ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 8, 2012

१२८. भारतीपुर

शिवपालगंजमधून निघाले ती मी पोचले थेट 'भारतीपुर'मध्ये. आधी उत्तरेतलं गाव पाहिलं होतं - एका अनुभवावरुन मत बनवायची घाई करायची नाही हा शिरस्ता पाळायचा म्हणून मग दक्षिणेतलं हे गाव. कसं आहे हे गाव? 

भारतीपुरचं पहिलं दर्शन काही विशेष वाटत नाही. देशाच्या कानाकोप-यात अशी खेडी पुन्हापुन्हा पाहिलेली आहेत. रस्त्याच्या कडेला उतारावर दाटीवाटीने उभा ठाकलेला बाजार; त्या सगळ्याला व्यापून असणारी ती चिरंतन दुर्गंधी; छोटया गल्ल्यांची गर्दी; त्या गल्ल्यांमध्ये कायम येणारा माणसांच्या लघवीचा वास; भिंतींवरच्या जाहिराती आणि अमक्याला मत द्या अशी आज्ञावजा विनंती करणा-या घोषणा; बाजारात इतस्ततः फिरणारी खेडयातली माणसं;  आई- वडिलांना न परवडणा-या खेळण्याचा किंवा खाऊचा हटट करणारी लहान मुलं.....रस्त्यावर एक शाळा आणि एक होस्टेल.. त्या शाळेच्या मैदानात खेळणारी मुलं ..., धूळ उडवत येणारी बस आणि बसमधून येणा-या परगावच्या भक्तांना पकडून त्यांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था करुन आपलं पोट भरणारी गावातली मंडळी आणि लांबूनही दिसणारे मंजुनाथच्या मंदिराचे शिखर! 

भारतीपुरच्या केंद्रस्थानी आहे 'मंजुनाथ'. याचा महिमा मोठा आहे. साक्षात परशुरामाने मंजुनाथाची स्थापना केली असं परंपरा सांगते. पित्याच्या आज्ञेवरुन परशुरामाने आपल्या मातेची हत्या तर केली (आणि वडिलांकडून वर मागून आईला परत जिवंतही केले) पण त्याच्या परशुवरचे रक्ताचे डाग पुसले जाईनात.  ते अखेर धुतले इथल्या नदीने - इतकं तिचं पावित्र्य. मंजुनाथाचा प्रभाव एवढा मोठा आहे की साक्षात देशाचे राष्ट्रपती इथं भेट देउन गेले आहेत नुकतेच. एकटे गांधीजीच होते जे मंजुनाथाच दर्शन न घेता गावच्या हरिजन वस्तीत जाऊन आले फक्त. बाकी मंजुनाथाला टाळण्याची कुणाची हिंमत नाही - कुणाच्या मनात तसा विचारही येत नाही. कुणी मंदिरात जायचं आणि कुणी जायचं नाही याचे कडक नियम आहेत; ते सगळे विनातक्रार पाळत आले आहेत. या मंजुनाथाच्या जोडीला डोंगरावरचा भूतनाथही आहे. मंजुनाथ आणि भूतनाथ यांची कथा म्हणजे प्राचीन काळी एका समाजगटाने दुस-यावर कशी मात केली याचा इतिहास आहे असं जोयिसच मत आहे.म्हणायला मंजुनाथ मोठा आहे भूतनाथापेक्षा. पण नाव मंजुनाथचं पण पूजा भूतनाथाची, त्याचा कोप होऊ नये याचीच काळजी सगळ्यांना अशी परिस्थिती आहे असाही एक तर्क आहे जोयिसचा. 

इंग्लंडमध्ये पाच वर्ष राहून जगन्नाथ परत आलाय भारतीपुरमध्ये. रस्त्यावरुन जाणा-या जगन्नाथला आदराने उठून नमस्कार करतात बाजारातले लोक ते त्याच्या इंग्लंड वारीमुळे नाही. जगन्नाथचे वडील इथले जमीनदार होते मोठे. जगन्नाथ लहान असताना मंजुनाथाच्या कृपेने जीवघेण्या आजारातून वाचला, म्हणून त्याच्या आईने मंजुनाथाला दिला आहे सोन्याचा मुकुट. मुलांचा रक्षणकर्ता अशी मंजुनाथची प्रतिमा अधोरेखित झाली ती जगन्नाथचे प्राण वाचण्यातून. तो मुकुट आता ठिकठिकाणी पूजा केल्या जाणा-या मंजुनाथच्या प्रतिमेचा अविभाज्य भाग आहे. या मंदिरातली प्रचंड घंटाही जगन्नाथच्या पूर्वजांनी दिलेली देणगी आहे. मंजुनाथ आणि जगन्नाथ यांच असं एक इतिहासातून आलेलं नात आहे - जे पंचक्रोशी जाणते. 

