत्न करत. म्हणजे मग अनेक गोष्टींचा आपल्याला दर वेळी नव्याने विचार करावा लागत नाही. कप्पे पाडले असे की, आपल्याला त्यांना नीट सामोर जाता येत. पण असे कप्पे पाडणारे मन मग सवयीने कशाचीच सर्वागीण अनुभूती घेऊ शकत नाही; मनाची ती ताकदच संपून जाते. तुकडे पाडणार मन घेऊन आपण असीम आणि शाश्वत आनंदाची, समाधानाची अपेक्षा करतो यातच मोठा विरोधाभास आहे.

आपल्याला समजलेला माणूस म्हणजेच जणू काही तो माणूस अशी आपली धारणा असते. मग ती व्यक्ती काहीतरी वेगळीच होती कोणे एके काळी, किंवा कोणाबरोबर अस समजल्यावर आपल्याला धक्का बसतो तोही याचं प्रकारच्या पठडीतून. पण माणस म्हणजे सुद्धा एक प्रकारचा kaleidoscope चं असतो .. वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळी दिसणारी .. समजली आहेत अस वाटता वाटता एकदम अपरिचित रंग उधळणारी ...

पण या अनिश्चिततेत पुष्कळ गम्मत आहे .. शिक्के मारायचे आणि वाचायचे अशी आपली सवय आपण सोडली तर !!

कदाचित 'शिक्के न मारण' हा एक प्रकारचा शिक्काच वापरत आलेय मी आजवर!

2 comments:

  1. If we want to remain young in our thots,the key is take every experience as a new one and respond in a new fashion.dnt be a hardwired machine..

    ReplyDelete
  2. सुचित्राजी, आयुष्यातल नवेपण टिकवण हे अगदी आवश्यक आहे अनेक दृष्टींनी हे मान्यच.

    ReplyDelete