ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, September 7, 2025

२७७. विवेकानंदपुरम

(भाग १ : कन्याकुमारीच्या दिशेने) 

(Want to read this post in English? It is here!) 

कन्याकुमारी रेल्वे स्थानकं खरं तर एक टुमदार आणि देखणं स्थानक आहे.

पण यावेळी का कुणास ठाऊक त्याचं पहिलं दर्शन फारच उदासवाणं होतं. सगळीकडं फक्त धूळ होती, . बाहेर पडताना लक्षात आलं की स्थानकाचं दुरूस्तीचं काम चालू होतं. छोट्या छोट्या गोष्टींत आपल्याला किती अपेक्षा असतात आणि आपले अपेक्षाभंग देखील किती इवल्याशा गोष्टींमध्ये असतात हे जाणवून हसूही आलं. यावेळी काही मी कन्याकुमारी रेल्वे स्थानकाचा फोटो काढला नाही. एक दिवस चालत गांधी मंडपापर्यंत आले होते, तेव्हा तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने मी नजरसुद्धा टाकली नाही.

हा २०११ साली काढलेला फोटो. घरी आल्यावर शोधला.

कन्याकुमारी रेल्वे स्थानक
स्थानकाबाहेर रिक्षा रांगेत उभ्याच होत्या. तसं तर स्थानक ते विवेकानंदपुरम हे अंतर केवळ दीड किलोमीटर आहे. सामान नसेल तर रमतगमत चालत जाता येईल इतकंच. पण सामान असल्यावर रिक्षाला पर्याय नाही. रिक्षावाल्याने शंभर रूपये सांगितले. हा बहुधा ठरलेला दर असणार. चार-पाच लोक मिळून जात असतील एरवी. मी फार काही विचार न करता रिक्षात बसले आणि विवेकानंदपुरममध्ये पोचले.
विवेकानंदपुरममध्ये प्रवेश करताना

विवेकानंदपुरम

विवेकानंदपुरम हा सुमारे शंभर एकरांचा परिसर आहे. हे ‘विवेकानंद शिला स्मारक’ आणि ‘विवेकानंद केंद्र’ यांचं मुख्यालय आहे. इथं त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केंद्र आणि निवास व्यवस्था आहे. सुमारे एक हजार पर्यटक एका वेळी इथं राहू शकतात अशी सोय आहे. नाश्ता-जेवणासाठी एक उपाहारगृह आहे. दिवसातून काही ठराविक वेळा कन्याकुमारी गावात जाण्या-येण्यासाठी मोफत बससेवा आहे. ग्रंथालय आहे, विवेकानंद चित्र प्रदर्शनी आहे, गणपतीचं देऊळ आहे, स्वातंत्र्ययोद्ध्यांचं स्मारक आहे, रामायण प्रदर्शन आहे, पर्यावरणविषयक कामाची माहिती देणारं केंद्र आहे, विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आहे, त्यांच्या जीवनाची माहिती देणारं प्रदर्शन आहे, ध्यानमंदिर आहे, भरपूर झाडं आहेत, मोरांचं अभयारण्य असल्याने मोरही खूप दिसतात, केंद्राचा समुद्रकिनारा (बीच) आहे - जिथून सूर्योदय दिसतो. अशा बऱ्याच गोष्टी परिसरात आहेत. एक कॉन्फरन्स हॉलही दिसला. आणि अर्थातच विवेकानंद केंद्राची शाळाही आहे.

दुपारी चारच्या सुमारास ‘विवेकानंद चित्र प्रदर्शनी’मध्ये गेले. हे या परिसरातलं माझं एक आवडतं ठिकाण. १९८३ मध्ये मी पहिल्यांदा कन्याकुमारीला गेले तेव्हा हे ठिकाण टुमदार, स्वच्छ, आणि मला नवा दृष्टिकोन देणारं होतं. आजही ते तसंच आहे. काही गोष्टी अपरिवर्तनीय असतात, त्यातली जणू ही एक. त्यावेळच्या विवेकानंद केंद्राच्या नेतृत्वाची दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यांनी त्याची घेतलेली काळजी हे दोन्ही यातून दिसून येतं. प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारात स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती चित्र आहे, जे लक्षवेधक आहे.

दहा रूपये प्रवेशशुल्क देऊन आत गेले. माझ्या आठवणीप्रनुसार यात मूळ सत्तरच्या आसपास फलक (पोस्टर्स) होते. आता त्यात विवेकानंद केंद्राच्या कामाचा तपशील पुरवणाऱ्या फलकांची भर पडली आहे. अत्यंत उत्तम चित्रं आहेत ही. हे चित्रकार कोण आहेत यासंबंधी आंतरजालावार माहिती मिळाली नाही. पुण्यात परत आल्यावर विवेकानंद्र केंद्रातल्या एका वरिष्ठ कार्यकर्तीला विचारलं, तेव्हा समजलं की कोलकाताचे रघुनाथ गोस्वामी यांनी ही चित्रं काढली आहेत. या प्रदर्शनातलं नचिकेताचं चित्र माझ्या अतिशय आवडीचं आहे. (नचिकेताची कथाही अर्थातच आवडीची.) 

इंग्रजी, तामिळ, आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रत्येक चित्राखाली स्पष्टीकरण आहे. भारताचा इतिहास आणि संस्कृती, नरेंद्रनाथ दत्त या युवकाचा स्वामी विवेकानंद बनण्याचा प्रवास, त्यांची शिकवण, त्याचा भारतावर आणि जगावर झालेला परिणाम ... अशा दोन तीन भागांत या प्रदर्शनाची विभागणी करता येईल. निवांत वेळ काढून या ठिकाणी जावं असं मी सुचवेन.

पर्यटकांच्या अर्ध्या किंवा एक दिवसाच्या सहलीचा विवेकानंदपुरम आता एक मोठा भाग आहे. अशा कुठल्याही सहलीत असतो तसा प्रत्येक ठिकाणासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. या अर्ध्या तासात लोक किती आणि काय वाचत असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. १९८० च्या दशकात त्या वेळच्या युवकांना बांधून ठेवणारी, प्रभावी वाटणारी भाषा आता बदलली आहे. इन्स्टा आणि ट्विटरच्या पिढीला ही पोस्टर्स शब्दबंबाळ वाटू शकतात. असो.

पुन्हा अपेक्षाभंग

तिथून विवेकानंदपुरममधल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. समुद्रात - पाण्यात - थेट उतरता येत नाही कारण संरक्षक भिंत बांधलेली आहे. सकाळी सूर्योदय पाहायला मोठ्या संख्येने लोक येतात, तेव्हा एक तास त्या भिंतीतला छोटा दरवाजा उघडतात. तिथं सुरक्षारक्षक सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असतो. या किनाऱ्यावरून समोरच्या विवेकानंद शिला स्मारकाचं छान दर्शन होतं.

पण आज आणखी एक अपेक्षाभंग झाला. समुद्रात ठिकठिकाणी भराव घालण्याचं काम चालू आहे. आणि एक भराव नेमका ‘शिला स्मारक’ आणि समुद्रकिनारा यांच्या मध्ये येतोय. आता किनाऱ्यावरून शिला स्मारक नीट दिसत नाहीय.

हा फोटो सकाळी काढला आहे. 

आणि हा संध्याकाळी.

वैतागवाणी भेट

समुद्रकिनाऱ्यावर मी वगळता सुरक्षारक्षक आणि आणखी एक तरूण माणूस होता. मी निवांत उभी होते, तेवढ्यात मला एक फोन आला. बोलणं झालं, मी फोन ठेवला आणि लगेच “आप महाराष्ट्रसे हो क्या दीदी” असं म्हणत तो तरूण मुलगा माझ्याशी बोलायला आला. मीही त्याची चौकशी केली. मेवाड(राजस्थान)मधला हा तरूण मुलगा चालत चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहे. गेले एक महिना तो  विवेकानंदपुरममध्ये राहतो आहे. मी त्याच्याशी जुजबी बोलून पुन्हा समुद्र पहायला वळणार इतक्यात त्याने “महाराष्ट्रात अमराठी लोकांवर हल्ले का होताहेत”, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना का आक्रमक झाली आहे” वगैरे चर्चा सुरू केली. मी त्याला शांतपणे “हल्ले वगैरे काही झाले नाहीयेत”, “पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती”, “काही अमराठी लोकांचा उद्दाम अविर्भाव” असं समजावून सांगत होते. पण लगेच माझ्या लक्षात आलं की याला ऐकायचं काही नाहीये, फक्त बोलायचं आहे. धर्म, संस्कृती, परंपरा .... या मार्गावर त्याची गाडी अपेक्षेप्रमाणे जात राहिली.

