ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, February 24, 2026

२८१. “बोशांको”ची भेट: भाग २: शांतिनिकेतन

(If you want to read this post in English, it is available here!

भाग १: बोलपूर

शांतिनिकेतन हे नाव ऐकलं की आपल्याला लगेच रवीन्द्रनाथ टागोर हे नाव आठवतं. भिंतींचं बंधन नसलेले खुले वर्ग, झाडाखाली बसलेली मुलं, गुरुदेव, विश्वभारती — असं एक चित्र डोळ्यांसमोर येतं. आपल्याल हे एक शैक्षणिक- सांस्कृतिक तीर्थक्षेत्र  म्हणून ओळखीचं आहे. जिथं शिक्षण म्हणजे परीक्षा नाही, तर अनुभव आहे; आणि कला म्हणजे चौकटीत बंदिस्त नसलेली गोष्ट आहे — अशी एक सुंदर (आणि काहीशी आदर्शवादीही) प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे. आज हे सगळं तसंच टिकून आहे का, की बदललं आहे – असंही एक कुतुहल मनात जागतं.

नुसतंच पर्यटक म्हणून जायचं तर शांतिनिकेतन पाहायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एक दिवस पुरेसा आहे.  टागोरांचं घर, संग्रहालय, हस्तकला बाजार, आठवड्याच्या हाटमधून आठवण म्हणून घेतलेली एखादी वस्तू — आणि मग परत फिरायचं. शांत आणि सुंदर अशी या जागेची ओळख जितकी खरी आहे, तितकीच अपुरीही आहे. कारण शांतिनिकेतन केवळ एका भेटीत उरकून टाकण्याची जागा नाही. आजही ती एक प्रकारे अंतर्मुख करणारी जागा आहे.

शांतिनिकेतन म्हणजे केवळ टागोरांची आठवण नाही, तर टागोरांनी रुजवलेली एक दृष्टी, एक विचारधारा आहे. माणूस, निसर्ग, शिक्षण, कला आणि समाज यांच्यातली सीमारेषा पुसून टाकण्याचा टागोरांनी केलेला प्रयत्न अजूनही इथं दिसतो. मला सुदैवाने पर्यटकांसारखी पाहायची आणि निघायची घाई नव्हती. स्थानिक लोकांबरोबर राहायचं आणि त्यांच्या शिफारसीनुसार रोज एक निवडक गोष्ट करायची असं मला करत आलं. शांतिनिकेतन हळूहळू पाहताना मग त्याचे अनेक पैलू उलगडत गेले. अर्थात सगळं पाहून झालं नाही, आणि सगळं कळलेलंही नाही. पण शांतिनिकेतनच्या ओळखीची सुरूवात तर झाली.

इतिहास

१८६३ मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेन्द्रनाथ टागोर यांनी बोलपूरजवळ या मोकळ्या, रुक्ष जमिनीत एक छोटंसं आश्रमस्थळ उभारलं. ‘शांतिनिकेतन’ — म्हणजे शांततेचं घर. सिन्हा नावाच्या जमिनदाराकडून देवेन्द्रनाथांनी वीस एकर जमीन विकत घेतली.  देवेन्द्रनाथांनी ध्यान, साधना, आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन अनुभवण्यासाठी आदर्श जागा म्हणून या जमिनीची निव़ड केली. या खरेदीचा उद्देश ब्राह्मो समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शिक्षणाला पलीकडे घेऊन जाणं, निसर्गाशी संवाद साधणं, आणि भौतिक शिक्षणाच्या चौकटींपेक्षा बाहेरचा - “जीवनाचा अभ्यास” - सुरु करणं हा होता.

त्या काळात कोणीही कल्पना केली नसेल की हे शांत, थोडंसं एकाकी ठिकाण पुढे जागतिक विचारांचं केंद्र बनेल.

रवीन्द्रनाथ टागोरांनी या जागेला केवळ आश्रम म्हणून नव्हे, तर शिक्षणाच्या प्रयोगशाळा म्हणून पाहिलं. १९०१ मध्ये त्यांनी इथं ब्रह्मचर्य आश्रम शाळेची स्थापना केली. वर्ग भिंतींमध्ये बंद न ठेवता झाडांच्या सावलीत नेण्याचा निर्णय हा केवळ शैक्षणिक नव्हता, तर राजकीय आणि सांस्कृतिकही होता. वसाहतवादी शिक्षणपद्धतीला पर्याय देण्याचा, भारतीय परंपरा आणि जागतिक विचार यांचा संवाद घडवण्याचा तो प्रयत्न होता. इथं पाठांतरापेक्षा निरीक्षण, स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व आणि परीक्षेपेक्षा समज याला महत्त्व दिलं गेलं.

१९२१ मध्ये विश्वभारतीची स्थापना झाली. ‘यत्र विश्वं भवत्येकनीडम्’ (जिथं संपूर्ण जग एक घर बनतं) हे विश्वभारतीचं केवळ घोषवाक्य नाही, तर इथल्या जगण्याची दिशा होती. देश-विदेशातील विद्यार्थी, कलाकार, विचारवंत इथं येऊ लागले. शांतिनिकेतन हे एका व्यक्तीचं स्वप्न राहिलं नाही, तर सामूहिक प्रयत्नातून उभं राहिलेलं बौद्धिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनलं.

संपूर्ण जग एक घर मानणारा हा प्रयोग. त्यामुळेच इथं शिक्षण म्हणजे फक्त वर्गखोलीतलं ज्ञान नाही. इथं ऋतू, सण, कला, निसर्ग, आणि मानवी नातेसंबंध हे सगळं शिक्षणाचा भाग आहे. आज UNESCO ने शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, पण स्थानिक लोकांसाठी आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन अजूनही जगणं शिकवणारी जागा  आहे.

विश्व भारती परिसर नकाशा

आज शांतिनिकेतन हा एक स्वतंत्र ‘परिसर’ म्हणून ओळखला जातो, जो विश्वभारती विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. 

                          

शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन हे दोन मुख्य भाग मिळून विश्वभारतीचा विस्तृत परिसर तयार होतो. शांतिनिकेतनमध्ये कला, संगीत, भाषा आणि मानवविद्येचे विभाग आहेत; तर श्रीनिकेतन ग्रामीण पुनर्रचना, शेती आणि समाजविकासाच्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं. म्हणजेच शांतिनिकेतन ही केवळ भौगोलिक जागा नाही, तर एक जीवनदृष्टी आहे — आणि विश्वभारती ही त्या जीवनदृष्टीची औपचारिक, विद्यापीठीय अभिव्यक्ती.

हेरिटेज वॉक

शांतिनिकेतन आश्रम हेरिटेज वॉक फक्त रविवारी असतो. आम्ही बोलपूरला शनिवारी रात्री पोचल्याने हेरिटेज वॉक हाच आमचा पहिला उपक्रम होता. 

हेरिटेज वॉकचं शुल्क जरा जास्तच वाटलं
                           

माहितीपत्रकात छातिमतल, शांतिनिकेतन गृह, उपासना गृह, तालध्वज, नूतन बाडी, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व तोरण, पश्चिम तोरण, सिंह सदन, पाठ भवन, दिनांत्रिका, चीना भवन, आणि हिंदी भवन या जागांचा उल्लेख आहे. यातली एक-दोन ठिकाणं वगळता बाकी सगळी पाहिली.

अनासुआने पुढं जाऊन तिकिटं काढून ठेवली होती. बांग्ला, इंग्रजी, आणि हिंदी अशा तीन भाषांमधले गाईड्स (मार्गदर्शक) उपलब्ध होते. आम्ही आणखी एका गटाबरोबर हिंदी बोलणाऱ्या गाईडसोबत चालायला लागलो.

