ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label अण्णा हजारे. Show all posts
Showing posts with label अण्णा हजारे. Show all posts

Sunday, April 1, 2012

१२०. पुन्हा जंतर मंतर: भाग २


दोन शहीदांची माहिती देऊन झाल्यावर टीम अण्णाचे एक ज्येष्ठ सदस्य श्री. संतोष हेगडे बोलायला येतात तेव्हा त्यांच्यासाठी खुर्ची येते. ते ७२ वर्षांचे आहेत (असे तेच सांगतात पुढे) त्यामुळे त्यांना कदाचित उभ राहून बोलायला त्रास होत असणार. त्यांच्या सोबत श्री. केजरीवाल दुसरा ध्वनिवर्धक हातात घेऊन का उभे आहेत हे मला आधी कळत नाही - पण ते पुढच्याच क्षणी कळत. हेगडे साहेब इंग्रजीत बोलतात आणि दर दोन तीन वाक्यांनंतर त्यांचा अनुवाद केजरीवाल (त्यांचा उल्लेख इथ अरविंदभाई असा होतो आहे) करतात. मला केजरीवालांच्या साधेपणाचं कौतुक वाटत. तितक्याच सहजतेने ते पुढे आंध्र प्रदेशातून सोला रंगा राव यांच्या नातेवाईकांच्या इंग्रजी बोलण्याचा अनुवाद हिंदीत करतात. केजरीवालांशी वैचारिक मतभेद आपले असू शकतात पण हा माणूस हाडाचा  कार्यकर्ता आहे याची खूणगाठ नकळत माझ्या मनात बांधली जाते. कर्नाटकातील अवैध खाणकामाचा तपास लोकायुक्त या नात्याने श्री. हेगडे यांनी सुमारे चार वर्षे केला आहे आणि त्याचा २६००० पानांचा अहवालही सादर केला आहे. श्री. हेगडे यांच्या मते कर्नाटकातील अवैध खाणकामात ३ मुख्यमंत्री, ५ मंत्री आणि ७०७ अधिका-यांचा सहभाग आहे. श्री. हेगडे स्पष्टपणे सांगतात, "राजकीय पाठबळाशिवाय इतक्या मोठया प्रमाणावर बेकायदेशीर काम होऊ शकत नाही."

उत्तर प्रदेशच्या समाजकल्याण खात्यातील अधिकारी श्री. रिंकु सिंग राही हे नंतर बोलायला समोर येतात. त्यांना धमक्या तर अनेक मिळाल्या आहेत  आणि या गृहस्थावर  एकदा सहा  गोळ्या झाडल्या गेल्या आहेत - त्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे; त्यांचा जबडा कायमचा वाकडा झाला आहे; त्यांच्या दोन्ही हातांत गोळ्या घुसल्या आहेत. आता कृत्रिम डोळा बसवून ते काम करतात. हे असे घडण्याचे कारण? आपल्याच खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध ते लढत आहेत. “मी मेलो नाही या शहीदांसारखा गोळ्या खाऊन याचे मला कधीकधी वाईट वाटते” अशी सुरुवात करून ते म्हणाले, "याचा अर्थ इतकाच की माझे इथले काम अजून संपले नाही." हा गृहस्थ २६ मार्चपासून लखनौमध्ये उपोषणाला बसणार होता. इतके सोसून, हाती काही न पडूनही या माणसाकडे लढण्याची प्रेरणा कुठून आली असेल असा प्रश्न मला त्यादिवशी पडला. हा माणूस अशी लढाई लढताना आणखी किती काळ जिवंत राहू शकेल अशी एक काळजी मला त्या वेळी वाटली, आजही वाटते.

श्री. मनीष सिसोदिया यांनी गेल्या एप्रिलपासून घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढावा सादर केला. त्यानंतर बोलायला उभे राहिले अरविंदभाई. अरविंदभाईंनी लोकांना एक थेट प्रश्न विचारला. "सध्याची संसद जन लोकपाल बील आणेल असे तुम्हाला वाटते का?" यावर समुहाने एकमुखाने "नाही" असा घोष केला. हे का शक्य नाही याचे स्पष्टीकरण मग अरविंदभाईंनी सविस्तर दिले. "मी संसदेचे पावित्र्य मानतो, तिचा अपमान होईल असे वक्तव्य मी कधीही केलेले नाही" असे सांगून ते म्हणाले की, "संसदेत बसणारे लोकच संसदेचा अपमान त्यांच्या व्यवहारातून करत असतात हे पुन्हापुन्हा दिसते आणि त्यामुळे मी व्यथित होतो."

प्रसारमाध्यमांचा हवाला देत त्यांनी पुढे म्हटले की, "आज लोकपाल कायदा असता तर केंद्रिय मंत्रीमंडळातील १४ मंत्र्यांवर अधिकृत तक्रार दाखल करता येईल. कोण असतील हे मंत्री, सांगा पाहू" असे लोकांना त्यांनी आवाहन केल्यावर लालूप्रसाद यादव, राहुल गांधी अशी नावे प्रथम पुढे आली. "अरे, हे केंद्रिय मंत्री नाहीत" असे अरविंदभाईंनी समजावून सांगितल्यावर मग लोकांनी चिदंबरम आणि कपिल सिब्बल या दोघांपासून सुरुवात केली. तांदूळ निर्यातीच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख झाल्यावर "चावलचोर" अशी पदवी लोकांनी दिली. कोळसा घोटाला आदल्या दिवशीच उघड झाला होता - त्याचीही चर्चा झाली. एअर इंडियाला आवश्यकता नसताना कशी विमाने खरेदी करण्यात आली आणि त्यामुळे देशाचे किती नुकसान झाले हेही त्यांनी सांगितले. या चौदा मंत्र्यांच्या यादीत चार मंत्री महाराष्ट्रातले आहेत - म्हणजे निदान या क्षेत्रात तरी महाराष्ट्र मागे नाही(!) असे म्हणता येईल. या चर्चेच्या दरम्यान लोकसभेत लोकपाल बीलावर झालेल्या चर्चेच्या काही क्षणफिती दाखवण्यात आल्या. संसद किती गांभीर्याने या विषयावर चर्चा करत होती, याचे पुन्हा एकदा झालेले दर्शन लोकांना चीड आणणारे होते.

केजरीवालांनी संसदेतील आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले: “आज लोकसभेत १६२ खासदार असे आहेत की ज्यांच्यावर ५२२ विविध अपराधांबाबत तक्रार दाखल झालेली आहे. देशभरात एकूण ४१२० आमदार आहेत, त्यांपैकी ११७६ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा आरोप झाला म्हणजे कोणी लगेच गुन्हेगार ठरत नाही हे मान्य करूनही काही प्रश्न शिल्लक राहतातच. न्याय जलद न मिळण्यात राजकीय नेत्यांचा फायदा असतो त्यामुळे तीस तीस वर्ष खटला चालू राहणा-या व्यवस्थेत आपण काहीच दुरुस्त्या केल्या नाहीत असे सांगून त्यांनी मागणी केली की : आमदार-खासदारांवरील गुन्ह्यांचा निकाल लावण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन करा; वर्षभरात त्यांच्यावरचे खटले चालवून निकाल जाहीर करा; जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल; जे निर्दोष आहेत त्यांना परत त्यांचे संसदेतले, विधानसभेतले स्थान द्या.” हीच आकडेवारी पुढे केजरीवाल यांनी राज्यसभेकडून त्यांना आलेल्या 'संसदेचा अपमान केल्याच्या' नोटीसला दिला आहे. ते सविस्तर उत्तर इथे पाहता येईल. ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांना विविध राजकीय पक्ष निवडणुकीचे तिकिट देतातच का? - असाही एक मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

किरण बेदी यांना मागच्या दोन्ही प्रसंगी मी ऐकलं नव्हत - ती संधी आज मिळाली. थोडसं पुढे झुकून शांतपणे बोलण्याची त्यांची शैली एखाद्या अभ्यासू प्राध्यापकाला साजेशी वाटली. मधेच कोणीतरी बोलत होत आपापसात तेव्हा त्यांना "आप दो मिनिट चूप बैठेंगे?" असं विचारताना त्या पोलिस अधिकारी होत्या त्यांच्या उमेदीची अनेक वर्षं हे चांगलच जाणवलं. आश्चर्य म्हणजे होत असलेल्या घटनांची जबाबदारी काही अंशी आपलीही आहे - हे त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. आपलं 'एक' मत मौल्यवान आहे आणि आपण ते जबाबदारीने वापरलं पाहिजे याची त्यांनी लोकांना आठवण करून दिली. लोकपाल बील लोकसभेत मंजूर झालेलं आहे आणि राज्यसभेत बाकी आहे, राज्यसभेतली पक्षनिहाय स्थिती कशी आहे, सी.बी.आय. लोकपालच्या अखत्यारीत येत की नाही हा कसा महत्त्वाचा मुद्दा आहे अशा अनेक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितल्या. पण लोकांना बहुतेक त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आवडत नाही. कारण बेदी बोलत असताना माझ्याशेजारी सकाळपासून बसलेला एक तरूण फोनवर सांगत होता, " अरे, यह मॅडम अब बोअर कर रही है, चलो, निकल जाते है यहासे ...".

सगळ्यात शेवटी अण्णा बोलायला उठले तेव्हा समूह एकदम शांत झाला. "प्रजासत्ताक दिवस आपण गावात साजरा करतो पण सत्ता मात्र मुंबई-दिल्लीत असते" असं सांगून ते म्हणाले, "की चूक आपलीच आहे. मालक आपण असून आपण झोपी गेलो. ज्यांना आपण सेवा करायला निवडून दिले ते मग आपल्या तिजोरीवर डल्ला मारायला लागले." अण्णांची ही सोपी साधी भाषा समुहाला भुरळ घालते हे मी पुन्हा एकदा पाहिलं. अण्णा अनेक मराठी शब्द त्यांच्या भाषणात वापरतात. आजही ते म्हणाले, "अभी जग गये है अच्छी बात है, लेकिन अब दुबारा डुलकी मत लेना." आता तिथं डुलकी शब्दाचा अर्थ कोणाला कळणार? माझ्या शेजारचा एक माणूस म्हणाला, "यह क्या बोल रहे है अण्णा?" त्यावर दुसरा म्हणाला, "अरे, झपकी मत लेना ऐसा बता रहे है". त्यावर तिसरा म्हणाला, "यह अण्णा थोडे और पढे-लिखे होते तो अच्छा होता" त्यावर चौथा म्हणाला, "अरे, जादा पढे-लिखे लोगोंनेही तो हमको मूर्ख बनाया है आज तक, हमे ऐसाही गाँवका आदमी चाहिये."

