ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, December 15, 2015

२३४. मीना (पुस्तक परिचय)

काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org.रावा हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही रावासोबत आहात! आम्हाला समर्थन द्या आणि मदत करा.” (If you are freedom-loving and anti-fundamentalist, you are with RAWA. Support and help us.)
शांती, स्वातंत्र्य, लोकशाही आणि स्त्रियांचे हक्क यासाठी १९७७ पासून काम करणारी रावा ही अफगाणिस्तानमधली एक जुनी सामाजिक-राजकीय संघटना आहे. ही संघटना अफगाण स्त्रियांनी स्थापन केली असून ती आजही अफगाण स्त्रियाच चालवतात. रावावरच्या माहितीतून अफगाण स्त्रियांचा दृष्टिकोन, त्यांचा संघर्ष आणि त्या भविष्याचा घेत असलेला वेध असं बरंच काही कळतं. ही वेबसाईट सात-आठ भाषांत आहे, त्यावरून रावाचे हितचिंतक जगभर पसरले आहेत असं दिसतं. अफगाणिस्तानसारख्या सतत संघर्ष चालू असलेल्या देशात मुळात कोणी स्त्रियांचं संघटन करावं हेच अवघड; ही संघटना इतक्या अडचणींतून वाटचाल करत आणि उद्दिष्टांपासून न ढळता ३८ वर्ष काम करत असावी हा तर चमत्कार मानावा लागेल. हा चमत्कार जिने घडवून आणला ती आहे मीना, रावाची संस्थापक.  हिचा परिचय संकेतस्थळावर आहे, पण तो अगदी थोडक्यात आहे. मीनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या प्रयत्नात मी असताना मीना हे पुस्तक हातात आलं.
Meena: Heroin of Afghanistan या (लेखिका – Melody Ermachild Chavias) २००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद शोभा आणि दिलीप चित्रे यांनी केला असून २००८ मध्ये राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. (माझ्याकडे २००९ ची दुसरी आवृत्ती आहे.)
१९७५ च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या (आणि त्याला जोडून महिला दशकाच्या) निमित्ताने स्त्रियांच्या हक्कांविषयी आणि त्यांची स्थिती सुधारण्याविषयी जगभरात मंथन घडून आलं. समाजाच्या स्त्रीविषयक धारणा बदलण्याचे आव्हान भारतातल्या स्त्री चळवळीच्याही समोर होतं – आजही आहे. या प्रवासातला अफगाणिस्तानमधला संदर्भ लक्षात घेतल्याविना मीनाचं काम किती क्रांतिकारी होतं हे समजणं अवघड आहे.
जुलै १९७३ मध्ये राजा झाहीर शाह (१९३३-१९७३) याची ४० वर्षांची राजवट संपुष्टात आणली गेली आणि रशियाधार्जिणं सरकार दाऊद खानच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं. झाहिर शाहच्या कारकिर्दीत मुलींच्या शिक्षणाला आणि सहशिक्षणालाही प्रोत्साहन होतं. स्त्रिया नोकरी करत होत्या आणि अगदी रेडिओवरह निवेदन करत होत्या, एअर होस्टेस होत्या, टेलिफोन ऑपरेटर होत्या. या स्त्रिया बुरखा वापरत नव्हत्या. पण शरिया कायद्यांनुसार स्त्रीचं अस्तित्व नगण्य होतं जे मीनाला बोचत होतं. काबूलमधल्या मलालाय (Malalai) शाळेत संवेदनशील मीनाला तिच्या आंतरिक ऊर्जेला योग्य दिशा देणा-या शिक्षिका भेटल्या. मीना स्वतंत्रपणे विचार करू लागली, स्त्रियांच्या हक्कांचा विचार करू लागली.
१९५६ (२७ फेब्रुवारी) साली काबूलमध्ये जन्मलेली मीना १९७५ मध्ये काबूल विद्यापीठात शिकत होती. काबूल विद्यापीठात मार्क्स, इस्लाम, अफगाण संस्कृती अशा अनेक विषयांवर चर्चा होत असतं. पण हळूहळू चित्र बदलत गेलं, विद्यापीठातलं वातावरण गढूळ झालं. १९७६ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी (म्हणजे तिथल्या सामाजिक संकेताच्या मानाने काहीसा उशिराच) तिचा विवाह फैजशी झाला. शिक्षण पूर्ण करायला संमती आणि एकपत्नीव्रताचं वचन अशा मीनाच्या वेगळ्या अटी मान्य करणारा आणि प्रत्यक्षात त्यानुसार जगणारा फैज हे देखील एक वेगळंच रसायन होतं.
