ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, December 23, 2023

२६७. रातरागिणी

शीर्षक वाचून गोंधळात पडणारे तुम्ही काही एकटेच नाही. मीही हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा गोंधळले. झालं असं की व्हॉट्सऍपवरच्या अनेक निरर्थक फॉरवर्ड्सच्या मांदियाळीत मला हा शब्द दिसला. रणरागिणी शब्द माहिती होता, पण रातरागिणी?

नवं काहीतरी दिसंतय म्हणून पाहिलं. लोकमत दैनिकाच्या वतीने सखी रातरागिणी नाईट वॉक आयोजित करण्यात आल्याची ती बातमी होती. २२ डिसेंबरची रात्र ही वर्षातली सर्वात मोठी रात्र असते. या रात्री पुणे शहरात एक छोटा वॉक दैनिक लोकमतने आयोजित केला होता.

सातच्या आत घरातया बंधनातून आता निदान शहरातल्या, शिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या काही स्त्रिया मुक्त झाल्या असल्या तरी गावांत-शहरांत अनेकींना आजही या प्रवृत्तीशी लढावं लागतं. आमची काही हरकत नाही, पण तू सुरक्षित नाहीस बाहेर, समाज बघ ना कसा आहे आपला,... अशा विविध कारणांनी स्त्रीचं रात्री बाहेर जाणं (तेही कामासाठी नाही तर फिरायला जाणं) हे अनावश्यकच नाही तर चुकीचंही मानलं जाणारी अनेक कुटुंबं (त्यात पुरूष आणि स्त्रिया दोन्हीही आले!) आपल्याही ओळखीत असतील. त्याला छेद देणारं काहीतरी घडतंय तर आपण त्यात सामील व्हावं असं मला वाटलं.

रात्री दहा वाजता अलका टॉकीज (हा शब्द आता वापरातून गेलाय, पण अलका टॉकीज हे अलका टॉकीजच आहे) चौकात जमायचं आणि तिथून शनिवारवाड्यापर्यंत चालत जायचं असा कार्यक्रम होता. अलका चौक ते शनिवारवाडा म्हणजे फार फार तर दोन किलोमीटरचं अंतर. अगदी रमतगमत चालत गेलं तरी अर्ध्या तासात पार पडणारं. पण कार्यक्रम तर दोन-अडीच तास चालेल असं संयोजकांनी सांगितलं होतं. तर रस्त्यात गाणी, पथनाट्य, तारपा नृत्य, खाण्याचे आणि चहाचे स्टॉल्स असणार होते. रात्रीचं असं निरुद्देश भटकून मला कितीतरी वर्ष उलटली होती. तसं भटकण्याची ही एक नामी संधी चालून आली होती.

मग कधी नव्हे ते व्हॉट्सऍप मेसेज फॉरवर्ड करण्याचा गुन्हा मीही केला. अर्थात फक्त पुणे शहरातल्या स्त्रियांना मी हा निरोप पाठवला. काही ओळखीच्या पुरूषांनाही पाठवला – त्यांच्या घरातल्या स्त्रियांना सामील व्हायचं असलं तर या विचारांनी. मला आलेल्या प्रतिसादांमध्ये वैविध्य होतं. कुणी यांना विचारून सांगते असं म्हणालं, तर कुणी वेळ फारच उशिराची आहे, पुढच्या वेळी संध्याकाळी सहा ते आठ घ्यायला सांगा म्हणजे मी येईन असं म्हणालं. कुणाची मुलं लहान होती, तर कुणाच्या घरी आजारी माणूस होतं. कुणाला इतक्या रात्री परत यायला रिक्षा-टॅक्सी मिळणार नाही याची खात्री होती. तर कुणाला स्त्री-पुरूष समानता मानणाऱ्यांनी असं खास स्त्रियांसाठीच्या कार्यक्रमात सामील व्हावं का अशी अत्यंत प्रामाणिक शंका होती.

शेवटी आम्ही चौघीजणी तयार झालो. तसंच बाणेरमधून एक मैत्रीण तिच्या सासूबाई आणि लहान मुलीसह निघाली. एका मैत्रिणीचा दुसरीतला मुलगा घरातून निघायच्या अगदी दहा मिनिटं आधी झोपी गेला. घरात दुसरं कुणी नसल्याने तिचं येणं रद्द झालं.


