ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, July 18, 2026

२८३. 'बोशांको'ची भेट: भाग ४: काली आणि मेघनाद

कोलकात्यातला मुक्काम संपत आला होता. कोलकात्यात जायचं तर दक्षिणेश्वर आणि बेलूर मठाला भेट देणं माझ्यासाठी आवश्यकच होतं. कोलकात्यातला शेवटचा दिवस दक्षिणेश्वर आणि बेलूर मठ भेटीसाठी राखून ठेवला होता. पण वेळेअभावी बेलूर मठात जाता आलं नाही. 

बाहेरून दिसणारा मुख्य मंदिराचा एक भाग

साधारणपणे १९८५च्या सुमारास मी दक्षिणेश्वर मदिरात गेले होते असं मला आठवतं. तेव्हा तिथल्या एका शिवमंदिरात वर्तमानपत्र वाचत बसलेला पुजारी पाहून धक्का बसला होता ते आठवतं. मंदिर माझ्या आठवणीप्रमाणे काही फार मोठं नव्हतं, तेव्हा तिथं गर्दी, रांग असला काही प्रकार असल्याचं मला आठवत नाही. यावेळी मात्र मंदिरात प्रवेश करताना (बाहेरून पाहताना)  ते प्रशस्त असल्याचं लक्षात आलं.                        

त्या दिवशी आम्ही तिथं दुपारी अडीचला पोचलो तर कळलं की मंदिर तीन वाजेपर्यंत बंद असणार आहे. मंदिर असं मधल्या वेळात बंद असतं याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मग थोडा वेळ घाटावर जाऊन बसलो. गंगा नदी जेमतेमच स्वच्छ होती – अपेक्षेप्रमाणे. 

पाणी कितीही घाण असू दे, गंगा नदीचं सान्निध्य नेहमीच सुखावणारं असतं. मंद वारा, दूरवर समोरच्या किनाऱ्यावर दिसणारं कोलकाता शहर, एक पूल, नदीत डुबकी घेणारी माणसं, माणसांनी नदीत टाकलेली नाणी शोधून काढणारी मुलं आणि स्त्रिया, गंगाजल घेऊन जायला पाण्याच्या छोट्या बाटल्या विकणारे लोक .... 

हुगळी (गंगा) तीरी

आणि या सगळ्यांत असून नसणारा गंगेचा प्रवाह .... गंगेचा तो विशाल आणि संथ प्रवाह पाहताना मला स्वतःच्या सुख-दुःखांचं क्षणिकत्व पुन्हा एकदा जाणवलं. नदीच्या आणि माणसांच्या पारंपरिक नात्यातला आपुलकीचा अंश आपल्यात अजून जसाच्या तसा रुजलेला आहे – याचा साक्षात्कार अविस्मरणीयच.

तिथं माझं आणि प्रतीक्षाचं मराठी बोलणं ऐकून एक बाई आमच्याशी बोलायला लागल्या.  त्या मराठीत बोलत होत्या म्हणून आधी वाटलं की त्याही आमच्यासारख्या पर्यटक असतील.

पण त्या निमलष्करी दलाच्या बँकेतल्या अधिकारी होत्या. (बँक हा त्यांनी वापरलेला शब्द. अशी  काही बँक असते ही माहिती मला नवीच होती. आंतरजालावर शोधल्यावर कळलं की ही सार्वजनिक बँक नसून त्या विशिष्ट दलाची आंतरिक सहकारी सोसायटी आहे.) त्यांचे पतीही त्या निमलष्करी दलामध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. गेली सात वर्ष त्या कोलकातामध्ये आहेत. त्या नेहमी दक्षिणेश्वरला येतात. आणखीही बरीच वैयक्तिक माहिती त्यांनी आपणहून उत्साहाने दिली. दूरच्या ठिकाणी आपली भाषा बोलणारी माणसं भेटली की लोकांना खूप बरं वाटतं असं दिसतं. 

त्या ताई उत्साहाने आमच्या सोबत राहिल्या आणि आम्हाला माहिती देत राहिल्या. सामान कुठं ठेवायचं, चपला कुठं ठेवायच्या वगैरे सांगत राहिल्या.  खरं तर एवढी माहिती सांगून त्या रांगेत निघून जातील असं मला वाटलं होतं. पण त्या आमच्या सोबतच थांबल्या. मंदिरात प्रवेश केल्यावर तीन रांगा असतात, त्यातल्या मधल्या रांगेत उभं राहिलं तर देवीचं पूर्ण दर्शन होतं असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही मधल्या रांगेत त्यांच्यासोबत उभे राहिलो. पुढचे दोन-अडीच तास रांगेतही आमच्या गप्पा चालू राहिल्या. 

त्यांच्या बोलण्यातून त्या कानडी-मराठी ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या असं दिसलं. त्या शुद्ध शाकाहारी होत्या. त्यामुळे बंगाली लोकांच्या मासेप्रेमावर खूप नाराज होत्या. ‘इथं सगळीकडं फार घाण असते’ म्हणाल्या. त्यांचा एकंदर सूर तक्रारीचाच होता. 

काली मंदिर

मंदिर शांत होतं. सूर्यप्रकाश हळूहळू कलायला लागला होता तेव्हा तर गंगेच्या तीरावरून येणारी हवा मस्त वाटत होती. लोक रांगांमध्ये शांतपणे उभे होते. लोकांना मोबाईल बाहेर ठेवून यावं लागल्यामुळे रील्स-कॉल्स वगैरे शक्य नव्हतं. रांग अत्यंत संथपणे पुढं सरकत होती, पण कोणी त्यासाठी अस्वस्थ दिसत नव्हतं.

दक्षिणेश्वर काली मंदिर. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात या मंदिराचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. जानबाझपूरच्या जमीनदार घराण्यातील 'राणी रासमणी' यांनी या मंदिराची स्थापना केली. समाजात एका खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या (तत्कालीन समाजाची धारणा) स्त्रीने बांधलेल्या मंदिरात उच्चवर्णीय ब्राह्मण पूजा करणार नाहीत, असा त्या काळी मोठा वाद निर्माण झाला. पण त्याला न जुमानता राणी रासमणी यांनी १८५५ मध्ये हे मंदिर पूर्ण केलं. याच मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून रामकृष्ण परमहंस रुजू झाले. त्यापुढचा इतिहास आपल्याला माहिती आहेच.

हे मंदिर बंगालच्या पारंपारिक नवरत्न (नऊ शिखरं असणाऱ्या) शैलीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य मंदिर एका अवाढव्य चौथऱ्यावर उभं आहे. मंदिराला तीन मजले असून त्याच्या कोपऱ्यांवर आकर्षक रीतीने नऊ शिखरं रचलेली आहेत. मुख्य मंदिराच्या समोर विस्तीर्ण पटांगण आहे. हुगळी (गंगा) नदीच्या घाटाला लागून एकाच रेषेत बांधलेली हुबेहूब अशी १२ 'शिव मंदिरं' आहेत. ही मंदिरं बंगालच्या पारंपारिक 'आठचाला' (आठ छतांची) स्थापत्यशैलीत आहेत. लाल विटांचा आणि पांढऱ्या चुन्याचा वापर करून केलेल्या या बांधकामात एक प्रकारचा साधेपणा आहे. आणि त्याचवेळी राजेशाही थाटही आहे. 

वास्तुविशारद असलेल्या प्रतीक्षाने तिचं छोटं स्केचबुक आणि पेन माझ्या स्लिंग बॅगमध्ये ठेवलं होतं. ते बाहेर काढून तिने मंदिराचं स्केच करायला सुरूवात केली. हे स्केच पाहून तुम्हाला मुख्य मंदिराच्या बाह्य स्वरूपाची थोडी कल्पना येईल. 

