ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label मुली. Show all posts
Showing posts with label मुली. Show all posts

Thursday, February 23, 2017

२४८. धोंडा

“आपल्याकडं दिवाळीला नंदाताई येणार आहे राहायला. तिला त्रास द्यायचा नाही बरं का”, जेवण करताना आईनं सांगितलं. कैतरी म्हत्त्वाचं असलं की जेवणाच्या येळी समद्यांना सांगायची आईला सवय हाये. म्हणजे नंदाताई म्हत्त्वाची असणार.
पण ही नंदाताई कोण? म्या तर कंदी बगितली नव्हं.
“ही कोनाय?” म्या दादाला हळूच इचारलं.
माजं हळू म्हंजे आज्जीच्या भाषेत ‘जाहीरनामा’ – म्हंजे बोंबाबोंब.
“आपल्या सुमन आत्त्याची मुलगी,” दादा म्हन्ला.
“म्हंजे मेलेल्या आत्त्याची?” म्या इचारलं.
येकदम लई कायकाय झालं.
आज्जीनं माज्या पाटीत गुद्दा घातला. दादानं एक चिमटा काढला. आईनं ड्वाळं वट्टारलं. आण्णांनी माज्याकडं लईच रागानं पायलं. म्या मान खाली घातली. उरावर धोंडा बसला बगा.
मेलेल्या आत्त्याची पोरगी.
कशी आसंल ती?
***
आण्णा घिऊन आले नंदाताईला.
मला नाय आवडली.
तशी म्याबी गोरी न्हाई, पर ती पारच काळीढुस्स.
म्या तिच्यासंगट जास्ती बोल्ले नाय.
दादाचंन तिचं मातुर झ्याक जमलं. कायबाय हसायचे-बोलायचे सारके.
म्या गपचिप त्यांच्या मागंमागं र्‍हायची. नंदाताईला लई कायकाय म्हैती. गाणी काय, गोष्टी काय, खेळ काय, चा काय – इचारू नगा. त्या दिशी तिनं केलेली शाबुदाणा खिचडी येकदम बेश. मंग मला नंदाताई आवडाया लाग्ली. तिचा हात धरून म्या गावभर हिंडाया लाग्ली.
पंदरा-इस दिसांनी नंदाताईला तिच्या घरला पोचवायचा विषय निगाला. आज्जीनं डोळ्यास्नी पदर लावला. नंदाताईबी सारकी रडाया लागली. राती माजा हात गच्च पकडून बोल्ली, “आन्जे, मला नाही जायचं घरी. कधीच नाही. मामा-मामीला सांग तू."
***
म्या लगी आज्जीकडं. आज्जी बोल्ली की आई-आण्णा दुसरं काय म्हणत न्हाईत.
“नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्याचं” म्या आज्जीला लाडानं बोल्ली. तर आज्जी “ती परक्याची पोर” असलं कायबाय बोलाया लाग्ली.
फुस्स! आज्जीचा येळंला कायबी उपेग नसतोयच.
आण्णांकडं ग्येले, “नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्यायचं” बोल्ले तर आण्णा “बरं” म्हन्ले. पर मला काय त्यात रामसीतामाय वाटलं न्हाय.
आईला बोल्ले तर म्हन्ली, “आपल्या गावात शाळा कुठंय नंदाताईसाठी? आपला दादाच शहरात राहून शिकतो ना? तू हट्ट केलास तर शाळा बुडेल तिची. शहाणी मुलगी ना तू.”
पोरींनी शाळा शिकाया पायजे हे बरोबर हाय. गुर्जीबी सांगतेत.
म्या नंदाताईला बोल्ली, “न्हाय जमायचं. शाळा बुडंल की तुजी.”
नंदाताई येकदम गप झाली.
****
आमी वड्यापल्याडच्या मळ्यात फिराया गेल्तो.
नंदाताई एकलीच हाये. तिला ना भैण, ना दादा.
ती आप्पांसंगट राहते. आप्पा म्हंजे तिचे वडील.
तिची आज्जी – म्हंजे आप्पांची आई – कंदीमंदी येऊन जाते त्यांच्याकडं.
आमची आज्जी कंदी तिकडं जात नाय. आण्णाबी नाय. म्याबी नाय.
तीबी येत न्हाय. या दिवाळीला पैल्यांदा आली.
म्या नंदाताईला इचारलं, “तुला करमत न्हाय का येकलीला? तुला का नाय परत जायाचं तुज्या घरला?”
नंदाताई रडाया लाग्ली. म्हन्ली, “आमचे आप्पा फार वाईट आहेत. आईला मारायचे नेहमी. आता मला मारायला लागलेत सारखे. आन्जे, मला जर परत तिकडं पाठवलं ना तर मी जीव देईन आईसारखा.”
सुमन आत्त्यानं जीव दिलता?
पुन्यांदा माज्या उरावर धोंडा पडल्यागत झालं.
****
घरी आलो तर दत्तुमामा आलते. आमच्या पुण्याच्या आत्याचा नवरा.
मला येकदम भारी सुचलं.
दत्तुमामा येकलेच पेपर वाचित व्हते.
म्या म्हन्लं, “ओ, तुमी पोलिस आहात नव्हं?”
दत्तुमामा हसले, म्हन्ले, “होय बाईसाहेब. कोण त्रास देतं तुला, नाव सांग. तुरुंगात टाकू आपण त्याला.”
इकडंतिकडं कुणी नवतं. तरी दत्तुमामांच्या अगदी जवळ जाऊन कानात बोल्ले, “आप्पा”.
“आप्पा? कोण आप्पा?” त्यांनी इचारलं.
या मोट्या मानसास्नी समदं समजून सांगावं लागतंय.
“नंदाताईचे आप्पा. तिला तरास देतेत, मारतेत.” म्या बोल्ली.
दत्तुमामा माज्याकडं पाहातच रायले.
“नंदाताई आत्त्यासारका जीव दीन म्हणती. त्या आप्पाफप्पांना पकडा तुमी.” म्या रडाया लाग्ली.
“रडू नकोस. मी बघतो काय करायचं ते,” दत्तुमामा म्हन्ले.
माजं रडू काय थांबचना.
***
लई त्हान लाग्ली व्हती. डोस्कं ठणकत व्हतं. डोळे उगाडले. उटाया जमंना.
आज्जी माज्याजवळ व्हती.
दादानं लगी माजं कपाळ फडक्यानं पुसलं.
“नंदाताई कुटंय,” म्या इचारलं.
“आन्जे, मी इथंच आहे. तुला बरं वाटल्याशिवाय मी कुठं जाणार नाही. लवकर बरी हो तू,” नंदाताई बोल्ली तशी म्या तिचा हात पकडून ठिला.
डोळे बंद करून द्येवाला म्हन्लं, “लई दुखतंय मला, पर बरं न्हाई क्येलंस तरी चालतंय. म्हंजे मंग नंदाताई जीवबीव न्हाई द्यायची.”
किती दिस गेले म्हाईत न्हाई.
दादा, आज्जी, नंदाताई, आई, आण्णा सगळे व्हते.
येक दिवस येष्टीत घालून तालुक्याला नेलं मला.
डॉक्टरकाकांनी कडूझार औषाद दिलं. ताप कायी कमी व्हईना.
नंदाताई हितंच व्हती ते बेश.
***
येके दिवशी सकाळी सकाळी जोराजोरात आवाज यायला लाग्ले.
आमच्या घरात असलं आरडाओरडीचं भांडाण कंदी नसतंय.
आज्जी जवळ नव्हती. नंदाताई रडत व्हती. दादा तिला समजौत व्हता.
दत्तुमामांचाबी आवाज आला. आण्णा चिडलेले.
आईबी कायतरी बोलत व्हती.
येक आवाज पुण्याच्या आत्याचा व्हता. दुसरा फलटणच्या आत्याचा.
समदे कशापायी आलेत?
दादानं औषाद दिलं. म्या झोप्ली.
राती जाग आली तवा आण्णा, आई, आज्जी कुजबुजत व्हते.
आई आणि आज्जी रडत व्हत्या. आण्णा कधीबी रडतील की काय असं दिसत व्हतं.
“माझ्या सुमीला काय भोगावं लागलं, तिचं तिलाच माहिती. आन्जीनं धोसरा घेतला म्हणून नंदाच्या वेळी तुम्ही सगळे जागे झालात हे नशीबच...” आज्जी म्हणत व्हती.
म्या गपचिप झोपली परत.
***
येके दिवशी जागी झाले तवा कायबी दुखत नव्हतं.
एका हातात दादाचा हात आणि दुसर्‍या हातात नंदाताईचा हात व्हता.
दोघंबी माज्याकडं पाहून हसत व्हते. आज्जी देवापुडं बसली व्हती.
आण्णा खुर्चीवर बसून हासत होते. आई डोळे पुसत व्हती.
मला लई भूक लागली व्हती.
तूप-मेतकूट-भात खाल्ला.
म्या बरी झाली म्हंजे नंदाताई आप्पांकडं जाणार? जीव देणार?
म्या हळूच तिच्याकडं पायलं. ती हसत व्हती.
आण्णा म्हन्ले, “आन्जाक्का, आता फटाफट बरं व्हायचं. आपण सगळे तालुक्याच्या गावाला राहायला जाणार.”
मला काय बरं वाटलं न्हाई.
“आणि नंदाताई?” म्या इचारलं.
“नंदाताई जाईल तिथं दादाच्या शाळेत, आणि तू दुसर्‍या शाळेत,” आई म्हन्ली.
“नंदाताई आता कायमची आपल्यासोबतच राहणार आहे.” आज्जीनं सांगितलं.
***
“आप्पा? त्यास्नी तुरुंगात घातलं का न्हाय दत्तुमामांनी? ” मी दादाला एकट्याला गाठून इचारलं.
“छे! तुरुंगात नाही टाकलं. पण नंदाताईला मारणार नाही असं सगळ्यांसमोर कबूल केलं त्यांनी. दत्तुमामांनी दम दिला आप्पांना,” दादा म्हन्ला.
झ्याक जिरली. नंदाताईला मारतेत होय?
म्हंजे आता दादापण घरी राहणार, हॉटेलात नाई. नंदाताई आमच्याकडं राहणार. म्या शेरातल्या शाळंत जाणार.
म्या पयल्यासारकी टुणटुणीत झाली.
पळत बायेर जाऊन “म्या शेरात जाणार” वराडले.
अंगणात मोत्या होता. तो शेपटी हालवत माझ्यासंगं गोलगोल फिरायला लाग्ला.
अंक्या, निम्मी, भान्याला सांगितलं, गुर्जींना सांगून आले.
समदे मला तालुक्याच्या गावाचं कायबाय विचारत व्हते, ‘आमालाबी घिऊन जा’ म्हणत व्हते.
पळापळीत उरावरचा धोंडा भौतेक कुटंतरी पडला.
ग्येला येकदाचा.
***