दाऊद खानच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी जवळीक असण्याला विरोध करत अफगाणिस्तानमध्ये मूलतत्त्ववाद वाढू लागला. नवं आणि जुनं यात रस्सीखेच होऊ लागली. त्या काळात स्त्रियांसाठी वेगळी संघटना निर्माण करण्याचा मीनाने निश्चय केला आणि ती कामाला लागली. त्यावेळी ती नुकतीच विशी ओलांडलेली एक नवविवाहित तरूणी होती. तिच्याकडं ना पैसा होता, ना अनुभव. पण मीनाच्या सहृदयतेने, चिकाटीने आणि अथक परिश्रमांनी अनेक अफगाण स्त्रिया लोकशाही, शांती आणि स्त्रियांचे हक्क यासाठी लढायला तयार झाल्या.
ओळखीच्या एकेका स्त्रीला भेटून मीनाने चाचपणी सुरू केली. १९७७ मध्ये रावाची स्थापना झाली. पोलीस आणि मूलतत्त्ववादी या दोन्ही गटांकडून मीनाला आणि तिच्या कामाला धोका होता. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळापासून सुरक्षिततेसाठी गुप्तता हा रावाचा मंत्र राहिला. एखादीला धमकी देऊन पोलिसांनी रावाची पाळंमुळं खणून काढू नयेत यासाठी ही दक्षता आवश्यक होती. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही रावा समूळ नष्ट करणं ना सरकारला जमलं ना मूलतत्त्ववाद्यांना -  याचं सगळं श्रेय मीनाच्या दूरदृष्टीला आहे.
मीनाने आणि तिच्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात सहका-यांनी जे काम केलं ते वाचताना इतकं धाडस, इतकी ताकद, इतकी अचल ध्येयनिष्ठा, इतकी संवेदना या स्त्रियांना कुठून मिळाली असेल याचं नवल वाटत राहतं.
रावाच्या स्थापनेपूर्वी स्त्रियांनी अशी त-हेने संघटित होण्याची अफगाणिस्तानच्या ज्ञात इतिहासात तरी नोंद नाही. घरात आणि घराबाहेर – कुठलंच वातावरण अनुकूल नसताना मीना आणि रावाने जे काम केलं ते थक्क करणारं आहे. छोट्या गटांत चर्चा करणं, एकमेकींना मदत करणं, साक्षरता वर्ग चालवणं अशा उपक्रमांतून रावा बळकट होत गेली. रावाच्या सदस्यांची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले आणि त्यातून अफगाण स्त्रिया तावून सुलाखून निघाल्या. राजकीय क्षितिजावर जेंव्हा जेंव्हा बदल झाले तेंव्हा त्याची अपरिमित झळ स्त्रियांना बसली. अफगाणिस्तानच्या राजकीय घडामोडींचा आढावा इथं घेणं शक्य नाही. पण १९७८ ते २००१ या काळात अफगाणिस्तानमध्ये दाऊद, तराकी, अमीन, बबरक कारमल, किश्तमंद, नजिबुल्ला अहमदझाई, तालिबान, रब्बानी इतके वेगवेगळे सत्ताधीश आले. प्रत्येक वेळी रक्तपात झाला, लाखो लोक विनाचौकशी तुरुंगात टाकले गेले, मारले गेले, देश सोडून गेले. प्रत्येक बदलासोबत स्त्रियांभोवतीच्या भिंती अधिक जवळ आल्या, त्यांची घुसमट वाढत गेली. त्यांचं जगणं कठीण होत गेलं.
पण या प्रत्येक वळणावर रावा अधिकाधिक मजबूत झाली, तिचं कार्य विस्तारत गेलं. स्त्रियांना मदत करण्यात रावाने कधी मागंपुढं पाहिलं नाही. तुरुंगातल्या कैद्यांची सुटका व्हावी यासाठी म्हणून स्त्रिया तुरूंगासमोर जमत. त्यांच्यावर होणा-या अत्याचाराची माहिती रावा पत्रक काढून जाहीर करत असे आणि पोलीस मागावर असताना ठिकठिकाणी या पत्रकांचे वाटप करत असे. रावाने पयाम-ई-झान नावाचं मासिक चालवलं – स्त्रीकेंद्री असणारं अफगाणिस्तानमधलं हे पहिलं मासिक होतं. घराची कधी झडती होईल ते सांगता येत नसे – अशा परिस्थितीत मासिक काढणं हे एक धाडसाचं कार्य होतं. सोविएत राजवटीच्या क्रूर कहाण्या जगासमोर आणण्यात मीनाने फार मोलाची भूमिका बजावली. मूलतत्त्ववादाचा धोकाही तिला त्या काळी दिसत होता, तो तिने स्पष्टपणे सांगितलाही होता, पण जगाने त्याकडं लक्ष दिलं नाही.
