ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label तालिबान. Show all posts
Showing posts with label तालिबान. Show all posts

Saturday, October 24, 2015

२३२. भीतीच्या भिंती: ९ हल्ला

गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – निवडणूक आयोग. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हे प्रवेशद्वार टाळा”. आमचं ऑफिस त्या प्रवेशद्वाराच्या अंगणातच. ताबडतोब सुरक्षा रक्षक आले आणि आम्हाला evacuate केलं गेलं. धोका बहुधा फार नसावा, कारण परिसरातल्याच दुस-या टोकाच्या इमारतीत आम्ही गेलो.
 मग बॉम्ब तपासणी पथक आलं, तपासणी झाली. तो एक कचरा वाहून नेणारा ट्रक होता, युएनचा नाही तर आउटसोर्स केलेला होता. युएनच्या परिसरात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनाची प्रत्येक वेळी श्वानपथकाद्वारे (बॉम्ब) तपासणी होते, कितीही वेळा ये-जा झाली तरी, आणि अगदी युएनच्या वाहनांचीही. शिवाय प्रत्येक व्यक्तीचं ओळखपत्र दरवेळी तपासलं जातं, त्यात अजिबात हयगय होत नसे. कुत्रा बॉम्बचा संशय येताच खाली बसतो – तसा इथं बसला आणि पुढची सगळी चक्रं फिरली. दोन तास तपासणी होऊनही काही संशयास्पद आढळलं नाही हे खरं. पण या ट्रकचा वापर अन्य कामासाठी झाला होता का, दहशतवाद्यांनी ही एक चाचणी करून बघितली का – असे अनेक प्रश्न मनात आलेच – माझ्या, इतरांच्याही.
एक दिवस नजीब होता गाडीवर. रस्त्याने येताना ‘इकडं अशी लढाई झाली होती, इतके लोक मारले गेले’ वगैरे सांगत होता तो. एकदा त्याचं एका अमेरिकन माणसाबरोबर अपहरणही झालं होतं. मग मला एकदम म्हणाला, “तुम्ही इथं काय करताय? आपल्या घरी जाऊन निवांत रहा की”. काय बोलायचं ते न सुचल्याने मी गप्प बसले.
सदैव पुढच्या क्षणी हल्ला होणार आहे अशा तयारीत राहायची सवय या अशा अनुभवांमुळे होत राहिली. हल्ला झालाच तर त्याला तोंड देण्याची मानसिकताही यातून कळत-नकळत घडत गेली असावी.
हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव एक ना एक दिवस मला येणार होताच, तो त्यादिवशी आला.
शुक्रवार हा माझ्यासाठी अगदी निवांत दिवस असायचा. एरवी सुट्टीच्या दिवशी घरातली इतर बरीच कामं उरकायची असतात, पण मी इथं हॉटेलमध्ये रहात असल्याने घरकाम सदृश्य कुठलंही काम नसायच. बाहेर उगाच आपलं फिरून येऊ हे शक्य नव्हतं. हमीद हा माझ्या संस्थेचा एक श्रीलंकन सल्लागार याच हॉटेलमध्ये राहायचा. तो मुस्लिम होता, त्यामुळे जवळच्या मशीदीत जाऊन यायचा तासभर. पंधरा दिवसांनी एकदा ऑफिसबरोबर आधी ठरवून आम्ही मॉलमध्ये खरेदीला जायचो. हॉटेलमध्ये रात्री फक्त ठरावीक जेवण मिळायचं, आणि ते ८ डॉलर्स असं महाग होतं. दुपारी व्यवस्थित जेवले असले तर मला रात्री इतक्या भरपेट जेवणाची गरज नसायची. मॉलमधली खरेदी म्हणजे या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था – दूध, फळं, ज्यूस यांचा स्टॉक करून ठेवणं. त्यामुळे ही खरेदी झटपट व्हायची. तशीही २० मिनिटं ही आम्हाला मॉलमधल्या खरेदीसाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा होती, त्यामुळे तिथं उगाच रेंगाळता यायचं नाही. ज्या मॉलमध्ये आम्ही जायचो त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता हे एकदा एकाने सांगितल्यावर मॉलमध्ये जाण्याचंही मी शक्यतो टाळायला लागले.
