ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, October 14, 2010

४८. निमित्तमात्र दिल्ली : भाग १

आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक.....

दिल्लीला यापूर्वीही अनेकदा गेले होते. चांगली दहा दहा दिवस राहिलेही होते. पण तरीही यावेळचे दिल्लीला जाणे थोडेसे वेगळे होते. कारण सगळे ठीकठाक जमले तर वर्षभर दिल्लीत राहण्याचा माझा इरादा होता. तसे पाहायला गेले तर, पुण्यात तरी माझे काय होते? एके दिवशी अशीच पुण्यात आले होते. मग राहिले, ओळखी झाल्या, नाती जुळली. तसेच दिल्लीत गेले की आजही ओळखी होतील, नाती जुळतील .. हे मला अनुभवाने माहिती होते. आणि नाहीच जमले ते तर दिल्लीत राहिलेच पाहिजे अशी काही माझ्यावर सक्ती नव्हती.

पहाटे चार वाजता माझा मित्र आणि त्याची मुलगी माझ्या घरात होते. त्याच्या गाडीतून अर्ध्या तासात आम्ही विमानतळावर पोचलो. बोर्डिंग पास घेतल्यावर खिडकी मिळाली आहे हे पाहिल्यावर मला आनंद झाला. मला विमानप्रवास फारसा आवडत नाही. इथं माणसं एकमेकांशी बोलायला उत्सुक तर सोडाच तयारही नसतात. त्यामुळे या प्रवासात गप्पा होत नाहीत. खिडकीची जागा मिळाली तर मस्त ढग दिसतात – मग प्रवासाचा कंटाळा येत नाही.

 इतक्या वेळा विमान प्रवास केला आहे मी - पण पहाटेच्या प्रवासात खिडकीची जागा मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग. उगवत्या सूर्याची किरणे हळूहळू आकाशभर पसरत जाताना जणू मलाही प्रकाशमान करून गेली. मनातले सगळे प्रश्न, सगळ्या शंका नाहीशा झाल्याचा अनुभव मला आला (- तो काही काळच टिकला ते सोडा!) आपण परत एकदा नि:शंक आनंदात असू शकतो, ती क्षमता आजही आपल्यात आहे हाही मला एक दिलासा होता.

दिल्ली जवळ आल्यावर यमुनेने विळखा घातलेला भूप्रदेश विमानातून दिसला. दूरवरून ते चित्र देखणं दिसत होतं - पण त्यात जे अडकले असतील त्यांची काय अवस्था असेल तेही समजत होतं. कोणत्याही परिस्थितीपासून आपण काय अंतरावर असतो, त्यावर आपल्या भावना अवलंबून असतात – म्हणून आपल्या भावनांबाबत, विचारांबाबत एका मर्यादेपल्याड आपण फार आग्रही असू नये याची जाणीव पुन्हा एकदा झाली.

विमानतळावरून बाहेर पडताना मी दिल्लीचा नकाशा घेतला. दिशांचे माझे अज्ञान लक्षात घेता, मला नकाशाचा फार काही उपयोग करता येईल अशी माझीही अपेक्षा नव्हती. पण पुढच्या दहा बारा दिवसांत मला नकाशाचा वापर करून, फारशी कोणाची मदत न घेता दिल्लीत व्यवस्थित फिरता आलं. माझ मलाच आश्चर्य वाटलं. स्वभावाला औषध नसतं वगैरे काही नाही - स्वभाव बदलतात, फक्त तशी वेळ यावी लागते. माझ्या दिल्ली वास्तव्यातल्या आठवडाभरात मेट्रो स्टेशनवर एका दिवसात मी तीन लोकांना राजीव चौकात गाडी बदला, केंद्रिय सचिवालयात व्हायोलेट लाईन घ्या, ही गाडी इथ टर्मिनेट होईल, दुस-या फलाटावर जा .. असं सांगितलं (अर्थात त्यांनी विचारल्यावरच!) तेंव्हा माझी मलाच गंमत वाटली. मी दिल्लीत पोचले आणि मेट्रोत स्त्रियांसाठी राखीव डबा सुरू झाला (हा केवळ योगायोग!) - त्यामुळे माझा प्रवास ब-यापैकी सुखावह होतो. इथे मुंबईच्या लोकल प्रवासाचा दांडगा अनुभव कामी आला. अर्थात दिल्ली मेट्रो म्हणजे मुंबई लोकल ++ असं प्रथमदर्शनी तरी माझ मत झालं आहे. पुढचं पुढे!
एखाद्या नव्या ठिकाणी आपण जातो, तेव्हा आपल्या ओळखी कशा होतात? म्हणजे आपलं नाव, आपलं त्या संस्थेतलं पद, आपलं शिक्षण या गोष्टी महत्त्वाच्या असतातच, पण त्याहीपेक्षा छोटया-मोठया गोष्टींतून लोक आपल्याला तपासून पाहत असतात, आपल्याबद्दल मत बनवत असतात. ही प्रक्रिया अर्थातच एकतर्फी नसते - आपणही तेच करत असतो. त्यातून मग ’कामाच्या पलिकडची’ - म्हणजे अनौपचारिक नाती निर्माण होण्याची प्रक्रिया आकाराला येते.