पूर्वप्रसिद्धी - 'मिसळपाव' दिवाळी अंक २०१६

Monday, March 7, 2016

२३६. #PledgeForParity शपथ समतेची

उद्या ८ मार्च. उद्या आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. उद्या आहे शुभेच्छांची देवाणघेवाण. उद्या आहे समस्यांची आकडेवारी आणि चिंता. उद्या काही भाषणं, काही लेख, आणि थोडे सुस्कारे. उद्या प्रगतीची काही उदाहरणं वाचून जागा होणारा आशावाद. उद्या रेडिओ, वर्तमानपत्रं, टीव्ही इकडं सगळीकडं झळकणारं अभिवादन, अभिनंदन आणि कौतुक. महिलांसाठी अमुक इतका डिस्काउंट असा बाजाराचा गोंगाट. उद्या महिला मेळावे, ठेवणीतले कपडे घालून आलेल्या स्त्रियांचे एकत्र जेवणाचे कार्यक्रम. उद्या थोडं हसू, काही उद्विग्नता..

अनेकांसाठी ही तर फक्त १७-१८ तासांची कसरत, फार नाही,. ९ मार्चला पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. महिला दिनअसतो तसा पुरूष दिनही असावा किंवाहल्ली पुरूषच कसे दीन झाले आहेत असले नेहमीचे विनोदही आहेत. असले विनोद महिला दिनाची नीट माहिती नसल्याने केले जातात असं मला अनेकदा वाटतं.

