ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 9, 2026

२८०. “बोशांको”ची भेट: भाग १

(Want to read this post in English? It is available here.)

शीर्षकातला बोशांको हा शब्द तुम्ही बहुधा पहिल्यांदाच वाचत असाल.

कोण आहे हा किंवा ही बोशांको असंही तुम्हाला कदाचित कुतुहल वाटत असणार.

तर बोशांको हे कुणाही व्यक्तीचं नाव नाहीये. किंबहुना बोशांको हा शब्द माझ्याही कधी ऐकण्यात-वाचण्यात आलेला नाहीये. आज मीच हा शब्द तयार केलाय. तीन जागांच्या नावांमधलं प्रत्येकी पहिलं अक्षर घेत तयार केलेला शब्द.

बोलपूर-शांतिनिकेतन-कोलकाता इथं मी नुकतीच जाऊन आले. त्या प्रवासाच्या या नोंदी. बोशांकोच्या नोंदी. किंवा मला दिसलेलं, अनुभवायला मिळालेलं बोशांको”.

या लेखमालिकेत चार लेख असतील. पहिल्या लेखात बोलपूरमधलं मातीचं घर आणि खाद्यपदार्थांबद्दलचे अनुभव आहेत. दुसरा लेख शांतिनिकेतनवर आहे. तिसरा लेख जुन्या कोलकात्यातील भटकंतीबाबत आहे. चौथ्या आणि शेवटच्या लेखात दक्षिणेश्वर भेट आणि एका कलाकृतीबद्दलची माझी निरीक्षणं असतील.

*****

कोलकात्याच्या दिशेने

पुणे ते कोलकाता हा प्रवास आझाद हिंद एक्स्प्रेसने केला. चौतीस तास अपेक्षित असणारा प्रवास - गाडीला उशीर झाल्याने बेचाळीस तासांचा झाला. हा प्रवास फक्त किलोमीटरमध्ये नसतो, तर तो सहप्रवाशांना जाणून घेण्याचाही असतो. अर्थात इतक्या लांबच्या प्रवासात सहप्रवाशांचे बरे-वाईट अनुभव येतातच. मनमाड किंवा भुसावळ कुठंतरी रात्री एक मोठा गट डब्यात चढला. रात्रीच्या अंधारात बर्थचे नंबर नीट दिसत नाहीत, त्यामुळे त्यांचा थोडा वेळ गोंधळ चालणार हे समजण्याजोगं होतं. इतर लोक झोपले आहेत, याचं भान तसंही कमी लोकांना असतं हा नेहमीचा अनुभव. पण अर्धा तास झाला तरी या लोकांचे आवाज काही थांबेनात. मग मी त्यांना आवाज कमी करायला सांगितलं तर त्यांना राग आला आणि त्यांचा आवाज आणखीच वाढला.

दुसऱ्या दिवशी त्यांच्यातल्या काहीजणांशी गप्पा मारताना कळलं की हा एक आध्यात्मिक गट होता आणि गंगासागरला चालला होता. गटात एकूण चाळीस लोक होते, आणि त्यात पंचवीस पुरूषही होते. त्यातल्या काही पुरूषांना खालचा बर्थ मिळालेला होता. म्हणजे काल रात्री हे लोक आपल्या गटातल्या स्त्रियांना खालचा बर्थ द्यावा म्हणून दुसऱ्याच पुरूष प्रवाशांशी भांडत बसले होते – ते फारच स्वार्थीपणाचं होतं तर. आपापसात त्यांना गटातल्या स्त्रियांना खालचा बर्थ देण्याचं काम शांतपणे करता आलं असतं. पण शक्यतो आपली सोय न सोडता दुसऱ्यांकडून लाभाची अपेक्षा करायची ही आपल्या समाजाची (त्यातल्या बहुसंख्य लोकांची) सवय आहे.

दुसरे एक दादा होते. ते पुण्यातून गाडी सुटतानचा अंथरूण पसरून झोपी गेले. मध्येमध्ये उठून ते फोनवर बोलत होते, खात होते. पण तिसऱ्या दिवशी सकाळी उतरेपर्यंत ते झोपलेलेच होते. त्यांना बरं नाहीये की काय हे एकदा विचारून घेतलं. ते फक्त विश्रांती घेत होते.

एक मध्यमवयीन बाई नागपूरला चढल्या. त्याही कोलकात्याला जात होत्या. त्यांचा भाऊ आजारी होता म्हणून त्या जरा विमनस्क होत्या. आम्ही काही खात असताना त्यांना खाण्याचा आग्रह केला तेव्हा जरा अधिक बोलणं झालं.. त्यांचा पुढचा प्रश्न होता – तुम्ही कुठं चाललात?

हा प्रश्न जास्तच अवघड होता. कारण मी अनुज्ञाच्या (माझ्या भाचीच्या) मैत्रिणींच्या घरी ओळखदेख नसताना राहायला चालले होते. असं ओळख नसताना कुणाहीकडं राहायला किंवा जेवायला जाणं हे माझ्यासाठी नेहमीचंच आहे. पण ते अनेकदा समोरच्या माणसांच्या व्याख्यांमध्ये न बसणारं असतं. त्यामुळे मी मोघम – शांतिनिकेतन पाहायला चाललोय – असं सांगून विषय बदलला.

तिसरे एक सहप्रवासी तरूण होते. ते कपड्यांचे ठोक व्यापारी होते. गाडीला उशीर झाल्याने त्यांच्या पुढच्या विमानप्रवासांचा झालेला घोळ ते निस्तरत होते. मध्येच त्यांना घरून फोन आला. त्यांचं सगळं संभाषण मला अगदी सहज ऐकू येत होतं. त्यांच्या तिसरीतल्या मुलीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत भाषण द्यायचं होतं, त्याबाबत बायकोशी त्यांचं बोलणं चालू होतं. मुलीला भाषण वाचता येणार नाही, ते पाठच करावं लागेल हे कळल्यावर ते जरा विचारात पडले. मग बायकोला म्हणाले, तू काळजी करू नकोस. तिला फक्त तीन शब्द लक्षात ठेवायला सांग. भारत, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एवढे तीन शब्द ती बोलली तरी छान होईल. मला त्या गृहस्थांबद्दल आदर वाटला. मग त्यांच्याशी आणखी थोड्या गप्पा झाल्या.

प्रवासात असा माणसांचा, दृष्टिकोनांचा, वास्तवांचा एक विशाल पट उलगडत राहतो.   

बोलपूर

हावडा जंक्शनला गाडी पोचली तेव्हा देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती. पोटपूजा करून आम्ही बोलपूरच्या दिशेने निघालो. ज्येष्ठ नागरिक या नात्याने मला गाडीत पुढंची जागा देण्यात आली आणि संपूर्ण प्रवासात ती जागा माझ्यासाठी राखीव राहिली 😊  

कोलकाता ते बोलपूर हे अंतर सुमारे १५० किलोमीटर आहे. एकूण इथल्या लोकांना गाडीचा हॉर्न वाजवायची आणि गाडी वेगात हाकायची सवय आहे हे पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच लक्षात आलं. 

कोलकाता शहराबाहेरचा महामार्ग

आपल्याला (पश्चिम बंगाल बाहेरच्या लोकांना) शांतिनिकेतन माहिती आहे, पण बोलपूर माहिती नसतं. शांतिनिकेतन बोलपूरमध्ये आहे ही बोलपूरची मुख्य ओळख असं म्हणता येईल. पण बोलपूरला शांतिनिकेतनच्या आधीचाही इतिहास आहे, ओळख आहे.

