ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label कन्याकुमारी. Show all posts
Showing posts with label कन्याकुमारी. Show all posts

Sunday, September 7, 2025

२७७. विवेकानंदपुरम

(भाग १ : कन्याकुमारीच्या दिशेने) 

(Want to read this post in English? It is here!) 

कन्याकुमारी रेल्वे स्थानकं खरं तर एक टुमदार आणि देखणं स्थानक आहे.

पण यावेळी का कुणास ठाऊक त्याचं पहिलं दर्शन फारच उदासवाणं होतं. सगळीकडं फक्त धूळ होती, . बाहेर पडताना लक्षात आलं की स्थानकाचं दुरूस्तीचं काम चालू होतं. छोट्या छोट्या गोष्टींत आपल्याला किती अपेक्षा असतात आणि आपले अपेक्षाभंग देखील किती इवल्याशा गोष्टींमध्ये असतात हे जाणवून हसूही आलं. यावेळी काही मी कन्याकुमारी रेल्वे स्थानकाचा फोटो काढला नाही. एक दिवस चालत गांधी मंडपापर्यंत आले होते, तेव्हा तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने मी नजरसुद्धा टाकली नाही.

हा २०११ साली काढलेला फोटो. घरी आल्यावर शोधला.

कन्याकुमारी रेल्वे स्थानक
स्थानकाबाहेर रिक्षा रांगेत उभ्याच होत्या. तसं तर स्थानक ते विवेकानंदपुरम हे अंतर केवळ दीड किलोमीटर आहे. सामान नसेल तर रमतगमत चालत जाता येईल इतकंच. पण सामान असल्यावर रिक्षाला पर्याय नाही. रिक्षावाल्याने शंभर रूपये सांगितले. हा बहुधा ठरलेला दर असणार. चार-पाच लोक मिळून जात असतील एरवी. मी फार काही विचार न करता रिक्षात बसले आणि विवेकानंदपुरममध्ये पोचले.
विवेकानंदपुरममध्ये प्रवेश करताना

विवेकानंदपुरम

विवेकानंदपुरम हा सुमारे शंभर एकरांचा परिसर आहे. हे ‘विवेकानंद शिला स्मारक’ आणि ‘विवेकानंद केंद्र’ यांचं मुख्यालय आहे. इथं त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केंद्र आणि निवास व्यवस्था आहे. सुमारे एक हजार पर्यटक एका वेळी इथं राहू शकतात अशी सोय आहे. नाश्ता-जेवणासाठी एक उपाहारगृह आहे. दिवसातून काही ठराविक वेळा कन्याकुमारी गावात जाण्या-येण्यासाठी मोफत बससेवा आहे. ग्रंथालय आहे, विवेकानंद चित्र प्रदर्शनी आहे, गणपतीचं देऊळ आहे, स्वातंत्र्ययोद्ध्यांचं स्मारक आहे, रामायण प्रदर्शन आहे, पर्यावरणविषयक कामाची माहिती देणारं केंद्र आहे, विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आहे, त्यांच्या जीवनाची माहिती देणारं प्रदर्शन आहे, ध्यानमंदिर आहे, भरपूर झाडं आहेत, मोरांचं अभयारण्य असल्याने मोरही खूप दिसतात, केंद्राचा समुद्रकिनारा (बीच) आहे - जिथून सूर्योदय दिसतो. अशा बऱ्याच गोष्टी परिसरात आहेत. एक कॉन्फरन्स हॉलही दिसला. आणि अर्थातच विवेकानंद केंद्राची शाळाही आहे.

दुपारी चारच्या सुमारास ‘विवेकानंद चित्र प्रदर्शनी’मध्ये गेले. हे या परिसरातलं माझं एक आवडतं ठिकाण. १९८३ मध्ये मी पहिल्यांदा कन्याकुमारीला गेले तेव्हा हे ठिकाण टुमदार, स्वच्छ, आणि मला नवा दृष्टिकोन देणारं होतं. आजही ते तसंच आहे. काही गोष्टी अपरिवर्तनीय असतात, त्यातली जणू ही एक. त्यावेळच्या विवेकानंद केंद्राच्या नेतृत्वाची दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यांनी त्याची घेतलेली काळजी हे दोन्ही यातून दिसून येतं. प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारात स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती चित्र आहे, जे लक्षवेधक आहे.

दहा रूपये प्रवेशशुल्क देऊन आत गेले. माझ्या आठवणीप्रनुसार यात मूळ सत्तरच्या आसपास फलक (पोस्टर्स) होते. आता त्यात विवेकानंद केंद्राच्या कामाचा तपशील पुरवणाऱ्या फलकांची भर पडली आहे. अत्यंत उत्तम चित्रं आहेत ही. हे चित्रकार कोण आहेत यासंबंधी आंतरजालावार माहिती मिळाली नाही. पुण्यात परत आल्यावर विवेकानंद्र केंद्रातल्या एका वरिष्ठ कार्यकर्तीला विचारलं, तेव्हा समजलं की कोलकाताचे रघुनाथ गोस्वामी यांनी ही चित्रं काढली आहेत. या प्रदर्शनातलं नचिकेताचं चित्र माझ्या अतिशय आवडीचं आहे. (नचिकेताची कथाही अर्थातच आवडीची.) 

इंग्रजी, तामिळ, आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रत्येक चित्राखाली स्पष्टीकरण आहे. भारताचा इतिहास आणि संस्कृती, नरेंद्रनाथ दत्त या युवकाचा स्वामी विवेकानंद बनण्याचा प्रवास, त्यांची शिकवण, त्याचा भारतावर आणि जगावर झालेला परिणाम ... अशा दोन तीन भागांत या प्रदर्शनाची विभागणी करता येईल. निवांत वेळ काढून या ठिकाणी जावं असं मी सुचवेन.