दोन मुद्दे आधीच स्पष्ट करते. एक म्हणजे या जगात फक्त स्त्रियांना समस्या आहेत आणि सगळे पुरूष एकजात सुखी आहेत असं मी मानत नाही. सामाजिक वास्तवाची जाणीव असणारी कोणतीही व्यक्ती असं एकांगी विधान करणार नाही. पुरूषांनाही समस्या आहेत, संघर्ष आहेत, जबाबदा-या आहेत, दु:खं आहेत, ताण आहेत हे नाकारण्याचं कारण नाही. पण सामान्यत: स्त्री-पुरूष नात्यांत व्यवस्थेने पुरूषाचा वरचष्मा निर्माण झाला आहे. स्त्री-पुरूष नातं म्हणते फक्त पत्नी-पती हे नातं नाही. मुलगा-आई, भाऊ-बहीण, वडील-मुलगी, सहकारी .. अशा नात्यांच्या अनेक पदरांत पुरूष प्राधान्य दिसून येतं. सामाजिक रचनेचा आणि संस्कारांचा हा परिणाम आहे. स्त्रियाही पुरूषांना प्राधान्य देतात कारण त्याही पुरूषप्रधान समाजरचनेत जन्म घेतात आणि वाढतात. पुरूषसत्ता हा आजच्या लेखाचा विषय नाही. परंतु स्त्री चळवळीने व्यक्तिगत पुरूषांना आव्हान दिलं नसून पुरूषसत्तेला – म्हणजेच स्त्रिया आणि पुरूष यातल्या श्रेणीक्रमाला, उतरंडीला आणि साचेबद्ध भूमिका आणि अपेक्षांना- आव्हान दिलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे सर्वच पुरूष स्त्रियांबाबत असंवेदनशील असतात आणि सर्व स्त्रिया इतर स्त्रियांबाबत संवेदनशील असतात – असं घाऊक विधान कोणी करत असेल तर त्यात तथ्य नाही. काही पुरूष संवेदनशील असतात, तर काही पुरूष असंवेदनशील असतात. जगातले सगळे पुरूष त्यांना भेटेल त्या स्त्रीचा छळ करत असतात, तिच्यावर अत्त्याचार करत असतात असं नाही. तसंच काही स्त्रिया संवेदनशील असतात, तर काही स्त्रिया असंवेदनशील असतात. परिवर्तन स्त्रिया आणि पुरूष या दोघांमध्येही अपेक्षित आहे. त्यामुळे स्त्री चळवळ स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही बरोबर काम करते. वर्षानुवर्षांच्या परंपरेने काही संस्कार आपल्यावर होतात, आपल्या काही सवयी पक्क्या होतात. मात्र या परंपरेने स्त्रियांना व्यवहारात दुय्यम स्थान दिलं आहे. हे फक्त भारतात घडलं-घडतं असं नाही तर जगभरात घडलं-घडतं. स्त्रिया हा एक स्वतंत्र वर्ग आहे असं एके काळी मानलं जायचं. पण व्यवहारात असं दिसतं की स्त्रिया ज्या समाजाच्या (धर्म, वंश, प्रांत, जात, भाषा इत्यादी घटक समाजरचना घडवतात) सदस्य असतात त्याचा त्यांच्या जगण्यावर परिणाम होतो. पण दुस्-या बाजूने स्त्रीला कायम स्त्रीत्त्वाचं जोखड वागवावं लागतं. म्हणून जगभरातल्या स्त्रियांमध्ये बरेच फरक असले तरी त्यांच्या स्थितीत काही विलक्षण साम्यही दिसून येतं.

पुरूषसत्ता म्हणजे काय? विस्तारभयास्तव मी विस्तृत लिहित नाही. वंशसातत्यासाठी मुलग्यां ना दिलं जाणारं महत्त्वखाण्यापिण्यात, शिक्षणात घरात मुलगा-मुलगी यांच्यात केला जाणारा भेदभाव (हा स्त्रियाही करतात कारण त्याही पुरूषसत्तेत वाढलेल्या असतात); घरकाम फक्त स्त्रियांची आणि मुलींची जबाबदारी असणं; मुली आणि स्त्रियांवर असणारी अनेक बंधनं (त्यांनी कोणते कपडे घालावेत, कोणाशी बोलावं-बोलू नये, एकटीने फिरू नये इत्यादी); लैंगिक शोषण; परंपरेने स्त्रियांना वारसाहक्क नसणं (कायद्यात सुधारणा झाल्या आहेत); मुले-मुली किती आणि कधी व्हावीत यासंबंधी निर्णय घेण्याचा स्त्रियांना अधिकार नसणं असे अनेक मुद्दे पुरूषांना दिलं जाणारं महत्त्व अधोरेखित करतात. यातल्या प्रत्येक मुद्द्याला अपवाद असू शकतो पण आपण इथं आत्ता सर्वसाधारणपणे समाजात काय दिसतं त्याची उजळणी करतो आहोत.

थोडक्यात सांगायचं तर स्त्रियांची उत्पादन शक्ती, स्त्रियांची पुनरूत्पादन शक्ती, स्त्रियांची लैंगिकता, स्त्रियांचं हिंडण्याफिरण्याचं स्वातंत्र्य, साधनसंपत्ती (शेती, घर इत्यादी) यावर पुरूषांचं नियंत्रण असणं म्हणचे पुरूषसत्ता. धर्म, कुटुंब, कायदा, शिक्षण, अर्थव्यवस्था, बाजार, राजकारण ... अशा अनेक व्यवस्थांमधून पुरूषसत्तेला बळ मिळत असतं.

पुरूषसत्ता खरं तर पुरूषांनाही कधीकधी जाचक वाटते, त्यांनाही ती नकोशी वाटते कारण त्यात त्यांच्यावरही अनेक जबाबदा-या असतात आणि पुरूष म्हणजे असाच असायला हवा या अपेक्षांचं त्यांनाही ओझं पेलून न्यावं लागतं. स्त्री चळवळीने स्त्रियांचे स्वत:बदद्लचे-पुरूषांबद्दलचे समज, स्वत:कडून आणि पुरूषांकडून असलेल्या अपेक्षा - अशा अनेक बाबतीत परंपरेला छेद देणारा विचार मांडला आहे. स्त्री आणि पुरूष यांच्यात जीवशास्त्रीय भेद आहेत (तेही फक्त प्रजननसंस्थेत), पण त्याच्या आधारे सामाजिक भेदांचं एक विश्व रचलं गेलं आहे. प्रश्न विचारले जात आहेत ते या सामाजिक रचनेबाबत, बदल अपेक्षित आहे तो सामाजिक रचनेत. समाजाच्या धारणांमध्ये तसेही बदल होत असतात – आपले आजोबा-वडील-आपण स्वत: किंवा आपली आजी-आई- आपण स्वत: यांच्या जीवनावर एक नजर टाकली तरी खूप बदल झालेले दिसून येतील. स्त्री चळवळीला अपेक्षित असलेले बदल होणं काहीसं अवघड असलं तरी अशक्यप्राय मात्र नाही.

