ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 25, 2023

२६५. वारसा जलव्यवस्थांचा: भाग २

 (भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)

जेजुरी. खंडोबाची जेजुरी. आपल्यापैकी अनेक लोक एकदा तरी जेजुरीला जाऊन आले असतील. मीही पूर्वी गेले होते. आज जेजुरीला जाऊनही आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो नाही. जलव्यवस्थापन हा या अभ्यास दौऱ्याचा विषय असल्याने आम्ही गेलो पेशवे तलावकडं. भोर तालुका सोडून आम्ही आता पुरंदर तालुक्यात आलो होतो.


जेजुरीच्या पूर्वेला हा विशाल तलाव आहे. आपण साधारणपणे तलाव पाहतो ते एक किंवा दोन बाजूंनी बांधलेले असतात. हा तलाव वर्तुळाकार नसून अष्टकोनी आहे आणि पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.

पहिले बाजीराव पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात (इसवी सन १७३४ ते १७४०) हा तलाव बांधला म्हणून याला पेशवे तलाव असे नाव  आहे. तलावाचे क्षेत्र सदतीस एकर आहे अशी माहिती एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी तो एकोणीस एकर क्षेत्रात आहे असं म्हटलं गेलं आहे. डोंगररांगातून येणारं पाणी निर्विघ्नपणे तलावात यावं म्हणून तलावाच्या अनेक बाजूंना छिद्रं आहेत. गाळ-दगड न येता फक्त पाणी तलावात यावं यासाठी ही रचना असावी. 

आम्ही गेलो तेव्हा सुदैवाने तलावावर फारशी गर्दी नव्हती. तलावावरून मल्हारगड (खंडोबा आणि महादेवाचे मंदिर असलेले प्रसिद्ध देवस्थान) स्पष्ट दिसतो. 

पाण्यावर किंचित तरंग उमटत होते. तलावाच्या बांधावर मोट बांधण्यासाठीची व्यवस्था स्पष्ट दिसते. तलावाच्या भिंतीवर ठराविक अंतरावर एकामागून एक असे चार जिने (दगडी पायऱ्यांचे आहेत, म्हणजे पुरेसे जुने आहेत हे जिने) भिंतीमध्ये उतरताना दिसले. ते पाहुन कुतुहल वाटलं. पण जिने उतरण्यापूर्वी जरा मागं जाऊन बघूयात म्हणून उतरून भिंतीच्या खालच्या बाजूला आलो. तर समोर दिसलं जमिनीत उभं केलेलं बल्लाळेश्वर मंदिर.


सुमारे पंचवीस पायऱ्या उतरल्या की समोर एक कुंड आहे. 

त्या कुंडाभोवती एका वेळी एक व्यक्ती चालत जाऊ शकेल असा दगडी मार्ग आहे. त्या मार्गाने चालत गेलं की उतरून आलेल्या पायऱ्यांच्या अगदी समोर तीन कमानी दिसतात आणि त्यातल्या मधल्या कमानीत शिवलिंग आहे. शिवलिंगाकडं जाताना त्याच्या डाव्या (आणि नंतर परत येताना उजव्याही) बाजूला पाणी वाहत येताना दिसलं. हे पाणी कुंडात जातं. आधी वाटलं की शिवदर्शन करण्यापूर्वी भाविकांना पाय धुता यावेत म्हणून नळ बसवला आहे की काय. पण पाण्याच्या स्रोताचा वेध घेता डावीकडे एक जिना दिसला. त्यातून पाणी अखंड वहात होतं. हे धरणातून येणारं पाणी होतं. स्थानिकांच्या माहितीनुसार या कुंडातल्या पाण्याचा स्तर कधीही कमी-जास्त होत नाही. या कुंडाच्या तळाशी एक लाकडी दरवाजा असून तो बंद आहे. पण याच दरवाज्याच्या आसपास कुठंतरी पाणी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. जमिनीखालून हे पाणी वाहतं आणि शेतीसाठी वापरलं जातं. १९८० पर्यंत हे पाणी शेतीसाठी वापरलं जात होतं, ते आम्ही पाहिलं आहे, वापरलं आहे – असं सांगणारे शेतकरी भेटलो. त्यांनीच आम्हाला थोडं दूरवर नेऊन शेतात जिथं पाणी बाहेर येत होतं, तो भाग दाखवला.

पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी या जिन्यात पूर्वी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर दट्टे बसवले होते. (हे दट्टे दगडी होते की लाकडी याविषयी वेगवेगळी माहिती आढळते.) आता हे दट्टे काढून टाकले आहेत आणि दट्ट्यांची जागा सिमेंटने बंद केलेली आहे. तसाच जिना शिवलिंगाच्या उजव्या बाजूलाही आहे. हे दोन्ही जिने चढून थेट धरणाच्या भिंतीवर आजही जाता येतं. भिंतीवरून दिसलेल्या चारपैकी दोन जिन्यांचं रहस्य इथं लक्षात आलं.

बल्लाळेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी डाव्या आणि उजव्या बाजूला छोटे बंदिस्त दगडी मार्ग आहेत. त्यातून चालत गेलं की खालच्या शिवलिंगाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला परत जिने आहेत – ज्यातून धरणाच्या भिंतीवर जाता येतं. थोडक्यात सांगायचं तर हे दुमजली मंदिर आहे आणि ते धरणाच्या भिंतीत साठ फूट खोल आहे. प्रत्येक मजल्यावर दोन जिने आहेत. या मंदिराची आणि धरणाची जोडरचना हे वास्तूशास्त्रातलं एक आश्चर्य तर आहेच, पण पाणी व्यवस्थापनातलंही एक उत्तम उदाहरण आहे. पाण्याच्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरांची स्थापना करणं यातून जनमानसाचा अभ्यासही दिसून येतो. देवाच्या प्रेमाने (अथवा भयाने – कोण कशाने प्रभावित असेल ते सांगता येत नाही) लोक पाण्याचीही काळजी घेत असत असं दिसतं.

मोरगाव-सुपे रस्त्यावर एके ठिकाणी चविष्ट भोजन करून आम्ही काही काळ तिथल्या अंगणात स्थिरावलो तेव्हा आकाशात ढग दाटून आले होते. रस्त्यावरची रहदारी थंडावली होती.  मोकळी हवा, शांतता, झोपाळा ....सकाळी हलकासा शिडकावा झाला होता. आता  पाऊस येणार असं वाटत असतानाच दहा मिनिटांत ते ढग निघून गेले.  आम्ही लोणी-भापकरच्या दिशेने निघालो. आता आम्ही आलो होतो ते बारामती तालुक्यात. पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांचं या अभ्यास सहलीच्या निमित्ताने वेगळंच दर्शन होतंय. 

लोणी भापकर गाव तसं मोठं असावं असं वाटेत दिसलेल्या ग्रामपंचायतीच्या दुमजली इमारतीवरून वाटलं. पाच रूपयांत दहा लीटर आरओ  फिल्टर पाणी मिळेलअसं ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका भिंतीवर लिहिलेलं दिसलं, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असावा. 

ज्येष्ठ नागरिक संघाचीही पाटी दिसली. गावात बरीच मंदिरं आहेत असं दिसतंय.  कालभैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. तिथं काही आम्ही गेलो नाही. सरदार भापकरांच्या गढीचे अवशेषही पाहिले नाहीत. सोनजी भापकर हे पेशवेकाळात मोठे सरदार होते. हा पराक्रमी सरदार पानिपतच्या लढाईत (१७६१) मारला गेला.  एके काळी हे बरंच महत्त्वाचं गाव किंवा स्थान असावं हे नक्की. अशा ऐतिहासिक स्थानी राहणाऱ्या लोकांना त्या त्या गावाबद्दल काय वाटत असावं याचं कुतूहल वाटतं. पण अर्थात त्याचा अंदाज मी माझ्यावरून आणि माझ्या ओळखीच्या माणसांवरून करू शकते म्हणा 😀

आम्ही गेलो ते थेट मल्लिकार्जुन मंदिरात. हा परिसर आता दत्त मंदिर या नावाने ओळखला जातो. पण दत्त मंदिर तिथं गेल्या दीडेकशे वर्षांत आलं असावं. परिसरातले सगळे गाभारे बंद होते, त्यामुळे देवतांच्या मूर्ती पाहता आल्या नाहीत. पण नंदी बाहेर होता, त्यावरून (आणि मल्लिकार्जुन नावावरुन) हे शिवमंदिर आहे हे सहज कळतं.

परिसरात प्रवेश करतानाच दोन – नाही तीन – गोष्टी तत्काळ नजरेत भरल्या. एक, मोकळ्या जागेत ठेवलेलं वराहशिल्प. दुसरी पुष्करिणी. आणि तिसरं म्हणजे मंदिराचं शिखर.  या मंदिराच्या वरच्या भागाची पडझड झाली असल्याने, बाकी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भाविकांना आत जाता येत नाही असं समजलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दरवाजे उघडे असत असं आंतरजालावरच्या काही लेखांवरून दिसून आलं. पण सुरक्षितता महत्त्वाची, तिच्याशी तडजोड नकोच.