शुक्रवारी मी निवांत उठायचे, रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे, भरपूर  नाश्ता करायचे, वाचायचे, भारतात फोन करायचे, लिहायचे.
सोबतचे काही लोक सुरक्षा नियम मोडायचे, मलाही त्यात ओढायला बघायचे.
त्या शुक्रवारी सकाळी अकराच्या आसपास गुरखा सैनिकाशी हवापाण्याच्या गप्पा मारत मी उभी होते. तेवढ्यात माझी कॅनेडियन शेजारीण माझ्याकडं आली. तशी आमची आपली हाय-हॅलो पुरतीच ओळख होती. पण आज तिचा बोलायचा नूर दिसत होता.
आज काय करणार आहेस दुपारी?” शेजारणीने विचारलं.
विशेष काही नाही, नेहमीचंच. मी उत्तरले.
मी जाणार आहे बाहेर जेवायला. येतेस का? ” तिचा पुढचा प्रश्न.
तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी ऑफिसची परवानगी घेतली असती, असं आयत्यावेळी नाही मला येता येणार, जणू काही माझाच दोष आहे अशा नम्रपणाने मी उत्तरले.
त्यात काय विचारायचं ऑफिसला? माझ्या ओळखीचा एक टॅक्सीवाला आहे, तो घेऊन जाईल आपल्याला आणि परत आणून सोडेल, शंभर डॉलर्स घेईल तो, निम्मे मी देईन, निम्मे तू दे. मी येणार हे गृहीत धरून बाई बोलत होत्या.
या बाई पण युएनच्या एका संस्थेच्या होत्या. त्यांनी त्यांच्या ऑफिसची परवानगी घेतली असती तर त्या बळावर मला ऐन वेळीही जाण्याची परवानगी मिळाली असती. त्यांच्या ऑफिसचा सिक्युरिटी क्लीअरन्स आहे हे सांगितल्यावर मला काही अडचण आली नसती. पण या परवानगी न घेता चालल्या होत्या तेही खाजगी वाहनाने. अपहरणाविषयी काही दिवसांपूर्वी माझ्या    सहका-यांनी केलेली थट्टामस्करी आणि एक मीटिंग सोडून निघावं लागलं होतं मला – या घटना मी विसरले नव्हते, त्यामुळे मी शेजारणीला शांतपणे नकार दिला.
थोडा धोका तर पत्करायला लागतोच. इथं रूममध्ये नुसत्या भिंती पहात बसणार आहेस का एकटी?” तिने मला उचकवायचा आणखी एक प्रयत्न केला पण मी बधले नाही. निराश होऊन ती आणखी कुणी सोबत येईल का ते पाहायला गेली. तोवर शांतपणे आमचा संवाद ऐकणा-या गुरख्याने मला या देशात काय करायचं नाही हे तुम्हाला चांगलं कळलंय, तुम्ही कधी अडचणीत नाही सापडणार तुमच्या चुकीने असं प्रमाणपत्र कौतुकाने दिलं.  
त्यातले तुमच्या चुकीनेया शब्दप्रयोगाचा अर्थ मला त्यावेळी नीट समजला नव्हता हे थोड्या वेळातच मला समजणार होतं.
चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकांबरोबर असणं टाळलं, की साधारणपणे आपण नको त्या परिस्थितीत सापडत नाही असा आजवरचा अनुभव. पण इथं मुळात परिस्थितीच असाधारण असल्याने तुम्ही कधी संकटात सापडाल त्याचा भरवसा नाही.
दुपारचे चार वाजत आले होते. ही माझी कॉफी प्यायची वेळ. किचनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी कॉफी पिण्याइतका निवांत वेळ. हमीदही यायचा किचनमध्ये आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसायचो आम्ही. लिहित असलेली मेल अर्धवट तशीच ठेवून मी स्वच्छतागृहात गेले.