१९८२ मध्ये अफगाणिस्तान सरकारने मीनाला अटक करण्याची घोषणा केली. देशात काम करणं अशक्य झाल्यावर मीनाने पाकिस्तानमधून (जिथं लाखो अफगाण निर्वासित कसेबसे जगत होते) काम चालू ठेवलं. प्राण पणाला लावत तिने आणि तिच्या सहका-यांनी अनेकदा पाक-अफगाण सीमा ओलांडली; उदरनिर्वाहासाठी शिवणकाम केलं; अनाथ मुला-मुलींना घर आणि शिक्षण दिलं; निर्वासितांसाठी साक्षरता वर्ग चालवले; मलालाय इस्पितळ उभं केलं आणि चालवलं.
मीनाच्या हालचालींबद्दल गुप्तता बाळगूनही घात झालाच. ४ फेब्रुवारी १९८७ रोजी क्वेट्टा (पाकिस्तान) मधून मीना नाहीशी झाली. तिची हत्त्या करण्यात आल्याचं उघड झालं. रावाच्या सदस्यांवर आकाश कोसळलं. पण तरीही रडत न बसता, न घाबरता त्यांनी काम पुढं चालू ठेवलं. दुर्दैवाने अफगाण स्त्रियांना अजूनही बराच प्रवास करायचा आहे.
अफगाण स्त्रियांसमोर चांगलं आणि वाईट प्रशासन असा पर्याय कधीच नव्हता;  पर्याय होते कमी वाईट आणि जास्त वाईट इतकाच. मुजाहिद्दीन तालिबानच्या विरोधात लढले खरे पण अफगाण स्त्रियांसाठी ते दोघेही तितकेच क्रूर होते. किंबहुना २००१ नंतरच्या अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत वारलॉर्ड्स पुन्हा एकदा सत्तेचे वाटेकरी झाल्याने आपला संघर्ष अद्याप संपलेला नाही अशी रावाची आणि अफगाण स्त्रियांची खात्रीच पटली आहे.
मीना आणि रावाच्या हालचाली लपूनछपून चालत असल्याने (ती त्यांची अपरिहार्यता होती) मीनाबद्दल फार माहिती मिळणं अवघड होतं. पोलीस छाप्याचे संकेत मिळताच अनेकदा रावाच्या कार्यकर्त्यांना कागदपत्रं नष्ट करावी लागत, शक्यतो कसलाही पुरावा मागे राहू नये याची त्या सदैव दक्षता घेत. देशात सत्तेवर कोणीही असो, मीना त्यांना नकोच होती. त्यामुळे मीनाच्या जगण्याबद्दल पुरेशी माहिती नव्हती.
२००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर Melody Chavias पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जाऊन मीनाच्या अनेक सहका-यांना भेटली. त्यातून हे पुस्तक तयार झालं. इतर सर्वसामान्य चरित्रांत कथानायिकेची/नायकाची जितकी सविस्तर माहिती आपल्याला मिळते, तशी या पुस्तकात मिळत नाही. पण परिस्थितीचा संदर्भ ध्यानी घेता, लेखिकेला अफगाणिस्तान बाहेरच्या जगाला मीनाची आणि अफगाण स्त्रियांच्या संघर्षाची ओळख करून देणं यात पुरेसं यश लाभलं आहे असं नक्की म्हणता येईल.
मूळ पुस्तक मी वाचलं नसल्याने अनुवादाच्या गुणवत्तेबदद्ल मला काही सांगता येणार नाही. पण मराठी पुस्तकातल्या काही ढोबळ चुका टाळता आल्या असत्या. पुस्तकात अनेक ठिकाणी इंग्रजी शब्द आहेत. परकीय भाषांतल्या शब्दांचे उच्चार चुकीचे होऊ नयेत यासाठी ही काळजी घेणं समजू शकतं. पण उदाहरणार्थ Parcham, Babrak Karmal, Khalq, Aid Projects, Reforms .. यातले काही शब्द देवनागरीतही लिहीता आले असते आणि काहींना रूढ पर्यायी मराठी शब्द आहेत. यातले बरेचसे शब्द कॅपिटल अक्षरांत लिहिल्याने माझ्या जास्त डोळ्यांवर आले असावेत कदाचित. दारी (दरी), करझाय (करझाई) असेही शब्द आहेत. नकाशात पाकिस्तानमधली क्वेट्टा आणि पेशावर शहरं कुठं आहेत हे दाखवलं असतं तर मीनाचे सीमारेषा ओलांडण्याचे प्रवास किती कठीण होते हे वाचकांना समजायला आणखी थोडी मदत झाली असती. काबूल न लिहिता काबुल लिहिलं गेलं आहे.
पुस्तकातल्या तपशीलाच्या काही किरकोळ चुकाही सहज नजरेस आल्या. रावाच्या संकेतस्थळावर मीनाचा जन्म २७ फेब्रुवारी १९५६ ला झाल्याचा उल्लेख आहे तर पुस्तकात मीना १९५७ साली जन्मल्याचा उल्लेख आहे. मीना ४ फेब्रुवारी १९८७ नाहीशी झाली (आणि तिची हत्त्या झाली), पण पुस्तकात पान १३३ वर ही घटना १४ फेब्रुवारीला झाल्याचे म्हटले आहे. हा कदाचित फक्त टंकनदोष असावा. शिवाय पुस्तकाचा मुख्य उद्देश मीनाचे जीवितकार्य समजावे हा आहे.
