ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts
Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts

Friday, January 3, 2014

१८४. सावित्रीच्या लेकी ....

३ जानेवारी. सावित्रीबाई फुले यांची जयंती.

“फुले वाड्यापासून दुचाकी फेरी आहे सकाळी. जाणारेस का?” एका ज्येष्ठ कार्यकर्तीशी फोनवर बोलताना त्यांनी विचारलं.

दोन अडचणी होत्या यात.

एक तर काय मोर्चे, फे-या काढायच्या आहेत त्या चालत काढाव्यात – असं माझं मत असल्याने मी असल्या इंधन जाळणा-या फे-यांत कधीच सहभागी होत नाही.
दुसरं म्हणजे आयोजक संस्था होती: ‘राष्ट्र सेवा दल’. या संस्थेची माहिती असली तरी माझा थेट संबंध कधी आला नव्हता.

पण भोवतालचे सगळे विचार पूर्वग्रह न ठेवता जाणून घ्यायचे आणि जे जे चांगलं वाटतं त्यात ‘डाव्या की उजव्या विचारसरणी’चं आहे याची चिकित्सा न करता सामील व्हायचं असं माझं गेली अनेक वर्ष धोरण आहे. तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात. हे मी पुरेशी मध्यममार्गी असल्याचं द्योतक आहे अशी मी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे स्वत:ची.

मुख्य म्हणजे यावेळी नाव सावित्रीबाईचं होतं – जे माझ्यासाठी वादातीत आहे.

कधी नव्हे ती मी  ३ जानेवारीला पुण्यात होते, शिवाय त्या निमित्ताने फुले वाड्यात जाणं होईल असं एक आकर्षण मनात होतं. नुकत्याच ओळखी झालेल्या काही मैत्रिणी तिथं भेटायची शक्यता होती.

‘एक अनुभव घेऊन पाहावा’ म्हणून जायचं ठरलं. मग पहिला शोध ‘फुले वाड्यात कसं पोचायचं’ तो घेतला. तीन सुहृदांनी तीन वेगळे मार्ग सांगितले आणि गुगल नकाशाने चौथा रस्ता दाखवला. वाटेत जिथं रस्त्याबाबत मनात शंका येईल, तिथं थांबून लोकांना विचारायचं ही नेहेमीची पद्धत अवलंबली. चहा-नाश्त्याची एक गाडी, एक सायकलस्वार, एक रिक्षावाला आणि शाळेत जाणारी एक मुलगी – इतक्या लोकांना विचारत मी गेले आणि थेट वाड्यात पोचले. त्यांच्यातलं कुणीही ‘कोण फुले, कुठला वाडा’ असं विचारलं नाही, सगळ्यांना ‘फुले वाडा’ माहिती होता; हे खूप बरं वाटलं.  ‘कच-याची पेटी दिसली की त्या बोळात वळा’ ही एकाने सांगितलेली खूण अचूक निघाली आणि त्याचा विषादही वाटला.

एका गावात किती गावं असतातं, एका जगात किती जगं असतात - याचं पुन्हा एकदा दर्शन झालं. रस्ता, तिथली घरं, सार्वजनिक नळावर कपडे धुणा-या स्त्रिया, अंगणात चुलीवर तापवलं जाणारं पाणी – असं वाटलं की काळ या वस्तीसाठी पुढे सरकलाच नाहीये.


वाड्याचं पाहिलं दर्शन लोभस होतं.



मी आधी इथं कधी आले होते ते मला आठवत नव्हतं इतकी ऐतिहासिक गोष्ट आहे ती. आज समारंभाचं वातावरण होतं. सनईचे सूर मन प्रसन्न करून गेले. मस्त रांगोळी होती. वाडा आत शिरून बघता आला नाही. अनेक स्त्रिया आणि मुलींचे गट तिथं येत होते, सावित्रीबाई आणि जोतिबांना अभिवादन करत होते. लहान मुली ‘सावित्री’च्या  वेषात पाहून आधी गंमत वाटली – नंतर, अशा अनेक मुली पाहिल्यांनातर  मात्र ही एक ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा आहे की काय अशी शंका आली.