पुढं त्याने ‘उद्धव ठाकरे भाजपची सोबत सोडून काँग्रेससोबत गेले ही कशी चूक आहे’ वगैरे सुरू केलं.  मी त्यावरही काही न बोलता त्याचं ऐकून घेत होते. मी काही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची प्रवक्ती नाहीये 😀धर्म आणि पक्षीय राजकारण एकत्र करणारे लोक भेटणं यात आता काही नवल राहिलेलं नाही. असले लोक प्रचंड प्रेडिक्टेबल आणि म्हणून कंटाळवाणे असतात. मी त्या संवादातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्थातच अयशस्वी झाला.

हळूहळू त्याची गाडी केरळ-तामिळनाडूवर टीका करण्याकडं वळली. इथले लोक कसे हिंदी बोलत नाहीत, इकडे कसा सारखा भात आणि इडलीच खावी लागते वगैरे. पुढं मात्र तो जे काही बोलला, त्यावर मी त्याला जवळजवळ फैलावरच घेतलं. “दीदी, आप कैसे सभ्य कपडे पहने हुए हो, लेकिन मै यहाकी मंदिरोंमे कई लडकियोंको देखता हूँ तो उनके आधे-अधुरे कपडे देखकर मुझे अजीब लगता है”.  त्याचं हे वाक्य मला संताप आणणारं होतं. मी त्याला म्हणलं, “भावा, मुलींना कोणते कपडे घालायचेत ते घालू दे, तू कोण त्यांना सांगणारा? त्या काय तुझ्याकडं कपड्यासांठी पैसे मागतात काय? आणि काय रे, तू देवळात जातोस तेव्हा मुलींकडं कशाला बघतोस?  देवाचा विचार कर ना. देवळात जायचं निमित्त करून मुलींकडं बघायला जातोस की काय तू? असली दांभिकता काही बरी नाही. सुधरा जरा.” 

तो थोडा वरमला. मग त्याने गाडी दुसऱ्या मार्गावर नेली. एकदम ‘परदेशस्थ भारतीयांवर’ (एनआरआय). ते कसे आईबापांना इकडं सोडून परदेशात चैन करत असतात, इकडं त्यांच्या आई-वडिलांची काळजी घ्यायला कुणी नसतं वगैरे. त्यावरही मी त्याला फटकारलं. म्हणलं, “त्यांना नावं ठेवतोस खरी, पण तू तरी काय करतो आहेस? आई-वडिलांना घरी सोडून तूही महिनोनमहिने धाम आणि ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहेस ना? मग तुझ्यात आणि त्या एनआरआयमध्ये काय फरक आहे?” मग तो आणखी वरमला. “नाही दीदी, मी यात्रा संपल्यावर घरीच जाणारेय. मी आयुष्यभर माझ्या आई-वडिलांची सेवा करणार आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी आजन्म अविवाहित राहीन.” मला खुदकन हसायलाच आलं.  

सगळं जग सोडून (ही आपली म्हणायची पद्धत, काही सोडून वगैरे नव्हते गेले मी!)  कन्याकुमारीला गेले, तिथं समुद्रकिनाऱ्यावर हा एकच पर्यटक होता, तो नेमका मलाच भेटावा .... या योगायोगाचंही मला हसू आलं. जगं तेच असतं. माणसं तशीच असतात - चांगली, वाईट, निरागस, स्वार्थी, दुष्ट, मतलबी, सरळ, सज्जन ...... त्यातली कुणी अध्यात्माची फुलबाजी (ग्लोरिफाईड) भाषा बोलतात, तर आणखी कुणाला तसली भाषा बोलायला जमत नाही इतकाच फरक असतो का माणसां-माणसांत?

तेवढ्यात अचानक पाऊस आला. मी सोबत छत्री नेली नव्हती. तो पळत पळत निघून गेला. मागे उरलो मी, पाऊस, समुद्र, आणि तो सुरक्षारक्षक. त्याच्याशी दोन वाक्यं बोलले आणि मग छान भिजत सावकाश चालत परत आले.

काही जुनं, काही नवं

पुढच्या दोन तीन दिवसांत विवेकानंदपुरममधल्या जमेल तितक्या ठिकाणांना भेटी दिल्या. एके ठिकाणी तिथं बसलेले गृहस्थ रेडिओ ऐकत होते. मी एकटीच पर्यटक होते. मी आत जाऊन सगळं बघून आले, तिथून निघाले. त्या अर्ध्या-पाऊण तासात ते गृहस्थ माझ्याशी अवाक्षरही बोलले नाहीत. किंबहुना मी तिथं आले आहे याची त्यांनी दखलही घेतली नाही याची मला फारच गंमत वाटली. पॅशनचं तुम्हाला प्रशिक्षण देता येत नाही, ती आतूनच यावी लागते हे पुन्हा एकदा जाणवलं.

“रामायण” प्रदर्शनाची इमारत छान आहे.

आतमध्ये भास्कर दास (चेन्नै) यांनी काढलेली चित्रं आहेत. १०८ चित्रं आहेत. कलाकाराबद्दल आदर व्यक्त करूनही मी म्हणेन की मला ती चित्रं एकसुरी वाटली. रामायणाची कथा माहिती आहे त्यामुळे सगळं काही वाचत बसले नाही मी. थोडी कमी चित्रं चालली असती, पण १०८ संख्येचं महत्त्व असावं कदाचित. वरच्या दालनात भारतमाता आणि मा अमृतानंदमयी यांच्या प्रतिमेसह इतर काही प्रतिमा आणि मूर्ती आहेत. शेजारीच “सस्टेनेबल लिविंग” या विषयावरचं डिजिटल प्रदर्शन आहे. ते मला काहीच कळलं नाही. दोन दिवसांनी केंद्रातल्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने ते मला सविस्तर दाखवलं. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे सौरऊर्जेचा वापर. हे चांगलं आहे. तसंच पावसाचं पाणी इमारतीच्या तळघरात साठवण्याची सोय आहे (Rain Water Harvesting). एका अर्थी हा नव्या-जुन्यांचा (धर्म आणि विज्ञान) संगमच म्हणायला हवा. तिथं अर्थातच सौरऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहायला कुणी येत नाही म्हणा.

काही जुने लोक भेटले. गप्पा झाल्या. जुनी नावं. जुन्या आठवणी. वगैरे.

एका सकाळी समुद्रकिनाऱ्यावर गेले. सूर्योदय पाहायला प्रचंड गर्दी होती.

सूर्य उगवला की लोक निघून जातात. बहुधा त्यांचे पुढचे प्रवास ठरलेले असतात. सुरक्षारक्षकही तासाभराची वेळ संपल्यानंतर निघून गेला. मी निवांत बसून राहिले. समुद्राची गाज, सौम्य झुळुक, समोर दिसणारं शिला स्मारक. मग एक नीलपंख (किंवा नीलकंठ)  उडत आला. गिरक्या घेणं आणि फांदीवर किंवा जमिनीवर बसणं - असा त्याचा कार्यक्रम चालू होता. ज्यांनी नीलपंख उडताना पाहिला असेल, त्यांना माझ्या भाग्याचा हेवा वाटेल याची मला खात्री आहे. दोन मोरही आले. इथं अर्थात मोरांचं अभयारण्य आहे, त्यामुळे ते मोठ्या संख्येने दिसतात.

कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आणि त्यासमोर विवेकानंदांचा आणखी एक पुतळा असंही एक स्मारक बीचजवळ आहे. तिथं फारसं कुणी येत नाही. दोन दिवस सकाळी काही काळ तिथंही निवांत बसून राहिले.