मीनाची ही अत्यंत प्रेरणादायी जीवनकहाणी आपण जरूर वाचावी आणि इतरांपर्यंतही अवश्य पोचवावी.

मीना: अफगाण मुक्तीचा आक्रोश
लेखिका: Melody Ermachild Chavias
अनुवाद: शोभा चित्रे / दिलीप वि. चित्रे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत: १५०/ - रूपये

Thursday, December 10, 2015

२३३. उशिरा

चौकातला दिवा लाल झाला, गाड्या थांबल्या.
रस्ता ओलांडून फटाफट ते सगळे रस्त्याच्या बाजूला ठरलेल्या जागी आले.
मनातली काळजी, शंका, उत्सुकता इतरांना कळू नये याची सगळ्यांची धडपड चालू होती.
पण कदाचित जगण्याचा तितकासा अनुभव पाठीशी नसल्याने असेल, भावना लपवण्याच्या धडपडीत त्यांचे चेहरे जास्त बोलत होते.
“आले का समदे?” नंदाने विचारलं. ते विचारताना एक कमी आहे हे तिच्या लक्षात आलं.
“बच्चन यायचाय अजून, जरा रुकेंगे...” हवेली विनंतीचा - तिला एरवी न शोभणारा - सूर लावत म्हणाली.
कुणी काही बोललं नाही, पण कुणी जागचं हललंही नाही.
“वो देख बच्चन...” मन्या ओरडला.
वाहत्या रस्त्यावर, चौकात दिवा लाल व्हायची वाट पाहत पाच वर्षांचा बच्चन उभा होता. त्याचं खरं नाव इतरांना काय, त्यालाही माहीत नव्हतं. त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती आणि ती त्याला बहुतेक जड झाली होती. दिवा लाल होताच गाड्या पुन्हा कचकन थांबल्या, दुसर्‍या बाजूला गती मिळाली.. बच्चन पळत पळत आला.
खान पुढं झाला. बच्चनच्या गालावरून हात फिरवत म्हणाला, “किदर लंबा गयेला था रे छोटू?”
बच्चन नुसताच हसला.
“चलो, शाळेच्या पीछे जाऊ. सुट्टी है, कुणी नसंल उधर.” जेमतेम आठ-नऊ वर्षांचा असेल खान. पण सगळे त्याच्या पाठोपाठ शाळेच्या मागच्या बाजूला निघाले.
ती शाळा म्हणजे या मुलांच्या दृष्टीने एक मोठी इमारत होती. त्यात दहा-बारा खोल्या होत्या. शाळेचं कुंपण बर्‍याच ठिकाणी मोडलं होतं. तिथे राहत नव्हतं कुणी. पण सकाळी भरपूर पोरं-पोरी आणि आठ-दहा मोठी माणसं यायची. दुपारी असेच आणखी काही जण यायचे. दिवाळी जवळ आली की सुट्टी असायची. या वेळी शाळेच्या आसपास गेलं तर चालायचं, कारण शिपाईसुद्धा कुठेतरी आत झोपलेला असायचा किंवा पत्ते खेळत असायचा.
शाळेकडे जाता जाता हळूहळू त्या मुलांचे चेहरे हसरे झाले.
लिंबाच्या सावलीत कोंडाळं करून ते बसले. मुंगीही आत शिरणार नाही इतके दाटीवाटीने बसले. प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकची पिशवी, कागदाची पुरचुंडी, खोकं असं काही ना काही होतं. हातातलं दुसर्‍याला दिसू नये अशी प्रत्येकाची पुन्हा धडपड होती. डोळ्यांत चमक होती.
“आता समदे डोळे बंद करा.” नंदा म्हणाली.
“मी न्हाय करायचा” कंद्या जोरात ओरडला.
बच्चनने कंद्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, “घबरनेका नाय. नंदादीदी है ना.” सगळे हसले.
खान कंद्याला म्हणाला, “छोटूका डोका अच्चा है, उसका ऐकत जा.”
नंदा म्हणाली, “कंद्या, कोणबी घेणार नाही तुज्या हातातलं, मी हाये ना हितं? ”
नंदा त्या सगळ्यांची दीदी होती. कंद्याला तिचं म्हणणं पटलं.
“समदे डोळे बंद करा. मी तीन बार राम-सीतामाय-हनुमान बोलीन. तिसर्‍या येळी हनुमान बोल्ले की समद्यानी आपल्याजवळ जे काय हाय ते सबको दिखाना.” नंदा म्हणाली.
“राम-सीतामाय-हनुमान”
“राम-सीतामाय-हनुमान”
“राम-सीतामाय-हनुमान”
सगळ्यांनी डोळे उघडले आणि हातातला खजिना इतरांना दाखवायला सुरुवात केली.