"मी मंदिरात राहतो, माझ्याजवळ काही नाही; तरी मी आजवर ४ मंत्र्यांच्या आणि ४०० अधिका-यांच्या विकेट घेतल्या आहेत" हे अण्णांच बोलणं कोणालाच आत्मप्रौढीच वाटलं नाही यातून लोकांचा अण्णांवरचा विश्वास दिसून येतो. अण्णांनी मग नकाराधिकार, निवडून दिलेला प्रतिनिधी परत बोलवण्याचा अधिकार यावर त्यांचे विचार मांडले. बाबा रामदेव आणि ही टीम एकाच लढयाचा भाग आहेत आणि इथून पुढच्या घडामोडींत ते एकमेकांच्या बरोबर असतील अशीही घोषणा त्यांनी केली. (भ्रष्टाचार करणारे एक होतात, तर भ्रष्टाचाराविरोधात लढणा-यांनी एक का होऊ नये असे आधीच कोणीतरी बोलण्याच्या ओघात म्हणून गेला होता.) लोकांनी याही घोषणेचे स्वागत केले. ज्या चौदा मंत्र्यांची नावे केजरीवालांनी वाचून दाखवली होती, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल न झाल्यास ऑगस्टमध्ये आंदोलन पुढचे पाउल उचलेल असेही त्यांनी सांगितले.

दिवसभराचा कार्यक्रम एकंदर शांततेत आणि शिस्तीत पार पडला. असंख्य तरूण स्वयंसेवक ही शिस्त राखण्यासाठी कायम उभे होते सभोवताली. त्यांचेही कौतुक वाटले.

एक दोन गोष्टी अर्थातच मला खटकल्या. उदाहरणार्थ इमामांचे 'संपूर्ण मुस्लिम समाज या आंदोलनाच्या पाठीशी उभा असल्याची घोषणा'. संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने बोलण्याचा इमामाचा अधिकार हा देखील माझ्या मते एक पारंपरिक भ्रष्टाचार आहे. मुस्लिम नागरिकांना त्यांचे स्वतंत्र मत असण्याचा अधिकार हे आंदोलन पण नाकारते का - असा एक प्रश्न माझ्या मनात आलाच. 

दुसरे म्हणजे जंतर मंतर इथे आणखी एका गटाचे गेले सहा दिवस आमरण उपोषण चालू होते - तिथेही सुमारे पाचशे लोक होते. प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या कार्यक्रमाला जितके महत्त्व दिले, तितके त्या दुस-या आंदोलनाला  नक्कीच दिले नसणार. ते बिचारे आधी शांत बसले होते. पण या व्यासपीठावरून कोणी त्यांची साधी दखलही घेतली नाही. मला वाटत होते की सिसोदिया, संजय सिंग, केजरीवाल यांपैकी कोणीतरी त्या आंदोलनकर्त्यांचा उल्लेख करतील पण तसे काहीच झाले नाही. मग ते आंदोलनकर्ते बिचारे थोडे नाराज झाले. "आम्हीही अण्णांचे समर्थक आहोत, भ्रष्टाचाराविरुद्ध आम्हीही लढत आहोत, आपला लढा एकच आहे अशी आम्ही अण्णांना आणि केजरीवालांना विनंती करतो" असे सारखे ध्वनिवर्धकावरून सांगत होते ते - पण इथे व्यासपीठावर बसलेले लोक काही ऐकू येत नसल्यासारखे बसले होते. ते दुसरे आंदोलनकर्ते इकडे बेदी, केजरीवाल, अण्णा बोलले तेव्हा एकदम शांत होते. पण बाकी वेळ त्यांच्या घोषणा, त्यांची भाषणे, त्यांची गाणी चालू होती. मला आंदोलनाचे वागणे काहीसे बालिश वाटले. ठीक आहे, त्या दुस-या आंदोलनाचा अजेंडा काय आहे ते माहिती नसेल, तेही आंदोलन गळ्यात घ्यायची टीम अण्णाची तयारी नसेल - हे सगळे मान्य आहे. पण आपल्यासारखच दुसरही कोणीतरी लढतं आहे, तेंव्हा निदान त्याला पाठिंबा देण्याचा मोठेपणा आंदोलनाने दाखवायला पाहिजे होता असं मला वाटलं. शेवटी कधीतरी तो भाग झाला पण माझ्या मते तोवर बराच उशीर झाला होता.

पण अशा घटनाच तर अधोरेखित करतात की हे आंदोलन माणसांनी चालवलेलं आहे, त्याला मर्यादा आहेत आणि चमत्कार काही एका रात्रीत घडणार नाही!!

Monday, March 26, 2012

११९. पुन्हा जंतर मंतर: भाग १

'नरेन्द्र ट्रॅक्टर से कुचला गया; सोनवणे जिंदा जला दिया गया' हे वाचून मला कुठल्यातरी टी.व्ही. मालिकेची माहिती दिसते आहे असं वाटलं होत. पण लागोपाठ दोन तीन दिवस तोच निरोप येत राहिल्यावर मी तो नीट वाचला. त्यातून लक्षात आलं की तो 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' कडून आलेला निरोप आहे आणि दुसरं म्हणजे २५ मार्चला 'जंतर मंतर' वर एक दिवसाच लाक्षणिक उपोषण आहे. अनायासे तो रविवार होता आणि मी दिल्लीत असणार होते; त्यामुळे जायच ठरवलं.

साधारणपणे साडेदहाला मी पोचले तोवर आधीच भरपूर गर्दी जमली होती. मागच्या वेळी 'जंतर मंतर' वर पोलिस होते पण ते निवांत होते. याहीवेळी ते निवांत होते पण सावध होते - त्यामुळे सुरक्षा तपासणीतून जावं लागलं - ज्याबद्दल माझा कधीच आक्षेप नसतो. एप्रिल २०११ मधलं 'जंतर मंतर'वरचे उपोषण आणि ऑगस्ट २०११ मधलं रामलीला मैदानावरचं उपोषण हे दोन्ही मी काहीसं जवळून, म्हणजे त्यात थोडी सहभागी होऊन पाहिलं होतं. रामलीला मैदानाने तर माझा भ्रमनिरास केला होता. त्यानंतर मुंबईत फार कमी प्रतिसाद मिळाल्याचंही पाहिलं होतं. तरीही मी यावेळी परत जायच ठरवलं कारण भ्रष्टाचार हा माझ्याही मते एक मोठा सामाजिक मुद्दा आहे. शिवाय आधीच्या चुकांमधून आंदोलन काही शिकलं आहे की नाही हे पाहण्याचीही उत्सुकता होती.

यावेळच वातावरण एकदम वेगळं होत हे प्रथमदर्शनीच लक्षात आलं. एप्रिल २०११ मधल वातावरण भाबडं आणि उत्साही होतं. त्यावेळी जो तो स्वतंत्रपणे काही ना  काही करत असे. तिथे पाठीशी 'भारतमातेच' चित्र होतं आणि व्यासपीठ छोटं होतं. रामलीला मैदानावर वातावरण जास्त आक्रमक आणि काहीसं धोरणी होतं. अण्णा तोवर 'दुसरे गांधी' झालेले होते आणि 'मै अण्णा हूं' अशी टोप्या आणि टी शर्ट यांचा सुळसुळाट होता.  दोन्ही ठिकाणी घोषणाबाजांचा सुकाळ होता. 'जीत के कगार पर हम है' अशी भावना होती, काहीसा उद्दामपणा होता. जमलेली गर्दी म्हणजे आंदोलनाला पाठबळ असा साधा हिशोब तेव्हा होता.  संसदेने अधिवेशन बोलावलं म्हणजे झालंच आता काम अशी मानसिकता होती.


यावेळीही 'मै अण्णा हूं' टोप्या आणि टी शर्ट होते पण त्यांची संख्या  तुलनेने कमी होती. घोषणाही फार अंगावर येणा-या नव्हत्या - माफक होत्या - ज्या वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक होत्या. गीतेही मोजकीच होती - दिवसभरात फक्त चार (किंवा पाच फार फार तर). व्यासपीठावर सगळे एकत्र बसले होते आणि मुख्य म्हणजे व्यासपीठाच्या भिंतीवर दोन तिरंगा आणि काही शहीदांचे फोटो होते. हे शहीद कोण - या प्रश्नाचे उत्तर तसं मला आलेल्या एस. एम. एस. मधे होतच म्हणा!

कार्यक्रमाची सुरुवात या शहीदांना श्रद्धांजली वाहून झाली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने मारल्या गेलेल्या शहीदांची ओळख करून देण्यात आली. या प्रत्येक व्यक्तीवर एक मिनिटाची फिल्म केली होती (कोणी ते माहिती नाही) ती दाखवून मग त्या व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकजण अधिक तपशील देत होता. हा सगळा कार्यक्रम अंगावर काटा आणणारा होता. राज्यांच्या सीमा ओलांडून लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत आणि शासन कोणत्याही पक्षाचे असो, त्याची किंमत कार्यकर्ते मोजत आहेत हे चित्र विषण्ण करणारं होतं.

होळीच्या दिवशी (८ मार्च २०१२) बेकायदेशीर खाणकामाविरुद्ध आवाज उठवणारा पोलिस अधिकारी नरेन्द्र कुमार ट्रॅक्टर अंगावर घालून मारला जातो; सत्येन दुबे (२८ नोव्हेंबर २००३) राष्ट्रीय महामार्गातील भ्रष्टाचार पंतप्रधान कार्यालयाला 'माझे नाव गुप्त ठेवा' अशी विनंती करत कळवतो. त्यावेळी केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एन. डी. ए. चे सरकार होते आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे. तरीही पंतप्रधान कार्यालयातून हे पत्र 'फुटते' आणि दुबे यांची हत्या होते. लखनौ आय. आय. एम. मधून पदवी घेतल्यावर मंजूनाथ इंडियन ऑईल मध्ये काम स्वीकारतो आणि तेलात भेसळ पकडताना २७व्या वर्षी (१९ नोव्हेंबर २००५) गोळ्या घालून मारला जातो.

