ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, July 9, 2010

३४. जीवो जीवस्य...

आज खूप दिवसांनी दुपारच्या वेळी मी घरात होते. रणरणत्या उन्हामुळे आसमंत चिडीचूप होता. मी राहते त्या भागात बरीच झाडे आहेत. मी खिडकीतून दिसणा-या झाडांकडे नुसतीच निरर्थकपणे पाहत होते. इतक्या उन्हात यांच्या आत काय लगबग चालू असेल, याचही मला कुतुहल होतं! इतक्यात एका फांदीवरून खार धावत गेली. तिच्या पुढेमागे कोणीच नव्हतं खर तर! याच बाईसाहेबांची दुपारच्या वेळी इतकी धांदल का चालली होती?

क्षणार्धात एक जुनच चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभ राहिलं! तो क्षण आठवला की अजून माझ्या काळजाचा एक ठोका चुकतो. मी तेंव्हा नेमके काय करायला हवे होते? काहीच न करता नुसतीच अलिप्तपणे मी बघत राहिले, ते बरोबर की चूक? परिस्थितीची नीट माहिती न घेता आपल्या बळाच्या आधारावर कोणा एकाची बाजू मी उचलून धरणे योग्य झाले असते का?

पॉंडिचेरीला होते मी. अरविंद आश्रमाच्या परिसरात राहत होते. अरविंदांची काही पुस्तके तेथे बसून नीट वाचावीत या इराद्याने गेले होते, त्यामुळे तेथे बरेच महिने माझा मुक्काम होता. आश्रमाचे ग्रंथालय छानच होते (अजूनही आहे!). पुस्तकांचा संग्रह तर चांगला होताच, शिवाय वाचत बसायची जागा निवडायलाही पुष्कळ वाव होता. मी बहुधा पहिल्या मजल्यावरच्या उघडया गच्चीत बसायचे. सावली देणारा कोपरा एक दोन दिवसांतच ध्यानात आला. डॊळे पुस्तकातून उचलून समोर पाहिले की चकाकणारा निळा आणि संथ समुद्र दिसायचा. त्याच्यावरून येणा-या वा-याच्या झुळुकांनी जवळपासची झाडे जणू खुषीत नाचायची. गच्चीतल्या मोकळ्या जागेत फुलझाडांच्या ब-याच कुंडया होत्या. त्यांच्या संगतीत एकूण छान चालला होता माझा वाचनाचा कार्यक्रम.

तिस-या चौथ्या दिवशी खारींची वर्दळ सुरू झाली. आधी त्या बहुधा मला बिचकल्या होत्या. पण आता त्यांनाही माझी सवय झालेली दिसत होती. अगदी निर्भयपणे, आत्मविश्वासाने त्या आमच्यासमोर (आणखी एक दोन जण असायचे वाचत बसलेले!) वावरायच्या. हातभर अंतरावरून बिनधास्त धावायच्या. कधी एखादी खार निवांतपणे समोर बसून टुकूटुकू पाहत राहायची - तत्त्वचिंतक असल्याचा आव आणत! फार गंमत वाटायची मला. दोन तीन तास मी माझ्या ठराविक खुर्चीत बसून असायचे. थोडा वेळ अरविंद वाचणे आणि बाकी वेळ समुद्र आणि खारी पाहणे असे माझे एकंदर छान चालले होते.

एक दिवस मी नेहमीच्या वेळी ग्रंथालयात गेले. सायकल लावून प्रवेशद्वारात येते तोच डावीकडे झुडुपात असलेले मांजर इमारतीच्या पाठीमागे धावले. एकदम सात आठ खारींचा चित्कार मला ऐकू आला. काही कळायच्या आतच इमारतीला मागच्या बाजूने वळसा घालून तो बोका माझ्यासमोर उभा होता.

ही सगळी घटना सेकंदाच्या जणू काही अंशातच घडली. मी अद्याप खारींच्या आवाजाचा वेध घेत होते, तोवर हे बोकोबा माझ्यासमोर उभे ठाकले. त्याला पळ काढायला पुष्कळ वाव होता, तरीही तो बोका उभा का राहिला हे मला आजतागायत कधी कळले नाही. तो बोका तसाच उभा होता म्हणून माझी नजर अजाणता त्याच्याकडे वळली! क्षणभर माझी नजर गोठलीच. त्या बोक्याच्या तोंडात एक खार होती. सुटकेसाठी ती धडपडत होती. आणि एखाद्या विजयी वीराच्या थाटात बोका माझ्यासमोर उभा होता.

मी झटकन खाली पाहिले. आसपास एकही दगड नव्हता. बोक्याला काहीतरी फेकून मारले की स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो खारीला सोडेल असा माझा हिशोब होता. बोका बिथरू नये म्हणून मी सावकाश हालचाल केली. एक पाय वरती उचलून हातात चप्पल घेतली. खार अजून तडफडत होती. बोका शांतपणे माझ्यासमोर उभा होता.

बोक्याच्या त्या नजरेने माझे अवसान गळाले. मला वाटले, आपण फक्त आपल्याच भावनेचा विचार करतो आहोत! ’जीवो जीवस्य जीवनम’ हा तर निसर्गाचाच न्याय आहे! रोजच्या सहवासामुळे आपल्याला खारीबद्दल जास्त आत्मीयता वाटते आहे. पण ही खार म्हणजे त्या बोक्याचे अन्न आहे. एवढया चपळ खारीला पकडण्यासाठी त्या बोक्यालाही काही कमी श्रम करावे लागले नसतील! त्याच्या तोंडचा घास काढून घेण्याचा मला काय अधिकार? निसर्गाने सर्वांना लढण्याची अस्त्रे दिली आहेत, तशीच बचावाचीही! आजवर किती खारी या बोक्याच्या तावडीतून निसटल्या असतील, पण आज बाजी याने मारली आहे. मी बळ वापरले तर कदाचित ही खार सुटेलही. पण या घटनेत मी मध्येच नाक खुपसणे न्याय्य होईल का?

माझा पुतळाच झाला होता. या विचारांच्या आंदोलनात मी गुंतलेली असतानाच खारीची तडफड संपली. बोका मला ओलांडून शांतपणे पुढे गेला. या सगळ्या घटनेला इतका कमी वेळ लागला की आसपासच्या माणसांना काही पत्ताही लागला नाही.

मला ती खार आठवते. तो बोका आठवतो. अनेक प्रसंग आठवतात. माणसे आठवतात. स्वत:च्या करण्याचे आणि नाकर्तेपणाचे सोयिस्कर समर्थन मला करता येते. पण दर वेळी मी न्याय्य बुध्दीने वागले असा कौल माझे मन मला देत नाही. मनालाही निसर्गाची एक गती आहे. त्या गतीचे मी समर्थन करते आहे का? पण ते तरी न्याय्य ठरते का?

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरूण भारत, १० जुलै १९९६

5 comments:

  1. छान लिहिलंय ..

    ReplyDelete
  2. बोक्याने जखमी केलेल्या खारीला सोडविणे क्रूरपणाचे ठरले असते

    ReplyDelete
  3. आभार हेरंब.

    शरयू, कदाचित तुमच मत बरोबर असेल.. माझा मात्र गोंधळ अजूनही आहे कायम!

    ReplyDelete
  4. apalya sagalyancha "asa" Putala baryachda hot asto.... pan te apan kabul karit nahi....

    ReplyDelete
  5. राजेश, अर्थात कबूल करून तरी परिस्थितीत काय फरक पडतो? केवळ आपल्या मनाचं समाधान!

    ReplyDelete