नंदाच्या हातातल्या फाटक्या खोक्यात तीन लाडू होते.
खानच्या प्लास्टिक बॅगमध्ये काही सादळलेले फटाके होते.
बच्चन नशीबवान होता. एका बाईने त्याला शंकरपाळी दिली होती, त्याला थोडासा वास येत होता, पण त्या बाईने बच्चनला दहा रुपयांची नोट दिली होती.
कंद्याने पाकीट उघडलं आणि तो रडायला लागला. त्याच्या पाकिटात फक्त दोन वेफर्स होते.
हवेलीकडे बाकरवडी होती.
नानीला कागदात बांधलेली शेव मिळाली होती.
संगीला कसलीतरी वडी मिळाली होती.
“चलो, आपण भी दिवाळी मनवू.” बच्चन आनंदाने ओरडला. सगळे हसले.
नंदा आणि खानने खाण्याच्या पदार्थांची वाटणी केली. भूक तर होतीच प्रत्येकाला. तरी पोरं-पोरी एकमेकांना घासातला घास “ये देख, अच्चा है” म्हणत आग्रह करत देऊ लागली. कंद्याही रडू विसरून हसायला लागला. बघता बघता त्यांनी खाऊचा फडशा पाडला.
“आता क्या करनेका?” मिंटू म्हणाली.
“अब वो बडे चौकमे जायेंगे. याद रखना छोटू, लंबा नई जाना जादा. और कंद्या, केवल कारवालोंसे माँगना, बाईकवाले कुच्च नहीं देते. मिंटू, गाली मत देना किसीको....” खान सूत्रं हाती घेत एकेकाला सूचना द्यायला लागला.
ती साताठ मुलं-मुली पुढच्या चौकाकडे निघाली.
एक हात संगीच्या, तर दुसरा हवेलीच्या खांद्यावर टाकून नंदा चालायली लागली.
खानने एका हातात बच्चनचा, तर दुसर्‍या हातात मन्याचा हात घेतला.
“कित्ते दिन है दिवाली अजून?” संगीनं विचारलं.
“दिवाळी संपली काल,” नंदादीदी म्हणाली. “मंग आता लोकं उरलंसुरलं देतेत ना आपल्याला, अजून दोन चार दिस हाये म्हणायची आपली दिवाळी.” संगीला समजावत ती म्हणाली.
“त्याचं काय हाय संगे, आपली दिवाळी जरा उशिरा येतीय.” हवेली म्हणाली.
नंदाने मान डोलावली.
काय बोलावं ते न सुचून संगी आणि हवेली गप्प झाल्या.
बड्या चौकाचा रस्ता संपता संपत नव्हता.
***
('मिसळपाव' दिवाळी अंक २०१५ मध्ये पूर्वप्रकाशित)

Saturday, October 24, 2015

२३२. भीतीच्या भिंती: ९ हल्ला

गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – निवडणूक आयोग. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हे प्रवेशद्वार टाळा”. आमचं ऑफिस त्या प्रवेशद्वाराच्या अंगणातच. ताबडतोब सुरक्षा रक्षक आले आणि आम्हाला evacuate केलं गेलं. धोका बहुधा फार नसावा, कारण परिसरातल्याच दुस-या टोकाच्या इमारतीत आम्ही गेलो.
 मग बॉम्ब तपासणी पथक आलं, तपासणी झाली. तो एक कचरा वाहून नेणारा ट्रक होता, युएनचा नाही तर आउटसोर्स केलेला होता. युएनच्या परिसरात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनाची प्रत्येक वेळी श्वानपथकाद्वारे (बॉम्ब) तपासणी होते, कितीही वेळा ये-जा झाली तरी, आणि अगदी युएनच्या वाहनांचीही. शिवाय प्रत्येक व्यक्तीचं ओळखपत्र दरवेळी तपासलं जातं, त्यात अजिबात हयगय होत नसे. कुत्रा बॉम्बचा संशय येताच खाली बसतो – तसा इथं बसला आणि पुढची सगळी चक्रं फिरली. दोन तास तपासणी होऊनही काही संशयास्पद आढळलं नाही हे खरं. पण या ट्रकचा वापर अन्य कामासाठी झाला होता का, दहशतवाद्यांनी ही एक चाचणी करून बघितली का – असे अनेक प्रश्न मनात आलेच – माझ्या, इतरांच्याही.
एक दिवस नजीब होता गाडीवर. रस्त्याने येताना ‘इकडं अशी लढाई झाली होती, इतके लोक मारले गेले’ वगैरे सांगत होता तो. एकदा त्याचं एका अमेरिकन माणसाबरोबर अपहरणही झालं होतं. मग मला एकदम म्हणाला, “तुम्ही इथं काय करताय? आपल्या घरी जाऊन निवांत रहा की”. काय बोलायचं ते न सुचल्याने मी गप्प बसले.