बोलपूरमधली भातशेती 
बीरभूम जिल्ह्यातलं बोलपूर. खरं तर मी मी पर्यटक पाहतात तसं बोलपूर पाहिलंच नाही. शांतिनिकेतनला जाता-येता आणि रेल्वे स्टेशनवर जाताना जे दिसलं त्यावरून छान वाटलं. भातशेतीत (इथं तीन वेळा भात घेतला जातो आणि तिसऱ्या भातासाठी जमिनीखालच्या पाण्याचा भरपूर उपसा होतो) लावणीचं काम चालू होतं. त्यात स्त्रिया आणि पुरूष दोघंही सारख्याच संख्येने काम करताना दिसले. लाल माती दिसते आहे. रस्ते छोटे आहेत पण वाहनंही तितकी जास्त नाहीत. अनेक स्त्रिया आणि पुरूष सायकलवरून जाताना दिसले. अजून हे सायकलींचं शहर आहे असं म्हणता येईल. बरीच हॉटेल्स आणि होम-स्टे दिसले त्याअर्थी पर्यटक मोठ्या संख्येने येत असावेत.

मातीचं घर

बोलपूरला आम्ही पोचलो तोवर अंधार झाला होता. पण बाहेरून आम्ही घरात आल्या आल्या थंडी संपून एकदम उबदार वाटलं. मी आले होते अनासुआच्या घरात. मातीच्या दुमजली घरात. हे मातीचं घर बांधणारी वास्तुविशारद आहे अनुज्ञा. अनुज्ञाला साहाय्य करणारी दुसरी वास्तुविशारद आहे प्रतीक्षा.

अनुसुआचं हे घर केवळ सुट्टीसाठीचं दुसरं घर नाही, तर प्राथमिक घर आहे. ती इथं कायमस्वरूपी राहते. २०२४-२५ मध्ये मातीचं घर बांधणं आणि त्यात कायमस्वरूपी राहणं म्हणजे मागं जाणं नाही, तर पुढं पाहणं आहे. हवामान बदल, वाढती उष्णता, अनिश्चित पावसाळे आणि विजेचा अति वापर — या सगळ्या पार्श्वभूमीवर मातीचं घर हे एक चांगलं उत्तर आहे. माती उन्हाळ्यात घर थंड ठेवते, हिवाळ्यात उबदारपणा देते आणि माणसाला निसर्गाशी पुन्हा जोडते. एसी, फॅन, हीटर यांच्या आवाजाऐवजी भिंतींचं शांत श्वसन जाणवतं. अशा घरात राहणं हा एक निवांतपणाचा अनुभव होता. ते घर अनुज्ञाने बांधलेलं असल्यामुळे तर मला ते अधिकच जवळचं वाटलं.

अनासुआचं घर दुरवरून असं दिसतं

मातीचं घर पर्यावरणपूरक तर आहेच, पण ते सामाजिक आणि सांस्कृतिक विधानही आहे. स्थानिक माती, स्थानिक कारागीर, स्थानिक ज्ञान — यावर उभं राहिलेलं घर गावात रोजगार निर्माण करतं. स्थानिक कारागिरांच्या ज्ञानाची आणि कौशल्याची परंपरा ते जिवंत ठेवतं. मातीचं घर प्रतिष्ठेची, समृद्धीची प्रचलित व्याख्या मोडून काढतं. मातीचं घर सांगतं की निसर्गाशी नातं हीच समृद्धी आहे. सिमेंटच्या जंगलात उभं राहिलेलं असं मातीचं घर माणसाला आठवण करून देतं की आपण निसर्गावर राज्य करायला नाही, तर त्याच्यासोबत राहायला आलो आहोत.

बदकांचा विरंगुळा

अनुसुआचं घर प्रशस्त आणि हवेशीर आहे. भोवताली संथ वाहती हवा, आणि पक्षांचे आवाज. खिडकीतून सहज दिसणारं आकाश आणि पक्षी. तिच्या घरातल्या कुत्र्यांचा, कोंबड्यांचा, आणि बदकांचा सहज वावर आल्हाददायक होता. 

विसावा

अंगणात एक तळं होतं. 

अंगणातून दिसणारं घर. बाजूला भाताची पारंपरिक कणगी

बदकं रांगेने येत आणि त्या तळ्यात एकामागोमाग उड्या मारत ते पाहायला मजा आली. बागेत भाजीपाला आहे. भाताचं शेत आहे. आणखी एक – त्या घरात भरपूर पुस्तकं आहेत. कोणी कुठंही निवांत बसावं, वाटलं तर इतरांशी गप्पा माराव्या किंवा वाचत बसावं, काळी कॉफी किंवा  काळा चहा पीत बंगाली गीतं ऐकावी ... कोणत्याही गरजेसाठी माणसाला जणू घराबाहेर जायलाच लागू नये असं तिथलं वातावरण.

अनुज्ञाचं एक फेसबुक लाईव्ह पाहून अनुसुआला वाटलं की हीच वास्तुविशारद आपल्याला हवं तसं घर बांधू शकेल. आणि मग दोन अनोळखी व्यक्ती एकमेकींशी बोलल्या, आणि कामाला सुरूवात झाली. काम पूर्ण झाल्यावरही त्यांच्यातले भावबंध कायम राहिले. त्यातून मीही त्यांच्याशी जोडले गेले. तंत्रज्ञानाच्या सकारात्मक परिणामांचं हे एक जिवंत उदाहरण. आणि 'अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका' हे वारंवार सांगणाऱ्या सूचनांना आपण का नाकारलं पाहिजे याचंही एक उदाहरण. 

मातीच्या घरासंबंधी अधिक जाणून घ्यायचं असेल तर मातीमोलच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. 

खाद्यपदार्थ

रूढार्थाने मी खवय्या गटात मोडत नाही. स्थानिक पदार्थ मी नेहमीच चाखून बघते. पण अमूकच पाहिजे आणि तमूकच नको असं काही माझं नसतं. कुणी मला आवडती भाजी कोणती, किंवा आवडती मिठाई कोणती असं विचारलं तर मला धड सांगताही येत नाही. आधी बोलपूरमधल्या अनुसुआच्या घरात आणि नंतर कोलकात्यातल्या देबाहुतीच्या घरात मात्र खाद्यपदार्थांबाबत एक वेगळीज जागरूकता माझ्यात आली.

आम्ही सगळेच सुट्टीवर होतो, त्यामुळे घाई कुणालाच नसायची. नाश्त्याला आणि जेवणासाठी तुनिदीदी रोज वेगवेगळे पदार्थ हौसेने बनवत असायची. कोणत्याही जेवणाची सुरुवात कधीही घाईने होत नसे. बंगाली पद्धतीप्रमाणे जेवण हे एका विशिष्ट क्रमाने करायचं असतं. भात हे मुख्य अन्न. पण ते ताटात थोडंच वाढून घ्यायचं. सुरूवात करायची ती  शुक्तो  किंवा एखादी सौम्य (किंवा सौम्य कडवट चवीच्या) भाजीने. तिच्यासोबत पहिला भात संपवायचा. मग पुन्हा भात वाढून घ्यायचा. आता त्यासोबत डाळ (मसूर किंवा मूग) खायची. मग येणार  आलू पोस्टो, लाउ घोंटो  अशा भाज्या. मग येणार मासे. प्रत्येक जेवणात वेगवेगळे मासे. मी सुरूवातीला हौसेने नावं विचारली, मग हळूहळू सोडून दिलं नावांची काळजी करणं. मग येणार चिकन किंवा मटण. जेवणात बटाटा हवाच. पण मी पाहिलं की प्रत्येक भाजीसाठी बटाटा वेगळ्या पद्धतीने कापलेला असायचा.

पदार्थांची रांग होती, पण गोंधळ नव्हता. बंगाली जेवण म्हणजे मासे – असं मला वाटतं होतं, ते काही खरं नाही. शाकाहारातही प्रचंड वैविध्य आहे. प्रत्येक चवीला तिची जागा, तिचा वेळ. खाणं म्हणजे एक प्रवास वाटत होता — थेट मुख्य पदार्थावर उडी नाही, तर टप्प्याटप्प्याने पुढे जाणं. खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटायचं, पण डोकं जड होत नव्हतं — हीच त्या सिक्वेन्सची ताकद.