स्त्रियांमध्ये बदल झाला तर परंपरेने मिळत आलेल्या काही फायद्यांवर पुरूषांना पाणी सोडावं लागेल हे खरं आहे. पण म्हणून स्त्री चळवळ’ (त्यात वेगवेगळ्या विचारधारा आहेत) म्हणजे पुरूषांच्या विरोधातलं कारस्थान असा काही विचार तुम्ही करत असाल, तर तो कृपया डोक्यातून काढून टाका. स्त्रिया परग्रहावरून आलेल्या नाहीत. आजी, आई, आत्त्या, मावशी, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण, सहकारी .... या सगळ्या आपल्या आहेत. माणूस म्हणून स्त्रियांच्या हक्कांची प्रस्थापना करण्याच्या या लढाईत स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही सहभागी होण्याची गरज आहे.

स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी अनेक शतकं संघर्ष चालू आहे. आर्थिक हक्क, नागरी हक्क, सामाजिक-सांस्कृतिक हक्क आणि राजकीय हक्क अशी या हक्कांची साधारण वर्गवारी केली जाते. काळाच्या ओघात स्त्रियांच्या संघर्षाचं स्वरूप बदललं, त्यांची साधनं बदलली आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही बदलला. या दीर्घ वाटचालीत अनेक संवेदनशील पुरूषांनी स्त्रियांना साथ दिली. स्त्रियांच्या हक्कांची दखल घेणारे अनेक कायदे झाले. पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीवही झाली. ही जाणीव केवळ आपल्या देशापुरती नाही तर जागतिक स्तरावर आहे.

स्त्री चळवळीचा इतिहास मोठा आहे. या लेखात त्याचा आढावा घेता येणं शक्य नाही. पण आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा आला आणि कसा रूजला हे थोडक्यात पाहू.

१९०८ मध्ये न्यूयॉर्क (अमेरिका) शहरातील कापड उद्योगातील स्त्रिया संपावर गेल्या. कामाच्या ठिकाणी योग्य त्या सोयी नाहीत, कामाचे तास खूप जास्त आहेत, कामाचं मोल अगदी कमी मिळतं अशा त्यांच्या असंख्य तक्रारी होत्या.

१९०९ मध्ये अमेरिकेत पहिला महिला दिन साजरा झाला. तो दिवस होता २८ फेब्रुवारी. १९१० मध्ये कोपनहेगन शहरात आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती. या परिषदेत १७ देशांतील सुमारे १०० महिला प्रतिनिधी सामील झाल्या होत्या. महिला हक्कांच्या चळवळीला पाठिंबा देणं आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी ठिकठिकाणी चालू असलेल्या प्रयत्नांना समर्थन देणं अशा दुहेरी उद्देशांना समोर ठेवून या परिषदेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मात्र हा दिवस कोणता असावा यासंबंधी परिषदेत काही ठरलं नाही.

२६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेल्या भारतीय राज्यघटनेने २१ वर्षावरील स्त्रियांना (पुरूषांप्रमाणेच) मतदानाचा अधिकार दिला. एका अर्थी भारतातल्या स्त्रियांना हा हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला नाही, कदाचित त्यामुळेच जगभरात याविषयी झालेल्या संघर्षाची आपल्याला कमी माहिती आहे. काही देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला ही माहिती स्त्रियांच्या लढ्याचा अंदाज आपल्याला देईल. (पूर्ण चर्चेत प्रौढ स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत उल्लेख आहे. काही देशांत सर्व प्रौढ पुरूषांनाही मतदानाचा अधिकार अनेक वर्ष नव्हता हेही एक वास्तव आहे.)

स्वीडन – १७१८ मध्ये सिटी गिल्डच्या सदस्य असणा-या आणि कर भरणा-या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो १९२१ मध्ये.  अमेरिका – १७५६ मध्ये Uxbridge (Massachusetts) इथल्या एका स्त्रीला शहराच्या मीटींगमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळाला. १९१० मध्ये राज्यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यायला सुरुवात झाली आणि १९२० मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. ग्रेट ब्रिटन १९२८, न्यूझीलँड १९२९, रशिया १९१७ (झारच्या पदच्युतीनंतर), १९३५ मध्ये ब्रिटीश राज (भारतातही सुरूवात) आणि बर्मा (आताचा म्यानमार), १९४५ – फ्रान्स, इटली आणि जपान, १९४७ चीन आणि पाकिस्तान (१९४७ मध्ये पाकिस्तानने फक्त शिकलेल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, तो १९५६ मध्ये सार्वत्रिक करण्यात आला.) ही प्रक्रिया अगदी २०१५ मधल्या सौदी अरेबियाच्या निर्णयापर्यंत चालू आहे.

कोपनहेगन परिषदेचा परिणाम म्हणून १९११ मध्ये १९ मार्च या दिवशी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लँड या देशांत महिला दिन साजरा करण्यात आला. दहा लाखांपेक्षा जास्त स्त्रिया आणि पुरूष या समारंभात सामील झाले. मतदानाच्या हक्कांबरोबर स्त्रियांना काम (नोकरी) करण्याचा अधिकार, व्यावसायिक शिक्षण घेण्याचा अधिकार आणि कामाच्या ठिकाणी समान वागणूक मिळावी अशा मागण्या या दिवशी मांडल्या गेल्या.

१९१३ मध्ये पहिल्या जागतिक युद्धाला विरोध दर्शवत, शांतीची मागणी करत रशियातल्या स्त्रिया फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या रविवारी रस्त्यावर उतरल्या.  तर युरोपमध्ये १९१४ मध्ये ८ मार्च आणि त्याच्या एक दोन दिवस पुढे-मागे महिला दिन साजरा झाला. १९१७ मध्ये रशियन कॅलेंडरनुसार फेब्रुवारीमधल्या शेवटच्या रविवारी भाकरी आणि शांती चा उद्घोष करत रशियन स्त्रिया  मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्या. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा दिवस होता ८ मार्च. (रशियाने १९१८ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं.) यानंतर चार दिवसांत झारची सत्ता संपली.

यानंतर विविध देशांत महिला दिन साजरा होत राहिला. अखिल भारतीय महिला परिषदेच्या (All India Women’s Conference) पुढाकाराने भारतात १ मार्च १९३० या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला. (१३ फेब्रुवारी हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.)