पुढं जाताना

इथं लोक एक तर पर्यटक म्हणून येतात किंवा या ना त्या संदर्भात विवेकानंद केंद्राशी नातं असणारे लोक येतात. मी यापैकी काहीच नव्हते. मी फक्त एके काळच्या माझ्या आयुष्यातल्या खुणांपैकी काय काय शिल्लक आहे ते तपासून पाहणारी एक प्रवासी होते. या खुणा फक्त बाहेरच्या परिसरात नव्हत्या, त्या माझ्या मनातही होत्या. आतल्या आणि बाहेरच्याही अनेक खुणा लोप पावल्या आहेत हे कळताना दु:ख झालं नाही. आपण पुढची वाट चालतो, तेव्हा मागचं नामशेष होणार हे अपेक्षितच असतं.  त्यातूनही जे काही अजून शिल्लक आहे ते सुखावणारं होतं - हेदेखील कालांतराने कधीतरी संपेलच या जाणीवेतही 😊

मी (फार पूर्वी) कन्याकुमारीत असताना ‘विवेकानंद केंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारात आहे की नाही’ अशा चर्चा व्हायच्या. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांचं निधन होऊन तेव्हा जेमतेम दीड वर्ष झालं होतं, त्यामुळे या चर्चा स्वाभाविक होत्या. अगदी “हे आरएसएस आरएसएस तुम्ही जे म्हणताय, ते काय आहे” असं विचारणारे निरागस कार्यकर्तेदेखील आमच्यात होते. (विवेकानंद केंद्रातला माझा एक सहकारी मित्र  परवाच या वाक्याची आठवण काढत होता आणि आम्ही दोघेही आमच्या बावळटपणावर खूप हसलो होतो). “जाणीव” संघटनेची स्थापना आणि काम या प्रक्रियेत असताना आम्ही मित्रांनी समाजातल्या विविध विचारसरणींचा प्राथमिक अभ्यास केला होता, त्यामुळे आरएसएसच्या विचारप्रणालीची मला तोंडओळख होती - इतकंच. पण आज आता हा प्रश्न (विवेकानंद केंद्र आणि संघ) विचारण्याचं कुणालाही कारण पडणार नाही. विवेकानंद केंद्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातली संस्था आहे याच्या खुणा जागोजागी दिसतात. ठळकपणे दिसतात.

मी कन्याकुमारीत येण्याइतकंच मी कन्याकुमारीतून परत जाणंही माझ्या आयुष्यात महत्त्वाचं होतं, आहे, राहील. मुक्कामाइतकाच - किंबहुना काहीसा जास्तच - महत्त्वाचा असतो तो प्रवास. तो चालूच आहे. आजही.


(पुढील भाग लवकरच ....)

 

Monday, September 1, 2025

२७६. कन्याकुमारीच्या दिशेने...

(Want to read this post in English? It is available here!) 

खरं तर कन्याकुमारीला जायचा माझा काही बेत नव्हता.

पण वीसेक महिने काम केलेला एक प्रकल्प नुकताच संपला होता. ऑनलाईन काम करण्याचे फायदे खूप जास्त असले तरी सतत संगणकाच्या स्क्रीनवरून लोकांशी बोलण्याचा कंटाळा आला होता. बाहेर कुठंतरी लांबवर भटकायला जाण्याचा मूड होता. तसं तर मला जायचं होतं “स्पिती व्हॅली”त. पण ज्या गटाबरोबर मी जाणार होते, त्यांचा तो कार्यक्रम रद्द झाला. मग म्हटलं “चला, कन्याकुमारीला जाऊयात.” 

कन्याकुमारीला जाणं हे वेळ घेणारं प्रकरण आहे. आता सुदैवाने बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यातून बसने अथवा ट्रेनने मुंबईपर्यंत जायचं, तिथून तिरूवनन्तपुरमपर्यंतचं विमान पकडायचं, तिथून बसने अथवा ट्रेनने किंवा टॅक्सीने कन्याकुमारीला जायचं हा एक पर्याय. दुसरा असाच रस्ता पुणे-चेन्नै-कन्याकुमारी असा आहे. या दोन्ही मार्गांवरून प्रवास केला तर काही तासांचा वेळ वाचतो हे खरं आहे, पण दगदग फार होते. शिवाय वेळ वाचवून मला फारसं काही करायचं नव्हतं. म्हणून मग मी पुणे-कन्याकुमारी असा ट्रेनचा प्रवास निवडला.

काही दशकांपूर्वी जेव्हा मी पुण्याहून कन्याकुमारीला (पहिल्यांदा) गेले होते, तेव्हा १०८१ डाऊन ट्रेनने गेले होते. जनरल डब्यातून. लांब पल्ल्याचा असा माझा तो पहिलाच प्रवास होता. मुंबईहून तेव्हा रात्री साडेआठच्या सुमारास ही गाडी पुणे स्थानकात यायची. तेव्हा ती मुंबई-त्रिवेंद्रम गाडी होती. त्या दोन दिवसांच्या प्रवासातल्या अनेक रोचक आठवणी आहेत. ट्रेनमध्ये काही विक्रेते “पाल, पाल” असं ओरडत होते ते ऐकून मी दचकले होते ते आठवतं. “पाल” म्हणजे “दूध” हे कळल्यावर हुश्श झालं होतं. दोनेक वर्षांची रोझी नामक माझी एक सहप्रवासी होती. तिच्याशी खेळताना मजा आली होती. तिच्या आई-वडिलांनी प्रवासात मला खूप मदत केली होती. तेव्हा त्रिवेंद्रमला उतरून कन्याकुमारीचं तिकिट काढायचं होतं- तर सगळेजण मला “केप”चं तिकिट काढायला सांगत होते. “केप” म्हणजेच कन्याकुमारी हे सामान्यज्ञानही त्यानिमित्ताने झालं होतं. ... अशा अनेक रम्य आठवणी सोबत असल्याने मला पुणे-कन्याकुमारी ट्रेन सोयीची वाटली तर नवल नव्हतं.

आता ही गाडी १६३८१ पुणे- कन्याकुमारी अशी आहे. मुंबईऐवजी गाडी पुण्यातून सुटते आणि साधारणपणे छत्तीस तासांनी कन्याकुमारीला पोचते. आता त्रिवेंद्रमला गाडी बदलावी लागत नाही. या गाडीची मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि केरळ अशा पाच राज्यांतून ही जाते. सोलापूर (महाराष्ट्र), वाडी आणि रायचुर (कर्नाटका), गुंटकल, कडप्पा, तिरूपती (आंध्र प्रदेश), सेलम, कोइंबतुर (तामिळनाडू) अशी महत्त्वाची स्थानकं ही गाडी घेते. केरळमध्ये बराच प्रवास करून नागरकोविलला पुन्हा तामिळनाडूत गाडी प्रवेश करते आणि कन्याकुमारीला पोचते. या प्रवासात ही गाडी भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पलार, वसिष्ठ, कोल्लार अशा अनेक नद्या ओलांडते.



तिकिट काढण्यापूर्वी राहायची व्यवस्था करणं आवश्यक होतं. कन्याकुमारीत जायचं तर विवेकानंदपुरममध्येच राहायला हवं. कन्याकुमारीत जाऊन दुसरीकडं कुठंतरी राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. मग विवेकानंदपुरमच्या वेबसाईटवर जाऊन रीतसर माहिती वगैरे भरली. मग असं लक्षात आलं की हल्ली ते एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत.

आता जग “सोलो ट्रॅव्हल”च्या युगात आहे, आणि हे लोक एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत. The contrast remains strong as ever …. असं वाटलंच. तरीही मी परिसर व्यवस्थापकांना इमेल पाठवली. ओळखी वगैरै सांगायचा (त्यातही मोठ्या लोकांच्या ओळखी सांगायचा) मला प्रचंड कंटाळा येतो. पण मग मी त्या व्यवस्थापकांना  शेवटी  ‘त्यांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांशी - पदाधिकाऱ्यांशी - माझी ओळख असल्याचं’ सांगितलं. त्यांनी त्याची खातरजमा केली आणि मग राहण्याची व्यवस्था मार्गी लागली.

कन्याकुमारीला अनेक वेळा गेले असले तरी तिथल्या परिसरात कधी फारशी भटकंती करण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी त्यासाठी काही वेळ काढायचं ठरवलं. येताना तिरूअनन्तपुरमलाही दोन दिवस जावं असं ठरवलं. त्यानुसार राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.

२३ जुलैला रात्री पुणे स्थानकावर पोचले. तिथं टॅक्सीचालकाला पैसे देण्यासाठी माझं मोबाईल इंटरनेट चालेना (बीएसएनएल, दुसरं काय?) तेव्हा टॅक्सीचालकाने त्याच्या मोबाईल इंटरनेटचा हॉटस्पॉट मला दिला आणि मी पैसे दिले. त्याच्या व्यावसायिकतेचं कौतुक वाटलं.

मेट्रो स्थानक आणि रेल्वे स्थानक यांना जोडणाऱ्या पुलावर काही वेळ निवांत बसून राहिले. गाडीची घोषणा झाल्यावर फलाटावर गेले. गाडी वेळेत लागली.


माझ्या बर्थच्या वरच्या बर्थवर एक गृहस्थ अगदी निगुतीने त्यांच्या झोपण्याची व्यवस्था लावत होते. गाडी सुटायच्या आत ते झोपीही गेले. गाडी सुटल्यावर अर्ध्या तासाने तिकिट तपासनीस आला तेव्हा हे गृहस्थ गाढ झोपेत होते. तिकिट तपासनीसाने त्यांना बऱ्याच हाका मारल्या, हलवलं, तरी ते काही झोपेतून जागे झाले नाहीत.