अमित जेटवा हा गुजरातमधील 'माहिती अधिकाराचा' कार्यकर्ता. सौराष्ट्रातल्या बेकायदेशीर खाणकामाबद्दल त्याने रीतसर तक्रार नोंदवली होती. २० जुलै २००९ रोजी कोर्टासमोर गोळ्या घालून त्याचा जीव घेण्यात येतो. आंध्र प्रदेशातील सीतारामपूर भागातील सोला रंगा राव हा तीस वर्षांचा पोलिओग्रस्त तरूण. गावातील विकास कामासाठी किती पैसे आले आहेत अन ते कसे खर्च झाले आहेत हे कळावे म्हणून 'माहिती अधिकारा'अंतर्गत तो अर्ज दाखल करतो, त्यापायी त्याला १५ एप्रिल २०१० रोजी जीव गमवावा लागतो. त्याला सळईने मारहाण झालेली दिसते. झारखंडमधला ललितकुमार मेहता रोजगार हमी योजनेतील घोटाळे उघडकीस आणतो आणि त्यालाही १४ मे २००८ या दिवशी मारण्यात येते. झारखंडमधल्या कामेश्वर यादवची याच गोष्टीसाठी ७ जून २००८ रोजी हत्या होते. याच राज्यातल्या नियामत अन्सारीने आपले प्राण असेच गमावले.

बेगुसराय (बिहार)मधल्या शशिधर मिश्राची तर रोजगार हमी घोटाळे उघडकीस आणले म्हणून त्याच्या घरासमोर त्याला गोळ्या मारून त्याची चाळणी केली गेली ती १४ फेब्रुवारी २०११ या दिवशी. पुण्याचे 'माहिती अधिकार' कार्यकर्ते सतीश शेट्टी (१३ जानेवारी २०१०) आणि कोल्हापूरचे दत्ता पाटील (२६ मे २०१०) यांच्या हत्यांची आपल्याला माहिती आहेच. महेन्द्र शर्मा, विश्राम ढुढिया, तामिळनाडूचा सतीशकुमार, उत्तर प्रदेशातले डी.पी. सिंग ... एकामागून एक घटना आणि त्यातले साम्य जाणवत होते. एक जण कोणीतरी घोटाळा शोधून काढतो, संबंधितांना त्याचा कायदेशीर जाब विचारला जातो आणि शेवटी तो स्वतःचे प्राण गमावतो. जाणारा तर गेला पण भ्रष्टाचाराचा भस्मासूर मात्र तसाच कायम आहे. यातल्या अनेक खटल्यांचे निकाल लागणं तर सोडून द्या, आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत.  लोकपाल' कायदा असता तर या लढणा-या कार्यकर्त्यांना संरक्षण देता आले असते, निदान काही जीव तरी वाचले असते - अशी संयोजकांची हळहळ अनेकांना स्पर्श करून गेली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे हे  फक्‍त  तिरंगा लहरवत 'वंदे मातरम' म्हणण्याइतके सोपे नाही याची जाणीव जमलेल्या लोकांना होते आहे असं त्यांच्या संवादावरून, त्यांच्या विचारमग्न चेह-यांवरून जाणवलं मला. या शहीदांच्या घरच्यांची हिंमत खरच दाद देण्याजोगी होती. ललितकुमारची पत्नी जेव्हा म्हणाली, "मी तर या एका आशेवर जगतेय की ज्यासाठी माझ्या पतीला प्राण द्यावा लागला, त्या भ्रष्टाचाराचा कधीतरी नाश होईल ..." तिच्या या जिगरबाज शब्दांनी  तिथे जमलेले लोक क्षणभर निस्तब्ध झाले.

मी मागेही म्हटले होते तसे दिल्लीच्या एरवी अतिशय आक्रमक आणि स्त्रियांशी गलिच्छ वागणा-या गर्दीचा मला आणखी एक चांगला अनुभव आला. लोकांच्या एकत्र येण्याचे कारण जर चांगले असेल तर लोक आपणहोऊन चांगले वागतात हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. सात तास मी एकटी स्त्री अनोळखी लोकांच्या गर्दीत होते पण मला काहीही त्रास झाला नाही. सहा सात तास एकत्र बसल्यामुळे आसपासच्या लोकांशी थोडी ओळख झाल्यासारखे वाटायला लागले होते. साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास माझ्याशेजारी एक पुरुष येऊन बसला तेव्हा त्याला मात्र मला 'नीट बसा तुम्ही' असं सांगायला लागलं. माझ हे वाक्य ऐकून शेजारच्या अनेकांनी त्याच्याकडे पाहिलं. तिस-यावेळी मी पुन्हा तेच त्या गृहस्थाला सांगितल्यावर अचानक माझ्या पुढे बसलेला दुसरा एक पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, तुम्हाला हात करताहेत." त्या गृहस्थाने त्या दिशेला वळून पाहिलं तर कोणीच नव्हत. त्यावर माझ्या पुढचा पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, ते चहाच्या टपरीकडे गेले ते, पोलिसांच्या आड आहेत ते त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीत ते. जा तुम्ही तिकडे." मग हा माणूस उठून तिकडे गेल्यावर मागचा एक पुरुष पुढे सरकला. तो गृहस्थ परत आला तरी त्याला आता ती जागा परत मिळणार नव्हती. मग पुढचा माणूस माझ्याकडे पाहून हसून म्हणाला, "बसा आता तुम्ही निवांत. तो पिऊन आला होता, पण त्याला आता पळवून लावलय आम्ही." त्याच्या या हुषारीच मला  मनापासून कौतुक वाटलं.

उत्तरेत वावरताना कवींना एक वेगळा मान असल्याच जाणवतं. कविता लिहून सामाजिक क्रांती घडवून आणायची स्वप्नं आजही इथले कवी पाहतात. या कवींना स्वतःच्या रचना अत्यंत तालासुरात गाता येतात हे आणखी एक विशेष.  कुमार विश्वास या तरूण कवीची 'होठों पे गंगा हो, हाथों मे तिरंगा हो' ही रचना तिथं जमलेल्या लोकांना बेभान करायला समर्थ होती. 'जंतर मंतर कब तक' अशी कोणत्यातरी वाहिनीवर चर्चा चालू असल्याचे सांगून तो म्हणाला, "याच उत्तर सोप आहे: भ्रष्टाचार जब तक, जंतर मंतर तब तक” - यावर लोकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला त्याला. अजमेर जिल्ह्यातल्या शहनाझ राजस्थानी या आणखी एका कवीने 'वंदे मातरम' या घोषणेसह सुरुवात केली आणि 'मी ही घोषणा देतोय याच अनेकांना आश्चर्य वाटत असेल' हेही सांगितल. क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला, "मै मुसलमान हूं, मगर हिन्दुस्थानी मुसलमान हूं" - अशी वाक्य एरवी ऐकताना काही वाटत नाही; पोकळ वाटतात ती - पण त्या समुहात बसून ऐकताना त्या वाक्याने समुहात किती उर्जा पेटवली ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. 'कुछ भी हो जाये, हमको ये तस्वीर बदलनी है' या त्याच्या कवितेवर मग सगळेजण डोलत होते. सामाजिक आंदोलनांत कलेचा माध्यम म्हणून उपयोग करणं हे काही नवीन नाही आपल्याला - पण इतिहासाचा वारसा पुढे न्यायला नवीन पिढीतही तितके समर्थ कलाकार आहेत हे जाणवून बर वाटलं.


मागच्या वेळी आपण लढाई तर जिंकली पण तहात हरलो, ही जाणीव 'टीम अण्णा'ला अखेर एकदाची झाली आहे हे पुढच्या काही तासांत त्यांच्या बोलण्यावरुन लक्षात आलं. उपोषण दिल्लीत असल्यामुळे अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांचे समर्थक मोठया संख्येने तिथे आले असणार हे स्वाभाविक आहे. पण किरण बेदी आणि केजरीवाल यांच ज्या पद्धतीने लोक स्वागत करत होते, त्यावरून त्या दोघांवर झालेल्या आरोपाला निदान दिल्लीच्या जनतेने तरी फारशी किंमत दिलेली नाही हे स्पष्ट झालं.  त्या दोघांच बोलणं ऐकून मला हे आंदोलन आता योग्य दिशा पकडतय असं वाटलं; कारण आंदोलन दीर्घ काळ चालवावं लागणार आहे, त्यासाठी नुसती भावनिक एकता पुरेशी नाही तर आपले विचार जुळेले पाहिजेत, चर्चा आणि अभ्यास केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

लेख फार मोठा होतोय म्हणून इथे थांबते सध्या. कदाचित थोड लिहीन आणखी पुढच्या भागात.

Wednesday, August 31, 2011

८७. रामलीला मैदानावर


वर्ष: १९८७. ठिकाण: राळेगण सिद्धी. अण्णा हजारे तेव्हाही प्रसिद्ध होते, पण आजच्यासारखे प्रसारमाध्यमांच्या गराड्यात नव्हते. त्या वर्षी मला अण्णांना अनेकदा भेटायची संधी मिळाली होती. आम्ही आठ दिवसांच एक युवक शिबीर राळेगणमध्ये घेऊ इच्छित होतो. त्याच्या परवानगीसाठी, पूर्वतयारीसाठी आणि प्रत्यक्ष शिबिरात अण्णांना मी अनेकदा भेटले, त्यांच्याशी बोलले. शिबिराच्या काळात आठही दिवस अण्णा राळेगणमध्ये होते; रोज एक तास ते आमच्या युवकांशी बोलायचे. एरवीही ते आमच्या आसपास, हाकेच्या अंतरावर असायचे. कधीही त्यांच्याकडे गेले तर ते बोलायचे. त्यांच बोलण सौम्य, मृदू, कधीही आवाज चढला नाही की कधी कपाळावर आठी उमटली नाही. शांतपणे समजून घेऊन बोलायची त्यांची पद्धत होती तेव्हा. मी खूप केलय, मला सगळ कळतंय असा त्यांचा अविर्भाव अजिबात नव्हता. पण हा माणूस विरोधाला नमणार नाही, संकटाला घाबरणार नाही अशी साक्षही मिळत होती त्यांच्याशी होणा-या संभाषणातून. 
  
ते आठ दिवस राळेगणमध्ये आम्ही लाडक्या पाहुण्यांसारखे राहिलो. तसं पाहिलं तर अण्णांच्या समोर आम्ही तेव्हा नगण्य होतो – धडपडणारे युवक यापलीकडे आमच काही कर्तृत्व नव्हत. पण अण्णांनी आमची खूप काळजी घेतली. त्यांच्या साधेपणाने, त्याच्या त्यागाने, त्यांच्या मृदू स्वभावाने त्यांनी आमच्या शिबिरातल्या सगळ्यांची मन जिंकून घेतली. मी तशी कोणाच्या पाया वगैरे कधी पडत नाही. पण राळेगणमधून निघताना मी अण्णांना वाकून नमस्कार केला होता हे आजही मला आठवत.
*****
वर्ष २०११. ठिकाण: दिल्ली. रविवार, २८ ऑगस्टची सकाळ. सगळ्या देशाच लक्ष आज इथ असण स्वाभाविक होत. अण्णा हजारे सकाळी दहा वाजता उपोषण सोडणार हे प्रसारमाध्यमांनी आधीच जाहीर केल होत. गर्दी असणार भरपूर हा अंदाज येणा-या लोकांनाही होता – आणि बसायला पुढे जागा मिळावी म्हणून लोक लवकर आले होते. मागच्या शनिवारी मी इथे येउन गेले होते – त्यावेळची रांग लक्षात घेऊन मीही आज लवकर आले होते. 

नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर फारशी गर्दी नव्हती – म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होती. बहुतेक सगळे बाहेर गावाहून आलेले प्रवासी होते. स्थानकाच्या बाहेर कमला मार्केटच्या परिसरात बसेस उभ्या होत्या, हातात अवजड सामान घेतलेले नवखे प्रवासी नेमकी कोणती बस पकडायची या चिंतेत होते. कोणत्याही रेल्वे स्थानकाबाहेर रोज जे दृश्य दिसत, त्यापेक्षा वेगळ इथे काहीही नव्हत. मी चुकून दुस-याच ठिकाणी तर नाही ना उतरले अशी माझ्या मनात आलेली शंका क्षणभरात विरून गेली कारण तिरंगा आणि ‘मी अण्णा आहे’ अस इंग्रजी-हिंदीत लिहिलेल्या टोप्यांची विक्री करणारे लोक, मुख्यत्वे लहान मुल आणि स्त्रिया लगेचच समोर आल्या. आज आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे हे त्यांना माहिती होत अस दिसलं – कारण आज मिळेल त्या भावात हातातला माल विकून मोकळ व्हायची त्यांची लगबग दिसत होती. रस्त्यावर सामोसे आणि इतर खादय पदार्थही विकले जात होते. जर आंदोलनाचा मुद्दा एखाद्याला माहिती नसेल तर एकंदर वातावरण एखादया राजकीय सभेच वाटलं असत! 

मागच्या शनिवारी मला बराच वेळ रांगेत उभ राहायला लागल होत. म्हणून रविवारचा दिवस असूनही मी लवकर इकडे आले होते. यावेळी रांग फार मोठी नव्हती – मी पाच मिनिटांतच रामलीला मैदानावर पोचले, पावसाने निम्म मैदान अजून चिखलात होत; त्यामुळे ‘मुंगीला शिरायलाही जागा नसण्याइतकी गर्दी असल्याची’ वृत्तपत्रांची बातमी दुस-या दिवशी वाचून मला हसायला आलं. माध्यम किती अतिशयोक्ती करतात – चांगली आणि वाईटही हे अशा प्रसंगीच माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या लक्षात येत.

रामलीला मैदान अर्थात प्रचंड मोठ आहे. त्यामुळे अर्ध्या भरलेल्या मैदानात सकाळी आठ वाजताच त्यादिवशी हजारोंची गर्दी होती. मी आपली गर्दीच्या एका भागात स्वत:साठी जागा करून घेत होते, तेवढयात ‘स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था असल्याच’ मला सांगण्यात आलं. धक्के कमी खावे लागतील या अपेक्षेने मी तिकडे गेले खरी पण अण्णा दिसल्यावर गर्दी त्यांना बघायला जागा सोडून उन्मादाने उभी राहिली तेव्हा स्त्रियांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेभोवतीचे बांबू कोसळून पडले आणि गर्दीत पुरुषांचे धक्के खाण काही चुकल नाही. पण ही अर्थातच पुढची गोष्ट झाली.

सभास्थानीच वातावरण एकदम भावूक होत. जिकडे तिकडे तिरंगा लहरत होता, देशभक्तीपर गाणी होती, घोषणा होत्या. स्त्रिया बसल्या होत्या त्या भागातही घोषणा चालू होत्या. कोणी उभ राहिलं की, स्वयंसेवक ताबडतोब येऊन ‘बसून घ्यायला’ सांगत होते. सगळ कस बराच काळ शिस्तीत चालल होत. बसायची सवय आता लोकांना फारशी राहिली नसल्याने, नऊच्या आसपास चुळबूळ सुरु झाली. तेवढयात टी.व्ही. कॅमेरे इकडे वळले आणि एवढा वेळ शिस्तीत बसलेली जनता उधळली. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीची लोकांना किती हाव असते, त्याच एक विलक्षण दर्शन त्या तासाभरात मला झालं. वय विसरून स्त्रिया धावत होत्या (याचा अर्थ फक्त स्त्रिया अस वागत होत्या असा मात्र नाही, पुरुषांच्या बाबतीतही हेच घडत असणार, मी ते त्यावेळी पाहिलं नाही इतकच!), देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर नाचत होत्या. पुढे बसलेल्या गर्दीला ढकलत मागून पुढे येत कॅमेरासमोर जाण्याची अहमहिका शिसारी आणणारी होती. तीच अवस्था पिण्याच्या पाण्याचे पाउच (अर्थातच फुकट) मिळवण्यासाठी झाली. प्रसंग कोणताही असो, लोकांचा स्वार्थ काही सुटत नाही हे पुन्हा एकदा लक्षात आलं!  गर्दीच्या वेडेपणाची ही केवळ सुरुवात होती.

अण्णा आल्यावर ती सगळी गर्दी एकदम पुढे झेपावली. सगळा गोंधळ माजला. संसदेला ‘जन संसद’ पुरून उरेल याची ग्वाही मला पुन्हा एकदा त्या सकाळी मिळाली. ‘इतक्या लांबून काही नीट दिसणार नाही, सगळे बसले तर सगळ्यांना व्यासपीठ नीट दिसेल’ अस सांगता सांगता आमचा काही जणींचा घसा सुकून गेला. पण इथ अगदी भारतीय मनोवृत्तीच दर्शन झालं – ती खाली बसत नाही तर मी तरी का बसू? – असा प्रत्येकीचा प्रश्न होता. नियम पालनाची, स्वयंशिस्तीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, इतर कोणी नियम पाळत नसेल तेव्हाही स्वत:चे जीवनमूल्य म्हणून काही गोष्टी पाळायला हव्यात हे कोणाच्या गावीही नव्हते. लोकपाल आला तरी ‘इतर भ्रष्टाचार करतात, मग मीच का नुकसान करून घेऊ माझ पैसे न देऊन?” असा प्रश्न विचारणारे लोक तरीही संख्येने अगणित असतील हे लक्षात येऊन मला फार निराश वाटलं.

श्री. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची सुरुवात ‘आभार प्रदर्शनाने’ झाली. गेल्या काही महिन्यांत त्यांच्याबद्दल बरच काही वाचलं होत आणि म्हणून मी त्यांना ऐकायला उत्सुक होते. पण माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. म्हणजे ‘प्रसारमाध्यमांचे आभार’ मला आवडले नाहीत तरी मी समजू शकते. पण ‘अनेक दिल्ली पोलिस दिवसभर गणवेषात काम करत आणि संध्याकाळी गणवेष उतरवून आंदोलनात सामील होत’ हे तिथ सांगणारे केजरीवाल मला तरी प्रगल्भ वाटले नाहीत. आता बिचा-ऱ्या त्या पोलीसांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणजे झालं!

आणखी एक गोष्ट म्हणजे अण्णांसोबत उपोषणाला बसलेले तीस लोक कुणाच्याच खिजगणतीत नव्हते. त्यांच नाव घेऊन त्यांच कौतुक करण तर दूरच, त्यांचा उल्लेखही सगळ्यात शेवटी घाईघाईने (बहुधा कोणीतरी लक्षात आणून दिल्यावर) केजरीवालांनी केला तेही खटकल. अनाम वीरांना जनता ‘नंतर’ विसरते अस नाही तर त्यांच्या जीवनकाळातही विसरते हेच दिसलं तिथ! शिवाय ‘आम्ही काही सगळे राजकीय नेते वाईट आहेत अस म्हटल नव्हत कधी’ अशी सफाई द्यायची काय गरज होती? विशेषत: आदल्या संध्याकाळी सरकारच्या ज्या प्रतिनिधींबरोबर व्यासपीठावर सगळे उभे होते, त्यातून अण्णांच्या     सहका-यांच मतपरिवर्तन जगजाहीर झालं होतच की!

केजरीवालांनी ‘संध्याकाळी इंडिया गेटवर विजय साजरा करायला जमा’ सांगितलं ते मला विनोदी वाटलं. कसला आणि कोणाचा विजय झाला होता? मला तर वाटत की रोजच्या सवयीने केजरीवालांनी ती घोषणा केली असेल. अन्यथा दिल्लीच्या वर्तुळात वावरणा-या केजरीवाल आणि किरण बेदी यांना मागच्या चार पाच दिवसांतल्या घटनांचा अर्थ समजला नसेल अस मानण म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत शंका घेण्यासारखच आहे!

तिथ जमलेल्या लोकांमध्ये ‘अण्णांनी उपोषण सोडलं एकदाच, बर झालं’ अशीच भावना जास्त होती. चेंगराचेंगरी होताना स्त्री पुरुषांच्या गर्दीतले संवाद केजरीवाल आणि सहका-यांनी अवश्य ऐकायला हवे होते. नंतर बाहेर पडतानाही “अण्णांनी उपोषण सोडल ते बर केलं, उगाच या म्हाता-या माणसाला मारलं असत यांनी’ अस लोक म्हणत होते आणि सहमतीचे सूर उमटत होते. एकजण म्हणाला, “अण्णा हुशार आहेत. जन लोकपाल पास होवो अथवा न होवो, आपल्यासारख्या फालतू लोकांसाठी जीव गमावण्यात शहाणपण नाही हे त्यांना एकदाच लक्षात आलं ते चांगल झालं!” भ्रष्टाचार, जन लोकपाल हे मुद्दे मागे पडून अण्णांची तब्येत हाच मुद्दा होता. अण्णा इतक्या खणखणीत आवाजात बोलत होते याबद्दल अनेकांना आनंद वाटत होता पण आश्चर्यही वाटत होत!

अण्णा उपोषण सोडताना व्यासपीठावर दोन लहान मुली होत्या त्यांच्या सोबत – सिमरन आणि इकरा. सिमरन दलित आहे आणि इकरा तुर्कमान गेट परिसरात राहते (म्हणजे मुस्लिम आहे) हे केजरीवालांनी प्रसारमाध्यमांच लक्ष वेधून घेत अधोरेखित केल. सात वर्षाच्या मुलींचा असा वापर पूर्ण अयोग्य वाटला मला. भ्रष्टाचार म्हणजे काय, संसद म्हणजे काय, लोकपाल म्हणजे काय .. हे सगळ कळण्याच त्यांच वय नाही. ती आत्ता त्यांची जबाबदारीही नाही. केवळ राजकीय नेते अशी ‘सहभागाची’ नाटकं करतात अस माझ आजवर मत होत! जात आणि धर्म यांच्या नावावर माणसांना ओळखण्याच, त्यांना स्थान देण्याच आपण टाळू शकलो नसतो का या आंदोलनात? दलित समाज बाबासाहेब आंबेडकरांच नाव घेतलं की खूष होतो अस समजण म्हणजे आंबेडकर केवळ दलितांचे आहेत असा संदेश देण आणि दलितांना मूर्ख समजण! ‘आम्ही लाच देणार नाही आणि घेणार नाही’ ही सार्वजनिक शपथ इतकी निर्जीव होती, की ती कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर तो चमत्कार मानावा लागेल या शतकातला! एकदा लोकानुनय करायचा म्हणला की कशी तडजोड करतात माणस याचा उत्तम नमुना मला रामलीला मैदानावर त्या सकाळी पहायला मिळाला.