बंगाली भाषेत छातिम असं ज्याला नाव आहे, तो म्हणजे सप्तपर्णी वृक्ष. इथल्या दोन सप्तपर्णी वृक्षांखाली देवेन्द्रनाथ टागोर यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत म्हणजे १८६२ मध्ये ध्यान केलं होतं – हे या जागेचं महत्त्व. कुंपणापलिकडून बऱ्याच अंतरावरून हे वृक्ष पाहावे लागले.  बहुतांश ठिकाणं अशी लांबूनच न्याहाळता आली. आपल्या समाजाला लागलेलं सेल्फीचं वेड आणि भिंतीवर आपलं नाव कोरण्याचा छंद लक्षात घेता पर्यटकांमध्ये आणि वास्तूंमध्ये हे अंतर आवश्यक आहे.

शांतिनिकेतन आश्रम परिसरात पहिलीपासूनचे वर्ग भरतात. 

आकाशाखालचे वर्ग

ठिकठिकाणी वृक्षांच्या आजूबाजूला मोठं वर्तुळ दिसलं.वर्तुळ म्हणजे दगडी वर्तुळाकार कट्टा. इथं विद्यार्थी बसतात. वर्तुळाचा एक भाग इत भागापेक्षा थोडा उंच आहे, तिथं शिक्षक-शिक्षिका बसतात. अजूनही इथं आकाशाखालचे, बिनभितींचे वर्ग भरतात. 

१९१९ मध्ये बौद्ध शैलीत बांधलेला घंटाताल आजही रोजच्या वापरात आहे.

पाठ-भवन

 हे आहे  पाठ-भवन कार्यालय. १९०१ मध्ये पाच विद्यार्थ्यांना घेऊन पाठ-भवनची सुरूवात झाली. इथं आजही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिलं जातं. ज्या बिनभिंतींच्या वर्गाचा मी आधी उल्लेख केला आहे – तो पाठ-भवनचा भाग आहे. आता या जुन्या इमारतीत कार्यालय आहे. मला या इमारतीचा रंग फार आवडला. इमारतीची रचना शैलीही मला भावली. शांतिनिकेतनमध्ये अनेक शैलींचं फ्युजन दिसतं – मग ती वास्तूकला असो की चित्रकला. एक प्रकारचा साधेपणा आणि तरीही विलक्षण सौंदर्य – असं शांतिनिकेतनमध्ये आजही जाणवतं. नव्याचा स्वीकार करताना जुन्यातलं चांगलं ते टिकवून ठेवायची कला शांतिनिकेतनला साधली आहे असं प्रथमदर्शनी वाटलं.

वडाचं एक जुनं झाड त्या परिसरात आहे. त्याच्या आसपास रेंगाळताना शांत वाटलं. एक-दोन लहान मुलं तिथं पारंब्यांवर झोके घेत होती. शेजारच्या एका कट्ट्यावर एकला चलो रे या गाण्यावर पाठ-भवनमधली मुलं-मुली नृत्याचा सराव करत होती. पर्यटक आपल्याकडं पाहताहेत का वगैरे गोष्टींकडं त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. ते त्यांच्या सरावात रममाण झाले होते.

नूतन बाडी (बांग्ला भाषेत नतुन बाडी) हे मृणालिनी देवी (रवीन्द्रनाथ यांच्या पत्नी) यांच्या मृत्यूनंतर १९०२ मध्ये बांधलेलं घर. महात्मा गांधी आणि कस्तुरबा या घरात काही काळ राहिले आहेत. शांतिनिकेतन गृह हे या परिसरातलं सर्वात जुनं घर. याही इमारतीत महात्मा गांधी राहिले आहेत. रवीन्द्रनाथांनी त्यांच्या पुढं प्रसिद्ध झालेल्या अनेक कविता याच घरात लिहिल्या आहेत. यातल्या नेमक्या कुठल्या ते आठवत नाही, पण एका इमारतीतील भिंतींवर आणि छतावर नंदलाल बोस यांची चित्रं पाहता आली. दिल खुष हो गया. इतकी ताजी आणि जिवंत चित्रं होती ती! ती चित्रं पाहून काय वाटलं याचं वर्णन मला शब्दांमध्ये करता येणार नाही.

परिसरात दोन तास भटकलो आणि बाहेर पडलो. बाहेर तूफान गर्दी होती. त्यात हे दोन वादक-गायक तल्लीन होऊन गात होते. ते ऐकतानाही प्रसन्न वाटलं. 

वादक

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आणि चित्रप्रदर्शनं

२६ जानेवारीला सकाळी पुन्हा विश्व-भारती परिसरात गेलो ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी. आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला, त्यामुळे प्रमुख पाहुणे कोण होते ते नेमकं कळलं नाही. पण त्या पाहुण्यांनी राज्यघटना आणि ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन शब्द उच्चारलेही नाहीत. त्यामुळे मला ट्रेनमधल्या त्या तरूण वडिलांची (माझे सहप्रवासी) आठवण आली. (संदर्भ – आधीची पोस्ट). कार्यक्रमाला तशी फारशी गर्दीही नव्हती. होती त्यातही शाळकरी मुला-मुलींची संख्या जास्त वाटली.

तिथून परत येताना एका ठिकाणी आलू चाप खाल्ला आणि चहा घेतला. इथली मातीची चूल छान होती. 

मातीची चूल

या छोट्या चौकात तीन-चार चहाच्या टपऱ्या होत्या. एका बाजूला डॉ. आंबेडकरांचा पुतळा दिसला म्हणून कौतुकाने पाहायला गेले. नवी दिल्लीतल्या एका गृहस्थाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा पुतळा भेट म्हणून दिला आहे. छान वाटलं ते पाहून. 

बाबासाहेबांचा पुतळा

एक दिवस रबीन्द्र भवन पाहिलं. रवीन्द्रनाथांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये हे उभारलं गेलं. टागोर संग्रहालय असं याचं दुसरं नाव आहे. इथल्या संग्रहालयाचं नाव आहे बिचित्र– म्हणजे आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, सुंदर ... इत्यादी. १९६१ मध्ये (रवीन्द्रनाथ जन्मशताब्दी) हे संग्रहालय तयार केलं गेलं. इथं रवीन्द्रनाथांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे रवीन्द्रनाथांचा आइन्स्टाईन, महात्मा गांधी, रोमा रोलां (Romain Rolland)  अशा लोकांशी झालेला पत्रव्यवहार आहे. रवीन्द्रनाथांनी काढलेली पंधराशेपेक्षा जास्त चित्रं आहेत. इथं फोटो काढायला परवानगी नाही. या संग्रहालयात फिरताना जाणवलं की सर्व वर्गातली (गरीब-श्रीमंत-मध्यमवर्गीय) वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथं आस्थेने पहात होती, थबकून चर्चा करत होती. बंगालसाठी आजही रवीन्द्रनाथ हा अभिमानाचा, अस्मितेचा, आणि आस्थेचा बिंदू आहे हे वारंवार जाणवतं.

उत्तरायणमध्ये पाच वेगवेगळी घरं आहेत. कोणार्क, श्यामली, उदयन, पुनश्च, उदिची अशी छान नावं या घरांना आहेत. या पाचही घरांमध्ये रवीन्द्रनाथांनी वेगवेगळ्या काळात वास्तव्य केलं आहे. श्यामली हे मातीचं घर आहे.

"उदिची"

या घरांच्या बांधणीत केलेले वेगवेगळे प्रयोग पाहून चकित झाले.

विक्रीकक्षात रवीन्द्रनाथांच्या चित्रांच्या छोट्या प्रतिकृती विकत मिळतात असं कळलं होतं, पण मला तर काहीच दिसलं नाही. इथं नेहमीचा सरकारी खाक्या दिसला. कर्मचारी लोकांकडं लक्ष देत नव्हते. त्यामुळे माझाही काही खरेदी करण्याचा उत्साह मावळला.

गणेश हलोई (Ganesh Haloi) यांच्या Ajanta Mural Tracing चं प्रदर्शन पाहायला गेलो.