गाडी सुटायच्या पाच मिनिटं आधी एक बाई माझ्या समोरच्या बर्थवर आल्या. त्यांच्याशी जुजुबी बोलणं झालं. त्या इरोडला उतरणार होत्या. तिकीट तपासनीसाने आमचं कोणाचंच तिकिट पाहिलं नाही, फक्त नाव विचारलं, त्याच्याजवळच्या कागदावर खूण केली, आणि गेला.

अशा रीतीने प्रवासाला सुरूवात झाली.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मला जाग आली. प्रवासात असले, काही नवं करायचं असलं की मला गजराची गरज भासत नाही. खिडकीतून बाहेर मस्त पहात बसले.

(वाडी जंक्शन, कर्नाटका)

                                                                                   (कृष्णा नदी की तुंगभद्रा नदी ?) 

थोड्या वेळाने समोरच्या अम्माही उठल्या. आणि मग सकाळी सहापासून त्यांचे जे व्हिडिओ कॉल्स सुरू झाले ते काही संपता संपेनात. त्याच्यातून थोडी उसंत मिळाली की त्या युट्युबवर काहीबाही ऐकत होत्या. त्यांचा फोन, त्यांचं इंटरनेट, त्यांनी काय ऐकावं यावर मी का मत व्यक्त करतेय असं तुम्हाला वाटत असेल. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल मला काहीच म्हणायचं नाही. पण माझी अडचण अशी होती की त्या इअरफोन-हेडफोन वापरत नव्हत्या. त्यामुळे ते सगळं माझ्या कानांवर सतत आदळत होतं. “बॅग भरताना गडबडीत इअरफोन घरी विसरला वाटतं तुमचा” - असं माझं गंमतीत म्हणून झालं. पण त्याचा अर्थ त्यांना बहुधा कळला नाही. त्यांचं मनोरंजन चालूच होतं. अखेर तासाभराने मी त्यांना “जरा आवाज कमी करता का तुमच्या मोबाईलचा” असं म्हटलं. काही वेळापुरता आवाज थांबला. परत तो चालू झाला. परत मी त्यांना टोकलं. हे चक्र दिवसभर चालू राहिलं. एकंदर सार्वजनिक जागेत वावरताना मोबाईलवर मोठ्या आवाजात काही ऐकू नये हे पथ्य फारच कमी लोक पाळतात हा अनुभव नेहमीचाच. त्यामुळे मी त्याचा त्रास करून घेतला नाही.

मला त्यांना असं पुन्हापुन्हा टोकताना वाईटही वाटत होतं. कारण त्या बाई तशा अगदी साध्या होत्या. गेली चार वर्ष पुण्यात राहताहेत. मराठी, हिंदी येत नाही. इंग्रजी कामापुरतं बोलू शकत होत्या त्या. त्यांच्या माहेरी भाच्याचं जावळं वगैरे काहीतरी होतं, त्यासाठी इरोडला चालल्या होत्या. प्रेमळ होत्या बाई.

मोडक्यातोडक्या आमच्या संवादाला आणखी चांगली भाषांतरकार मिळाली ती सकाळी आठच्या सुमारास. इंग्रजी आणि तामिळ दोन्ही उत्तम बोलणारी आणखी एक स्त्री प्रवासी रायचुरला आमच्यासोबत आल्या. त्या एका खत कंपनीत शेती अधिकारी होत्या. त्यामुळे ग्रामीण भारताविषयीचे - शेतकऱ्यांविषयीचे - त्यांचे अनुभव ऐकण्याजोगे होते. महाराष्ट्रातल्या विदर्भाचीही जबाबदारी त्यांना नुकतीच मिळाली होती. त्या त्यांच्या स्थानकावर बसताना तिथून इडली घेऊन आल्या होत्या. ती इडली खाण्याचा त्यांनी मला आग्रह केला. मग मी त्या दोघींना आणि तोवर वरच्या बर्थवरून उतरून खाली आलेल्या गृहस्थांना (हे त्रिवेंद्रमचे होते, पुण्यात काही कामासाठी आले होते) माझ्यासोबत कॉफी पिण्याचा आग्रह केला. मग पुढं आपापल्या स्थानकावर ते सगळे उतरून जाईपर्यंत एकत्र खाणं आणि कॉफी घेणं चालू राहिलं.

“गैरसोय झाली तरी चालेल, पण भाषिक अस्मिता आम्ही बाळगूच बाळगू” - या संकल्पनेत लोक कसे अडकलेले असतात त्याचा मग दिवसभर अनुभव आला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नाही, आणि या तिघांना हिंदी अजिबात येत नाही - अशी स्थिती. त्यामुळे मला त्यांना मदत करावी लागली. सुरूवातीला मी उत्साहात होते, पण नंतर मात्र मला कंटाळा आला. दोन्ही पार्ट्या अडेलतट्टू आहेत असं माझ्या लक्षात आलं. “टी” म्हणजे “चाय” आणि “दस” म्हणजे “टेन”  इतकंही लोकांना कळत नसेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. मी नंतर निवांत वाचत बसले. तसंही हे पुस्तक लिहून झाल्यावर मी वाचलं नव्हतंच.


थोडं पल्याड फक्त हिंदी बोलणारं कुटुंब होतं. त्यांचं दीड-दोन वर्षांचं बाळ होतं. हिंदी बोलता न येणारे हे तिघं आणि इंग्रजी बोलता न येणारे ते दोघं यांच्यात काहीही संवाद झाला नाही. मला दोन्ही भाषा बोलता येतात त्यामुळे माझं काही अडलं नाही. मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे. पण समोरच्या व्यक्तीशी बोलता नाही आलं तरी चालेल, पण मी त्यांची भाषा बोलणारच नाही अशा प्रकारचा (एकांगी)  अभिनिवेश आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो त्याची ही एक झलक लक्षात राहण्याजोगी आहे.

मी त्या संवादात पाचसहा तामिळ शब्द शिकून घेतले. वणक्कम (नमस्कार), नंद्री (आभार-धन्यवाद), तंबी (धाकटा भाऊ), सापाड (खाणं, जेवण), तन्नी (पाणी), चिन्न (छोटं), सरी (ओके), इप्पडी (कसं), नल्ला (सुंदर)  ....... त्या दोघी आपापसात तामिळमध्ये बोलत होत्या तेव्हा असे बरेच शब्द संदर्भाने कळले आणि मी ते त्यांना परत विचारून खात्री करून घेतली. इच्छा असेल तर संवादासाठी कोणतीही भाषा शिकता येते. व्याकरण नाही शिकता येत लगेच, पण मोडकातोडका संवाद नक्कीच साधता येतो.

या प्रवासात आणखी एक प्रयोग केला. रेलरेस्ट्रोमधून जेवण मागवण्याचा. अनुभव चांगला होता. 


वेगवेगळ्या राज्यांतून गाडी जात असताना समोरचं दृष्य बदलत होतं. भारताचं भौगोलिक वैविध्य(ही) अचंबित करणारं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं.

(शक्तिनगर, कर्नाटका) 

(कडप्पा स्थानकाजवळ, आंध्र प्रदेश) 

(नागरकोविलजवळ, तामिळनाडू)

या सगळ्या बाह्य घडामोडींमध्ये मी कन्याकुमारीला जाण्याबद्दल विचार करत होते. मी का चालले आहे तिथं परत? एकदा सोडलेल्या जागांवर परत जायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही हे पथ्य बऱ्यापैकी पाळलं आहे आजवर. एका अर्थी परत भूतकाळाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करत होते का मी?  पण कितीतरी बदल झालेत. मीच किती बदलले आहे. परिस्थितीही बदलली आहे. अगदी या गाडीचा जुना नंबरही बदलला आहे. माझा दृष्टिकोन बदलला आहे. संदर्भ बदलला आहे. कदाचित जुन्या “मी”च्या संदर्भात आज मी कुठं आहे हे मला तपासून पाहायचं आहे का? (त्यासाठी खरं तर हजारो मैल प्रवास करायची काही गरज नसते - हेही मला माहिती आहेच की!)

खूप वर्षांपूर्वी कन्याकुमारीत  मी पहिल्यांदा आले होते, ती माझ्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. त्या घटनेचे तात्कालिक आणि दूरगामी असे अनेक चांगले-वाईट परिणाम झाले. तो प्रवास एका अर्थी आता पूर्ण झालाय. कदाचित तो साजरा करण्यासाठी कन्याकुमारी हे मला एक योग्य ठिकाण वाटलं असेल.

कळेलच काय ते पुढच्या काही दिवसांत - असं म्हणून जास्त विचार न करता मी निवांत बसून राहिले.

त्रिवेद्रमनंतर डबा जवळजवळ रिकामा झाला होता.

गाडी कन्याकुमारीला पोचली.

