ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, July 3, 2010

३३. यशस्वी माघार

खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते.

वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते? कारण बहुसंख्य लोकांच्या भावना अशा कृतींशी जोडल्या गेलेल्या असतात. ’त्या कृती निरर्थक आहेत’ असे म्हटले तर संवाद सुरू होण्यापूर्वीच थांबतो, अशा अनुभवातून पोळले गेल्यानंतर मी ही तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे.

ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो. यातून कदाचित ’व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे. आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते. पण सार्वजनिक जीवनात देवदेवतांच्या, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत ही विभागणी पटत नसली तरीही मी मान्य केली आहे. एका अर्थी समाजाने 'माघार कशी घ्यायची असते’ याबाबत माझे केलेले दीर्घकाळचे हे शिक्षणच आहे म्हणा ना!

समाजात वावरताना ’धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतात, पुरूष धार्मिक असतात, लहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात. काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो. जीवनाच्या सर्वांगाला व्यापून असणा-या धार्मिकतेला स्पर्श न करता काम करणे अवघड; आणि तिला छेद देऊन काम करणेही तितकेच अवघड!

काही अनुभव

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक छोटे गाव. आमचा एक प्रकल्प तेथे चालू होता. परसबाग लागवड हा त्यातील एक उप-कार्यक्रम. घराच्या अंगणात, परसात सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला लावायचा असा हा अगदी साधा आणि छोटा कार्यक्रम. स्त्रियांमधले कुपोषण कमी करण्यासाठी परसबाग उपयोगी पडते असा आजवरचा अनुभव. पण परसबागेचा उपक्रम तेथे काही केल्या नीट चालत नव्हता. फक्त पावसाळ्यात चार महिने परसबाग असायची आणि नंतर ती नाहीशी व्हायची. स्त्रियांच्या एका समूहाबरोबर याच विषयावर बोलायला मी आले होते.

’पावसाळ्यानंतर पाणी नसते आणि म्हणून परसबाग मरते. पिण्याच्या पाण्यासाठीच मग वणवण असते, झाडांना कोण पाणी घालणार?’ असे स्त्रियांचे मत पडले. परसबागेला वेगळे पाणी घालण्याची गरज नाही असे मी त्यांना समजावून सांगत होते. आम्ही बसलो होतो त्या पडवीतून मला समोर एक अर्ध्या भिंतीची मोरी दिसली. 'या मोरीतल्या आंघोळीच्या पाण्यावरही भाज्या वाढतील’ असे मी म्हटल्यावर बैठकीत क्षणभर सन्नाटा पसरला. एक तरूण स्त्री तिचे हसू काबूत राखू शकली नाही, ती खुदकन हसली. अनेकींच्या चेहर-यावर स्मित झळकले. “दीदी हमको बच्चा कम करनेका तरीका बता रही है", असे एकीने मोठयाने म्हटल्यावर त्या सगळ्याजणी खिदळायला लागल्या.

माझ्या बोलण्यामुळे नेमका काय विनोद झाला हे मला समजले नव्हते. त्यांच्या शेरेबाजीचा संदर्भ मला कळत नव्हता. “मी काही चुकीचे बोलले का?” या माझ्या प्रश्नावर हसण्याची आणखी एक जोरदार लाट आली. एका प्रौढ स्त्रीने मग मला ओढत एका कोप-यात नेले आणि ती मला रागावून म्हणाली, “औरतोंकी माहवारी के नहाने के पानीपर उगी सब्जिया हमारे मर्द खायेंगे, तो उनकी मर्दानगी कम नही होगी क्या? तुम शहरके लोग कुछ समझते नही हो, और आते हो हमे पढाने के लिये! यहा तुम्हारा यह कार्यक्रम नही होगा, अभी दुसरा कुछ बताना है तो बताओ, नही तो मीटिंग खत्म करके मेरे घर चाय पीने चलो".

प्रजननात्मक आरोग्यावर काम केल्याशिवाय परसबाग यशस्वी होणार नाही हा त्या स्त्रियांनी मला शिकवलेला एक धडा! विकास कार्यक्रमाचा जीवनविषयक दृष्टिकोनाशी - त्याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार – संलग्न असलेला हा पैलू तोवर माझ्या कधी ध्यानातच आला नव्हता. जे करायचे ते संदर्भ लक्षात घेऊन, लोकांच्या विचारांना सामावून घेऊन करायला शिकणे भागच असते अशा वेळी. कधी कधी मनात असलेले सगळे करायला जमत नाही, याचाही स्वीकार करावा लागतो.