धडाड... धडाड...
खळ्ळ....खळ्ळ
कर्कश सायरन.
तिन्ही आवाज एकदम आले.
********
स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचांचा खच माझ्याभोवती पडला आहे, बाहेर बंदुकांच्या फैरी झडत आहेत आणि सायरन वाजत आहे या तीन्ही गोष्टींची नोंद मी निमिषार्धात घेतली. हे वाक्य वाचायला तुम्ही जेवढा वेळ घेतला असेल, त्याच्या एक दशांश वेळात मी ही नोंद घेतली.
पण आपलं मन कमालीचं हट्टी असतं. अनुभवाला नाव दिल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही, संवेदनेची खूण ओळखण्याचा त्याचा आटापिटा असतो.
बहुतेक भूकंप झालेला दिसतोय – परिस्थितीचं आकलन करून घेण्याची मनाची धडपड.
आधी बंकर गाठ, बुद्धीने प्रतिसाद नियंत्रित करण्यात पुढाकार घेतला.
स्वच्छतागृहातून बाहेर आले. खोलीतही काचांचा खच पडला होता.
सायरन वाजतच होता. बंदुकांचे आवाज येतच होते.
हेल्मेट चढवलं. जाकिट जड असल्याने घालता येत नव्हतं, ते हातात घेतलं. घाई कर.
पासपोर्ट, ओळखपत्र, पैसे असलेलं छोटं पाऊच गळ्यात अडकवलं.
किती सेकंदात? बहुधा दोन.
सायरन अजून वाजतोच आहे.
बंदुकांचे आवाज जवळून येताहेत का ?
माहिती नाही, लवकर चल.
हा तालिबान हल्ला आहे का ?
असेल किंवा नसेलही. तू पळ.
ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.
लॅपटॉप बंद करावा काय?
नाही, तेवढा वेळ नाही. तू पळ आता लगेच.
फोन? चार्जर?
हं, दोन्ही हॅन्डसेट घे.
वॉकी-टॉकी?
ती राहू दे, तू पळ आधी बंकरकडे.
बूट कुठे आहेत?
खिडकीजवळ. हं! काचांनी भरलेत ते. असू दे, तू बंकरमध्ये जा.
बाहेर सगळीकडे काचा आहेत, नीट पळ. पाय पूर्ण टेकवू नकोस.
नेहमी खोलीसमोर असतात ते आपले गुरखा ठीक आहेत ना?
त्यांची काळजी तू नको करूस. पळ जोरात.
तो गुरखा पाहिलास ? किती एकाग्रतेने नेम धरून उभा आहे तो.
त्याचा चेहरा विलक्षण शांत आहे.
नाही, त्याच्याशी आत्ता बोलू नकोस. तू पळ बंकरकडे.
तुला भीती वाटतेय ?
माहिती नाही. पण काय झालंय नेमकं ?
कळेल लवकरच.
सायरन वाजतोय अजून!
अजून ?
हं, आता उजवीकडे.
तो बघ, रशीद उभाच आहे दारात.
तो न बोलता बाजूला होतो आणि मला आत जाण्याची खूण करतो.
बंकर.
कुणीतरी माझं जाकिट चढवायला मला मदत करतं.
हेल्मेट मी नुसतं अडकवलं आहे, तेही तिसरं कुणीतरी नीट बसवतंय.
फोन चौथ्याच्या हातात देऊन मी ट्राउझर घालते.
आतमध्ये पंधराएक लोक आहेत.
हमीद कुठे आहे ? हं, आला तोही.
लोक पळत पळत येताहेत.
सायरन वाजायचा थांबला आणि बंदुकींचे आवाज अधिक स्पष्ट झाले.
****
रशीद आणि दोन गुरखा रक्षक. आधी हजेरी झाली. आम्ही २५ लोक असायला हवे होतो इथं (युएनच्या विविध संस्थांशी संबंधित २५ लोक या हॉटेलमध्ये राहतात), त्यापैकी २२ जण होतो. तिघांचा काय पत्ता ? जखमी तर नाही ना झाले ? नाही. उपस्थित सहका-यांकडून दोघे जेवायला बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली – ती कॅनेडियन शेजारीण आणि आणखी एक. त्यांच्या ऑफिसला फोन केला. आता पुढचे निरोप ते लोक देतील. एकाला गुरखा सोबत घेऊन आला. नाही, तो जखमी नव्हता, पण काय करायचं हे न सुचून खोलीत नुसता उभा होता. गुरखा प्रत्येक खोलीत जाऊन  कुणी जखमी होऊन पडलं नाही ना हे तपासत होते. सुदैवाने आम्हाला कोणालाही काचा लागलेल्या नव्हत्या.