जेवणाचा शेवट नेहमी गोड आणि शांत. पायेश, छेना संदेश, रोसोगोल्ला  किंवा कधी मिष्टि दोई

गूळ-खोबऱं यांचं सारण असलेला 'पाटी-शाप्ता'

आधी खाल्लेल्या सगळ्या चवींना अलगद निरोप देणारी मिठाई. सगळे गोड पदार्थ नोरेन गुडमध्ये बनवलेले. नोरेन गुड म्हणजे बंगालच्या हिवाळ्याची खास ओळख. खजूराच्या झाडावरून पहाटे गोळा केलेल्या रसापासून बनवलेला हा गूळ फक्त काही महिन्यांसाठीच मिळतो. थंड हवेत रस हळूहळू आटवत नेला की त्यात साखरेसारखी तिखट गोडी न राहता धुरकट, मऊ, थोडी मातीची चव तयार होते. म्हणूनच नोरेन गुड  ही केवळ गोडी नाही, तर ऋतूची खूण आहे. वर्षभर सहज उपलब्ध नसणं हीच त्याची खासियत. गूळ आणि खोबरं यांचा वापर पदार्थांची चव वाढवत होता. त्या आठ-दहा दिवसांत मला हे प्रकर्षाने जाणवलं की बंगाली खाद्यसंस्कृतीत खाणं हे यज्ञकर्म किंवा उदरभरणही नाही तर शांत, संथपणे उपभोगायचा एक प्रवास आहे.

मातीच्या घरात निवांत राहताना शांतिनिकेतनला अर्थातच आम्ही विसरलो नव्हतो. पुढचे तीन दिवस वेगवेगळ्या निमित्ताने शांतिनिकेतन-विश्व भारती परिसरात फिरणं झालं. त्यासंबंधी अधिक जाणून घेऊयात पुढच्या लेखात.  

 

Thursday, January 22, 2026

२७९. तिरूवनंतपुरम (त्रिवेंद्रम)

(English translation of this post is available here.)

भाग ३: कन्याकुमारी परिसर भटकंती

कन्याकुमारीच्या प्रवासाची आखणी करतानाच तिरूवनन्तपुरमला दोन दिवस राहण्याचा बेत मी आखला होता. माझा असा समज होता (नेमका का ते माहिती नाही) की कन्याकुमारीहून त्रिवेंद्रमला जायला भरपूर बस आहेत आणि त्या सतत आहेत. प्रत्यक्षात अशा थेट बस जवळजवळ नाहीतच. नागरकोविलच्या वडस्सेरी (Vadassery) बसस्थानकावरून मला त्रिवेंद्रमसाठी बस मिळेल असं सांगण्यात आलं. मग नागरकोविल गाठलं. नागरकोविलच्या बसमध्ये चढताना खरं तर मी कंडक्टरला वडस्सेरीला जाते ना ही बस? मला पुढं त्रिवेंद्रमला जायचंय..” वगैरे म्हणून चढले होते. नागरकोविलला उतरल्यावर इतर प्रवाशांना त्रिवेद्रमला जाणारी बस?” असं विचारायला गेल्यावर लक्षात आलं की मी अण्णा बसस्थानकावर आले होते. वडस्सेरीहून तुम्हाला त्रिवेंद्रमची बस मिळेल असं जो तो मला (मोडक्योतोडक्या इंग्रजीत) सांगत होता, पण वडस्सेरीला जायचं कसं? आपल्याच देशातल्या माणसांशी आपल्याला भाषा माहिती नसल्यामुळे साधं बोलताही येत नाही – हे पुन्हा एकदा जाणवलं.

भाषा येत नसली तरी लोक मदत करायला मात्र अगदी उत्सुक होते. पाच-सहा प्रवाशांची माझ्या गहन प्रश्नावर एक मिनी-कॉन्फरन्स झाल्याचं मला दिसलं. एक मध्यमवयीन बाई माझा हात धरून मला एका बसपाशी घेऊन गेल्या. त्यांनी कंडक्टरला काहीतरी सांगितलं. कंडक्टरने हाताने मला बसमध्ये चढण्याची खूण केली. नो त्रिवेंद्रम, वडस्सेरीअसं त्याने मला तीनतीनदा बजावून सांगितलं. ही बस मला नागरकोविलमधल्या वडस्सेरी या बसस्थानकावर सोडणार - इतकं मला कळलं.

अण्णा बसस्थानकापासून वडस्सेरीपर्यंत मला तिकिट घ्यावं लागलं नाही. स्त्रियांसाठी तीस किलोमीटरचा प्रवास मोफत आहे असं कळलं. पण कन्याकुमारी ते नागरकोविल या बावीस किलोमीटरच्या प्रवासाचं मात्र मी तिकिट काढलं होतं. (नागरकोविल, कन्याकुमारी दोन्ही तामिळनाडूत आहेत.) त्यामुळे नक्की योजना काय आहे ते कळलं नाही. कदाचित स्थानिक बस आणि लांब पल्ल्याची बस असा काहीतरी फरक असावा. किंवा तामिळनाडूची बस आणि केरळची बस असा फरक असावा. तिकिट काढावं लागलं याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, योजना मला नीट समजली नाही, इतकंच म्हणायचं आहे. 

बसमध्ये माझ्या शेजारी तामिळ भाषा बोलणाऱ्या ताई होत्या. त्यांनी उत्साहाने बोलणं सुरू केलं. माझं तामिळ वणक्कमपासून (नमस्कार) सुरू होतं आणि तामिळ तेरियादपाशी (मला तामिळ येत नाही) संपतं. पण गंमत म्हणजे तरीही त्यांचा थांबा येईपर्यंत दीडेक तास आम्ही बोलत होतो. बोलायचंच असेल तर भाषेचा अडसर येत नाही – हेही पुन्हा एकदा लक्षात आलं. आणि कदाचित त्यामुळेच अन्य भारतीय भाषा शिकण्याची तेवढा सोस रहात नाही. काम भागून जातं. लोक मदत करतात. लोक हसून बोलतात. लोक त्यांचा डबा काढतात आणि आपल्यालाही चहा-नाश्त्याचा आग्रह करतात.

त्रिवेंद्रमची ही काही माझी पहिली भेट नव्हती. इथल्याही जुन्या काही आठवणी आहेत. एका युवक शिबिरासाठी महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना घेऊन कन्याकुमारीला आले होते. चेन्नैला आमची गाडी उशीरा पोचली, त्यामुळे त्रिवेंद्रमला जाणारी पुढची गाडी चुकली. मग चेन्नै स्थानकप्रमुखांशी बोलणी करून दुसऱ्या एका गाडीत व्यवस्था केली. ती गाडी अपरात्री कधीतरी त्रिवेंद्रमला पोचली होती. तीस मुला-मुलींसह त्रिवेंद्रम स्थानकाच्या फलाटावर रात्री झोपलो होतो – तो एक संस्मरणीय अनुभव होता. नंतर कधीतरी दोन आठवड्यांच्या एका प्रशिक्षणासाठी कोवलम बीचजवळ राहिले होते, आणि सकाळ-संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यावर जात होते. दिल्लीत असताना एका प्रकल्पाच्या निमित्ताने त्रिवेंद्रमच्या आसपासच्या खेड्यांमध्ये जाणं झालं होतं, तेही दिवस छान होते. केरळची राजधानी असलेलं हे शहर मला केवळ प्रशासकीय केंद्र म्हणून नाही, तर इतिहास, संस्कृती, स्थापत्यकला आणि माणुसकी यांचं सुंदर मिश्रण म्हणून अनुभवायला मिळालं आहे. आधीच्या सगळ्या भेटी कामानिमित्त होत्या, ही भेट निवांत होती हा एक मोठा फरक यावेळी होता.