आंतरराष्ट्रीय महिला दिनख-या अर्थाने जागतिक झाला तो १९७५ मध्ये. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जाहीर केला. त्यानंतर जगभर या दिवशी स्त्रियांच्या हक्कांसंबंधी विचारमंथन होण्यास अधिक जोमदार सुरूवात झाली.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा एक दिवसाचा उपक्रम होऊ नये याकरिता दरवर्षी एक दिशादर्शक वाक्य, घोषवाक्य (थीम) जाहीर केलं जातं. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली अशी थीम होती. स्त्रिया आणि मानवी अधिकार (१९९८), स्त्रियांवरील हिंसेपासून मुक्त जग (१९९९), आजच्या अफगाण स्त्रिया – वास्तव आणि संधी (२००२), स्त्रिया आणि एचआयव्ही एड्स (२००४), निर्णयप्रक्रियेत स्त्रिया (२००६), ग्रामीण स्त्रियांचे सबलीकरण – भूक आणि गरीबी संपवणे (२०१२) अशा काही थीम मला सहज आठवल्या.

२०१६ ची आंतरराष्ट्रीय महिला दिनची थीम आहे #PledgeForParity – ‘शपथ समतेची किंवा समतेसाठी शपथ. व्यक्तिगत पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर करता येतील असे चार विविध उपक्रम सुचवण्यात आले आहेत. १. स्त्रिया आणि मुलींना त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मदत करणे: कळत-नकळत असलेल्या (जाणीव-नेणीवेतल्या) पूर्वग्रहांना आव्हान देणे (Help women and girls to achieve their ambitions: challenge conscious and unconscious bias). २. लिंगभाव संतुलित नेतृत्वाला साद (Call for Gender balanced leadership) ३. स्त्री आणि पुरूषांच्या योगदानाला समान मूल्य देणे (Value women’s and men’s contribution equally) ४. सर्वसमावेशक आणि लवचीक संस्कृती निर्माण करणे (Create inclusive, flexible cultures) असे चार पर्याय आहेत. यापलीकडचा एखादा पर्याय आपल्याला सुचत असल्यास त्यानुसार उपक्रम करायला काहीच हरकत नाही. मी एक क्रमांकाची शपथ घेतली आहे – संकल्प केला आहे.

या ठिकाणी  जाऊन आपण शपथ घेऊ शकता. हे सगळं काहीसं फेसबुकी शैलीचं (म्हणजे उथळ) वाटू शकतं याची मला कल्पना आहे. त्यामुळे शपथ न घेताही आपण आपल्यापुरता, आपल्या भवतालच्या परिस्थितीशी सुसंगत असा संकल्प करू शकतो.

माझ्या घरात, माझ्या कामाच्या ठिकाणी, मी ज्या ज्या ठिकाणी वावरते/वावरतो अशा सर्व ठिकाणी मी जाणीवपूर्वक स्त्री-पुरूष समतेसाठी प्रयत्नशील राहीन असा निश्चय आपण करू शकतो का? तो आचरणात आणू शकतो का? ही शपथ फक्त पुरूषांनी घेणं अपेक्षित नाही, स्त्रिया आणि पुरूष यांची ही संयुक्त जबाबदारी आहे. स्त्री-पुरूष समतेच्या मार्गावर आपण एकटेच नाही, अनेक जण आणि अनेक जणी सोबत आहेत याची खातरी असू द्या. हा एका दिवसाचा उपक्रम नाही, हा सातत्याने करण्याचा प्रवास आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

शपथ घेतल्यावर (अथवा संकल्प केल्यावर) तुमच्या वाटचालीतले अनुभव जरूर सांगा. मला ते वाचायला नक्कीच आवडतील.

Thursday, October 15, 2015

२३१. धरसोड


आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात.
आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते.

आजोबा आले की आई मला काम सांगणार.
पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची.
हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत.

आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं.
बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला. आजोबा म्हन्ले.

भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल.
कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा.
आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग?
असंल कायतरी. जौंदे.

हेंनी चा सोडला, कापी पकाडली.
येक सोडलं की दुसरं कायतरी पकडायचं.


म्या असं काय केलं की आज्जी म्हन्ते धरसोड

Wednesday, July 22, 2015

२३०.पुनर्भेट



२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली. त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’.

कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच.

दरम्यान अनेकदा या मुलींची नावं संगणकाच्या पडद्यावर उमटली. कधी वयानुसार गट, कधी भाषेनुसार, कधी कुटुंबाच्या माहितीनुसार. वडील नसलेल्या मुली किती, नातलगांकडे राहणा-या मुली किती, सावत्र आई/वडील असलेल्या मुली किती....वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीचं विश्लेषण आणि त्या अनुषंगाने नवनव्या कल्पना.

शिबीर आठ जिल्ह्यांत झालं, आता हा शेवटचा जिल्हा. या जिल्ह्यात सहा शाळा. प्रत्येक शाळेची भेट आणि त्यात ‘रापारिगा लीडर्स’शी संवाद. जमलं तर गृहभेट आणि पालकभेट.

भर दुपारी बारा वाजता आम्ही शाळेत पोचलो. मुलींचा वर्ग बारा वाजता सुरु होतो, त्यामुळे ही योग्य वेळ त्यांना भेटायची. पाचेक मिनिटांत लाजून, मान खाली घालून, तरीही उत्सुक तिरक्या नजरेने पाहणा-या सहा मुली माझ्यासमोर उभ्या. एकेक नाव सांगतेय आणि मी हातातल्या यादीवर ‘बरोबर’ची खूण करतेय. एक, दोन, तीन, चार, पाच.... वा! इथं एकही ‘रापारिगा लीडर’ शाळा सोडून गेली नाहीये तर! अरेच्चा! पण ही सहावी मुलगी वेगळंच नाव सांगतेय – कागदावर ते नाव नाहीये. हं! म्हणजे इथंही गळती झालीय तर! लग्न झालं की काय तिचंही?... एका क्षणात मनात किती ते विचार!

मी त्या नव्या सहाव्या मुलीची आधी व्यवस्थित विचारपूस करते.

मुख्याध्यापकांकडे वळून मी प्रश्न विचारणार – तितक्यात विचार बदलून मी मुलींना विचारते, “पण सेलेस्टिना कुठेय? ती फक्त आज नाही आली शाळेत की बरेच दिवस गैरहजर आहे?”

“ela morreu” (ती मेली) निर्विकार चेह-याने एक मुलगी सांगते.
मला काय बोलावं ते सुचत नाही.