पर्यटकांच्या अर्ध्या किंवा एक दिवसाच्या सहलीचा विवेकानंदपुरम आता एक मोठा भाग आहे. अशा कुठल्याही सहलीत असतो तसा प्रत्येक ठिकाणासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. या अर्ध्या तासात लोक किती आणि काय वाचत असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. १९८० च्या दशकात त्या वेळच्या युवकांना बांधून ठेवणारी, प्रभावी वाटणारी भाषा आता बदलली आहे. इन्स्टा आणि ट्विटरच्या पिढीला ही पोस्टर्स शब्दबंबाळ वाटू शकतात. असो.

पुन्हा अपेक्षाभंग

तिथून विवेकानंदपुरममधल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. समुद्रात - पाण्यात - थेट उतरता येत नाही कारण संरक्षक भिंत बांधलेली आहे. सकाळी सूर्योदय पाहायला मोठ्या संख्येने लोक येतात, तेव्हा एक तास त्या भिंतीतला छोटा दरवाजा उघडतात. तिथं सुरक्षारक्षक सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असतो. या किनाऱ्यावरून समोरच्या विवेकानंद शिला स्मारकाचं छान दर्शन होतं.

पण आज आणखी एक अपेक्षाभंग झाला. समुद्रात ठिकठिकाणी भराव घालण्याचं काम चालू आहे. आणि एक भराव नेमका ‘शिला स्मारक’ आणि समुद्रकिनारा यांच्या मध्ये येतोय. आता किनाऱ्यावरून शिला स्मारक नीट दिसत नाहीय.

हा फोटो सकाळी काढला आहे. 

आणि हा संध्याकाळी.

वैतागवाणी भेट

समुद्रकिनाऱ्यावर मी वगळता सुरक्षारक्षक आणि आणखी एक तरूण माणूस होता. मी निवांत उभी होते, तेवढ्यात मला एक फोन आला. बोलणं झालं, मी फोन ठेवला आणि लगेच “आप महाराष्ट्रसे हो क्या दीदी” असं म्हणत तो तरूण मुलगा माझ्याशी बोलायला आला. मीही त्याची चौकशी केली. मेवाड(राजस्थान)मधला हा तरूण मुलगा चालत चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहे. गेले एक महिना तो  विवेकानंदपुरममध्ये राहतो आहे. मी त्याच्याशी जुजबी बोलून पुन्हा समुद्र पहायला वळणार इतक्यात त्याने “महाराष्ट्रात अमराठी लोकांवर हल्ले का होताहेत”, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना का आक्रमक झाली आहे” वगैरे चर्चा सुरू केली. मी त्याला शांतपणे “हल्ले वगैरे काही झाले नाहीयेत”, “पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती”, “काही अमराठी लोकांचा उद्दाम अविर्भाव” असं समजावून सांगत होते. पण लगेच माझ्या लक्षात आलं की याला ऐकायचं काही नाहीये, फक्त बोलायचं आहे. धर्म, संस्कृती, परंपरा .... या मार्गावर त्याची गाडी अपेक्षेप्रमाणे जात राहिली.

पुढं त्याने ‘उद्धव ठाकरे भाजपची सोबत सोडून काँग्रेससोबत गेले ही कशी चूक आहे’ वगैरे सुरू केलं.  मी त्यावरही काही न बोलता त्याचं ऐकून घेत होते. मी काही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची प्रवक्ती नाहीये 😀धर्म आणि पक्षीय राजकारण एकत्र करणारे लोक भेटणं यात आता काही नवल राहिलेलं नाही. असले लोक प्रचंड प्रेडिक्टेबल आणि म्हणून कंटाळवाणे असतात. मी त्या संवादातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्थातच अयशस्वी झाला.

हळूहळू त्याची गाडी केरळ-तामिळनाडूवर टीका करण्याकडं वळली. इथले लोक कसे हिंदी बोलत नाहीत, इकडे कसा सारखा भात आणि इडलीच खावी लागते वगैरे. पुढं मात्र तो जे काही बोलला, त्यावर मी त्याला जवळजवळ फैलावरच घेतलं. “दीदी, आप कैसे सभ्य कपडे पहने हुए हो, लेकिन मै यहाकी मंदिरोंमे कई लडकियोंको देखता हूँ तो उनके आधे-अधुरे कपडे देखकर मुझे अजीब लगता है”.  त्याचं हे वाक्य मला संताप आणणारं होतं. मी त्याला म्हणलं, “भावा, मुलींना कोणते कपडे घालायचेत ते घालू दे, तू कोण त्यांना सांगणारा? त्या काय तुझ्याकडं कपड्यासांठी पैसे मागतात काय? आणि काय रे, तू देवळात जातोस तेव्हा मुलींकडं कशाला बघतोस?  देवाचा विचार कर ना. देवळात जायचं निमित्त करून मुलींकडं बघायला जातोस की काय तू? असली दांभिकता काही बरी नाही. सुधरा जरा.” 

तो थोडा वरमला. मग त्याने गाडी दुसऱ्या मार्गावर नेली. एकदम ‘परदेशस्थ भारतीयांवर’ (एनआरआय). ते कसे आईबापांना इकडं सोडून परदेशात चैन करत असतात, इकडं त्यांच्या आई-वडिलांची काळजी घ्यायला कुणी नसतं वगैरे. त्यावरही मी त्याला फटकारलं. म्हणलं, “त्यांना नावं ठेवतोस खरी, पण तू तरी काय करतो आहेस? आई-वडिलांना घरी सोडून तूही महिनोनमहिने धाम आणि ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहेस ना? मग तुझ्यात आणि त्या एनआरआयमध्ये काय फरक आहे?” मग तो आणखी वरमला. “नाही दीदी, मी यात्रा संपल्यावर घरीच जाणारेय. मी आयुष्यभर माझ्या आई-वडिलांची सेवा करणार आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी आजन्म अविवाहित राहीन.” मला खुदकन हसायलाच आलं.  