(कन्याकुमारी रेल्वे स्थानक) 

हे भारतातलं दक्षिणेतलं शेवटचं रेल्वे स्थानक. 

इथं माझ्या एका प्रवासाची सुरूवात झाली होती - हे माझ्यापुरतं महत्त्वाचं. 


(पुढील भाग लवकरच....) 

Tuesday, June 3, 2025

२७५. अनपेक्षित आनंद

(For English readers, this post is here too!) 

त्या दिवशी मला एक जाणवलं की गेली कित्येक वर्ष 'आनंदाचे क्षण'  ही माझ्यासाठी एक पूर्वनियोजित बाब झाली आहे. कामधंदा करत असताना सुट्टी खूप आधी ठरवून घ्यावी लागते. आपण सुट्टीवर जाऊ तेव्हा आलेलं काम कोण करेल हे बरंच आधी ठरवावं लागतं. मग जाण्या-येण्याची तिकिटं, राहायची व्यवस्था, बॅग भरणं, घरातली आवराआवरी... सगळं व्यवस्थित करावं लागतं. अचानक गायबं होऊन जाणं ही शक्यता आता माझ्यासाठी उरलेली नाही. (एके काळी ते मला सहज जमत असे!) गेल्या अनेक वर्षांत हीच माझी जीवनशैली झाली आहे. अर्थात,  अशा पूर्वनियोजित गोष्टींमध्येही काही अनपेक्षित आनंदाचे क्षण मिळत असतात.

त्या संध्याकाळी परिसरातल्या एका संस्थेत एक हिंदी नाटक होतं. फेसबुकवर मी त्याची पोस्ट वाचली. नाटकाचं नाव होतं ‘कोर्ट मार्शल’. मी इंटरनेटवर त्याची माहिती शोधली आणि मला ते नाटक रंजक वाटलं. Indian Express मध्ये या नाटकाविषयी लिहिलं आहे – “कोर्ट मार्शल हे नाटक एका अतिशय आज्ञाधारक सैनिकाबद्दल आहे, जो एका गुन्ह्यात अडकलेला असतो. त्याचं वागणं संपूर्ण रेजिमेंटला हादरवून टाकतं आणि त्याच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी सैन्य कोर्ट मार्शलची कारवाई करते.”

योगायोगाने, त्याच दिवशी सकाळी यामिनीचा फोन आला. तीही त्या परिसरात दुसऱ्या कार्यक्रमासाठी येणार होती. आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता भेटायचं ठरवलं.

मी नाटकाच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा तिथं बरीच गर्दी होती. मी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना नाटक नेमकं कुठं होणार आहे हे विचारलं. कारण तिथे दोन-तीन सभागृहं आहेत, त्यामुळे आधीच विचारलेलं बरं असतं. ते दोन कर्मचारी त्यांच्या मोबाईलमध्ये एका व्हिडिओ पहात होते. माझ्याकडं न पाहताच त्यांनी मला तळमजल्यावरच्या सभागृहाकडं जायची खूण केली. मी त्या सभागृहात जाऊन तिसऱ्या रांगेत बसले. काही तरुण मुली पारंपरिक नृत्याच्या पोशाखात दिसल्या. मी थोडी गोंधळले. पण वाटलं, नाटक सुरू होण्यापूर्वी कदाचित काही छोट्या मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम असावा.

माझ्या मागे बसलेल्या एका वयस्क बाईंनी मला विचारलं, “तुमच्या मुलीचा किंवा नातीचा पण नाच आहे का? कोणता आहे?तेव्हा लक्षात आलं की मी चुकीच्या सभागृहात बसले आहे!

मी पुन्हा बाहेर आले आणि त्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नाटकाबद्दल विचारलं. यावेळी त्यांचा व्हिडिओ पाहून झालेला होता, त्यामुळे बहुधा त्यांनी माझा प्रश्न नीट ऐकला. एकजण म्हणाला,  अहो, कालच झालं ते नाटक.!”  दुसरा म्हणाला,थोडं कर्कश होतं ते नाटक, पण चांगलं होतं.” मी संस्थेच्या ज्या पदाधिकारीच्या पोस्ट वाचते, त्यांनी नजरचुकीने फेसबुकवर चुकीची तारीख टाकलेली होती असं लक्षात आलं.

आता माझ्यासमोर चार पर्याय होते: घरी परत जायचं आणि तासाभराने परत यामिनीला भेटायला याच भागात यायचं. ते जरा अवघडच होतं. दुसरा पर्याय म्हणजे यामिनीला न भेटता थेट घरी जाणं. पण मला तिला भेटायचं होतं, बऱ्याच दिवसांत भेटलोच नव्हतो आम्ही. तिसरा पर्याय म्हणजे बाहेर झाडाखाली  ७.३० पर्यंत बसून राहायचं. पण मी सोबत एकही पुस्तक घेऊन आले नव्हते. आणि चौथा पर्याय होता – समोर जो काही कार्यक्रम होत होता, तो बघणं.

चौथा पर्याय जरा गंमतशीर होता. ना आयोजकांपैकी (आणि त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी) कोणाला मी ओळखत होते, ना मला नृत्यामध्ये फारसं गम्य होतं. ना आमंत्रण, ना ओळखदेख – तरीही मी त्यांच्या कार्यक्रमात आले होते. हॉलमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मी शेवटच्या रांगेत बसले, म्हणजे त्यांच्या पाहुण्यांना जागा लागली तर मी कार्यक्रमात व्यत्यय निर्माण न करता तिथून बाहेर पडू शकत होते.

तो कार्यक्रम एका नृत्यशाळेचा होता. भरतनाट्यम शिकवणारी नृत्यशाळा. (नृत्यशाळेचं नाव आणि कार्यक्रमाचे फोटो मी जाणीवपूर्वक इथं देत नाही. कारण ते योग्य ठरणार नाही.) कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या ताई दोन्ही भाषा – मराठी आणि इंग्रजी – सहजतेने बोलक होत्या. त्यांचं सूत्रसंचलन काव्यात्मक होतं, पण पाल्हाळ नव्हतं. सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक नृत्याची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली. त्या अभ्यास करून आल्या होत्या हे स्पष्ट जाणवत होतं. खूप दिवसांनी इतकं प्रभावी सूत्रसंचालन ऐकलं. त्या ताईंचं मनापासून कौतुक वाटलं.

भरतनाट्यम ही दक्षिण भारतातील – तमिळनाडू राज्यातील – एक पारंपरिक नृत्यशैली आहे. त्याबाबत काहीही वाचलं नसतानाही कार्यक्रमाच्या सुरूवातीचं संगीत ऐकूनच मला त्याचं तामिळनाडूशी नातं ओळखता आलं. त्या सूरांनी मला चाळीस वर्षांपूर्वीच्या कन्याकुमारीला नेलं. तिथे मी एम.एस. सुब्बुलक्ष्मींची भजनं पहाटे ऐकत असे. त्यासोबत समुद्राचा आवाज, थंड हवा, शांतता, मनात दाटून येणारा आनंद – हे सगळं क्षणात आठवलं. एखादा अनुभव मनाला कुठल्या कुठं घेऊन जातो हे पाहून गंमत वाटली.

विविध वयोगटांतील मुलींनी एकत्र नृत्य सादर केलं. त्यांचं देहबोलीद्वारे भाव व्यक्त करणं, समन्वय, एकत्र हालचाली करताना एकमेकांना समजून घेणं – फार सुरेख होतं. मला त्या गाण्यांचे शब्द समजले नाहीत, पण नृत्य करणाऱ्यांच्या हालचाली आणि चेहरे भाव मला अर्थपूर्ण वाटले. मला त्यांचा थोडासा हेवाही वाटला. कारण मी एक ‘कलाशून्य’ व्यक्ती आहे आणि याची खंत मला अधूनमधून वाटत असते.  😊

हे कलाकार नेहमी स्वतःच्या शरीराशी इतकं एकरूप असतात का? शब्दांशिवाय संवाद शक्य आहे का त्यांच्यासाठी? नृत्य आणि दैनंदिन जीवन यांच्यातला पूल ते कसा बांधतात?

नृत्य करणाऱ्या काही मुली लहान होत्या. तर काही प्रौढ स्त्रिया – त्या नृत्यशिक्षिका होत्या. पण नृत्य सादर होत असताना त्यांचा कुठेही ‘शिक्षिका’ असल्याचा आव नाही. सादरीकरणात सगळ्याचजणी गुंगून गेल्या होत्या. एखाददुसरा अपवाद वगळता सादरीकरण सामूहिक होतं. त्या प्रत्येक नृत्यामागे किती तयारी आणि सराव असेल!