प्रदर्शनाची माहिती देणारं पोस्टर

तिथं आमच्याविना कुणीच नव्हतं. तिथली प्रकाशयोजना अशी होती की ट्रेसिंग नीट दिसतंच नव्हतं. तिथले सुरक्षा कर्मचारी मात्र उत्साही होते, बरीच माहिती सांगत होते. गणेश सर अजंठामध्ये सहा वर्ष काम करत होते. त्यांनी केलेली ट्रेसिंग सुंदर आहेत. कशी केली असतील हा प्रश्न पडला, पण त्याचं उत्तर काही शोधलं नाही. गणेश सरांचं या विषयवारचं पुस्तक प्रकाशित झालं आहे असं नंतर कळलं. कदाचित पुस्तकात सविस्तर माहिती असेल, किंवा इतर मार्गांनी ती शोधावी लागेल.

रवीन्द्रनाथांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतं. पण शांतिनिकेतनमध्ये त्यांच्यासमवेत योगदान देणारे आणखी तीन चित्रकार महत्त्वाचे आहेत. नंदलाल बोस (Nandalal Bose), रामकिंकर बैज (Ram Kinker Baij) आणि बिनोद बिहारी मुखर्जी (Benode Behari Mukherjee)  बैज आणि मुखर्जी यांच्या चित्रांचं प्रदर्शन दुसऱ्या दालनात होतं. तीही चित्रं अप्रतिम होती. सगळीच चित्रं अतिशय जिवंत वाटत होती. बिनोद बिहारी एका डोळ्याने अंध होते तर दुसऱ्या डोळ्याने त्यांना दूरचे दिसत नसे – तरीही त्यांची चित्रं अतिशय वास्तवदर्शी आहेत. कसं काय चित्रं काढत असेल हा माणूस – असं वारंवार वाटत राहिलं. प्रदर्शनाची वेळ संपत आल्याने आम्हाला तिथून निघावं लागलं. पण केवळ चित्रं पाहण्यासाठी शांतिनिकेतनला पुन्हा यावं इतकी सगळी चित्रं सुरेख होती.  

आणखी एका सकाळी ऋत्विक घटक यांच्या जीवनकार्यावरचं फोटो प्रदर्शन पाहिलं. ते पाहताना आपण यांचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत हे जाणवलं. दुसऱ्या एका दालनात कृष्णा रेड्डी यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं. प्रिंटमेकर पेंटिंग असा एक नवा प्रकार इथं पाहायला मिळाला. शांतिनिकेतनच्या एका तरूण विद्यार्थ्याने (तोही तिथं प्रदर्शन पाहायला आला होता) मला सोप्या भाषेत ते समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण माझ्या ते सगळं डोक्यावरून गेलं. चित्रं अर्थातच छान होती.

शांतिनिकेतन-बोलपूरमधली ही सगळी प्रदर्शनं पाहताना आपल्याला चित्रकलेतलं काही कळत नाही याचं अपार दु:ख झालं. चित्रकला-निरक्षर असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे एक पूर्ण नवं विश्व होतं. एकाचवेळी अद्भुत, सुखावणारं, आणि तरीही परक्यासारखं अंतर ठेवून वागणारं.

चित्रांची भाषा समजून घ्यायला हवी खरी. नुसती एक नवी लिपी नाही, तर नवा विचार, नवा संवाद ....यांच्या अगणित शक्यता त्यामुळे समोर येतील.

आपल्या जगण्यात साधेपणा आणि सौंदर्य दोन्ही आहे का? निसर्गाकडं पाहण्याची आपली दृष्टी खरोखर कशी आहे? कलाकारांना जे दिसतं ते आपल्याला दिसू शकतं का? कलेची साधना करण्याइतकी तिच्याशी आपली बांधिलकी आहे का? या जगात आपलं नातं नेमकं कुणाशी, कशाशी आहे हे आपल्याला पुरेसं समजलं आहे का? …. असे अनेक प्रश्न या भटकंतीत माझ्या मनात येत राहिले. शांतिनिकेतनने मला नक्की एक नवी दृष्टी दिली. तिचं गारूड माझ्यावर किती काळ राहील हे काळच सांगेल.  

*******

पुढच्या भागात जाऊ जुन्या कोलकात्यात. 

Monday, February 9, 2026

२८०. “बोशांको”ची भेट: भाग १

(Want to read this post in English? It is available here.)

शीर्षकातला बोशांको हा शब्द तुम्ही बहुधा पहिल्यांदाच वाचत असाल.

कोण आहे हा किंवा ही बोशांको असंही तुम्हाला कदाचित कुतुहल वाटत असणार.

तर बोशांको हे कुणाही व्यक्तीचं नाव नाहीये. किंबहुना बोशांको हा शब्द माझ्याही कधी ऐकण्यात-वाचण्यात आलेला नाहीये. आज मीच हा शब्द तयार केलाय. तीन जागांच्या नावांमधलं प्रत्येकी पहिलं अक्षर घेत तयार केलेला शब्द.

बोलपूर-शांतिनिकेतन-कोलकाता इथं मी नुकतीच जाऊन आले. त्या प्रवासाच्या या नोंदी. बोशांकोच्या नोंदी. किंवा मला दिसलेलं, अनुभवायला मिळालेलं बोशांको”.

या लेखमालिकेत चार लेख असतील. पहिल्या लेखात बोलपूरमधलं मातीचं घर आणि खाद्यपदार्थांबद्दलचे अनुभव आहेत. दुसरा लेख शांतिनिकेतनवर आहे. तिसरा लेख जुन्या कोलकात्यातील भटकंतीबाबत आहे. चौथ्या आणि शेवटच्या लेखात दक्षिणेश्वर भेट आणि एका कलाकृतीबद्दलची माझी निरीक्षणं असतील.

*****

कोलकात्याच्या दिशेने

पुणे ते कोलकाता हा प्रवास आझाद हिंद एक्स्प्रेसने केला. चौतीस तास अपेक्षित असणारा प्रवास - गाडीला उशीर झाल्याने बेचाळीस तासांचा झाला. हा प्रवास फक्त किलोमीटरमध्ये नसतो, तर तो सहप्रवाशांना जाणून घेण्याचाही असतो. अर्थात इतक्या लांबच्या प्रवासात सहप्रवाशांचे बरे-वाईट अनुभव येतातच. मनमाड किंवा भुसावळ कुठंतरी रात्री एक मोठा गट डब्यात चढला. रात्रीच्या अंधारात बर्थचे नंबर नीट दिसत नाहीत, त्यामुळे त्यांचा थोडा वेळ गोंधळ चालणार हे समजण्याजोगं होतं. इतर लोक झोपले आहेत, याचं भान तसंही कमी लोकांना असतं हा नेहमीचा अनुभव. पण अर्धा तास झाला तरी या लोकांचे आवाज काही थांबेनात. मग मी त्यांना आवाज कमी करायला सांगितलं तर त्यांना राग आला आणि त्यांचा आवाज आणखीच वाढला.

दुसऱ्या दिवशी त्यांच्यातल्या काहीजणांशी गप्पा मारताना कळलं की हा एक आध्यात्मिक गट होता आणि गंगासागरला चालला होता. गटात एकूण चाळीस लोक होते, आणि त्यात पंचवीस पुरूषही होते. त्यातल्या काही पुरूषांना खालचा बर्थ मिळालेला होता. म्हणजे काल रात्री हे लोक आपल्या गटातल्या स्त्रियांना खालचा बर्थ द्यावा म्हणून दुसऱ्याच पुरूष प्रवाशांशी भांडत बसले होते – ते फारच स्वार्थीपणाचं होतं तर. आपापसात त्यांना गटातल्या स्त्रियांना खालचा बर्थ देण्याचं काम शांतपणे करता आलं असतं. पण शक्यतो आपली सोय न सोडता दुसऱ्यांकडून लाभाची अपेक्षा करायची ही आपल्या समाजाची (त्यातल्या बहुसंख्य लोकांची) सवय आहे.

