ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, December 8, 2010

५५: भीखाराम

शिव गावातून बाहेर पडताना प्रदीप शर्मा म्हणाले, “आता तुम्हाला भीखारामच्या ताब्यात दिलं, की मग मला काही काळजी नाही.” “कोण आहेत हे गृहस्थ?” मी कुतुहलानं विचारलं एव्हाना माझ्या पंचवीस प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यामुळं असेल, ते नुसतेच हसले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता – विशेषत: २००६ च्या पुराची कहाणी ऐकता ऐकता आम्ही कधी कनासरला येऊन पोचलो ते कळलंच नाही. तिथे एक उंचेपुरे गृहस्थ उभे होते. पस्तीशीच्या आसपास त्यांचं वय असेल. त्यांचा वेष आधुनिक होता. खादीच्या जाकिटाआड लपलेल्या कपडयांची इस्त्री विस्कटलेली नव्हती. मिशांमुळे त्यांच्या चेह-याला एक प्रकारची उग्रता आलेली होती. केस काहीसे तपकिरी रंगाकडे झुकणारे, दात पान-तंबाखुचे सेवन जगजाहीर करणारे. पण ते हसले तेंव्हा त्यांचा चेहरा एकदम सौम्य होऊन गेला. ग्रामपंचायतीचे कार्यालय चांगले सजवलेले होते. वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारे फलक होते. कार्यालयात अजिबात धूळ नव्हती. ’चहा येतोच आहे’ अस भीखाराम म्हणाले तेव्हा 'आता अर्ध्या तासाची निश्चिंती’ अस मी मनात म्हटलं! पण अक्षरश: तिस-या मिनिटाला चहा आला. मी जरा आश्चर्याने पाहिलं तेव्हा भीखाराम माझ्याकडेच पहात होते. “सगळं नियोजन नीट केलंय मॅडम, काही काळजी करू नका” अस ते म्हणाले तेव्हा मी जरा खजील झाले. ’संध्याकाळी कार्यालयातच राहायला या’ भीखारामच्या आमंत्रणावर सगळ्यांचे चेहरे विचारमग्न झाले. “इथं नसेल आवडत तर माझ्या घरी चला राहायला.” भीखाराम म्हणाले. आणि हसत पुढे म्हणाले, “मी काही तुमची राजेशाही बडदास्त नाही ठेवू शकणार, पण माझ्या परीने मी चांगली करेन सोय.” त्यांच्या या खुलाशावर मी काहीतरी मोघम बोलले आणि आम्ही ’गोरसियों का तला’ या आमच्या गावाच्या दिशेने निघालो. भीखारामला मी ’जी’ वगैरे जोडत नाही, कारण या परिसरात ’राम’ हे ’राव’ सारख वापरलं जात. बाजीराव येथे असते (पहिला किंवा दुसराही!) तर त्यांच नाव बाजीराम असलं असत इकडे. सगळे पुरूष ’राम’ आणि सगळया स्त्रिया ’देवी’. मला पुढच्या दोन दिवसांत संगाराम, मग्गाराम, चेनीराम, हिराराम, नग्गाराम .. असे असंख्य ’राम’ भेटले. तुलसीदेवी, गवरादेवी (गौरा नाही, ’गवरा’च!), लालीदेवी अशा अनेक ’देवी’ही भेटल्या. गावात उतरल्यावर भीखारामने लोकांना बोलवायला सुरूवात केली. इकडंची गावंही मजेदार. म्हणजे २५० घरांचं हे गाव सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिसरात वसलेलं आहे. चार पाच घरांची किंवा अगदी एक दोन घरांचीही छोटी वस्ती – त्याला ’ढाणी’ म्हणतात. 