ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Tuesday, November 15, 2016

२४६. पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट


तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते.

सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या.

बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे ते आले बघा पाटील साहेब, चल आता असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

पाटलांच्या मागोमाग एक म्हातारी चढली. ती चढताना पाटलांनी तिची पिशवी हातात घेतली होती, म्हणून आधी कंडक्टरला वाटलं की पाटलांची आई-मावशी-चुलती कोणीतरी असलं ती.

पण तसं काही नव्हतं. जागेवर बसायच्या आधीच म्हातारी कडोसरीचे पैसे काढत म्हणाली, नाशकाला जाती ना रं बाबा ही यष्टी? आर्दं तिकिटं दे मला.

आज्जे, जरा दमानं घे. बस तिकडं जागेवर. आलोच मी पैसे घ्यायला, कंडक्टर जरा त्रासलेल्या आवाजात म्हणाला.

शिवाजीनगर स्थानकातून बस बाहेर पडली. चालक-वाहकाच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नाशिक फाट्यावर आणखी एक दोन प्रवासी चढले. बस पुढं निघाली. मग कंडक्टर तिकिटं द्यायला आला. बहुतेक प्रवाशांनी तिकिटाचे नेमके पैसे आणले होते, त्यामुळे कंडक्टर खुषीत होता.

आज्जीबाईने एक नोट पुढं केली. कंडक्टरने घेतली आणि तो चमकला.

म्हातारे, पाश्शेची नोट चालत न्हाय आता. दुसरे पैसे काढ. कंडक्टर शांतपणे म्हणाला.

म्हातारी घाबरली.चांगली नवीकोरी नोट हाये की बाबा. येकबी डाग न्हाय. न चालाया काय झालं?” ती अवसान आणत म्हणाली. सुरकुत्यांनी वीणलेल्या तिच्या चेह-यात दोन आठ्यांची भर पडली.

कालपरवा टीवी बघितला न्हाय का? मोदी साहेबांनी सांगितलं की ही पाश्शेची नोट चालणार नाही आता म्हणून. सारखं सांगतायत की समदे लोकं. कंडक्टरने तिला समजावून सांगितलं.

अरं द्येवा, आता काय करू मी? बुडलं की माजं पैसं आता, आजीबाईने जोरदार हंबरडा फोडला. म्हातारीच्या आवाजाने एसटीतले सगळे टक्क जागे झाले.

आजीबाई, बुडले नाही पैसै. बँकेत नायतर पोस्टात जावा, बदलून मिळेल. आधार कार्ड आहे ना, ते घेऊन जावा सोबत, समदे मिळतील पन्नासच्या न्हायतर वीसच्या नोटांमध्ये. लगेच मिळणार, काळजी नको. एका प्रवाशाने आजीला धीर दिला. मग काही लोक आपापसात एटीएमच्या रांगांबद्दल तक्रारवजा सुरांत बोलायला लागले. तर आणखी काही लोक त्यांना देशप्रेमाचं महत्त्व पटवून द्यायला लागले. सरकारच्या धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोह नाही असा एक सौम्य आवाज त्या गजबजाटात बहुधा कुणाच्याही कानी पडला नाही.

आजीच्या आजूबाजूचे प्रवासी मात्र तिला धीर देण्याचा प्रयत्नात मग्न होते. खातं आहे का बँकेत? तिकडं भरून टाका म्हणजे फार रांगेत उभारायची पण कटकट नाही. पैशे कुटं जात नाहीत तुमचे. या पाश्शेऐवजी शंभर-पन्नास-वीसच्या नोटा वापरायच्या आता काही दिवस. आणखी एकाने सल्ला दिला.

म्हातारी सावरली. असं म्हनतायसा? बुडणार न्हाय ना पैशे? बदलून देताना कट न्हाय ना द्यावा लागणार? झ्याक हाये की मंग. पर इतका कुटाना कशापायी करतोय म्हनायचा तो मोदीबाबा?” म्हातारीच्या या प्रश्नावर सहप्रवासी हसले. मग दोन-तीन लोकांनी म्हातारीला समजावून सांगायचा प्रयत्न केला. महागाई, भ्रष्टाचार, पाकिस्तान हे तीन शब्द म्हातारीला ओळखू आले. मग म्हातारीने लोकांचं बोलणं समजल्यागत मान डोलवली. पण बरेच शब्द म्हातारीच्या डोक्यावरून गेले. पैसा काळा कुटं असतुया व्हयं या म्हातारीच्या उस्फूर्त प्रतिक्रियेवर लोक पुन्हा हसले. सगळे हसताहेत हे पाहून म्हातारीही हसायला लागली. मोदीबाबाचं भलं होवो असा तिने तोंड भरून आशीर्वादही दिला.

कुणी तुम्हाला पाश्शेहजारच्या नोटा द्यायला लागलं तर घेऊ नका बरं आज्जी, एका कॉलेजकुमाराने प्रेमळ सल्ला दिला.

म्हातारी मनापासून हसली. अरं लेकरा, मला कोण द्यायला बसलंय पैशे? काडून घ्यायला बगतेत समदे. मालक मेले माजे तवापासून सरकार मला पैशे देती दर म्हैन्याचे म्हैन्याला. समद्यांची माज्या पेन्शनीवर नजर असतीय.  देवाला जायचं म्हणून हेच लपवून ठेवलेले. हरवायला नकोत म्हणून परवाच नातवानं एक नोट करून आणली बाबा पाश्शेची. त्यो न्हाय का फटफटीवर आलता मला सोडाया, तो नातू. घे रे मास्तरा, दे तिकिट. म्हातारी मूळ पदावर आली.

कंडक्टर म्हणाला, घ्या. सगळं रामायण झाल्यावर म्हातारी विचारतेय रामाची सीता कोण ते. प्रवासी हसले.

म्हातारे, ही नोट घरी घेऊन जायची. त्या साहेबांनी सांगितली तशी पोस्टात न्हायतर बँकेत जाऊन बदलून घ्यायची. आता ती नोट आत ठेव अन् दुस-या नोटा काढ. कार्ड हाये ना? शंभर न चाळीस रूपये दे. कंडक्टर म्हणाला.

दुसरी नोट न्हाय रे लेकरा. येवढीच हाये. म्हातारी काकुळतीने म्हणाली.

काय बोलावं ते कंडक्टरला सुचेना. आजूबाजूचे प्रवासीही चपापले.

आजी, असं करू नका. मास्तरला सरकारचा हुकूम आहे. न्हाय घेता येत तेस्नी पाश्शेची नोट. शोधा जरा, सापडंल एखादी शंभराची नोट, एका प्रवाशाने समजावलं.