सगळं जग सोडून (ही आपली म्हणायची पद्धत, काही सोडून वगैरे नव्हते गेले मी!)  कन्याकुमारीला गेले, तिथं समुद्रकिनाऱ्यावर हा एकच पर्यटक होता, तो नेमका मलाच भेटावा .... या योगायोगाचंही मला हसू आलं. जगं तेच असतं. माणसं तशीच असतात - चांगली, वाईट, निरागस, स्वार्थी, दुष्ट, मतलबी, सरळ, सज्जन ...... त्यातली कुणी अध्यात्माची फुलबाजी (ग्लोरिफाईड) भाषा बोलतात, तर आणखी कुणाला तसली भाषा बोलायला जमत नाही इतकाच फरक असतो का माणसां-माणसांत?

तेवढ्यात अचानक पाऊस आला. मी सोबत छत्री नेली नव्हती. तो पळत पळत निघून गेला. मागे उरलो मी, पाऊस, समुद्र, आणि तो सुरक्षारक्षक. त्याच्याशी दोन वाक्यं बोलले आणि मग छान भिजत सावकाश चालत परत आले.

काही जुनं, काही नवं

पुढच्या दोन तीन दिवसांत विवेकानंदपुरममधल्या जमेल तितक्या ठिकाणांना भेटी दिल्या. एके ठिकाणी तिथं बसलेले गृहस्थ रेडिओ ऐकत होते. मी एकटीच पर्यटक होते. मी आत जाऊन सगळं बघून आले, तिथून निघाले. त्या अर्ध्या-पाऊण तासात ते गृहस्थ माझ्याशी अवाक्षरही बोलले नाहीत. किंबहुना मी तिथं आले आहे याची त्यांनी दखलही घेतली नाही याची मला फारच गंमत वाटली. पॅशनचं तुम्हाला प्रशिक्षण देता येत नाही, ती आतूनच यावी लागते हे पुन्हा एकदा जाणवलं.

“रामायण” प्रदर्शनाची इमारत छान आहे.

आतमध्ये भास्कर दास (चेन्नै) यांनी काढलेली चित्रं आहेत. १०८ चित्रं आहेत. कलाकाराबद्दल आदर व्यक्त करूनही मी म्हणेन की मला ती चित्रं एकसुरी वाटली. रामायणाची कथा माहिती आहे त्यामुळे सगळं काही वाचत बसले नाही मी. थोडी कमी चित्रं चालली असती, पण १०८ संख्येचं महत्त्व असावं कदाचित. वरच्या दालनात भारतमाता आणि मा अमृतानंदमयी यांच्या प्रतिमेसह इतर काही प्रतिमा आणि मूर्ती आहेत. शेजारीच “सस्टेनेबल लिविंग” या विषयावरचं डिजिटल प्रदर्शन आहे. ते मला काहीच कळलं नाही. दोन दिवसांनी केंद्रातल्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने ते मला सविस्तर दाखवलं. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे सौरऊर्जेचा वापर. हे चांगलं आहे. तसंच पावसाचं पाणी इमारतीच्या तळघरात साठवण्याची सोय आहे (Rain Water Harvesting). एका अर्थी हा नव्या-जुन्यांचा (धर्म आणि विज्ञान) संगमच म्हणायला हवा. तिथं अर्थातच सौरऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहायला कुणी येत नाही म्हणा.

काही जुने लोक भेटले. गप्पा झाल्या. जुनी नावं. जुन्या आठवणी. वगैरे.

एका सकाळी समुद्रकिनाऱ्यावर गेले. सूर्योदय पाहायला प्रचंड गर्दी होती.

सूर्य उगवला की लोक निघून जातात. बहुधा त्यांचे पुढचे प्रवास ठरलेले असतात. सुरक्षारक्षकही तासाभराची वेळ संपल्यानंतर निघून गेला. मी निवांत बसून राहिले. समुद्राची गाज, सौम्य झुळुक, समोर दिसणारं शिला स्मारक. मग एक नीलपंख (किंवा नीलकंठ)  उडत आला. गिरक्या घेणं आणि फांदीवर किंवा जमिनीवर बसणं - असा त्याचा कार्यक्रम चालू होता. ज्यांनी नीलपंख उडताना पाहिला असेल, त्यांना माझ्या भाग्याचा हेवा वाटेल याची मला खात्री आहे. दोन मोरही आले. इथं अर्थात मोरांचं अभयारण्य आहे, त्यामुळे ते मोठ्या संख्येने दिसतात.

कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आणि त्यासमोर विवेकानंदांचा आणखी एक पुतळा असंही एक स्मारक बीचजवळ आहे. तिथं फारसं कुणी येत नाही. दोन दिवस सकाळी काही काळ तिथंही निवांत बसून राहिले.