दुसरे एक दादा होते. ते पुण्यातून गाडी सुटतानचा अंथरूण पसरून झोपी गेले. मध्येमध्ये उठून ते फोनवर बोलत होते, खात होते. पण तिसऱ्या दिवशी सकाळी उतरेपर्यंत ते झोपलेलेच होते. त्यांना बरं नाहीये की काय हे एकदा विचारून घेतलं. ते फक्त विश्रांती घेत होते.

एक मध्यमवयीन बाई नागपूरला चढल्या. त्याही कोलकात्याला जात होत्या. त्यांचा भाऊ आजारी होता म्हणून त्या जरा विमनस्क होत्या. आम्ही काही खात असताना त्यांना खाण्याचा आग्रह केला तेव्हा जरा अधिक बोलणं झालं.. त्यांचा पुढचा प्रश्न होता – तुम्ही कुठं चाललात?

हा प्रश्न जास्तच अवघड होता. कारण मी अनुज्ञाच्या (माझ्या भाचीच्या) मैत्रिणींच्या घरी ओळखदेख नसताना राहायला चालले होते. असं ओळख नसताना कुणाहीकडं राहायला किंवा जेवायला जाणं हे माझ्यासाठी नेहमीचंच आहे. पण ते अनेकदा समोरच्या माणसांच्या व्याख्यांमध्ये न बसणारं असतं. त्यामुळे मी मोघम – शांतिनिकेतन पाहायला चाललोय – असं सांगून विषय बदलला.

तिसरे एक सहप्रवासी तरूण होते. ते कपड्यांचे ठोक व्यापारी होते. गाडीला उशीर झाल्याने त्यांच्या पुढच्या विमानप्रवासांचा झालेला घोळ ते निस्तरत होते. मध्येच त्यांना घरून फोन आला. त्यांचं सगळं संभाषण मला अगदी सहज ऐकू येत होतं. त्यांच्या तिसरीतल्या मुलीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत भाषण द्यायचं होतं, त्याबाबत बायकोशी त्यांचं बोलणं चालू होतं. मुलीला भाषण वाचता येणार नाही, ते पाठच करावं लागेल हे कळल्यावर ते जरा विचारात पडले. मग बायकोला म्हणाले, तू काळजी करू नकोस. तिला फक्त तीन शब्द लक्षात ठेवायला सांग. भारत, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एवढे तीन शब्द ती बोलली तरी छान होईल. मला त्या गृहस्थांबद्दल आदर वाटला. मग त्यांच्याशी आणखी थोड्या गप्पा झाल्या.

प्रवासात असा माणसांचा, दृष्टिकोनांचा, वास्तवांचा एक विशाल पट उलगडत राहतो.   

बोलपूर

हावडा जंक्शनला गाडी पोचली तेव्हा देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती. पोटपूजा करून आम्ही बोलपूरच्या दिशेने निघालो. ज्येष्ठ नागरिक या नात्याने मला गाडीत पुढंची जागा देण्यात आली आणि संपूर्ण प्रवासात ती जागा माझ्यासाठी राखीव राहिली 😊  

कोलकाता ते बोलपूर हे अंतर सुमारे १५० किलोमीटर आहे. एकूण इथल्या लोकांना गाडीचा हॉर्न वाजवायची आणि गाडी वेगात हाकायची सवय आहे हे पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच लक्षात आलं. 

कोलकाता शहराबाहेरचा महामार्ग

आपल्याला (पश्चिम बंगाल बाहेरच्या लोकांना) शांतिनिकेतन माहिती आहे, पण बोलपूर माहिती नसतं. शांतिनिकेतन बोलपूरमध्ये आहे ही बोलपूरची मुख्य ओळख असं म्हणता येईल. पण बोलपूरला शांतिनिकेतनच्या आधीचाही इतिहास आहे, ओळख आहे.

बोलपूरमधली भातशेती 
बीरभूम जिल्ह्यातलं बोलपूर. खरं तर मी मी पर्यटक पाहतात तसं बोलपूर पाहिलंच नाही. शांतिनिकेतनला जाता-येता आणि रेल्वे स्टेशनवर जाताना जे दिसलं त्यावरून छान वाटलं. भातशेतीत (इथं तीन वेळा भात घेतला जातो आणि तिसऱ्या भातासाठी जमिनीखालच्या पाण्याचा भरपूर उपसा होतो) लावणीचं काम चालू होतं. त्यात स्त्रिया आणि पुरूष दोघंही सारख्याच संख्येने काम करताना दिसले. लाल माती दिसते आहे. रस्ते छोटे आहेत पण वाहनंही तितकी जास्त नाहीत. अनेक स्त्रिया आणि पुरूष सायकलवरून जाताना दिसले. अजून हे सायकलींचं शहर आहे असं म्हणता येईल. बरीच हॉटेल्स आणि होम-स्टे दिसले त्याअर्थी पर्यटक मोठ्या संख्येने येत असावेत.

मातीचं घर

बोलपूरला आम्ही पोचलो तोवर अंधार झाला होता. पण बाहेरून आम्ही घरात आल्या आल्या थंडी संपून एकदम उबदार वाटलं. मी आले होते अनासुआच्या घरात. मातीच्या दुमजली घरात. हे मातीचं घर बांधणारी वास्तुविशारद आहे अनुज्ञा. अनुज्ञाला साहाय्य करणारी दुसरी वास्तुविशारद आहे प्रतीक्षा.

अनुसुआचं हे घर केवळ सुट्टीसाठीचं दुसरं घर नाही, तर प्राथमिक घर आहे. ती इथं कायमस्वरूपी राहते. २०२४-२५ मध्ये मातीचं घर बांधणं आणि त्यात कायमस्वरूपी राहणं म्हणजे मागं जाणं नाही, तर पुढं पाहणं आहे. हवामान बदल, वाढती उष्णता, अनिश्चित पावसाळे आणि विजेचा अति वापर — या सगळ्या पार्श्वभूमीवर मातीचं घर हे एक चांगलं उत्तर आहे. माती उन्हाळ्यात घर थंड ठेवते, हिवाळ्यात उबदारपणा देते आणि माणसाला निसर्गाशी पुन्हा जोडते. एसी, फॅन, हीटर यांच्या आवाजाऐवजी भिंतींचं शांत श्वसन जाणवतं. अशा घरात राहणं हा एक निवांतपणाचा अनुभव होता. ते घर अनुज्ञाने बांधलेलं असल्यामुळे तर मला ते अधिकच जवळचं वाटलं.

अनासुआचं घर दुरवरून असं दिसतं

मातीचं घर पर्यावरणपूरक तर आहेच, पण ते सामाजिक आणि सांस्कृतिक विधानही आहे. स्थानिक माती, स्थानिक कारागीर, स्थानिक ज्ञान — यावर उभं राहिलेलं घर गावात रोजगार निर्माण करतं. स्थानिक कारागिरांच्या ज्ञानाची आणि कौशल्याची परंपरा ते जिवंत ठेवतं. मातीचं घर प्रतिष्ठेची, समृद्धीची प्रचलित व्याख्या मोडून काढतं. मातीचं घर सांगतं की निसर्गाशी नातं हीच समृद्धी आहे. सिमेंटच्या जंगलात उभं राहिलेलं असं मातीचं घर माणसाला आठवण करून देतं की आपण निसर्गावर राज्य करायला नाही, तर त्याच्यासोबत राहायला आलो आहोत.

बदकांचा विरंगुळा

अनुसुआचं घर प्रशस्त आणि हवेशीर आहे. भोवताली संथ वाहती हवा, आणि पक्षांचे आवाज. खिडकीतून सहज दिसणारं आकाश आणि पक्षी. तिच्या घरातल्या कुत्र्यांचा, कोंबड्यांचा, आणि बदकांचा सहज वावर आल्हाददायक होता. 

