ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, June 28, 2012

१३०. इंद्रधनुष्य

जून महिना संपत आला तरी पाऊस अद्याप हुलकावणी देतो आहेच. पण अशा वेळी मला हमखास आठवतं ते माझं एक स्वप्न! तीनेक वर्षांपूर्वी अशाच एका पावसाची वाट पाहणा-या जूनच्या अखेरच्या दिवसांत मला पडलेलं ते स्वप्न ...

त्या दिवशी मी स्वतःशीच हसत उठले. अशी जाग येणं म्हणजे मला एखादं मस्त स्वप्न पडलेलं असण्याचं (आणि अर्थात आयुष्य सुखी असण्याचं) लक्षण आहे. काय स्वप्न पडलं होत मला त्या दिवशी? तर माझ्या हातांत इंद्रधनुष्य होतं - त्याला मी स्पर्श करत होते, ते माझ्या हातात असण्याची मला स्वच्छ आणि स्पष्ट जाणीव होती, त्याचा स्पर्श मला जाणवत होता आणि मी त्याच्याशी बोलत होते. स्वाभाविकच मी एकदम मजेत होते, मी हसत होते, मी आनंदात होते आणि मला एकदम सगळं काही 'भरून पावलं आहे' असं वाटत होतं...

माझी बहुतेक स्वप्नं मायावी असतात आणि त्यात वास्तवापेक्षा कल्पनाशक्तीची भरारी असते. पण हे स्वप्न मात्र वास्तवाच्या बरंचसं जवळचं होतं असं मी म्हणू शकते. कारण त्यावेळी नुकतीच मी हातभर अंतरावरून इंद्रधनुष्य पाहून आलेली होते!!

तसा तो नेहमीचाच एक दिवस होता - असं निदान दिवसाच्या सुरुवातीला तरी मला वाटलं होत. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या एका दुर्गम खेडयात मी माझ्या सहका-यांसह कार्यालयीन कामासाठी गेले होते. काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं आणि मग आम्ही एका धरणावर गेलो. आकाश ढगाळ होतं त्यामुळे पावसाची आशा होती सगळ्यांना. पण खर तर जूनचा शेवटचा आठवडा आला तरी पाऊस अद्याप इकडे फिरकलाच नव्हता. सगळेजण अगदी डोळ्यांत प्राण आणून पावसाची वाट पहात होते.

पाऊस नाहीच आला त्या दिवशी. धरणात पाणीही अगदीच कमी होतं. पण धरणाच्या परिसरात भटकताना मला अगदी हाताच्या अंतरावर हे असं इंद्रधनुष्य दिसलं

आयुष्यात अशक्यप्राय वाटणा-या गोष्टी घडण्याची शक्यता नेहमीच असते. मला सगळ्यात मजा याची वाटते की अशा गोष्टी जेंव्हा कधी घडतात तेंव्हा त्यात (ती घटना घडण्यात) माझी भूमिका अगदी नगण्य असते. अशा अशक्यप्राय घटना म्हणजे मला मिळालेली एक देणगी असते - त्यात परतफेडीची काही अपेक्षा नसते, परतफेडीची सक्ती नसते.. निसर्गासमवेत असताना मी देणार कोणं - घेणार कोण, द्यायचं किती - घ्यायचं किती - असे सगळे हिशोब नकळत पार विसरून जातेच. एका अर्थी निसर्ग मला अहंकाराच्या ओझ्यापासून काही क्षण का होईना मुक्त करतो. मी जशी आहे तसं असायची मोकळीक मला निसर्ग देतो आणि मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारण्यातला आनंद पण मला तो शिकवतो - कारण निसर्ग माझ्याकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. मी कशीही असले (आणि खरं म्हणजे असले किंवा नसले) तरी त्याला काही फरक पडत नाही. ते इंद्रधनुष्य मी असण्यानं काही अधिक सुंदर दिसत नाही, आणि मी नसण्यानं त्याच काहीही बिघडत नाही. निसर्गाशी असणार नातं म्हणून आपल्याला मुक्त करणारं असतं!