पुढं जाताना

इथं लोक एक तर पर्यटक म्हणून येतात किंवा या ना त्या संदर्भात विवेकानंद केंद्राशी नातं असणारे लोक येतात. मी यापैकी काहीच नव्हते. मी फक्त एके काळच्या माझ्या आयुष्यातल्या खुणांपैकी काय काय शिल्लक आहे ते तपासून पाहणारी एक प्रवासी होते. या खुणा फक्त बाहेरच्या परिसरात नव्हत्या, त्या माझ्या मनातही होत्या. आतल्या आणि बाहेरच्याही अनेक खुणा लोप पावल्या आहेत हे कळताना दु:ख झालं नाही. आपण पुढची वाट चालतो, तेव्हा मागचं नामशेष होणार हे अपेक्षितच असतं.  त्यातूनही जे काही अजून शिल्लक आहे ते सुखावणारं होतं - हेदेखील कालांतराने कधीतरी संपेलच या जाणीवेतही 😊

मी (फार पूर्वी) कन्याकुमारीत असताना ‘विवेकानंद केंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारात आहे की नाही’ अशा चर्चा व्हायच्या. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांचं निधन होऊन तेव्हा जेमतेम दीड वर्ष झालं होतं, त्यामुळे या चर्चा स्वाभाविक होत्या. अगदी “हे आरएसएस आरएसएस तुम्ही जे म्हणताय, ते काय आहे” असं विचारणारे निरागस कार्यकर्तेदेखील आमच्यात होते. (विवेकानंद केंद्रातला माझा एक सहकारी मित्र  परवाच या वाक्याची आठवण काढत होता आणि आम्ही दोघेही आमच्या बावळटपणावर खूप हसलो होतो). “जाणीव” संघटनेची स्थापना आणि काम या प्रक्रियेत असताना आम्ही मित्रांनी समाजातल्या विविध विचारसरणींचा प्राथमिक अभ्यास केला होता, त्यामुळे आरएसएसच्या विचारप्रणालीची मला तोंडओळख होती - इतकंच. पण आज आता हा प्रश्न (विवेकानंद केंद्र आणि संघ) विचारण्याचं कुणालाही कारण पडणार नाही. विवेकानंद केंद्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातली संस्था आहे याच्या खुणा जागोजागी दिसतात. ठळकपणे दिसतात.

मी कन्याकुमारीत येण्याइतकंच मी कन्याकुमारीतून परत जाणंही माझ्या आयुष्यात महत्त्वाचं होतं, आहे, राहील. मुक्कामाइतकाच - किंबहुना काहीसा जास्तच - महत्त्वाचा असतो तो प्रवास. तो चालूच आहे. आजही.


(पुढील भाग लवकरच ....)

 

Monday, September 1, 2025

२७६. कन्याकुमारीच्या दिशेने...

(Want to read this post in English? It is available here!) 

खरं तर कन्याकुमारीला जायचा माझा काही बेत नव्हता.

पण वीसेक महिने काम केलेला एक प्रकल्प नुकताच संपला होता. ऑनलाईन काम करण्याचे फायदे खूप जास्त असले तरी सतत संगणकाच्या स्क्रीनवरून लोकांशी बोलण्याचा कंटाळा आला होता. बाहेर कुठंतरी लांबवर भटकायला जाण्याचा मूड होता. तसं तर मला जायचं होतं “स्पिती व्हॅली”त. पण ज्या गटाबरोबर मी जाणार होते, त्यांचा तो कार्यक्रम रद्द झाला. मग म्हटलं “चला, कन्याकुमारीला जाऊयात.” 

कन्याकुमारीला जाणं हे वेळ घेणारं प्रकरण आहे. आता सुदैवाने बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यातून बसने अथवा ट्रेनने मुंबईपर्यंत जायचं, तिथून तिरूवनन्तपुरमपर्यंतचं विमान पकडायचं, तिथून बसने अथवा ट्रेनने किंवा टॅक्सीने कन्याकुमारीला जायचं हा एक पर्याय. दुसरा असाच रस्ता पुणे-चेन्नै-कन्याकुमारी असा आहे. या दोन्ही मार्गांवरून प्रवास केला तर काही तासांचा वेळ वाचतो हे खरं आहे, पण दगदग फार होते. शिवाय वेळ वाचवून मला फारसं काही करायचं नव्हतं. म्हणून मग मी पुणे-कन्याकुमारी असा ट्रेनचा प्रवास निवडला.

काही दशकांपूर्वी जेव्हा मी पुण्याहून कन्याकुमारीला (पहिल्यांदा) गेले होते, तेव्हा १०८१ डाऊन ट्रेनने गेले होते. जनरल डब्यातून. लांब पल्ल्याचा असा माझा तो पहिलाच प्रवास होता. मुंबईहून तेव्हा रात्री साडेआठच्या सुमारास ही गाडी पुणे स्थानकात यायची. तेव्हा ती मुंबई-त्रिवेंद्रम गाडी होती. त्या दोन दिवसांच्या प्रवासातल्या अनेक रोचक आठवणी आहेत. ट्रेनमध्ये काही विक्रेते “पाल, पाल” असं ओरडत होते ते ऐकून मी दचकले होते ते आठवतं. “पाल” म्हणजे “दूध” हे कळल्यावर हुश्श झालं होतं. दोनेक वर्षांची रोझी नामक माझी एक सहप्रवासी होती. तिच्याशी खेळताना मजा आली होती. तिच्या आई-वडिलांनी प्रवासात मला खूप मदत केली होती. तेव्हा त्रिवेंद्रमला उतरून कन्याकुमारीचं तिकिट काढायचं होतं- तर सगळेजण मला “केप”चं तिकिट काढायला सांगत होते. “केप” म्हणजेच कन्याकुमारी हे सामान्यज्ञानही त्यानिमित्ताने झालं होतं. ... अशा अनेक रम्य आठवणी सोबत असल्याने मला पुणे-कन्याकुमारी ट्रेन सोयीची वाटली तर नवल नव्हतं.

आता ही गाडी १६३८१ पुणे- कन्याकुमारी अशी आहे. मुंबईऐवजी गाडी पुण्यातून सुटते आणि साधारणपणे छत्तीस तासांनी कन्याकुमारीला पोचते. आता त्रिवेंद्रमला गाडी बदलावी लागत नाही. या गाडीची मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि केरळ अशा पाच राज्यांतून ही जाते. सोलापूर (महाराष्ट्र), वाडी आणि रायचुर (कर्नाटका), गुंटकल, कडप्पा, तिरूपती (आंध्र प्रदेश), सेलम, कोइंबतुर (तामिळनाडू) अशी महत्त्वाची स्थानकं ही गाडी घेते. केरळमध्ये बराच प्रवास करून नागरकोविलला पुन्हा तामिळनाडूत गाडी प्रवेश करते आणि कन्याकुमारीला पोचते. या प्रवासात ही गाडी भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, पलार, वसिष्ठ, कोल्लार अशा अनेक नद्या ओलांडते.