अलका चौकात आम्ही पोचलो तेव्हा व्यासपीठावरून गाणं गायलं जात होतं आणि जमलेल्या स्त्रियांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. हळूहळू गर्दी वाढत गेली. स्त्रियांचीच गर्दी असल्याने नकोशी धक्काबुक्की नव्हती. सार्वजनिक ठिकाणी अंग चोरून वावरावं लागण्याच्या अनुभवातून काही काळ तरी मुक्ती मिळाली. (अर्थात स्त्रियांचीही अती गर्दी असती तर तेव्हाही अंग चोरावं लागलं असतं म्हणा.) रातरागिणीचं थीम साँग ऐकायला मला आवडलं. वस्त्रहरण आता होणे नाही, अपहरणाचा मुद्दाच नाही, रस्त्यावर आज उतरल्या नव्या वाघिणी, अंधारावर चालून जाणार रातरागिणी….’ अशा त्या गाण्याच्या सुरूवातीच्या ओळी होत्या. त्या गाण्याची लय छान आहे. सोबत "बादल पे पाव है, छोटासा गाव हैं, अब तो चल पडी, अपनी नाव हैं" यासारखी काही लोकप्रिय गाणीही होती.

अंधाराला घाबरत नाय, अंधाराला घाबरत नाय,’ ‘होऊ दे कितीही अंधार, आम्ही मागे नाही फिरणार अशा वेगवेगळ्या घोषणाही चालू होत्या. फुलगावच्या लोकसेवा शाळेतल्या मुली मोठ्या संख्येने आल्या होत्या. त्यात ढोलवादक पथकही होतं, एनसीसी कॅडेट्स होते, आणि नृत्याचा पोशाख धारण करून आलेला मुलींचा एक गट होता. हे सगळे गट एकाच शाळेतले होते की वेगवेगळ्या शाळांमधले हे मात्र माहिती नाही.

गाणी चालू होती तोवर आजूबाजूच्या (अनोळखी) स्त्रियांशी गप्पा झाल्या. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात रहात असलेल्या एक आजी एकट्याच आल्या होत्या. माझ्यासोबत यायला कुणी मैत्रीण नव्हती, पण इथं आलं की काय मग सगळ्या मैत्रिणीचअसं त्या हसतहसत म्हणाल्या. लोकमत सखी मंचचा मोठा गट आहे हे काहीजणींशी बोलताना कळलं. या गटात अनेक साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम चालतात असंही कळलं. हळूहळू ढोल वाजायला लागले आणि त्याच्या त्रासाने आम्ही गर्दीपासून दूर जायला लागलो. शनिवारवाड्याच्या दिशेने चालायला लागलो.

मैत्रिणींची लहान मुलं सोबत असल्याचा एक फायदा झाला ते म्हणजे त्या दोघांना आईस्क्रीमचं दुकान दिसलं😀मग लहानांसोबत मोठ्यांनीही आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. नदीपात्रातल्या रस्त्याने जाताना खाण्या-पिण्याचे अनेक स्टॉल्स होते. गेली अनेक वर्षं मी संध्याकाळी सात वाजता जेवते आहे. पण आज मात्र आईस्क्रीम, वडापाव, शंकर महाराज मठ वाटत असलेला प्रसाद (तांदळाची खिचडी) वगैरे खाल्लं. कमी प्रमाणात खाल्लं पण खाल्लं. वाटेत अभिव्यक्ती, लोकायत वगैरे संस्थांचे प्रबोधन करणारे स्टॉल्स आणि कार्यकर्ते होते. तारपा नृत्याच्या तालाने अनेक स्त्रिया आकर्षित होऊन नृत्यात सहभागी होत होत्या.  तुतारी वादकाने मस्त वातावरणनिर्मिती केली. 

आम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होतो आणि उजव्या बाजूला बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. रिक्षाचालक हातात फलक घेऊन उभे होते. पुणे शहर स्त्रियांसाठी सुरक्षित असावे यासाठी हे रिक्षाचालक कटिबद्ध असल्याचं सांगत होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून पुढं निघालो.