मी पहिल्या दिवशी सकाळी विमानतळावरून थेट कामाच्या ठिकाणी पोचले होते. संध्याकाळी बाहेर पडताना आता नेमकं कोणत्या दिशेनं, कोणत्या रस्त्यानं बाहेर पडावं असा माझा संभ्रम चेह-यावर दिसत असणार. कार्यालयातून बाहेर पडणा-या एका स्त्रीने मला विचारलं, “कुठं जायचेय तुला?” (हे तिने इंग्रजीत विचारले सुरूवातीला - मग आमचा संवाद इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये होत राहिला,) मी सांगितल्यावर ती म्हणाली, “मलाही तिकडेच जायचे आहे. आपण टॅक्सी शेअर करू.” पत्ता शोधावा लागणार नाही याचा मला आनंद झाला. मी अर्थातच टॅक्सीचे निम्मे पैसे तिच्याकडून घेतले नाहीत. मी एकटी गेले असते तर मला लागलेच असते तितके पैसे असा माझा साधा विचार होता. पण तिला माझ्या या वागण्याचं अत्यंत अप्रूप वाटलं.

पुढचे तीन दिवस  यामिनीने रोज मी राहत असलेल्य़ा ठिकाणापासून कार्यालयापर्यंत आणि नंतर पुन्हा घरापर्यंत तिच्या स्वत:च्या गाडीतून अत्यंत प्रेमाने मला सोडलं. नंतर मी दुसरीकडे राहायला गेले आणि मेट्रोने प्रवास करायला लागले. दिल्लीतल्या पहिल्या दिवशीच एक नातं - निरपेक्ष मैत्रीच ना्तं निर्माण झालं. अशी नाती पुढच्या दहा दिवसांत आणखीच जुळत गेली. माझी राहण्याच्या जागेची व्यवस्था होत नाही हे कळल्यावर ’तू काही काळजी करू नकोस. माझ्या घरी चल राहायला’ असं म्हणणा-या शीना आणि उमा भेटल्या. मैत्रिणीची मैत्रीण असलेल्या हिमजाने फोन करून माझी चौकशी केली. ’एवढ तर आम्ही केलचं पाहिजे’ असं म्हणणारा दीपंकर भेटला, सौरभ भेटला. शामजी भेटले. जुन्या ओळखीतले तीन मित्र आणि एक मैत्रीण भेटले. माझ्या तीनही टीमच्या वरिष्ठ अधिका-यांनी मदत केली. आठवडाभर मी जिथे राहिले तो अरविंद आश्रम तर मला परका वाटलाच नाही. त्यामुळे ’दिल्लीत माझ्या ओळखीच कोणी नाही’ हे वाक्य तिस-या दिवसापासून मला बोलता आलेलं नाही. या शहरातही मला अनेक चांगली माणसं भेटणार आहेत, मी या शहराशी जोडली जाणार आहे अशी ग्वाही पहिल्या तीन चार दिवसांत मला मिळाली.