“काय झालं”, मी विचारते.
“माहिती नाही. एक दिवस आजारी पडली, दुस-या दिवशी गेलीच ती डॉक्टरकडे न्यायच्या आत.” मुख्याध्यापक सांगतात.

“कधी झालं हे?” मी विचारते.
आपापसात चर्चा करून ‘आठ दिवस’ या निष्कर्षाप्रत ते येतात.

“तिच्या आई-वडिलांना भेटता येईल का?” या माझ्या प्रश्नावर ते सध्या कामासाठी गाव सोडून गेल्याचं कळलं.

मृत्यू मला नवा नाही. जिवलगांच्या जाण्यातून त्याची अनेकदा चाहूल घेतली आहे.

पण मृत्यूची सवय होता होत नाही; प्रत्येकवेळी तो नवा असतो. तितकाच अंतर्मुख आणि हतबल करणारा असतो. त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव लख्ख करणारा असतो.

परक्या भूमीतल्या, जिला मी कधीही भेटले नव्हते अशा या मुलीच्या निमित्ताने मृत्यू आज पुन्हा भेटला. पुन्हा एकदा डोळे ओलावून गेला. 

प्रश्न मरण्याचा नसतो तर जगण्याचा असतो हे अधोरेखित करणारी पुनर्भेट.
अजून किती बाकी आहेत?

Sunday, March 1, 2015

२२३. उलगडा

“आई गं, तू छोटी होतीस; म्हणजे खूप खूप पूर्वी; तेव्हा माझ्यासारखीच होतीस?” दीपिकाचा प्रश्न ऐकून श्वेता हसली. ही प्रश्नमालिका हे तिच्या लेकीचं मागच्या आठवडाभरातलं एक नवं खूळ होतं.

“अगदी थेट तुझ्यासारखी होते मी!” श्वेता उत्साहाने सांगते.
पण का कुणास ठावूक, दीपिकाच्या मनात अजून शंका आहेत.

“तू इतकी मोठी आहेस आता; आणि मी इतकी लहान! मग तू माझ्याएवढी असताना मी केवढी होते? आणि होते कुठे मी तेव्हा?” दीपिकाचे प्रश्न आत्ताशी सुरु झालेत.

“जवळच तर होतीस माझ्या”, श्वेता सांगते. आता आज कहाणी कोणत्या दिशेने जाणार आहे, देव जाणे!
आता आई सांगेल ते तंतोतंत खरं मानण्याइतकी दीपिका काही लहान नाही. मागच्याच आठवड्यात तर तिचा सहावा वाढदिवस साजरा झालाय.

“जवळ नव्हते काही मी तुझ्या; तेव्हा आकाशात स्टार होते मी. तू हाक मारलीस म्हणून आले मग मी ४०४, गजानन अपार्टमेंट....”

सायकल फेरी मारायला लेकीच्या मित्र –मैत्रिणींच्या हाका आल्या आणि श्वेताची सुटका झाली.

पण दीपिकाच्या प्रश्नांसमोर फार काळ तग धरता येणार नाही हे श्वेताला कळून चुकलं होतं. किती दिवस ती लपवू शकणार आहे सत्य? दहा नाही पण अजून किमान साताठ वर्ष आहेत हातात या प्रश्नांना सामोरं जायला हे तिचं गृहितक. पण प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस स्मार्ट होत चाललेल्या दीपिकाच्या आकलनशक्तीला कमी लेखून चालणार नव्हतं आता.

*****
दीपिकाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जाताना श्वेताला वारंवार तिच्या लहानपणीची आठवण येते. लहानगी श्वेताही असाच प्रश्नांचा भडीमार करायची – तो तिच्या बाबांवर. आणखी एक मोठा फरक म्हणजे श्वेता गेलेल्या दिवसांबद्दल, पूर्वीच्या काळाबद्दल कधीच प्रश्न विचारायची नाही; तिला वेध असायचे ते येऊ घातलेला दिवसांचे; भविष्याचे. “बाबांना ‘पूर्वी’ असा शब्द असेलेला प्रश्न विचारला की त्रास होतो’ हे लहानग्या श्वेताला जाणवलं होतं. म्हणून श्वेताचे प्रश्न “बाबा, मी मोठेपणी कोण होऊ?“; “बाबा, मी तुमच्याएवढी होईन तेव्हा पण माझ्या सोबत असाल ना?” या धर्तीचे असत.

घरात आजी पण होती; बाबाची आई. का कुणास ठावूक, आजीचा श्वेतावर भयंकर राग होता. सारखी श्वेताच्या तकारी सांगत राहायची ती. तसं घरी फार कुणी यायचं नाही म्हणा; त्यामुळे त्या सगळ्या तक्रारी बाबासमोर व्हायच्या. बाबा ब-याचदा हसून प्रसंग निभावून न्यायचा. अति झालं की गंभीर होत म्हणायचा, “जे घडलं त्यात या निष्पाप जीवाचा काही दोष नाही. उगा तिला त्रास देऊ नकोस आणि स्वत:लाही त्रास करून घेऊ नकोस. आई, तुला जसा फक्त मी आहे; तसाच या पोरीलाही या जगात फक्त मी आहे...” असं काही झालं की आजी दोन चार दिवस ठीकठाक असायची. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

आजीची बोलणी कमीत कमी खावी लागावीत अशा बेताने वागायला श्वेता लहान वयात शिकली. घरात अधेमध्ये कुणीतरी नातलग मंडळी यायची. त्यांनी श्वेताबाबत काही भोचक प्रश्न विचारले तर मात्र आजी त्यांना फटकारायची. “तिचा बाप समर्थ आहे तिची काळजी घ्यायला, तुम्हाला काय पडलंय?” अशी आजीची भाषा ऐकून समोरचा गपगार होऊन जायचा. एरवी आपल्याला धारेवर धरणारी आजी आपली बाजू घेऊन भांडतेय याचं श्वेताला नवल वाटायचं पण हळूहळू आजीच्या या दोन्ही रूपांची तिला सवय होऊन गेली. पण आजीचा आधार वाटावा इतकी जवळीक मात्र त्यांच्यात कधीच झाली नाही.

