ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label राजस्थान. Show all posts
Showing posts with label राजस्थान. Show all posts

Thursday, January 12, 2012

१०८. उदघाटन


नमस्कार एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
कोण आहेत हे? मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले. त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळ मी नेहमीच करते. आणि त्यामुळे अनेकदा मी पत्रकार असल्याचा समज फैलावतो. आजही तसच झालेलं दिसतंय. म्हणून त्या खासदारांनी ओळख नसताना मला नमस्कार केला होता.

तिकडे व्यासपीठावर बसलेले खासदार माझ्याकडे पहात होते. ‘नमस्कार तर केला पण ही बाई आहे कोण’ असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. त्यांनी एकाला बोलावून काहीतरी विचारलं. त्याने दुस-याला. त्याने तिस-याला. मला काही काम नव्हत. त्यामुळे मी ती साखळी लक्ष देवून पाहत होते. अखेर त्याची सांगता मघाच्या माझ्या शेजा-याने मला ‘तुम्ही पत्रकार आहात का? अस विचारण्यात झाली. मी कोण आहे (आध्यात्मिक अर्थाने नाही तर लौकिकार्थाने) ते सांगितलं. आलेल्या वाटेने निरोप परत गेला. माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही याची खात्री पडून खासदार महोदय सैलावले.

राजस्थानमधल्या एका गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’च्या रस्त्याच उदघाटन होत – त्याच्याशी माझा खर तर काही संबंध नव्हता. पण अनेक वेळा खेडयापाडयात भटकताना ‘सडक, वीज, पाणी’ लोकांसाठी किती महत्त्वाचे असतात हे पाहिलं होत. विशेषत: जिथ मुल-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आजा-यांना वेळेत उपचार मिळत नाहीत, शेतातला भाजीपाला सडून जातो किंवा जनावरांना खायला घालावा लागतो – तेव्हा गावक-यांच्या मनात जे येत ते फक्त त्यांनाच कळेल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल माझ मत चांगल आहे. आणि शिवाय मी कधी रस्त्याच उदघाटन बघितलं नव्हत. म्हटल चला, हेही एक पाहू काय असत ते.


आम्ही मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळलो तेंव्हा
मोहरीची फुललेली शेत समोर आली. सरकारी कार्यक्रम असल्याने गाडयांचा ताफा होता. रस्त्यावर जो तो थांबून कुतुहलाने त्याकडे पहात होता. काही अंतर पक्क्या सडकेन गेल्यावर आम्ही डावीकडे वळलो तर तिथ एक मोठा मंडप दिसला. त्याच्या आत कोणी नव्हत. आधी मला वाटलं गावात कोणाच तरी लग्न असणार – पण तस काही नव्हत. हा मंडप रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी होता हे मला दोन तासांनी कळलच.


आम्ही मंडपापाशी न थांबता कच्च्या रस्त्याने पुढे गेलो. जिकडे तिकडे पुरुष निवांत बिडया फुंकत बसले होते. दोन दिवसांपूर्वी पाउस झाला होता त्यामुळे शेतात काम नव्हत. थंडीही होती चांगलीच. आम्ही एका विशाल महालवजा घरापाशी उतरलो. सुटाबुटातले एक गृहस्थ पुढे आले – त्यांनी आमच स्वागत केलं. हे या गावातले गृहस्थ – आता दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. एवढया छोटया गावातून येऊन दिल्लीत स्वत:च एक स्थान निर्माण करण ही काही सोपी गोष्ट नाही. मला त्या गृहस्थांच कौतुक वाटलं.

रस्ता या गृहस्थांच्या घरावरून जाणारा – किंबहुना त्यांना घरापर्यंत आणणारा असल्यामुळे बरेच अधिकारी हजर होते. सिमेंटची गुणवत्ता, इंटरलॉकिंग टाईल्स, रस्त्याची रुंदी, त्याची भारवाहक क्षमता, स्थानिक शेतक-यांच्या पाईप टाकून पाणी नेण्याचा गरजा लक्षात घेऊन केलेली रस्त्याची रचना .... अशी देशातल्या ज्येष्ठ इंजिनीअर्स केलेली चर्चा शिक्षणदायी होती.  तसे काम प्रत्यक्षात होते का हा प्रश्न वेगळा अर्थातच!

