ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, May 11, 2011

७२. अदलाबदल

नव्या भागात प्रवास करताना सहसा मला वातानुकूलित गाडीने किंवा डब्यातून प्रवास करायला आवडत नाही. नव्या भागात जाताना खिडकीतून दिसणार जग नवं वाटत. पण अर्थात आजचा प्रवास नेहमीच्या मार्गावर होता. खिडकी हवी तर धूळ, गार हवा, मधून येणारा पाउस हेही सोबत येणार होत! म्हणून मी वातानकूलित तिकीट विनातक्रार स्वीकारलं होत!

पण डब्यात जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मला ‘खिडकी’ मिळाली आहे हे पाहिल्यावर मला लहान मुलासारखा आनंद झाला. आता पुढचे काही तास मला पुस्तक उघडायची गरज भासणार नव्हती तर! या डब्याच्या खिडकीतून नीट दिसत नाही दृश्य हे खर, पण तरीही मी ते पाहत नुसती निवांत बसू शकणार होते! आता तीन आसनांच्या रांगेत माझी जागा शेवटची होती हा अडचणीचा भाग होता. आयुष्यातले जवळपास सगळे आनंद अशा ‘पण’शी जोडलेले असतात. ‘त्यामुळे आपला आनंद कमी होऊ दयायचा नाही’ अशी मी स्वत:ला पुन्हा एकदा आठवण करून दिली.

माझ हे खिडकीच्या सुखाच स्वप्न अल्प काळचं टिकल! मी जागेवर जेमतेम स्थिरावले तोवर १७ -१८ वर्षांचा एक तरुण मुलगा येऊन मला म्हणाला, “मावशी, तुम्ही प्लीज खिडकीची जागा मला द्याल का?”

माझ्याबाबतीत नेहमी अस होत! एक तर खिडकीची जागा, खालचा बर्थ रेल्वे प्रवासात क्वचितच मला मिळतात – आणि जेव्हा केव्हा ते मिळतात तेव्हा कोणीतरी मला विनंती करून ती जागा मागत! आता कोणी ओळख नसणार विनंती करत तेव्हा त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असत. माणस सहसा दुस-याला विनाकारण त्रास देत नाहीत असा माझा आजवरचा अनुभव. म्हणून जास्त काही न विचारता मी हसून शेवटच्या तिस-या – खिडकीपासून दूर असणा-या जागी गेले.

त्या तरुण मुलाच्या मागोमाग त्याचा धाकटा भाऊ किंवा बहीण दिसण्याऐवजी जेव्हा एक सत्तरीचे गृहस्थ दिसले तेव्हा मला आश्चर्य वाटलं! आपल्या आजोबांचा हात काळजीपूर्वक धरून सावकाश चालत त्या मुलाने त्यांना जागेवर बसवले, ते आरामात बसले आहेत अशी खात्री केली, खिडकीचा पडदा सरकवला, आजोबांना थंडी तर वाजत नाही ना हे विचारल. मग माझ्याकडे वळून तो हसत म्हणाला, “दादाजींना खिडकीत बसायला आवडत, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला विनंती केली. मी मनापासून तुमचा आभारी आहे.”

मी त्यावर हसले आणि पुस्तक काढून वाचायला लागले.

पण आजोबा आणि नातवात मस्त संवाद चालू होता – तो माझ्या कानावर पडत होता त्यामुळे वाचनात माझे पूर्ण लक्ष लागेना. मी डोळे मिटले पण झोपही येईना.

“गडबड नको, शांत व्यवास्थित बसायचं आता दोन तीन तास. काही खायचं का? भूक लागलीय का? डब्यात खाऊ आहे आजीने दिलेला. तो नको? वडा पाव खायचाय? सोसायचा नाही तो! बर, आता विक्रेता आला की त्याला विचारू काय आहे त्याच्याजवळ ते! ...” मला तो संवाद ऐकताना मजा वाटली कारण हे सगळ तो नातू आपल्या आजोबाना म्हणत होता.

मग दादाजीना गाण ऐकायची लहर आली. नातवाने मोबाईलवर गाण चालू करताना माझ्याकडे अपराधी नजरेन पाहिलं. तो म्हणाला, “ दादाजीना ऐकायला कमी येत, त्यामुळे गाण्याचा आवाज जरा मोठाच ठेवावा लागणार. तुम्हाला त्याचा त्रास होईल थोडा वेळ, पण गाण नाही लावलं तर ते नाराज होतील ....”

“असू दे, मला काही त्रास नाही. मी पण ऐकेन गाणी ...” मी त्याला हसून म्हटलं.