रशीदने सिक्युरिटीला फोन केला. रशीद आमच्या गटाचा वॉर्डन होता, तो सांगेल तसं आम्ही वागायचं होतं.
आपल्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. कार बॉम्बचा स्फोट ही त्याची सुरूवात होती.  हल्ल्याचं लक्ष्य आपण आहोत का अन्य कुणी ते अद्याप माहिती नाही. किती वेळ आपल्याला इथं थांबावं लागेल ते सांगता येत नाही, त्यामुळे मोबाईलची बॅटरी पुरवून वापरा. कदाचित evacuation होईल (या जागेतून हलवलं जाईल) . प्यायच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. कोप-यात स्वच्छतागृह आहे. मेडिकल इमर्जन्सी वाटल्यास तत्काळ मला सांगा. रशीद हे सगळं इतक्या धीरगंभीरपणे पण सहजतेने म्हणाला की आता पुढं तो विमानाचे पायलट म्हणतात ना तसं पुश बॅक ऍन्ड रिलॅक्स म्हणणार की काय असं मला क्षणभर वाटलं.
बंकरमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता होती. त्या शांततेत मला माझ्या हृदयाची धडधड मग स्पष्ट ऐकू आली. आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो पण या आकस्मिक हल्ल्याने सगळेजण हादरले होते, काय बोलायचं ते कुणाला सुचत नव्हतं.
मग ज्याने-त्याने आपापल्या सुरक्षा अधिका-याला फोन करायला सुरूवात केली. जॉर्जला मी फोन केला. एका रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मी काही बोलायच्या आधी त्याने मला विचारलं, तू आणि हमीद दोघेही बंकरमध्ये आहात ?” अच्छा, म्हणजे हल्ला झाल्याला अजून तीन मिनिटंही झाली नाहीत तर याला माहिती आहे हल्ला झाल्याची. काही हेल्थ प्रॉब्लेम ? दर अर्ध्या तासाला आपण बोलत राहू. रशीद सांगेल तसं करा. इतकंच बोलणं झालं आमचं.
मग छोट्या गटात लोक आपापसात बोलायला लागले. हमीद मला म्हणाला की तो भावाशी स्काईपवर बोलत होता. अचानक काचा पडताना पाहून भूकंपअसं वाटून तो ताबडतोब कॉटखाली जाऊन आडवा पडला. मग सेकंदभरात गोळीबाराचे आवाज ऐकल्यावर त्याला हल्ला झाल्याचं लक्षात आलं.
बंकर. अदमासे दहा बाय बाराची खोली. दोन सोफा, दोन खुर्च्या. उरलेले खाली बसले.
पुन्हा एक मोठ्ठा हादरा. जणू आमच्या दारातच.
दुसरा स्फोट, कुणीतरी म्हणालं.
त्याक्षणी मला एका सनातन सत्याचा साक्षात्कार झाला. मला भीती मरणाची वाटत नाही, एक ना एक दिवस तो दरवाजा उघडून त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकायचं आहेच. खरं सांगायचं तर त्या जगाबद्दल काहीसं कुतूहलही वाटतं. पण मृत्यूच्या त्या क्षणाकडे नेणा-या वेदनेची भीती वाटते. तुला वेदनारहित मरण देतो अशी कुणी खात्री दिली तर मला मरायचं भय वाटणार नाही. इथं अशा हल्ल्यात मेले तर ठीकच, पण कायमचं अपंगत्व आणि परावलंबित्व नको. – अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं – म्हणून विचार जगण्याचा करावा हेही ओघाने आलं.
तिस-या स्फोटाने आमचा बंकर हादरला.