मुख्य मंदिराचं प्रतीक्षाने रांगेत उभ्या उभ्या काढलेलं स्केच

माझ्यापुढं रांगेत दोन परदेशी तरुण उभे होते. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यातला एक अमेरिकेचा होता तर दुसरा ग्रीसचा. अमेरिकन तरुण गेली काही वर्ष रमण महर्षींच्या आश्रमात (तिरूवण्णामलै, तामिळनाडू) राहतो आहे. मी काही वर्षांपूर्वी तिथं जाऊन आले होते, त्यामुळे काही आठवणी शेअर केल्या गेल्या. मग अर्थातच पाँडिचेरी, कन्याकुमारी, वाराणसी, अलाहाबाद, रामेश्वरम ... असे अनेक विषय निघाले. त्या अमेरिकन तरुणाला भारतीय तीर्थक्षेत्रांची माझ्यापेक्षा जास्त माहिती होती असं मला वाटलं. ग्रीक तरुणाची ही पहिलीच भारतभेट होती आणि हा अमेरिकन तरुण त्याचा मार्गदर्शक सोबती होता. ते दोघंही मंदिरातल्या वातावरणाचा शांतपणे आस्वाद घेत होते.

जवळजवळ अडीच तास उभं राहून, केवळ एक मिनिटांत कालीमातेचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. या दर्शनाबद्दल शब्दांत काही सांगता येणं अवघड आहे. मी काही श्रद्धाळू व्यक्ती नाही. पण तरीही मी अडीच-तीन तास रांगेत आनंदाने उभी राहिले. मला जाणवलं की मी मंदिरांमध्ये मूर्ती किंवा देव पाहायला जात नाही. दर्शन म्हणजे केवळ मूर्ती पाहणं नसतंच मुळी माझ्यासाठी. दर्शन म्हणजे तिथं असलेल्या शेकडो-हजारो वर्षांच्या सांस्कृतिक संचिताशी मी जोडलं जाण्याचा एक क्षण. या एका क्षणाकरता मी केलेला प्रवास...... आणि म्हणूनच कदाचित तो शब्दातीत असतो.  

दिवसाच्या दुसऱ्या अध्यायात होता  ‘मेघनादवध काव्य’ हा नाट्यप्रयोग. त्यासाठी आम्ही ‘गिरीश मंच’च्या दिशेने निघालो. धार्मिक विश्वातून थेट रंगभूमीच्या जगात. 

गिरीश मंच 

कोलकात्याच्या बागबाजार या ऐतिहासिक भागात असलेलं 'गिरीश मंच' हे बंगाली नाट्यसृष्टीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. आधुनिक बंगाली रंगभूमीचे जनक अशी उपाधी देण्यात आलेले प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, आणि अभिनेते गिरीशचंद्र घोष यांचं नाव या नाट्यगृहाला देण्यात आलं आहे. हे गिरीश दुसरेतिसरे कुणी नसून रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते हे कळल्यावर उगाचंच छान वाटलं. इथं प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारचे नाट्यप्रयोग होतात. 


गिरीशचंद्र घोष नास्तिक होते. ते दारूच्या आहारी गेले होते. पण रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. महेन्द्रनाथ गुप्त यांनी 'एम' या नावाने लिहिलेल्या 'श्रीश्री रामकृष्ण कथामृत' या ग्रंथात रामकृष्ण परमहंस आणि गिरीशचंद्र यांच्यातील हृद्य नात्याचे वर्णन आहे. गिरीशचंद्र यांनी 'बुद्धदेव चरित', 'बिल्वमंगल', 'तपस्या' यांसारखी नाटकं बंगाली रंगभूमीवर सादर केली. विवेकानंद आणि गिरीशचंद्र  एकमेकांना खूप जवळचे होते. दक्षिणेश्वरहून 'गिरीश मंच'मध्ये जाणं हा म्हणूनच एक प्रकारचा सुसंगत प्रवास होता, त्यात काहीही विरोधाभास नव्हता.  

मेघनादवध काव्य आणि गौतम हालदार

इथं आम्ही आलो होतो ते 'मेघनादवध काव्य' प्रयोग पाहायला. हे काव्य मायकेल मधुसूदन दत्त (१८२४-१८७३) यांनी लिहिलं होतं. १८६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या (दीडशे वर्षांच्या जुन्या) काव्यावर आज २०२६ मध्ये प्रयोग व्हावा, त्याची एक हजार रुपये किंमत असेलेली तिकिटं तत्काळ संपावीत याचं मला नवल वाटलं. आमच्या मैत्रिणींनी आमची तिकिटं पुरेशी आधी काढलेली असल्याने आम्हाला पुढच्या रांगेत जागा मिळाली. इथंही एकच सीट नंबर दोन व्यक्तींना देणं वगैरे घोळ होते. त्यावरुन झालेली बंगाली भाषेतली वादावादी ऐकताना आपल्याचा गावात आहोत असं वाटलं. 

नाट्यप्रयोग गौतम हालदार सादर करत होते. १९६३ मध्ये जन्मलेले गौतम हालदार हे केवळ एक अभिनेते नसून ते दिग्दर्शक, गायक आणि नृत्यकार असे बहुआयामी कलावंत आहेत. गेल्या तीस वर्षांत गौतम हालदार यांनी देश-विदेशात मेघनादवध काव्यचे शेकडो प्रयोग केले आहेत.

हा जवळपास एकपात्री प्रयोग आहे. रंगमंचावर काही वादक आणि गायक बसले होते. ते कोरस आणि वादनात साथ देत होते. पण रंगमंचावरचं सुमारे अडीच तास चालणारं सादरीकरण गौतम हालदार यांचं एकट्याचं होतं. प्रयोग पूर्णपणे बंगाली भाषेत होता. दोन प्रसंगाच्या मधल्या विरामात मी माझ्या शेजारी बसलेल्या बंगाली दीदींना  काही वाक्यांचा अर्थ विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे प्राचीन बंगाली त्यांनाही समजत नाहीये. (शिवाय बंगाली कळत नसताना हे लोक इथं का आलेत - असं प्रश्नचिन्हं दिसलं ते वेगळंच.)  मेघनाद वध झाल्यानंतरचं सगळं वर्णन पहिल्या प्रसंगात होतं असं त्यांनी मला आत्मविश्वासाने सांगितलं – पण प्रत्यक्षात प्रयोगात मेघनाद वध फार नंतर आला. कथा सुरुवातीला फारशी समजत नव्हती, हळूहळू ती उलगडत गेली. 

मेघनाद वध हे  महाकाव्य बंगाली साहित्यातील मैलाचा दगड मानलं जातं. या काव्याचा गाभा रामायणातील लंकेच्या युद्धावर आधारित आहे, पण दृष्टिकोन अपारंपरिक आहे. मधुसूदन यांनी या महाकाव्यात रावणाला एक उदात्त, स्वाभिमानी आणि दुर्दैवी राजा दाखवलं आहे. तर त्याचा मुलगा मेघनाद (इंद्रजित) याला देशासाठी प्राणांची आहुती देणारा एक परमवीर नायक म्हणून उभं केलं आहे. तसंच राम आणि लक्ष्मण यांच्या मर्यादा आणि त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर कवीने बोट ठेवलं आहे. हे काव्य एकूण नऊ सर्गांमध्ये (भागांमध्ये) विभागलेलं असून त्यात वीर, करुण आणि रौद्र रसांचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो. मधुसूदन यांनी बंगाली भाषेत पहिल्यांदाच 'अमित्राक्षर छंद' (Blank Verse) यशस्वीपणे आणला. बंगाली कवितेला त्यांनी यमकांच्या बंधनातून मुक्त केलं. या काव्यातील बंगाली भाषा ही आजची साधी किंवा बोलीभाषा नाही; ती अत्यंत संस्कृतप्रचुर, जड, गंभीर आणि अभिजात (Classical Bengali) आहे.