म्हातारीकडं खरंच दुसरी नोट नव्हती. म्हातारी रडकुंडीला आली. प्रवासीही भांबावले. एकटी म्हातारी, तिच्यासोबत कुणी नाही. तिला न धड अक्षरओळख. ना पोराचा फोन नंबर तिला माहिती. काय करायचं आता?  कुणाला काही सुचेना. सगळे गोंधळले.

तोवर चालकालाही या गोंधळाचा अंदाज आला. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि तोही चर्चेत सामील झाला.

लेट हर गेट डाऊन. आय वील बी लेट फ़ॉर .... म्हणणा-या एका भपकेबाज युवकाकडे सगळ्यांनीच वळून रागाने पाहिलं. तो गप्प बसला.

घ्या हो कंडक्टर तुम्ही ही नोट. तीस डिसेंबरपर्यंत आहे की वेळ. भरून टाका बँकेत. हाय काय आन नाय काय, एकाने सल्ला दिला.

तसं नाही करता येत मला, साहेब. ड्यूटी संपली की पैसे जमा करावे लागतात. तिकडं कॅशियर घेणार नाही पाश्शेची नोट. तुम्हीच कुणीतरी घ्या ती नोट आन द्या म्हातारीला शंभराच्या नोटा. कंडक्टरने आपलं संकट दुस-यांवर ढकललं.

सगळ्यांच्या नजरा पाटील आणि जोशींकडं वळल्या. दोघंही स्टेट बँकवाले.

शेजारी-पाजारी, नातलग, ओळखीचे लोक, बायकोच्या ऑफिसमधले सहकारी, पोरांच्या मित्रांचे पालक, बहिणीच्या सासरचे लोक ... या सगळ्यांच्या पाहिजे तितक्या नोटा बदलून मिळण्याच्या अपेक्षांचं ओझं घेऊन ते मागचे पाच दिवस जगत होते. तीस डिसेंबर फार दूर होतं अजून.

पाटील जोशींच्या कानात काहीतरी कुजबुजले. जोशींनी मुकाट्याने मान हलवली.

तेवढ्यात आपण सगळे थोडीथोडी वर्गणी काढू. आजींना तिकिट काढून देऊ. चालेल का?” असं म्हणत एका कॉलेज युवतीने वीसची नोट काढली. प्रश्न वीस-पन्नासचा नव्हता, नोटांचा होता. म्हणून तातडीने बरेच प्रवासी परत झोपी गेले. तरी बघताबघता काही नोटा जमा झाल्या. आजींना उतरवा असं म्हणणा-यानेही वीस रूपये दिले. बक्कळ साडेचारशे रूपये जमा झाले.

आजी हे घ्या तिकिट आणि हे बाकीचे पैसे ठेवा वरच्या खर्चाला. ते पाश्शे ठेवून द्या आता. पाटील म्हणाले.

देवा, नारायणा, तुजी किरपा रं समदी. या समद्यांना सुखी ठेव रं बाबा, आजींनी डोळे मिटून हात जोडले.

प्रवास पुढं सुरू झाला.

आजी, त्या पाश्शेच्या नोटेचं आता काय करायचं?” उजळणीसाठी एकानं विचारलं.

परत येयाला लागतीलच की पैशे. तवा त्या मास्तरला दीन नोट, न्हायतर मोडून घीन नाशकात. माजा पैसा काय काळा नव्हं, मी काय मोदीबाबाला ही नोट देणार नाय. आजीबाई विजयी स्वरांत, ठामपणे म्हणाल्या.

सहप्रवासी एकमेकांची नजर चुकवत आणि हसू लपवत फेसबुक- व्हॉट्सऍपवर किस्सा सांगायला मोबाईलकडं वळले.

Friday, November 11, 2016

२४५. पाश्शेहजारांच्या गोष्टी: १. बचत गट




आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?”  बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं.
राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये, रामा बेरकीपणानं म्हणाला.
दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे. म्हणजे निदान दादा आणि त्यांची माणसं तरी असचं सागंतात.
आता या कमळवाल्याला हितं काय करायचंय? केली की भर सगळी मागच्या विलेक्शनला, अजून दोन वरीसबी न्हाय झाली तर ... शेवंता कुजबुजली. पण ते ऐकून अलका फणफणली. बाया कलकल करायल्या लागल्या. कोण कॉंग्रेसची, तर कोण भाजपची तर कोणी सेनेची. गलका व्हायला लागला. ते पाहून कांता म्हणाली, उगा का भांडताय बायांनो? कधी ते हातवाले असतात तर कधी तेच कमळवाले असतात. आज येक आला, उद्या दुसरा यील.आपण कशाला बरबाद करायची आपली एकी?” बाया हसल्या. रामापण हसला.
काय निरोप आहे दादांचा?” कांताने विचारलं.
काय न्हाई. दादा म्हणले किती दिवस शंभराचीच बचत करणार बाया? हजार-दोन हजार टाका की म्हन्ले आता. दिपाळीतून वाचले असतील ते पुडं सक्रातीला मिळतील. रामा म्हणाला.
अरे बाबा, दादा मोठा माणूस हाये. आमी शंभरच कसंतरी करून वाचिवतोय, हजार कुठनं आणायचे बाबा? झाड नाही पैशाचं आमच्या दारात. सांग जा जाऊन तुझ्या दादास्नी. रखमाआजी फिस्कारली. रखमा दादांची लांबच्या नात्यातली चुलती होती. तिचं असलं बोलणं दादा मनावर न घेता हसण्यावारी नेतील हे आख्ख्या गावाला माहिती. त्यामुळे सगळे हसले.
मंग काय तर! सांगायला काय होतंय त्यास्नी. दादा देणारेत का पैसे?” आणखी एकीने धीर करून विचारलं.
तेच तर सांगाया आलतू. दादा म्हणले दोन दोन हजार देतील दादा प्रत्येक बाईला. रामा म्हणाला.
अन अट काय? परत कदी द्यायचे? व्याज किती?” प्रश्नांचा भडिमार झाला रामावर.
अट एकच. पयशे लगोलग गटाच्या खात्यात जमा करायचे. याज बीज काय नाय. जमलं तसं सा मैन्यांनी परत करायचे. कुणाला परत करायचे नसतील तरी बी चालंतंय. आपल्या गावच्या बायांची बचत वाढली पायजे असं दादांना लई दिसांपासून वाटतंय बगा. रामाने सांगितलं.
बायांची नजरानजर झाली. फुकट मिळतंय तर कशाला सोडा – असा विचार प्रत्येकीच्या मनात आला. तसंही दादा नेहमी ओरबाडून घेतो, आज देतोय म्हणजे काहीतरी भानगड असणार असाही विचार त्यांच्या मनात आला.
आम्ही काय लिखापढी करणार नाही बघ,” कांताने ठासून सांगितलं.
काय गरज नाही अध्यक्षीणबाई. दादांकडून भाऊबीज समजा, असं म्हणून रामाने पिशवीतून पाचशेच्या नोटांचा गड्डा बाहेर काढला.
रामाच्या वाटच्या ऐशी नोटा आज संपल्या. अजून एक महिना बाकी आहे.
आसपासच्या गावातल्या बचत गटांचा हिशोब रामाने मनातल्या मनात सुरू केला.