दुचाकी यात्रेचा अनुभव पुण्यातल्या (किंवा खरं तर कोणत्याही शहरातल्या) ‘ट्रॅफिक जाम’च्या अनुभवासारखा होता – म्हणजे दुचाकी अत्यंत सावकाश चालवावी लागत होती. पोलिसांचं सहकार्य चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे सकाळची वेळ असल्याने वाहनंही तुलनेत कमीच होती रस्त्यावर. जाता जाता अखंड घोषणाही होत्या. ‘सावित्रीच्या लेकी आम्ही, आता मागे राहणार नाही’; ‘आवाज कुणाचा, सावित्रीच्या लेकींचा’ यासारख्या नव्या घोषणांच्या (माझ्यासाठी नव्या) सोबत  ‘हम सब एक है’ ‘बघताय काय, सामील व्हा’ या युगचिरंतन घोषणाही होत्या. एका अर्थाने सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळी यांच्यात भाषेची बरीच देवाणघेवाण झाली आहे हे या निमित्ताने लक्षात आलं.

पुण्यात सकाळी दहाच्या आत दुकानं उघडत नाहीत – हे सत्य आज पुन्हा एकदा लक्षात आलं. रस्त्यावर फारसे लोक नसल्याने जनजागरणाचा हेतू कितपत साध्य झाला हे मला सांगता येणार नाही. पण एक दोन चौकात स्थानिक लोकांनी आमचं स्वागत केलं – आमच्यावर फुलं उधळून; एका ठिकाणी मुलींच्या लेझीम पथकाचा जोष होता स्वागताला  – तेव्हा सगळं काही अगदीच वाया गेलं नसणार हे नक्की.

अचानक आम्हाला ‘गाड्या रस्त्यावर लावा आणि इकडे या’ असा आदेश मिळाला. तो होता ‘भिडे वाडा’ – जिथे फुले दाम्पत्याने पहिली शाळा चालवली.


हा एक संघर्ष असतोच नेहमी – जुनं काय टिकवायचं, काय काळाच्या ओघात नामशेष होऊ द्यायचं. इमारत टिकवायची का नाही या मुद्द्यावर स्थानिक लोकांची मतं बाहेरच्या लोकांपेक्षा वेगळी असतात हे दिल्लीत अनेकदा अनुभवलं  आहे. इथल्या स्थानिक लोकांचं काय मत आहे ते मला माहिती नाही – एकदा गेलं पाहिजे त्या परिसरात आणि लोकांशी गप्पा मारायला पाहिजेत अशी मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली.

मग आम्ही गेलो ते थेट पुणे विद्यापीठात. या विद्यापिठाला ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ असं नाव देण्याला मान्यता मिळाली आहे – पण अजून ते दिलं गेलं नाही. आदर्श भूमिका घ्यायची तर व्यक्तींची नावं विद्यापीठांना देऊ नयेत असं मी म्हणेन. पण एकदा ‘जवाहरलाल नेहरु विद्यापीठ’ असं नाव एका विद्यापीठाला दिल्यावर हा आदर्श पर्याय राहत नाही आपल्याला. मग काही ठराविक नावं पुन्हा पुन्हा देशात सगळीकडं दिसत राहणार आणि काही नावं आली की मात्र लोक ‘पण नामांतर करून विद्यापीठाचा दर्जा सुधारणार आहे का’ असे प्रश्न विचारतात याचा खेद होतो. नामांतर हा एक संवेदनशील विषय आहे; त्याची हाताळणी सरधोपट पद्धतीने करून आपण विषय अधिक अवघड कसा बनवून घेतो – हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलंय.

पुणे विद्यापीठातही मी ब-याच वर्षांनी गेले. मला तरी विद्यापीठ परिसर बराच उजाड आणि म्हणून उदास वाटला (अर्थात हे माझं वय झाल्याचं लक्षण – बाकी काही नाही!) तिथं गाड्या लावून सगळे जमलो तेव्हा मला एका गोष्टीचा सुखद धक्का बसला. तो म्हणजे ‘तरुणाई’ची उपस्थिती. इतका वेळ गाडी चालवत असल्याने (समोर पाहून!) सोबत नेमके कोण लोक आहेत याचा अंदाज नव्हता. पण अनेक तरुण मुलं-मुली सोबत आहेत, त्यांना सावित्रीबाईंच्या कार्यांचं महत्त्व माहिती आहे हे पाहून बरं वाटलं. समाजात प्रश्न नेहमीच राहतील; जुने संपले तर नवीन उभे राहतील – पण जोवर नवी पिढी परिवर्तनाच्या कामात सहभागी होते आहे (आणि ती अनेक ठिकाणी होते आहे) तोवर फार चिंता करायचं कारण नाही.