भारतीय हिंदू परंपरेत वराह हा विष्णूचा तिसरा अवतार मानला जातो. हिरण्यक्ष राक्षसाने पृथ्वी समुद्राच्या तळाशी ओढून नेली. विष्णूने वराहाचं रूप धारण करून. एक हजार वर्ष राक्षसाशी लढाई करून पृश्वीला वाचवलं ...ही कथा आपण अनेकांनी लहानपणी ऐकली-वाचली असेल. वराहावताराचं काम संपल्यावर विष्णून ते शरीर त्यागलं, आणि मग त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगं बनली अशी कथा विष्णुपुराणात आहे. महावराहाचं किंवा यज्ञवराहाचं शिल्प काहीसं भग्नावस्थेत असलं तरी विलक्षण देखणं आहे. वराहाचं शिल्प आपल्याला आवडू शकेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पुष्करणीसमोरच्या मोकळ्या अंगणात आता हा असला तरी पूर्वी तो पुष्करिणीतल्या मंडपात असावा असा अंदाज लावता येतो. तिथं श्रीदत्त या देवतेचं आगमन झाल्यावर वराहाला बाहेर हलवण्यात आलं असावं. वराहाच्या पाठीवर जी झूल दिसते, त्यात विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. फोटोतल्या वराहाचे पायही पाहा. तिथंही शंख, गदा ही विष्णूची आयुधं दिसतील.
 

मल्लिकार्जुन मंदिर पांडवकालीन आहे असा समज लोकांमध्ये प्रचलित आहे. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीवरून हे मंदिर यादवकालीन (तेराव्या किंवा चौदाव्या शतकातलं) असावं असं म्हणता येईल. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिरात दोन शिवलिंगं आहेत. एक शंकराचं आणि दुसरं पार्वतीचं.


मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर दगडी बांधकाम असलेली पुष्करणी आहे. एका नजरेत तिचं समग्र दर्शन होत नाही, इतकी ती मोठी आहे. 

या पुष्करणीचा फोटो काढण्यासाठी ड्रोन वापरायला हवं असं मला वाटलं. पुष्करणीत खाली उतरून पाण्याच्या चारी दिशांना फिरता येते. उतरण्यासाठी एका बाजून पायऱ्या आहेत. ठिकठिकाणी लहान कोनाडे दिसतात, त्यातल्या काहींमध्ये मूर्तीही दिसतात, त्या नव्या असाव्यात. पाणी वापरात नसल्याने भरपूर शेवाळ साठलं आहे. इथं असं वाटलं की जुन्या काळी काय भव्यता असेल या वातावरणात. आणि मग असंही वाटलं की जुन्या काळी कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसांना (त्यातही स्त्रियांना) दिवसाढवळ्या इथं निवांत येऊन बसण्याची चैनही कदाचित करता आली नसती. असो. हा जर-तरचा विचार बिनकामाचा आहे. 

पुष्करिणीतल्या मंडपासमोर आता दत्ताचं मंदिर आहे. या दत्ताला दहा हात आहेत असं कळलं.  या मंडपातील खांबांवर सुंदर कोरीवकाम दिसतं. या कोरीवकामात काही कामशिल्पंही दिसली. 

छतावरची नक्षीही सुंदर आहे. आता इथं नंदी नाही, पण पूर्वी या मंडपात नंदी असावा. आणि आता जिथं दत्तमंदिर आहे तिथं शिवमंदिर असावं – आणि कदाचित शिवमंदिराच्या पूर्वी विष्णूचं मंदिर होतं की काय असा एक प्रश्न मनात आला. इथं जात्यासारखा एक मोठा दगड दिसला. ते जातं वगैरे नसून चुन्याच्या घाणीचा एक भाग होता असं अभिजित घोरपडे यांनी सांगितलं. त्याविषयी अधिक पुढच्या भागात पाहू. 

परतीच्या वाटेवर सोमेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली ती इथले 'वीरगळ' पाहण्यासाठी. 