तिकिट काढण्यापूर्वी राहायची व्यवस्था करणं आवश्यक होतं. कन्याकुमारीत जायचं तर विवेकानंदपुरममध्येच राहायला हवं. कन्याकुमारीत जाऊन दुसरीकडं कुठंतरी राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. मग विवेकानंदपुरमच्या वेबसाईटवर जाऊन रीतसर माहिती वगैरे भरली. मग असं लक्षात आलं की हल्ली ते एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत.

आता जग “सोलो ट्रॅव्हल”च्या युगात आहे, आणि हे लोक एकट्या व्यक्तीला खोली देत नाहीत. The contrast remains strong as ever …. असं वाटलंच. तरीही मी परिसर व्यवस्थापकांना इमेल पाठवली. ओळखी वगैरै सांगायचा (त्यातही मोठ्या लोकांच्या ओळखी सांगायचा) मला प्रचंड कंटाळा येतो. पण मग मी त्या व्यवस्थापकांना  शेवटी  ‘त्यांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांशी - पदाधिकाऱ्यांशी - माझी ओळख असल्याचं’ सांगितलं. त्यांनी त्याची खातरजमा केली आणि मग राहण्याची व्यवस्था मार्गी लागली.

कन्याकुमारीला अनेक वेळा गेले असले तरी तिथल्या परिसरात कधी फारशी भटकंती करण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी त्यासाठी काही वेळ काढायचं ठरवलं. येताना तिरूअनन्तपुरमलाही दोन दिवस जावं असं ठरवलं. त्यानुसार राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.

२३ जुलैला रात्री पुणे स्थानकावर पोचले. तिथं टॅक्सीचालकाला पैसे देण्यासाठी माझं मोबाईल इंटरनेट चालेना (बीएसएनएल, दुसरं काय?) तेव्हा टॅक्सीचालकाने त्याच्या मोबाईल इंटरनेटचा हॉटस्पॉट मला दिला आणि मी पैसे दिले. त्याच्या व्यावसायिकतेचं कौतुक वाटलं.

मेट्रो स्थानक आणि रेल्वे स्थानक यांना जोडणाऱ्या पुलावर काही वेळ निवांत बसून राहिले. गाडीची घोषणा झाल्यावर फलाटावर गेले. गाडी वेळेत लागली.


माझ्या बर्थच्या वरच्या बर्थवर एक गृहस्थ अगदी निगुतीने त्यांच्या झोपण्याची व्यवस्था लावत होते. गाडी सुटायच्या आत ते झोपीही गेले. गाडी सुटल्यावर अर्ध्या तासाने तिकिट तपासनीस आला तेव्हा हे गृहस्थ गाढ झोपेत होते. तिकिट तपासनीसाने त्यांना बऱ्याच हाका मारल्या, हलवलं, तरी ते काही झोपेतून जागे झाले नाहीत.

गाडी सुटायच्या पाच मिनिटं आधी एक बाई माझ्या समोरच्या बर्थवर आल्या. त्यांच्याशी जुजुबी बोलणं झालं. त्या इरोडला उतरणार होत्या. तिकीट तपासनीसाने आमचं कोणाचंच तिकिट पाहिलं नाही, फक्त नाव विचारलं, त्याच्याजवळच्या कागदावर खूण केली, आणि गेला.

अशा रीतीने प्रवासाला सुरूवात झाली.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मला जाग आली. प्रवासात असले, काही नवं करायचं असलं की मला गजराची गरज भासत नाही. खिडकीतून बाहेर मस्त पहात बसले.

(वाडी जंक्शन, कर्नाटका)

                                                                                   (कृष्णा नदी की तुंगभद्रा नदी ?) 

थोड्या वेळाने समोरच्या अम्माही उठल्या. आणि मग सकाळी सहापासून त्यांचे जे व्हिडिओ कॉल्स सुरू झाले ते काही संपता संपेनात. त्याच्यातून थोडी उसंत मिळाली की त्या युट्युबवर काहीबाही ऐकत होत्या. त्यांचा फोन, त्यांचं इंटरनेट, त्यांनी काय ऐकावं यावर मी का मत व्यक्त करतेय असं तुम्हाला वाटत असेल. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल मला काहीच म्हणायचं नाही. पण माझी अडचण अशी होती की त्या इअरफोन-हेडफोन वापरत नव्हत्या. त्यामुळे ते सगळं माझ्या कानांवर सतत आदळत होतं. “बॅग भरताना गडबडीत इअरफोन घरी विसरला वाटतं तुमचा” - असं माझं गंमतीत म्हणून झालं. पण त्याचा अर्थ त्यांना बहुधा कळला नाही. त्यांचं मनोरंजन चालूच होतं. अखेर तासाभराने मी त्यांना “जरा आवाज कमी करता का तुमच्या मोबाईलचा” असं म्हटलं. काही वेळापुरता आवाज थांबला. परत तो चालू झाला. परत मी त्यांना टोकलं. हे चक्र दिवसभर चालू राहिलं. एकंदर सार्वजनिक जागेत वावरताना मोबाईलवर मोठ्या आवाजात काही ऐकू नये हे पथ्य फारच कमी लोक पाळतात हा अनुभव नेहमीचाच. त्यामुळे मी त्याचा त्रास करून घेतला नाही.