'भाटी की ढाणी’, 'भिल ढाणी’ अशी त्यांची नावं कोणती कुटंबं तिथं राहतात ते जगजाहीर करतात. भिल ढाणी अर्थात जरा मोठी आहे – अंदाजे पन्नास एक घरांची. घर म्हणजे मातीच्या चार पाच वेगवेगळ्या छोट्या खोल्या. एक खोली अन्न शिजवायची, एक झोपायची, एक धान्य साठवणीची (ज्यात फक्त बाजरी दिसली सगळ्या घरांत) अशी त्याची स्पष्ट विभागणी. अंगणभर कलिंगडं वाळवायला पसरलेली. त्याच्या बिया विकणे हा पैसा कमवायचा एक मार्ग. शेळ्या घरटी किमान दोन ते तीन. कोंबडया मात्र अजिबात दिसल्या नाहीत. जाटांच्या घरात एक तरी गाय असतेच, भिल्लांकडे मात्र गाय नाही. लेकरं मात्र भरपूर. सात आठ लेकरं असणा-या किमान चाळीस स्त्रिया मला त्या दोन दिवसांत भेटल्या. आणि ही संख्या आहे जिवंत असणा-या लेकरांची. पंचवीशी- तिशीतच त्या बाया किती वेळा बाळंतपणाच्या चक्रातून गेल्या असतील याचा आपण अंदाज त्यावरून बांधू शकतो. भीखाराम लोकांना बोलवत होते, तोवर मी वही आणि पेन काढलं. भीखारामचं नाव लिहिताना आपण चुकीचं लिहित नाही ना, अशी शंका मनात आली. म्हणून देवनागरीत माझ्या वहीत लिहिलेलं नाव मी भीखारामना दाखवलं. “मॅडम, मी सांगतो तुम्हाला तसं लिहा” असं म्हणत Bheekharam असं स्पेलिंग त्यांनी मला सांगितलं. “माझा सेल नंबरही लिहा” असं म्हणत त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. “तुम्हाला नाही लागणार कधी माझा नंबर; पण मी तुम्हाला कधी फोन केला तर तुम्ही फोन बंद करू नये न उचलताच म्हणून ही खबरदारी घेतोय” अस म्हणताना भीखाराम मिस्किलपणे हसत होते. मला या माणसाबद्दल तोवर ब-यापैकी कुतुहल वाटायला लागलं होतं. लोक जमा होईपर्यंत आम्ही रस्त्यावर उभं राहून गप्पा मारायला लागलो. भीखाराम खरं तर कनासर ग्रामपंचायतीचे सचिव (ग्रामसेवकांचे हे नवे नाव!) आणि गोरसियों का तला गाव येते काश्मिर (हो! तुम्ही बरोबर वाचलंत!) ग्रामपंचायतीत. पण काश्मिर ग्रामपंचायतीचे सचिव काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत आणि सध्या भीखाराम दोन ग्रामपंचायतींचे काम पाहतात. भीखाराम उंडू गावचे रहिवासी. “तुम्ही किती शिकला आहात?” या माझ्या सहका-याच्या थेट प्रश्नावर भीखाराम हसले. “ती एक कहाणी आहे” असं ते म्हणाले. लहानपणापासून भीखारामला खूप शिकायचं होतं, पण घरात आणि गावात त्याचं कोणाला काही विशेष अप्रूप नव्हतं! मग दहावी तर पन्नास किलोमीटर अंतरावरच्या शिव गावात (जे तालुक्याचं मुख्यालय आहे) केली. बाडमेर हे जिल्ह्याचं ठिकाण आणखी पन्नास साठ किलोमीटर पुढं. पण चांगलं शिकायचं तर जोधपुरला गेलं पाहिजे असं भीखारामना वाटलं. जोधपुर पडतं साधारणपणॆ दीडशे किलोमीटर. म्हणजे घरापासून दूर, रोजचं जेवण काही घरून येण्याची शक्यता नव्हती. जोधपुरला गेल्यावर कॉलेजचा प्रवेश वगैरे तर झाला, पण राहण्याची आणि जेवणाची सोय काही होईना. खोलीचं भाडं सातशे आठशे रूपये – ते आणायचं कुठून? घरातून काही पैसे मिळण्याची शक्यता नव्हती. पोटापाण्याचाही प्रश्न होता. भीखाराम सांगतात, “आता तुम्ही शहरातले लोक टीका कराल माझ्या वागण्यावर. पण मी सरळ एका मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलं. साधी झोपडी बांधली स्वत:च आणि राहायला लागलो. सार्वजनिक नळावर आंघोळीची आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली. जे शहर गरीबांना जागा देत नाही, त्या शहरात गरीबांना स्वत:साठी अशीच जागा निर्माण करायला लागते मॅडम, मग भले तुमचा कायदा काहीही सांगो. मी कायदा मोडत होतो हे मला कळत होते, पण माझा हेतू चांगला होता, हे तुम्हीही मान्य कराल.” “राहायची