आम्ही परत निघालो आणि आम्हाला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर थांबायला सागितलं. दोन मिनिटांत तीनचार मुलं-मुली प्रवेशद्वारावर चढली आणि तिथं त्यांनी कापडी फलक झळकावला.


त्यांच्या दृष्टीने विद्यापिठाचं नामांतर आज झालंय. त्याचा आनंद तिथल्या जमलेल्या सगळ्यांच्या चेह-यांवर स्पष्ट दिसत होता.

त्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाली, पोलीस आले. आता काही अपप्रकार तर होणार नाही ना अशी एक शंका मनात आली. पण पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली. प्रवेशद्वारात अडकलेल्या नागरिकांनीही संयम दाखवला त्यामुळे वातावरणात ताण निर्माण झाला नाही.

आम्ही परत आलो ते ‘साने गुरुजी स्मारका’ वर. इथं सेवा दलाच्या काही कार्यकर्त्यांशी ओळख झाली, गप्पा झाल्या. मग पुढचा दिवसभराचा कार्यक्रम चालू झाला पण मी तिथून निघाले.

काय ठरवून?

एक तर फुले वाड्याला सवडीने भेट दिली पाहिजे. आता कुणी ‘पुण्यात काय आहे पाहायला’ विचारलं तर हा वाडा पाहायला सागितलं पाहिजे.

दुसरं म्हणजे जोतीबांची ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतक-याचा आसूड’ ही दोन पुस्तकं केव्हापासून वाचायची पडली आहेत – ती लगेच वाचायला घेतली पाहिजेत.

तिसरं म्हणजे ‘राईट टू एजुकेशन’ चा थोडा अधिक अभ्यास केला पाहिजे.

चौथं – दुर्गम भागातल्या किमान एका तरी मुलीच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेतली पाहिजे.

पाच – सोमवारी ६ जानेवारीला सुषमा देशपांडे यांचा ‘व्हय मी सावित्रीबाई’ हा प्रयोग एसएम जोशी फौंडेशनला संध्याकाळी साडेसहा वाजता आहे; हे ओळखीच्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे.

पुन्हा मी कधी अशा ‘दुचाकी फेरीत’ सामील होईन अशी शक्यता कमीच आहे. पण आज मी गेले ते चांगलं झालं इतकं नक्की. ‘सावित्रीच्या लेकी’ स्वत:ला म्हणवून घेण्यासाठी अजून बरंच काही करायला हवंय आम्ही आपण सगळ्यांनी!

Thursday, August 19, 2010

४०. पाचवी सावित्री

सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.
पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.

एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.  

मृत्युशी गप्पागोष्टी करत स्वत:च्या हुषारीने सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी सावित्री. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: करणारी, बाह्य गोष्टींपेक्षा स्वत:च्या सहचराचे आंतरिक गुण पाहणारी, यमाशी न घाबरता संवाद करणारी सावित्री. तिचे हे सगळेच गुण विलक्षण वाटत लहानपणी; आणि खरे तर अजूनही.

पण कधीकधी असेही वाटते की परिस्थितीपुढे एवढी शरणागती पत्करणे हे सावित्रीने का स्वीकारले असेल? तिच्या स्वत:त असामान्य क्षमता असतानाही? काहीही करून, तडजोड स्वीकारून लग्न केलेच पाहिजे या मानसिकतेतून तिला बाहेर का पडता आले नाही? कदाचित काळाच्या फार पुढे कोणालाच जाता येत नाही हेच तात्पर्य याही कथेतून द्यायचे असेल त्या काळच्या समाजधुरिणांना!