तिरू हे एक आदरसूचक अक्षर आहे. काहीसं संस्कृतमधल्या श्री सारखं. तिरूचिरापल्ली, तिरूपती, तिरूवल्लुवर.... अशा अनेक शहरांच्या नावात तिरू आहे. ‘अनंत’ हे ईश्वराचं संबोधन आहे, पण इथं अनंत म्हणजे शेषनाग. ‘पुरम’ म्हणजे निवास, नगरी. शेषावर विसावलेल्या विष्णूशी जोडलेली ही नगरी. शहराचं नावचं असं अर्थपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण. या शहराला स्वत:ची एक लय आहे. रस्ते टुमदार, वळणावळांचे. रस्त्यांवरील वाहतूक पाहतानाही ही लय जाणवत राहते. दुचाकीस्वारांची संख्या मोठी असली तरी जवळजवळ प्रत्येकजण हेल्मेट घालूनच गाडी चालवतात—पुरुष, स्त्रिया, तरुण, वयस्क सगळेच, दुचाकी चालवणारे आणि मागे बसणारे – दोघेही हेल्मेट वापरतात. 

हे केवळ कायद्याचं पालन वाटत नाही, तर सुरक्षिततेची एक सामूहिक जाणीव वाटते. वाहतूक तुलनेने कमी आक्रमक, अधिक संयमित आणि शांत भासते - जणू या शहराचा स्वभावच तसा आहे.

होम-स्टे

तिरूवनन्तपुरममध्ये कुठं राहायचं ते ठरवताना Booking.com या संकेतस्थळावर एक होम-स्टे दिसलं. Chaithritha Ladies Homestay.  ते फक्त स्त्रियांसाठी होतं आणि त्याचे रिव्ह्यूजही चांगले होते. पैसे प्रत्यक्ष तिथं गेल्यावर भरायचे होते, त्यामुळे काही कारणांनी प्रवास रद्द झालाच तरी पैसे वाया गेले नसते. मी लगेच तिथं राहायचं नक्की केलं.

मी कन्याकुमारीला जायला निघण्यापूर्वी सुमारे महिनाभरापासून या होम-स्टेवाल्या लोकांचा माझ्याशी व्हॉट्सऍपवरून संवाद सुरू झाला. मी कुठून, कशी पोचणार आहे, स्टेशन किंवा बसस्थानकावरून मला पिकअप व्यवस्था हवी आहे का, मला त्रिवेंद्रममध्ये काय पाहायचं आहे, त्यासाठी काही व्यवस्था करायची आहे का ... वगैरे. मी त्रिवेंद्रमला त्यांच्या घरी पोचेपर्यंत हा संवाद चालू होता. किंबहुना मी पुण्याला परत पोचल्यावरही मी त्यांना घरी सुखरूप पोचल्याचं कळवलं होतं – अगदी आपल्या सुहृदांना कळवावं तसं.

होम-स्टेतर्फे माझ्याशी संवाद साधणारी आणि माझी सगळी व्यवस्था करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे मला माहिती नव्हतं. त्रिवेंद्रमला पोचल्यावर बिंदू मॅडम भेटल्या तेव्हा कळलं की माझी सगळी विचारपूस त्यांचा मुलगा लिहिन (हो, हेच त्याचं नाव) करत होता. तो दूर दिल्लीत, मी पुण्यात आणि व्यवस्था त्रिवेंद्रममधली – हे तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झालं. दिल्लीत राहून तो आईला सगळी मदत करतो. (त्यांची वैयक्तिक माहिती अर्थातच जास्त लिहिणार नाहीये.)

कन्याकुमारीतून त्रिवेंद्रमला बसने येणार का ट्रेनने असं मला लिहिनने विचारलं. तोवर मी त्या प्रवासाचा फारसा विचार केला नव्हता. कन्याकुमारीला जाताना त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी हा प्रवास ट्रेनने करणार होते. मग बदल म्हणून कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम बसने जाऊयात असं ठरवलं. त्रिवेंद्रमला येण्यासाठी तामिळनाडू आणि केरळ अशा दोन्ही राज्यांच्या बस असतात. पण तुम्ही केरळ राज्याच्याच बसने या”, असं लिहिनने मला आग्रहाने सांगितलं. ते ऐकताना गंमत वाटली. आपण महाराष्ट्राच्या बसबाबत इतके काही आग्रही नसतो हे जाणवलं.  

त्रिवेंद्रम शहरात काही ठिकाणांना भेट देण्यासाठी लिहिनने गाडीची चालकासह व्यवस्था केली होती. हा चालक म्हणजे लिहिनचा मामेभाऊ होता. विश्वनाथ थोडासा लाजराबुजरा होता. त्याचा एक चुलतभाऊ – मेघन त्याचं नाव -सोबत होता. हा मात्र गप्पिष्ट होता. माझ्या घरच्यांना मुलगी हवी होती, तर मी जन्माला आलो – म्हणून माझं नाव मुलीच्या नावाशी जवळचं (मेघन) आहे असं तो सांगत होता. हे दोघंही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. माझ्यासोबत तेही पहिल्यांदाच अनेक ठिकाणांना भेट देत होते. त्यामुळे मला माहिती देणारा एखादा गाईड सोबत असावा ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. पण केरळमधल्या कुटुंबाबाबत, त्यांच्या परस्पर-संबंधांबाबत पुष्कळ काही जाणून घेता आलं.

घरात प्रवेश केल्या केल्या वायफाय पासवर्ड मिळाला. कनेक्शन उत्तम होतं. घरगुती नाश्ता, जेवण. छोटेखानी पण टुमदार आणि स्वच्छ घर. झाडं हाताशी आहेत असं वाटायला लावणारी खिडकी. वळणारा रस्ता आणि कोपऱ्यावरच्या इमारतीच्या कठड्यावर खेळणारं मांजर. 

मीही जणू एका चित्राचा भाग असावे इतकी परिसरात शांतता. मजा आली.

होम-स्टेमध्ये पुट्टु-कडला-करी, अप्पम आणि स्थानिक मासे खाता आले. पुट्टु–कडला- करी हा केरळमधील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ आहे. मला तो ताटात दिसला तेव्हा आधी छोले-भातच वाटला. 

पण पुट्टुमध्ये किसलेल्या ताज्या खोबऱ्याची चव लागली आणि छान वाटलं. पुट्टु हा तांदळाच्या पीठापासून आणि किसलेल्या नारळापासून बनवला जाणारा वाफवलेला पदार्थ. तो खास पुट्टु कुडम किंवा साच्यात उभा वाफवला जातो. त्यामुळे तो अगदी मऊ असतो. त्यासोबतची कडला-करी ही काळ्या हरभऱ्यांपासून (black chickpeas) बनवलेली असतो. त्यात असतो नारळ, भाजलेले मसाले आणि कढीपत्त्याची फोडणी. ही घट्ट रस्सेदार भाजी असते. हा पदार्थ चविष्ट तर आहेच, तसाच आरोग्यदायीही आहे. मी कितीही वेळा न कंटाळता पुट्टु-कडला-करी खाऊ शकेन - आयती मिळाली तर, अर्थात.



दिवसभर मला सोबत करणाऱ्या दोन तरूण मुलांसोबत गप्पा मारताना मला मजा आली. त्यांच्याच आग्रहामुळे दुपारच्या जेवणासोबत टॉडीचीही चव घेतली. सौम्य आंबट चवीचं हे पेय. तिथल्या उपाहारगृहात कुटुंबातले सगळ्या वयाचे लोक एकत्रितपणे टॉडीचा आस्वाद घेताना दिसले. बुधवारचा दिवस असूनही (म्हणजे सुट्टी नसताना) उपाहारगृह भरलेलं होतं. 