दिल्लीत सुरक्षा तपासण्यांना मात्र सारखे सामोरे जावे लागते. किंबहुना दिल्लीच्या वास्तव्याचा तो अविभाज्य भाग आहे. रोज मेट्रो स्थानकात (दोन वेळा - सकाळी जाताना आणि संध्याकाळी परतताना) सुरक्षा तपासणी होते. शिवाय कार्यालयात प्रवेश करतानाही. ते आता रोजचेच कर्मकांड बनल्याने त्यात फारसे गांभीर्य राहिलेले नाही. म्हणजे हौज खास मेट्रो स्थानकात दोन दिवस सकाळी महिला सुरक्षा रक्षक नव्हतेच. त्यामूळे तपासणी न होताच माझ्यासारख्या अनेक स्त्रिया स्थानकात प्रवेश करत होत्या. एखादा दहशतवादी गट अशा गोष्टी बारकाईन पाहत असणारच. दहशतवादी गटांत स्त्रियाही काम करतात – हे सगळे आपल्याला माहिती आहे. तरीही आपण असला बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा करतो. अनेकदा त्याची किंमत मोजूनही आपण शहाणपण शिकलेलो नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. माणसांच्या जीवनाचं आपल्याला मोल नाही हेच खरं!

कॉमनवेल्थ हा दिल्लीतला चर्चेचा विषय होता. त्यात भर पडली अयोध्या निकालाची. या दोन्हीमुळे दिल्लीत जिकडे तिकडे संगीनधारी पोलिस दिसतात. वेगवेगळया ठिकाणी वाळूने भरलेल्या पोत्यांच्या थप्पीआड कधी दक्ष तर कधी कंटाळलेला पोलिस हे दृश्य जागोजागी दिसते. गडचिरोली ते चंद्रपूर प्रवासात रस्त्यावर, झाडांआड उभे असलेले शेकडो पोलिस मी एकदा पाहिले होते - तेव्हाची अस्वस्थता (माणसाचे जगणे किती असुरक्षित झाले आहे, याला प्रगती म्हणायचे का? - अशा विचारांतून आलेली अस्वस्थता) यावेळी जाणवली नाही. सगळयाच परिस्थितीची सवय होऊन जाते मनाला.

काही झाले तर ही व्यवस्था तरीही अपुरीच पडेल आणि आणखी काही माणसांचे जीव यात जातील – हे जणू मीही आता गृहीत धरले आहे. त्या जाणा-या माणसांत एक आपणही असू या भीतीच्या पल्याड आता महानगरातले लोक गेले आहेत. ’जो वाचला तो जगतो’ असा आमचा नियम बनला आहे आणि मेलेल्यांसाठी मेणबत्त्या वगैरे लावून प्रार्थना केल्या की आम्ही आमच्या कर्तव्यातून मोकळे होतो. सगळ्याच गोष्टींचे कर्मकांड बनवण्यात आपण समाज म्हणून अगदी पटाईत आहोत.

केंद्रिय सचिवालय स्थानकात फलाटावर दोन महिला सुरक्षा रक्षक एकमेकींशी बोलत होत्या. त्यांच्या वजनापेक्षा त्यांच्या हातात असलेल्या संगीनीचे वजन जास्त असेल. त्या दोघी मला माहिती नसलेल्या भाषेत बोलल्या. त्या दोघींच्या चेह-यावरून त्या अरूणाचल – मेघालय भागातल्या असाव्यात असे वाटले. मी सहज "तुम्ही कोणत्या भाषेत बोललात आता?” असे एकीला हिंदीत विचारले. त्यावर ती नुसतीच हसली. मग तोच प्रश्न मी तिला इंग्रजीत विचारला, त्यावरही ती नुसतीच हसली. तिला त्या दोनही भाषा येत नाहीत असे तिने मला मानेने सूचित केले. आता हे खरं की खोटं देव जाणे! प्रवाशांशी बोलू नका, त्यांच्यात मिसळू नका अशा त्यांना कदाचित सूचना असतील – पण प्रवाशांशी बोलल्या नाहीत तर त्या काय मदत करणार त्यांना? आणि खरेच दोन्हीही भाषा येत नसतील – तर संकटकाळात त्यांची कोणाला मदत होणार? शिवाय प्रवाशांच्या संभाषणांतून काही धागेदोरे मिळवण्याची शक्यताही यांच्याबाबतीत पूर्ण मावळतेच. काय विचार असतो, काय प्रक्रिया असते या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेमागे आणि ती किती उपयोगी असते असे प्रश्न माझ्या मनात आलेच.