शिवाय यमाकडून सावित्री जे तीन वर मागते तेही जरासे मजेदार आहेत. पहिला वर सावित्री मागते तो सास-याची दृष्टी परत येऊन त्याचे राज्य त्याला परत मिळावे हा. दुस-या वरानुसार स्वत:च्या पित्याला शंभर मुलगे व्हावेत अशी ती मागणी करते. तिस-या वरानुसार सत्यवानापासून तिला स्वत:ला शंभर मुलगे व्हावेत असे ती मागते. यमासारख्याकडून हुषारीने स्वत:च्या मागण्या मान्य करून घेणे हे नि:संशय वादातीत कौशल्य आहे. पण यात सावित्री स्वत:च्या बाईपणाला कमी लेखते असे वाटत राहते नेहमीच मला ही गोष्ट वाचताना! मागून मागायचे, तर स्वत:सारखी एखादी तरी मुलगी तिने मागायला हवी होती अशी हळहळ मला लहान वयात वाटत असे. सावित्रीचा सगळा लढा वैयक्तिक स्वरूपाचा होता - जरी तो तेजोमय असला तरी व्यक्तिगत स्वरूपाचा होता हे जाणवते.

सावित्रीच्या गुणांची झलक परिस्थितीशी हसतमुखाने दोन हात करणा-या अनेक स्त्रियांकडे पाहताना आजही मिळते. स्वत:ला कमी लेखून कुटुंबाचे भले करण्यासाठी कितीतरी असंख्य स्त्रिया स्वत:ची हुषारी खर्च करत असतात. ते करत असताना त्या स्वत:ला कमी लेखण्यात त्यांची ताकद खर्च होते. महाभारतात वर्णन केलेली अशी सावित्री खरोखर होऊन गेली असेल, ती केवळ कविकल्पना नसावी असे भक्कमपणे वाटावे इतक्या स्त्रिया - समाजातल्या अनेक घटकांतील, वयोगटातील, आर्थिक परिस्थितीतल्या स्त्रिया मला पाहायला मिळाल्या.

दुसरी सावित्री म्हणजे जोतिबांच्या बरोबरीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी! हिचा लढा वेगळाच होता. ती यमाला इतर सर्व मर्त्य माणसांसारखीच सामोरी गेली. पण समाजाला सामोरी जाताना मात्र त्या आधीच्या सावित्रीचा तेजाचा वसा तिने चालवला. भारतातल्या स्त्रियांच्या पहिल्या शाळेची पहिली शिक्षिका, अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा चालविणे, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरची विहीर खुली करणे, विधवेचे मूल दत्तक घेणे असे कितीतरी ’पहिले’ प्रयत्न या स्त्रीने केले. त्यात तिला तिच्या पतीची जोतिबांची साथ होती, किंबहुना त्यांची प्रेरणाही होती हे आहे. पण त्या काळात एका स्त्रीने समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतका सक्रिय पुढाकार घेणे हे असामान्यपणाचे लक्षण होते यात शंकाच नाही. जे इतर कोणाला सुचू नये ते सुचणे, इतकेच नाही तर इतरांचा विरोध असताना ते काम आयुष्यभर सातत्याने आणि निष्ठेने करत राहणे हे विलक्षणच आहे. त्या काळात ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ चालवणे हा क्रांतीकारक कार्यक्रम होता. सामाजिक काम करत असताना तिने कविताही लिहिल्या. आधुनिक मराठी कवितेतला तिचा वाटा अगदी नगण्य मानता येणार नाही. १८४८ म्हणजे आता फार जुना काळ वाटतो, पण त्या काळच्या वर्तमानाचे चटके सावित्रीबाईंनी सोसले.

जोतिबांच्या निधनानंतर शेतकरी कामकरी वर्गाकरता विचारांचे आणि संधींचे नवे दालन उघडणा-या ’सत्यशोधक समाजाची’ धुरा सावित्रीने यशस्वीपणे सांभाळली. शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे काम करत असताना या सावित्रीची दृष्टी अधिक व्यापक होती, त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता असे जाणवते. ’स्व’ विस्तारला की काय होते याचे चित्र या सावित्रीच्या आयुष्यात दिसून येते. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची, काळाच्या पुढे जाऊन कृती करण्याची एक नवी परंपरा या सावित्रीने निर्माण केली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सत्यवानाच्या सावित्रीइतकीच हीदेखील तेजस्वी आणि स्वयंपूर्ण होती - पण हिच्या तेजाचा अविष्कार दीनदुबळयांसाठी होत राहिला, स्वत:साठी नाही.