एका ठिकाणी कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वांसाठी गुळाचा चहा ठेवला होता. तिथं दोन महिला पोलिसांशी गप्पा झाल्या. एक महिला पोलिसाला तिची दोन वर्षांची मुलगी घरी झोपली आहे का नाही याची काळजी होती. रात्रीची ड्युटी नेहमीच असते (शिफ्ट्स असतात) असं त्या सांगत होत्या.

बऱ्याच काळाने रात्री असं निवांतपणे, कसलीही घाई न करता चालायला मजा आली. सोबत मैत्रिणी होत्या, त्यांच्याशीही गप्पा झाल्या. त्यांच्या मुलांशीही गप्पा झाल्या. अनेक फोटो काढून झाले. नदीपात्रातल्या रस्त्यातून रात्री जाताना ओंकारेश्वर देऊळ फार मोठं आहे असा साक्षात्कार झाला. डेक्कन आणि संभाजी उद्यान मेट्रो स्थानकं इतकी जवळ आहेत, की ट्रेनला एक डबा जास्त जोडला की दोन्ही स्थानकं जोडली जातील असा विनोद करून झाला.

शनिवारवाड्यावर पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. नाही म्हणता म्हणता आम्ही दोन तास चाललो होतो तर. शनिवारवाडा सजवला होता. एका मैत्रिणीचा तिसरीतला मुलगा शनिवारवाडा आत जाऊन पाहता येईल या आशेने आमच्यासोबत आला होता. वाड्याचा दरवाजा बंद आहे हे कळल्यावर तो खूपच निराश झाला 😊

एकूण मजा आली तरी बारकाईने पाहताना काही गोष्टी मात्र खटकल्या

ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असताना पुन्हा याही कार्यक्रमात ढोल वाजले. मान्य आहे, की मुलींचंच पथक होतं. पण उत्सव म्हणला की ढोल गरजेचा आहे का? गणेशोत्सवातले ढोल बंद करणं अवघड आहे. पण निदान नवे उत्सव, त्या उत्सवांच्या परंपरा निर्माण करताना आपण काही भूमिका घेणार आहोत? की नवे उत्सव फक्त बाह्य स्वरूपातच नवे असणार आहेत? सौम्य संगीताचेही अनेक पर्याय आहेत (जसं तारपा, तुतारी, सनई) ते पाहता येतील.

प्रखर दिवे डोळ्यांवर येत होते. सगळं काही व्हिडिओसाठी करायची गरज नाही. सौम्य दिवे लावूनही कार्यक्रम चांगला करता आला असता. प्रकाश प्रदूषण ही गोष्ट तर आपल्या गावीही नाही. माईकचा कर्कश आवाजही नियंत्रणात ठेवता आला असता. रात्री बारा वाजता शनिवारवाड्यावर माईक लावून कार्यक्रम करण्याने परिसरातल्या लोकांना त्रास झाला असणारच. 'एक दिवस काय होतंय' असं म्हणून चालणार नाही. वर्तमानपत्रांकडून अजूनही आशा असणारे अनेक लोक समाजात आहेत. चांगले पायंडे पाडायची जबाबदारी आपलीही आहे, आपल्या कार्यक्रमातून आपण उत्सव साजरे करण्याचे पर्याय उभे केले पाहिजेत.

शिवाय कार्यक्रम स्त्रियांचा आणि स्त्रियांसाठी असताना व्यासपीठावर सातत्याने पुरुष बोलत होते. कार्यक्रम जर महिलांसाठी आहे तर व्यासपीठावरही महिलांना(च) जागा मिळू द्या. पुरुषांसाठी अन्य अनेक जागा आहेत. स्त्रियांनी फक्त गाणी म्हणायची, घोषणा द्यायच्या आणि त्यांना मार्गदर्शन वगैरे करायची वेळ आली की पुरूष पुढं येणार.... ही नेहमीचीच पद्धत याही कार्यक्रमात दिसली.

स्त्रियांच्या विकासासाठी स्त्रियांनी अमुक केलं पाहिजे आणि तमुक केलं पाहिजे (घाबरायला नाही पाहिजे, रात्री बाहेर पडायला पाहिजे .... वगैरे) हे पण आता कंटाळाच नाही तर उबग यावा इतकं जुनं झालंय. प्रश्न फक्त स्त्रियांच्या क्षमतांचा नाहीये. तसा असलाच तर तो फार कमी आहे. स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहेच. प्रश्न आहे समाजाच्या संवेदनशीलतेचा. ती वाढवण्यासाठी स्त्रियांसोबत पुरूषही सहभागी असले पाहिजेत. सामाजिक वागणुकीत बदल घडून आला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ प्रशासनाकडूनही मिळालं पाहिजे (कायदे, धोरणं, प्रशासकीय व्यवस्था, मूलभूत सोयी वगैरे). या तिन्ही पातळ्यांवर काम झालं तरच स्त्रियांना खऱ्या अर्थाने अंधारावर मात करायला आणखी बळ मिळेल.