पहिल्या आठवडयात राष्ट्रपती भवनावरून मी किमान दहा वेळा गेले. श्री. वेंकटरमण राष्ट्रपती असताना मला त्यांना राष्ट्रपती भवनात भेटायची संधी मिळाली होती. डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना मी त्यांना लिहिलेल्या एका पत्राला त्यांनी अनपेक्षितपणे उत्तर दिले होते - या दोन्ही गोष्टी मला आठवल्या – त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन.. एका राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या एरवी फक्त असंख्य टीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून पाहिलेल्या कार्यालयातही मी एका संध्याकाळी गेले. एका वेगळ्या कोनातून त्या परिसराकडे पाहताना मजा आली.

शनिवारी मैत्रिणीच्या घरी जेवल्यावर आम्ही फिरायला बाहेर पडलो. हाताशी तिची गाडी आणि चालक होता - त्यामुळे बाहेर पडलो. “छत्तरपुरची देवळं पाहायला आवडतील का तुला?’ या प्रश्नावर मी होकार दिला. मला वाटलं हे बहुधा छत्रपुर नावाच जुन शहर असणार आणि तिथे काही जुनी देवळं पाहायला मिळतील. देवाकडं मी कधी काही मागत नाही पण मला देवळं पाहायला आवडतात. पण ही सगळी आधुनिक देवळं आहेत. कोणीतरी नागपाल नावाचे स्वामीजी होते - त्यांच्या अफाट संपत्तीच प्रदर्शन आहे तिथ – चांदीची भांडी, भरजरी वस्त्रं वगैरे. “जे लक्ष्मी त्यागतात त्यांच्याकडे लक्ष्मी येते" असा माझ्या मैत्रिणीने त्याचा अर्थ लावला, मी त्यावर अर्थातच वाद घातला नाही. दोन तीन गोष्टी तिथल्या विशेष लक्षात राहिल्या. एक म्हणजे जुन्या लाकडी रथावरचं अप्रतिम कोरीवकाम.; दुसरं म्हणजे त्या नागपाल स्वामींचा अत्यंत जिवंत वाटणारा पुतळा. आणि तिसरं म्हणजे शंकरासोबत अलंकारांनी सजलेल्या पार्वतीच चित्र. एरवी ’लंकेची पार्वती’ हा शब्दप्रयोग जास्त ऐकलेला.

मग कुतुब मिनारला गेलो. तिथ असंख्य कबरी आहेत – किंवा थडगी - या दोन शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे की नाही हे मला माहिती नाही; शोधावं लागेल. असंख्य पर्यटक होते तिथे आणि कशाचाही फोटो काढायचा म्हटलं तरी सारखं कोणी ना कोणी त्या फ्रेममध्ये येत होतं. ते सगळे अवशेष पाहताना ’एके काळी इथ काय धमाल वातावरणं असेल’ असा विचार मनात येत राहिला. त्या पडक्या अवशेषांची एक कथा असणार, पण ती मला समजली नाही. खरं सांगायच तर मी ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.

ती सगळी थडगी पाहताना थोडसं हसायलाही आल – कारण त्यावर नावंही नव्हती. आणि नुसती नावं वाचून काय कळत म्हणा? इतिहास ब-यापैकी विसरभोळा असतो. आपले पराक्रम, आपलं यश, आपली प्रतिष्ठा .. या सगळ्यासाठी आपण धावतो -पण ते सगळच फार क्षणिक असतं. या सगळयासाठी माणसाने धडपडू नये असं मला अजिबात म्हणायचं नाही. जगणं अधिक अर्थपूर्ण व्हावं यासाठी आपण सगळ्यांनीच सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत यात शंकाच नाही. पण तो करताना फार जास्त अभिनिवेश बाळगू नये.