देवळाच्या नामफलकावर विर्घळ असा शब्द दिसतो खरा, पण ते वीरगळ आहे. मराठी विश्वकोश प्रथमावृत्तीनुसार युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे 'वीरगळ' होय. 'वीराचा दगड' ह्या अर्थाच्या 'वीर-कल' ह्या कन्नड शब्दावरून 'वीरगळ' हा शब्द आलेला आहे. वीरगळाला 'वीराचा दगड' किंवा केवळ 'वीर' म्हणूनही संबोधतात. 'वीरगळां' चा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते. इथली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकाच मंदिरात अदमासे चौदा-पंधरा वीरगळ आहेत. लढाईचे विविध प्रसंग या वीरगळांवरती कोरलेले आहेत. हे वीरगळ जमिनीत पक्के रोवलेले आहेत. किती खोल आहेत, ते मला माहिती नाही.

सुप्याजवळच्या शिवकालीन पाणपोयीच्या दिशेने मग आम्ही निघालो तेव्हा मनात अनेक नवे प्रश्न होते. इतिहासातल्या या दालनांकडं आजवर कधी पाहिलं नव्हतं, आता त्यातली जादू कळायला लागली आहे. अर्थातच त्या त्या काळचा सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ नीट समजून घेतल्याविना केवळ वास्तुतून इतिहास समजत नाही. पण वास्तू, प्रतीकं, स्मारकं आपल्याला दिशा दाखवतात. शेवटी वाट कुठलीही असो, ती आपली आपल्यालाच चालावी लागते. 

(क्रमश:)

Thursday, September 21, 2023

२६४. वारसा जलव्यवस्थांचा: भाग १

(भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)

चार दिवसांपूर्वी मला जर कुणी विचारलं असतं की रांझे-कुसगाव-जेजुरी-लोणी भापकर-सुपे-मोगराळे-लिंब या गावांमध्ये काय साधर्म्य आहे; तर कदाचित ही सर्व गावं आहेत, तिथली अर्थव्यवस्था शेतीप्रधान असणार, शिक्षण-आरोग्य-रोजगाराचे प्रश्न.... असे काही मुद्दे मला सुचले असते. पण १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवसभवतालच्या चमुसोबत या परिसरात भटकायची संधी मिळाली आणि वर उल्लेख केलेल्या गावांना जोडणारा आणखी एक दुवा स्पष्ट झाला. तो आहे ऐतिहासिक जलव्यवस्था’- पाणी साठवण्याच्या, वितरणाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण इतिहासकालीन जागा. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधली ही गावं आहेत.

प्रवासाच्या दोन दिवस आधी आमची एक ऑनलाईन मीटिंग झाली होती. तेव्हा आमचा गट फार मोठा नाही हे लक्षात येऊन मला बरं वाटलं होतं. अभिजीत घोरपडे आणि वनिता पंडित हे भवतालचे मार्गदर्शक धरून आम्ही चौदा लोक होतो. त्यात शेतकरी होते, शिक्षक होते, वास्तुरचनाकार होते, इंजिनिअर होते, आणि विद्यार्थी होते.  बारामती, सांगली, मुंबई अशा विविध ठिकांणाहून लोक या पर्यावरण-अभ्यास सहलीत सामील झाले होते. माझा ना इतिहासाचा अभ्यास आहे, ना पाण्याचा. पण आपल्या परिसरात आहे तरी नेमकं काय या उत्सुकतेने मी या सहलीत सामील झाले. भवतालबरोबर मी पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे कार्यक्रमातून काही शिकायला मिळेल का नाही, याबाबत मनात सुरूवातीला थोडी शंका होती, ती अर्थातच अनुभवाअंती दूर झाली.  

सकाळी सात वाजता पुण्यातून निघून, वाटेत चहा-नाश्ता करून आम्ही भोर तालुक्यातल्या रांझे गावी पोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलांना केलेल्या शिक्षेची कथा आपल्याला आठवत असेलच, तेच हे रांझे. काही ठिकाणी गावाचं नाव रांजे असं लिहिलेलं दिसलं. गाव लहान दिसतंय, तीनेकशे कुटुंबं आहेत. लोकसंख्या अंदाजे पंधराशे ते अठराशे असेल. गंमत म्हणजे या गावाहून तालुक्याचं ठिकाण (भोर) ३५ किलोमीटर दूर आहे, तर जिल्ह्याचं ठिकाण (पुणे) ३० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यात लोकांना कामासाठी तीसेक किलोमीटर सहज हिंडावं लागत असेल, तो भाग वेगळा.

अंगणवाडी केंद्र बंद होतं. पण इमारत सुबक होती आणि बाहेरून तरी छान सजवलेली दिसली. 