काही वर्षांपूर्वी तिसरी एक सावित्री भेटली. ती म्हणजे पु.शि. रेगे यांची सावित्री. त्यात पहिल्या वाचनात खरे तर सावित्रीपेक्षा ’मोर यावा’ म्हणून आजीजवळ हट्ट करणारी, ’मी येईन तेंव्हा आधी लच्छीनं नाचलं पाहिजे’ ही मोराची अट लक्षात ठेवून सदैव आनंदात राहणारी आणि त्या ओघात मोराचे भान न उरणारी लच्छी जास्त भावली होती. पुढे कधीतरी त्या कथेचा  ’म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपणच व्हायचं’ असा अर्थ लावणारी सावित्री वेगळीच आहे हे जाणवलं आणि तिच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली.

रेगेंची सावित्री आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही तिच्यासारखी स्वगतात्मक पत्र लिहायला आवडतात. पूर्वी पत्र लिहायचे; आजकाल ई-मेल लिहिते मी, इतकाच काय तो फरक! शिवाय असा मनमोकळा संवाद साधायला समोरच्या माणसाची आणि आपली फार ओळख असायला पाहिजे असा माझा कधीच आग्रह नसायचा, आजही नसतो. किंबहुना जोवर ओळख कमी असते तोवरच मनमोकळा संवाद होतो, असा माझा अनुभव आहे .असो.  हा अतिशय वादाचा मुद्दा होऊ शकतो याची मला जाणीव आहे.

ही सावित्री म्हटले तर आत्ममग्न आहे, म्हटले तर स्वत:ला विसरून दुस-यासाठी काही करणारी आहे. तिला वीणा वाजवता येते, लेखन करता येते. स्वत:च्या मर्यांदांची तिला जाणीव आहे तशीच स्वत:च्या सामर्थ्याचीही. स्वत:च्या भावनांना ती निखळपणे सामोरी जाऊ शकते, पराभवाचे तिला दु:ख होते, पण त्या पराभवाला स्वीकारून तिला पुढेही जाता येते. ही सावित्रीही गूढच आहे, पण ती पुष्कळशी तुमच्या आमच्यासारखी वाटते. मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.

आणखी काही काळाने पॉंडिचेरीच्या वास्तव्यात आणखी एक सावित्री भेटली, ती व्यक्ती म्हणून नाही तर एक असामान्य कल्पना म्हणून! योगी अरविंदांनी सत्यवान – सावित्री कथेचा आध्यात्मिक स्तरावरून एक वेगळाच अर्थ लावला आहे. त्यांच्या मते वैदिक ऋषींनी या कथेद्वारे शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंदांच्या मते सत्यवान आंतरिक दैवी सत्य असलेल्या पण अंध:कारात आणि अज्ञानात अडकलेल्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन (हा अंध आहे) हे अंध झालेले दैवी मन आहे. सावित्रीचा पिता अश्वपति तपस्येचे प्रतीक आहे. तर स्वत: सावित्री तपस्येतून उदय पावणारी आणि दैवी सत्याला अज्ञानातून मुक्त करणारी दैवॊ शक्ती आहे. सावित्री शाश्वततेचं, अनंतत्त्वाचं रूप आहे. योगी अरविंदांच्या मतानुसार सावित्री हा परिवर्तनाचा मंत्र आहे - आणि ते येथे कोणत्याही सामाजिक परिवर्तनाबाबत बोलत नाहीत तर मनुष्यत्वाकडून ईशत्वाकडे नेणा-या मार्गाबद्दल बोलत आहेत. मानव्याकडून महामानव्याकडे होणा-या प्रवासाबाबत बोलत आहेत.