त्याउलट माणसांच्या नात्यांत देवघेव, अपेक्षा जास्त. ही अपेक्षा फक्त पैशांची किंवा भेटवस्तूंची नसते - ती असते  प्रेमाची, आदराची, कौतुकाची.. जे जे काही आपल्याला मिळत ते कोणत्या ना कोणत्या रूपांत परत करावं लागतं. तुम्ही घेणं नाकारलं तर 'आढयताखोर' असा शिक्का बसतो, आणि देण नाकारलं तर तुम्ही 'कृतघ्न' ठरता. अगदी खास वाटणारी, जवळची नाती याला अपवाद असतात असं मानायचं कारण नाही, कारण खास जवळीकीच्या नात्यांतल्या अपेक्षाही तितक्याच आवेगाच्या असतात असा अनुभव तुम्हा-आम्हा सर्वांनाच आहे. जितकं नात उत्कट, तितकी मोजावी लागणारी किंमत अधिक, तितकी त्यातली सुखाची आणि दु:खाचीही अनुभूती तीव्र!!

निसर्ग मात्र माझ्यासाठी काही केल्याचा दावा कधी करत नाही - पण तरी तो मला अपार आनंद आणि समाधान देतो. माझ्या क्रिया-प्रतिक्रियांची त्याला चिंता नसते - दखलही नसते. मी कसं जगायचं याचे निर्णय त्याने माझ्यावर सोपवलेले असतात - माझं स्वातंत्र्य अशा रीतीने अबाधित राहत. सूर्य उगवतो आणि मावळतो - माझ्या अस्तित्वाची त्याला पर्वा नाही. माझ्या जन्मापूर्वीही तो उगवत होता, आणि मी मेल्यानंतरही तो उगवत राहील. मी त्याच्याकडे पाहते आहे की नाही, मला आनंद होतो आहे की नाही अशा गोष्टी त्याच्या खिजगणतीत नसतात. पाऊस त्याला पाहिजे तेंव्हा येतो आणि त्याच्या मर्जीने गायब होतो. मी त्याला काहीही हुकूम देऊ शकत नाही.

पण हे दोन्ही बाजूंनी आहे. तेही कोणी मला काही हुकूम देत नाहीत. आम्ही एकमेकांकडून अपेक्षाही ठेवत नाही - पावसाने आलं पाहिजे अशी मी त्याची कधी वाट पहात नाही पण तो आला की मला आनंद होतो. आम्ही फक्त एकमेकांसमवेत  - जेंव्हा कधी असतो तेंव्हा - जगतो इतकंच! मी निसर्गाची - पाऊस, सूर्य, वारा, आकाश, झाडं .. यांची - सोबत न घेता जगायचं ठरवलं तर त्याला ते कुणीच आक्षेप घेत नाहीत. ते मला कोणत्याही त-हेचं भावनिक आवाहन करत नाहीत की ते मला 'आमच्याशिवाय कशी जगशील ते पाहतोच' अशा थाटाच्या धमक्या देत नाहीत. आम्ही एका 'काल-मिती'त एका वेळी आहोत. सृष्टीमधली कोणतीही गोष्ट माझ्यावर अवलंबून नाही यात एक फार मोठी मोकळीक आहे माझ्यासाठी. त्यातून मला क्षणभर का होईना माझ्या अहंकाराची झूल उतरवून ठेवण्याची संधी मिळते. त्यातून मला विस्तारण्याची संधी मिळते. निमिषमात्र मला जणू सभोवतालाशी एकरूप होता येत ते निसर्गाच्या या तटस्थ वृत्तीमुळेच!