हे किती काळ चालणार आहे? यातून सुखरूप बाहेर पडणार की नाही आपण? – सगळ्यांच्या मनात तेच प्रश्न. कुणीही हे प्रश्न विचारले नाहीत. हे प्रश्न विचारायचे नाहीत असा आमच्यात जणू एक अलिखित करार झाला होता. ....

(अपूर्ण) 

Sunday, June 7, 2015

२२८. भीतीच्या भिंती: ७. कोपरा

भाग ६

स्त्री-पुरुष समतेच्या प्रवासात ‘खास स्त्रियांसाठी असणा-या सोयी’ हा विरोधाभास नसतो, तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो – हे भाषणातलं वाक्य वाटतं खरं; पण तसं नाही. अनेक प्रवास एकटीने करताना ‘प्रश्न फक्त माझ्या क्षमतेचा नसून सभोवतालच्या लोकांच्या संवेदनशीलतेचा देखील असतो’ असा आजवरचा अनुभव. त्यामुळे दिल्लीत मी राहायला गेल्यावर आठवडाभरात ‘दिल्ली मेट्रो’ स्त्रियांसाठी वेगळं कंपार्टमेंट (मेट्रोचा ‘डबा’ हे काही योग्य वाटेना म्हणायला!) घोषित केलं; तेव्हा मला आनंद झाला होता. स्वत:च्या मर्यादा ओळखायची ही सवय जाचक असते अनेकदा, पण किंमत मोजायची तयारी नसते माझी; तेव्हा इलाज नसतो.
रोज फक्त ऑफिस ते घर; ठराविक रस्ता; तेच सुरक्षा रक्षक; तीच माणसं; बोलायचे तेच विषय; रस्त्यात दिसणारे तेच रणगाडे; ऑफीसच्या कोप-यातून दिसणारा आकाशाचा तोच तुकडा; भिरभिरणारी तीच हेलिकॉप्टर्स; तेच सायरन आणि रोजचे तेच ते सुरक्षा संदेश! संध्याकाळी ‘पाचच्या आत घरात’. नाविन्य काही ते नाहीच.
शिवाय सोबत आणिक एक वेगळंच द्वंद्व. आजवरचं आयुष्य भेदभाव जोपासणा-या रूढी-परंपरांशी झगडण्यात गेलं; इथं मात्र ‘स्थानिक संस्कृतीबद्दल आदर’ म्हणत डोकं “हिजाब”मध्ये झाकून वावरत होते – त्याचाही मानसिक ताण होता. ‘हिजाब’ म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर ‘डोकं आणि छाती झाकणारं वस्त्र’. ओढणी वापरायची सवय असल्याने तसा त्रास नव्हता म्हणा. पण ‘हिजाब’ म्हणजे स्त्रीच्या सभ्यतेचं प्रतिक – असलं एक संभाषणवजा भाषण ऐकून एक दिवस वैतागाच्या भरात मी “हिजाब” वापरला नाही; तर गाडीच्या काचेवर सणसणीत दगड आला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी खाली वाकले. गाडी बुलेटप्रुफ नसती, तर माझ्या डोक्याचा नेम अचूक साधला गेला असता. तिथल्या वातावरणात ही अगदीच किरकोळ गोष्ट. पण क्षणभर मी हादरले, हे कबूल करायला हवं.
माझ्यासमोर पर्याय असतात तेव्हा निर्णयस्वातंत्र्याची शेखी मला मिरवता येते. पण नियम मोडायची किंमत “मृत्यू” असेल तर? विचार आणि व्यवहाराचं स्वातंत्र्य ही आज अनेकांसाठी फक्त एक कविकल्पना आहे हे भयावह सत्य काबूलमधील वास्तव्यात समोर आलं आणि तिथल्या स्त्रियांची (आणि एकंदर समाजाचीही) कोंडी काही अंशी मला समजली.  
एक दिवस “हंगामा”शी (ही माझी सहकारी) बोलत होते. “मला काही उद्योग/व्यवसाय करणा-या स्त्रियांना भेटायचं आहे” असं मी तिला सांगत होते. ती म्हणाली, “तू अजून बाग-ए-जनानात गेली नाहीस का? असं करू, परवा सकाळी जाऊया. मीही खूप दिवसांत गेले नाही तिकडे. परवानगी वगैरे मी काढते सगळी, तू फक्त तयार राहा नऊ वाजता.”
काहीतरी नवं घडणार तर इथल्या आयुष्यात याचा मला आनंद झाला. मी हनीफला (हा बांगलादेशचा) म्हटलं, “तुला पण यायचं असलं तर चल तर माझ्या सोबत बाग-ए-जनानात.” त्यावर हंगामा हसून म्हणाली, “त्याला नाही इतक्या सहज येता येणार तिथं. त्याचं काही काम असलं तरच त्याला प्रवेश मिळेल, तोही ‘महिला मंत्रालया’च्या लेखी पूर्वपरवानगीने. ही बाग फक्त स्त्रियांसाठी आहे.” ही माहिती मला रोचक वाटली.
*****
नेहमीप्रमाणे बंदूकधारी सैनिकांच्या पहा-यातून आम्ही बागेत प्रवेश केला. संबंधित खात्याच्या शासकीय अधिकारी सोबत असल्याने आमची ‘सुरक्षा तपासणी’ झाली नाही कदाचित त्यामुळेच आम्हाला प्रवेशिकाही विकत घ्यावी लागली नाही. अन्यथा दहा अफगाण (आणि स्त्रियांच्या सोबत येणा-या १२ वर्षांपेक्षा लहान मुलींना आणि मुलांना पाच अफगाण) प्रवेश शुल्क आहे. गुरुवार-शुक्रवारी इथं गर्दी असते, आज मंगळवार असल्याने  गर्दी कमी आहे पण अगदी शुकशुकाट नाही. तरुण मुलींचे, प्रौढ स्त्रियांचे छोटे गट दिसताहेत; हसण्याचे आवाज येताहेत; संगीत कानांवर पडतंय. वातावरणात एक निवांतपण आणि मोकळेपणा आहे. या भिंतीच्या शहरात अशीही एक जागा आहे तर! अशी एक जागा जिथं स्त्रियांना चेहरा लपवण्याची गरज नाही. माझ्याही नकळत मी एक दीर्घ श्वास घेतला.