जगन्नाथ विचारांत आहे. त्याला वाटत की हा मंजुनाथ गावाला बदलू देत नाही, गावाच्या गळ्याला लागलेला हा जणू एक फास आहे; जोवर गावाची त्याच्या विळख्यातून सुटका होणार नाही, तोवर इथं काहीही होणार नाही. तसंच राहील हे गाव. इथं काहीतरी नवं घडवून आणायला पाहिजे अशी ऊर्मी जगन्नाथच्या मनात दाटते आहे. शतकानुशतके चालत आलेलं हे चक्र आहे इथल्या व्यवस्थेच, त्यात उलथापालथ घडवून आणायला हवी हे जगन्नाथला आतून जाणवत. 

इंग्लंडमध्ये असताना जगन्नाथने अनेक वैचारिक चर्चा केल्या आहेत. आपण बुद्धीजीवी आहोत फक्त, आपल्यात कृती करुन दाखवायची धमक नाही याचे त्याला वैषम्य आहे. त्याच्या आणि मार्गारेटच्या नात्याचा प्रवासही त्याला हेच सत्य सांगतो आहे. आपल्या नोकर-चाकरांमध्ये मिसळायचा, त्यांच जीवन जाणून घ्यायचा जगन्नाथ प्रयत्न करतो; पण त्यातून त्याच्या पदरी निराशाच येते. माणसांच्या जीवनाचे जे पैलू त्याला दिसतात त्यातून तो त्यांच्यापासून लांबच जात राहतो. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्याशी त्याच नात सांधलं जाऊच शकत नाही. तो अस्वस्थ आहे. 

जगन्नाथच्या मनात एक क्रांतिकारी कल्पना येते. गावच्या मातंगांना मंजुनाथच्या मंदिरात जायला परवानगी नाही- पण येत्या अमावस्येला मेळ्याच्या दिवशी, जेव्हा जत्रा असते आणि हजारो लोक इथं येतात तेंव्हा गावातल्या मातंगांनी मंजुनाथच्या मंदिरात प्रवेश केला तर? मग मंजुनाथाच महत्त्व कमी होऊन जाईल त्याच्या सत्तेला आव्हान मिळाल्याने, मग इतिहास नव्याने घडेल या गावात. जगन्नाथ उत्साहाने बंगळूरच्या वृत्तपत्रांत हा कार्यक्रम जाहीर करतो. 

जगन्नाथच्या विचारांच्या आंदोलनाला अनेक पदर आहेत - ते अतिशय सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे आहेत. एक पकडायला जावं तर जीव दुस-याच कशात तरी गुंतलेला आहे याची जशी जगन्नाथला जाणीव होते, तशीच ती आपल्यालाही होते.आपल्या लोकांच्या विरोधात तर उभं राहायचं, पण त्यांना ज्यांच्यासाठी दुखवायचं त्या मातंगांची या बदलाची तयारी किती - हा प्रश्न जगन्नाथला वारंवार सतावतो. आपण केवळ आपल्या अहंकारासाठी बदल घडवायचा प्रयत्न करतोय, आपल्याला मातंगांबद्दल मनापासून प्रेम वाटत नाही हेही त्याला कळते आहे आणि त्यातून त्याचा आंतरिक संघर्ष अधिक गहिरा होत जातो. घरातला पूजेचा शाळिग्राम मातंगांच्या हाती देताना जगन्नाथ मावशीला दुखावतो - ज्या मावशीने आईच्या मृत्यूनंतर त्याला मायेने जपले आहे त्या मावशीशी दावा घेतल्यासारखा जगन्नाथ वागतो. पण मातंगांचीही इच्छा नाहीच शाळिग्राम हाती घेण्याची, मंदिरात प्रवेश करण्याची - त्यामुळे काहीतरी विपरीत घडणार असा त्यांचा विश्वास आहे. मग 'ना घरका, ना घाटका' बनत तो हे सगळे प्रयत्न नेमके कुणासाठी करतो आहे, यातून नेमके काय साधले जाणार आहे?   इतिहासाशी नाळ तोडून तुम्ही नवं काही निर्माण करत नाही तेव्हा प्रवासाला काही अर्थ असतो का? 