गर्दी इतकी अनावर होती की ती ना स्वयंसेवकांच्या ताब्यात होती ना केजरीवालांच्या नियंत्रणात होती! “तुम्ही आता शांत बसला नाहीत तर अण्णा उपोषण सोडणार नाहीत, इतके दिवस केल तसं आणखी काही तास ते उपोषण करू शकतात’ ही केजरीवालांची धमकी त्यांची हतबलता दाखवणारी होती. तिथ आलेले ‘समर्थक’ कसे होते याची झलक दाखवणार वाक्य होत ते! या गडबडीत अण्णांनी उपोषण कधी सोडलं ते अनेकांना कळलच नाही. अण्णांच भाषण संपल तरी ‘ते कधी सोडणार उपोषण?’ अशी चौकशी लोक करत होते.

अण्णा काय बोलले ते आधीच पेपरमध्ये येऊन गेलय – त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही मी. अण्णांच भाषण चालू असताना गर्दीचा एक लोंढा मंडपाच्या बाहेर पडत होता आणि नवा लोंढा आत येत होता.  जाणारा लोंढा ‘अण्णा की रसोई” आणि ‘अण्णा की मुफ्त चाय’ या दोन ठिकाणी रांगेत उभ राहत होता. उपोषण करणा-या लोकांच्या समर्थकांसाठी फुकट खाण आणि चहा वाटण्याच  काय प्रयोजन होत हे समजण माझ्या अल्प मतीच्या पल्याड होत! या समर्थकांना आंदोलनाच्या पुढच्या दिशेत, कार्यक्रमात काही गम्य नव्हत! चेंगराचेंगरीत बाजूला होत होत मीही तोवर मंडपाच्या शेवटच्या टोकाला येऊन पोचले होते. येणारी गर्दी घोषणा देत होती आणि जाणारी गर्दी त्यांना प्रतिसाद देत होती; अण्णा काय बोलत होते त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हत. मला मात्र अण्णांनी एकदाही ‘वंदे मातरम’ म्हटलं नाही त्यांच्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात हे जाणवलं.

‘जंतर मंतर’ आंदोलनाच्या काळात एका संध्याकाळी ‘वंदे मातरम’ म्हणणारा मुस्लिम तरुणांचा एक गट मला भेटला होता, मी त्यांच्याशी या विषयावर बोललेही होते. “हम भी तो इस मिटटीसे पले हुये है” हे त्यांचे भावूक आणि हृदयातून आलेले उद्गार आजही मला आठवतात. अशा सगळ्या तरुणांना – मग ते हिंदू असोत की मुसलमान – आपण पुन्हा एकदा धर्ममार्तन्डाच्या ताब्यात देणार आहोत का? – अशी मला शंका येते. युवकांची जागृती वगैरे सगळ सुरुवातीलाच संपून जाईल अशा आपल्या वागण्याने.
******
राळेगणमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी मला भेटलेले आणि कळलेले अण्णा बदलले आहेत का असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत राहिला. म्हणजे एका बाजूने अण्णा तसेच आहेत – साधे, सौम्य बोलणारे, निश्चयी, सरळ, काहीसे भोळेभाबडे, दुस-यांसाठी त्याग करणारे, विरोधाला न नमणारे. त्यांच्या या गुणांवर तर देशातले इतके लोक फिदा झाले. कधी नाही ते निस्वार्थी नेतृत्व लाभलेय अशी अनेकांची भावना झाली – ज्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.

पण इथे व्यासपीठावर बसलेले, कॅमेऱ्याच्या गराड्यात लोकांपासून दूर असलेले अण्णा वेगळे वाटत होते. ‘मी अण्णा आहे’ हे छापलेले स्वीकारणारे; स्वत:चा चेहरा तिरंग्याच्या मध्यभागी टी शर्टवर छापायला परवानगी देणारे; स्वत:वर रचलेल गाण रामलीला मैदानावर इतरजण गाताना विनातक्रार ऐकणारे; ज्यांच्याबद्दल भ्रष्टाचाराची तक्रार आहे अशा लोकांबरोबर व्यासपीठावर उभे राहणारे (भले मग ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे असोत!); उपोषण करणा-या सहका-यांना विसरणारे: एके काळी विवेकानन्दाबद्दल भरभरून बोलणारे पण आता ‘युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती’ आहे अस म्हणताना विवेकानन्दान्चा साधा उल्लेखही न करणारे; हे अण्णा तेच आहेत का असा मला संभ्रम पडला. हजारोंच्या, लाखोंच्या गर्दीत मला अण्णा एकदम परके, अनोळखी वाटले. माझ्या बाजूने त्यांच्याशी माझ जे नात होत, मी जे आजवर जपल होत  – ते एकदम तुटून गेल्यासारख वाटलं मला त्या क्षणी! 

परत एकदा राळेगणमध्ये जाऊन अण्णांना भेटायला हव. माझ्या या असल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर १९८७ मध्ये  देत होते, तशीच  पुन्हा एकदा अण्णा हसत, शांतपणे, विचारपूर्वक देतील अशी मला आशा आहे. निदान त्यापूर्वी मी त्यांच्याबद्दलच माझ मत बदलण्याची घाई करू नये. माणसाच मूळ जिथं रुजलेल असत, तिथ तो माणूस खराखुरा कळतो. तिथच त्या माणसाला शोधायला हव – रामलीला मैदानावरची गर्दी ही काही योग्य जागा आणि वेळ नाही त्यांना समजून घेण्याची!


या विषयावरच्या आणखी काही पोस्ट्स : मतभिन्नतेतून, जंतर मंतरलेल्या संध्याकाळी 

Monday, August 22, 2011

८६. मतभिन्नतेतून …..

पुन्हा एकदा सगळा  देश मतामतांच्या  गल्बल्यात अडकला आहे. यावेळचा विषय आहे ‘जन लोकपाल' अर्थात देशातल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन!


पण माझ्या मते या मत- मतमतांतराबाबत  जास्त काळजी करण्याचे काही कारण नाही. कोणताही विषय घेतला तरी त्यावर टोकाची वेगवेगळी मत आणि दृष्टिकोन असण्याची आपली परंपरा फार प्राचीन आहे. किंबहुना मतभिन्नता हे आपल्या  देशाच, आपल्या समाजाच एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. आपला देश, आपला समाज एकमुखाने बोलतो आहे अशी घटना इतिहासाला आठवते तशी शेवटची कधी घडली होती? 

गेल्या काही वर्षांतल्या अनेक बॉम्बस्फोटानंतर ? दंगलींनंतर ? कोसीच्या महाप्रलयात? नक्षलवादी हल्ल्यात? सुनामीने माजवलेल्या हाहाकारात? भूकंपात?  आणीबाणीच्या काळात? त्यांनतर ? १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यात आणि फाळणीत? १९४२ सालच्या ‘चले जाव' आंदोलनात? १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीत? शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत? राणा प्रतापच्या काळात? गौतम बुद्धाच्या वेळी?  शंकराचार्यांच्या काळी? श्रीकृष्णाच्या काळात? रामाच्या राज्यात? उपनिषदांच्या वेळी? सिन्धु संस्कृतीच्या काळात? आर्यांच्या काळात? कधी आपण एकमुखाने बोलत होतो?

कोणत्याही सुधारणा घ्या – सामाजिक असोत, शैक्षणिक असोत, राजकीय असोत किंवा धार्मिक असोत – त्याला पाठिंबा  देणारे लोक समाजात असतात तसेच त्याबाबत शंका उपस्थित करून त्याला विरोध करणारेही सर्व काळात असतात. कोणता बदल आजवर १०० टक्के लोकांच्या सहभागाने आणि पूर्ण सहमतीने झाला आहे? नवा विचार नेहमी उपेक्षिला जातो, त्याची थट्टा होते, त्याला विरोध होतो आणि त्या विचाराचा प्रसार करणा-यांना धमक्या दिल्या जातात – हे अगदी याच क्रमाने घडते असे नाही, पण टप्पे सगळे असतात जवळजवळ हेच. हे पुन्हपुन्हा घडताना दिसते. मोठी माणसे या सगळ्याला तोंड देत त्यांचा विचार पुढे नेत राहतात – जोवर मोठ्या संख्येने समाज त्या विचाराचा स्वीकार  करत  नाही तोवर! फार कमी लोकांना  त्यांचा विचार समाजाने स्वीकारला आहे हे पाहण्याचे समाधान लाभते, अनेकानां त्याविना काळाच्या पडद्याआड जावे लागते. काही तर पूर्णपणे समाजाच्या स्मरणातून जातात – त्यांचे जगणेही एकाकी असते आणि मरणेही. ते गेल्यावर अनेक वर्षांनी समाजाला त्यान्चे मोठेपण समजते. असा हा आपला आजवरचा इतिहास असल्यामुळे एकदम कधी नाही ते भ्रष्टाचार निर्मूलनासारख्या मुद्यावर आपल्या देशात वैचारिक एकवाक्यता असावी अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरेल.

गेले काही महिने माझ्या आसपास अण्णा हजारे आणि त्यांचे आंदोलन या विषयावर सतत चर्चा चालू आहे.             महाराष्ट्रातल्या माझ्या ओळ्खीच्या अनेक लोकांना वाटत, की या आंदोलनाचा केंद्रबिंदू (म्हणजे अण्णांच उपोषण) दिल्लीत आहे – आणि मी सध्या दिल्लीत आहे - त्यामुळॆ मी त्यात सहभागी होत असणारच. दुस-या बाजूने दिल्लीतल्या माझ्या ओळखीच्या लोकांना वाटत की, अण्णा हजारे मराठी आहेत आणि मीही मराठी आहे; त्यामुळॆ मी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असणार. (श्री. अरविन्द केजरीवाल हरयाणात वाढले म्हणून दिल्लीतल्या प्रत्येक हरयाणवी माणसाने यात सामील व्हावे अशीही दिल्लीकर अपेक्षा करतात की नाही हे मला माहिती नाही! ) त्यामुळॆ गेल्या काही महिन्यांत मी दर दहा संवादांत किमान तेरा वेळा 'जन लोकपाल आणि  अण्णा हजारे' याबद्दल बोलत असते – हो, तेरा वेळा; कारण आपल्याकडे लोकांना तोच तोच मुद्दा घोळवत बसायला आवडत!