सदैव पुढच्या क्षणी हल्ला होणार आहे अशा तयारीत राहायची सवय या अशा अनुभवांमुळे होत राहिली. हल्ला झालाच तर त्याला तोंड देण्याची मानसिकताही यातून कळत-नकळत घडत गेली असावी.
हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव एक ना एक दिवस मला येणार होताच, तो त्यादिवशी आला.
शुक्रवार हा माझ्यासाठी अगदी निवांत दिवस असायचा. एरवी सुट्टीच्या दिवशी घरातली इतर बरीच कामं उरकायची असतात, पण मी इथं हॉटेलमध्ये रहात असल्याने घरकाम सदृश्य कुठलंही काम नसायच. बाहेर उगाच आपलं फिरून येऊ हे शक्य नव्हतं. हमीद हा माझ्या संस्थेचा एक श्रीलंकन सल्लागार याच हॉटेलमध्ये राहायचा. तो मुस्लिम होता, त्यामुळे जवळच्या मशीदीत जाऊन यायचा तासभर. पंधरा दिवसांनी एकदा ऑफिसबरोबर आधी ठरवून आम्ही मॉलमध्ये खरेदीला जायचो. हॉटेलमध्ये रात्री फक्त ठरावीक जेवण मिळायचं, आणि ते ८ डॉलर्स असं महाग होतं. दुपारी व्यवस्थित जेवले असले तर मला रात्री इतक्या भरपेट जेवणाची गरज नसायची. मॉलमधली खरेदी म्हणजे या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था – दूध, फळं, ज्यूस यांचा स्टॉक करून ठेवणं. त्यामुळे ही खरेदी झटपट व्हायची. तशीही २० मिनिटं ही आम्हाला मॉलमधल्या खरेदीसाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा होती, त्यामुळे तिथं उगाच रेंगाळता यायचं नाही. ज्या मॉलमध्ये आम्ही जायचो त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता हे एकदा एकाने सांगितल्यावर मॉलमध्ये जाण्याचंही मी शक्यतो टाळायला लागले.
शुक्रवारी मी निवांत उठायचे, रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे, भरपूर  नाश्ता करायचे, वाचायचे, भारतात फोन करायचे, लिहायचे.
सोबतचे काही लोक सुरक्षा नियम मोडायचे, मलाही त्यात ओढायला बघायचे.
त्या शुक्रवारी सकाळी अकराच्या आसपास गुरखा सैनिकाशी हवापाण्याच्या गप्पा मारत मी उभी होते. तेवढ्यात माझी कॅनेडियन शेजारीण माझ्याकडं आली. तशी आमची आपली हाय-हॅलो पुरतीच ओळख होती. पण आज तिचा बोलायचा नूर दिसत होता.
आज काय करणार आहेस दुपारी?” शेजारणीने विचारलं.
विशेष काही नाही, नेहमीचंच. मी उत्तरले.
मी जाणार आहे बाहेर जेवायला. येतेस का? ” तिचा पुढचा प्रश्न.
तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी ऑफिसची परवानगी घेतली असती, असं आयत्यावेळी नाही मला येता येणार, जणू काही माझाच दोष आहे अशा नम्रपणाने मी उत्तरले.
त्यात काय विचारायचं ऑफिसला? माझ्या ओळखीचा एक टॅक्सीवाला आहे, तो घेऊन जाईल आपल्याला आणि परत आणून सोडेल, शंभर डॉलर्स घेईल तो, निम्मे मी देईन, निम्मे तू दे. मी येणार हे गृहीत धरून बाई बोलत होत्या.
या बाई पण युएनच्या एका संस्थेच्या होत्या. त्यांनी त्यांच्या ऑफिसची परवानगी घेतली असती तर त्या बळावर मला ऐन वेळीही जाण्याची परवानगी मिळाली असती. त्यांच्या ऑफिसचा सिक्युरिटी क्लीअरन्स आहे हे सांगितल्यावर मला काही अडचण आली नसती. पण या परवानगी न घेता चालल्या होत्या तेही खाजगी वाहनाने. अपहरणाविषयी काही दिवसांपूर्वी माझ्या    सहका-यांनी केलेली थट्टामस्करी आणि एक मीटिंग सोडून निघावं लागलं होतं मला – या घटना मी विसरले नव्हते, त्यामुळे मी शेजारणीला शांतपणे नकार दिला.
थोडा धोका तर पत्करायला लागतोच. इथं रूममध्ये नुसत्या भिंती पहात बसणार आहेस का एकटी?” तिने मला उचकवायचा आणखी एक प्रयत्न केला पण मी बधले नाही. निराश होऊन ती आणखी कुणी सोबत येईल का ते पाहायला गेली. तोवर शांतपणे आमचा संवाद ऐकणा-या गुरख्याने मला या देशात काय करायचं नाही हे तुम्हाला चांगलं कळलंय, तुम्ही कधी अडचणीत नाही सापडणार तुमच्या चुकीने असं प्रमाणपत्र कौतुकाने दिलं.  