कादंबरीत इतर पात्रांच जगणं आणि त्याची कहाणी येते - श्रीपतिराय, अडिग, पुराणिक, सत्यप्रकाश, गणेश, पिल्ल, जोयिस. त्यांचे धागे जगन्नाथच्या कहाणीत मिसळत राहतात. 

मातंग अखेर मंजुनाथाच्या मंदिरात प्रवेश करतात का? भारतीपुरवर या घटनेचा परिणाम काय होतो? जगन्नाथला समाधान मिळते का? - या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी 'भारतीपुर' वाचायला हवं. 

यू. आर. अनंतमूर्ती यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने लिहिलेली ही कादंबरी. देव, पाखंडी, भांडवलदार सगळे कसे मिळून मिसळून रहात असतात आणि सद्यस्थितीत काही बदल करायचा म्हटले की ते सगळे कसे 'एक' होतात हे सांगणारी ही एक अतिशय वास्तवदर्शी कहाणी. 'जात नाही ती जात' हे आपण म्हणतोच - पण ते नेमकं कसं असत, कसं दिसत, त्याचे कुणाला काय परिणाम भोगावे लागतात - हे 'भारतीपुर' वाचताना स्पष्ट होत जातं. सामाजिक बदल करताना व्यक्तिगत बदल कोणत्या पातळीवर होतात, समाजाचे नियम बदलायचे तर कशा प्रकारचे आरोप माणसांवर होतात - हेही वाचण्यासारखं आहे. 

जातीव्यवस्थेवर भाष्य करणारं हे एक चांगलं पुस्तक आहे. कथेचा प्रवाह थोडा गोंधळात टाकणारा आहे आणि कथेचे तुकडे काही ठिकाणी इतक्या वेगाने एकमेकांत मिसळतात की त्याचा अर्थ समजणं अवघड होतं काही प्रसंगी. लेखकाला जे सांगायचं आहे ते थेट आहे की अप्रत्यक्ष आहे ही शंका सतत मनात येत राहते. त्यामुळे जे सांगितलं आहे त्याच्या पल्याड काही शोधायची खटपट करताना जे सरळ सांगितलं आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः अनंतमूर्ती मी पहिल्यांदाच वाचत असल्याने माझी जरा अशी ये-जा झाली. म्हणजे जातीव्यवस्थेप्रमाणे ही कादंबरी धर्मव्यवस्थेवर पण भाष्य करते का? - असा प्रश्न माझ्या मनात आला आणि त्याच उत्तर पहिल्या वाचनात तरी मला मिळालेलं नाही. 

कदाचित पुढच्या वाचनात नवा अर्थ समजेल मला या कादंबरीचा. 



भारतीपुर (हिंदी अनुवाद) 
यू. आर. अनंतमूर्ती
राधाकृष्ण पेपरबैक्स,  नई दिल्ली
२०११
किंमतः रुपये १५०/- 
('भारतीपुर' या १९७३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कन्नड कादंबरीचा हा हिंदी अनुवाद भालचन्द्र जयशेटटी आणि तिप्पेस्वामी 'पुनीत' यांनी केला आहे.) 

6 comments:

  1. अशा स्वरूपाच्या पुस्तकाचा परिचय देताना शेवटी 'अमूक प्रश्नांच्या उत्तरासाठी पुस्तकच मुळातून वाचावे' असे स्वरूप असावेच का? माझ्या मते नाही. ती उत्तरे दिल्याने पुस्तकाच्या खपावर काही परिणाम होणार नाही.
    जातीव्यवस्थेवरचे भाष्य हे धर्मव्यवस्थेवरचे भाष्य नाही का? जातीव्यवस्था धर्मापेक्षा वेगळी काढता येते का? असेही काही प्रश्न आहेत.
    परिचय साधा-सरळ आहे हे आवडले.

    ReplyDelete
  2. Glad that you finally started writing about books.

    Joy

    ReplyDelete
  3. पुस्तक परिचय आवडला. ह्या निमित्ताने
    भारतातील एका भागातील इतिहास व त्या निमिताने अनेक विषयांची माहिती मिळाली आहे.

    ReplyDelete
  4. अनामिक/अनामिका, पुस्तकाच्या खपाचा मुद्दा कळला नाही तुमचा!
    जातीव्यवस्था हा धर्मव्यवस्थेचा एक पैलू नक्की आहे .. पण त्यात अजूनही बरच काही आहे...

    ReplyDelete
  5. निनाद्जी, तुम्हाला पुस्तक जरूर आवडेल, अवश्य वाचा ही विनंती.

    ReplyDelete