घरातला विषय मार्गी लागला तरी पण शाळेत प्रश्न यायचेच. शाळेतल्या इतर मैत्रिणी ‘आई’बद्दल बोलायला लागल्या की श्वेताला काही सुचायचं नाही, रडू यायचं. एकदा तर गृहपाठ म्हणून ‘माझी आई’ असा विषय दिला बाईंनी निबंध लिहायला तेव्हा श्वेता घाबरून बसली होती घरी आल्यावर. पण बाबाने तेव्हा मस्त युक्ती काढली होती. श्वेताने चक्क ‘भारतमाता’ या विषयावर निबंध लिहिला आणि कौतुकाची थाप मिळवली होती वर्गात. पुढे पुढे मात्र कुणी विचारलं तर ‘माझी आई मी लहान असताना देवाघरी गेली’ असं श्वेता सांगायला लागली – बाबा आणि आजीने तसं काही कधी म्हटलेलं नव्हतं तरीही! पाचवीत शाळा बदलली आणि ‘श्वेताची आई नाहीये’ हे जणू सगळ्यांनी न बोलता मुकाट स्वीकारलं.

पण श्वेताला मात्र आईबद्दल अनेक प्रश्न होते. कशी होती ती? माझ्यासारखी सावळी? तिचे केस कुरळे होते का? तिच्या गालावर खळी पडायची का? तिचा आवाज कसा होता? तिला पाऊस आवडायचा? आणि दही-भात? तिला डोसा बनवता यायचा का चांगला? मैत्रिणी जमवून घरात दंगा केला तर आई रागावली असती का? ती रोज नाचाच्या क्लासला घेऊन गेली असती का मला? .....

आपण बाबासारख्या नाही हे श्वेताला कळत होतं. बाबा उंच होता भरपूर – श्वेता दहावीतही पाच फूट दोन इंचाच्या पल्याड गेली नव्हती. बाबाच्या आणि तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी जुळत नव्हत्या – बाबा तिला आवडते म्हणून कॉफी घ्यायचा खरा; पण चहा पिताना तो जास्त खुलायचा. बाबा सावकाश; शांतपणे बोलायचं तर श्वेताचा नेहमी तारस्वर. इवल्याशा गोष्टींनी श्वेताचे डोळे पाण्याने भरून येत; बाबा मात्र कितीही अडचण असली तरी हसतमुख असतो. बाबा वक्तशीर इतका की त्याच्याकडे पाहून घड्याळ लावावं. श्वेताला अनेकदा वाटायचं की ती बाबाची मुलगी नाहीचय मुळी. पण बाबाची तिच्यावर इतकी माया कशी असेल मग?

सातव्या-आठव्या इयत्तेत असताना आजीचा दुपारी डोळा लागला की श्वेताचा एकच उद्योग असायचा; तो म्हणजे बाबा ऑफिसातून यायच्या आधी घरात असतील नसतील तितकी कागदपत्रं उचकून बघायची. पण श्वेताची निराशा झाली. तिला ना आईचा एखादा फोटो सापडला; ना कोणत्या कागदावर तिचं नाव दिसलं. ना बाबाने आईला किंवा आईने बाबाला लिहिलेलं पत्र दिसलं; ना आईंची एखादी जुनी साडी दिसली. एकाही पुस्तकावर आईचं नाव नव्हतं; श्वेता जणू आईच्या गर्भातून जन्माला न येता सीतेसारखी भूमीतून उगवली होती.

कधीतरी एकदा विचारांच्या तंद्रीत श्वेताने बाबाला विचारलं, “बाबा, माझी आई कशी होती रे?”

“मला नाही माहिती, शोना....” बाबाच्या स्वरांतली वेदना जाणवून तिने त्याच्याकडे पाहिलं होतं आणि बाबाचा विदीर्ण चेहरा पाहून ती हबकली होती. आईचा विषय बाबाला त्रासदायक आहे हे कळल्यावर श्वेताने तो विषय कायमचा बंद केला होता. आईबद्दल बाबाला काही माहिती नाही हा धक्का तिने आतल्या आत सोसला. तिची दहावीची परीक्षा संपली आणि आजी आजारी पडली. आजारी आजी श्वेताला सारखी काही सांगू पहात होती. पण तिने ‘आजी, राहू दे आता. काय फरक पडतो त्याने? तू बरी झालीस की बोलू मग हवं तर’ असं म्हणून आजीचा सूचक संवाद सुरु होण्यापूर्वीच बंद केला होता. त्या आजारपणात आजी गेली आणि मग आई हा बंद कप्पा होऊन गेला श्वेतासाठी.

*****
दीपिका धावत येऊन श्वेताच्या कुशीत शिरते. तिचा चेहरा लालभडक झालाय, डोळ्यातून पाणी वाहतेय. आईचा हात पाठीवरून फिरतानाही तिचे हुंदके कमी होत नाहीत. दीपिका आईला घट्ट मिठी मारते. दीपिकाला किती भीती वाटतेय ते त्या स्पर्शातून श्वेताला समजतं.

“काय झालं राणी? कुणी त्रास दिला तुला?” श्वेता विचारते.
“आई, रोशनी म्हणाली की मी तुझी मुलगी नाहीये; तू मला हॉस्पिटलमधनं विकत आणलंयस. मग विकी, सनी, जादू, मोना सगळे मला चिडवायला लागले.” दीपिकाचा स्वर दुखावला आहे चांगलाच.
“आपण त्यांच्या आई –बाबांकडे तक्रार करू हं!” श्वेता समजावते आहे लेकीला. पण त्या वाक्यात असं काहीतरी आहे की लेक आईपासून दूर होते.

“सगळ्यांना बाबा आहेत. माझा बाबा कुठं आहे? तो मला कधीच का भेटला नाही अजून? तो कधी फोन पण नाही करत. माझ्या वाढदिवसाला विश पण नाही करत तो कधी. कुठं आहे माझा बाबा?” दीपिका स्फुंदते आहे.

ज्याच्यावर प्रेम केलं; ज्याची साथ आयुष्यभर असेल असं मानलं तो ‘श्वेताला मूल होऊ शकत नाही’ असं लक्षात आल्यावर बदलला. मुलगी दत्तक घेऊन एक पाऊल पुढे टाकेतोवर तो आणखीच बदलला. दीपिका घरात आल्यावर ‘दुस-याचं मूल माझं नाही मानता येत मला. तुला पर्याय नसेल पण माझ्या बीजातून मी नवा जीव निर्माण करू शकतो’ असं म्हणून घरातून निघून गेलेला तिचा तो जीवनसाथी. घटस्फोटाला तिने लगेच संमती दिली. प्रेम करता येतं; मागता येत नाही. जीव लावता येतो पण त्या बदल्यात समोरच्याने पण आपल्यात जीव गुंतवावा अशी अपेक्षा नाही करता येत. त्याची सावलीही दीपिकावर पडू नये म्हणून मग नवं शहर; नवं काम ......