विसावा

अंगणात एक तळं होतं. 

अंगणातून दिसणारं घर. बाजूला भाताची पारंपरिक कणगी

बदकं रांगेने येत आणि त्या तळ्यात एकामागोमाग उड्या मारत ते पाहायला मजा आली. बागेत भाजीपाला आहे. भाताचं शेत आहे. आणखी एक – त्या घरात भरपूर पुस्तकं आहेत. कोणी कुठंही निवांत बसावं, वाटलं तर इतरांशी गप्पा माराव्या किंवा वाचत बसावं, काळी कॉफी किंवा  काळा चहा पीत बंगाली गीतं ऐकावी ... कोणत्याही गरजेसाठी माणसाला जणू घराबाहेर जायलाच लागू नये असं तिथलं वातावरण.

अनुज्ञाचं एक फेसबुक लाईव्ह पाहून अनुसुआला वाटलं की हीच वास्तुविशारद आपल्याला हवं तसं घर बांधू शकेल. आणि मग दोन अनोळखी व्यक्ती एकमेकींशी बोलल्या, आणि कामाला सुरूवात झाली. काम पूर्ण झाल्यावरही त्यांच्यातले भावबंध कायम राहिले. त्यातून मीही त्यांच्याशी जोडले गेले. तंत्रज्ञानाच्या सकारात्मक परिणामांचं हे एक जिवंत उदाहरण. आणि 'अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका' हे वारंवार सांगणाऱ्या सूचनांना आपण का नाकारलं पाहिजे याचंही एक उदाहरण. 

मातीच्या घरासंबंधी अधिक जाणून घ्यायचं असेल तर मातीमोलच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. 

खाद्यपदार्थ

रूढार्थाने मी खवय्या गटात मोडत नाही. स्थानिक पदार्थ मी नेहमीच चाखून बघते. पण अमूकच पाहिजे आणि तमूकच नको असं काही माझं नसतं. कुणी मला आवडती भाजी कोणती, किंवा आवडती मिठाई कोणती असं विचारलं तर मला धड सांगताही येत नाही. आधी बोलपूरमधल्या अनुसुआच्या घरात आणि नंतर कोलकात्यातल्या देबाहुतीच्या घरात मात्र खाद्यपदार्थांबाबत एक वेगळीज जागरूकता माझ्यात आली.

आम्ही सगळेच सुट्टीवर होतो, त्यामुळे घाई कुणालाच नसायची. नाश्त्याला आणि जेवणासाठी तुनिदीदी रोज वेगवेगळे पदार्थ हौसेने बनवत असायची. कोणत्याही जेवणाची सुरुवात कधीही घाईने होत नसे. बंगाली पद्धतीप्रमाणे जेवण हे एका विशिष्ट क्रमाने करायचं असतं. भात हे मुख्य अन्न. पण ते ताटात थोडंच वाढून घ्यायचं. सुरूवात करायची ती  शुक्तो  किंवा एखादी सौम्य (किंवा सौम्य कडवट चवीच्या) भाजीने. तिच्यासोबत पहिला भात संपवायचा. मग पुन्हा भात वाढून घ्यायचा. आता त्यासोबत डाळ (मसूर किंवा मूग) खायची. मग येणार  आलू पोस्टो, लाउ घोंटो  अशा भाज्या. मग येणार मासे. प्रत्येक जेवणात वेगवेगळे मासे. मी सुरूवातीला हौसेने नावं विचारली, मग हळूहळू सोडून दिलं नावांची काळजी करणं. मग येणार चिकन किंवा मटण. जेवणात बटाटा हवाच. पण मी पाहिलं की प्रत्येक भाजीसाठी बटाटा वेगळ्या पद्धतीने कापलेला असायचा.

पदार्थांची रांग होती, पण गोंधळ नव्हता. बंगाली जेवण म्हणजे मासे – असं मला वाटतं होतं, ते काही खरं नाही. शाकाहारातही प्रचंड वैविध्य आहे. प्रत्येक चवीला तिची जागा, तिचा वेळ. खाणं म्हणजे एक प्रवास वाटत होता — थेट मुख्य पदार्थावर उडी नाही, तर टप्प्याटप्प्याने पुढे जाणं. खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटायचं, पण डोकं जड होत नव्हतं — हीच त्या सिक्वेन्सची ताकद.

जेवणाचा शेवट नेहमी गोड आणि शांत. पायेश, छेना संदेश, रोसोगोल्ला  किंवा कधी मिष्टि दोई

गूळ-खोबऱं यांचं सारण असलेला 'पाटी-शाप्ता'

आधी खाल्लेल्या सगळ्या चवींना अलगद निरोप देणारी मिठाई. सगळे गोड पदार्थ नोरेन गुडमध्ये बनवलेले. नोरेन गुड म्हणजे बंगालच्या हिवाळ्याची खास ओळख. खजूराच्या झाडावरून पहाटे गोळा केलेल्या रसापासून बनवलेला हा गूळ फक्त काही महिन्यांसाठीच मिळतो. थंड हवेत रस हळूहळू आटवत नेला की त्यात साखरेसारखी तिखट गोडी न राहता धुरकट, मऊ, थोडी मातीची चव तयार होते. म्हणूनच नोरेन गुड  ही केवळ गोडी नाही, तर ऋतूची खूण आहे. वर्षभर सहज उपलब्ध नसणं हीच त्याची खासियत. गूळ आणि खोबरं यांचा वापर पदार्थांची चव वाढवत होता. त्या आठ-दहा दिवसांत मला हे प्रकर्षाने जाणवलं की बंगाली खाद्यसंस्कृतीत खाणं हे यज्ञकर्म किंवा उदरभरणही नाही तर शांत, संथपणे उपभोगायचा एक प्रवास आहे.

मातीच्या घरात निवांत राहताना शांतिनिकेतनला अर्थातच आम्ही विसरलो नव्हतो. पुढचे तीन दिवस वेगवेगळ्या निमित्ताने शांतिनिकेतन-विश्व भारती परिसरात फिरणं झालं. त्यासंबंधी अधिक जाणून घेऊयात पुढच्या लेखात.  

 

Thursday, January 22, 2026

२७९. तिरूवनंतपुरम (त्रिवेंद्रम)

(English translation of this post is available here.)

भाग ३: कन्याकुमारी परिसर भटकंती

कन्याकुमारीच्या प्रवासाची आखणी करतानाच तिरूवनन्तपुरमला दोन दिवस राहण्याचा बेत मी आखला होता. माझा असा समज होता (नेमका का ते माहिती नाही) की कन्याकुमारीहून त्रिवेंद्रमला जायला भरपूर बस आहेत आणि त्या सतत आहेत. प्रत्यक्षात अशा थेट बस जवळजवळ नाहीतच. नागरकोविलच्या वडस्सेरी (Vadassery) बसस्थानकावरून मला त्रिवेंद्रमसाठी बस मिळेल असं सांगण्यात आलं. मग नागरकोविल गाठलं. नागरकोविलच्या बसमध्ये चढताना खरं तर मी कंडक्टरला वडस्सेरीला जाते ना ही बस? मला पुढं त्रिवेंद्रमला जायचंय..” वगैरे म्हणून चढले होते. नागरकोविलला उतरल्यावर इतर प्रवाशांना त्रिवेद्रमला जाणारी बस?” असं विचारायला गेल्यावर लक्षात आलं की मी अण्णा बसस्थानकावर आले होते. वडस्सेरीहून तुम्हाला त्रिवेंद्रमची बस मिळेल असं जो तो मला (मोडक्योतोडक्या इंग्रजीत) सांगत होता, पण वडस्सेरीला जायचं कसं? आपल्याच देशातल्या माणसांशी आपल्याला भाषा माहिती नसल्यामुळे साधं बोलताही येत नाही – हे पुन्हा एकदा जाणवलं.