Wednesday, July 23, 2014

२०५. मर्जी

माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय;
कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये.
स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय?

त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही.
प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय.
प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी.
प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका.
इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग.  

मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे.
भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय.
असं किती काळ चालेल?

कधीतरी हे पान उलटेल.  
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.

पात्रं थोडीच लिहितात कादंबरी? मी लिहितेय.
माझ्या मर्जीने लिहीन, त्यांच्या मर्जीने नाही!

Thursday, May 29, 2014

२०२. नाटेठोम

आमची सुट्टी झ्याक.
राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ.
दिवसभर आंबे, खेळ.
अब्यास न्हाई. मार न्हाई.

घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं.
त्यांच्यासंग शुद्ध बोलते.

अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत.
मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस  काळे.
‘क्याट’ म्हनत्येत त्येला. 
खेळतात ती समदी.

त्यादिशी बगत बस्ली.
सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली.
अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”.
मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला.
मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला.

म्या इचारलं “नाटेठोम? म्हंजे?”
दादा म्हन्ला, “घरात नाही”.

तितक्यात बायेर कुनीतरी आलं.
“अण्णा आहेत का पोरी?” काका इचारले.
“नाटेठोम” म्या सांगितलं.

आईने हाक मारली.
कैतरी काम असणार.
म्या म्हन्ली ” नाटेठोम”!

*शतशब्दकथा 


Thursday, May 15, 2014

१९९. दुस्री

म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास.
गुर्जी म्हन्लं ‘आता दुस्रीत’.

म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.”
आयनं हसून श्येंगदानं दिलं.
आज्जीनं गूळ दिला हातात.
आण्णा पेन देनार हायेत.

गावभर हिंडून दारात बसली.
मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली.

आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी.
कायबी कराया गेलं की ‘ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा’ म्हनत्येत.
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.
पन सोताला शाने समजत्येत जादा.

म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!”
राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!”

म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?

*  शतशब्दकथा 

Wednesday, September 25, 2013

१७७. यष्टी

परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत.
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.

राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात.
आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ”
“अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली.

चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता.
मान्सं तमाकू थुकत व्हती.
बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली.
ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते.

जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं.
“यष्टी” समदे वराडले.

आण्णा हसत व्हते.
तेस्नी मला खांद्यावर बशिवलं.
लई लई दिसांनी.


मला यष्टी आवडली. 

Tuesday, July 23, 2013

१७१. नौस


म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत.
आज सांजच्याला आले तवा हासत व्हते.
म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!”

ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत.
“तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली.
आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”.

बाबौ! आता कायबी कराया येतंय.
कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा.

पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु.
अब्यास कर, सुद्द बोल,
भांडू नको, श्या दिऊ नको,
पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड.
गंपतीचं भजन म्हन.

घरात आय, साळंत हे. हैतच.
पोरपोरी हस्त्येत.
रडू रडू होतंय मला.

येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय.
“द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान!  

*शतशब्दकथा 

Friday, June 1, 2012

१२७. संदर्भ

दिल्लीत आल्यापासून तीन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये माझं जाणं-येणं असतं. त्यातलं तिसरं ठिकाण हे कधीकधी म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळी जाण्याचं; उरलेली दोन मात्र नेहमीची. पण शहरात मी नवीन असून आणि दिशांच माझं ज्ञान अगाध असूनही मला जाण्या-येण्यात अडचण आली नाही कधी. याच मुख्य कारण म्हणजे ही दोन्ही कार्यालयं दोन लागोपाठच्या मेट्रो स्थानकांच्या जवळ आहेत अगदी. पटेल चौक मेट्रो स्टेशन आणि केंद्रिय सचिवालय मेट्रो स्टेशन एकमेकांचे शेजारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सुरुवातीला एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात जाताना मी मेट्रोने जायचे. मला ते सगळ्यात जास्त सोपं जायचं, वेळ वाचायचा आणि मेट्रोचा प्रवास अर्थातच सुरक्षित आहे. 

पण एकच स्टेशन पुढे जायचं असं म्हणलं तरी प्रत्यक्षात मला दोन्ही स्थानकांत बरचं चालावं लागायचं. म्हणजे आधी पटेल चौक मेट्रो स्थानकात एक जिना उतरा (हे भुयारी स्थानक आहे), मग सुरक्षा तपासणी करून आणखी एक जिना उतरायचा. मेट्रो स्थानकातला एक जिना म्हणजे किमान सत्तर पाय-या. वरती चढण्यासाठी सरकते जिने आहेत, पण उतरायचं ते आपण आपल्या पायांनी! स्त्रियांसाठीचा डबा फलाटाच्या एकदम पुढच्या टोकाला असतो, तिथंवर चालायला किमान दोन मिनिटे तरी लागतातच. हे सगळ - सुरक्षा तपासणीचा अपवाद वगळता - परत एकदा केंद्रिय सचिवालय स्थानकात करायचं - इथं फक्त उतरायच्या ऐवजी चढायचं. स्थानकातून बाहेर पडलं की पाच-सात मिनिटांच्या चालण्यात मी कार्यालयात पोचते. म्हणजे मेट्रोने प्रवास करुनही या दोन कार्यालयात जाता-येता मला किमान दहा ते बारा मिनिटं चालावं लागत. पण चालण्याबद्दल माझी सहसा तक्रार नसते. शिवाय आणखी काही पर्याय मला माहिती नव्हते त्यामुळे मी बराच काळ या दोन कार्यालयांच्या दरम्यान मेट्रोने प्रवास करत राहिले.  

नोव्हेंबरमध्ये कधीतरी अशीच मी एका ठिकाणाहून दुसरीकडे निघाले असता माझ्या एका सहका-याने 'इथून तिथंवर तू कशी जातेस?' असं आपलं मला सहज विचारलं. मी सांगितलं; त्यावर तिथं आमच बोलणं ऐकत असलेले सगळे दिल्लीकर हसले. मी विचारलं "का हसता आहात" म्हणून. मग मला कळलं की ज्या दोन कार्यालयात मी नियमित मेट्रोने येत-जात होते, त्यांच्यात चालत गेलं तर फक्त दहा मिनिटांच अंतर आहे! "तू सरळ चालत का नाही जात?" असं त्या सगळ्यांनी मग मला विचारलं. दहा मिनिटं मेट्रो स्थानकात चालायचं, शिवाय सुरक्षा तपासणी, शिवाय पैसे घालवायचे -त्यापेक्षा तेवढया वेळात, तेवढयाच चालण्यात आणि पैसे खर्च न करता मी जाऊ शकते हे त्या सगळ्यांनी मग मला समजावून सांगितलं. 