नृत्यं शिव, नटराज, पार्वती, अष्टलक्ष्मी यांच्याशी संबंधित होती. पुष्पांजली, अलारिप्पू, जातिस्वरम्, देवी कीर्तनम् यासारखी नवी नावं ऐकायला मिळाली. राग आणि ताल यांचं थोडक्यात वर्णनही ऐकलं.

साधारण दीड तास मी आनंदाने हे सगळं पाहत होते. तेव्हा मनात वेगवेगळे विचारही आले.

पहिला प्रश्न – मी आपल्या लोककथांपासून कधी दूर गेले? पूर्वी ह्या कथा – जसं की शिव नाचतोय, रामसेतू बांधला जातोय – यांचं आणि म्हणून सण-उत्सवांचंही आकर्षण वाटायचं. पण हल्ली सण-उत्सवांमधला निरागसपणा लोप पावतो आहे. माझ्याभोवती, माझ्या परिसरात, माझ्या जगात आता सण उत्सव म्हणजे निव्वळ कर्मकांड झालं आहे. त्यात भर पडली आहे ती धर्माचा अभिमान या बाबीची. आणि “ते आणि आम्ही” असं सातत्याने कर्कश आवाजात सांगणाऱ्या द्वेषाची. मला ते पचनी पडत नाही.  पण या कार्यक्रमामुळे लोककथा परत एकदा वाचायला हव्यात असं वाटतंय. 

दुसरं असं वाटलं की आनंद वाटायला आपण एखाद्या समूहाचा सदस्य असण्याची, लोक आपल्या ओळखीचे असण्याची काही गरज नाही.  अनोळखी लोकांसोबतही आपण आनंद अनुभवू शकतो. आपल्याला हसायला, बोलायला, आनंदी व्हायला काहीही निमित्त होऊ शकतं.

मला नेहमी असं वाटतं की मी या जगात योगायोगानेच आले आहे – (जशी मी या कार्यक्रमाला आले तशीच). या जगात येताना माझ्या कुणीही ओळखीचं नव्हतं. इथं मी काही मर्यादित काळासाठी असणार आहे, आणि इथून मला काही घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे म्हटलं तर एक प्रकारचं उपरेपण आहे. पण त्याचवेळी असंख्य लोकांशी निर्माण झालेले स्नेहबंध आहेत, जागांच्या रमणीय आठवणी आहेत. हे लोक, या जागा, या आठवणी आता माझाच समृद्ध हिस्सा आहेत. एके काळी अनोळखी असलेली माणसं, जागा ... आज आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. आज मी जी काही आहे, ती या सर्वांमुळे आहे. उपरेपण आणि आपलेपण हे दोन विरूद्ध प्रवाह माझ्यात एकत्रित रहात आले आहेत. काही आनंद तात्कालिक असतात, काही दीर्घकाळ सोबत राहतात. आनंदी राहावं असे प्रसंग, घटना वारंवार होत राहतात. म्हणून  to be or not to be” या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे  – “be and be not”.

साडेसात झाले. यामिनीला फोन करायची वेळ झाली होती. मी शांतपणे निघाले – कुणालाही न सांगता, निरोप न घेता. कुणाला माझं येणं लक्षात आलं नव्हतं, आणि जाणंही नाही. एकदम परफेक्ट! ती दीड तासांची भेट जणू माझ्या आयुष्याचंच सार वाटलं – एखादा सुंदर क्षण अनुभवायचा, आणि शांतपणे निघून जायचं. प्रत्यक्ष आयुष्यात कधी कधी मीही काहीतरी सादर करते म्हणा – अर्थातच भरतनाट्यम् नक्कीच नाही 😊

आणखी एक. नियोजन महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा न ठरवता, अचानक करणंही आनंददायी अनुभव असू शकतो. नवीन शक्यता, नवीन माणसं, नवीन अनुभव यांच्यासाठी आपलं मन खुलं असायला हवं. चुकीच्या हॉलमध्ये जाऊन त्या संध्याकाळी मला निखळ आनंद मिळाला; आणि स्वतःशी संवाद साधण्याची एक संधीही! कोण जाणे पुढच्या क्षणी, पुढच्या वळणावर असा एखादा अनपेक्षित आनंदाचा अनुभव आपल्यासाठीही असेल.    

Saturday, April 26, 2025

२७४. साहित्यभूषण परीक्षा: १.१: 'केशवसुत'

(नाशिक स्थित कुसुमाग्रज प्रतिष्ठान १९९६ पासून दरवर्षी साहित्यभूषण परीक्षा आयोजित करते. १९९६ सालच्या म्हणजे पहिल्याच परीक्षेत मी सहभागी झाले होते. त्या परीक्षेत मला इंद्रायणी (प्रथम )पुरस्कार मिळाला होता. उत्तरपत्रिका घरीच बसून लिहायच्या होत्या - आजही तसंच आहे. त्यावेळी पाच पेपर होते. १. वाड्मयीन परंपरा, प्रवृत्ती आणि प्रवाह. २. साहित्य विचार आणि समीक्षा ३. मराठीतील साहित्यप्रकारांचा अभ्यास ४. भाषिक व्यवहार आणि कौशल्ये ५. दीर्घ निबंध

उत्तरपत्रिका कुसुमाग्रज प्रतिष्ठानला पाठवण्यापूर्वी मी त्या फोटोकॉपी करून घेतल्या होत्या. आता त्या फोटोकॉपी जीर्ण होत चालल्या आहेत, म्हणून इथं केवळ त्यांची नोंद करते आहे. मलाच पुन्हा वाचायला उपयोगी पडेल हा हेतू आहे.

१९९६ सालची मी आता बरीच बदलली आहे. आज मी हे असंच लिहीन (किंवा यापेक्षा बरं किंवा वाईट लिहीन) असं काही निश्चितपणे सांगता येणार नाही. जे मी तेव्हा लिहिलं होतं, ते जसंच्या तसं इथं उतरवते आहे. त्यात आता दुरुस्त्या सुचल्या तरी त्या केल्या नाहीत. माझं मलाही हे पुन्हा वाचताना नव्यानेच कळल्यासारखं वाटतंय हे मात्र खरं 😊 )  

प्रश्न १.१:  केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक का म्हणतात, ह्याचे सप्रमाण विश्लेषण करा.

केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात, मराठी कवितेचे जनक म्हणत नाहीत हा भेद आपण नीटपणे ध्यानात घ्यायला हवा. केशवसुतांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते. त्यांचा म़त्यू ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाला. म्हणजे केशवसुतांना जेमतेम चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. समग्र केशवसुतया व्हीनस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात (आवृत्ती दुसरी, १९७०, संपादक – प्रा. भ. श्री. पंडित) केशवसुतांच्या १३२ कविता आहेत. त्यावरून केशवसुतांच्या प्रतिभेचा व सामर्थ्याचा आपल्याला अंदाज येतो. पण केशवसुत हे काही मराठीतील आद्य कवी नव्हेत. तरीही मग आधुनिक मराठी काव्याचे जनकत्व केशवसुतांकडे का जाते?

मराठीत कविता फार लिहिल्या जातात. साहित्य संमेलनातील कवीसंमेलनातील कवींची गर्दी आपल्याला धास्तावून टाकते. पण हे आजच घडते आहे असे मात्र नव्हे. तर पूर्वीही घडत असावे. कारण समर्थ रामदासांनीही कविता गवताऐसी I उदंड वाढली असे I” असे उद्गार काढले आहेत. पण काही मोजक्याच कवींचा ठसा काळावर उमटतो. प्राचीन काळातील काही कवींचा फक्त नामोल्लेख मी करणार आहे – त्यावरून मराठी वाङ्‍‍मयातील कवितेची प्राचीनता आपल्या ध्यानात येईल.

मुकुंदराज हे मराठीतील आद्य कवी होत. त्यांच्या विवेकसिंधुचा काळ थेट इसवी सनाच्या बाराव्या शतकाइतका मागे पोहोचतो. ज्ञानेश्वरी इसवी सन १२९० मध्ये लिहिली गेली. ज्ञानेश्वरीत तत्त्वज्ञानात्मक विवेचन जरी जास्त असले (कारण ती गीतेवरील टीकाच आहे) तरीही ज्ञानेश्वरी स्वतंत्र काव्य म्हणूनही परिणामकारक आहे असे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला वाटते. ज्ञानेश्वरांच्या भाषेतील सहजता (जरी काळाच्या अंतरामुळे आज ती भाषा काही अंशी क्लिष्ट वाटते आहे तरीही), त्यांच्या सुंदर, सोप्या उपमा, त्यातील रस हे सारे काही विलक्षणच आहे. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील सारे संत वाड्मय मग याच वाटेने जाते. निवृत्तीनाथ. सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा याच परंपरेत मोडतात. नामदेव, जनाबाई, कान्होपात्रा, एकनाथ, रामदास हीच वाट चोखाळतात. नीट विचार केला तर आरत्या यासुद्धा कविताच आहेत. रामदासांची करूणाष्टके ही सुद्धा वेगळीच पण कविताच आहे. आणि तुकारामांच्या बाबतीत बोलायचे तर तुका झालासे कळस हे भक्तीच्यात नव्हे तर काव्याच्या क्षेत्रातही खरेच आहे.  