गौतम हालदार यांचा कायिक आणि वाचिक अभिनय जबरदस्त होता. कोणत्याही पात्राचा पोषाख न बदलता, केवळ आपल्या हातातील एका साध्या उपरण्याच्या आणि शरीराच्या अद्भूत लवचिकतेच्या जोरावर ते काही सेकंदात रावणाचे रौद्र रूप धारण करतात, तर दुसऱ्याच क्षणी पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेली मंदोदरी किंवा पतिव्रता प्रमिला बनतात. भीती, क्रोध, दु:ख, आनंद, प्रेम, तिरस्कार, द्वेष, शांती ... अशा विविध पात्रांच्या (रावण, मंदोदरी, सीता, लक्ष्मण, मेघनाद, बिभीषण, राम ......) भावना ते अत्यंत उत्कटपणे व्यक्त करत होते. एका बाजूला युद्धाची भयानकता दाखवणारे त्यांचे आक्रमक डोळे आणि पायांमधील ताठरता असते, तर दुसऱ्या बाजूला रावणाचा पराभव आणि असहाय्यता दाखवणारी शरीराची मान टाकलेली अवस्था. बंगाली समजत नसलं तरी त्यांची अभिनयाची भाषा थेट पोचणारी होती. मजा आली. 

**********

बोशांकोतून परतण्याची वेळ झाली.
बोलपूरमधलं मातीचं घर, रवीन्द्रनाथांचं शांतिनिकेतन, कोलकात्याचा इतिहास, दक्षिणेश्वरची भक्ती, आणि रंगभूमीवर पुन्हा जिवंत झालेला मेघनाद......... 
या आठ दिवसांत मला बंगालचे अनेक रंग दिसले. इथं अनेक सुप्त प्रवाह आहेत, गंगेसारखेच. काही कळले, काहींची फक्त चाहूल लागली. 
पाहुणी म्हणून आले होते. बंगालच्या अंगणात बसून त्याच्या गुजगोष्टी ऐकताना काही काळ तरी इथलीच होऊन गेले. 

Tuesday, April 21, 2026

२८२. 'बोशांको'ची भेट: भाग ३: जुनं कोलकाता

 (If you want to read this post in English, it is available here!)

अखेर एक दिवस बोलपूरचा मुक्काम संपवून आम्ही कोलकात्याच्या दिशेने निघालो. हा प्रवास ट्रेनचा होता. प्रान्तिक नावाच्या रेल्वे स्थानकावर गेलो. छोटंस स्थानक. तीन-चारच फलाट.
प्रान्तिक रेल्वे स्थानक

गर्दी अजिबातच नाही. प्रान्तिक नावाचा अर्थ शोधताना लक्षात आलं की रवीन्द्रनाथांच्या एका कवितासंग्रहाचं हे नाव आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रान्तिक शांतिनिकेतनला जवळ आहे. एका अर्थी शांतिनिकेतनचं हे प्रवेशद्वारच.

हल्ली ट्रेन जशा उशीरा असतात, तशी आमचीही ट्रेन सुमारे दोन तास उशीरा आली. बोलपूरला इतक्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या जत्रेत झालमुडी मात्र खायची राहून गेली होती. भूक नव्हती तरी मग हौस म्हणून ट्रेनमध्ये झालमुडी खाल्ली. 


धावती भेट

हावडा स्थानकावर देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती. हावडा रेल्वे स्थानकात काही फलाटांजवळ थेट चारचाकी येऊ शकते, हे मला फार आवडलं. दोन फलाटांच्या मध्ये प्रशस्त रस्ता पाहून मजा वाटली.

हावडा रेल्वे स्थानकात दोन फलाटांच्या मधला रस्ता

स्थानकाच्या बाहेर पडलो. थेट घरी न जाता थोडं फिरून जाण्याचा बेत होता. आणि मग लगेच कोलकातातल्या वाहनांची (इतर कोणत्याही मोठ्या शहरात असते अगदी तशीच) गर्दी दिसायला लागली. हुगळी नदीकडं गेलो. तिथल्या घाटावर काही काळ शांतपणे थांबलो. समोर पसरलेलं पाणी, त्यावर हलकेच उमटणाऱ्या लाटांची हालचाल, आणि त्यामागे उभा असलेला भव्य हुगळी ब्रिज. थोड्याशा अंतरावरून सुप्रसिद्ध हावडा ब्रिज दिसला आणि कोलकात्यात आपण आलो हे जणू अधोरेखित झालं.
हावडा ब्रिज

घाटाला लागून असलेल्या रुळांवरून एक लोकल ट्रेन धडधडत गेली तेव्हा बोलणं थांबवून आम्ही सगळ्यांनी लहान मुलांप्रमाणे ती ट्रेन पाहिली.

नदीत काही मोठाल्या मूर्ती तरंगत होत्या. त्याबद्दल विचारलं असता इथल्या सरस्वती पूजन उत्सवाबद्दल नव्यानेच कळलं. बंगाल म्हणजे दुर्गापूजा हे समीकरण डोक्यात होतं. सरस्वती पूजनाबद्दल मला काही माहिती नव्हतं. वसंतपंचमीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक रीत्याही सरस्वतीची पूजा होते. इथल्या लहान मुला-मुलींसाठी शिक्षणाचा श्रीगणेशा, मुळाक्षरं शिकण्याची प्रक्रिया वसंतपंचमीच्या दिवशी होते. शाळांमध्ये, महाविद्यालयांत वह्या-पुस्तकांची पूजा होते. सार्वजनिक उत्सवांमधल्या मूर्ती मोठ्या असतात आणि त्या मोठाल्या मंडपांमध्ये असतात. दुर्गा आणि सरस्वती या दोन्ही परंपरांचा संगम बंगालच्या संस्कृतीत झालेला दिसतो.

घाटावरून परतताना दूरवर विधानभवन आणि आकाशवाणीची इमारत दिसली.  या छोट्याशा भटकंतीचा शेवट करताना आम्ही कोलकात्याचा प्रसिद्ध रोल खाल्ला — गरमागरम, मसालेदार आणि अतिशय चविष्ट.

जुनं कोलकाता

कोलकाता. समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा असणारं शहर. एक महिना राहिलं तरी अनेक गोष्टी पाहायच्या राहून जातील इतकं भव्य शहर. माझ्याकडं ते पाहायला फक्त दोन दिवस होते. फारसं समजून न घेता खूप काही पाहता येतं – पण त्या बकाबक पर्यटनाला काही अर्थ नसतो. इथं येण्यापूर्वी देबाहुती आणि अनासुआ यांच्याशी बरीच चर्चा केली होती. त्यातून अर्धा दिवस जुन्या कोलकात्यात (उत्तर कोलकाता) फिरायचं असं ठरलं.

सुबीरदा आमचे वाहनचालक होते. त्यांनी तीन वर्ष सोलापूरच्या मिलमध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांनी आमच्याशी मोडक्यातोडक्या मराठीत बोलायची संधी घेतली. गाईडचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा काहीच कळलं नाही – जोगोबोंधो. मग लक्षात आलं की ते जगबंधु आहे. दोन वेगळ्या विचारधारेशी निष्ठा असणारी माणसं आहेत हे पहिल्या दहा मिनिटांतच लक्षात आलं ते एसआयआर (Special Intensive Revision) सारख्या संवेदनशील विषयावरुन. तसंच एक मोहन बगानचा पाठीराखा तर दुसरा इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचा.

कोलकात्यात भटकताना इडन गार्डन्स, सॉल्ट लेक स्टेडियम, नेताजी स्टेडियम .. अशा अनेक स्टेडियमजवळच्या रस्त्यांवरून गेलो. कोलकात्याचं क्रीडाप्रेम हा एक वेगळाच विषय आहे.

जुन्या कोलकात्यात पहिल्यांदा गेलो ते स्वामी विवेकानंदांच्या घरी.

स्वामी विवेकानंद यांचं घर

१२ जानेवारी १८६३ रोजी या घरात स्वामीजींचा जन्म झाला होता. मोडकळीस आलेले हे घर १९६२ मध्ये रामकृष्ण मिशनने ताब्यात घेऊन त्याचं पुनरूज्जीवन केलं. तिथं आता संग्रहालय आहे, संशोधन केंद्र आहे, भाषा केंद्र आहे, संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. आम्ही लवकर पोचल्याने संग्रहालय पाहता आलं नाही. एका मोकळ्या जागेत तीन मुलं दोन प्रौढ मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार नृत्याचा सराव करत होती.