चहापान झालं आणि ट्रे घेऊन आणखी एक माणूस आला. आमच्या ग्रुपमधल्या कोणीच त्यातल काही घेतलं नाही तेव्हा माझ तिकडे लक्ष गेलं. जमलेल्या गर्दीत जाऊन तो माणूस परत आला तेव्हा मी त्याचा हा फोटो काढला.

 धूम्रपानाच्या धोक्यांबाबत इतक सगळ सांगितलं जात; ते किती व्यर्थ आहे याचा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी.


मग आम्ही सगळे परत त्या मंडपात गेलो. खासदार आले आणि तो रिकामा मंडप क्षणात भरून गेला. मग अनेकजण बोलले – सगळे अगदी थोडक्यात – दोन शब्दांच्या बरच जवळ पोचेल इतकच – बोलले. त्यात बरीच माहिती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ या योजनेत एक किलोमीटर रस्ता बनवायला अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च होतात. या योजनेच्या माध्यमातून देशात रोज १५६ किलोमीटर रस्ता निर्माण होतो – हे उद्दिष्ट मला आठवत तस आधी बरच जास्त होत – ते होत नाही असं दिसल्यावर हुशारीने उद्दिष्टच खाली आणलं गेलं. राजस्थानमध्ये मागच्या अकरा वर्षांत (२००० मध्ये ही योजना आली.) ८८६० नवे रस्ते निर्माण केले गेले. या रस्त्यांची लांबी ३४, ७९५ किलोमीटर आहे आणि यातून १०७०३ गावे जोडली गेली.

ही सगळी माहिती ऐकत असताना मला त्या अनामिक गावातील अनामिक चेहरे दिसत होते. विकासाच्या किमतीबद्दल आपण – ज्यांनी विकासाची फळे चाखली आहेत – बोलणे आणि त्यामुळे इतरांना संधी नाकारणे हा एक प्रकारचा दांभिकपणा आहे. रस्ते शहरात लागतात तसेच खेडयातही लागतात – फायदे आपण भोगायचे आणि त्यांच्या फायद्याची गोष्ट समोर आल्यावर मात्र पर्यावरण प्रेम जागे व्हायचे हे बरोबर नाही. 

कार्यक्रम संपला. मंडपाच्या बाहेर अनेक स्त्रिया उभ्या होत्या – त्यांची जागा नेहेमी अशी परिघाबाहेर का – हा प्रश्न मला पडलाच. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.




आम्ही जेवलो.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.


परत निघालो. तोवर मघाचा मंडप उतरवण्याचे काम जवळजवळ उरकलं होत. दोन तासांपूर्वीच्या कार्यक्रमाची नामोनिशाणी दाखवणारा उदघाटनाचा फक्त फलक तिथ होता.

इथ रस्ता नक्की होणार का – अशी शंका माझ्या मनात आली.
होईल इथ बहुतेक.
कारण दिल्लीचे ते अधिकारी. त्यांचे भाऊ इथ राहतात आणि त्यामुळे या अधिका-याच इथ नियमित येण असत.