 मी अर्थात फक्त दोनेक घोट प्यायले.

श्री पद्मनाभस्वामी मंदिर

तिरुवनंतपुरमचे सर्वात प्रसिद्ध मंदिर - श्री पद्मनाभस्वामी मंदिर. इथं पोषाखाबाबत विशेष नियम आहेत. विश्वनाथ, बिंदू सगळ्यांनी मला त्याबाबत आधीच सांगितलं होतं. पुरूषांनी अंगाचा वरचा भाग उघडा ठेवला पाहिजे (शर्ट काढायचा) आणि मुंडू किंवा धोती नेसायची. स्त्रियांनी खरं तर साडी नेसून आलं पाहिजे. पण हल्ली सलवार-कमीज सारख्या वेषात सलवारीवर मुंडू (त्याला मुंडू-नेरियथू असं म्हणतात) नेसलं तरी चालतं. देवळाच्या आवारात साडी किंवा मुंडू भाड्याने मिळण्याची व्यवस्था आहे. मी होम-स्टेमधून निघायच्या आधीच बिंदूने तिच्याकडचा नवाकोरा मुंडू मला वापरायला दिला होता. मंदिरात प्रवेश करताना मी तो सलवारीभोवती गुंडाळला. सुरक्षा तपासणी करताना तिथल्या स्त्री पोलिसाच्या लक्षात आलं की तो मुंडू व्यवस्थित बसलेला नाही, कधीही निघेल. मग तपासणी झाल्यावर त्या स्त्री पोलिसाने मला मुंडू व्यवस्थित बांधून दिला.

मंदिर खूप मोठं आहे. देशातलं हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे असं मानलं जातं. लोक शांतपणे रांगते उभे होते. सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्यापूर्वी नियमित दर्शनला येणारे लोक होते, आणि माझ्यासारखे काही पर्यटक होते. मंदिराच्या एका भागात सामूहिक विष्णूसहस्रनाम पठण चालू होतं. कोणे एके काळी मला ते पाठ होतं (तुला काय जमणार ते असं कुणीतरी म्हटल्याने आव्हान स्वीकारून मी ते काही तासांत पाठ केलं होतं – ती एक वेगळीच कहाणी, पण ती आठवली....) त्यामुळे माझ्या मनात त्यातले पुढचे पुढचे शब्द उमटत होते. खरं तर कितीतरी वर्षांत मी विष्णूसहस्रनाम म्हणलेलं नाही, पण मनाची जादू अजबच.

मंदिराच्या नावातून कळतं तसं हे विष्णूचं देऊळ आहे. इथं शेषशायी विष्णू पाहायला मिळतो. आठव्या शतकात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी अठराव्या शतकात केला. त्रावणकोरच्या राजांचा या मंदिराशी अतूट संबंध होता. इ.स. १७५० मध्ये महाराजा मार्तंड वर्मा यांनी “त्रिप्पादिदानम्” ही ऐतिहासिक घोषणा केली - ज्यात संपूर्ण त्रावणकोर राज्य भगवान पद्मनाभस्वामींना अर्पण केलं गेलं. त्यानंतर राजे स्वतःला श्री पद्मनाभदास” (देवाचे सेवक) म्हणवू लागले. राज्य हे देवाचे असून राजा केवळ सेवक – अशी त्यांची धारणा होती असं म्हणतात.

मंदिराची वास्तू म्हणजे केरळ आणि द्रविड शैलीचं मिश्रण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात १२००८ शाळीग्राम आहेत असं वाचलं – पण मला काही ते दिसले नाहीत. नेहमीप्रमाणे याही मंदिरात पुजारी लोकांना ढकलत होते आणि जास्त पैसे भरणाऱ्या लोकांची वेगळी रांग होती. देवापुढं असली पैशावर आधारित विषमता तथाकथित श्रद्धावान लोक कशी काय करू शकतात हा नेहमीचाच प्रश्न मला पुन्हा एकदा पडला. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे तीन दरवाजांतून होणारं दर्शन. पहिल्या दरवाज्यातून भगवान विष्णूचं मुख आणि छाती, दुसऱ्यातून मध्यभाग, आणि तिसऱ्यातून पाय दिसतात. शेषशायी मूर्ती अठरा फूट लांबीची आहे. मंदिर शांत आहे, देखणं आहे. मन प्रसन्न झालं. फक्त मंदिराची अजून चांगली माहिती मिळाली असती तर मला आवडलं असतं. काय पहायचं आहे ते कळल्याविना कधीकधी गोष्टी दिसत नाहीत, तसंच इथंही झालं.

कुथिरमालिका पॅलेस

कुथिरमालिका पॅलेस पाहताना मला केरळच्या राजेशाही इतिहासाची जिवंत झलक अनुभवायला मिळाली. हा त्रावणकोरच्या राजांचा राजवाडा. पद्मनाभ मंदिराला लागून. संपूर्ण राजवाडा लाकडातून साकारलेला असून छतावर कोरलेल्या घोड्यांचं शिल्प विशेष लक्ष वेधून घेतं. हा राजवाडा महाराज स्वाती तिरुनाळ यांनी बांधला — ते केवळ राजा नव्हते, तर नामवंत संगीतकार आणि कलाप्रेमी होते. या पॅलेसमधील प्रत्येक दालन त्या राजवंशाच्या सौंदर्यदृष्टी, सांस्कृतिक जाणिवा आणि कलाप्रेमाची साक्ष देतं.

राजघराणातल्या विविध वस्तूंचं इथं आता संग्रहालय आहे. इथं आम्हाला माहिती सांगायला स्त्री गाईड होत्या. त्यांनी चांगली माहिती दिली. फोटो काढायला परवानगी नसल्याने लोक पटापट पुढं सरकत होते. इथं आणखी एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली की राजांच्या वंशावळीतले लोक एक छापाच्या चेहऱ्याचे नाहीत. मग लक्षात आलं की राजेपद - थोरल्या मुलाकडं, थोरल्या भावाच्या थोरल्या मुलाकडं ....असं न जाता राजाच्या बहिणीच्या मुलांकडं गेलं. म्हणजे राजेपद मातृवंशीय होतं. त्यामुळे राजांची नावंही वेगवेगळी दिसतात. अर्थात हे माझं एक निरीक्षण, मलाही नीट माहिती नाहीये.

नेपियर संग्रहालय

हे संग्रहालय इ.स. १८५५ मध्ये स्थापन झालं आणि नंतर इ.स. १८८० मध्ये त्याची सध्याची भव्य इमारत बांधण्यात आली. या इमारतीला तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड नेपियर यांचं नाव देण्यात आलं. संग्रहालयात केरळच्या इतिहासाशी निगडित अनेक दुर्मिळ वस्तू जतन केल्या आहेत. यात प्राचीन कांस्य व पितळी मूर्ती, हस्तिदंतावर कोरलेली शिल्पं, पारंपरिक केरळी वाद्यं, शस्त्रास्त्रं, तसंच त्रावणकोर राजघराण्याशी संबंधित वस्तू पाहायला मिळतात. इथं आम्ही निवांत फिरलो आणि मी अनेक फोटोही काढले.

लॉरी बेकर यांच्या संस्थेच्या कार्यालयाचा परिसर

त्रिवेंद्रमला जाते आहेस तर लॉरी बेकर यांचा परिसर पाहून ये – असा एका वास्तुविशारद मैत्रिणीने आग्रह केला होता. माझ्यासोबतच्या मुलांना लॉरी बेकर हे नावही माहिती नव्हतं. त्यामुळे जागा शोधताना आम्ही भटकत राहिलो. एका ठिकाणी पोचलो तर ती स्त्रियांच्या स्वयंसहाय्यता गटाचा उद्योग चालवणारी एक संस्था होती. पाहुणे आलेत म्हणून तिथल्या कार्यकर्त्या जेवण बाजूला ठेवून उठल्या. आता आपण आलोच आहोत इथं, तर हेही पाहूयात म्हणून मग त्यांच्या कामाचीही सविस्तर माहिती घेतली. त्यांनीच मग आम्हाला लॉरी बेकर यांच्या संस्थेच्या कार्यालयाच्या परिसरात कसं पोचायचं ते सांगितलं.