विवेकानंदांच्या घराच्या परिसरात एका छोट्या गल्लीत सुप्रसिद्ध गायक मन्नाडे यांचंही घर आहे.

मन्नाडे यांच्या घराच्या गल्लीत प्रवेश करताना

घरात जाता येत नाही. पण आम्ही मराठी आहोत असं कळल्यावर तिथं सध्या राहणाऱ्या गृहस्थांनी एका खोलीची मोठी खिडकी आमच्यासाठी उघडली. तिथं मन्नाडे यांचा फोटो आणि त्यांना मिळालेली विविध पारितोषिकं, स्मृतिचिन्हं वगैरे व्यवस्थित ठेवली होती. याच परिसरातल्या एका इमारतीत मिर्झा गालिब एक वर्ष राहिले होते असं जगबंधु दादांनी सांगितलं. 

परिसरातल्या अनेक घरांमध्ये कालीमाता आणि जगन्नाथ (पुरी) मंदिरं आहेत. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या ही मंदिरे जपली गेली आहेत. कालीपूजा आणि रथयात्रा यांसारख्या सणांमध्ये या छोट्या मंदिरांना खूप महत्त्व असतं. यातली एक कालीची मूर्ती ही आधी दक्षिणेश्वर मंदिरासाठी तयार करण्यात आली होती, परंतु ती राणी रासमणी यांना आवडली नाही. म्हणून ती मूर्ती इथल्या एका घरगुती मंदिरात आहे असं जगबंधु म्हणाले. पण नंतर शोधूनही मला त्याचा नेमका काही संदर्भ अजून तरी मिळालेला नाही. या परिसरातली मिठाईची दुकानं प्रसिद्ध आहेत. पण आम्ही त्या दुकानांत थांबलो नाही. या एका परिसरात किती इतिहास आहे!

कोलकाता ट्राम

या भागात फिरताना कोलकाताची ट्राम (एकदाची) दिसली. 

१८७३ मध्ये सुरू झालेली इथली ट्राम ही आशियातली सर्वात जुनी ट्राम वाहतूक आहे. सुरूवातीची ट्राम घोडे ओढत असत. १९०२ मध्ये ती इलेक्ट्रिक झाली. १९८४-८५ मध्ये कोलकाता भेटीत या ट्रामने मी प्रवास केल्याची आठवण आहे. मंद गती, वाहतुकीत निर्माण होणारा अडथळा आणि वाहतुकीचे नवनवे पर्याय यामुळे ट्राम आता कमी आहेत. पूर्वी पन्नासपेक्षा जास्त मार्गांवरून चालणारी ट्राम आता फक्त तीन मार्गांवर चालू आहे.

१९८४ मध्ये कोलकातामध्ये सुरू झालेली मेट्रो ही भारततली सर्वात जुनी मेट्रो आहे. जुनी मेट्रो जमिनीखालून होती. आता मेट्रोचं जाळं पाच विविध लाईन्स आणि सुमारे साठ स्थानकं असं विस्तारलं आहे. भूमिगत आणि उन्नत असे दोन्ही प्रकारचे मेट्रो मार्ग आहेत. काही मेट्रो स्थानकांची नावं वाचून थोडा गोंधळ उडाला. उदाहरणार्थ ऋत्विक घटक, कवि सुभाष, गीतांजली, सत्यजित रे ....ही मेट्रो स्थानकाची काही नावं आहेत. या नावाचं मोठेपण वादातीत आहे, पण ते नाव वाचून आपण शहरातल्या नेमक्या कोणत्या भागात आहोत याचा अंदाज नवख्या माणसाला येणं कठीण आहे.

कोलकात्यात प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. काही जुने पर्याय अजूनही वापरात आहेत याची जाणीव हे पाहिल्यावर झाली. 

पुढे कॉलेज स्ट्रीटवर यात बसलेले प्रवासी दिसले

कोलकात्याच्या या भागाचं जुनेपण अजून टिकून आहे, आणि म्हणूनच एक प्रकारचा जिवंतपणाही. छोटे रस्ते, जुन्या इमारती, रस्त्यावर चपला बाजूला ठेवून देवाला नमस्कार करणारी माणसं, रस्त्यावरच्या नळावर आंघोळ करणारे पुरुष, रसरशीत ताजा भाजीपाला आणि घासाघीस करणारे ग्राहक, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चिन्ह मिरवणारी पोस्टर्स , चालत किंवा सायकलवर जाणारे सर्व वयाचे लोक, सामानाच्या पिशव्या हातात घेऊन सावकाश चालत जाणाे लोक ....

जोरासांको ठाकुर बाडी

जोरा म्हणजे जोडी, सांको म्हणजे बांबूचा पूल. पूर्वी या परिसरातल्या ओढ्यावर बांबूचे दोन समांतर पूल होते, म्हणून या परिसराला जोरासांको नाव पडलं असं मानलं जातं. तर कुणी म्हणतं की या परिसरात दोन शिवमंदिरं होती, त्यावरून जोरासांको हे नाव पडलं. बाडी म्हणजे घर. जोरासांको परिसरातलं ठाकुरांचं घर. 

हे आहे टागोर घराण्याचे वडिलोपार्जित घर. १७८४ मध्ये नीलमणी ठाकूर यांनी हे घर बांधलं.

घर कसलं म्हणायचं, प्रचंड मोठी हवेली आहे.

ठाकुर बाडी प्रवेशद्वार

द्वारकानाथ टागोरांनी या घराचा विस्तार केला.  ७ मे १८६१ या दिवशी रवीन्द्रनाथांचा जन्म इथं झाला. त्यांचं बालपण या वास्तूमध्ये गेलं. याच घरात रवीन्द्रनाथांनी अनेक कविता लिहिल्या. याच घरात ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवीन्द्रनाथांनी अखेरचा श्वास घेतला.

या इमारतीच्या एका भागात १९६१ पासून रवीन्द्र भारती संग्रहालय आहे. या संग्रहालयात पन्नासपेक्षा जास्त दालनं आहेत. एका दालनात टागोर घराण्याचा इतिहास मांडला आहे. रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ आणि वडील देबेन्द्रनाथ यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचं कार्य आणि त्या काळातील कागदपत्रं इथं आहेत. एकोणिसाव्या शतकातल्या बंगालमधलं एक प्रभावशील, शिक्षित, आणि श्रीमंत कुटुंब कसं जगत असेल याची एक झलक मिळते.  

एक दालन अशाच प्रकारे रवीन्द्रनाथांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी वापरलेले कपडे, टोप्या, पेन, चष्मा, घड्याळ, चपला ... अशा बऱ्याच वस्तू आहेत.  त्यांच्या अनेक प्रसिद्ध कवितांच्या आणि गाण्यांच्या हस्तलिखित प्रती इथं दिसतात. लिहिताना त्यांनी खोडलेले शब्द आणि त्यातून तयार केलेली चित्रं रोचक आहेत. महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि इतर जागतिक नेत्यांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार आहे, त्यांनी काढलेली चित्रं आहेत. १९१३ मध्ये त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे.

मला सगळ्यात जास्त आवडला तो रवीन्द्रनाथांच्या जागतिक प्रवासाचा नकाशा. त्या काळी रवीन्द्रनाथांनी तीसपेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता. या मोठ्या नकाशावर टागोरांनी भेट दिलेल्या देशांचे मार्ग आणि तो प्रवास कधी केली याची नोंद आहे. नकाशासोबतच त्यांनी परदेश दौऱ्यात वापरलेल्या वस्तू, पासपोर्ट आणि विविध जागतिक नेत्यांसोबतची त्यांची दुर्मिळ छायाचित्रं आहेत. टागोरांचं जगाचं नागरिक असणं आणि त्यांनी विश्वभारतीची स्थापना करणं यांचा संबंध या नकाशातून काहीसा स्पष्ट होतो.