उदघाटन झालेले सगळेच रस्ते इतके भाग्यवान असतात का पण? 
*

Wednesday, December 8, 2010

५५: भीखाराम

शिव गावातून बाहेर पडताना प्रदीप शर्मा म्हणाले, “आता तुम्हाला भीखारामच्या ताब्यात दिलं, की मग मला काही काळजी नाही.” “कोण आहेत हे गृहस्थ?” मी कुतुहलानं विचारलं एव्हाना माझ्या पंचवीस प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यामुळं असेल, ते नुसतेच हसले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता – विशेषत: २००६ च्या पुराची कहाणी ऐकता ऐकता आम्ही कधी कनासरला येऊन पोचलो ते कळलंच नाही. तिथे एक उंचेपुरे गृहस्थ उभे होते. पस्तीशीच्या आसपास त्यांचं वय असेल. त्यांचा वेष आधुनिक होता. खादीच्या जाकिटाआड लपलेल्या कपडयांची इस्त्री विस्कटलेली नव्हती. मिशांमुळे त्यांच्या चेह-याला एक प्रकारची उग्रता आलेली होती. केस काहीसे तपकिरी रंगाकडे झुकणारे, दात पान-तंबाखुचे सेवन जगजाहीर करणारे. पण ते हसले तेंव्हा त्यांचा चेहरा एकदम सौम्य होऊन गेला. ग्रामपंचायतीचे कार्यालय चांगले सजवलेले होते. वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारे फलक होते. कार्यालयात अजिबात धूळ नव्हती. ’चहा येतोच आहे’ अस भीखाराम म्हणाले तेव्हा 'आता अर्ध्या तासाची निश्चिंती’ अस मी मनात म्हटलं! पण अक्षरश: तिस-या मिनिटाला चहा आला. मी जरा आश्चर्याने पाहिलं तेव्हा भीखाराम माझ्याकडेच पहात होते. “सगळं नियोजन नीट केलंय मॅडम, काही काळजी करू नका” अस ते म्हणाले तेव्हा मी जरा खजील झाले. ’संध्याकाळी कार्यालयातच राहायला या’ भीखारामच्या आमंत्रणावर सगळ्यांचे चेहरे विचारमग्न झाले. “इथं नसेल आवडत तर माझ्या घरी चला राहायला.” भीखाराम म्हणाले. आणि हसत पुढे म्हणाले, “मी काही तुमची राजेशाही बडदास्त नाही ठेवू शकणार, पण माझ्या परीने मी चांगली करेन सोय.” त्यांच्या या खुलाशावर मी काहीतरी मोघम बोलले आणि आम्ही ’गोरसियों का तला’ या आमच्या गावाच्या दिशेने निघालो. भीखारामला मी ’जी’ वगैरे जोडत नाही, कारण या परिसरात ’राम’ हे ’राव’ सारख वापरलं जात. बाजीराव येथे असते (पहिला किंवा दुसराही!) तर त्यांच नाव बाजीराम असलं असत इकडे. सगळे पुरूष ’राम’ आणि सगळया स्त्रिया ’देवी’. मला पुढच्या दोन दिवसांत संगाराम, मग्गाराम, चेनीराम, हिराराम, नग्गाराम .. असे असंख्य ’राम’ भेटले. तुलसीदेवी, गवरादेवी (गौरा नाही, ’गवरा’च!), लालीदेवी अशा अनेक ’देवी’ही भेटल्या. गावात उतरल्यावर भीखारामने लोकांना बोलवायला सुरूवात केली. इकडंची गावंही मजेदार. म्हणजे २५० घरांचं हे गाव सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या परिसरात वसलेलं आहे. चार पाच घरांची किंवा अगदी एक दोन घरांचीही छोटी वस्ती – त्याला ’ढाणी’ म्हणतात. 