त्यातला पैसे वाचवायचा मुद्दा बाजूला ठेवला तरी इतक्या जवळच्या अंतरासाठी थेट चालत जाण्याऐवजी आपण इतका सारा खटाटोप करतो हे लक्षात आल्यावर मला त्यातला विनोद कळला. मग एका सहका-याकडून मी नकाशा काढून घेतला. त्याच्या मदतीने मी अक्षरशः दहा मिनिटांत एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात पोचले. मग पुढचे अनेक महिने तो माझा शिरस्ताच झाला. ते चालणं म्हणजे घराच्या अंगणात फेरफटका मारावा तितकं सहज झालं माझ्यासाठी. हिवाळयात तर ते चालणं सुखाच वाटायला लागलं. त्यानिमित्ताने सूर्यकिरणांचा स्पर्श व्हायचा, पाय मोकळे व्हायचे. रस्त्यावरच्या इतर इमारती, वाटेतल्या बस थांब्यावर उभे असणारे लोक.. हे सगळं पाहताना मजा यायची. दुपारी दोन वाजता या रस्त्यावरुन चालत जाणं हा माझा जणू एक प्रकारे छंद झाला त्या काही महिन्यांत. 

असेच काही महिने गेले. 
पुन्हा एकदा कधीतरी मी एका कार्यालयातून दुसरीकडे जायला निघाले तेव्हा माझ्या त्याच सहका-याने "कशी जाणार आहेस?" असं सहज विचारलं. 
"नेहमीसारखी. चालत. आणखी काय?" मीही सहज सांगितलं. 

याहीवेळी आमचं बोलणं ऐकत असलेले भोवतालचे सगळेजण हसले. त्यात हसण्यासारखं काय होत, ते मला कळेना. कधीकधी मला वाटतं की माझी विनोदबुद्धी जरा मर्यादितच आहे! मी विचारलं "का हसताय" असं त्यांना. त्यावर कोणीतरी म्हणालं, "वेडी आहेस की काय तू? भर दुपारी दोन वाजता तू चालत जाणार? बाहेर तापमान किती आहे, माहिती आहे का? ही दिल्ली आहे बाईसाहेब, गृहित धरू नकोस तिला, महागात पडेल." (हे अशा थाटांत की जणू बाकीची गावं, शहर यांना गृहित धरलं तर काही अडचण नाही!!)

ऐन एप्रिल-मे-जूनमधल्या दिल्ल्लीच्या उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता दहा मिनिटं चालत जाण्याइतपत सुदैवाने मी धडधाकट आहे. मला उन्हातान्हात चालण्याचा दांडगा अनुभव आहे आणि हौसही आहे. मी अर्थात हे भाषण तिथं देत बसले नाही. त्याऐवजी मी म्हटलं, "फक्त दहाच मिनिटांच तर अंतर आहे आणि ते सोयीचही आहे मेट्रो स्थानकात चालण्यात वेळ घालवण्यापेक्षा."

"छे! छे! तू आपली मेट्रोने जा कशी. उगाच पैसे वाचवायला बघू नकोस. आजारी पडशील त्यापेक्षा हे बरं.." असा सल्ल्याचा वर्षाव माझ्यावर चारी दिशांनी झाला. 

मग मी त्यादिवशी आणि पुढचे काही महिने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मेट्रोने जात राहिले. 

मी जेव्हा चालत होते, त्यावेळी 'चालत जाणं कसं योग्य आहे" याबाबतचा युक्तिवाद होता माझ्याकडे (किंवा लोकांकडे). आता परत चालण्याऐवजी मी तेच अंतर मेट्रोने जायला लागले तर 'मेट्रोने जाणं कसं योग्य आहे' याबाबतचा युक्तिवाद तयार होता माझ्याकडे (किंवा लोकांकडे!) 

हे लक्षात आल्यावर मला हसू आलं. 

माझ्या इच्छा, माझ्या कृती कशा संदर्भानुसार बदलत जातात! कार्यालयांच्या जागा बदलत नाहीत - पण कधी ते अंतर मी चालत जाते तर कधी तेच अंतर मेट्रोने पार करते. वरवर विरोधाभासी वाटणा-या या निर्णयांच आणि कृतींच समर्थन मी तितक्याच ठामपणे करु शकते. 

कृती हेच ध्येय मानून मी माझ्या व्यवहाराला चिकटून राहिले तर प्रश्न निर्माण होतात. दिल्लीच्या उन्हाळ्यात भर दुपारी दोन वाजता चालणं - हे काही माझं ध्येय नाही, उद्दिष्ट नाही. मला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कमीत कमी त्रासात आणि कमीत कमी वेळेत पोचायचं आहे. हे पोचणं तर साधावं आणि त्रासही कमीत कमी व्हावा यासाठी परिस्थितीनुसार माझ्या कृती, माझे व्यवहार, माझं आचरण मला बदलावं लागणारंच! एका परिस्थितीत जे सर्वोत्तम असतं ते दुस-या परिस्थितीत पूर्ण निरर्थक, इतकंच नाही तर उद्दिष्ट गाठण्यात बाधा आणणारं ठरू शकतं. 

अर्थात ध्येय, उद्दिष्ट नेहमी तेच राहील असंही नाही, तेही बदलत जाण्याची शक्यता आहेच. कदाचित उद्या 'दिल्लीच्या उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता चालण्याची क्षमता आपली शाबूत आहे की नाही' हे तपासून पाहणं हेच उद्दिष्ट असलं तर? मग चालावं लागेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी, कितीही त्रास होणार असला तरीही. ध्येय जर जगावेगळं असेल; तर त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्गही जगावेगळे राहणार! अर्थात सध्या माझं असं काहीही चित्रविचित्र ध्येय नाही - मी त्याबतीत आधीच लक्ष्मणरेषा ओलांडलेली आहे, नाही का?  

उद्दिष्ट हा संदर्भ आहे. ध्येय हा संदर्भ आहे. 
परिस्थिती हा संदर्भ आहे. माझ्या क्षमता, माझी कुवत हा संदर्भ आहे. 
माझा साधनांबाबतचा निर्णय हा संदर्भ आहे. 
मला हवं ते साधण्यासाठी मी काय पर्याय निवडते तो संदर्भ आहे.

पण म्हणजे मी म्हणतेय तसं संदर्भ सारखा बदलत असतो का? हे माझं गृहितक बरोबर आहे का? 