बाहेर पडताना इमारतीच्या आवारात मोठी रांग दिसली. चौकशी करता ती एसआयआरसाठी असल्याचं कळलं.

बोई पारा

बोई म्हणजे पुस्तक आणि पारा म्हणजे परिसर. बोई पारा – पुस्तकांचा परिसर. कॉलेज स्ट्रीट असं या रस्त्याचं अधिकृत नाव आहे. ही बाजारपेठ केवळ भारतातली नाही तर आशियातली सर्वात मोठी पुस्तकांची बाजारपेठ आहे. इथं महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तकं मिळतात तशीच दुर्मिळ पुस्तकंही मिळतात. 

१८१७ मध्ये या भागात (राजान राममोहन रॉय, डेविड हेअर, आणि अन्य सहकारी यांनी) हिंदू कॉलेजची (आता त्याचं नाव प्रेसिडेन्सी युनिवर्सिटी आहे) स्थापना झाली. साधारण तेव्हापासून पुस्तक बाजार सुरु झाला असं दिसतं. बोई पारा हा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. पुस्तकांची छोटी-मोठी शेकडो दुकानं इथं आहेत. नजर पडेल तिकडं पुस्तकंच दिसतात. रविवार वगळता इतर दिवशी बाजार दिवसभर चालू असतो.   

दहा-पंधरा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरात खूप महाविद्यालयं, विद्यापीठं दिसली. कोलकाता युनिवर्सिटी, हेअर स्कूल, हिंदू स्कूल, संस्कृत कॉलेज ही सहज आठवणारी नावं. तसंच बंगाल थिऑसऑफिकल सोसायटी, महाबोधी सोसायटीचं भारतातलं मुख्यालय अशाही नामवंत संस्था या परिसरात आहेत. विद्यार्थ्यांची विनोदबुद्धीही दिसली. 

उजवीकडे एका कागदावर कॅन्टीनच्या अन्नाबाबतची तक्रार "Don't make canteen food too oily, USA might invade our campus" अशा खोडकर शब्दांत केली आहे. 


बोई पारा परिसरात गेल्यावर
इंडियन कॉफी हाऊसमध्ये जाणं हे एक शास्त्र असतं, तिथं जावंच लागतं. 

ही जागा बंगाली संस्कृती, राजकारण, आणि साहित्याचं एक ऐतिहासिक केंद्र आहे. १८७६ पासून या जागेत अल्बर्ट हॉल होता. १८७६ मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या 'भारत सभे'चं हे मुख्य केंद्र होतं. १८८३ मध्ये पहिली अखिल भारतीय नॅशनल कॉन्फरन्स याच हॉलमध्ये भरली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अनेक राजकीय सभा या ठिकाणी झाल्या होत्या. इथं साहित्यिक, कलाकार आणि विचारवंतांचे वैचारिक गट एकत्र येऊन चर्चा आणि विचारविनिमय करत असत. रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सत्यजित रे, आणि मृणाल सेन यांसारखे दिग्गज या ठिकाणी नियमित येत असत. कोलकात्याची प्रसिद्ध 'अड्डा' संस्कृती इथूनच विकसित झाली.


१९४२ मध्ये 'कॉफी बोर्डा'ने हे हॉल भाड्याने घेतला. तिथं कॉफी हाऊस सुरू केलं. हेच ते इंडियन कॉफी हाऊसजिना चढून जाताना भिंतीवरची चित्रं दिसली. आत गेल्यावर दिसलं ते उंच छत, जुने पंखे, आणि पांढऱ्या गणवेशातील वेटर. रवीन्द्रनाथ, नेताजी, मन्नाडे, सत्यजित रे ... अशा अनेकांची छायाचित्रं आत आहेत. आम्ही गेलो त्यावेळी सुदैवाने फार गर्दी नव्हती. पण आम्हाला जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं. कॉफी पिऊन निघालो.

या भागात हिंडताना नागरी हक्कांबाबत आंदोलन करणाऱ्या संस्थां-संघटना-लोकांसाठी अजूनही जागा शिल्लक आहे असं दिसलं. गर्दी जमण्यापूर्वी आंदोलनाची इतकी जय्यत तयारी – अगदी पोलिसांच्या वाहनासह – पाहता आली.

व्हिक्टोरिया स्मारक

ही कोलकात्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य वास्तू आहे. ब्रिटिश काळात राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ १९०६ ते १९२१ या काळात तिचं बांधकाम करण्यात आलं. पांढऱ्या संगमरवरी दगडात ही इमारत उभारलेली आहे. तिच्या रचनेत ब्रिटिश आणि भारतीय वास्तुकलेचा संगम दिसतो. इथं आतमध्ये एक मोठं संग्रहालय आहे. मला हे संग्रहालय पाहायला आवडलं असतं, पण हातात तेवढा वेळ नव्हता त्यामुळे बाहेरच्या फेरफटक्यावरच समाधान मानावं लागलं.

सुमारे चौसष्ट एकर परिसरात हे स्मारक उभं आहे. मुख्य संगमरवरी इमारतीभोवती विस्तीर्ण बाग, पायवाटा, आणि पाण्याचे तलाव आहेत. दुपारी एकच्या उन्हात या तलावांच्या काठी फिरणं सुखद होतं. 

अनेकदा गाईड माहिती देतात, पण ती तपासून घ्यावी लागते. इथं गाईडने आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे गंगेचं (हुगळी नदी) पाणी थेट या तलावांमध्ये आणलं जातं – ब्रिटिशांनी तशी व्यवस्था केली आहे. दुसरं म्हणजे आजही ब्रिटिश सरकार या स्मारकाच्या देखभालीच्या खर्चाचा वाटा उचलतं.

मी घरी आल्यावर इंटरनेटवर या दोन्ही मुद्द्यांवर माहिती शोधली, तर प्रत्यक्षात असं काही नाहीये. या परिसरात एकूण सहा तलाव आहेत. हुगळी नदी स्मारकापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे, पण नदीतून पाणी उचलण्याची काहीही व्यवस्था नाही. तलावांसाठी प्रामुख्याने भूगर्भातील पाणी आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण या पद्धतींचा वापर केला जातो. स्वातंत्र्यानंतर हे स्मारक पूर्णपणे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. हे स्मारक पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील एका स्वायत्त ट्रस्टद्वारे चालवलं जातं. ब्रिटिश सरकार सध्या याच्या देखभालीसाठी कोणताही निधी पुरवत नाही.

गाईडने अशी तद्दन चुकीची माहिती का सांगितली असेल ते कळत नाही. एकदा हे चुकीचं आहे कळल्यावर मला त्यांनी दिलेली इतर माहितीसुद्धा विश्वासार्ह वाटेनाशी झाली. बढाचढाके सांगणं आपल्याकडं अनेकदा दिसतं. असो.

पुढच्या भेटीत या स्मारकातील संग्रहालयात नक्की जाईन.

सेंट पॉल कॅथ्रेडल

हे १९व्या शतकात बांधलेलं एक महत्त्वाचं चर्च आहे. १८४७ साली त्याचं बांधकाम पूर्ण झालं, तेव्हा ते आशियातील पहिलं अँग्लिकन कॅथेड्रल होतं. ब्रिटिश काळात कोलकाता ही राजधानी असल्यामुळे अशा भव्य चर्चची गरज भासली असावी.

ही इंडो-गोथिक शैलीतली इमारत आहे. इंडो-गोथिक शैली म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर — परदेशातून आलेली भव्य बांधकामाची पद्धत आणि भारतातल्या गरजा यांचा संगम. म्हणजे इमारत दिसायला उंच, थोडी टोकदार कमानी असलेली, मोठ्या खिडक्या आणि आकर्षक रचना. हे सगळं युरोपमधून आलेलं. पण तीच इमारत भारतात बांधताना इथलं उष्ण आणि दमट हवामान लक्षात घेऊन काही बदल केले जातात – जसं की जास्त हवेशीरपणा, जाड भिंती, आत थंडावा राहील अशी मांडणी. दिसण्यात परदेशी छटा आणि वापरात पूर्णपणे स्थानिक सोय - हा इंडो-गोथिकचा साधा अर्थ ही इमारत पाहताना छान लक्षात आला.