भाषा येत नसली तरी लोक मदत करायला मात्र अगदी उत्सुक होते. पाच-सहा प्रवाशांची माझ्या गहन प्रश्नावर एक मिनी-कॉन्फरन्स झाल्याचं मला दिसलं. एक मध्यमवयीन बाई माझा हात धरून मला एका बसपाशी घेऊन गेल्या. त्यांनी कंडक्टरला काहीतरी सांगितलं. कंडक्टरने हाताने मला बसमध्ये चढण्याची खूण केली. नो त्रिवेंद्रम, वडस्सेरीअसं त्याने मला तीनतीनदा बजावून सांगितलं. ही बस मला नागरकोविलमधल्या वडस्सेरी या बसस्थानकावर सोडणार - इतकं मला कळलं.

अण्णा बसस्थानकापासून वडस्सेरीपर्यंत मला तिकिट घ्यावं लागलं नाही. स्त्रियांसाठी तीस किलोमीटरचा प्रवास मोफत आहे असं कळलं. पण कन्याकुमारी ते नागरकोविल या बावीस किलोमीटरच्या प्रवासाचं मात्र मी तिकिट काढलं होतं. (नागरकोविल, कन्याकुमारी दोन्ही तामिळनाडूत आहेत.) त्यामुळे नक्की योजना काय आहे ते कळलं नाही. कदाचित स्थानिक बस आणि लांब पल्ल्याची बस असा काहीतरी फरक असावा. किंवा तामिळनाडूची बस आणि केरळची बस असा फरक असावा. तिकिट काढावं लागलं याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, योजना मला नीट समजली नाही, इतकंच म्हणायचं आहे. 

बसमध्ये माझ्या शेजारी तामिळ भाषा बोलणाऱ्या ताई होत्या. त्यांनी उत्साहाने बोलणं सुरू केलं. माझं तामिळ वणक्कमपासून (नमस्कार) सुरू होतं आणि तामिळ तेरियादपाशी (मला तामिळ येत नाही) संपतं. पण गंमत म्हणजे तरीही त्यांचा थांबा येईपर्यंत दीडेक तास आम्ही बोलत होतो. बोलायचंच असेल तर भाषेचा अडसर येत नाही – हेही पुन्हा एकदा लक्षात आलं. आणि कदाचित त्यामुळेच अन्य भारतीय भाषा शिकण्याची तेवढा सोस रहात नाही. काम भागून जातं. लोक मदत करतात. लोक हसून बोलतात. लोक त्यांचा डबा काढतात आणि आपल्यालाही चहा-नाश्त्याचा आग्रह करतात.

त्रिवेंद्रमची ही काही माझी पहिली भेट नव्हती. इथल्याही जुन्या काही आठवणी आहेत. एका युवक शिबिरासाठी महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना घेऊन कन्याकुमारीला आले होते. चेन्नैला आमची गाडी उशीरा पोचली, त्यामुळे त्रिवेंद्रमला जाणारी पुढची गाडी चुकली. मग चेन्नै स्थानकप्रमुखांशी बोलणी करून दुसऱ्या एका गाडीत व्यवस्था केली. ती गाडी अपरात्री कधीतरी त्रिवेंद्रमला पोचली होती. तीस मुला-मुलींसह त्रिवेंद्रम स्थानकाच्या फलाटावर रात्री झोपलो होतो – तो एक संस्मरणीय अनुभव होता. नंतर कधीतरी दोन आठवड्यांच्या एका प्रशिक्षणासाठी कोवलम बीचजवळ राहिले होते, आणि सकाळ-संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यावर जात होते. दिल्लीत असताना एका प्रकल्पाच्या निमित्ताने त्रिवेंद्रमच्या आसपासच्या खेड्यांमध्ये जाणं झालं होतं, तेही दिवस छान होते. केरळची राजधानी असलेलं हे शहर मला केवळ प्रशासकीय केंद्र म्हणून नाही, तर इतिहास, संस्कृती, स्थापत्यकला आणि माणुसकी यांचं सुंदर मिश्रण म्हणून अनुभवायला मिळालं आहे. आधीच्या सगळ्या भेटी कामानिमित्त होत्या, ही भेट निवांत होती हा एक मोठा फरक यावेळी होता.

तिरू हे एक आदरसूचक अक्षर आहे. काहीसं संस्कृतमधल्या श्री सारखं. तिरूचिरापल्ली, तिरूपती, तिरूवल्लुवर.... अशा अनेक शहरांच्या नावात तिरू आहे. ‘अनंत’ हे ईश्वराचं संबोधन आहे, पण इथं अनंत म्हणजे शेषनाग. ‘पुरम’ म्हणजे निवास, नगरी. शेषावर विसावलेल्या विष्णूशी जोडलेली ही नगरी. शहराचं नावचं असं अर्थपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण. या शहराला स्वत:ची एक लय आहे. रस्ते टुमदार, वळणावळांचे. रस्त्यांवरील वाहतूक पाहतानाही ही लय जाणवत राहते. दुचाकीस्वारांची संख्या मोठी असली तरी जवळजवळ प्रत्येकजण हेल्मेट घालूनच गाडी चालवतात—पुरुष, स्त्रिया, तरुण, वयस्क सगळेच, दुचाकी चालवणारे आणि मागे बसणारे – दोघेही हेल्मेट वापरतात. 

हे केवळ कायद्याचं पालन वाटत नाही, तर सुरक्षिततेची एक सामूहिक जाणीव वाटते. वाहतूक तुलनेने कमी आक्रमक, अधिक संयमित आणि शांत भासते - जणू या शहराचा स्वभावच तसा आहे.

होम-स्टे

तिरूवनन्तपुरममध्ये कुठं राहायचं ते ठरवताना Booking.com या संकेतस्थळावर एक होम-स्टे दिसलं. Chaithritha Ladies Homestay.  ते फक्त स्त्रियांसाठी होतं आणि त्याचे रिव्ह्यूजही चांगले होते. पैसे प्रत्यक्ष तिथं गेल्यावर भरायचे होते, त्यामुळे काही कारणांनी प्रवास रद्द झालाच तरी पैसे वाया गेले नसते. मी लगेच तिथं राहायचं नक्की केलं.

मी कन्याकुमारीला जायला निघण्यापूर्वी सुमारे महिनाभरापासून या होम-स्टेवाल्या लोकांचा माझ्याशी व्हॉट्सऍपवरून संवाद सुरू झाला. मी कुठून, कशी पोचणार आहे, स्टेशन किंवा बसस्थानकावरून मला पिकअप व्यवस्था हवी आहे का, मला त्रिवेंद्रममध्ये काय पाहायचं आहे, त्यासाठी काही व्यवस्था करायची आहे का ... वगैरे. मी त्रिवेंद्रमला त्यांच्या घरी पोचेपर्यंत हा संवाद चालू होता. किंबहुना मी पुण्याला परत पोचल्यावरही मी त्यांना घरी सुखरूप पोचल्याचं कळवलं होतं – अगदी आपल्या सुहृदांना कळवावं तसं.

होम-स्टेतर्फे माझ्याशी संवाद साधणारी आणि माझी सगळी व्यवस्था करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे मला माहिती नव्हतं. त्रिवेंद्रमला पोचल्यावर बिंदू मॅडम भेटल्या तेव्हा कळलं की माझी सगळी विचारपूस त्यांचा मुलगा लिहिन (हो, हेच त्याचं नाव) करत होता. तो दूर दिल्लीत, मी पुण्यात आणि व्यवस्था त्रिवेंद्रममधली – हे तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झालं. दिल्लीत राहून तो आईला सगळी मदत करतो. (त्यांची वैयक्तिक माहिती अर्थातच जास्त लिहिणार नाहीये.)