प्रथमदर्शनी बाग मला खूप आवडली. स्वच्छता आहे, शांतता आहे, सावली आहे, बसायला पुरेसे बाक आणि तेही चांगल्या स्थितीत आहेत. भरपूर झाडं आहेत. शिवाय उगीच शेरेबाजी करणारे, विखारी नजरेनं पाहणारे पुरुष (कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येणारा हा सर्वसामान्य अनुभव- मात्र जगातल्या सर्व पुरुषांबद्दलची ही नोंद नाही) नाहीत. पुस्तक वाचत बसायला, नुसतं निवांत बसायला  मस्त जागा आहे ही! तेरा एकरांची ही जागा. चारी बाजूंनी बंदिस्त; पण आता भवताली उभ्या राहणा-या इमारती या जागेच्या मूळ उद्दिष्टासाठी प्रश्नचिन्हं ठरताहेत.


ही जागा एके निसर्गरम्य स्थळ होतं काबूलमधलं. पण मुजाहिद्दीन, तालिबान, यादवी या काळात त्याची प्रचंड नासधूस झाली आणि कालांतराने तिथं कचरा डेपो झाला.
मुजाहिद्दीन आणि तालिबान या दोन्ही काळांत स्त्रियांच्या सार्वजनिक वावरावर, स्त्रियांच्या जगण्यावर अनेक निर्बंध लादले गेले. स्त्रियांनी शिकायचं नाही, अर्थार्जन करायचं नाही, संगीत ऐकायचं नाही, कुटुंबातील प्रौढ पुरुषाची सोबत असल्याविना रस्त्यावर यायचं नाही, पुरुष डॉक्टरकडून तपासून घ्यायचं नाही (आणि स्त्रियांनी वैद्यकीय व्यवसाय करायला बंदी!), शरीर नखशिखान्त झाकणारा बुरखा वापरायचा, सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर बंदी, क्रीडासहभागावर बंदी..... – असले अमानुष नियम. (इथं सविस्तर यादी आहे). स्त्रियांसाठी पूर्ण देशच तुरुंग झाला. नियमाविरुद्ध बंड करण्याची शिक्षा एकच – मृत्यू. तुम्ही, तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचा नवरा, तुमचा मुलगा यांपैकी कुणीही – कदाचित सगळेही मारले जाऊ शकतात. आहे तयारी?
२००२-०३ च्या सुमारास युएसएड (USAID) च्या आर्थिक मदतीतून या जागेचं पुनरुज्जीवन झालं. यात पुढाकार घेतला तो ‘महिला मंत्रालयाने’ आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदत केली. इथं काम करणा-या मजूरांत ५० टक्के स्त्रिया होत्या. हंगामासारख्या अनेक स्त्रिया झाडं लावण्याच्या कामात (विनावेतन) सहभागी झाल्या. विध्वंसातून झालेल्या या निर्मितीशी स्थानिक स्त्रियांचं एक हृद्य नातं आहे याचा प्रत्यय हंगामाच्या चेह-याकडे पाहून येत होता.
‘बाग-ए-जनाना’त स्त्रिया विविध कारणांसाठी येतात. कुणी संगणक शिकायला येतं (फेसबुक वापरणा-या अफगाण मुलींचे चमकणारे डोळे मला आजही आठवतात); तर कुणी ड्रायव्हिंग शिकायला. कुणी साक्षरता वर्गात येतं; तर कुणी शिवणकाम शिकायला, तर कुणी इंग्लीश शिकायला. कुणी व्यायामशाळेचा लाभ घेतं तर कुणी इथल्या खाद्यपदार्थांच्या आस्वादात मग्न असतं; कुणी मैत्रिणींच्या घोळक्यात ‘मन की बात’ सांगत असतं. काही शैक्षणिक उपक्रम मोफत आहेत आणि बाकीच्यांसाठी नाममात्र शुल्क आहे.