आतमध्ये काही स्मारकफलक आणि ब्रिटिश काळातील काही व्यक्तींची माहिती वाचायला मिळते. आत काही फलकांवर इतर कॅथेड्रल्सचा संदर्भ दिलेला दिसला, तो नेमका कशासाठी तो कळलं नाही. तिथं शंका विचारावी तर कुणी नव्हतं. फोटो काढून नंतर कुणा योग्य व्यक्तीला दाखवावा म्हटलं तर फोटो काढायला परवानगी नसल्याने तेही जमलं नाही.  मोबाईलला बंदी असल्याने आतमध्ये अगदी शांत वातावरण आहे. अर्थात ही शांतता फार काळ टिकली नाही. कारण चार पाच बस भरून शाळकरी मुलं-मुली सहलीसाठी आलेली दिसली. मग आम्ही तिथून निघालो.

कोलकाता बुक फेस्टिवल

कोलकाता बुक फेस्टिवलला खूप गर्दी होती. त्यात मी माझ्या मैत्रिणींपासून वेगळी पडले. तरीही चिकाटीने एकटीने वीसेक स्टॉल्सवर चक्कर मारली. तिथल्या विक्रेत्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता (पुणे पुस्तक महात्सवाच्या तुलनेत तो अगदी जाणवला). अमाप संख्येने बंगाली पुस्तकं होती, हिंदी जवळजवळ नव्हतीच. एखादं पुस्तक हाताळलं की लगेच कुणीतरी विक्रेता-विक्रेती येऊन त्याबाबत अधिक माहिती सांगायला लागायची. माझी बांग्ला शब्दसंपदा मर्यादित असल्याने ते श्वास घ्यायला थांबले की मी आमि बांग्ला जानि ना म्हणायचे. मग पुढचा संवाद मोडक्यातोडक्या हिंदी-इंग्रजीत व्हायचा. ते मला इंग्रजी पुस्तकं दाखवायचे. नाही म्हणत म्हणत खरेदी झालीच. एक बांग्ला पुस्तकही घेतलं. 

पुस्तक महोत्सवात लेखक-कवी-साहित्यिकांच्या मुलाखती योग्यच आहेत. पण नृत्य, गायन, भाषणं, आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स नसतील तर गर्दी कमी होईल. आणि पुस्तकप्रेमींना शांततेत पुस्तकं पाहता येतील – असं मला पुन्हा एकदा वाटलं. नेहमीप्रमाणे मी अल्पमतात आहे याची मला जाणीव आहे.

*****

या दीड दिवसाचा विचार केला, तर तो फक्त “ठिकाणं पाहण्याचा” राहिला नाही - तर कोलकात्याला थोडंफार समजून घेण्याची एक सुरुवात झाली. एका बाजूला प्रान्तिकपासून हावडा, हुगळी घाट, सरस्वती पूजनाचा अनुभव; तर दुसऱ्या बाजूला जुन्या कोलकात्याच्या गल्ल्या, घरं, विचारवंतांचा वारसा, आणि पुस्तकांच्या रस्त्यांवरची बौद्धिक चहलपहल — हे सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसलं. इथं इतिहास फक्त संग्रहालयात बंद नाही, तर तो रोजच्या आयुष्यात, सणांमध्ये आणि लोकांच्या वागण्यात जिवंत आहे. वेळ कमी असल्यामुळे बरंच काही राहिलं, काही गोष्टी अर्धवट समजल्या — आणि काही नव्याने प्रश्न निर्माण करून गेल्या. कदाचित तेच कोलकात्याचं वैशिष्ट्य असावं.

Tuesday, February 24, 2026

२८१. “बोशांको”ची भेट: भाग २: शांतिनिकेतन

(If you want to read this post in English, it is available here!

भाग १: बोलपूर

शांतिनिकेतन हे नाव ऐकलं की आपल्याला लगेच रवीन्द्रनाथ टागोर हे नाव आठवतं. भिंतींचं बंधन नसलेले खुले वर्ग, झाडाखाली बसलेली मुलं, गुरुदेव, विश्वभारती — असं एक चित्र डोळ्यांसमोर येतं. आपल्याल हे एक शैक्षणिक- सांस्कृतिक तीर्थक्षेत्र  म्हणून ओळखीचं आहे. जिथं शिक्षण म्हणजे परीक्षा नाही, तर अनुभव आहे; आणि कला म्हणजे चौकटीत बंदिस्त नसलेली गोष्ट आहे — अशी एक सुंदर (आणि काहीशी आदर्शवादीही) प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे. आज हे सगळं तसंच टिकून आहे का, की बदललं आहे – असंही एक कुतुहल मनात जागतं.

नुसतंच पर्यटक म्हणून जायचं तर शांतिनिकेतन पाहायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एक दिवस पुरेसा आहे.  टागोरांचं घर, संग्रहालय, हस्तकला बाजार, आठवड्याच्या हाटमधून आठवण म्हणून घेतलेली एखादी वस्तू — आणि मग परत फिरायचं. शांत आणि सुंदर अशी या जागेची ओळख जितकी खरी आहे, तितकीच अपुरीही आहे. कारण शांतिनिकेतन केवळ एका भेटीत उरकून टाकण्याची जागा नाही. आजही ती एक प्रकारे अंतर्मुख करणारी जागा आहे.

शांतिनिकेतन म्हणजे केवळ टागोरांची आठवण नाही, तर टागोरांनी रुजवलेली एक दृष्टी, एक विचारधारा आहे. माणूस, निसर्ग, शिक्षण, कला आणि समाज यांच्यातली सीमारेषा पुसून टाकण्याचा टागोरांनी केलेला प्रयत्न अजूनही इथं दिसतो. मला सुदैवाने पर्यटकांसारखी पाहायची आणि निघायची घाई नव्हती. स्थानिक लोकांबरोबर राहायचं आणि त्यांच्या शिफारसीनुसार रोज एक निवडक गोष्ट करायची असं मला करत आलं. शांतिनिकेतन हळूहळू पाहताना मग त्याचे अनेक पैलू उलगडत गेले. अर्थात सगळं पाहून झालं नाही, आणि सगळं कळलेलंही नाही. पण शांतिनिकेतनच्या ओळखीची सुरूवात तर झाली.

इतिहास

१८६३ मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेन्द्रनाथ टागोर यांनी बोलपूरजवळ या मोकळ्या, रुक्ष जमिनीत एक छोटंसं आश्रमस्थळ उभारलं. ‘शांतिनिकेतन’ — म्हणजे शांततेचं घर. सिन्हा नावाच्या जमिनदाराकडून देवेन्द्रनाथांनी वीस एकर जमीन विकत घेतली.  देवेन्द्रनाथांनी ध्यान, साधना, आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन अनुभवण्यासाठी आदर्श जागा म्हणून या जमिनीची निव़ड केली. या खरेदीचा उद्देश ब्राह्मो समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शिक्षणाला पलीकडे घेऊन जाणं, निसर्गाशी संवाद साधणं, आणि भौतिक शिक्षणाच्या चौकटींपेक्षा बाहेरचा - “जीवनाचा अभ्यास” - सुरु करणं हा होता.

त्या काळात कोणीही कल्पना केली नसेल की हे शांत, थोडंसं एकाकी ठिकाण पुढे जागतिक विचारांचं केंद्र बनेल.