सोय झाली, पण जगायला अन्नही तर लागतं. सकाळचं कॉलेज आटोपलं की दुपारी मी एका फॅक्टरीत कामाला जायला लागलो. फॅक्टरी कसली म्हणा; दगड फोडायचं काम करत होतो मी तिकडं. आमच्या भागात दगड मिळत नाही, बाहेरून येतो तो. मोठा दगड असतो, तो फोडून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करायचे, जे मग घर बांधायला वापरले जातात. लहानपणापासून मी ते काम केलेलं असल्याने मला ते माहिती होतं. माझं तिथलं काम बघून काही खाजगी ठेकेदारही मला कामाला बोलवायला लागले. अशा रीतीने कॉलेज करून मी महिन्याला हजार बाराशे कमवायला लागलो. माझा माझा खर्च भागवून घरीही थोडेफार पैसे द्यायला लागलो. असं करत करत राज्यशास्त्र विषयात एम. ए. पूर्ण केलं.” “मग गावात कसे काय परत आलात?” आमच्यातल्या आणखी एकाचा प्रश्न. “एवढया शिक्षणावर काही चांगली नोकरी शहरात मिळाली नसती. आणखी शिकायचं तोवर इथल्या प्रथेप्रमाणे लग्न झालं होतं माझं – जबाबदारी वाढतेच ना लग्नानंतर. थोडीफार शेती आहे, ती बघणं पण गरजेचं होतं. तेवढ्यात ही ग्रामसेवकाची जागा निघाली. काम तर कुठंही करावं लागणारच, मग आपल्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाल्यावर मग मी ती संधी घेतलीच. पैसे बियसे काही दिले नाहीत हं मी या नोकरीसाठी. माझ्या शिक्षणाच्या बळावर मला मिळाली ती. मी इथलाच आहे, त्यामुळे लोकांच्या अडचणी मला माहिती आहेत. आमचे लोक अडाणी आहेत, त्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं नाही. शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. मी काही फुकट काम करत नाही , शासन मला पगार देतं – पण माझ्या लोकांना माझ्या शिकण्याचा उपयोग होतो. मलाही बरं पडतं.” भीखारामच्या उत्तराने आम्हाला अंतर्मुख केलं. पुढचे दोन दिवस भीखाराम आमच्याबरोबर होते – खरं तर आम्ही त्यांच्याबरोबर होतो. गावातल्या लोकांबरोबर आम्ही पुष्कळ बोललो, त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला – त्यात भीखारामची आम्हाला खूप मदत झाली. असे अनेक कार्यक्षम, प्रामाणिक, साधे, समंजस, आपल्या समाजावर प्रेम असणारे, मदतीस तयार असणारे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत भीखाराम आज अदृश्यपणे काम करत आहेत. संघर्षातून पुढं आल्यावरही त्यांच्यात कसल्याही प्रकारचा कडवटपणा नाही. आपल्याकडे जे नाही त्याची त्यांना जाणीव आहे, पण आपल्या ताकदीवर त्यांचा विश्वासही आहे. आपली शक्ती कशी वापरायची याची त्यांनी विचारपूर्वक एक रणनीती बनवली आहे. ते लाचार नाहीत पण उद्धटही नाहीत. ते सहनशील आहेत पण त्यामुळे आपले शोषण होणार नाही इतकी काळजी ते घेतात. ते काही संत महात्मा नाहीत, त्यांनाही त्यांचा स्वार्थ आणि परमार्थ साधायचा आहे. त्यांनाही राग-लोभ असणारच. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा ते एक पाऊल नक्कीच पुढे आहेत. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता तिच्यावर त्यांनी मात केलेली आहे. भीखारामसारख्या माणसांना भेटल्यावर मनाला एक प्रकारची उभारी येते. All is not Well’ हे जरी खर असलं तरी ‘All is not over YET’ असा एक दिलासाही मिळतो!