****
मी रामलीला मैदानाकडे चालले आहे – जिथे अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी ‘जन लोकपालच्या’ मागणीसाठी उपोषण करत आहेत. नवी दिल्ली मेट्रो स्थानकात शेकडो, नाही हजारो लोक आहेत – ते सगळॆ रामलीला मैदानावर चालले आहेत. गर्दीचा लोंढा मला आपसूक बाहेर पडण्याची दिशा दाखवतो आहे . स्थानकात प्रचंड  गर्दी आहे. मेट्रोने व्यवस्था नीट चालावी म्हणून जास्तीचे लोक स्थानकात नेमले आहेत. एवढ्या गर्दीला सांभाळण्याचे काम ते चांगले करत आहेत. मेट्रो स्थानकात घोषणा देणारा जनसमूह हे एक अनोखे द्रुश्य आहे. स्थानकात प्रवेश करणारे आणि स्थानकातून बाहेर पडणारे लोक ‘वन्दे मातरम' , ‘इन्किलाब झिन्दाबाद' अशा घोषणानी एकमेकांना प्रेरित करत आहेत. ती जणू ‘खूण पटवण्याची’ एक पद्धत आहे. स्थानकाबाहेर पडल्यावर “रामलीला मैदान कोणत्या बाजूला आहे हो?” अस मला कुणाला विचारण्याची गरज नाही – सगळी गर्दी त्याच दिशेने चालली आहे. सगळे रस्ते जणू रामलीला मैदानाला जाऊन मिळताहेत!

पण मी नुकतीच Connaught Place परिसरात जाऊन आले आहे आणि तिथलही दृश्य माझ्या नजरेसमोर आहे. राजीव चौक मेट्रो स्थानकात शेकडो, नव्हे हजारो लोक आहेत. ते स्थानकात प्रवेश करत आहेत आणि स्थानकातून बाहेर जात आहेत. त्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाशी, परिसरात चालू असलेल्या उपोषणाशी काही देणे घेणे नाही. मी त्या परिसरात अर्धा तास फिरते. हजारो लोक मला वेगवेगळ्या चमचमत्या  दुकानांपाशी दिसतात. त्यांचे ‘संघर्षाचे’ मुद्दे वेगळे आहेत – McDonalds  मध्ये  जाव की Subways मध्ये? कोल्ड कॉफी प्यावी, की मिल्क शेक? आईसक्रीम आत्ता खाव, की सिनेमानंतर? सोनीचा laptop घ्यावा आधी, की रीबोकचे बूट? ते सगळे भारतीयच आहेत – पण India Against Corruption त्यांच्या विषयपत्रिकेवर नाही, त्यांच्या विचारांच्या परिघात नाही. मी एक दोन जणांना ‘के’ block पासून निघणा-या मोर्चाविषयी विचारते – पण त्यांना अर्थातच काहीही माहिती नाही.


****
तर रामलीला मैदानाकडे!  रस्त्याच्या दोन्ही बाजूला  तिरंगा विक्रीला आहे. तो वेगवेगळ्या आकारांत आणि वेगवेगळ्या स्वरूपांत उपलब्ध आहे.म्हणजे  wristband आहे, बिल्ला आहे, खिशाला लावायचे छोटे ध्वज आहेत आणि हवेत लहरवण्यासाठीचे मोठे ध्वजही आहेत,उपरण्यासारखे गळ्याभोवती लटकवायचे पट्टे आहेत, आणि नव्या रीतीचे hair bands आहेत. . जशी तुमची इच्छा आणि ऐपत, तशी तुम्ही खरेदी करू शकता. गांधी टोप्या (तिला खर तर नेहरु टोपी म्हणायला पाहिजे अस मला नेहमी वाटत!) – ज्यावर ‘मी अण्णा आहे' असा मजकूर हिन्दी आणि इन्ग्रजी भाषेत लिहिलेला आहे – विक्रीला आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर या वस्तू खरेदी करताहेत. ते पाहून विक्री करणारी लहान मुले आणि    स्त्रियांचे चेहरे फुलले आहेत. भारत  भ्रष्टाचारमुक्त होवो अथवा न होवो, या विक्रीतून त्याना दोन वेळचे पोट भरण्याइतके पैसे मिळत आहेत हे महत्त्वाचे! त्यांच्या दृष्टीने एखादी राजकीय सभा अथवा धार्मिक कार्यक्रम आणि हे आंदोलन यात काहीच फरक नाही. जेथे जे विकते तेथे ते विकायचे असे त्यांचे धोरण आहे . दोन चार दिवस धंदा बरा होतो आहे हेच त्यांचे सुख आणि समाधान.

मैदानात प्रवेश करायचा तर मोठी रांग आहे. एप्रिल महिन्यात जंतर मंतरमध्ये जाणे – येणे फार सोपे होते, गर्दीही इतकी नसायची. तेव्हा पोलिस होते हजर, पण पडद्याआड  होते जणू. आता इथे मात्र सुरक्षा व्यवस्था जास्त कडक आहे. bag  मशीनद्वारे तपासल्या जाताहेत आणि माणसान्चीही सुरक्षा तपासणी होते आहे. काही दुर्घटना होण्यापेक्षा आधीच काळ्जी घेणे हे जास्त चांगले. तशीही दिल्लीतल्या लोकांना पदोपदी सुरक्षा तपासणीची आता सवय झाली आहे म्हणा. हे आपल्या भल्यासाठी आहे हे लोक जाणतात त्यामुळे सगळे जण पोलिसांना सहकार्य करत आहेत.

काही लोकाना इतका वेळ रांगेत थांबायची सवय नाही. ते रांग मोडून मधेच पुढे घुसतात. माझ्यासारखे काही लोक त्याना ‘अशी रांग मोडून पुढे जाणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे’ असे सुनावतात. त्यावर ते थोडे कसनुसे हसतात पण पुढची जागा काही सोडत नाहीत. आम्ही तो विषय लावून धरतो तेव्हा रांगेतले इतर लोक “जाऊ द्या हो, एवढ्या तेवढ्याने काय फरक पडतो" अशी आमची ‘समजूत' घालतात.  मनमानी करणारे लोक आणि ती मुकाट्याने स्वीकारणारे लोक, साधे नियम मोडणारे लोक आणि तो हसत स्वीकारणारे लोक – अशा समर्थकांच्या बळावर हे आंदोलन कसे काय दीर्घकाळ चालणार असा मला प्रश्न पडतो! India Against Corruption ची ‘ जन लोकपालच्या ‘पुढे जाऊन काही नक्की विचारप्रणाली तरी आहे का हे जरा बघावे लागेल.

मैदानात मला तीन तरूण मुली आणि दोन तरुण दिसतात. ते स्वत:च्या पिशवीतून प्लास्टिक bag  काढतात आणि भोवतालचा कचरा त्यात भरायला लागतात. ते ‘आय ए सी’ चे स्वयंसेवक आहेत का अस मी त्यांना विचारल्यावर ते ‘नाही' म्हणून सांगतात. पण या ठिकाणी असा कचरा पसरणे योग्य नाही या भावनेतून ते आपण होऊन स्वच्छतेचे काम करताहेत. मला त्या तरूणांच, त्यांच्या स्वयंप्रेरणेच, त्यांच्या समजूतदारपणाच  मनापासून कौतुक वाटत. 

मला  आणखी एक रांग दिसते. कसली आहे ती – मोर्चासाठी नाव नोदवायची आहे की काय - म्हणून मी चौकशी करते. मग कळत की, कोणीतरी तिथ बिस्किटांचे पुडे वाटतय – अर्थात फुकट! लोकांची मोठी रांग आहे तिथ आणि एकापेक्षा जास्त पुडे मिळवायचा अनेकांचा प्रयत्न आहे.  गरज नसताना जास्त पुडे जमा करणारे लोक कसे काय भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहणार असा मला पुन्हा प्रश्न पडतो. पाण्याचे विनामूल्य वितरण मी समजू शकते अशा प्रसंगी  – पण बिस्किटांचे काय प्रयोजन?
***
काही तासानंतर मी रामलीला मैदानाच्या बाहेर पडते. मेट्रो स्थानकाबाहेर मला एक ‘फूड प्लाझा’ दिसतो. मी कॉफी प्यायला तिथ जाते. बरीच गर्दी आहे तिकडे. एका टेबलापाशी दोन स्त्रिया बसल्या आहेत – तिथ दोन खुर्च्या रिकाम्या आहेत. मी त्यांची  परवानगी घेऊन तिथ बसते. मी सहज विचारते, “तुम्ही पण रामलीला मैदानवर जाऊन आलात का?” “छे, नाही गेलो,” त्या हसत उत्तरतात. त्या दोघी आई आणि मुलगी आहेत. आई पुढे म्हणते, “जाईन म्हणते मी एखाद्या दिवशी. काही interesting आहे का तिथ?” मला तिच्या प्रश्नाचा अर्थ कळत नाही; interesting  म्हणजे  काय  म्हणायचय  त्यांना?  मी नुसतीच हसते.  तरूण मुलगी म्हणते, “कामधंदा नसलेले रिकामटेकडे लोक जातात तिकडे, मला नाही वेळ असल्या गोष्टींसाठी .” मग मी नुकतीच तिकडून येते आहे हे लक्षात येऊन ती चपापून गप्प बसते.

काउन्टरवरच्या बाईंना मी विचारते, “कस काय चाललय एकंदरीत ?” हा प्रश्न तसा निरर्थकच म्हणायला हवा. पण ती उत्साहाने म्हणाली, “यामुळे जोरात चाललाय आमचा धंदा” – इतक्या प्रामाणिक प्रतिक्रियेवर पुढ काय बोलायच ते मला कळत नाही आणि मी पुन्हा एकदा नुसतीच हसते.

***
एकंदरीत  काय तर विभिन्न दृष्टिकोन असणारे आणि विभिन्न प्राधान्यक्रम असणारे लोक आहेत. वेगवेगळी मत असणारे आणि वेगवेगळ्या विचारांशी संलग्न असणारे लोक आहेत. विविध प्रकारच्या अपेक्षा असणारे लोक आहेत आणि विविध प्रकारची स्वप्न असणारे लोक आहेत. लोकांची गुंतवणूक  वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि उत्तरदायी असण्याच्या त्यांच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. लोकांचे समजून घेण्याचे स्तर वेगवेगळे आहेत आणि जबाबदारी घेण्याची तयारीही वेगवेगळी आहे.