गावात वीज आहे, पण ती अर्थातच अनेकदा नसते. गावात प्राथमिक शाळा आहे, पुढच्या शिक्षणासाठी मात्र गावाबाहेर जावं लागतं. या परिस्थितीतही २०११च्या जनगणनेनुसार गावातले ७५ टक्के लोक साक्षर आहेत. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र नाही. रस्ते तसे ठीकठाक वाटले, ऐन पावसात ते कसे असतात याची कल्पना नाही. गावात बँक, पोस्ट ऑफिस, एटीएम या सोयी नाहीत. जवळचा पेट्रोल पंप चार किलोमीटर अंतरावर आहे.  हे सगळं वर्णन पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचं आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून प्रामुख्याने ऊस आणि फळभाज्या घेतल्या जातात. विहिरी आणि कूपनलिका यांच्या साहाय्याने शेतीला पाणीपुरवठा होतो.

इथल्या रांझेश्वर मंदिरात प्रवेश करताच एक मोठं वडाचं झाडं दिसलं. झाडाच्या खोडावर बांधलेले दोरे सांगत होते की वटपौर्णिमा नुकतीच होऊन गेली आहे. वडाभोवतीचा मजबूत दगडी पार स्वच्छ होता. डाव्या बाजूच्या कमानीही लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामपंचायतीमधले कर्मचारी श्री. बाबासाहेब भणगे आम्हाला माहिती द्यायला हजर होते. परस्पर ओळखींचे एक छोटे सत्र पार पडल्यावर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.

हे मंदिर शिवपूर्वकालीन आहे, दादोजी कोंडदेव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असा ऐतिहासिक पुरावा आहे. म्हणजे हे मंदिर चारशे वर्ष किंवा  त्याहूनही जुनं असावं. पायऱ्या उतरून आम्ही मुख्य मंदिराजवळ आलो तेव्हा समोर नंदी दिसले. शिवलिंगासमोर नंदी असणं काही नवं नाही, पण इथं एक सोडून तीन नंदी आहेत. या तिन्ही नंदींचे आकार वेगवेगळे आहेत. त्यामागे काय कथा आहे हे काही कळलं नाही. शिवलिंगाभोवती सापाचं वेटोळं स्पष्ट दिसतं. मंदिर परिसर बराच मोठा आहे आणि स्वाभाविकपणे त्याची पडझडही झाली आहे. खूप मोठं मंदिर असावं हे स्पष्ट होण्याइतके अवशेष टिकून आहेत.

इथं आमच्या भेटीचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे तीन कुंडं पाहणं. वरवर पाहता अगदी साधी व्यवस्था आहे असं दिसतं. इथं तीन कुंडांची साखळी आहे - एकाला एक जोडून अशी तीन कुंडं आहेत. त्यांची खोली अनुक्रमे २.०, १.४ आणि १.२ फूट अशी आहे. फोटो पाहून कुंडांच्या लांबी-रूंदीची तुम्हाला कल्पना येईल. पहिल्या कुंडाला देवकुंड असं म्हटलं जातं. इथं झऱ्याचं पाणी थेट कुंडात येतं. या कुंडातलं पाणी देवाच्या पूजेसाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातं. या कुंडातल्या पाण्याचा स्तर वाढला की पाणी दुसऱ्या  कुंडात जाईल अशी व्यवस्था आहे. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अशा रीतीने केली आहे की दुसऱ्या कुंडातलं पाणी कधीही पहिल्या कुंडात परत येणार नाही (आणि तिसऱ्या कुंडातलं पाणी कधीही दुसऱ्या कुंडात परत येणार नाही.) पाणी वाहून जाण्यासाठी असलेली छिद्रं पहिल्या कुंडात स्पष्टपणे दिसतात, पाणी वाहण्यासाठी काही कलाकारीची गरज नसते. पण जे काम करायचं ते सौंदर्यपूर्ण, नेटकं, आकर्षक करायचं हे तत्कालीन कारागिरांचं वैशिष्ट्य दुसऱ्या कुंडातलं गोमुख पाहून लक्षात येतं. यातलं पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं. दुसऱ्या कुंडातून पाणी तिसऱ्या कुंडात येतं तेव्हा कपडे धुणे, भांडी धुणे अशा कामासांठी ते वापरलं जातं. आता गावात नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकरी या कुंडांचा क्वचितच वापर करतात. केवळ देवळाचे पुजारी कुंडात आंघोळ करताना दिसले.