पंडित विश्वनाथ बाळापूरकर. म्हाइंभट, महदाईसा, नरसिंह पंडित, नारायण व्यास ... अशी ही काव्यपरंपरा अबाधित राहते. मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, हरि पंडित, मोरोपंत, शाहीर राम जोशी, अनंत फंदी, शाहीर होनाजी बाळा यांचाही यात हातभार लागला आहे.

केशवसुतांना थोडेसे मोठे. एक-दोन पिढ्या मोठे असलेलेही काही कवी आहेत. परशुरामपंत गोडबोले (१७९९-१८७४) यांच्या शाकुंतलभवभूती या रचना प्रसिद्ध आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर १८२४ ते १८७८ या काळात होऊन गेले. महादेव मोरेश्वर कुंटे (१८३५-१८८८० यांची बहिर्जी नाईक ही कविता वाचण्याजोगी आहे.

केशवसुतांचे समकालीन असे काही कवी आणि त्यांच्या कविता आजही प्रसिद्ध आहेत. उदाहरणच द्यायचे तर संगीत सौभद्र नाटकातील प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी येत उष:काल हा हे गाणे आजचेच वाटते. त्याचे कवी आण्णासाहेब किर्लोस्कर १८४३-१८८५ या काळात होऊन गेले. गोविंद बल्लाळ देवलांची (१८५५-१९१६) मृच्छकटिकझुंजारराव नाटकांतील पदे या चांगल्या कविताच आहेत. वासुदेव खरे (१८५८-१९२४) यांची पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन ही कविता आजही जवळची वाटते. हरि नारायण आपटे (१८६४-१९१९), दत्तात्रय कोंडो घाटे (१८७५-१८९९), नारायण वामन टिळक (१८६१-१९१९ – केवढे हे क्रौर्य, पाखरा येशील का परतून चे कर्ते), चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (१८७१-१९३७), नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी (१८७२-१९४७) या कवींची कामगिरीही तितकीच लाखमोलाची आहे. राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज – १८८५-१९१९) यांच्या राजहंस माझा निजला आणि महाराष्ट्रगीत या दोनच कविता त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत. आणि बालकवींचे (त्र्यंबक बापूजी ठोमरे, १८९०-१९१८) ऋण कोणता मराठी माणूस विसरेल? आनंदी आनंद गडे, श्रावणमासी हर्ष मानसी, फुलराणी ती खेळत होती, पाय टाकूनि जळात बसला असला औदुंबर या ओळी मराठी मनात चिरंतन स्थान मिळवून बसलेल्या आहेत. नव्या-जुन्यांच्या या अक्षुण्ण प्रवाहात केशवसुतांनी काय नेमका ठसा उमटविला आहे?    

मराठीतील प्राचीन कविता जर आपण पाहिल्या तर असे लक्षात येते की या काव्यात रस आहे. कवींची भाषा प्रासादिक आहे. त्यांच्या काव्यांत निरर्थक शब्द आपल्याला आढळत नाहीत. प्रत्येक शब्द वजनदार आणि अर्थपूर्ण असतो. पण शब्दांचे वजन वाढविण्याच्या नादात ते शब्द दुर्बोध बनू नयेत, जनसामान्यांच्या आकलनाच्या पल्याड आपले काव्य जाऊ नये याची या कवींनी (विशेषत: संत कवींनी) काळजी घेतलेली दिसते. कारण कवितेकरिता कविता असा त्यांचा भाव नसून लोकशिक्षणाकरिता कविता असे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्या कवितेच्या मुळाशी काही विशिष्ट हेतू आहे. (तुकाराम याला अपवाद म्हणावे लागतील.)

प्राचीन कवितेत आजच्या संकल्पनांनुसार असे काही दोष जरी आढळले तरी त्या कवितेचा स्थलकालातीतपणा लक्षणीय आहे. त्या काव्याचा स्वर विश्वव्यापी सह-अनुभूतीचा असल्याने आजही ती कविता तितकीच अर्थपूर्ण आणि आपल्या मनाला स्पर्श करणारी ठरते. या कवितेतील कारूण्य आणि उत्कटता दोन्हीही विलोभनीय आहे. एका ठराविक छंदात तिची रचना झाल्याने ती गाता येते हेदेखील तिचे एक वैशिष्ट्य आहे.

मध्ययुगीन कवींनीही याच रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कवितांचे विषय रामायण-महाभारत-पुराणे-संस्कृत सुभाषिते यावर आधारलेले आहेत. त्यातील संस्कृतप्रचुर क्लिष्ट मराठी जपण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो. कवी हा एक माणूस असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येत नाही. त्या अर्थी जुनी अथवा मध्ययुगीन मराठी कविता व्यक्तिवादी अभिव्यक्ती करत नाही. ती एका समूहमनाची, एका सुसंस्कृत परंपरेची, आणि एका आदर्शाची अभिव्यक्ती करते. त्यातून त्यांचे कवीहृदय कळते. पण या कवीहृदयालाही एक माणूस या नात्याने कधी संदेह निर्माण होत असतील, कधी निराशा येत असेल, कधी उदासीनता येत असेल, कधी विकृती येत असेल हे मात्र त्यांच्या कवितेतून व्यक्त होत नाही. (पुन्हा एकदा या सगळ्या विधानाला तुकाराम, नामदेव, रामदास अपवाद ठरतील असे वाटते. पण त्यांच्या मनाचे हे आविष्कार सामान्य माणसासारखे भौतिक स्तरावरचे नाही. त्यांचा संघर्ष अधिक तीव्र आहे, पण तो आध्यात्मिक स्तरावरचा आहे!) ते एक आदर्शवादी, नैतिक कविता लिहितात. पण त्यातून त्यांच्या मनाची खरी अवस्था आपल्याला कळते का – असा प्रश्न मनात येतोच.

केशवसुत आणि बालकवी या दोघांनीही मराठी कवितेला तिच्या या चौकटीच्या जोखडातून मुक्त करण्याचे प्रयत्न केले. पण बालकवींना या बंदिस्त वाड्याच्या काहीच खिडक्या उघडण्यात यश मिळाले. केशवसुतांनी मात्र खिडक्या आणि दरवाजे दोन्ही उघडून मराठी कवितेला नव्या प्रकाशात वाटचाल करायला लावली आहे.

केशवसुतांचा काळ हा सामाजिक संक्रमणाचा काळ होता. १८५७ च्या क्रान्तीच्या अपयशाचे घाव हळूहळू बुजत चालले होते. स्वत:च्या सामाजिक परिस्थितीत काही बदल, सुधारणा घडवून आणण्याची गरज केशवसुतांना भासते. केशवसुतांनी त्यांच्या काव्यलेखनाची सुरूवात जरी परंपरेप्रमाणे संस्कृत व इंiग्रजी कवितांच्या भाषांतरांनी केली असली तरी ते तिथेच थांबले नाहीत. परिवर्तनाच्या हाकेला त्यांनी जोरदारपणे प्रतिसाद दिला.

रूढी जुलुम यांची भेसुर

सन्ताने राक्षसी तुम्हाला

फाडुनि खाती, ही हतबेला –

जल्शाची का? पुसा मनाला!

तुतारिने ह्या सावध व्हा तर!

किंवा

नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे

कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे

ब्राह्मण नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा

तेच पतित की जे आखडति प्रदेश साकल्याचा

यांसारख्या त्यांच्या ओळी त्या काळाचा विचार करता विलक्षणच आहेत. परंपरेचा पाईक असण्याची कवीची आजवरची प्रथा केशवसुत येथे मोडत आहेत. याचा नंतरच्या मराठी कवितेवर फारच चांगला परिणाम दिसून येतो.

मात्र केशवसुतांची क्रांती समाजविघातक नसून समाजसुधारणावादी होते. आधी कवी काही वेगळेच लिहित असत आणि समाज काही वेगळेच जगत असे. पण अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी, जायाचे  जग का असेच, आगबोटीच्या काठाशी एका तरुणीस इत्यादी कवितांतून सामाजिक अन्यायाचे, विषमतेचे केशवसुत स्पष्ट वर्णन करतात. समाजात भेदभाव असू नयेत ही भूमिका मांडतात. एका दृष्टीने अध्यात्माकडे जीवनवादी दृष्टिकोनातून ते आपल्याला पाहायला शिकवतात असेच म्हणायला हवे.