त्यातले तुमच्या चुकीनेया शब्दप्रयोगाचा अर्थ मला त्यावेळी नीट समजला नव्हता हे थोड्या वेळातच मला समजणार होतं.
चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकांबरोबर असणं टाळलं, की साधारणपणे आपण नको त्या परिस्थितीत सापडत नाही असा आजवरचा अनुभव. पण इथं मुळात परिस्थितीच असाधारण असल्याने तुम्ही कधी संकटात सापडाल त्याचा भरवसा नाही.
दुपारचे चार वाजत आले होते. ही माझी कॉफी प्यायची वेळ. किचनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी कॉफी पिण्याइतका निवांत वेळ. हमीदही यायचा किचनमध्ये आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसायचो आम्ही. लिहित असलेली मेल अर्धवट तशीच ठेवून मी स्वच्छतागृहात गेले.
धडाड... धडाड...
खळ्ळ....खळ्ळ
कर्कश सायरन.
तिन्ही आवाज एकदम आले.
********
स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचांचा खच माझ्याभोवती पडला आहे, बाहेर बंदुकांच्या फैरी झडत आहेत आणि सायरन वाजत आहे या तीन्ही गोष्टींची नोंद मी निमिषार्धात घेतली. हे वाक्य वाचायला तुम्ही जेवढा वेळ घेतला असेल, त्याच्या एक दशांश वेळात मी ही नोंद घेतली.
पण आपलं मन कमालीचं हट्टी असतं. अनुभवाला नाव दिल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही, संवेदनेची खूण ओळखण्याचा त्याचा आटापिटा असतो.
बहुतेक भूकंप झालेला दिसतोय – परिस्थितीचं आकलन करून घेण्याची मनाची धडपड.
आधी बंकर गाठ, बुद्धीने प्रतिसाद नियंत्रित करण्यात पुढाकार घेतला.
स्वच्छतागृहातून बाहेर आले. खोलीतही काचांचा खच पडला होता.
सायरन वाजतच होता. बंदुकांचे आवाज येतच होते.
हेल्मेट चढवलं. जाकिट जड असल्याने घालता येत नव्हतं, ते हातात घेतलं. घाई कर.
पासपोर्ट, ओळखपत्र, पैसे असलेलं छोटं पाऊच गळ्यात अडकवलं.
किती सेकंदात? बहुधा दोन.
सायरन अजून वाजतोच आहे.
बंदुकांचे आवाज जवळून येताहेत का ?
माहिती नाही, लवकर चल.
हा तालिबान हल्ला आहे का ?
असेल किंवा नसेलही. तू पळ.
ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.
लॅपटॉप बंद करावा काय?
नाही, तेवढा वेळ नाही. तू पळ आता लगेच.
फोन? चार्जर?
हं, दोन्ही हॅन्डसेट घे.
वॉकी-टॉकी?
ती राहू दे, तू पळ आधी बंकरकडे.
बूट कुठे आहेत?
खिडकीजवळ. हं! काचांनी भरलेत ते. असू दे, तू बंकरमध्ये जा.
बाहेर सगळीकडे काचा आहेत, नीट पळ. पाय पूर्ण टेकवू नकोस.
नेहमी खोलीसमोर असतात ते आपले गुरखा ठीक आहेत ना?
त्यांची काळजी तू नको करूस. पळ जोरात.
तो गुरखा पाहिलास ? किती एकाग्रतेने नेम धरून उभा आहे तो.
त्याचा चेहरा विलक्षण शांत आहे.
नाही, त्याच्याशी आत्ता बोलू नकोस. तू पळ बंकरकडे.
तुला भीती वाटतेय ?
माहिती नाही. पण काय झालंय नेमकं ?
कळेल लवकरच.
सायरन वाजतोय अजून!
अजून ?
हं, आता उजवीकडे.
तो बघ, रशीद उभाच आहे दारात.
तो न बोलता बाजूला होतो आणि मला आत जाण्याची खूण करतो.
बंकर.
कुणीतरी माझं जाकिट चढवायला मला मदत करतं.
हेल्मेट मी नुसतं अडकवलं आहे, तेही तिसरं कुणीतरी नीट बसवतंय.
फोन चौथ्याच्या हातात देऊन मी ट्राउझर घालते.
आतमध्ये पंधराएक लोक आहेत.
हमीद कुठे आहे ? हं, आला तोही.
लोक पळत पळत येताहेत.
सायरन वाजायचा थांबला आणि बंदुकींचे आवाज अधिक स्पष्ट झाले.