एका कुंडातून दुसऱ्या कुंडात पाणी वाहतं ठेवणं ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अभिनवच होती - आहे. पण तत्कालीन नेतृत्व तिथंच थांबलं नाही. तिसऱ्या कुंडातलं पाणी वापरून झालं की जमिनीत जिरून जात नाही. जमिनीखाली दगडी पाट बांधून त्याद्वारे हे पाणी मंदिराबाहेर वळवण्यात आलं आहे आणि तिथून ते शेतीसाठी वितरित होतं. हा दगडी पाट – दगडी भुयार-पाट म्हणायला पाहिजे खरं तर – अगदी प्रशस्त आहे. त्यातून आजही पाणी वाहतंय. आमच्या गटातले काही सहकारी या पाटातून (किंचित वाकून) चालत गेले आणि मंदिराबाहेर आले. त्यांच्या चाहुलीने आतली शेकडो वटवाघळं उडून बाहेर आली. ती पाहून मग मी भुयार-पाटात चालत जाण्याचा बेत रद्द केला.

पाणी अजिबात वाया न जाऊ देता पाण्याचा वापर जास्तीत जास्त लोकांना कसा करता येईल आणि पाण्याचा परिणामकारक पुनर्वापर कसा करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवणारी ही व्यवस्था आहे. आता काळ बदलला, सोयी झाल्या, नवं तंत्रज्ञान आलं, लोकांच्या गरजा बदलल्या म्हणून ही व्यवस्था वापरली जात नाही. पण ती व्यवस्था अजूनही चांगल्या स्थितीत आहे, ती बंद पडलेली नाही हे फार महत्त्वाचं आहे. ही व्यवस्था टिकली म्हणून आपल्यार्यंत पोचली. सस्टेनेबल डेवलपमेंट (शाश्वत विकास किंवा चिरंजीवी विकास) बाबत विचार करताना असं भूतकाळातूनही शिकायला मिळतं हे नक्की.

मंदिर परिसरातली शांतता, दगडी बांधकामाने त्या वातावरणात असलेली एक स्थिरता, पडझड झालेल्या भिंतीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य .... हे सगळं सोबत घेऊन आम्ही पुढं निघालो ते कुसगावकडं.

आम्ही गावात न जाता मुख्य रस्ता सोडून आत गेलो. साधारण दहाएक मिनिटं चालल्यावर खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. रांझे आणि कुसगाव यांच्या हद्दीवर असलेलं हे छोटेखानी धरण (किंवा आजच्या भाषेत मोठा बंधारा) अजूनही मजबूत आहे. जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवगंगा नदीवर हा बंधारा बांधला गेला आहे. (पुण्यात राहण्याची सोय होण्यापूर्वी जिजाऊ लहानग्या शिवरायासह खेड शिवापूरमध्ये काही काळ राहिल्या होत्या.) चारशे वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या बंधाऱ्यात पाणी साठलेलं दिसलं. बंधाऱ्याची उंची दहा फुटांपेक्षा जास्त असावी. किती लांबीचा बंधारा आहे हे मला माहिती नाही,


पण नदीच पात्रं बऱ्यापैकी रुंद आहे. भिंतीची रुंदी (जाडी) पाच ते  सहा फूट असावी असा माझा अंदाज आहे. पाणी बंधाऱ्यातून पुढं वाहण्यासाठी जो भाग केला आहे, त्याच्या दोन्हीबाजूंना बुरूजासारखी रचना आहे.

पाण्याच्या प्रवाहाने बंधारा वाहून जाऊ नये म्हणून ही व्यवस्था असते का असा प्रश्न पडला. नदीचं पात्र फार खोल नसावं (बहुधा गाळ साठला असावा), कारण आमच्यापासून थोड्या अंतरावर बंधाऱ्याने अडलेल्या पाण्यात एक माणूस मासे पकडत होता आणि मध्येच तो चालत नदी ओलांडून गेला.

या परिसरात पाऊस भरपूर होत असला, तरी दिवाळी उलटली की पाण्याची कमतरता भासत असणार. लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने अतिशय दूरदृष्टी दाखवून जिजाऊंनी शिवगंगा नदीवर बंधारे बांधले. त्यांनी तीन बंधारे बांधले आहेत, आम्ही त्यापैकी फक्त हा एक पाहिला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दीर्घकाळ टिकणारं काम कसं उभं करावं याचा हा एक आदर्श आहे. जिजाऊंनी केलेल्या या कामाची मला फारशी कल्पना नव्हती हे सखेद नमूद करते. आता या विषयावर आणखी वाचलं पाहिजे हे लक्षात आलं.

(क्रमश:)

भाग २