खूप वर्षांपूर्वी अरूणाचल प्रदेशात गेले होते. गावात गेले की एखादे घर गाठायचे आणि बैठक मारायची. हळूहळू इतर माणसे जमा होत. पुरूष येत तशा स्त्रियाही येत, मुले मुली तर अगणित जमा होत. माझी भाषा त्यांना कळत नसे आणि त्यांची मला. सहकारी कार्यकर्ता दुभाषाचे काम करे, त्यामुळे संवादाची गती आपोआप कमी राही. मला शांतपणे निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळत असे. अगदी मजेदार दिवस होते ते.

पहिल्या बैठकीत माझ्यासमोर एका पेल्यात पेय आले. माझ्या खाण्यापिण्याच्या फारशा आवडीनिवडी नाहीत. जेथे जाईन तेथले पदार्थ खाऊन बघायचे, त्याबद्दल जरा माहिती घ्यायची अशी माझी साधारण पद्धत. त्यानुसार मी त्या समोर आलेल्या पेयाचे नाव विचारले. त्यावर ’अपांग’ असे उत्तर आले, ज्यातून मला काहीच अर्थबोध झाला नाही. मी ते पेय घेणार तेवढयात माझ्या सहका-याचा चेहरा मला दिसला आणि मी पेला खाली ठेवला. 'कडू काढा वगैरे आहे की काय?’ असे मी त्याला गंमतीने विचारले. तो भयंकर गंभीरपणे मला म्हणाला, “दारू आहे ती".

आता नेमके काय करावे हे मला सुचेना. त्या आदिवासींनाही काही सुचेना. जमलेल्या सगळ्यांचे डोळे एका वृद्ध माणसाकडे वळले. वातावरणातील ताण हलका करण्यासाठी मी 'अपांग कशी करतात?’ असा प्रश्न विचारला, त्यावर एका युवकाने मला उत्साहाने दहा मिनिटे माहिती दिली. मी मग त्यांना शांतपणे म्हटले, “अपांग घ्यायला आवडली असती मला, पण आज ती मी नाही घेतली तर चालेल का तुम्हाला?”

तो वृद्ध गृहस्थ त्याच्या भरदार आवाजात म्हणाला, “ ती दारू आहे म्हणून तू ती घेणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. पण तुला एक घोट तरी घ्यावाच लागेल. आलेल्या पाहुण्याला अपांग नाही पाजली तर आमचे पूर्वज कोपतील आणि आमच्या गावावर संकटे कोसळतील.” मी बराच वेळ त्याच्याशी बोलत होते. पण त्याने अखेर निर्वाणीचा इशारा दिला, “ तुला जसा तुझा धर्म आहे, तशी आम्हालाही आमची परंपरा आहे. आमच्या गावात तुला आमची परंपरा पाळावी लागेल. ही परंपरा न पाळण्याने तुझे काही नुकसान नाही होणार, पण आमचे होईल. यासाठीच तू आमच्याकडे आलीस का?” दुस-या बाजूने मी अपांगला स्पर्शही करू नये असा माझ्या सहका-याचा आग्रह. अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले. काही राखायचं तर काही गमवावं लागतं --- हा मला मिळालेला आणखी एक धडा.

भारतीय रेल्वेची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे गाडयांची नावे. पुष्पक, ज्ञानगंगा, झेलम, इंद्रायणी, राप्ती सागर ….अशा नावांच्या गाडयांतून प्रवास करताना जणू तो इतिहास आणि भूगोल आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. जम्मू ते कन्याकुमारी या गाडीचेही 'हिमसागर एक्स्प्रेस’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. कार्यकर्त्यांच्या एका समूहात या गाडीला ’विवेकानंद एक्स्प्रेस’ असे नाव देण्याबाबत, तसा विनंतीअर्ज रेल्वेकडे पाठवण्याबाबत अत्यंत गंभीरपणे चर्चा चालू होती. मी ’हिमसागर’ हे नाव कसे अधिक चांगले आहे, व्यक्तीचे नाव गाडयांना न देण्याची रेल्वेची भूमिका कशी योग्य आहे, विवेकांनंदाचे मोठेपण असल्या भौतिक गोष्टींवरून ठरत नाही ….असे अनेक मुद्दे मांडले. पण मला आठवते तसे त्याही चर्चेची सांगता 'हिला विवेकानंदबद्दल काही आदर नाही’ अशीच झाली होती. तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाही, पण ते तसे आहे खरे! काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले.