इथं अनिल कुमार नावाचे वरिष्ठ अधिकारी भेटले. लॉरी बेकर जिथं राहिले होते त्या गावातल्या परिसराचा पुनर्विकास चालू आहे असं कळलं. इथं त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे.

लॉरी बेकर हे ब्रिटिश-भारतीय वास्तुविशारद होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधला. पदवीचं शिक्षणही तिथलंच. दुसऱ्या महायुद्धानंतर ते भारतात आले. स्थानिक सामग्रीचा वापर करून (म्हणजेच कमी खर्चात) पर्यावरणस्नेही वास्तु बांधणं हे त्यांचं वैशिष्ट्य. घर, शाळा, हॉस्पिटल, चर्च ... अशा दोन हजारपेक्षा जास्त इमारती त्यांनी बांधल्या. भपकेदारपणा, दिखाऊपणा, आणि खर्च यांना जाणीवपूर्वक नाकारून त्यांनी माणूस, निसर्ग आणि गरज यांना केंद्रस्थानी ठेवलं. १९९० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

इथं पाहिलेली बहुमजली विटांची लायब्ररी मला आवडली. 

कुठलाही भपकेदारपणा नाही — पण नैसर्गिक प्रकाश, हवेशीर रचना आणि विटांचा वापर यामुळे ती जागा अत्यंत जिवंत वाटते. आम्ही तीन मजले चढून गेलो. प्रत्येक मजल्यावरच्या लाकडी फळीवर दणादण पाय आपटून पाहिले (अनिल कुमार यांच्या सुचनेनुसारच ते केलं) आणि इमारत अतिशय भक्कम आहे असं लक्षात आलं. प्रत्येक मजल्यावर राहण्याची एकेक खोलीही आहे, तिथं प्रशिक्षणार्थी राहतातही. काहीतरी नवं पाहिल्याचा आनंद वाटला.

तिथून निघताना विश्वनाथ आणि मेघन म्हणाले, बापरे, आपल्या आत्त्याने (की मामाने) ते नवं होम-स्टे केलंय तिथं तर सगळ्या काचा बसवल्यात, त्याऐवजी असं विटांचं बांधकाम करायला पाहिजे होतं ना.... ते ऐकून मला बरं वाटलं. प्रत्यक्षात बदल करणं कदाचित आत्ता त्यांच्या हातात नाही, पण काही चांगले पर्याय आहेत इतकं त्यांच्या लक्षात येणंही महत्त्वाचं आहे.

दिवसभर भरपूर पायपीट झाली होती. आम्ही सगळेच दमलो होतो. तरी घरी परत येईतोवर चार वाजून गेले होते.

कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणी छान वेळ गेला. आठवडाभर खूप निवांतपणा मिळाला. समुद्राचा सहवास मिळाला. काही नव्या गोष्टी पाहिल्या. नवी-जुनी माणसं भेटली. काही जुन्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला – जो आवश्यक होता. केवळ माणसंच नाही तर जागाही आपल्याला घडवत असतात. केरळ-तामिळनाडूची मी त्यासाठी कायमच ऋणी राहीन.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्रिवेंद्रम स्थानकावर जाऊन पुण्याकडं जाणारी ट्रेन पकडली. त्रिवेंद्रमचा निरोप घेताना मी पुन्हा येईन😊 असं मी स्वत:ला आणि तामिळनाडू-केरळ यांनाही सांगितलं 😊  प्रत्यक्षात येणं होईल - न होईल, पण याही दिवसांच्या आठवणी सोबत राहतील याची मला खात्री आहे.


ही लेखमालिका समाप्त. 

 

Monday, September 29, 2025

२७८. कन्याकुमारी परिसर भटकंती

(English translation of this post is available here.)

भाग २ विवेकानंदपुरम 

दुपारी कन्याकुमारीला पोचल्याने पहिल्याच दिवशी विवेकानंद शिला स्मारकावर (इथून पुढं सोयीसाठीयाचा उल्लेख आपण “रॉक” असा करुया) जाण्यात अर्थ नव्हता. म्हणजे जाता आलं असतं. पण जायला उशीर झाल्याने तिथं जास्त वेळ थांबता आलं नसतं. म्हणून मग पहिल्या दिवशी अगदी निवांत भटकले ती विवेकानंदपुरममध्ये.  

पहिल्या दिवशी दुपारीही आंघोळीला गरम पाणी मिळालं होतं याचं आश्चर्य वाटलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी काही ते मिळालं नाही. स्वागतकक्षात गीझर दुरुस्तीसाठी किल्ली ठेवायला गेले. तर ते लोक 'खोलीची किल्ली ठेवून घेत नाहीत' असं कळलं. दिवसभर इकडंतिकडं भटकताना खोलीची किल्ली आपण सांभाळायची हे मला संकटच वाटतं. पण असो. त्यांनी इलेक्ट्रिशिअनला फोन केला. तो "पाच मिनिटांत येतो" असं म्हणाला खरा. पण पाच मिनिटांत भारतात खरोखर कुणीच येत नाही. पंधरा मिनिटं वाट पाहून मी तिथल्या बसने रॉककडं निघाले.  

बसची वाट पहात असताना त्रिसुर (Thrissur, पूर्वीचं त्रिचूर)  इथलं एक ज्येष्ठ नागरिक जोडपं भेटलं.  गेली काहीवर्ष  ते नियमितपणे कन्याकुमारीला (वार्षिक) भेट  देत  आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या.

पुढचे दोन दिवस ते भेटत राहिले. सौम्य  बोलणारे  आजी- आजोबा होते ते. आजी बोलायच्या कमी.  आजोबा आपले हसून मला रांगेत पुढं जाण्याची जागा वगैरे  द्यायचे, कॉफी घेणार का विचारायचे.  भारतात एकंदर अनोळखी लोकांबद्दलसुद्धा सर्वसाधारणपणे गत्य असतं असा माझा अनुभव आहे. 

मग तो  उत्तरेत जा, की दक्षिणेत, पूर्वेला जा की पश्चिमेत.

विवेकानंदपुरममध्ये फारशी गर्दी नव्हती. तसा जुलै महिना म्हणजे शाळा-कॉलेज सुरु असण्याचे दिवस, त्यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नाही हे समजण्याजोगं होतं. त्याच अंदाजाने मी रॉकला जाण्यासाठी पोचले आणि आपला गर्दीबाबतचा अंदाज सपशेल चुकल्याचं माझ्या ध्यानी  आलं. 

                             

तिथं लोक दोन वेगळ्या रांगांमध्ये उभे होते. सुरक्षारक्षक गर्दीचं व्यवस्थापन करत होते. त्यांच्यापैकी एकाला विचारल्यावर कळलं की एक रांग शंभर रूपये प्रवेशशुल्कवाल्यांची आहे, तर  दुसरी तीनशे रूपये प्रवेशशुल्कवाल्यांची. हे प्रवेशशुल्क बोटीने (समुद्रातल्या) स्मारकापर्यंतच्या  जाण्या-येण्याच्या प्रवासाचं आहे.  मी २०११ मध्ये इथं आले होते, तेव्हा अशा वेगळ्या रांगा नव्हत्या. प्रवेशशुल्कही फक्त पन्नास रूपये होतं. महागाई वाढल्याने प्रवेशशुल्कात झालेली वाढ समजू शकते.  पण दोन रांगा? 