थोडक्यात सांगायचं तर माझ्या सगळ्या वाटचालीला एक आणि एकच संदर्भ आहे.
त्याला 'जगण्याची प्रेरणा' म्हणा; त्याला 'आनंदी असण्याची ऊर्मी' म्हणा. त्याला नाव काहीही द्या. 
पण अगदी खरं सांगायचं तर 'स्व-केंद्रितता', 'स्वार्थ' हाच माझ्या जगण्याचा आणि माझ्या प्रवासाचा एकमेव संदर्भ आहे. 

**

Thursday, May 17, 2012

१२५. नवी दृष्टी

पुण्यातून अलाहाबादला चालले होते. मी नेहमी एकटीच प्रवास करते. पण त्या वेळी कधी नाही ते सोबत टीम होती. गप्पांच्या नादात स्टेशन कधी आलं ते कळलंही नाही. तिथून पुढे प्रतापगढला पोचलो. दुस-या दिवसापासून होणा-या प्रशिक्षणाची चर्चा करायला बसलो तेव्हा लक्षात आलं की माझा चष्मा मी ट्रेनमध्येच विसरून आले आहे. माझ्याभोवती सगळे 'साक्षर' लोक असल्याने पुढचा आठवडाभर माझ काही अडलं नाही. शिवाय संगणकावर अक्षराचा आकार हवा तितका मोठा करता येतो, त्यामुळे लिहायलाही मला काही अडचण नव्हती. त्यामुळे चष्म्याविना आयुष्य काही तितकं खडतर असत नाही असं लक्षात आलं. 

पुण्यात परतल्यावर पहिलं काम नवा चष्मा घेण्याचं. माझ्याकडे जुना कागद होताच डॉक्टरांनी दिलेला. म्हटलं, नवा चष्मा घ्यायचा आहेच तर नंबरही एकदा तपासून घेऊ. हे डॉक्टर भलतेच व्यस्त असतात; न सांगता गेलं तर भेटायची शक्यता कमी; त्यामुळे आधी फोन केला. हे डॉक्टर  पुण्याबाहेर  आहेत हे समजलं - दहा दिवसांनी येणार होते ते. पुढचे दहा दिवस मी ऑफिसातच असणार होते आणि संगणकावर काम करणार होते. त्यामुळे दुसरा कोणतातरी डॉक्टर गाठण्याऐवजी मी दहा दिवस थांबायचं ठरवलं. वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं वाचायला अडचण होती खरी .. पण त्यांच्याविना मी जगू शकते हे माहिती झालेलं होत तोवर. 

ते दहा पंधरा दिवस मजेत गेले माझे. संध्याकाळी ऑफिसातून घरी आलं की निवांत बसायचं; विचार करायचा ; जुनं काही आठवायचं - आणि मी बहुतेक वेळा चांगल्याच आठवणी लक्षात ठेवते - यामुळे मी हसतमुख होते. संगीत ऐकलं; रात्री झोपण्यापूर्वी योगनिद्रेची कॅसेट ऐकली; घरातली साठलेली साफसफाई केली; शेजा-यांशी गप्पा मारल्या; प्लंबर आणि इलेक्ट्रीशियन यांना बोलावून कामं उरकली.. ..वगैरे वगैरे. 

डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेहमीची तपासणी झाली. त्यांच्या साहाय्यकाने सांगितलं, "आधी तुम्हाला जवळचचं कमी दिसत होत पण आता लांबचंही कमी दिसायला लागलंय, त्यामुळे चष्म्याचा नंबर बदललाय. आता तुम्हाला बाय-फोकल चष्मा वापरावा लागणार." हे ऐकून मला वाईट वाटेलं असं गृहित धरून माझी समजूत काढल्यागत तो म्हणाला, "काळजीचं काही कारण नाही. वाढत्या वयाबरोबर हे बदल होतात - हे अगदी नॉर्मल आहे." अर्थातच तो साहाय्यक पंचविशीतला होता आणि दिवसभरात तो हे वाक्य किमान पंचवीस वेळा म्हणत असणार!!

हं!! मी 'जवळच्या' गोष्टी पाहण्यात कधीच फार हुशार नव्हते; त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष होतंच नेहमी. वयाचा आणि जवळचं न दिसण्याचा माझ्यासाठी काही संबंध नाही. मी त्या गुणवैशिष्ट्यासह जन्माला आले आहे हे मला माहिती आहे. पण माझा असा (गैर)  समज होता की मी 'दूरचं' पाहू शकते;  सोबत असलेल्या इतरांना ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या मला दिसतात; त्या वरवर अदृश्य असणा-या गोष्टींचे अर्थ मला समजतात. माझा असा स्वत:बद्दल समज होता (अजूनही आहे) की ज्या गोष्टी जन्मसिद्ध हक्क म्हणून मला लाभल्या नाहीत त्या माझ्यासाठी असणा-या  जगाचं स्वप्न पाहण्याचा मला अधिकार आहे - तसं स्वप्न मला दिसत. हे काही सहज घडत गेलं नाही, त्यात संघर्ष होता अपार .. पण मजाही होतीच.

आता प्रत्यक्ष एका विशिष्ट अंतरापल्याडचं मला सहज दिसणार नाही. जसजसे दिवस जातील तसतशी ही शक्ती आणखी कमी होत जाणार! मला तर जवळच्या गोष्टी पाहायची सवय नाही आणि तीही शक्ती कमीच होत जाणार. मला ना दूरचं दिसणार, ना जवळचं - मग इथून पुढे मी काय पाहीन? माझ्या आयुष्यात मी काय शोधेन आता जर मला दिसणारच कमी गोष्टी तर?

वय वाढताना दृष्टी कमी होत जाते हे मला फार गंमतीशीर वाटत. बाहेरच्या गोष्टी पहायला बाह्य साधनाची मदत घ्यावी लागते हे आणखी विशेष. आधी आयुष्याच्या धावपळीत 'पहायला' वेळ नव्हता .. आता वेळ मिळेल तर पाहण्याची क्षमता कमी होत जाणार ..

फक्त तरुण वयात 'पाहता' येत का माणसाला?
की आता बाहेरच लक्ष कमी करून मी 'आत' पहावं - याची वेळ झालेली आहे?
मी विचारांत पडले.


मग अखेर नवा चष्मा आला.

त्यातून सगळ काही पुन्हा एकदा स्पष्ट दिसायला लागलं.
मनात काही प्रश्न उरले नाहीत. 
काही शंका उरल्या नाहीत. 
जे काही संभ्रम निर्माण झाले होते मनात, ते लयाला गेले. 
मनात काही किंतु राहिला नाही. 


आयुष्य मर्यादितच आहे. आणि या एका आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत - ती यादी कधी संपणार नाही. 
बाह्य साधनांच्या मदतीने हा प्रवास सुकर करता येतो नक्कीच. 

जेव्हा ही बाह्य साधनंही बिनकामाची होतील, निरुपयोगी ठरतील तेव्हा मी काय करायचं हे ती वेळ, ती परिस्थिती मला सांगेलच - त्याचा विचार आत्तापासून कशाला? 