एका बाजूने असे दिसते की अण्णांचे आंदोलन एप्रिल महिन्याच्या एक पाऊलही पुढे गेलेले नाही, आणि दुस-या बाजूने या आंदोलनावर टीकेची झोड उठली आहे. संसदेचे सार्वभौमत्त्व, लोकशाही प्रक्रिया, नागरिक संघटनांची भूमिका याबाबत सगळीकडे चर्चा चालू आहे. 

यातला एक गमतीचा भाग म्हणजे आंदोलनकर्ते आणि विरोधक दोन्हीही बाजू संख्येच्या पाठबळाबद्दल बोलताहेत. म्हणजे आंदोलनकर्ते सांगतात की, आम्हाला इतके इतके missed calls आले  आणि इतक्या मोठ्या संख्येने विविध ठिकाणी लोक मोर्चात सामील झाले. पण ते विसरतात की  missed calls देणे हे श्वासासाठी फुकट मिळणा-या हवेसारखे आहे – त्याचा कोण हिशोब ठेवतो? मोर्चात आणि उपोषणाच्या जागी येणारे लोक दोन तीन तास थांबतात  माझ्यासारखे  आणि मग आपापल्या कामाला निघून जातात. आमच्यासारख्यांच्या निष्ठेची काय खात्री? आंदोलनाचे टीकाकार म्हणतात की यात फक्त मध्यमवर्गाचा सहभाग आहे आणि जे खरे शोषित आणि पीडित आहेत ते यात सामील नाहीत. पण टीकाकार हे विसरतात की, कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात छोटीच असते आणि त्यात कमीच लोक  प्रारंभी सामील असतात . एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या मताला दुस-या कोणाचा पाठिंबा नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की ते मत अथवा तो विचार पूर्णतया  चुकीचा  आहे – कदाचित ती व्यक्ती काळाच्या फार पुढचा विचार करत असण्याचीही शक्यता आहे!

या सगळ्या चित्रविचित्र घटना आणि घडामोडी लक्षात घेऊनही मला असे दिसते आहे की, आंदोलनाला एक वेगळे बळ मिळते आहे. गेले सहा महिने भ्रष्टाचाराचा विषय सातत्याने  लोकांसमोर ठेवणे हे एक मोठे यश मानायला हवे. दोन तीन तासांपुरते का होईना पण तरुण आणि तितक्याच प्रमाणात प्रौढ माणसे आंदोलनात सहभागी होत आहेत हेही एक मोठे यशच आहे. तिरंगा लहरविण्यात लोकाना अभिमान वाटतो  आहे ही चांगली बाब आहे. १५ ऑगस्ट  आणि २६ जानेवरी हे दोन नेहमीचे दिवस वगळता इतर दिवशीही भारताची आठवण लोकांना आहे, त्याबद्दल बोलले जात आहे हे    कौतुकास्पद आहे. संसदेचे सार्वभौमत्त्व, संसदेचे काम, लोक संघटनांची भूमिका, स्वयंशासन अशा गोष्टींवर गांभीर्याने  चर्चा होत आहे हेही एक मोठे यश आहे.  काही लोकांना यामुळे सामाजिक कामात सहभागी होण्याची, योगदान देण्याची संधी उपलब्ध  होत आहे  (असे  त्यांना  वाटते)  हेदेखील महत्त्वाचे आहे.  

आपल्यापैकी काही लोकांचा जन लोकपाल' आंदोलनाच्या पद्धतीला विरोध आहे आणि त्याबाबत ते आवाज उठवत आहेत. अशा लोकांना ‘देशद्रोही’ असे शेलके विशेषण न लावता आपण त्यांचे ऐकून घेत आहोत – आपल्याला  न आवडणा-या मताचाही आदर करत आहोत – हे तर माझ्या मते सर्वात मोठे यश आहे.
  
म्हणून मला अस वाटत, की आमची मत कितीही विभागलेली असोत, त्यातून समाज म्हणून, देश म्हणून, माणूस म्हणून आम्ही अधिक सामर्थ्यशील बनत आहोत!
**                                                                                                                                                                 
तुम्हाला कदाचित 'जंतर मंतरलेल्या संध्याकाळी' वाचायला आवडेल. 

Monday, April 11, 2011

६९. ‘जंतर मंतर’लेल्या संध्याकाळी

‘इंडिया गेट’ पासून आम्ही ‘जंतर मंतर’ ला परत येत आहोत. आयोजकांनी ‘घोषणा नको’ अशी सूचना दिली आहे. म्हणजे मौन नाही; पण घोषणाही नाहीत. मला आयोजकांच्या शहाणपणाच कौतुक वाटत. लोक दमले आहेत हे त्यांनी बरोबर ओळखलय. आधी जंतर मंतरपासून इंडिया गेटकडे जाताना आम्ही असंख्य घोषणा दिल्या आहेत. आज मिरवणुकीत मेणबत्त्या नाहीत; त्याऐवजी थाळी आणि चमचा आहे. त्यांच्या आवाजाने, लोकांच्या आवाजाने सरकार जागे व्हावे अशी आंदोलनाची अपेक्षा आहे.

गेला पाऊण तास आम्ही सगळे विश्रांती न घेता सलग ‘वंदे मातरम’ म्हणत आहोत. ‘इन्किलाब झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ या आणखी दोन लोकप्रिय घोषणा आहेत. आणखी एक घोषणा म्हणताना सगळ्यांच्या चेह-यावर हसू दिसतंय – ती घोषणा आहे “सोनिया जिसकी मम्मी है, वर सरकार निकम्मी है” ! फक्त तरुण वर्गच नाही तर मध्यम वयाचे स्त्री पुरुषही मोठया संख्यने मिरवणुकीत सामील झाले आहेत.


पण आता घोषणा बंद असल्याने लोक आपापसात बोलत आहेत. मी एकटीच चालते आहे. माझ्यासोबत कोणी दुसरे नसल्याने मी कोणाशी बोलायचा प्रश्न नाही. त्यामुळे मला इतरांचे आपापसातले संभाषण ऐकू येतय – माझ्या बाजूला, पुढे, मागे – सगळीकडे लोकांचे छोटे गट गप्पा मारताहेत. हे बोलणे ‘कॅमे-या’ समोर असते तसे नाही. मी त्यांचे बोलणे ऐकतेय हे त्यांना माहितीही नाही.

कॉलेज विदयार्थ्यांचा एक गट आहे. एक मुलगा म्हणतो, “ मी पहिल्यांदाच अशा निषेध मोर्चात सामील झालोय. नेहमी फक्त टीव्हीवर आणि यु ट्युबवर पाहिल होत! आज मला फार ग्रेट वाटतय!”
त्यावर गटातल कोणीतरी हसलं असणार. कारण हा पहिला आवाज विचारता झाला, “हसताय का तुम्ही? मी काही विनोदी बोललो नाही.”
मग त्याचा मित्र म्हणाला, “अरे, तू निषेध मोर्चाच बोललास. मला तर आठवतय तसं मी आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर इतका वेळ चालतोय. मला फार बर वाटतय. असे खूप लोक असतील की ज्यांना रोज नाईलाजाने चालाव लागत असेल. त्यांच जगण कस असेल याची मी कल्पना करतोय!”

आणखी एक गट आहे मुला-मुलींचा.
एक मुलगा म्हणतो, “तुम्हाला माहिती आहे का, या म्हाता-या माणसाला घर, कुटुंब वगैरे काही नाही.”
“म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?’ एका मुलीचा प्रश्न.
“आपण सगळे त्यांच्या घरातलेच आहोत,” आणखी एकजण भावूकतेने म्हणतोय.
“अरे ऐक तर यार! मला अस म्हणायच्य की त्यांना काही मुलगा, मुलगी, नातवंड, जमीन, इस्टेट नाही. ते स्वत:साठी हा संघर्ष करत नाहीत. ते लढताहेत आपल्यासाठी – आपल् जगण भल व्हावं म्हणून!”
“वा! याहून चांगल आजवर तू काही बोलला नव्हतास” त्याचे सहकारी त्याला शाबासकी देतात.

आणखी एक गट.
एक मुलगी म्हणते, “वर्ल्ड कप सेलेब्रशन बेस्ट होत, पण आज आपण जे काही करतोय ते बेस्टेस्ट आहे!”
‘का?” तिच्या मित्र मैत्रिणीना कुतुहल आहे.
“कारण क्रिकेट खेळतात ते सचिन, युवी, एम एस, झाक, भज्जी वगैरे – आपण नुसतेच ओरडतो त्यांच्या विजयानंतर. आपला त्यात वाटा शून्य असतो. पण इथे मात्र आपण राष्ट्राच्या एका कामात प्रत्यक्ष सहभागी होतोय,” ती स्पष्टीकरण देते.
“ उपोषणाला बसलेले ते ३०० लोक खरे सहभागी आहेत, आपण काय नुसते चालतोय” गटातला कोणीतरी जमिनीवर पाय असणारा त्यांना आठवण करून देतो.
“ते तर आहेच – ते ३०० लोक खरे हिरो आहेत यात वादच नाही. पण आपणही खारीचा वाटा उचलतो आहोत ना! माझ्या आयुष्यातला हा अगदी अविस्मरणीय प्रसंग आहे,” कोणीतरी म्हणते आणि त्यावर सगळे सहमत होतात – अगदी तो जमिनीवर पाय असणारासुद्धा!




आणखी एक गट.
“आपण १३च्या जेल भरोत सामील होऊया.” एक मुलगी सुचवते.
“पण त्यांनी आपल्याला खरच जेलमध्ये टाकल तर? पोलिस मारहाण तर करणार नाहीत आपल्याला? आणि कॉलेजने काढून टाकल तर?” दुसरी मुलगी नुसत्या विचारांनीही घाबरली आहे.
“काय काळजी करतेस एवढी? पोलिस मारणार वगैरे नाहीत काही. हजारो लोक येतील तुरुंगात जायला – तेवढी जागा कुठे आहे तुरुंगात?” एक मुलगा तिला समजावतो.
दुसरा मुलगा आपल्या गटाला प्रोत्साहित् करतो. तो म्हणतो, “आपण भगतसिंग आणि इतर स्वातंत्र्य योद्ध्यांबद्दल वाचले आहे. त्यांनी आपल्यासाठी बलिदान केले. ही आपली वेळ आहे, हा आपला क्षण आहे, ही आपली जबाबदारी आहे. आता या वेळी पळ काढून चालणार नाही.”
“हो, आपण यात सहभागी होऊ” ते सगळे एकमुखाने म्हणतात.