****
रशीद आणि दोन गुरखा रक्षक. आधी हजेरी झाली. आम्ही २५ लोक असायला हवे होतो इथं (युएनच्या विविध संस्थांशी संबंधित २५ लोक या हॉटेलमध्ये राहतात), त्यापैकी २२ जण होतो. तिघांचा काय पत्ता ? जखमी तर नाही ना झाले ? नाही. उपस्थित सहका-यांकडून दोघे जेवायला बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली – ती कॅनेडियन शेजारीण आणि आणखी एक. त्यांच्या ऑफिसला फोन केला. आता पुढचे निरोप ते लोक देतील. एकाला गुरखा सोबत घेऊन आला. नाही, तो जखमी नव्हता, पण काय करायचं हे न सुचून खोलीत नुसता उभा होता. गुरखा प्रत्येक खोलीत जाऊन  कुणी जखमी होऊन पडलं नाही ना हे तपासत होते. सुदैवाने आम्हाला कोणालाही काचा लागलेल्या नव्हत्या.
रशीदने सिक्युरिटीला फोन केला. रशीद आमच्या गटाचा वॉर्डन होता, तो सांगेल तसं आम्ही वागायचं होतं.
आपल्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. कार बॉम्बचा स्फोट ही त्याची सुरूवात होती.  हल्ल्याचं लक्ष्य आपण आहोत का अन्य कुणी ते अद्याप माहिती नाही. किती वेळ आपल्याला इथं थांबावं लागेल ते सांगता येत नाही, त्यामुळे मोबाईलची बॅटरी पुरवून वापरा. कदाचित evacuation होईल (या जागेतून हलवलं जाईल) . प्यायच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. कोप-यात स्वच्छतागृह आहे. मेडिकल इमर्जन्सी वाटल्यास तत्काळ मला सांगा. रशीद हे सगळं इतक्या धीरगंभीरपणे पण सहजतेने म्हणाला की आता पुढं तो विमानाचे पायलट म्हणतात ना तसं पुश बॅक ऍन्ड रिलॅक्स म्हणणार की काय असं मला क्षणभर वाटलं.
बंकरमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता होती. त्या शांततेत मला माझ्या हृदयाची धडधड मग स्पष्ट ऐकू आली. आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो पण या आकस्मिक हल्ल्याने सगळेजण हादरले होते, काय बोलायचं ते कुणाला सुचत नव्हतं.
मग ज्याने-त्याने आपापल्या सुरक्षा अधिका-याला फोन करायला सुरूवात केली. जॉर्जला मी फोन केला. एका रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मी काही बोलायच्या आधी त्याने मला विचारलं, तू आणि हमीद दोघेही बंकरमध्ये आहात ?” अच्छा, म्हणजे हल्ला झाल्याला अजून तीन मिनिटंही झाली नाहीत तर याला माहिती आहे हल्ला झाल्याची. काही हेल्थ प्रॉब्लेम ? दर अर्ध्या तासाला आपण बोलत राहू. रशीद सांगेल तसं करा. इतकंच बोलणं झालं आमचं.
मग छोट्या गटात लोक आपापसात बोलायला लागले. हमीद मला म्हणाला की तो भावाशी स्काईपवर बोलत होता. अचानक काचा पडताना पाहून भूकंपअसं वाटून तो ताबडतोब कॉटखाली जाऊन आडवा पडला. मग सेकंदभरात गोळीबाराचे आवाज ऐकल्यावर त्याला हल्ला झाल्याचं लक्षात आलं.
बंकर. अदमासे दहा बाय बाराची खोली. दोन सोफा, दोन खुर्च्या. उरलेले खाली बसले.
पुन्हा एक मोठ्ठा हादरा. जणू आमच्या दारातच.
दुसरा स्फोट, कुणीतरी म्हणालं.
त्याक्षणी मला एका सनातन सत्याचा साक्षात्कार झाला. मला भीती मरणाची वाटत नाही, एक ना एक दिवस तो दरवाजा उघडून त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकायचं आहेच. खरं सांगायचं तर त्या जगाबद्दल काहीसं कुतूहलही वाटतं. पण मृत्यूच्या त्या क्षणाकडे नेणा-या वेदनेची भीती वाटते. तुला वेदनारहित मरण देतो अशी कुणी खात्री दिली तर मला मरायचं भय वाटणार नाही. इथं अशा हल्ल्यात मेले तर ठीकच, पण कायमचं अपंगत्व आणि परावलंबित्व नको. – अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं – म्हणून विचार जगण्याचा करावा हेही ओघाने आलं.
तिस-या स्फोटाने आमचा बंकर हादरला.

हे किती काळ चालणार आहे? यातून सुखरूप बाहेर पडणार की नाही आपण? – सगळ्यांच्या मनात तेच प्रश्न. कुणीही हे प्रश्न विचारले नाहीत. हे प्रश्न विचारायचे नाहीत असा आमच्यात जणू एक अलिखित करार झाला होता. ....

(अपूर्ण)