अरविंदांची सावित्री मला जवळची वाटली, पण ती मला समजली नाही. तितकी प्रगल्भता माझ्यात बहुधा तेव्हा नव्हती - आणि कदाचित आजही नाही. अरविंद सांगतात त्या दृष्टीकोनातून सावित्रीची कथा वाचली, की वरती मी उल्लेख केला होता ते सारे प्रश्न गायब होतात. आजवर न दिसलेले, न भावलेले, न कळलेले काही नवे कळल्यासारखे वाटते - पण ते क्षणभरच! एक भव्य दिव्य स्वप्न डोळ्यांसमोर यावे पण क्षणार्धात नाहीसे होऊन आपले मोडके तोडके जगणे शिल्लक राहिले आहे अशी विषण्णता मला अरविंद वाचताना येते. म्हणून माझ्यापुरता मी एक नियम केला आहे - मी फक्त अरविंदांची पत्रे वाचते. त्यात एक वेगळेच अरविंद समोर येतात – मिस्किल, साधे, मानवी, दुस-यांच्या मर्यादा समजून घेणारे. ते मग जवळचे वाटतात – मित्रासारखे वाटतात.

या सगळ्या सावित्रींची आठवण मागचे काही दिवस सातत्याने माझ्यासोबत आहे.

त्याचं काय झालं, काही मित्रमैत्रिणींच्या प्रोत्साहनाने मी संगीत ऐकण्याकडे एकदम वळले. माझ्या नादिष्ट स्वभावानुसार मग दिवसातला (आणि रात्रीचाही) जमेल तितका काळ मी संगीत ऐकण्यात घालवायला लागले. कुमार गंधर्वांनी गायलेल्या कबीराच्या रचना ऐकताना मला अनेक गोष्टी आठवल्या. त्यात प्रकर्षाने आठवली ती पु. शि. रेगेंच्या ’सावित्री’मधली लच्छी. म्हणून प्रवासात असतानाही रात्री दहा वाजता एका मैत्रिणीला फोन करून मी तिच्याकडचं ’सावित्री’ माझ्यासाठी आणायला सांगितलं  आणि तिने ते आणलही.

तो दिवस चांगला गेला होता माझा. त्या आनंदात ’सावित्री’ वाचायला घेतली. लच्छीची गोष्ट संपली आणि मला एकदम बावचळल्यासारखचं झालं. कारण त्या ’सावित्री’शी माझा काही सूर जुळेचना. जेमतेम १२० पानांच पुस्तक आहे ते - त्यामुळे तासाभरात वाचून झाल. आणि ते झाल्यावर फार रिकामं वाटल मला - उदास नाही (ते चाललं असतं मला!) - रिकामं!

रात्रभर माझी चिडचिड झाली. एक दोन जणांना ई मेल लिहून उगाच माझा वैताग त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न केला. ’सावित्री मला कळलीच नाही’ अशी तक्रारही मी काही जणांकडे गेली. त्यावर सगळे फक्त हसले - समंजसपणे हसले - त्यामुळे मला जास्तच रिकामं वाटायला लागलं!

मला वाटतं मी ’सावित्री’ला बाहेरच्या जगात शोधायचा प्रयत्न करते ही आत्ताच्या घटकेला सगळ्यात मोठी अडचण आहे. खरी ’सावित्री’ बहुधा आपल्यातच असते. ज्या ज्या टप्प्यावर जी जी सावित्री समजण्याची माझी लायकी होती, ती ती सावित्री मला भेटली. बुद्धीची तलवार परजून मी विश्लेषण केल्याने त्यातल्या कोणत्याच सावित्रीचे काही बिघडले नाही - अर्थात माझेही काही बिघडले नाही म्हणा, उलट काही घडतच गेले. सावित्री वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येते, कारण त्या त्या वेळच्या माझ्या गरजा वेगळ्या असतात. मी बदलते म्हणून मला भावणारी ’सावित्री ’ बदलते. आता माझी गरज बदलल्याने जुनी ओळखीची सावित्री मला अनोळखी वाटण अगदी स्वाभाविक आहे. म्हणून जुनं नातं चुकीचं होतं, गैरवाजवी होतं, अवास्तव होतं .. असे कोणतेही निष्कर्ष घाईने काढायचीही गरज नाही. त्या सगळ्यांच ऋण घेऊनच आता पुढची वाटचाल करायला हवी. सावित्रीचा वसा घ्यायचा म्हणजे स्वत:च भानं राखून जगायचं...

सावित्री हवी, तर स्वत:च सावित्री व्हायला हवं............ते अद्याप जमेल की नाही हे माहिती नाही.
पण आता बहुतेक पाचवी सावित्री भेटण्याची वेळ आलेली दिसते आहे