कन्याकुमारीतून त्रिवेंद्रमला बसने येणार का ट्रेनने असं मला लिहिनने विचारलं. तोवर मी त्या प्रवासाचा फारसा विचार केला नव्हता. कन्याकुमारीला जाताना त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी हा प्रवास ट्रेनने करणार होते. मग बदल म्हणून कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम बसने जाऊयात असं ठरवलं. त्रिवेंद्रमला येण्यासाठी तामिळनाडू आणि केरळ अशा दोन्ही राज्यांच्या बस असतात. पण तुम्ही केरळ राज्याच्याच बसने या”, असं लिहिनने मला आग्रहाने सांगितलं. ते ऐकताना गंमत वाटली. आपण महाराष्ट्राच्या बसबाबत इतके काही आग्रही नसतो हे जाणवलं.  

त्रिवेंद्रम शहरात काही ठिकाणांना भेट देण्यासाठी लिहिनने गाडीची चालकासह व्यवस्था केली होती. हा चालक म्हणजे लिहिनचा मामेभाऊ होता. विश्वनाथ थोडासा लाजराबुजरा होता. त्याचा एक चुलतभाऊ – मेघन त्याचं नाव -सोबत होता. हा मात्र गप्पिष्ट होता. माझ्या घरच्यांना मुलगी हवी होती, तर मी जन्माला आलो – म्हणून माझं नाव मुलीच्या नावाशी जवळचं (मेघन) आहे असं तो सांगत होता. हे दोघंही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. माझ्यासोबत तेही पहिल्यांदाच अनेक ठिकाणांना भेट देत होते. त्यामुळे मला माहिती देणारा एखादा गाईड सोबत असावा ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. पण केरळमधल्या कुटुंबाबाबत, त्यांच्या परस्पर-संबंधांबाबत पुष्कळ काही जाणून घेता आलं.

घरात प्रवेश केल्या केल्या वायफाय पासवर्ड मिळाला. कनेक्शन उत्तम होतं. घरगुती नाश्ता, जेवण. छोटेखानी पण टुमदार आणि स्वच्छ घर. झाडं हाताशी आहेत असं वाटायला लावणारी खिडकी. वळणारा रस्ता आणि कोपऱ्यावरच्या इमारतीच्या कठड्यावर खेळणारं मांजर. 

मीही जणू एका चित्राचा भाग असावे इतकी परिसरात शांतता. मजा आली.

होम-स्टेमध्ये पुट्टु-कडला-करी, अप्पम आणि स्थानिक मासे खाता आले. पुट्टु–कडला- करी हा केरळमधील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ आहे. मला तो ताटात दिसला तेव्हा आधी छोले-भातच वाटला. 

पण पुट्टुमध्ये किसलेल्या ताज्या खोबऱ्याची चव लागली आणि छान वाटलं. पुट्टु हा तांदळाच्या पीठापासून आणि किसलेल्या नारळापासून बनवला जाणारा वाफवलेला पदार्थ. तो खास पुट्टु कुडम किंवा साच्यात उभा वाफवला जातो. त्यामुळे तो अगदी मऊ असतो. त्यासोबतची कडला-करी ही काळ्या हरभऱ्यांपासून (black chickpeas) बनवलेली असतो. त्यात असतो नारळ, भाजलेले मसाले आणि कढीपत्त्याची फोडणी. ही घट्ट रस्सेदार भाजी असते. हा पदार्थ चविष्ट तर आहेच, तसाच आरोग्यदायीही आहे. मी कितीही वेळा न कंटाळता पुट्टु-कडला-करी खाऊ शकेन - आयती मिळाली तर, अर्थात.



दिवसभर मला सोबत करणाऱ्या दोन तरूण मुलांसोबत गप्पा मारताना मला मजा आली. त्यांच्याच आग्रहामुळे दुपारच्या जेवणासोबत टॉडीचीही चव घेतली. सौम्य आंबट चवीचं हे पेय. तिथल्या उपाहारगृहात कुटुंबातले सगळ्या वयाचे लोक एकत्रितपणे टॉडीचा आस्वाद घेताना दिसले. बुधवारचा दिवस असूनही (म्हणजे सुट्टी नसताना) उपाहारगृह भरलेलं होतं. 


 मी अर्थात फक्त दोनेक घोट प्यायले.

श्री पद्मनाभस्वामी मंदिर

तिरुवनंतपुरमचे सर्वात प्रसिद्ध मंदिर - श्री पद्मनाभस्वामी मंदिर. इथं पोषाखाबाबत विशेष नियम आहेत. विश्वनाथ, बिंदू सगळ्यांनी मला त्याबाबत आधीच सांगितलं होतं. पुरूषांनी अंगाचा वरचा भाग उघडा ठेवला पाहिजे (शर्ट काढायचा) आणि मुंडू किंवा धोती नेसायची. स्त्रियांनी खरं तर साडी नेसून आलं पाहिजे. पण हल्ली सलवार-कमीज सारख्या वेषात सलवारीवर मुंडू (त्याला मुंडू-नेरियथू असं म्हणतात) नेसलं तरी चालतं. देवळाच्या आवारात साडी किंवा मुंडू भाड्याने मिळण्याची व्यवस्था आहे. मी होम-स्टेमधून निघायच्या आधीच बिंदूने तिच्याकडचा नवाकोरा मुंडू मला वापरायला दिला होता. मंदिरात प्रवेश करताना मी तो सलवारीभोवती गुंडाळला. सुरक्षा तपासणी करताना तिथल्या स्त्री पोलिसाच्या लक्षात आलं की तो मुंडू व्यवस्थित बसलेला नाही, कधीही निघेल. मग तपासणी झाल्यावर त्या स्त्री पोलिसाने मला मुंडू व्यवस्थित बांधून दिला.

मंदिर खूप मोठं आहे. देशातलं हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे असं मानलं जातं. लोक शांतपणे रांगते उभे होते. सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्यापूर्वी नियमित दर्शनला येणारे लोक होते, आणि माझ्यासारखे काही पर्यटक होते. मंदिराच्या एका भागात सामूहिक विष्णूसहस्रनाम पठण चालू होतं. कोणे एके काळी मला ते पाठ होतं (तुला काय जमणार ते असं कुणीतरी म्हटल्याने आव्हान स्वीकारून मी ते काही तासांत पाठ केलं होतं – ती एक वेगळीच कहाणी, पण ती आठवली....) त्यामुळे माझ्या मनात त्यातले पुढचे पुढचे शब्द उमटत होते. खरं तर कितीतरी वर्षांत मी विष्णूसहस्रनाम म्हणलेलं नाही, पण मनाची जादू अजबच.

मंदिराच्या नावातून कळतं तसं हे विष्णूचं देऊळ आहे. इथं शेषशायी विष्णू पाहायला मिळतो. आठव्या शतकात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी अठराव्या शतकात केला. त्रावणकोरच्या राजांचा या मंदिराशी अतूट संबंध होता. इ.स. १७५० मध्ये महाराजा मार्तंड वर्मा यांनी “त्रिप्पादिदानम्” ही ऐतिहासिक घोषणा केली - ज्यात संपूर्ण त्रावणकोर राज्य भगवान पद्मनाभस्वामींना अर्पण केलं गेलं. त्यानंतर राजे स्वतःला श्री पद्मनाभदास” (देवाचे सेवक) म्हणवू लागले. राज्य हे देवाचे असून राजा केवळ सेवक – अशी त्यांची धारणा होती असं म्हणतात.