अर्थात ही सगळी कामं 'लोकमत' या दैनिकाने केली पाहिजेत असं मला म्हणायचं नाहीये. त्यांनी त्यातला एक भाग केला. तो करताना या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची जाणीवही अधिक ठळक असली तर जास्त चांगलं होईल. पुणे शहरातील अनेकींसाठी हा एक नवा अनुभव होता. या अनुभवाची प्रासंगिकता कायम राखायची असेल तर आत्मपरीक्षणाला, बदलांना पर्याय नाही – लोकमतलाही आणि आपल्यालाही! नाहीतर कार्यक्रम फक्त प्रतिकात्मक होऊन जाण्याचा धोका राहतो. 

 

Monday, December 11, 2023

२६६. दुवा

अनोळखी माणसांसोबत बोलायला उत्सुक असणारी तीन माणसं – खरं तर तीन स्त्रिया, एक पुरूष, आणि एक आठेक वर्षांची मुलगी - एका दिवसात मला भेटले. समोर दिसलेल्या अनोळखी माणसाला कुठल्याही शिक्क्यांविना स्वीकारणं मोठ्या माणसांना जमतच नाही की काय असं वाटण्याजोगे अनुभव होते ते.

पहिल्या ताई बसमध्ये भेटल्या. पुणे शहरातली बस. शनिवारची कलती संध्याकाळ. त्यामुळे की काय गर्दी जराशी कमी होती. पण सवयीने मी स्त्रियांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर जाऊन बसले. तिकिट काढलं. शेजारी बसलेल्या ताईंनीही काढलं. त्या खिडकीतून बाहेर पहात होत्या, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा माझा इरादा थंडावला. तितक्यात त्यांच्या हातातलं तिकिट खाली त्यांच्या पायाशी पडलं. त्यांनी पायांच्या बोटांनी ते तिकिट उचलून घेण्याचा प्रयत्न केला खरा. पण बसच्या त्या तिकिटाला जाडी अशी काही नसतेच, त्यामुळे ते तिकिट काही उचललं जाईना. मग मी जागेवरून उठले, खाली वाकून तिकिट घेतलं आणि त्यांच्या हातात दिलं. त्या हसल्या. ते धन्यवाद, आभार वगैरे शब्द माणसं सरसकट वापरत नाहीत ते बरं आहे.

त्यांचा पहिला प्रश्न होता, तुमचं आडनाव काय?” अनेक लोकांना आडनावावरून जात कळते हे मला माहिती आहे. शिवाय माझं आडनाव काही त्यावरून जात कोणती ते कळू नये या प्रकारातलं नाही. मी मुद्दामच फक्त माझं नाव सांगितलं. मग त्या म्हणाल्या, हो, पण आडनाव काय?” फार आढेवेढे न घेता ते मग मी त्यांना सांगितलं. मग त्यांचा चौकशीचा सूर लागला तो त्या काही थांबायचं नाव घेईनात. कुठं राहता, काय करता, घरी कोण असतं, आत्ता कुठं चाललात, तिकडून परत कधी येणार .... वगैरे वगैरे.

पाच-सहा स्टॉपनंतर मला उतरायचं होतं. त्यामुळे एवढ्या चौकशीची काही गरज नव्हती. आम्ही एकमेकींना आधी कधीच पाहिलेलंही नव्हतं. मी त्यांना एकही व्यक्तिगत प्रश्न विचारत नव्हते. अर्थात त्या ताई मला काही विचारायला वावही देत नव्हत्या हा भाग वेगळा. पण संधी मिळाली असती तरी मी काही त्याना खोलात जाऊन त्यांची माहिती घेतली नसती. पुन्हा कधी भेटलो तर कदाचित विचारेन, पण पहिल्याच भेटीत या माहितीची मला काही गरज वाटत नव्हती.