केशवसुतांनी बऱ्याच इंग्रजी कवितांचा अनुवाद केला आहे असे म्हटले जाते व त्यात तथ्यही आहे. संस्कृत व इंग्रजी कवितांचा अनुवाद ही केशवसुतांच्या काळाची पद्धतच होती. पण केशवसुत या अनुवादांच्या पुष्कळ पुढे गेले आहेत. या इंग्रजी कवितांच्या विषयांचा परिणाम त्यांच्या कवितांवर दिसून येतो. (सुनीत -Sonnet - रचना हा एक बाह्य आविष्कार होय.) केशवसुतांच्या प्रेमकविता या प्रकारचे उदाहरण म्हणून सांगता येईल. मात्र केशवसुतांचे प्रेम केवळ शरीरापुरते मर्यादित नाही तर ते आत्ममग्न प्रेम आहे. या प्रेमकवितेतूनही काही तात्त्विक चिंतनाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.

प्रीति मिळेल का हो बाजारी?

प्रीति मिळेल का हो शेजारी?

प्रीति मिळेल का हो बागात?

प्रीति मिळेल का हो शेतात?

असे प्रश्न निर्माण करून ते स्वत:च उत्तरतात:

प्रीतिची नसे अशी ग मात;

पहा शोधुनि हृदयात!’

या ओळी वेगळ्याच आहेत. दो हृदयांच्या संमगसमयी कसल्या लौकिकरीति– असेही केशवसुत आपल्याला विचारतात.

तल्लीन सवे मी झालो

विकलगात्र होऊनि गेलो

निर्वाणी पूर्ण बुडालो

नुरलीच जगाची याद!

जिने मला वेडा केले

तिच्यावर ही फिर्याद!  

अशी फिर्याद करणारी प्रीति केशवसुत रंगवतात. कवितेलाच प्रेयसी समजून तिचीही आळवणी केशवसुत करताना दिसतात.

कवीला व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व असते याची जाणीव केशवसुतांच्या कवितेत दिसून येते.

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी?

आम्ही असू लाडके -देवाचे,

…………………………

आम्हाला वगळा -गतप्रभ झणी होतील तारांगणे

आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

या कवितेत तर हे आत्मभान फारच प्रभावीपणे उतरले आहे. उत्तरकाळात मराठी कवितेत हे आत्मभान वाढलेले दिसते आणि त्याची सुरूवात केशवसुतांनी केली आहे. कवी हा शब्दांचा दैवी अधिकारी आहे अशी जाण केशवसुतांच्या कवितेत दिसते.

मीहि कशाला येथ रहावे?

काय असे ज्या मी चिकटावे?

वाटे गिरक्या घेत मिळावे –

या पवनाच्या चक्री होऊनि लीन सच्चिदानंदात

जगद्द्रुमाचे पिकले पर्ण

गलित असे मी अगदी जीर्ण

तर भर भर उडू द्या मला शब्दांसंगे स्वर्गात

असे केशवसुतांना शब्दांचे वेड आहे.

काव्य लिहिले मी खरे, परी माते

शारदेने जो मंत्र दिला कानी

तसे लिहिले मी –

काव्य तिचे मानी

यातून कविता ही साधना आहे याचीही जाण केशवसुत व्यक्त करतात. अर्थात ही जाणीव काव्याच्या प्रांतात नवी नाही – जुनीच आहे. पण बंडखोरी करताना, कवीला सर्वश्रेष्ठ असा द्रष्टा मानत असतानाही कविता ही समर्पणाची, साधनेची वृत्ती आहे असे बजावायला केशवसुत विसरत नाहीत.

केशवसुतांची निसर्गाविषयीची विशेष आपुलकी – हीदेखील मराठी कवितेतील एक नवी गोष्ट आहे. इंग्रजी कवितांवरून अशी कल्पना त्यांना सुचली असे काहीजण म्हणतात. पण केशवसुतांच्या कवितेत अनुवादकाला सुचावे तितके निसर्गाचे फक्त वर्णन नाही तर निसर्गाशी विलक्षण तादात्म्य आहे. (बालकवींच्या कवितेत तर ते अधिकच उत्कट रूप धारण करते) आणि त्याचबरोबर निसर्गाशी असलेल्या आपल्या विविध नात्यांचा आविष्कारही आहे. उगवत असेल्या सूर्यासमधील वर्णन पारंपरिक स्वरूपाचे आहे.

सह्यगिरिच्या पायथ्याला सुपीक

रम्य खोरे कोकणामधी एक

नदी त्यामधुनी एक वाहताहे

एक खेडे तीवरी वसुनि राहे

या वर्णनात व्यक्तिगत अनुभव प्रकट होतो. तर

गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे

झाले पहा कितिक हे विपरीत सारे

आहे घरासचि असे गमते मनास

ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास!

हा अनुभव बघताबघता तुमचा-आमचा होऊन जातो. हा निसर्ग आपल्याला कसा गुंतवून टाकतो याचे सुरेख वर्णन कविता आणि प्रीति यासारख्या कवितांमध्ये आहे.

केशवसुतांच्या कवितेला आध्यात्मिकतेचे वावडे नाही. किंबहुना तिचा रोख तिकडे आहे. पण पारंपरिक शब्दांची कास सोडून ते नव्या रीतीने त्याकडे बघतात.

पुरूषाशी रम्य अति

नित्य प्रकृति

क्रीडा करिती;

स्वरसंगम त्या क्रीडांचा

ओळखणे, हा ज्ञानाचा -

हेतु; तयाची सुंदरता

व्हाया चित्ता-

प्रत ती ज्ञाता

वाडे कोडे गा आता

झपूर्झा! गडे झपूर्झा!

किंवा

वादयांतुनि त्या निघती नंतर

उदात्ततेचे पोषक सुस्वर;

तो मज गमले विभूति माझी

स्फुरत पसरली विश्वामाजी

दिक्कालांसहि अतीत झालो;

उगमी विलयी अनन्त उरलो;

विसरूनि गेलो अखिला भेदा

ऐकत असता दिड दा दिड दा!

यांसारख्या ओळी वाचकालाही काही काळ वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.

केशवसुतांच्या काही ऐतिहासिक कविता आहेत. काही बोधपर कविता आहेत. केशवसुतांच्या कविता आत्मपर आहेत. केशवसुतांच्या कविता सुधारणावादी आहेत. स्वानंदासाठी कविता आहेत. परहितार्थ कविता आहेत. केशवसुत पद्याच्या रचनेत काहीसे अडकलेले असले तरी त्यांच्या रचनेत क्लिष्टता नसून सहजता व रमणीयता आहे. त्यांच्या भाषेत उत्कटता आहे. केशवसुतांची कविता सुंदर आणि उदात्त आहे. केशवसुतांची कविता निसर्गाशी जवळीक साधणारी आणि तरीही आत्मभान राखणारी आहे. निराशेत घुटमळणाऱ्या केशवसुतांचा सूर अंती आशेलाच मिळतो आहे.

मला वाटते की केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणणे शब्दश: योग्य ठरणार नाही. ते प्रतिकात्मक अर्थानेच घ्यावे लागेल. मराठी कवितेचा चहुबाजूंनी जो विकास नंतरच्या काळात दिसून येतो त्याची मुहूर्तमेढ अनेकांनी पूर्वीच रोवली आहे. अनेक संतांनीही परंपरेविरूद्ध बंडखोरी केली आहे. (हात लागताच ओवळे होणारे कसले ते सोवळे– असा सवाल रामदास-एकनाथांनीही केला आहे.) प्रणयकविता, ऐतिहासिक कविता, चिंतनात्मक कविता ... फक्त केशवसुतांनीच लिहिल्या असे म्हणता येत नाही. पण इतर साऱ्यांजवळ यातला एकेकच विशेष होता – केशवसुतांमध्ये मात्र हे सारे एका वेळी अस्तित्वात होते! मराठी कवितेच्या साचेबंद इमारतीतच केशवसुत राहिले – पण बाहेरची पुष्कळ मोकळी हवा आणि पुश्कळ प्रकाश त्यांनी आत आणला याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. आधुनिक मराठी कवितेचे जनक असे केशवसुतांना म्हणण्यात तत्पूर्वीच्या कवींचा उपमर्द होत नाही. कारण त्यांच्याच वाटचालीचा आधार घेऊन केशवसुत पुढे आलेले आहेत. त्यामुळे केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणण्यातील प्रतीकात्मकता आणि तारतम्य आपण लक्षात घ्यावे असे मला वाटते.