मला त्यांना असं पुन्हापुन्हा टोकताना वाईटही वाटत होतं. कारण त्या बाई तशा अगदी साध्या होत्या. गेली चार वर्ष पुण्यात राहताहेत. मराठी, हिंदी येत नाही. इंग्रजी कामापुरतं बोलू शकत होत्या त्या. त्यांच्या माहेरी भाच्याचं जावळं वगैरे काहीतरी होतं, त्यासाठी इरोडला चालल्या होत्या. प्रेमळ होत्या बाई.

मोडक्यातोडक्या आमच्या संवादाला आणखी चांगली भाषांतरकार मिळाली ती सकाळी आठच्या सुमारास. इंग्रजी आणि तामिळ दोन्ही उत्तम बोलणारी आणखी एक स्त्री प्रवासी रायचुरला आमच्यासोबत आल्या. त्या एका खत कंपनीत शेती अधिकारी होत्या. त्यामुळे ग्रामीण भारताविषयीचे - शेतकऱ्यांविषयीचे - त्यांचे अनुभव ऐकण्याजोगे होते. महाराष्ट्रातल्या विदर्भाचीही जबाबदारी त्यांना नुकतीच मिळाली होती. त्या त्यांच्या स्थानकावर बसताना तिथून इडली घेऊन आल्या होत्या. ती इडली खाण्याचा त्यांनी मला आग्रह केला. मग मी त्या दोघींना आणि तोवर वरच्या बर्थवरून उतरून खाली आलेल्या गृहस्थांना (हे त्रिवेंद्रमचे होते, पुण्यात काही कामासाठी आले होते) माझ्यासोबत कॉफी पिण्याचा आग्रह केला. मग पुढं आपापल्या स्थानकावर ते सगळे उतरून जाईपर्यंत एकत्र खाणं आणि कॉफी घेणं चालू राहिलं.

“गैरसोय झाली तरी चालेल, पण भाषिक अस्मिता आम्ही बाळगूच बाळगू” - या संकल्पनेत लोक कसे अडकलेले असतात त्याचा मग दिवसभर अनुभव आला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना इंग्रजी येत नाही, आणि या तिघांना हिंदी अजिबात येत नाही - अशी स्थिती. त्यामुळे मला त्यांना मदत करावी लागली. सुरूवातीला मी उत्साहात होते, पण नंतर मात्र मला कंटाळा आला. दोन्ही पार्ट्या अडेलतट्टू आहेत असं माझ्या लक्षात आलं. “टी” म्हणजे “चाय” आणि “दस” म्हणजे “टेन”  इतकंही लोकांना कळत नसेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. मी नंतर निवांत वाचत बसले. तसंही हे पुस्तक लिहून झाल्यावर मी वाचलं नव्हतंच.


थोडं पल्याड फक्त हिंदी बोलणारं कुटुंब होतं. त्यांचं दीड-दोन वर्षांचं बाळ होतं. हिंदी बोलता न येणारे हे तिघं आणि इंग्रजी बोलता न येणारे ते दोघं यांच्यात काहीही संवाद झाला नाही. मला दोन्ही भाषा बोलता येतात त्यामुळे माझं काही अडलं नाही. मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे. पण समोरच्या व्यक्तीशी बोलता नाही आलं तरी चालेल, पण मी त्यांची भाषा बोलणारच नाही अशा प्रकारचा (एकांगी)  अभिनिवेश आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो त्याची ही एक झलक लक्षात राहण्याजोगी आहे.

मी त्या संवादात पाचसहा तामिळ शब्द शिकून घेतले. वणक्कम (नमस्कार), नंद्री (आभार-धन्यवाद), तंबी (धाकटा भाऊ), सापाड (खाणं, जेवण), तन्नी (पाणी), चिन्न (छोटं), सरी (ओके), इप्पडी (कसं), नल्ला (सुंदर)  ....... त्या दोघी आपापसात तामिळमध्ये बोलत होत्या तेव्हा असे बरेच शब्द संदर्भाने कळले आणि मी ते त्यांना परत विचारून खात्री करून घेतली. इच्छा असेल तर संवादासाठी कोणतीही भाषा शिकता येते. व्याकरण नाही शिकता येत लगेच, पण मोडकातोडका संवाद नक्कीच साधता येतो.

या प्रवासात आणखी एक प्रयोग केला. रेलरेस्ट्रोमधून जेवण मागवण्याचा. अनुभव चांगला होता. 


वेगवेगळ्या राज्यांतून गाडी जात असताना समोरचं दृष्य बदलत होतं. भारताचं भौगोलिक वैविध्य(ही) अचंबित करणारं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं.

(शक्तिनगर, कर्नाटका) 

(कडप्पा स्थानकाजवळ, आंध्र प्रदेश) 

(नागरकोविलजवळ, तामिळनाडू)

या सगळ्या बाह्य घडामोडींमध्ये मी कन्याकुमारीला जाण्याबद्दल विचार करत होते. मी का चालले आहे तिथं परत? एकदा सोडलेल्या जागांवर परत जायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही हे पथ्य बऱ्यापैकी पाळलं आहे आजवर. एका अर्थी परत भूतकाळाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करत होते का मी?  पण कितीतरी बदल झालेत. मीच किती बदलले आहे. परिस्थितीही बदलली आहे. अगदी या गाडीचा जुना नंबरही बदलला आहे. माझा दृष्टिकोन बदलला आहे. संदर्भ बदलला आहे. कदाचित जुन्या “मी”च्या संदर्भात आज मी कुठं आहे हे मला तपासून पाहायचं आहे का? (त्यासाठी खरं तर हजारो मैल प्रवास करायची काही गरज नसते - हेही मला माहिती आहेच की!)