बाजार
स्त्रिया आणखी एका गोष्टीसाठी इथं येतात – ती म्हणजे खरेदी! या बागेत वीस दुकानं आहेत, आणि ती सर्व स्त्रियाच चालवतात. विक्रेत्याही स्त्रिया आणि ग्राहकही स्त्रिया. कपडे, लाकडी खेळणी आणि शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधनं, घरगुती वापराच्या अनेक वस्तू (पायपुसणी, झाडू, हँगर इत्यादी), गालिचे अशा विविध वस्तू आकर्षकरीत्या मांडलेली दुकानं आहेत. काही शिलाई दुकानं आहेत. इथल्या सर्व कर्मचारी स्त्रियाच आहेत. कच्चा माल आणला जातो तो मुख्यत्वे दिल्ली आणि कराचीतून. सकाळी साडेसातला दुकानं उघडतात आणि दुपारी चार वाजता बंद होतात. दिवसभर इथं थांबायचं असल्याने या स्त्रिया दुपारचं जेवण इथं बनवतात – त्यामुळे वातावरण एकंदर ‘सहली’ सारखं वाटत होतं मला. ‘आम्ही आमच्या कुटुंबासाठी कमावतोय’ असा सार्थ (आणि सकारण) अभिमान त्यांच्याशी बोलताना जाणवला – एक मस्त अनुभव होता तो.
महिला मंत्रालयाकडे या जागेचे प्रशासकीय अधिकार आहेत. वीस दुकानदार स्त्रिया सरकारला भाडं देतात – ते महिना २५०० ते ३६०० अफगाण आहे. त्यात पाणी आणि सुरक्षा व्यवस्था आहे, विजेचं बील आपापलं भरायचं. बरीच दुकानं दहा वर्षांपासून इथं आहेत. ब-याच स्त्रिया इथं दुकान चालवतात आणि त्यांच्या घरचे पुरुष खुल्या बाजारात दुकान चालवतात. गरीब आणि दुसरी कोणतीही उपजीविका नसलेल्या स्त्रीला इथं दुकान चालवायला मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य. स्पर्धेत इथली मोक्याची जागा टिकवून ठेवायचं म्हटलं की भ्रष्टाचार होणं ओघानं आलं. इथल्या स्त्रियांशी पुढं तीन-चार वेळा चर्चा झाल्या तेव्हा हा मुद्दा ठासून मांडला गेलाही.
सरकारतर्फे जी विविध प्रदर्शनं भरवली जातात त्यात या स्त्रिया सहभागी होतात. काबूलमधले शेकडो-हजारो परदेशी कर्मचारी हे यांचं मुख्य ग्राहक. त्यामुळे इथल्या बहुसंख्य दुकानदार स्त्रियांकडे ‘विजीटिंग कार्ड’ आहेत. त्यावर फोन नंबर आणि ईमेल आयडीही आहेत. इमेल अर्थात घरातले पुरुष वापरतात. मोबाईल मात्र सर्वजणी वापरताना दिसल्या. २०१४च्या निवडणुकीनंतर बहुतेक विदेशी कर्मचारी परत जातील, मग खरेदी कोण करणार – ही व्यावसायिक चिंता इथं सगळ्यांना भेडसावते आहे. या स्त्रियांपुढेही हा प्रश्न आहेच.
इथं ‘बाग-ए-खजाना’चं कार्यालय आहे. अफगाणिस्तानमधल्या महिला उद्योजकांची ‘सबाह’ (सभा) ही असोसिएशन २००५ पासून कार्यरत आहे. 