असं जून महिन्यातलं पावसाची वाट पाहण्याच्या काळातलं अनपेक्षित भेटणार इंद्रधनुष्य पहायला मिळणं हा एका अर्थी नशीबाचा भाग आहे हे मला मान्य आहे. अशा वेळी जे आहे त्या सगळ्याबद्दल कृतज्ञता वाटते आणि जे नाही त्याची उणीव पुसून टाकली जाते.

आणि कधीकधी तर मला हे सगळ जगणंच स्वप्नवत वाटायला लागतं......
जणू फक्त स्वतःच्या 'असण्यासाठी' असलेलं ..
इतरांच्या साद-प्रतिसादाची वाट कधीही न पाहणारं ..
इंद्रधनुष्यासारखं रंगीबेरंगी...
ऐन दुष्काळातही उमलणारं ...
अशक्यप्राय शक्यता असलेलं ........

**

12 comments:

  1. chhan lihile aahe,, aani indradhanushya tar khup goad disat aahe,, mi pan 2 /3 vela indradhanushya baghitli aahet,, te baghtana jo anand asto na to tar agdi AvarNiya asto ! ho na? :) sorry aadhichi comment chukun vinayakchya navane geli hoti mhanun delete keli

    ReplyDelete
  2. विचार खूप आवडला. 'सृष्टीतील कोणतीही गोष्ट माझ्यावर अवलंबून नाही' हे फारच आवडलं !!! मी जिवंत आहे काय आणि नाही काय...काहीही फरक पडणार नाही आहे....पाऊस तसाच भिजवून जाणार आहे...आणि इंद्रधनुष्य तशीच कमान धरणार आहे ! लिखाण खूप सकारात्मक वाटलं. आणि सकाळी सकाळीच वाचल्यामुळे एकदम छान ! आता वर्तमानपत्र वाचायचं धाडस करते ! :)

    ReplyDelete
  3. मस्तच. अनुभूतीच्या प्रत्येयाला नेमकं शब्दात पकडलं आहे. आभारी.

    ReplyDelete
  4. लेखन आवडलं.

    ReplyDelete
  5. रोहिणी, हो इंद्रधनुष्य दिसण्याचा आनंद काही औरच असतो .. आपण वयाने कितीही वाढलो तरी!

    अनघा, आपलं जगण आपल्यापुरत(च) महत्त्वाचं असतं - इतक भान आलं की एक प्रकारची सुटका होते अनेक साचेबद्ध संकेतांमधून!!

    कमलेश, तुम्हाला पण असाच एखादा अनुभव आठवला असं दिसतंय...

    अनामिक/का, आभार.

    ReplyDelete
  6. अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच चपखल शब्दांची निवड !! सुंदर लेख

    ReplyDelete
  7. khup chhan! kharach nisargat indradhanushya dishana hi ek adbhut ghatana ahe.khup varsht i.d pahile nahi.jevanhi unhacha paus padto tevha tak lavoon akasht baghat rahate i.d disava mahnun. ani ho philosophical view pan avadla.kharach apan aso kinva naso nisargala kahich pharak padat nahi. sthitapragnya asatona!

    ReplyDelete
  8. हेरंब,आभार. अनुभवच असा होता तो ...

    अनामिक/अनामिका, आभार. हो, इंद्रधनुष्य पहावं असं ठरवून ते दिसत नाही .. निसर्गाशी असणार नातं असं कोणत्याच चौकटीत बांधता येत नाही हेच तर त्याच वैशिष्टय आहे.

    ReplyDelete
  9. निव्वळ अप्रतिम.. विकांताची सकाळ सार्थकी लागली :) :)

    ReplyDelete
  10. आभार, सुहासजी.

    ReplyDelete
  11. आजच्या, म्हणजे भर पावसाच्या दिवशी, ही पोस्ट वाचायला मला सुचणे हा एक सुंदर योगायोग म्हणायला हवा.

    ReplyDelete
  12. श्रीराज, आला का पाउस अखेर तुमच्याकडे? बरं झालं :-)

    ReplyDelete