खूप वर्षांपूर्वी कन्याकुमारीत  मी पहिल्यांदा आले होते, ती माझ्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. त्या घटनेचे तात्कालिक आणि दूरगामी असे अनेक चांगले-वाईट परिणाम झाले. तो प्रवास एका अर्थी आता पूर्ण झालाय. कदाचित तो साजरा करण्यासाठी कन्याकुमारी हे मला एक योग्य ठिकाण वाटलं असेल.

कळेलच काय ते पुढच्या काही दिवसांत - असं म्हणून जास्त विचार न करता मी निवांत बसून राहिले.

त्रिवेद्रमनंतर डबा जवळजवळ रिकामा झाला होता.

गाडी कन्याकुमारीला पोचली.

(कन्याकुमारी रेल्वे स्थानक) 

हे भारतातलं दक्षिणेतलं शेवटचं रेल्वे स्थानक. 

इथं माझ्या एका प्रवासाची सुरूवात झाली होती - हे माझ्यापुरतं महत्त्वाचं. 


(पुढील भाग लवकरच....) 

Wednesday, October 31, 2012

१४०. निमित्त कॉफीचं ...

वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.

वैभवने मला हुकूम सोडला. साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.

छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही. वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना करते.

आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘ वर्षाची नाही, महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने ‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय? वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – जाऊ दे, तुला नाही कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.

काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.

अरे, हे कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीचं घेणार ना, दुसरं काय? माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.

वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस.

मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी माझी आणखी एक अडचण असते.  ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन आला ते माझ्यासाठी.

आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा, ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.

मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.

तिथल्या तरुण मुलाने विचारलं, काय घेणार?
कॉफी, मी सांगितलं.
"कोणती?" 
मी एक नाव सांगितलं.
साखर हवी की नको? त्या मुलाने विचारलं.
पाहिजे, मी सांगितलं.
किती? पुढचा प्रश्न – त्याचंही उत्तर मी दिलं.
दूध? आणखी एक प्रश्न.
हो माझं उत्तर.
गरम का थंड? प्रश्न – त्याचंही उत्तर दिलं.
क्रीम हवं? प्रश्न काही संपेनात.

अरे बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला? मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.

काउंटरवरच्या त्या मुलाला माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर  ...

मला त्याच्या या उत्तराचं आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या         चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका विद्यार्थ्याला इथं सांगत होते ... तो हसून पुढच्या ग्राहकाकडे वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं , हे माझ्या लक्षात आलं.

एक तर प्रश्न माहिती पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही शिकण्यापासून सुटका नाही.

या प्रसंगानंतर काही महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी – अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत (साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.

कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक  मिळत नाही, पण इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!

माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते. कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.

मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ...
**

Tuesday, April 5, 2011

६८. गजर


‘लवकर उठे लवकर निजे त्याला सुखसमृद्धी भेटे’ अशा अर्थाचा सुविचार लहानपणी शाळेत असताना वाचला होता आणि असंख्य वेळा तो मला ऐकवला गेला होता. ‘कळत पण वळत नाही’ या सदरात ज्या अनेक गोष्टी आहेत माझ्या; त्यातली ही एक! लवकर उठण्याचे फायदे माहिती असले तरी माझ जीवशास्त्रीय घडयाळ मात्र ब-यापैकी उलट चालत! म्हणजे रात्री दोन वाजता मी उत्साहात असते, त्यावेळी मी अगदी मजेत आणि कितीही आव्हानात्मक काम करू शकते. ऑफिसच्या कामाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी असण्याऐवजी दुपारी एक ते रात्री अकरा अशी असली तर मला जास्त सोयीचं होईल – पण अर्थातच तसं काही होत नाही.

खर तर मला कितीतरी नवीन कल्पना, विचार अस ‘जग शांत झोपलेले’ असताना सुचतात. दिवसा गर्दी, भोवतालचे आवाज, माणसांशी औपचारिकता म्हणून काहीबाही बोलाव लागण ... अशा गोष्टींत बराच वेळ वाया जातो, विचारांची साखळी अनेकदा तुटते. “या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:’ हा गीतेतला श्लोक पहिल्यांदा वाचताना मला एकदम समजल्यासारखा वाटला होता! त्या श्लोकाचा खरा अर्थ वेगळाच आहे आणि आपण काही केवळ उशीरा झोपण्याच्या सवयीमुळे ‘स्थितप्रज्ञ’ बनत नाही हे कळल्यावर भ्रमनिरास झाला होता माझा आणि गीतेला नंतर बरेच दिवस मी हातही लावला नव्हता!

त्यामुळे कन्याकुमारीला पहिल्यांदा गेले तेव्हा एक नवीनच संकट माझ्यासमोर उभ ठाकल – ते म्हणजे पहाटे साडेचार वाजता उठण्याचं! एखादया दिवशी नाही तर रोज पहाटे! साधारणपणे पहाटे तीन साडेतीन ही माझी तोवर झोपी जाण्याची वेळ होती – तीच नेमकी इथ उठायची वेळ होती! अनेकदा ‘जाग आली नाही तर’ काही अडचण नको म्हणून पहाटे तीन साडेतीनला मी परिसरातल्या रस्त्यावर फे-या मारत असे. परिसर सुरक्षित होता त्यामुळे अडचण नाही यायची. रात्रपाळीच्या सुरक्षा कर्मचा-यांना सुरुवातीला जरा अजब वाटलं ते – पण अजब गोष्टींची पण लोकांना सवय होते. एरवी अशा जाग्रणातून ‘साठलेली’ झोप दुपारी पुरी करता यायची. कन्याकुमारीतही तसा दुपारी थोडा मोकळा वेळ असायचा. पण मला उगीच आपली दहा वीस मिनिटांची झोप म्हणजे स्वत:ची समजूत घातल्यासारख वाटत! त्यापेक्षा न झोपलेल परवडल! मी त्या काळात जास्त वेळ बहुतेक ‘नीट झोपायला कधी मिळेल’ याच विचारांत घालवले – अस म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही.