मंदिराची वास्तू म्हणजे केरळ आणि द्रविड शैलीचं मिश्रण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात १२००८ शाळीग्राम आहेत असं वाचलं – पण मला काही ते दिसले नाहीत. नेहमीप्रमाणे याही मंदिरात पुजारी लोकांना ढकलत होते आणि जास्त पैसे भरणाऱ्या लोकांची वेगळी रांग होती. देवापुढं असली पैशावर आधारित विषमता तथाकथित श्रद्धावान लोक कशी काय करू शकतात हा नेहमीचाच प्रश्न मला पुन्हा एकदा पडला. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे तीन दरवाजांतून होणारं दर्शन. पहिल्या दरवाज्यातून भगवान विष्णूचं मुख आणि छाती, दुसऱ्यातून मध्यभाग, आणि तिसऱ्यातून पाय दिसतात. शेषशायी मूर्ती अठरा फूट लांबीची आहे. मंदिर शांत आहे, देखणं आहे. मन प्रसन्न झालं. फक्त मंदिराची अजून चांगली माहिती मिळाली असती तर मला आवडलं असतं. काय पहायचं आहे ते कळल्याविना कधीकधी गोष्टी दिसत नाहीत, तसंच इथंही झालं.

कुथिरमालिका पॅलेस

कुथिरमालिका पॅलेस पाहताना मला केरळच्या राजेशाही इतिहासाची जिवंत झलक अनुभवायला मिळाली. हा त्रावणकोरच्या राजांचा राजवाडा. पद्मनाभ मंदिराला लागून. संपूर्ण राजवाडा लाकडातून साकारलेला असून छतावर कोरलेल्या घोड्यांचं शिल्प विशेष लक्ष वेधून घेतं. हा राजवाडा महाराज स्वाती तिरुनाळ यांनी बांधला — ते केवळ राजा नव्हते, तर नामवंत संगीतकार आणि कलाप्रेमी होते. या पॅलेसमधील प्रत्येक दालन त्या राजवंशाच्या सौंदर्यदृष्टी, सांस्कृतिक जाणिवा आणि कलाप्रेमाची साक्ष देतं.

राजघराणातल्या विविध वस्तूंचं इथं आता संग्रहालय आहे. इथं आम्हाला माहिती सांगायला स्त्री गाईड होत्या. त्यांनी चांगली माहिती दिली. फोटो काढायला परवानगी नसल्याने लोक पटापट पुढं सरकत होते. इथं आणखी एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली की राजांच्या वंशावळीतले लोक एक छापाच्या चेहऱ्याचे नाहीत. मग लक्षात आलं की राजेपद - थोरल्या मुलाकडं, थोरल्या भावाच्या थोरल्या मुलाकडं ....असं न जाता राजाच्या बहिणीच्या मुलांकडं गेलं. म्हणजे राजेपद मातृवंशीय होतं. त्यामुळे राजांची नावंही वेगवेगळी दिसतात. अर्थात हे माझं एक निरीक्षण, मलाही नीट माहिती नाहीये.

नेपियर संग्रहालय

हे संग्रहालय इ.स. १८५५ मध्ये स्थापन झालं आणि नंतर इ.स. १८८० मध्ये त्याची सध्याची भव्य इमारत बांधण्यात आली. या इमारतीला तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड नेपियर यांचं नाव देण्यात आलं. संग्रहालयात केरळच्या इतिहासाशी निगडित अनेक दुर्मिळ वस्तू जतन केल्या आहेत. यात प्राचीन कांस्य व पितळी मूर्ती, हस्तिदंतावर कोरलेली शिल्पं, पारंपरिक केरळी वाद्यं, शस्त्रास्त्रं, तसंच त्रावणकोर राजघराण्याशी संबंधित वस्तू पाहायला मिळतात. इथं आम्ही निवांत फिरलो आणि मी अनेक फोटोही काढले.

लॉरी बेकर यांच्या संस्थेच्या कार्यालयाचा परिसर

त्रिवेंद्रमला जाते आहेस तर लॉरी बेकर यांचा परिसर पाहून ये – असा एका वास्तुविशारद मैत्रिणीने आग्रह केला होता. माझ्यासोबतच्या मुलांना लॉरी बेकर हे नावही माहिती नव्हतं. त्यामुळे जागा शोधताना आम्ही भटकत राहिलो. एका ठिकाणी पोचलो तर ती स्त्रियांच्या स्वयंसहाय्यता गटाचा उद्योग चालवणारी एक संस्था होती. पाहुणे आलेत म्हणून तिथल्या कार्यकर्त्या जेवण बाजूला ठेवून उठल्या. आता आपण आलोच आहोत इथं, तर हेही पाहूयात म्हणून मग त्यांच्या कामाचीही सविस्तर माहिती घेतली. त्यांनीच मग आम्हाला लॉरी बेकर यांच्या संस्थेच्या कार्यालयाच्या परिसरात कसं पोचायचं ते सांगितलं.

इथं अनिल कुमार नावाचे वरिष्ठ अधिकारी भेटले. लॉरी बेकर जिथं राहिले होते त्या गावातल्या परिसराचा पुनर्विकास चालू आहे असं कळलं. इथं त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे.

लॉरी बेकर हे ब्रिटिश-भारतीय वास्तुविशारद होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधला. पदवीचं शिक्षणही तिथलंच. दुसऱ्या महायुद्धानंतर ते भारतात आले. स्थानिक सामग्रीचा वापर करून (म्हणजेच कमी खर्चात) पर्यावरणस्नेही वास्तु बांधणं हे त्यांचं वैशिष्ट्य. घर, शाळा, हॉस्पिटल, चर्च ... अशा दोन हजारपेक्षा जास्त इमारती त्यांनी बांधल्या. भपकेदारपणा, दिखाऊपणा, आणि खर्च यांना जाणीवपूर्वक नाकारून त्यांनी माणूस, निसर्ग आणि गरज यांना केंद्रस्थानी ठेवलं. १९९० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

इथं पाहिलेली बहुमजली विटांची लायब्ररी मला आवडली. 

कुठलाही भपकेदारपणा नाही — पण नैसर्गिक प्रकाश, हवेशीर रचना आणि विटांचा वापर यामुळे ती जागा अत्यंत जिवंत वाटते. आम्ही तीन मजले चढून गेलो. प्रत्येक मजल्यावरच्या लाकडी फळीवर दणादण पाय आपटून पाहिले (अनिल कुमार यांच्या सुचनेनुसारच ते केलं) आणि इमारत अतिशय भक्कम आहे असं लक्षात आलं. प्रत्येक मजल्यावर राहण्याची एकेक खोलीही आहे, तिथं प्रशिक्षणार्थी राहतातही. काहीतरी नवं पाहिल्याचा आनंद वाटला.

तिथून निघताना विश्वनाथ आणि मेघन म्हणाले, बापरे, आपल्या आत्त्याने (की मामाने) ते नवं होम-स्टे केलंय तिथं तर सगळ्या काचा बसवल्यात, त्याऐवजी असं विटांचं बांधकाम करायला पाहिजे होतं ना.... ते ऐकून मला बरं वाटलं. प्रत्यक्षात बदल करणं कदाचित आत्ता त्यांच्या हातात नाही, पण काही चांगले पर्याय आहेत इतकं त्यांच्या लक्षात येणंही महत्त्वाचं आहे.

दिवसभर भरपूर पायपीट झाली होती. आम्ही सगळेच दमलो होतो. तरी घरी परत येईतोवर चार वाजून गेले होते.

कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणी छान वेळ गेला. आठवडाभर खूप निवांतपणा मिळाला. समुद्राचा सहवास मिळाला. काही नव्या गोष्टी पाहिल्या. नवी-जुनी माणसं भेटली. काही जुन्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला – जो आवश्यक होता. केवळ माणसंच नाही तर जागाही आपल्याला घडवत असतात. केरळ-तामिळनाडूची मी त्यासाठी कायमच ऋणी राहीन.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्रिवेंद्रम स्थानकावर जाऊन पुण्याकडं जाणारी ट्रेन पकडली. त्रिवेंद्रमचा निरोप घेताना मी पुन्हा येईन😊 असं मी स्वत:ला आणि तामिळनाडू-केरळ यांनाही सांगितलं 😊  प्रत्यक्षात येणं होईल - न होईल, पण याही दिवसांच्या आठवणी सोबत राहतील याची मला खात्री आहे.


ही लेखमालिका समाप्त.