दोन चार गाणी झाल्यावर आजोबाना फोन लावायची हुक्की आली. आपल्या मुलाला (त्या तरुणाच्या बाबांना) फोन लावला गेला. दादाजी तक्रार करत होते, “हा मला वडा पाव देत नाहीये खायला, तू त्याला सांग.” बाबा तरुण मुलाशी काहीतरी बोलले. “पण ..” त्याने काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. मग तो समंजसपणे हसला. फोन ठेवताना त्याने दादाजींना सांगितलं, “घेऊ ह आता वडा पाववाला आला की!”

थोडया वेळाने नातवाने आजोबाना आग्रहाने चहा पाजला; चहाबरोबर दोन बिस्किटे खायला घातली; एक डुलकी काढण्याचा आदेश दिला, बाथरूमला जायची आठवण करून दिली; तिथवर तो आजोबाना घेऊन गेला. एखाद्या लहान मुला-मुलीसाठी मोठ्यांनी जे जे कराव ते सगळ हा तरुण नातू आपल्या आजोबांसाठी करताना पाहून मला नवल वाटलं. त्या तरुणाची संवेदनशीलता, त्याचा समंजसपणा, जबाबदारीचे त्याचे भान आणि मुख्य म्हणजे आजोबांवारचे त्याचे प्रेम हे पाहताना मला बर वाटत होत! आजोबा पण नातवाचे त्यांच्याकडे इतके लक्ष असण्याने सुखावलेले दिसत होते.

दादाजी थोडा वेळ झोपले ती संधी साधून मी त्या युवकाशी गप्पा मारल्या. तो सांगत होता, “म्हातारपण म्हणजे दुसर लहानपणच असत म्हणा ना! मी जेव्हा लहान होतो, तेव्हा मी आजोबाना फार त्रास द्यायचो. मी त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट ऐकायचो नाही पण ते मला कधी रागावले नाहीत. त्यांना मी फार पळवायचो मागे मागे माझ्या! मला सांभाळायच म्हणजे त्याना केवळ शारीरिक कष्ट नव्हते, भरपूर मानसिक ताणही होता. पण त्यांनी कधी माझ्यावर हात उगारला नाही. त्यांनी एक गोष्ट दिली की मी दुस-याच काशासाठी तरी हटट करायचो. पण दादाजींचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि त्यांनी कधीही माझ्याबद्दल तक्रार केली नाही. त्यानी माझी खूप काळजी घेतली. मला बर वाटत की त्यांची काळजी घेण्याची संधी मला मिळतेय. आमच्या पूर्वीच्या भूमिकांची फक्त आता अदलाबदल झालीय इतकचं – बदललं काहीच नाही त्याव्यतिरिक्त! सगळ तेच अन् तसच तर आहे ....

अदलाबदल .. अगदी नेमके हेच शब्द माझ्या मनात येत होते मघापासून! जेव्हा आपल्याला भूमिका बदलावी लागते तेव्हा भूमिकेतला बदल आपण कसा स्वीकारतो यावर आपल् सुख-दु:ख अवलंबून असत! भूमिकेतली अदलाबदल वाटते तितकी सोपी नसते! कारण अनेकांसाठी याचा अर्थ असतो – सत्ता सोडणे, अधिकार सोडणे, केंद्रस्थान सोडणे वगैरे! काहींसाठी याचा अर्थ असतो – सत्ता स्वीकारणे, त्याची जबाबदारी घेणे, निर्णय घेण्याची संधी असणे, केंद्रस्थानी असणे वगैरे.

आज आपण आपली भूमिका कशा त-हेने निभावून नेतो, यावर आपल्या वाट्याला ‘बदलेली’ भूमिका कोणती येणार हे अवलंबून असत! म्हणून आपल्याला आश्चर्य वाटायचं खर तर कारण नाही – आपल्याला माहितीच हव काय पुढे असणार आहे ते! आजची आपली भूमिका नीट निभावून नेली की त्याची दुसरी बाजूही कालांतराने समोर येतेच. आयुष्याच ‘पूर्ण’ चित्र आपल्याला दाखवायची ही निसर्गाची जणू एक युक्तीच आहे म्हणा ना!
**
प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, १५ मे २०११

7 comments:

  1. साधा अनुभव .. आणि दिलासा देणारा.

    ReplyDelete
  2. आभार अनामिक/का आणि गौरी.

    ReplyDelete
  3. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत किती सुरेख वर्णन केले आहे.. अप्रतिम!

    ReplyDelete
  4. आभार मोनालीजी आणि स्वागत तुमच!

    ReplyDelete
  5. >>>आज आपण आपली भूमिका कशा त-हेने निभावून नेतो, यावर आपल्या वाट्याला ‘बदलेली’ भूमिका कोणती येणार हे अवलंबून असत!

    खर आहे...लेख सुंदर सहज...आवडला ...

    ReplyDelete