'भाटी की ढाणी’, 'भिल ढाणी’ अशी त्यांची नावं कोणती कुटंबं तिथं राहतात ते जगजाहीर करतात. भिल ढाणी अर्थात जरा मोठी आहे – अंदाजे पन्नास एक घरांची. घर म्हणजे मातीच्या चार पाच वेगवेगळ्या छोट्या खोल्या. एक खोली अन्न शिजवायची, एक झोपायची, एक धान्य साठवणीची (ज्यात फक्त बाजरी दिसली सगळ्या घरांत) अशी त्याची स्पष्ट विभागणी. अंगणभर कलिंगडं वाळवायला पसरलेली. त्याच्या बिया विकणे हा पैसा कमवायचा एक मार्ग. शेळ्या घरटी किमान दोन ते तीन. कोंबडया मात्र अजिबात दिसल्या नाहीत. जाटांच्या घरात एक तरी गाय असतेच, भिल्लांकडे मात्र गाय नाही. लेकरं मात्र भरपूर. सात आठ लेकरं असणा-या किमान चाळीस स्त्रिया मला त्या दोन दिवसांत भेटल्या. आणि ही संख्या आहे जिवंत असणा-या लेकरांची. पंचवीशी- तिशीतच त्या बाया किती वेळा बाळंतपणाच्या चक्रातून गेल्या असतील याचा आपण अंदाज त्यावरून बांधू शकतो. भीखाराम लोकांना बोलवत होते, तोवर मी वही आणि पेन काढलं. भीखारामचं नाव लिहिताना आपण चुकीचं लिहित नाही ना, अशी शंका मनात आली. म्हणून देवनागरीत माझ्या वहीत लिहिलेलं नाव मी भीखारामना दाखवलं. “मॅडम, मी सांगतो तुम्हाला तसं लिहा” असं म्हणत Bheekharam असं स्पेलिंग त्यांनी मला सांगितलं. “माझा सेल नंबरही लिहा” असं म्हणत त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. “तुम्हाला नाही लागणार कधी माझा नंबर; पण मी तुम्हाला कधी फोन केला तर तुम्ही फोन बंद करू नये न उचलताच म्हणून ही खबरदारी घेतोय” अस म्हणताना भीखाराम मिस्किलपणे हसत होते. मला या माणसाबद्दल तोवर ब-यापैकी कुतुहल वाटायला लागलं होतं. लोक जमा होईपर्यंत आम्ही रस्त्यावर उभं राहून गप्पा मारायला लागलो. भीखाराम खरं तर कनासर ग्रामपंचायतीचे सचिव (ग्रामसेवकांचे हे नवे नाव!) आणि गोरसियों का तला गाव येते काश्मिर (हो! तुम्ही बरोबर वाचलंत!) ग्रामपंचायतीत. पण काश्मिर ग्रामपंचायतीचे सचिव काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत आणि सध्या भीखाराम दोन ग्रामपंचायतींचे काम पाहतात. भीखाराम उंडू गावचे रहिवासी. “तुम्ही किती शिकला आहात?” या माझ्या सहका-याच्या थेट प्रश्नावर भीखाराम हसले. “ती एक कहाणी आहे” असं ते म्हणाले. लहानपणापासून भीखारामला खूप शिकायचं होतं, पण घरात आणि गावात त्याचं कोणाला काही विशेष अप्रूप नव्हतं! मग दहावी तर पन्नास किलोमीटर अंतरावरच्या शिव गावात (जे तालुक्याचं मुख्यालय आहे) केली. बाडमेर हे जिल्ह्याचं ठिकाण आणखी पन्नास साठ किलोमीटर पुढं. पण चांगलं शिकायचं तर जोधपुरला गेलं पाहिजे असं भीखारामना वाटलं. जोधपुर पडतं साधारणपणॆ दीडशे किलोमीटर. म्हणजे घरापासून दूर, रोजचं जेवण काही घरून येण्याची शक्यता नव्हती. जोधपुरला गेल्यावर कॉलेजचा प्रवेश वगैरे तर झाला, पण राहण्याची आणि जेवणाची सोय काही होईना. खोलीचं भाडं सातशे आठशे रूपये – ते आणायचं कुठून? घरातून काही पैसे मिळण्याची शक्यता नव्हती. पोटापाण्याचाही प्रश्न होता. भीखाराम सांगतात, “आता तुम्ही शहरातले लोक टीका कराल माझ्या वागण्यावर. पण मी सरळ एका मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलं. साधी झोपडी बांधली स्वत:च आणि राहायला लागलो. सार्वजनिक नळावर आंघोळीची आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली. जे शहर गरीबांना जागा देत नाही, त्या शहरात गरीबांना स्वत:साठी अशीच जागा निर्माण करायला लागते मॅडम, मग भले तुमचा कायदा काहीही सांगो. मी कायदा मोडत होतो हे मला कळत होते, पण माझा हेतू चांगला होता, हे तुम्हीही मान्य कराल.” “राहायची