अर्थात श्रीमंताना पर्यटनस्थानी, तीर्थक्षेत्री, देवळांत जास्त पैसे देऊन अशी खास सेवा मिळावी यात  नवीन काही नाही म्हणा. समतेचा उद्घोष करणारे विवेकानंद आणि मानवी एकतेचा संदेश देणारे तिरूवल्लुवर यांच्या स्मारकाला भेट देताना भेदभावाचा असा अनुभव यावा - आपला समाज किती  निर्ढावलेला दांभिक आहे हेच यातून कळतं.

अर्थात हा निर्णय पुम्पुहार शिपिंग कॉर्पोरशनचा म्हणजे पर्यायाने तामिळनाडू सरकारचा आहे. रांगेत उभं राहायचं नसेल, तर ऑनलाईन तिकिट काढून जाण्याचीही व्यवस्था आहे,  पण ते मला आधी माहिती नव्हतं. नंतर शोध घेतल्यावर कळलं की दुहेरी शुल्क व्यवस्था अगदी  अलिकडंच म्हणजे ५ जून २०२५ पासून सुरू झाली आहे.  लोकांना वेळ वाचवण्याची फार हौस असते. त्यामुळे जास्त पैसे खर्च करून लोक वेळ वाचवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. ही तीनशेची रांग  राहणार तर. नेहमीसाठीच.

मी अर्थातच शंभर रुपयेवाल्या रांगेत उभं राहिले. एखाद्या देशाची संस्कृती जाणून घ्यायची असेल तर 
त्या देशातल्या एखाद्या सामान्य रांगेत काही काळ उभं रहायला हवं.  अशा रांगामध्ये एक प्रकारचं अफात समाजदर्शन घडतं. जितकी लांब रांग, तितके  अनुभव अधिक. आपण फक्त ऐकायचं आणि पाहायचं, व्यक्त व्हायचं नाही. मी कुणाच्याही खाजगी अवकाशात हेतूत: डोकावत नव्हते तरी त्यांचे आपापसातले संवाद माझ्या कानांवर पडत होतेच. 

रांग पुढं सरकत नसतानाही माणसं पुढं सरकायचा प्रयत्न करत होती, विनाकारण एकमेकांना  धक्काबुक्की करत होती. एक माणूस उभा आहे, पण रांग सरकायला लागली की त्याचे पाच ते दहा लोक रांगेत सामील होणं हेही होतंच. त्याबद्दल काही बोलायची सोय नव्हती. मोबाईलवर लोक मोठमोठ्याने बूोलत होते. लहान मुलं खाण्याचा- ज्यूस पिण्याचा हट्ट करत होते. लोक आपापसात भांडतही होते.   

गोंगाट,कलकलाट हे आपल्या समाजाचं वैशिष्टय आहे. आपल्या देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे हे घराबाहेर पडलं की जाणवतंच. त्यात तो शनिवारचा दिवस असल्याने गर्दीला उधाण आलं होतं. तेवढ्या रांगेतही कॉफी विक्रीचा एक ठेला होता. मग कॉफी आणि चहा सांडणं वगैरेही ओघानचं आलं. रांग  थोडी पुढं गेल्यावर ठिकठिकाणी बसायला दगडी बाक आहेत. वृद्ध लोकांचं मी समजू शकते, पण  लहान (दहा ते बारा वर्षांची)  मुलंमुलंही दमून ठिकठिकाणी बाकावर बसत होती ते मात्र चिंताजनक  वाटलं.

एकदा बोट निघाली आणि हा सगळा त्रास विसरायला झाला. समुद्राच्या लाटांवर बोट हेलकावे खाताना वाहणारा गार वारा ......... समुद्राची ही विलक्षण जादू असते. रॉक किनाऱ्यापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रवास सुरू होतो ना होतो तो संपतो.

या स्मारकाचं महत्त्व, त्याचा इतिहास, त्याची रचना याबाबत पुरेशी माहिती सार्वजनिक रीत्या उपलब्ध आहे, त्यामुळे त्याबद्दल  काही लिहिणार नाही.

शिला स्मारकावर अफाट गर्दी होती. स्मारकाचा कोपरा ना कोपरा सेल्फी अथवा ग्रुप फोटो घेणाऱ्या  गर्दीने व्यापलेला होता. हल्ली सगळीकडं हेच चित्र आहे. कुठलीही विशेष गोष्ट माणसांविना पाहताच  येत नाही. पर्यटन करायचं म्हणजे फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियावर लगोलग टाकायचे अशी  एक नवी प्रथा रूढ होते आहे.

मला शिला स्मारकावरचे ते दिवस आठवले की जेव्हा तिथं कॅमेरा न्यायला परवानगी नव्हती. तेव्हा  सगळं कसं निवांत पाहता यायचं, अनुभवता यायचं. मोबाईल अनेकांच्या हाती आल्यावर “कॅमेरा  नेण्यास परवानगी न देणं” याला काही अर्थ राहिला नाही, त्यामुळे तो नियम रद्द करण्यात आला  असावा. विवेकानंद मंडप आणि ध्यानमंदिरात जाऊन आल्यावर रॉकवर एखादं ठिकाण पकडायचं,  समुद्राच्या लाटा आणि त्याचे रंग पाहायचे, भणाणता वारा अनुभवायचा ....  हे मात्र या गर्दीत अजूनही साधता येतं हे चांगलं आहे. मजा आली.

नंतर मी मोर्चा वळवला तो तिरूवल्लुवर स्मारकाकडं. विवेकानंद शिला स्मारकाचं उद्घाटन २ सप्टेंबर १९७० या  दिवशी झालं. त्यानंतर जवळजवळ तीस वर्षांनी त्याच्या शेजारीच उभारण्यात आलेल्या  तिरूवल्लुवर पुतळ्याचं उद्घाटन झालं. (१ जानेवारी २०००). रॉकसाठी तीस रूपये प्रवेश फी आहे.  तिरूवल्लुवर स्मारकासाठी वेगळं प्रवेश शुल्क नाही. सुरुवातीच्या काळात दोन्ही स्मारकांवर बोटीने जावं लागायचं. आता मात्र या दोन्ही स्मारकांना जोडणारा काचेचा पूल आहे. पर्यटकांसाठी आणखी  एक  आकर्षण


तिरूवल्लुवर हे महान संत होते. त्यांचं स्मारक कन्याकुमारीच्या समुद्रात बनणं हा त्या महापुरुषाप्रति आदर व्यक्त  करण्याचा एक  चांगला मार्ग आहे. पण दोन्ही स्मारकांकडं पाहताना असं जाणवतं की  तिरूवल्लुवर यांचं स्मारक अधिक प्रमाणबद्ध बनवता आलं असतं. रॉकवरच्या विवेकानंद मंडपाची उंची सुमारे पंचावन्न फूट आहे. त्या तुलनेत शेजारच्या रॉकवरचा १३३  फूट उंचीचा तिरूवल्लुवर यांचा पुतळा फारच अवाढव्य वाटतो.  तो थोडा कमी उंचीचा बनवला  असता तरी चाललं असतं.  पण जगातला सर्वात उंच पुतळा बनवण्याची स्पर्धा आपल्याला कितीही  मानवत नसली तरी चालू  आहेच म्हणा.  अर्थात या उंचीचं एक स्पष्टीकरणही आहे. तिरूक्कुरल  या तिरूवल्लुवरलिखित ग्रंथात १३३ अध्याय आहेत. म्हणून त्यांच्या पुतळ्याची उंची १३३ फूट आहे.

रॉकवरून तिरूवल्लुवर पुतळा पाहणं आणि तिरूवल्लुवर पुतळ्यावरून विवेकानंद रॉक पाहणं हा  एक आनंददायी अनुभव होता. मजा आली.