त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायच्या नादात मी एक स्टॉप पुढं आले. गुगल मॅप चालू करून मी इच्छित ठिकाणाच्या दिशेने चालायला लागले. आधीच पोचायला थोडा उशीर झाला होता. त्यात मी एक स्टॉप पुढं येऊन चालण्याचं अंतर दहा मिनिटांनी वाढवलं होतं. नकाशावर मला दिसलेल्या एका जवळच्या रस्त्याकडं (म्हणजे शॉर्ट कट) मी वळले. एकूणच दिशांबाबत माझं अज्ञान अगाध आहे. त्यामुळे जीवनाची दिशा वगैरे शब्दांपासून मी लांब राहणं स्वाभाविक आहे. ते असो.

तात्पर्य काय तर पुणे शहरातल्या एरवी फक्त नावानेच माहिती असलेल्या एका वस्तीत मी घुसले. ८५० मीटर अंतरावरचं माझं पोचण्याचं ठिकाण मग ९५० मीटर झाल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी दिशा बदलली. एकमेकांनी चिकटून असेलली असंख्य छोटी घरं, घरांच्या दारात बसलेल्या स्त्रिया-मुली, रस्त्यावर खेळणारी मुलं (मुलगे खेळत होते, आणि त्याच वयाच्या मुली आईजवळ बसून होत्या). समोरसमोरच्या घरांमध्ये तीन-चार फुटांचं अंतर असेल-नसेल, त्यातूनही वाट काढत जाणारे दुचाकीस्वार होते. माझ्याकडं काही जणांनी आश्चर्याने पाहिलं, पण मी काही न बोलल्याने तेही काही बोलले नाहीत. मी चालत असलेला रस्ता मुख्य रस्त्याला जाऊन मिळतो आहे ना याची मी वाटेत एका घरात बसलेल्या स्त्रियांबरोबर खातरी करून घेतली. पण मी जितकी जास्त चालत होते, तितकी मी माझ्या पोचण्याच्या ठिकाणाहून दूर जात होते. आपण भूलभुलय्यात फसलो आहोत की काय असं मला वाटायला लागलं. मला काही कुणी त्रास देत नव्हतं, किंवा मला काही असुरक्षित वगैरेही वाटत नव्हतं. मला फक्त वेळेत माझ्या ठिकाणी पोचायचं होतं.

वाटेतल्या एका घराच्या दारात एक ताई उभ्या होत्या. मग मी थांबले. त्यांना मी म्हणलं, मी रस्ता चुकलेय असं दिसतंय. मी तुमच्या वाडीतच गोल गोल फिरतेय बहुतेक. मला .....सोसायटीत जायचं आहे. इथून कसं जायचं? सांगाल का मला?” मीही अर्थात प्लीज, कृपया वगैरे शब्द वापरले नाहीत. बोलताना असे शब्द अनेकदा औपचारिक वाटतात. त्या ताई हसल्या, म्हणाल्या, इथं सोसायटी वगैरे काही नाही. ही अशी घरं दिसताहेत ना, तशीच वस्ती आहे इथं. तुम्ही चुकलायत रस्ता. बाजूलाच आठ-नऊ वर्षांची एक मुलगी उभी होती, तिला म्हणाल्या, जा गं, मावशीला त्या रस्त्यापत्तुर सोडून ये.मुलगीही लगेच तयार झाली. मला जरा संकोच वाटला. मी म्हणलं, अहो, सांगा मला, मी जाईन. तिला कशाला त्रास. ताई हसल्या. म्हणाल्या, दिवसातून दहा वेळा जातेय ती. शिवाय तुम्हाला नाही सापडायचा रस्ता, तुम्ही पुन्हा चुकाल.

नाव नाही, गाव नाही, जात नाही, धर्म नाही .... मला मदत करायला त्यांना माझ्या अशा कोणत्याच ओळखीची गरज पडली नाही.

छोटी पोरगी बडबडी होती. ती एकदम तिच्या मैत्रिणीशी तिचं काही भांडण झालं होतं, त्याबद्दल सांगायला लागली. कुठल्यातरी बोळकांडातून डावी-उजवीकडं वळून तिने मला तीन मिनिटांत मुख्य रस्त्यावर आणून सोडलं. आता तुम्ही जा असा मला आदेश देऊन ती सुसाट तिच्या घराकडं पळाली.