अर्थात याला काही दिवस, काही प्रसंग अपवाद होते. कन्याकुमारीत असताना काही दिवस हे विशेष ‘Rock’ दिवस असायचे. नाही; याचा संगीत अथवा नृत्याशी काही संबंध नाही. ब-याच ‘शुभ’ दिवसांना (आणि असे दिवस बरेच आहेत आपल्याकडे!) पहाटे उठून ‘विवेकानंद शिला स्मारकावर’ (म्हणजेच Rock!) जाण्याचा कार्यक्रम असायचा. भल्या पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही तेथे पोचायचो. त्याआधी कन्याकुमारी देवीच्या गाभा-यात जाऊन तिला (म्हणजे तिच्या मूर्तीला – हो, उगीच गैरसमज नको!) पाहणे मला आवडायचे. समुद्रावरून येणारी वा-याची थंड झुळूक, लाटांचा अव्याहत नाद, समुद्र आणि आकाशाचा एकरूप होऊन गेलेला निळा रंग, पूर्व क्षितिजावर सूर्याच्या आगमनाची हळूवार उमटत जाणारी पदचिन्ह...सगळ गूढ वातावरण 'आपल' वाटायचं! मला कधीही जिथं परक वाटलं नाही - आजही वाटत नाही - अशी ती एक जागा! त्यात भर पडायची तिथल्या ध्यान कक्षातल्या शांततेची. आपण फार भाग्यवान आहोत अस तेव्हा वाटायचं .. ही संधी मिळणार असेल तर आणखी एकदा ‘मनुष्य जीवनाच्या चक्रातून’ जायला माझी काहीही हरकत नाही! मला खात्री आहे, आत्ताही ज्यांना ही संधी मिळते ते स्वत:ला भाग्यवान समजत असतील! Rock ला जायचं असल की मी भल्या पहाटे उठायला उत्साहाने तयार असायचे नेहमीच!

मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, की काही विशेष करायचं असेल तर मला पहाटे कितीही वाजता उठायला चालत – माझी त्याबाबत काही तक्रार नसते. म्हणजे आजही टेकडी चढायला जायचय, सायकलवर गावात फेरी मारायचीय, पक्षी पाहायचेत, पाउस पडतो आहे, प्रवास करायचा आहे, मीटिंग आहे, काही लिहायला सुचलं आहे, फोन करायचाय .. अशा अनंत कारणांसाठी मला कितीही वाजता उठायला आवडत. सकाळची गाडी अथवा बस पकडायला मला आजवर कधी गजर लावावा लागलेला नाही. माझा प्रवासाचा बेत दोनच वेळा बारगळला आहे. एकदा दुपारी दोनची गाडी चुकली माझी! कारण त्यावेळी ऐन मे महिन्यात, भर दुपारी, पावसाची चिन्ह नसतानाही पुण्यात पेशवे पार्कमध्ये एक मोर नाचत होता आणि आम्ही ते दृश्य पहात बसलो! दुस-या वेळी संध्याकाळी पाचची गाडी चुकली कारण मैत्रिणीकडे एक पुस्तक मिळाल आणि ते वाचण्याच्या नादात मी किती वाजलेत ते विसरले. मैत्रिणीला अर्थात मला गाडी पकडायची आहे हे मी सांगायचं विसरले होते. अन्यथा विशेष कार्यक्रमांच्या वेळी मला घडयाळाच्या गजराची कधीच गरज भासत नाही.

पण एरवी जेव्हा काहीच विशेष घडणार नसेल त्यादिवशी मात्र मला झोपेतून उठण्यासाठी गजर लावावा लागतो. केवळ एकाच गजराने काम भागत नाही; म्हणून दोन किंवा तीन गजर लावावे लागतात. मोबाईलच्या जमान्यात असे तीन तीन गजर एकाच वेळी लावून ठेवण्याची मोठी सोय आहे. अर्थात त्या गजरांचाही एक कार्यक्रम असतो – ऋतुनुसार किंवा स्थानानुसार तो बदलतो! म्हणजे पुण्यात असताना पहिल्या गजर झाला की घराच्या खिडक्या आणि बाल्कनीचे दार उघडायचे. दुसरा गजर झाला की पाणी भरायचे, तिस-यानंतर व्यायाम करायचा .. असे ठरलेले कार्यक्रम असत. ते ते काम आटोपून दोन गजरांच्या मध्ये मला स्वप्न पडण्याइतकी गाढ झोप लागतेही. मी सहसा कधीच रात्री दोनच्या आत झोपत नाही – त्यामुळे सकाळचा गजर म्हणजे माझ्यासाठी ‘अजून झोपायला इतका वेळ शिल्लक आहे’ याचा निर्देश असतो.

ही माझी एक गंमतच आहे. साधारणपणे लोक उठण्यासाठी गजर लावतात .. मी मात्र तो ‘अजून’ झोपण्यासाठी वापरते! विशेष गोष्ट करायची असते तेव्हा साधारणपणे लोक गजर लावून उठतात. मला मात्र विशेष गोष्ट करायची असली की अगदी पहाटे तीन वाजताही आपोआप जाग येते. ठरलेल्या दिनक्रमासाठी फार कमी लोकांना मी गजर लावताना पाहिल आहे. मला मात्र रोजच्या ठरीव साच्याच्या जगण्यासाठी गजर लावून उठावं लागत!

आणि बहुतेक सगळ आयुष्य अनेकदा ठरीव साच्याचचं असत – त्यामुळे मला कायमच गजराची गरज भासते!
**