कदाचित त्या परिस्थितीत आणखी एखादी 'नवी दृष्टी' उमलेल आतून. 
एक दृष्टीच्या संपण्यातून दुसरी दृष्टी, नवी दृष्टी जन्माला येते.. हे अनुभवलं आहेच की आजवर कित्येकदा. 

या नव्या दृष्टीच स्वागत करून पुढे जात रहायला हवं....

**

Thursday, January 26, 2012

११०. पडले तरी ...

फोन वाजला. गप्पा सोडून बाहेर गेले. 
एक फोन, त्यातून दुसरा, त्यातून तिसरा असं करत मी चांगली अर्ध्या तासाने आत आले. 
मी आल्यावर क्षणभर शांतता.
अंदाज होताच मला, तरीही मी निरागसपणे विचारलं, "काय बोलत होतात एवढ?" 
"मी आल्यावर शांत  का झालात?" हा मी स्पष्ट न विचारलेला प्रश्न अगदी स्पष्ट होता. 
"तुझ्याबद्दलच बोलत होतो अर्थात" धनश्री म्हणाली.
मी अनेक किस्से देते त्यांना बोलायला त्यामुळे त्यात मला काही नवं नव्हत, त्यांनांही नव्हत! 
आज मी चुकीच्या ठिकाणी उतरले होते. जागेची खात्री न करताच चारचाकी सोडून दिली होती.  
मग रिक्षावाले नाही म्हणाले  - कारण मला बरोबर विरुद्ध दिशेला जायचं होत. 
त्यावर रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता.
किंवा त्याहून म्हणजे एक फोन केला तर कोणीही मला तिथवर घ्यायला आलं असत - अगदी आनंदाने.
पण मी चालायला सुरुवात केली.
रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. सुनसान होता रस्ता. 
आजूबाजूला घरं - दुकान नव्हती. माणसही नव्हती. 
एकदम शांतता. 
पण हवा मस्त होती. 
मला चालायला मजा येत होती. 
सामान हातात थोड कमी असत तर चाललं असत - पण त्याने फार काही बिघडत नव्हत.
अशा रीतीने मी पाउण तास उशीरा पोचले होते. 
आणि त्यावरच माझ स्पष्टीकारण जेमतेम देऊन झालं होत, तोवर मी फोनमुळे बाहेर गेले होते.
"तुझा दृष्टिकोन फार सकारात्मक आहे , मला हेवा वाटतो तुझा ..." प्रिया  म्हणाली. 
"आणि कोणत्या अडचणींना घाबरत नाहीस तू" अनुराधा म्हणाली.
"असलं बोलून तुम्ही तिला बिघडवून टाकताय अजून" जयेश एकदम वैतागला होता. 
"का रे बाबा?" अमित बोललाच.
"अरे, ही चुकून भलतीकडे उतरली .. म्हणजे हिला इतक्यांदा इथ येऊनही रस्ता कळला नाहीये..." जयेश म्हणाला. 
"त्यात भर म्हणजे रिक्षा करावी किंवा आपल्याला फोन करावा हे तिला सुचलं नाही. ..." जयेशच चालूच.
"हो रे बाबा, पण मला चालायचं होतच .. कितीतरी दिवसांत मी अशी एकटी चालले नव्हते .. मग घेतली संधी ..." मी त्याला जरा शांत करायचा प्रयत्न केला. 
"तुला अंदाज होता तू किती मागे उतरली आहेस ते?" त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं.
"मला वाटल पंधरा मिनिटांत पोचेन मी इथवर .. " मी सांगायचा प्रयत्न केला.
"हेच मला तुझ आवडत नाही ..." आता संतोष खेळात सामील झाला.
"अरे बाबांनो,  माहिती आहे ना तुम्हाला हिचा स्वभाव ...." कीर्ति माझी बाजू घेत म्हणाली. 
"बदलायला नको का हा हिचा स्वभाव?" जयेश  मला आज एवढ्या गांभीर्याने का घेत होता, माहिती नाही. 
मग बराच काळ सगळ्यांनी एकेमेकांना सुनावण्यात गेला. मी शांत होते. मला अशी चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची सवय नाही. एरवी मी विषय बदलला असता .. पण आज मला कोणी दाद देत नव्हत. 
काही काळाने एक गोष्ट - जी बहुतेक जयेश, अमित, संतोष. ऋतुजा. मेघना  मघापासून सांगायचा प्रयत्न करत होते  - माझ्या लक्षात आली. 
एखाद्या प्रसंगात सकारात्मक दृष्टिकोन असण ही बाब वेगळी.
पण मी प्रत्येक प्रसंगातून  - मला काहीतरी शिकायला कसे मिळालं, मला त्यात कशी मजा आली  यावरच लक्ष केंद्रित करत असते!  हा माझा एक स्वभाव बनला आहे. 
ज्याच वर्णन आणखी एका प्रकारे करता येईल. ते म्हणजे 'पडले तरी नाक वर...' 
सकारात्मक दृष्टिकोनाच्या गोंडस नावाखाली मी केवळ बदलायला नकार देत आहे असं नाही तर मी माझ्या अहंकाराला पण खतपाणी घालते आहे. 
मी हसून म्हणाले, "बरोबर. एकदम कबूल. मला माझा स्वभाव बदलायला पाहिजे हे मला पटलं आहे ..." 
त्यावर सगळ्यांनी निश्वास टाकला.
त्यांचा आनंद क्षणभरच टिकला पण.
कारण पुढच्याच क्षणी मी मूळ पदावर जात म्हणाले, "आता यावर एक लेख लिहायला हरकत नाही ...." 

Thursday, December 15, 2011

१०४. रिकामपणातलं पूर्णत्व


एखाद शहर कितीही सुरक्षित वाटत असलं आपल्याला, तरी भल्या पहाटे तिथ पोचण टाळायला पाहिजे शक्यतो, हे मी पुरेशा अनुभवानंतर शिकले.