त्या सोसायटीतलं काम आटोपून पत्रकार नगरमध्ये एका कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम संपल्यावर निवांत चालत आले ती जवळजवळ लॉ कॉलेजपर्यंत. रोजची ठराविक पावलं चालायची असतात तीही पूर्ण झाली त्या निमित्ताने. चालताना सभोवतालच्या जागा, आकाश, माणसं काहीशी वेगळीच भासतात हा नेहमी येणारा अनुभव पुन्हा एकदा आला.

सिग्नलसाठी थांबले असताना कोपऱ्यावर एक नवा कॅफे दिसला, म्हणून तिकडं गेले. शनिवारची संध्याकाळ असूनही कॅफे पूर्ण रिकामा होता याचं नवलं वाटलं. (नंतर लक्षात आलं की तिथं वाहनांच्या पार्किंगची सोय नाही.) मी ऑर्डर देऊन बसत होते तेवढ्यात एका ताईंनी प्रवेश केला. आमची नजरानजर झाली आणि मी हसून मोबाईल उघडला. त्यांनी दोन मिनिटं वाट पाहिली आणि म्हणाल्या, तुम्ही एकट्याच असाल तर या ना इकडं माझ्या टेबलावर.मी उठून त्यांच्या टेबलाकडं गेले, बसले. त्यांनीही नाव, आडनाव, कुठं राहता, वय किती, घरी कोण असतं, इकडं कुठं आला होता, आता घरी परत कसं जाणार ... अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्या ... भागात राहतात, गाडी (चारचाकी) नाही आणली ते बरं झालं ... अशी स्वत:बद्दलची माहिती त्या कळत-नकळत पुरवत होत्या.

मी सँडविच मागवलं होतं आणि त्यांनी समोसा. शेअर करायला चालेल का असं त्यांनी विचारल्यावर मी हो म्हटलं. गप्पा मारत राहिलो. वाहतूक व्यवस्थेबद्दल, देशातल्या सध्याच्या स्थितीबद्दल वगैरे. त्यांनी त्यांचं बील दिलं, त्या बाहेर पडल्या. आता वेळ होती काउंटरवच्या पुरूषाची. आम्ही दोघींची ओळख आधीपासून होती का असा त्याचा मुख्य प्रश्न होता. त्याने अर्थात नाव-गाव काही विचारलं नाही मला. मीही हा कॅफे कधी सुरू झाला, गर्दी कोणत्या वेळी जास्त असते ... असे माझ्या उपयोगाचे प्रश्न विचारले, बील दिलं आणि बाहेर पडले.

आपली सर्वांचीच ओळख (आयडेंटिटी) अनेक पदरी असते. नाव-गाव-जात-धर्म-भाषा या काही ठळक ओळखी. माणसं आपल्यासारखी माणसं शोधत असतात. सार्वजनिक जीवनात आपल्यासारख्या माणसांसोबत – ती अनोळखी असली तरी – आपण जास्त आरामात असतो. आपली मतं एकसारखी असणार याची आपल्याला काहीशी खातरी (किमानपक्षी अपेक्षा) असते. आपलं अनुभवविश्व सारखं असणार या गृहितकावर आधारित ही अपेक्षा असते.

समजा मी मराठी बोलणारी नसते, समजा मी स्त्री नसते, समजा मी अमुक एका वयाची नसते, समजा माझं नाव-गाव-धर्म काही वेगळाच असता तर मला हाच अनुभव आला असता का? कदाचित मला रस्ता दाखवणाऱ्या वाडीतल्या त्या आई-मुलगी माझ्याशी वेगळ्या वागल्या नसत्या. पण बसमधल्या ताई आणि कॅफेमधल्या ताई?

समजा बसमधल्या आणि कॅफेमधल्या ताई मराठी बोलणाऱ्या नसत्या, स्त्रिया नसत्या, अमुक एका वयाच्या नसत्या .... तर मीही त्यांना माझी व्यक्तिगत माहिती सांगितली असती का?

अनेकपदरी ओळखींमधला काहीतरी दुवा आपण सगळेच शोधत असतो.

हा दुवा नसेल्यांशी आपला संवाद होऊ शकेल असं आपण (आणि समाजही) बदललो तर ......