                           
परतीच्या रांगेतही दोन लोक घुसले, त्यावरुन  लोकांची आपापसात जोरदार भांडणं झाली. "हम इसमें कुछ नहीं बोलेंगे, याद रखना" असं एक तरुण त्याच्या मित्रांना म्हणाला. ते माझ्या मागेच उभे होते, मग त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की तो नेपाळच्या शिक्षकांचा एक गट होता. दर सुट्टीत ते भारतात फिरायला येतात. महाराष्ट्रातही ते येऊन गेले आहेत. माझ्या पुढं सोलापूरचं एक तेलगु भाषिक कुटुंब होतं.  त्यांच्याशीही गप्पा झाल्या.  या रांगतेही सुमारे दोन तास उभं राहावं लागलं. पण समुद्राची सोबत असल्याने दोन तास कसे गेले ते कळलं नाही. 

मी कन्याकुमारी परिसरातल्या इतरही काही ठिकाणांना भेट देण्यासाठी रानडे टूर्स अँड ट्रॅवल्स  यांच्याकडं अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी नोंदणी केली. शुल्क केवळ दोनशे रूपये होतं.

या सहलीत कन्याकुमारी परिसरातल्या काही ठिकाणांना भेट दिली. मेणाचं संग्रहालय, तिरूपती वेंकटचलपती मंदिर, साईबाबा मंदिर, सुचिंद्रम इथलं ब्रह्मा-विष्णू-शिव मंदिर, संगीत-कारंजं, आणि सूर्यास्त पाहिला. एकूण या सहलीला तसा फारसा काही अर्थ नव्हता. कारण माहिती सांगणारं कुणी सोबत नव्हतं. बसचा चालक गाडी थांबवायचा, आणि “तीस मिनिटांत परत या” असं आम्हाला सांगायचा. अशा  सहलींना मी का जात नाही हे माझ्या  पुन्हा एकदा लक्षात आलं. पण निदान या निमित्ताने  या स्थळांची प्राथमिक माहिती तरी झाली.

मेणसंग्रहालयात काही मूर्ती छान जमल्या होत्या. मला सुब्बुलक्ष्मी यांची ही मूर्ती आवडली.

इथं 'त्रिमिती चित्र' (3D painting) असा एक अफलातून प्रकार होता.  म्हणजे जमिनीवर काढलेली चित्रं होती. त्यात आपण योग्य त्या स्थानावर बसून फोटो काढला तर वाघ आपल्या पाठीशी आहे, किंवा हत्ती सोंडेने आपल्या अंगावर पाणी उडवतोय ... असे फोटो आले. मजेदार प्रकार होता तो. मला आवडला. त्रिमिती चित्र ही केरळची पारंपरिक कला आहे असं तिथल्या अम्मा म्हणाल्या.   

तिरूपती वेंकटचलपती मंदिराची वास्तू भव्य आणि सुंदर आहे. त्याच्या चौथऱ्यावरून दिसलेला समुद्र अद्भुत होता. असं वाटलं की इथंच बसून राहावं. 

साईबाबा मंदिरात भली मोठी रांग होती. या परिसरातल्या सर्वच धार्मिक वास्तू उंच चौथऱ्यावर उभ्या आहेत असं लक्षात आलं. हेही देऊळ स्वच्छ होतं. पण हे काय, आणि वेंकटचलपती मंदिर काय - ही अशी आधुनिक देवळं मनाला तितकीशी भावत नाहीत. कार्पोरेट कार्यालयीन इमारतींसारखी ती झगझगीत वाटतात. या देवळाच्या बाहेरच्या खाद्यगृहावर चार भाषांत लिहिलेली पाटी होती, ते पाहून छान वाटलं.


आणि आर्थिक हितसंबंध असतील तर कुठल्याच भाषिक, सांस्कृतिक अस्मिता टोकदार रहात नाहीत असंही वाटलं.   

सुचिंद्रम (शुचिंद्रम) मंदिर अतिशय भव्य आहे. इथं मी पूर्वी येऊन गेले होते, म्हणून मला थोडीफार माहिती होती. अन्यथा मार्गदर्शकाविना या मंदिराचं महत्त्व समजणं अवघड आहे. स्थानुमलयन (किंवा थानुमलयन) असं या मंदिराचं नाव आहे. स्थानु म्हणजे शिव, मल म्हणजे विष्णु, आणि अयन म्हणजे ब्रह्मा. ब्रह्मा-विष्णु-महेश यांचं हे मंदिर आहे.

इंद्राने गौतम ऋषिंच्या वेषात येऊन गौतमपत्नी अहिल्येला फसवून तिचा उपभोग घेतला अशी ब्रह्मवैवर्त आणि पद्मपुराणात एक कथा आहे. गौतम ऋषि इंद्राला शाप देतात. दुसऱ्या एका लोककथेनुसार  ब्रह्मा-विष्णु-महेश हे सती अनुसया यांची परीक्षा घ्यायला येतात तेव्हा ती त्या तिघांना बालकरूप देते. (आता या कथेचा मागोवा घ्यायचा तर फारच मजेदार बाबी समोर येतात, पण ते असो.) ही घटना घडली ते हे ठिकाण. गौतमाच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने या स्थानी ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रिमूर्तीची प्रार्थना केली. शापातून मुक्त झाल्यावर इंद्राने या स्थानी हे मंदिर बनवले अशी कथा आहे. शापातून इंद्र मुक्त्त झाला, इंद्र शुद्ध झाला म्हणून हे शुचिंद्रम.

या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं आतमध्ये संगीत-खांब आहेत. या खांबांवर प्रहार केल्यास सारेगम ... निर्माण होते. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही, पण बाहेरून दिसणारं मंदिराचं हे चित्र त्याची भव्यता सांगतं. मंदिराबाहेरची पुष्करणीही मोठी आहे.



कन्याकुमारीमधून सूर्योदय अनेकदा पाहिला आहे, पण सूर्यास्त मात्र पहिल्यांदाच पाहिला. समुद्रकिनारा वेगळा आहे हा. खूप गर्दी होती. आणि खरेदी, खाणं यांच्या सोबतीने जमेल तितका सूर्यास्त पाहणारे लोक सभोवताली होते. तिथले बोल्डर्स आणि मेरीचा मोठा (मोठाच, दुसरं काय!) पुतळा पाहून मी जरा चकित झाले. या किनाऱ्यावर पुन्हा एकदा निवांत आलं पाहिजे.

एकंदर तशी ही सहल वरवरची झाली. आता पुन्हा कधी गेलेच तर काय पूर्वतयारी करून जायचं आणि सोबत कुणा स्थानिक मार्गदर्शकाला घेऊन जाण्याची गरज - या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. परिसरातलं अजून किती पाहायचं राहिलं आहे हेही लक्षात आलं. 

या सगळ्या ठिकाणांमधून फिरताना जाणवलं की कन्याकुमारी केवळ यात्रेचं ठिकाण नाही. 

ते केवळ स्मरणरंजनाचं ठिकाण नाही.

तर ते एक कोलाज आहे. शिल्पं आणि मेणाचे पुतळे, मंदिरं आणि समुद्रकिनारे, ध्यान आणि Music  Fountain. विवेकानंदपुरममधल्या शांततेनंतर शहराने त्याचं बहुरंगी रूप दाखवलं. 

दर भेटीत हे जुनं शहर माझ्यासाठी नवं काहीतरी घेऊन येतं.  

म्हणूनच मी वारंवार इथं  येते. ठिकाणं पुन्हा पाहायला नाही, माणसांना भेटायला नाही. 

तर माझ्या आतल्या वेगवेगळ्या बाजू पुन्हा एकदा शोधायला. 

त्यामुळे “ही माझी कन्याकुमारीची शेवटची भेट” असं मी स्वत:ला सांगितलेलं असलं तरी कदाचित कन्याकुमारीत पुन्हा जावं लागेलही ...


पुढचा आणि अखेरचा लेख लवकरच ....