मी ऑफिसच्या क्वार्टर्समध्ये रहात होते तेव्हा आलेल्या एका अनुभवानंतर आता ‘पुरेसे’ झाले आहेत अनुभव असा निष्कर्ष मी एकदाचा काढला. एकदा सकाळी साडेपाच वाजता घरी पोचताना रिक्षावाल्याने मला शांतपणे ‘फक्त तीनशे रुपये’ मागितले – त्या काळच्या शंभर रुपयांच्या अंतरासाठी. अगदी ‘परतीचे भाडे’ गृहित धरले तरी ही रक्कम दीडशे रुपयांच्या वर जात नव्हती. पण माझ ऑफिस एकाकी रस्त्यावर होतं आणि आमचे गेटवरचे सुरक्षारक्षक गायब झाले होते कुठेतरी. रस्त्यावर कोणी नव्हतं मी आणि तो रिक्षावाला वगळता. मी त्या रिक्षावाल्याला काही म्हणायच्या आधीच तो म्हणाला, मी आत्ता तुमच्या हातातला laptop घेऊन पळालो, तर तुम्हाला केवढ्याला पडेल ते बघा.’ त्यावेळी मी हाक मारली तर ऐकायला परिसरात कुत्रही नव्हतं. मला धक्का वसला त्या रिक्षावाल्याच्या बोलण्याचा – तरी ‘बर झाल तुम्ही काय परिणाम होईल ते आधी बोललात ते ‘ अस म्हणत मी त्याला मुकाट्याने त्याने मागितलेले पैसे दिले. तो भाग किती एकाकी आहे हे मला माहिती होतं, रिक्षावाल्याला माहिती असण्याची शक्यता कमी (नाहीतर त्याने थेट कृती नसती केली का धमकी देण्याऐवजी) असा तर्कशुद्ध विचार मला नंतर    ब-याच तासांनी सुचला!

मग मी पुणे रेल्वे स्थानकावर असलेली (गेले ते दिवस!) ‘Pre Paid’ रिक्षा सेवा वापरायला सुरुवात केली. इथ निदान काही झालच दुर्दैवाने तर नंतर तक्रार तरी करता येते. एक पोलिस हवालदार त्या बूथवर असायचा आणि रिक्षाचा नंबर आणि आपला संपर्क नंबर लिहून घ्यायचा तो. ही सेवा केवळ एक रुपयात मिळायची – तरीही पुणेकरांनी न वापरून ही सेवा बंद पाडली पुढे. असो.

एकदा पहाटे पाच वाजता मी या बूथवर पोचले. मी एकटीच आहे अशी खात्री करून घेतल्यावर पोलिसमामांनी मला एक तासभर स्थानकावरच वेळ काढण्याचा सल्ला दिला. त्या काळात रिक्षावाल्यांनी प्रवाशांना लुटण्याच्या असंख्य घटना घडत होत्या त्यामुळे पोलिस जास्त सावधगिरी बाळगत होते. ‘एक कप चहा घ्या, एखादा पेपर घ्या, वाचत बसा, तास कसा गेला तुम्हाला कळणारही नाही ... अशी मोलाची भर त्याने त्याच्या सल्ल्यात टाकली. ‘सहाच्या आत एकट्या व्यक्तींना रिक्षाने जाऊ द्यायचं नाही पहाटे’ अस काहीतरी धोरण त्या काळात असणार पोलिसांच! आता साक्षात पोलिस ‘जाऊ नका’ म्हटल्यावर आणि ते आपल्या भल्यासाठी असल्यावर स्थानकावर बसून राहण भाग होत मला. आपल्याच गावात, प्रवासातून परत आल्यावर असा स्थानकावर वेळ काढावा लागण म्हणजे काय भयंकर अनुभव असतो, हे जे त्यातून गेलेत त्यांनाच कळेल.

मग मी माझ प्रवासाच धोरण बदललं. भल्या पहाटे पुण्यात पोचणार नाही अशाच ट्रेनन मी यायला लागले. मला खर तर भल्या पहाटे माझ्या घरी परत यायला आवडायचं ..पण काय करणार?

पण त्या दिवशी मात्र मला पहाटे पाच वाजता पुण्यात पोचणा-या ‘अहिंसा एक्सप्रेस’च तिकीट मिळालं होत. दिवाळीच्या सुट्ट्यांचे दिवस होते – जे तिकीट मिळतं ते घ्या अशी स्थिती होती. त्यामुळे तिकीट बदलायच्या भानगडीत मी पडले नाही. मला पुढच चित्र दिसत होत – स्टेशनवर बसून राहाण्याच – पण नाईलाज होता. मला पुणे रेल्वे स्थानकावर बसून रहायचं जीवावर आलं होत. मग मी ठरवलं की आपण शिवाजीनगर स्टेशनवर – म्हणजे एक स्टेशन आधीच उतरू. तिथही बसून राहावं लागेल तासभर – पण निदान बसून राहण्याची जागा तरी बदलेल असा माझा विचार होता. पावणेपाचच्या आसपास गाडी शिवाजीनगरला पोचेल तेव्हा तिथे पहिली लोणावळा लोकल पकडणा-या लोकांची गर्दी असेल असा मी अंदाज बांधला.

शिवाजीनगरला गाडी थांबली. बरेच लोक उतरले. मीही उतरले. हातात घड्याळ नव्हत त्यामुळे वेळेच काही भान नव्हत. दोन नंबरच्या फलाटावरून एक जिना चढून आणि उतरून मी एक नंबरच्या फलाटावर आले तेव्हा फलाट अगदी रिकामा होता. स्टेशनवर उतरलेले सगळे लोक घाईघाईने बाहेर पडले होते. ते ठीक. पण लोणावला लोकलसाठी कोणीच कसं नव्हत? मी फलाटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली आणि माझ्या लक्षात आलं की पहाटेचे फक्त साडेतीन वाजलेले आहेत. ही गाडी राजकोट ते त्रिवेंद्रम अशी सुपर असल्यामुळे ती पुण्यात तासभर आधी येते नेहमीच्या अहिंसा एक्सप्रेसपेक्षा हे मी विसरून गेले होते पार!



त्या क्षणी त्या फलाटाच, त्या स्थानकाच रिकामपण आणि तिथली शांतता मला एकदम आवडली. जणू ती माझ्यात झिरपली. मी एकटी होते तरी मला भीती नाही वाटली. स्टेशन असं निर्मनुष्य नसेल, कोणीतरी रेल्वेची माणस असतील इथच कुठतरी असा विश्वास होता मला कदाचित. मी दोन तीन दीर्घ श्वास घेतले. पहाटेच्या त्या ताज्या हवेने मला एकदम बर वाटल, डोळ्यातली झोप निघून गेली. मग मला एका बाकड्यावर झोपलेलं एक कुत्र दिसलं. माझी चाहूल लागल्यावर त्याने क्षणभर डोळे उघडले, आणि निर्विकारपणे माझ्याकडे पाहिलं. परत त्याने डोळे मिटले – माझी अजिबात दखल न घेता!