एक मध्यम वयीन स्त्री एकटीच चालताना दिसते. मी तिच्याशी बोलायला जाते. तरुणाईच्या प्रतिसादांनी – त्यांच्या संख्यने आणि त्यांच्या उत्साहाने ती भारावली आहे. ती माझ्याशी सविस्तर बोलते. “इथल वातावरण फारच चांगल आहे. दिल्लीची गर्दी स्त्रियांशी बहुधा नेहमीच वाईट वागते. पण इथे मात्र मुलींची आणि स्त्रियांची काळजी घेताहेत. एखाद्याचा चुकून धक्का लागला तर तो लगेच मनापासून माफी मागतो. चांगले काम, चांगले वातावरण लोकांमध्ये कसा बदल घडवते याचे हे एक उदाहरण आहे.”

मी त्या स्त्रीशी पूर्ण सहमत आहे. तुम्हाला माहिती आहेच की जंतर मंतर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे त्यांच्या सहका-यासह ‘जन लोकपाल बिलाच्या’ मागणीकरता आमरण उपोषण करत आहेत (होते). मी येथे अनोळखी लोकांच्या गर्दीत आहे, संध्याकाळचे काही तास आहे. रात्रीचे दहा वाजले तरी असुरक्षित वाटत नाही. एक चांगले वातावरण आहे भोवती – आपण सगळे एक आहोत असा दिलासा देणारे. ही दिल्ली माझ्या आजवरच्या अनुभवापेक्षा अगदीच वेगळी आहे.

******
अण्णा हजारे; लोकपाल आणि जन लोकपाल; सामाजिक संस्थांची आणि संसदेची भूमिका, जंतर मंतरचा पडद्यामागचा गट, सरकारला कसा अंदाजच आला नाही; सगळ्या स्तरातल्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग; गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग; लोकांचा राजकीय नेतृत्वावरचा उडालेला विश्वास; या आंदोलनाची रणनीति, मीडियाचा वापर, लोकशाही प्रक्रियांचे संस्थात्मिकीकरण – अशा अनेक मुद्द्यावर बरेच काही लिहिले गेले आहे आणि आणखीही बरेच लिहिले जाईल.

चर्चा आणि वाद आता नुकताच सुरु झाला आहे.
*****
या छान वाटणा-या चित्राची दुसरीही एक बाजू आहे. ती मी सांगितली नाही तर तुम्हाला मी अर्धसत्य सांगितल्यासारख होईल.

लोक मोठया संख्येने जंतर मंतरला येतात. कशासाठी? तर उपोषणाला बसलेल्या लोकाना पाठिंबा देण्यासाठी. आणि ते – सगळे नाही तरी बरेचसे – काय करतात?

थोडया घोषणा देऊन झाल्या, फोटो काढून झाले (मुख्यत्वे स्वत:चेच) की समोरच्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांकडे ते मोर्चा वळवतात. उपोषणाला बसलेल्या लोकांसमोर ते निर्लज्जपणे खात असतात. उपोषणाला बसलेल्या लोकांना पाठिंबा देताना काही तासदेखील ते आपल्या भुकेवर नियंत्रण राखू शकत नाहीत. त्यांच्या पाठिंब्यांचा नेमका अर्थ काय असतो?

कचरापेटी भरून वाहते आहे. उपोषणकर्त्यांच्या भोवतालचे वातावरण अस्वच्छ होते आहे पण त्याची कोणाला फिकीर नाही, त्यामुळे उपोषणकर्ते आजारी पडण्याचा धोका वाढतो – पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही. स्वयंसेवक बहुधा रात्री सगळा भाग साफ करतात. ते त्यांचे काम आहे का?

जवळजवळ प्रत्येकाकडे कॅमेरा आहे. ते ठीक आहे. पण बहुतेक सगळे स्वत;चेच फोटो काढण्यात मग्न आहेत. कॅमेरा आणायला बंदी केली तर इतके लोक येतील का?

घोषणा देणे ही देशभक्तीचे एकमेव प्रतिक बनले आहे. अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत असतानादेखील या घोषणाबाजानां शांत बसवत नाही. संयोजक सूचना देतात की, एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली आहे – त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यासाठी वाट दया. त्यावर एक तरुण ‘भारत माता की ..” ओरडतो. मी त्याच्या खांद्यावर थाप मारून त्याला सूचना नेमकी काय होती ते सांगते. तो खजील होते, माफी मागतो आणि निघून जातो. घोषणा देता येत नसतील तर त्याला तिथे थांबण्यात रस नाही.

एक गट ‘मनमोहन सिंग भारत छोडो’ अशी घोषणा देतो आहे. मनमोहनसिंगसुद्धा त्यांच्याइतकेच भारतीय आहेत ही वस्तुस्थिती त्यांच्या गावीही नाही. ‘भ्रष्टाचा-यांना गोळी मारा’ अशी घोषणा ऐकून आमच्यापैकी काहीजण ‘हिंसात्मक भाषा नको वापरायला. हे आंदोलन अहिंसेच्या तत्त्वावर उभारले आहे’ असे सांगतात तेव्हा तो गट आमच्यापासून दूर जातो.

काही युवक रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकतात तेव्हा त्याना कचराकुन्डीचा वापर करण्याची आठवण करून द्यावी लागते.

एक पत्रकार अण्णांना ‘तुम्ही सरकारला वेठीस धरले आहे’ असे म्हणते. आता त्या बाईना common sense कमी होता हे उघडच आहे. असा निराधार आरोप, पूर्ण आत्मविश्वासाने, हजारो समर्थकांसमोर करताना त्यांनी जरा विचार करायला हवा होता. जमलेल्या गर्दीने आरडाओरडा करत त्या बाईना बोलूच दिल नाही. अण्णांनी तिच्या प्रश्नच उत्तर दिल हा भाग वेगळा. पण गर्दीचे वागणे अजिबात समर्थनीय नव्हते. पत्रकार काही देव नव्हेत आणि त्यांनी तारतम्य राखावे हे खरे. पण दुस-यांचे काही ऐकून घ्यायचे नाही अशी मानसिकता आपल्या भविष्यात कुठे नेणार याची चिंता वाटलीच.
*****
लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल माझ्या मनात अनेक शंका आहेत.

हा आणखी एका प्रकारचा mass hysteria तर नाही? ‘सचिन, सचिन’ ऐवजी देश आता ‘अण्णा हजारे, अण्णा हजारे’ अस ओरडत नाही ना? अण्णांना देवत्व बहाल करण्याची मानसिकता अंगावर शहारे आणणारी आहे. आणि त्यांना खाली खेचून मूर्तिभंजन करायलाही आम्हाला वेळ लागणार नाही. त्यांच्या लढ्याचा मुद्दा लोकांनी फार उथळपणे समजून घेतला आहे अस दिसत. म्हणजे अनेकांना ‘जन लोकपाल’ आलं की जादूने एका रात्रीत सगळ काही बदलून जाईल अशी अपेक्षा आहे – जे वास्तवापासून फार अंतरावर आहे. आणि आम्ही फक्त घोषणा देऊ, त्या म्हाता-या माणसाने लढावे अशीच आमची अपेक्षा आहे. अनेकांना ही एक वेगळी करमणूक, वेगळी excitement आणि चर्चेला वेगळा विषय इतकाच या घटनेचा अर्थ!

India Against Corruptionचळवळीत सामील व्हायचं? एक missed call दया, किंवा फेसबुक किंवा Twitter वर एक क्लिक करा. जंतर मंतर किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही मोर्चात सामील होऊ शकलात तर उत्तम. मी हे सगळ केल आणि त्यातला फोलपणा मला जाणवला. किती सहजपणे तुम्ही ऐतिहासिक घटनेत सामील होऊ शकता! पण माझा अनुभव सांगतो की एखाद्या विचाराला, एखाद्या चळवळीला सामील व्हायचं ही इतकी सोपी गोष्ट नाही. तो एक अवघड मार्ग आहे. त्यासाठी बरच काही सोडाव लागत, बरच काही नव शिकावं लागत, समाजाला बदलण्याआधी स्वत:ला बदलाव लागत! जीवनमूल्य न बदलता माणस कस काय एका नवीन विचारधारेत सामील होऊ शकतात?

ही लढाई ‘खरी’ होईल तेव्हा इतके समर्थक असतील का? हा उत्साह टिकेल का? एकी टिकेल का? आताच विरोधाचे स्वर तीव्र होऊ लागले आहेत. पोलिस सावध होते पण त्यांनी बळ वापरल नाही. उदया शासनाने ही चळवळ बळाचा वापर करून मोडायची ठरवलं तर (सुदैवाने तसं आता घडल नाही) – तर समाजाला, समर्थकांना अहिंसक मार्गाने चालण्याची प्रेरणा नेतृत्त्व देऊ शकेल का? गोष्टी सोप्या न राहता अवघड झाल्या तर काय? खरच त्याग करावा लागला तर काय?

काळच याच उत्तर देईल.
****

जी गर्दी कालपर्यंत ‘वन डे मातरम’ गात होती ती अचानक ‘वंदे मातरम’ गाताना पाहून बर वाटलं. अभिमान वाटला. उत्साह वाटला.

जे वाईट क्षण आहेत त्याना क्षणभरासाठी विसरल, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल तर मला असे शेकडो, हजारो प्रेरणादायी क्षण आठवतात. कॅमेरा नसताना लोक जे बोलले, जे वागले, त्यातून समाजाच्या शक्तीच, निश्चयाच, साहसाच, निष्ठेच एक वेगळ दर्शन मला झालं. हे नाव नसलेले, चेहरा नसलेले अनामिक नागरिक होते – पण त्यांच्यात एक अनोखी शक्ती आहे याचा मला प्रत्यय आला. आज आम्हाला गरज आहे विश्वासार्ह, प्रामाणिक आणि सृजनात्मक नेतृत्त्वाची. ते मिळेल का?

आमचा बदललेला दृष्टिकोन टिकेल का? आमच्या निष्ठा आमच्या नवा उत्साह जागवतील का? कर्तव्य आणि जबाबदारीचे आमचे भान टिकेल का? संवेदनशीलता टिकेल का?

मी आंधळी अपेक्षा ठेवत नाही बदलाची. पण जंतर मंतरवरच्या त्या संध्याकाळच्या अनुभवानी माझ्यातला आशावाद वाढवला आहे. ‘India Shining’ वर माझा कधीच विश्वास नव्हता पण ‘भारत पुन्हा एकदा जागा होतो आहे’ अस मात्र मला नक्की वाटलं. जंतर मंतरने मला तो एक विश्वास दिला आहे.
**
प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, २४ एप्रिल २०११