12 comments:

  1. अश्या लोकांच्या जिद्दीबद्दल नेहमीच कौतुक वाटत ..
    सुंदर झालाय लेख ..

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिलंयत..

    >> भीखारामसारख्या माणसांना भेटल्यावर मनाला एक प्रकारची उभारी येते

    तुमचं लेखन वाचूनही तशीच उभारी येते मनाला !

    ReplyDelete
  3. आभार लीना. खरच, अशा लोकांकडून आपल्याला खूप शिकता येत!

    नेहमीप्रमाणेच आभार हेरंब!

    ReplyDelete
  4. Kharach ubhari yete.. asha bhikharamna konatya adachani/awhanana samore jawe lagate, ani tyatunahee te tag kase dharun rahatat, kimbahuna tawun sulakhun nighatat ka - kase, ase prashnahee padale..

    Bakee kay nimittane ya gawanmadhe phirane hote ahe?

    Best..

    ReplyDelete
  5. सीमा,
    नक्की कोणती सीमा हे कळल नाही blogger profile उघडत नसल्यामुळे, जरी भाषेवरून अंदाज येतोय :-)
    हो ना, मलाही असे प्रश्न पडतात या लोकांकडे पाहिल्यावर!
    बाकी काम काय होत वगैरे मेलमध्ये सांगते.

    ReplyDelete
  6. खरंच मनाला उभारी येते..
    >>All is not Well’ हे जरी खर असलं तरी ‘All is not over YET’ असा एक दिलासाही मिळतो!
    +१

    ReplyDelete
  7. >>>> भीखारामसारख्या माणसांना भेटल्यावर मनाला एक प्रकारची उभारी येते. All is not Well’ हे जरी खर असलं तरी ‘All is not over YET’ असा एक दिलासाही मिळतो!

    अगदी पटलं...

    ReplyDelete
  8. विद्याधर, तन्वी, तुम्हालाही अशी माणसं भेटल्यावर, त्यांच्याबद्दल वाचल्यावर बरं वाटत - हाच तर आपल्याला जोडणारा धागा आहे.

    ReplyDelete
  9. खरंच मनाला उभारी येते..
    >>All is not Well’ हे जरी खर असलं तरी ‘All is not over YET’ असा एक दिलासाही मिळतो!
    +100

    आणि माणसाच्या मनात जिद्द असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत लक्ष्य साधण्याचा प्रयत्न सोडत नाहीच. हे फार महत्वाचं. त्यातूनच अशी माणसे घडत राहतात.

    ReplyDelete
  10. भानस, प्रतिकूल परिस्थितीतल्या माणसांची जिद्द हा मला नेहमीच एक चमत्कार वाटतो.

    ReplyDelete
  11. खर आहे,तुमच लेखन वाचूनही तशीच उभारी येते मनाला ..All is not over yet..अश्या भिखारामांची संख्या खरच वाढायला हवी ...

    ReplyDelete
  12. आभार देवेन. मला वाटत असे भीखाराम खूप आहेत - आपण त्याना शोधायला कमी पडतो!

    ReplyDelete