आसमंतात फक्त शांतता होती. फलाटावरच्या घड्याळाची टिकटिक आणि माझ्या हृदयाचे ठोके एवढाच काय तो आवाज होता. कुत्री भुंकत नव्हती, पाखर झोपली होती, माणसं नव्हतीच तिथ. मी एका नव्या जगात; एका गूढ विश्वात गेल्यासारखं वाटत होत मला त्या क्षणी! सगळ माहितीच असूनही नवं वाटाव असं काहीतरी विचित्र होत! एक प्रकारच मृगजळ, मायावी दृश्य होत ते! आता यातून नवं जग उदयाला येईल आपल्या नजरेसमोर अस वाटाव अशी परिस्थिती होती. एक परिपूर्ण आणि असीम शांतता होती माझ्या भोवताली आणि तिच प्रतिबिंब माझ्या आतही होत! माणसांनी निर्माण केलेल्या रचना, वास्तू यांच्यातही एक वेगळ सौंदर्य आणि शांती असते असं मला त्या पहाटे प्रकर्षाने जाणवलं. माणसाच आणि निसर्गाच नात कधीही तुटणार नाही असा दिलासा मिळाला मला तेव्हा – का कुणास ठावूक!

शिवाजीनगर स्थानकावर भल्या पहाटे एकटीने व्यतीत केलेल्या त्या क्षणांनी मला नकळत पुष्कळ बळ दिलं. भौतिक विकास, भौतिक प्रगती आणि आंतरिक विकास हे किती परस्पर संबधित असतात, किती परस्पर विरोधी असतात, त्यांच्या नात्याचे ताणेबाणे काय असतात .... असा काहीसा असंबद्ध विचार त्या काळात मी करत होते .... त्या सगळ्या प्रश्नांची एकदम उत्तर मिळाल्यागत झालं त्या अनुभवातून. जणू सगळे प्रश्न संपून गेले.

असाच अर्धा पाऊण तास गेला. मग चहाचा काउंटर उघडला. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. पेपर विकणारा आला. त्यानेही माझ्याकड पाहिलं. लोक आले. आवाज वाढला. तोवर शांत झोपलेलं कुत्र एक आळस देऊन नाहीस झालं. कावळे-चिमण्यांचे आवाज यायला लागले. गाडी आली. त्यात लोक चढले – उतरले कोणीच नाहीत. कारण पुणे स्थानकातून लोणावळ्याला जाणारी पहिली लोकल होती ती. एका मिनिटासाठी ती गाडी चुकलेल्या लोकांची गर्दी झाली. दिवस उजाडला. तोवर ते गूढ वाटणार जग आता रोजच्यासारख झालं. मला त्या सगळ्या बदलाशी जुळवून घ्यायला थोडे कष्ट पडले. हातातून काहीतरी अमूल्य निसटतय अस वाटल ..... पण तसं नाही हेही कळलं.

आजवर शेकडो वेळा मी आले गेलेले हे स्टेशन. त्या पहाटे रिकामपणातल पूर्णत्व, काही नसल्यातलं असलेपण .... याचा मला एक वेगळाच अनुभव आला. वरवर दिसणा-या विरोधाभासात एक धागा असतो सातत्याचा हे समजून आतून एकदम शांत झाले मी.

आता कधी जेव्हा एखाद्या द्वंद्वात सापडते मी मनाच्या – भावनांच्या, विचारांच्या, मूल्यांच्या – त्यावेळी रिकामपणातल्या त्या पूर्णत्वाची मला आठवण येते .. आणि हरवली आहे असं वाटणारी वाट पुन्हा एकदा नव्याने गवसते मला.
**

Thursday, December 8, 2011

१०३. . भायर वचपाची वाट

अलिकडे मला एक नवीनच जाणीव झाली आहे.  किंबहुना जाणीवेची जाणीव झाली आहे असं म्हणावं लागेल.
ती म्हणजे: शब्द, माणसं, रस्ते, प्रवास ... या सगळ्यात फार मोठ साम्य आहे.
म्हणजे कोण कधी भेटतील; कोण सोबत राहतील; कोण मागे पडतील; कोण लक्षात राहतील; कोण विसरले जातील; कोण सुखावतील आणि कोण दुखावतील; कोण ओळखीचे असून अनोळखी होतील; कोण अनोळखी असतानाही आपले वाटतील; कोण कधी परके होतील ....... कशाच काही गणित नाही. सगळच बेभरवशाचं!
नागपूर – अमरावती – मुंबई असा प्रवास करत करत – प्रत्येक ठिकाणी कामं करत -  मी त्या सकाळी गोव्यात डाबोलीम विमानतळावर उतरले तेव्हा खर तर मी ब-यापैकी दमलेली होते. पुढच्या चार दिवसांच काम समोर दिसत होत. बाहेर पडताना मला बोर्ड दिसला ‘भायर वचपाची वाट’ आणि मी एकदम स्तब्ध झाले.
कितीतरी रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर, कार्यालयांत ... ही सूचना वाचलेली. ‘बाहेर पडण्याचा मार्ग’ – त्यात नवं काहीच नाही – कोणत्याच अर्थाने. शब्द जुने, त्यांचा प्रचलित अर्थ जुना, त्यातून काय करायचे हेही स्पष्ट – कोठेच अनिश्चितता नाही. तरी मला एकदम ते शब्द काहीतरी सांगताहेत असं वाटल.
मग कितीतरी गोष्टी आठवल्या.
सिंहाच्या गुहेत आत जाताना दिसणारी पावलं पण बाहेर न पडणारे प्राणी ...
बाहेर पडायचं कस हे माहिती नसताना चक्रव्यूहात शिरणारा आणि प्राण गमावणारा अभिमन्यू ....
भूकंपात ढिगा-याखाली गाडले गेलेले लोक ....
पर्याय नसल्याने दु:खाची नाती निभावत राहणारे लोक ....
कांही प्रसंग निसर्गाने, नियतीने दिलेले ...काही ओढवून घेतलेले ...
प्रत्येक वेळी मी ‘भायर वचपाची वाट’ शोधताना माझी झालेली तगमग आठवली; त्यातली उत्सुकता आठवली; त्यातला साहसाचा भाव आठवला; त्यातला आनंद आठवला; त्यातलं नाविन्य आठवल; जे नवं होत ते जुनं होत जाताना झालेला भ्रमनिरास आठवला ...
खरं तर प्रत्येक गोष्टीतून ‘भायर वचपाची वाट’ असतेच .. पण कधी ती दिसत नाही, कधी ती सुरक्षित वाटत नाही, कधी अडकून राहण्यातच मनाला समाधान वाटत राहतं .. तर कधी नवे धोके पत्करायची आपली तयारी नसते ...कधी इच्छा असते पण शरीराची ताकद नसते .... कधी ‘असू दे असंच’ अशी मानसिकता असते.
पण ‘भायर वचपाची वाट’ आहेच ... ही जाणीवच बराच  दृष्टिकोन बदलून टाकते हे मी पुन्हपुन्हा अनुभवलं आहे हे मात्र खरंच!
‘भायर वचपाची वाट’ शोधत राहण्याचा हा एक चक्रव्यूह  आहे आणि त्यातून ‘भायर वचपाची वाट’ नाही असं तर नाही ना हे अखेर ? – अशी एक शंकाही  आत्ता हे लिहिताना माझ्या मनात डोकावली आहे .....