सोय झाली, पण जगायला अन्नही तर लागतं. सकाळचं कॉलेज आटोपलं की दुपारी मी एका फॅक्टरीत कामाला जायला लागलो. फॅक्टरी कसली म्हणा; दगड फोडायचं काम करत होतो मी तिकडं. आमच्या भागात दगड मिळत नाही, बाहेरून येतो तो. मोठा दगड असतो, तो फोडून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करायचे, जे मग घर बांधायला वापरले जातात. लहानपणापासून मी ते काम केलेलं असल्याने मला ते माहिती होतं. माझं तिथलं काम बघून काही खाजगी ठेकेदारही मला कामाला बोलवायला लागले. अशा रीतीने कॉलेज करून मी महिन्याला हजार बाराशे कमवायला लागलो. माझा माझा खर्च भागवून घरीही थोडेफार पैसे द्यायला लागलो. असं करत करत राज्यशास्त्र विषयात एम. ए. पूर्ण केलं.” “मग गावात कसे काय परत आलात?” आमच्यातल्या आणखी एकाचा प्रश्न. “एवढया शिक्षणावर काही चांगली नोकरी शहरात मिळाली नसती. आणखी शिकायचं तोवर इथल्या प्रथेप्रमाणे लग्न झालं होतं माझं – जबाबदारी वाढतेच ना लग्नानंतर. थोडीफार शेती आहे, ती बघणं पण गरजेचं होतं. तेवढ्यात ही ग्रामसेवकाची जागा निघाली. काम तर कुठंही करावं लागणारच, मग आपल्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाल्यावर मग मी ती संधी घेतलीच. पैसे बियसे काही दिले नाहीत हं मी या नोकरीसाठी. माझ्या शिक्षणाच्या बळावर मला मिळाली ती. मी इथलाच आहे, त्यामुळे लोकांच्या अडचणी मला माहिती आहेत. आमचे लोक अडाणी आहेत, त्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं नाही. शासनाच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. मी काही फुकट काम करत नाही , शासन मला पगार देतं – पण माझ्या लोकांना माझ्या शिकण्याचा उपयोग होतो. मलाही बरं पडतं.” भीखारामच्या उत्तराने आम्हाला अंतर्मुख केलं. पुढचे दोन दिवस भीखाराम आमच्याबरोबर होते – खरं तर आम्ही त्यांच्याबरोबर होतो. गावातल्या लोकांबरोबर आम्ही पुष्कळ बोललो, त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला – त्यात भीखारामची आम्हाला खूप मदत झाली. असे अनेक कार्यक्षम, प्रामाणिक, साधे, समंजस, आपल्या समाजावर प्रेम असणारे, मदतीस तयार असणारे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत भीखाराम आज अदृश्यपणे काम करत आहेत. संघर्षातून पुढं आल्यावरही त्यांच्यात कसल्याही प्रकारचा कडवटपणा नाही. आपल्याकडे जे नाही त्याची त्यांना जाणीव आहे, पण आपल्या ताकदीवर त्यांचा विश्वासही आहे. आपली शक्ती कशी वापरायची याची त्यांनी विचारपूर्वक एक रणनीती बनवली आहे. ते लाचार नाहीत पण उद्धटही नाहीत. ते सहनशील आहेत पण त्यामुळे आपले शोषण होणार नाही इतकी काळजी ते घेतात. ते काही संत महात्मा नाहीत, त्यांनाही त्यांचा स्वार्थ आणि परमार्थ साधायचा आहे. त्यांनाही राग-लोभ असणारच. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा ते एक पाऊल नक्कीच पुढे आहेत. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता तिच्यावर त्यांनी मात केलेली आहे. भीखारामसारख्या माणसांना भेटल्यावर मनाला एक प्रकारची उभारी येते. All is not Well’ हे जरी खर असलं तरी ‘All is not over YET’ असा एक दिलासाही मिळतो!