सगळ्यात मला विशेष भावला तो अलई मिनार. १२९६ ते १३१६ या काळात अल-उद-दिन खलजी या राज्यकर्त्याने येथील मशिदीचा विस्तार केला. कुतुब मिनाराच्या दुप्पट आकाराचा अलई मिनार त्याने १३११ मध्ये बांधायला घेतला. पण त्याच्या मृत्युनंतर ते काम तसेच अर्धवट पडून राहिले आहे ते आजतागायत!  दुस-याची ईर्षा करून, दुस-याला कमी लेखण्यासाठी कोणतेच काम हाती घेऊ नये असा संदेश हे अपूर्ण राहिलेले स्वप्न देत आहे असं मला वाटलं. सत्ताधीशांचीही सगळीच स्वप्नं पूर्ण होतात असे काही नाही - असंही ते पाहताना जाणवलं

दिल्ली तस पाहायला गेलं तर थडग्यांच, कबरींच, समाध्यांच आणि स्मारकांच शहर आहे. अमर्याद सत्तेची किंमत मोजावी लागते, काळाच्या पडद्याआड गेलं की सगळेच अनामिक होऊन जातात याची आठवण हे शहर करून देतं. जीवनाच्या क्षणभंगुरतेची इतकी तीव्र जाणीव अशी जागोजागी क्वचितच एखाद्या शहराने जपली असेल. मला दिल्लीची ही तात्त्विक बैठक आजवर कधी लक्षात आली नव्हती. ती आता अधिक खोलात जाऊन समजाऊन घेणे हाच माझा पुढच्या काही महिन्यांतला कार्यक्रम असेल!

10 comments:

  1. बरेचदा आपण सगळेच कुठल्याही गोष्टीकडे पाहताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो, तद्वतच तुम्ही करता, पण तुमचे ते वेगळे दृष्टिकोन एकदमच वेगळे आणि वेगळ्या पातळीचे असतात. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे, असे एकाच गोष्टीकडे पाहण्याचे विविध कोन तुम्ही लेखनातूनदेखील अगदी परिणामकारकरित्या उतरवता.
    पुढच्या भागाची वाट पाहतोय!

    ReplyDelete
  2. >> एकाच गोष्टीकडे पाहण्याचे विविध कोन तुम्ही लेखनातूनदेखील अगदी परिणामकारकरित्या उतरवता.

    + १

    या ही लेखात एखाद्या घटनेकडे किती वेगवेगळया दृष्टीने बघता येऊ शकतं हेच तुम्ही दाखवून दिलं आहेत... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ..

    ReplyDelete
  3. दिल्ली (जुनी) किती जुने आहे?

    ReplyDelete
  4. विद्याधर, हेरंब आभारी आहे. पुढचा भाग कधी लिहीन, लिहीन का नाही हे माहिती नाही. त्यामुळॆ ’भाग १’ हे शब्द कदाचित फसवे असू शकतात. पण काही लिहिलच तर त्याला भाग २ म्हणता येईल इतकी सोय मी करून ठेवली आहे हे नक्की :-)

    Anonymous, काही महिन्यांपूर्वी मी भारतातील शहरीकरणाबद्दल वाचत होते, त्यात दिल्लीचा इतिहास मला मनोरंजक वाटला. माझा या विषयाचा अभ्यास नाही. पण काही वाचनात आलं, तर अवश्य कळवेन तुम्हाला .. तुमचे नाव आणि संपर्क कळला तर ते मी तुम्हाला कळवू शकेन.

    ReplyDelete
  5. ratya@mtnl.net.in (फक्त आपल्यासाठी)

    ReplyDelete
  6. Sharayu,
    Messages are bouncing back from the address you have provided here.

    ReplyDelete
  7. Good expressions.Somehow i managed to read Marathi.

    Diwali Greetings.

    Himja.

    ReplyDelete
  8. Thanks Himja for the visit and for taking time to express and share. I guess you have taken lot of efforts to read Marathi. May be, you would be more comfortable with reading my English blog!

    ReplyDelete
  9. मस्त. एकदम clear reporting. मजा आली. समोरासमोर आल्यावर,‘दिल्लीच्या गंमती सांग ना’, असं म्हणायची सोयच नाही उरली.

    ReplyDelete
  10. तरीही पुष्कळ गमती उरतात .. सगळ काही लिहिता येत नाही!

    ReplyDelete