रवीन्द्रनाथ टागोरांनी या जागेला केवळ आश्रम म्हणून नव्हे, तर शिक्षणाच्या प्रयोगशाळा म्हणून पाहिलं. १९०१ मध्ये त्यांनी इथं ब्रह्मचर्य आश्रम शाळेची स्थापना केली. वर्ग भिंतींमध्ये बंद न ठेवता झाडांच्या सावलीत नेण्याचा निर्णय हा केवळ शैक्षणिक नव्हता, तर राजकीय आणि सांस्कृतिकही होता. वसाहतवादी शिक्षणपद्धतीला पर्याय देण्याचा, भारतीय परंपरा आणि जागतिक विचार यांचा संवाद घडवण्याचा तो प्रयत्न होता. इथं पाठांतरापेक्षा निरीक्षण, स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व आणि परीक्षेपेक्षा समज याला महत्त्व दिलं गेलं.

१९२१ मध्ये विश्वभारतीची स्थापना झाली. ‘यत्र विश्वं भवत्येकनीडम्’ (जिथं संपूर्ण जग एक घर बनतं) हे विश्वभारतीचं केवळ घोषवाक्य नाही, तर इथल्या जगण्याची दिशा होती. देश-विदेशातील विद्यार्थी, कलाकार, विचारवंत इथं येऊ लागले. शांतिनिकेतन हे एका व्यक्तीचं स्वप्न राहिलं नाही, तर सामूहिक प्रयत्नातून उभं राहिलेलं बौद्धिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनलं.

संपूर्ण जग एक घर मानणारा हा प्रयोग. त्यामुळेच इथं शिक्षण म्हणजे फक्त वर्गखोलीतलं ज्ञान नाही. इथं ऋतू, सण, कला, निसर्ग, आणि मानवी नातेसंबंध हे सगळं शिक्षणाचा भाग आहे. आज UNESCO ने शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, पण स्थानिक लोकांसाठी आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन अजूनही जगणं शिकवणारी जागा  आहे.

विश्व भारती परिसर नकाशा

आज शांतिनिकेतन हा एक स्वतंत्र ‘परिसर’ म्हणून ओळखला जातो, जो विश्वभारती विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. 

                          

शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन हे दोन मुख्य भाग मिळून विश्वभारतीचा विस्तृत परिसर तयार होतो. शांतिनिकेतनमध्ये कला, संगीत, भाषा आणि मानवविद्येचे विभाग आहेत; तर श्रीनिकेतन ग्रामीण पुनर्रचना, शेती आणि समाजविकासाच्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं. म्हणजेच शांतिनिकेतन ही केवळ भौगोलिक जागा नाही, तर एक जीवनदृष्टी आहे — आणि विश्वभारती ही त्या जीवनदृष्टीची औपचारिक, विद्यापीठीय अभिव्यक्ती.

हेरिटेज वॉक

शांतिनिकेतन आश्रम हेरिटेज वॉक फक्त रविवारी असतो. आम्ही बोलपूरला शनिवारी रात्री पोचल्याने हेरिटेज वॉक हाच आमचा पहिला उपक्रम होता. 

हेरिटेज वॉकचं शुल्क जरा जास्तच वाटलं
                           

माहितीपत्रकात छातिमतल, शांतिनिकेतन गृह, उपासना गृह, तालध्वज, नूतन बाडी, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व तोरण, पश्चिम तोरण, सिंह सदन, पाठ भवन, दिनांत्रिका, चीना भवन, आणि हिंदी भवन या जागांचा उल्लेख आहे. यातली एक-दोन ठिकाणं वगळता बाकी सगळी पाहिली.

अनासुआने पुढं जाऊन तिकिटं काढून ठेवली होती. बांग्ला, इंग्रजी, आणि हिंदी अशा तीन भाषांमधले गाईड्स (मार्गदर्शक) उपलब्ध होते. आम्ही आणखी एका गटाबरोबर हिंदी बोलणाऱ्या गाईडसोबत चालायला लागलो.

बंगाली भाषेत छातिम असं ज्याला नाव आहे, तो म्हणजे सप्तपर्णी वृक्ष. इथल्या दोन सप्तपर्णी वृक्षांखाली देवेन्द्रनाथ टागोर यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत म्हणजे १८६२ मध्ये ध्यान केलं होतं – हे या जागेचं महत्त्व. कुंपणापलिकडून बऱ्याच अंतरावरून हे वृक्ष पाहावे लागले.  बहुतांश ठिकाणं अशी लांबूनच न्याहाळता आली. आपल्या समाजाला लागलेलं सेल्फीचं वेड आणि भिंतीवर आपलं नाव कोरण्याचा छंद लक्षात घेता पर्यटकांमध्ये आणि वास्तूंमध्ये हे अंतर आवश्यक आहे.

शांतिनिकेतन आश्रम परिसरात पहिलीपासूनचे वर्ग भरतात. 

आकाशाखालचे वर्ग

ठिकठिकाणी वृक्षांच्या आजूबाजूला मोठं वर्तुळ दिसलं.वर्तुळ म्हणजे दगडी वर्तुळाकार कट्टा. इथं विद्यार्थी बसतात. वर्तुळाचा एक भाग इत भागापेक्षा थोडा उंच आहे, तिथं शिक्षक-शिक्षिका बसतात. अजूनही इथं आकाशाखालचे, बिनभितींचे वर्ग भरतात. 

१९१९ मध्ये बौद्ध शैलीत बांधलेला घंटाताल आजही रोजच्या वापरात आहे.

पाठ-भवन

 हे आहे  पाठ-भवन कार्यालय. १९०१ मध्ये पाच विद्यार्थ्यांना घेऊन पाठ-भवनची सुरूवात झाली. इथं आजही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिलं जातं. ज्या बिनभिंतींच्या वर्गाचा मी आधी उल्लेख केला आहे – तो पाठ-भवनचा भाग आहे. आता या जुन्या इमारतीत कार्यालय आहे. मला या इमारतीचा रंग फार आवडला. इमारतीची रचना शैलीही मला भावली. शांतिनिकेतनमध्ये अनेक शैलींचं फ्युजन दिसतं – मग ती वास्तूकला असो की चित्रकला. एक प्रकारचा साधेपणा आणि तरीही विलक्षण सौंदर्य – असं शांतिनिकेतनमध्ये आजही जाणवतं. नव्याचा स्वीकार करताना जुन्यातलं चांगलं ते टिकवून ठेवायची कला शांतिनिकेतनला साधली आहे असं प्रथमदर्शनी वाटलं.

वडाचं एक जुनं झाड त्या परिसरात आहे. त्याच्या आसपास रेंगाळताना शांत वाटलं. एक-दोन लहान मुलं तिथं पारंब्यांवर झोके घेत होती. शेजारच्या एका कट्ट्यावर एकला चलो रे या गाण्यावर पाठ-भवनमधली मुलं-मुली नृत्याचा सराव करत होती. पर्यटक आपल्याकडं पाहताहेत का वगैरे गोष्टींकडं त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. ते त्यांच्या सरावात रममाण झाले होते.

नूतन बाडी (बांग्ला भाषेत नतुन बाडी) हे मृणालिनी देवी (रवीन्द्रनाथ यांच्या पत्नी) यांच्या मृत्यूनंतर १९०२ मध्ये बांधलेलं घर. महात्मा गांधी आणि कस्तुरबा या घरात काही काळ राहिले आहेत. शांतिनिकेतन गृह हे या परिसरातलं सर्वात जुनं घर. याही इमारतीत महात्मा गांधी राहिले आहेत. रवीन्द्रनाथांनी त्यांच्या पुढं प्रसिद्ध झालेल्या अनेक कविता याच घरात लिहिल्या आहेत. यातल्या नेमक्या कुठल्या ते आठवत नाही, पण एका इमारतीतील भिंतींवर आणि छतावर नंदलाल बोस यांची चित्रं पाहता आली. दिल खुष हो गया. इतकी ताजी आणि जिवंत चित्रं होती ती! ती चित्रं पाहून काय वाटलं याचं वर्णन मला शब्दांमध्ये करता येणार नाही.