शिवणकाम, एम्ब्रॉयडरी आणि फूड प्रोसेसिंग अशा तीन क्षेत्रांत त्यांनी आजवर सुमारे दोन हजार स्त्रियांना प्रशिक्षण दिलं आहे. प्रशिक्षणोत्तर प्रत्यक्ष व्यवसाय करण्यातही ‘सभा’ स्त्रियांना मदत करते. मी ‘इंदी’ (म्हणजे हिंदी) आहे हे कळल्यावर इथल्या तरुण प्रशिक्षक माझ्याशी उत्साहाने ‘सिवा’ प्रॉजेक्टबद्दल बोलायला लागल्या. मला काही केल्या ‘सिवा’ शब्दाचा संदर्भ लागत नव्हता. काही काळाने उजेड पडला. त्या इलाबेन भट यांच्या ‘सेवा’ संस्थेबद्दल बोलत होत्या. ‘सार्क’ देशांच्या अंतर्गत जे अनेक कार्यक्रम  चालतात त्यात अफगाण स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उत्तम कार्य ‘सेवा’ करते. इथल्या अनेक प्रशिक्षक अहमदाबादमध्ये राहून आल्यात; त्यांना ढोकळा आणि खाकरा माहिती आहे. पुढे मझार-ए-शरीफमध्ये एकीने मला तिचं  प्रमाणपत्रही दाखवलं. ते पाहताना मला खूप बरं वाटलं.


बाग-ए-जनानात एकाही दुकानदार स्त्रीने मला फोटो काढायला परवानगी दिली नव्हती (मी त्यांच्या निर्णयाची कारणमीमांसा समजू शकते.) इथं मात्र या तरुण मुलींनी मला आग्रहाने फोटो काढायला लावला.
 

मग  आम्ही तिथल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खास माझ्यासाठी बनवलेली शाकाहारी बलोनी (किंवा बलुनी - balooni) खाल्ली.

प्रतिकूल परिस्थितीत केवळ तग धरायची नाही; तर आनंदाने जगायची कला अनेकांना अवगत असते हे खरं. अफगाण स्त्रियांच्या सकारात्मक वृत्तीला तोड नाही. त्यांना खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे हे सतत जाणवत राहतं.
जागतिकीकरणाच्या रेट्यात त्या कशा टिकतील? अफगाणिस्तान सरकार प्रत्येक प्रांतात एक ‘बाग-ए-जनाना’ निर्माण करतेय ही चांगली बाब आहे, पण ती पुरेशी नाही. प्रश्न फक्त या स्त्रियांच्या क्षमतांचा नाही. खुल्या स्पर्धेला तोंड द्यायला या स्त्रिया तयार आहेत, खुला बाजार त्यांना सामावून घ्यायला, त्यांना स्पर्धेत उतरू द्यायलाही तयार नाही असं दिसतं. तो बदल कसा घडवून आणणार? स्त्रियांना उपदेश करणं सोपं आहे तुलनेनं; जे स्त्रियांच्या वाटचालीत बाधा आणतात त्यांच्याबाबत आपण काय करणार आहोत?
हा प्रश्न अफगाणिस्तान सरकारला आणि समाजाला जितका आहे तितकाच तो भारतीय सरकारला आणि भारतीय समाजालाही आहे. स्त्रियांसाठी असा ‘खास कोपरा’ जेव्हा निर्माण करावा लागतो तेव्हा आपला पल्ला दूर आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. तोवर ‘बाग-ए-जनाना’ गरजेचा आहे. तोही बंदिस्त आहे, तरीही! पूर्ण शहरात तो फक्त एक कोपरा आहे; जिथवर कदाचित सगळ्या स्त्रिया पोचू शकत नाहीत, तरीही!!
 क्रमशः