कर्नाटकमध्ये बचत गटाची बैठक एका देवळात ठेवली म्हणून गटाची अध्यक्षच बैठकीला येऊ शकली नाही - कारण त्यावेळी तिची मासिक पाळी चालू होती. राजस्थानमधील एका छोटया गावातील प्रशिक्षणात 'मुलगा व्हावा’ म्हणून उपवास करणारी सहा महिन्यांची गर्भवती, सातपुडयच्या अक्राणी परिसरात अश्वत्थामा दिसल्याचे सांगणारा आदिवासी म्हातारा, बाळाला लस टोचली तर देवतेचा कोप होईल म्हणून घरात लपून राहणारे आदिवासी....असे कितीतरी प्रसंग आठवतात. या सगळ्यातून वाट काढत चालायचे तर दमछाकही होते.

सकारात्मक बाजू

पण देवदेवतांवरील लोकांच्या श्रद्धेबाबत केवळ एवढेच लिहिणे एकांगी होईल. कोणाला पटो अथवा ना पटो, पण या सगळ्याला एक सकारात्मक बाजू आहे. भले ती विचारांनी स्वीकारलेली जीवनशैली असेल किंवा नसेल, पण याच श्रद्धेतून समाजात काही चांगले बदलही होताना दिसतात.

उदाहरणार्थ, शहरांत दारू पिण्याला प्रतिष्ठा मिळताना दिसते आहे. पूर्वी गावाच्या वेशीवर मंदिर असायचे; आता कोणत्याही गावात प्रवेश करताना दारूचे दुकान दिसते - अगदी सरकारमान्य दुकान! अशा परिस्थितीत एखादा आदिवासी पाडा जेंव्हा "आमच्या गावात दारू अजिबात नाही बरं ताई, आम्ही माळकरी आहोत" असे अभिमानाने सांगतो, तेंव्हा दूरच्या त्या विठोबाला 'अशीच कृपा राहू दे बाबा यांच्यावर’ अशी प्रार्थना मनात आपोआप उमटते.. घर सोडून दहा मैलांच्या पलिकडे न गेलेल्या स्त्रियांच्या समुहात जेंव्हा कोणीतरी ’त्रिंबकपर्यंत’ किंवा ’प्रयागपर्यंत’ जाऊन आल्याचे कौतुकाने सांगते तेंव्हा कुंभमेळ्याचा सामाजिक पैलूही समोर येतो. पूर्वजांची पूजा करणारे, त्यांच्या अधिभौतिक शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक नकळत समाजाचा इतिहास जपत असतात. देवाच्या आवारातली झाडे तोडायची नाहीत, अशा पारंपरिक नियमातून मोजक्याच ठिकाणी का होईना ’देवराई’ आत्ताआत्तापर्यंत जगली आहे. विशेषतः हिंदू धर्मातले बरेच सण निसर्गाची जाणीव करून देणारे आहेत. - त्यामुळे झाडे, डोंगर, नद्या, पशु, पक्षी.. … अशा निसर्गातल्या अन्य घटकांशी माणसांचे नाते जुळलेले आहे. प्रवासात वाटेत दिसणा-या नदीत पैसे टाकण्याची लोकांची लगबग मजेदार वाटली तरी एखाद्याच्या मनात ते करताना सर्वस्व अर्पण करण्याची भावना असू शकते हेही लक्षात घ्यावे लागते.

समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते.

देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते!

पूर्वप्रसिद्धी: विश्रांती दिवाळी अंक, २००९

6 comments:

  1. अतिशय सुंदर लेख .... !!! खूप आवडला...

    ReplyDelete
  2. grt...my father appreciates Hindi literature,i will show it to him

    ReplyDelete
  3. धन्यवाद हेरंब.

    Witty Jester, I hope your father knows Marathi too (this post is in Marathi) so that he can appreciate this post :-)

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लेख....देवदेवतांच्या निमित्ताने या अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात या अर्थाचा शेवटून तिसरा परिच्छेद पूर्ण पटला

    ReplyDelete
  5. अपर्णा, अनेक गोष्टींचा चांगला उपयोग करून घेता येतो, पूर्ण टाकाऊ अस काहीच नसत तर!

    ReplyDelete
  6. 'मिसळपाव' वरील प्रतिसाद - http://misalpav.com/node/35953

    ReplyDelete