परिसरात दोन तास भटकलो आणि बाहेर पडलो. बाहेर तूफान गर्दी होती. त्यात हे दोन वादक-गायक तल्लीन होऊन गात होते. ते ऐकतानाही प्रसन्न वाटलं. 

वादक

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आणि चित्रप्रदर्शनं

२६ जानेवारीला सकाळी पुन्हा विश्व-भारती परिसरात गेलो ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी. आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला, त्यामुळे प्रमुख पाहुणे कोण होते ते नेमकं कळलं नाही. पण त्या पाहुण्यांनी राज्यघटना आणि ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन शब्द उच्चारलेही नाहीत. त्यामुळे मला ट्रेनमधल्या त्या तरूण वडिलांची (माझे सहप्रवासी) आठवण आली. (संदर्भ – आधीची पोस्ट). कार्यक्रमाला तशी फारशी गर्दीही नव्हती. होती त्यातही शाळकरी मुला-मुलींची संख्या जास्त वाटली.

तिथून परत येताना एका ठिकाणी आलू चाप खाल्ला आणि चहा घेतला. इथली मातीची चूल छान होती. 

मातीची चूल

या छोट्या चौकात तीन-चार चहाच्या टपऱ्या होत्या. एका बाजूला डॉ. आंबेडकरांचा पुतळा दिसला म्हणून कौतुकाने पाहायला गेले. नवी दिल्लीतल्या एका गृहस्थाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा पुतळा भेट म्हणून दिला आहे. छान वाटलं ते पाहून. 

बाबासाहेबांचा पुतळा

एक दिवस रबीन्द्र भवन पाहिलं. रवीन्द्रनाथांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये हे उभारलं गेलं. टागोर संग्रहालय असं याचं दुसरं नाव आहे. इथल्या संग्रहालयाचं नाव आहे बिचित्र– म्हणजे आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, सुंदर ... इत्यादी. १९६१ मध्ये (रवीन्द्रनाथ जन्मशताब्दी) हे संग्रहालय तयार केलं गेलं. इथं रवीन्द्रनाथांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे रवीन्द्रनाथांचा आइन्स्टाईन, महात्मा गांधी, रोमा रोलां (Romain Rolland)  अशा लोकांशी झालेला पत्रव्यवहार आहे. रवीन्द्रनाथांनी काढलेली पंधराशेपेक्षा जास्त चित्रं आहेत. इथं फोटो काढायला परवानगी नाही. या संग्रहालयात फिरताना जाणवलं की सर्व वर्गातली (गरीब-श्रीमंत-मध्यमवर्गीय) वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथं आस्थेने पहात होती, थबकून चर्चा करत होती. बंगालसाठी आजही रवीन्द्रनाथ हा अभिमानाचा, अस्मितेचा, आणि आस्थेचा बिंदू आहे हे वारंवार जाणवतं.

उत्तरायणमध्ये पाच वेगवेगळी घरं आहेत. कोणार्क, श्यामली, उदयन, पुनश्च, उदिची अशी छान नावं या घरांना आहेत. या पाचही घरांमध्ये रवीन्द्रनाथांनी वेगवेगळ्या काळात वास्तव्य केलं आहे. श्यामली हे मातीचं घर आहे.

"उदिची"

या घरांच्या बांधणीत केलेले वेगवेगळे प्रयोग पाहून चकित झाले.

विक्रीकक्षात रवीन्द्रनाथांच्या चित्रांच्या छोट्या प्रतिकृती विकत मिळतात असं कळलं होतं, पण मला तर काहीच दिसलं नाही. इथं नेहमीचा सरकारी खाक्या दिसला. कर्मचारी लोकांकडं लक्ष देत नव्हते. त्यामुळे माझाही काही खरेदी करण्याचा उत्साह मावळला.

गणेश हलोई (Ganesh Haloi) यांच्या Ajanta Mural Tracing चं प्रदर्शन पाहायला गेलो.

प्रदर्शनाची माहिती देणारं पोस्टर

तिथं आमच्याविना कुणीच नव्हतं. तिथली प्रकाशयोजना अशी होती की ट्रेसिंग नीट दिसतंच नव्हतं. तिथले सुरक्षा कर्मचारी मात्र उत्साही होते, बरीच माहिती सांगत होते. गणेश सर अजंठामध्ये सहा वर्ष काम करत होते. त्यांनी केलेली ट्रेसिंग सुंदर आहेत. कशी केली असतील हा प्रश्न पडला, पण त्याचं उत्तर काही शोधलं नाही. गणेश सरांचं या विषयवारचं पुस्तक प्रकाशित झालं आहे असं नंतर कळलं. कदाचित पुस्तकात सविस्तर माहिती असेल, किंवा इतर मार्गांनी ती शोधावी लागेल.

रवीन्द्रनाथांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतं. पण शांतिनिकेतनमध्ये त्यांच्यासमवेत योगदान देणारे आणखी तीन चित्रकार महत्त्वाचे आहेत. नंदलाल बोस (Nandalal Bose), रामकिंकर बैज (Ram Kinker Baij) आणि बिनोद बिहारी मुखर्जी (Benode Behari Mukherjee)  बैज आणि मुखर्जी यांच्या चित्रांचं प्रदर्शन दुसऱ्या दालनात होतं. तीही चित्रं अप्रतिम होती. सगळीच चित्रं अतिशय जिवंत वाटत होती. बिनोद बिहारी एका डोळ्याने अंध होते तर दुसऱ्या डोळ्याने त्यांना दूरचे दिसत नसे – तरीही त्यांची चित्रं अतिशय वास्तवदर्शी आहेत. कसं काय चित्रं काढत असेल हा माणूस – असं वारंवार वाटत राहिलं. प्रदर्शनाची वेळ संपत आल्याने आम्हाला तिथून निघावं लागलं. पण केवळ चित्रं पाहण्यासाठी शांतिनिकेतनला पुन्हा यावं इतकी सगळी चित्रं सुरेख होती.  

आणखी एका सकाळी ऋत्विक घटक यांच्या जीवनकार्यावरचं फोटो प्रदर्शन पाहिलं. ते पाहताना आपण यांचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत हे जाणवलं. दुसऱ्या एका दालनात कृष्णा रेड्डी यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं. प्रिंटमेकर पेंटिंग असा एक नवा प्रकार इथं पाहायला मिळाला. शांतिनिकेतनच्या एका तरूण विद्यार्थ्याने (तोही तिथं प्रदर्शन पाहायला आला होता) मला सोप्या भाषेत ते समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण माझ्या ते सगळं डोक्यावरून गेलं. चित्रं अर्थातच छान होती.

शांतिनिकेतन-बोलपूरमधली ही सगळी प्रदर्शनं पाहताना आपल्याला चित्रकलेतलं काही कळत नाही याचं अपार दु:ख झालं. चित्रकला-निरक्षर असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे एक पूर्ण नवं विश्व होतं. एकाचवेळी अद्भुत, सुखावणारं, आणि तरीही परक्यासारखं अंतर ठेवून वागणारं.

चित्रांची भाषा समजून घ्यायला हवी खरी. नुसती एक नवी लिपी नाही, तर नवा विचार, नवा संवाद ....यांच्या अगणित शक्यता त्यामुळे समोर येतील.

आपल्या जगण्यात साधेपणा आणि सौंदर्य दोन्ही आहे का? निसर्गाकडं पाहण्याची आपली दृष्टी खरोखर कशी आहे? कलाकारांना जे दिसतं ते आपल्याला दिसू शकतं का? कलेची साधना करण्याइतकी तिच्याशी आपली बांधिलकी आहे का? या जगात आपलं नातं नेमकं कुणाशी, कशाशी आहे हे आपल्याला पुरेसं समजलं आहे का? …. असे अनेक प्रश्न या भटकंतीत माझ्या मनात येत राहिले. शांतिनिकेतनने मला नक्की एक नवी दृष्टी दिली. तिचं गारूड माझ्यावर किती काळ राहील हे काळच सांगेल.  

*******

पुढच्या भागात जाऊ जुन्या कोलकात्यात.