हे सगळं सहा वर्षांच्या कोवळ्या पोरीला कसं समजावून सांगायचं? कसं सांगायचं की मी तुला जन्म नसला दिला तरी सर्वार्थाने मी तुझी आई आहे? या इवल्या जीवाला कसा पेलवेल हा भार? हा निरागस जीव मिटून जाईल. तिला न दुखावता कसं सांगायचं सत्य?

दीपिका स्तब्ध बसलेल्या आईकडे पाहून भेदरली आहे आणखीच. श्वेता तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करते. पण “तू मला विकत घेतलंस, मला बाबा नाही...” असं आक्रंदत दीपिका तिच्यापासून दूर होते आहे. लेकीला जपायचं तर आहे पण या क्षणी आपल्याला तिला जपता येत नाही हे कळून श्वेता आतल्याआत उध्वस्त होते आहे.

“आजू, मला आईने विकत आणलंय का रे?” दीपिकाने दारात उभ्या असलेल्या आजोबाकडे धाव घेतली आहे.

श्वेता कोप-यात उभ्या असलेल्या बाबाच्या चेह-याकडे पाहून दचकते. असा का दिसतोय हा आत्ता? याला काय होतंय? डॉक्टरांना फोन करावा का?

बाबाने नातीला उचलून कुशीत घेतलेय आणि तो तिला थोपटतोय. पण त्याची नजर कुठे हरवली आहे?

“बाबा ....” श्वेता हळूच हाक मारते.

“शोना, रडू नकोस. मी आहे ना. ....” बाबाच्या बोलण्यावर श्वेता दचकते. कितीतरी वर्षांनी त्याचा तोंडून ‘शोना’ ऐकताना ती परत एकदा लहान होऊन जातेय.

बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवत ती म्हणते, “बघ ना रे बाबा, आता कसं सांगू मी राणीला? लहान आहे रे ती फार अजून.”

“श्वेता, बेटा रडू नकोस. तू माझी आहेस. माझीच मुलगी आहेस. मी आहे ना तुझ्याजवळ! मी तुला सोडून कधी कुठे जाणार नाही.....” बाबा त्याचं तंद्रीत बोलतो आहे.

रडतेय नात. बाबा बोलतोय लेकीशी. नातीला ‘लेक’ समजून तिची समजूत घालणा-या बाबाकडे पाहताना, त्याचे शब्द ऐकताना श्वेता चकित झाली आहे.

एक हात बाबाच्या गळ्यात आणि एक हात दीपिकाच्या केसांतून फिरवत गलितगात्र अवस्थेत उभ्या असलेल्या श्वेताला एका क्षणी बाबाच्या बोलण्याचा अर्थ उमगतो.
तिच्याही नकळत श्वेताचं मन उभारी घेतं.

इतकी वर्ष अबाधित असलेल्या त्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे.

**

Thursday, February 19, 2015

२२२. शिकाम्बा-मशाम्बा

कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही.

त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं  ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं.

पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत. पण तो आजचा विषय नाही. मुलींच्या शिक्षणाशी संबंधित एका प्रकल्पावर मी सध्या ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करते आहे. त्यामुळे या कौन्सिलचं प्रशिक्षण पाहणं; त्याचा आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल सुचवणं; ते अमंलात येतील हे पाहणं – हे माझं (अनेक कामांपैकी) एक काम. 

या गावात जाताना जेव्हा मुख्य रस्ता सोडून आम्ही उजवीकडे वळलो; तेव्हा डाव्या बाजूला ‘शिकाम्बा’ नामक नदीवर बांधलेलं धरण असल्याची आणि त्या धरणाला ‘शिकाम्बा लेक’ म्हटलं जातं अशी माहिती उत्साही सहका-यांनी दिली होती. “आज वेळ नाही आपल्याकडे, पण पुढच्या भेटीत जमवू आणि जाऊ थोडा वेळ तरी ‘शिकाम्बा लेक’ परिसरात” असंही आमचं आपापसात बोलणं झालं. त्यामुळे ‘शिकाम्बा’ शब्द मेंदूत रुजला. 

आज माझ्या सोबत स्थानिक एनजीओचे जे सहकारी आहेत, त्यांच्यातल्या कुणालाच इंग्रजी भाषा समजत नाही. त्यामुळे मी पोर्तुगीज भाषा किती आत्मसात केली आहे याची आज कसोटी आहे. प्रशिक्षण सुरु झालं आणि पहिल्याच मिनिटात माझ्या लक्षात आलं की मला स्थानिक लोकांचं ‘पोर्तुगीज’ नीटसं समजत नाहीये. चौकशी केल्यावर स्थानिक भाषा ‘शुटे’ (Chute) असल्याचं कळलं. मग लोक काय बोलतात ते मला पोर्तुगीजमध्ये अनुवाद करून सांगायची आणि माझं पोर्तुगीज लोकांना त्यांच्या भाषेत सांगण्याची जबाबदारी बेलिन्या आणि किटेरिया या दोघींनी घेतली आणि फार अडचणी न येता माझा लोकांशी संवाद सुरु झाला. 

लोक काय काम करतात; शेती आहे का; त्यात काय उगवतं; ते पुरतं का कुटुंबासाठी; कुणाकुणाच्या मुली या शाळेत आहेत; माध्यमिक शिक्षणासाठी मुली पुढे कुठे जातात; प्राथमिक शाळेतून मुलींची गळती मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं; कुटुंबात साधारण किती लोक असतात; स्त्रियांचं आरोग्य ..... असंख्य प्रश्न. मी भारतीय असल्याचं त्यांना सुरुवातीलाच सांगितलं आहे मी; त्यामुळे (मी पाहुणी असल्याने) आमची मस्त चर्चा चालू आहे. 

एक सत्र संपून दुसरे सुरु होताना एखादा खेळ  घ्यावा म्हणून बेलिन्या पुढे येते. पण स्थानिक स्त्रिया (ज्या स्कूल कौन्सिलच्या सदस्य आहेत) त्या बेलिन्याला थांबवतात आणि माझ्याकडे हात दाखवत काहीतरी म्हणतात – त्यावर सगळा समूह हसत तत्काळ सहमत होतो. मी प्रश्नार्थक नजरेने किटेरियाकडे पाहते. “भारतातल्या मुली खेळतात असा एखादा खेळ तुम्ही घ्या आमचा” अशी त्या लोकांची मागणी आहे. 

एक क्षण मी विचारात पडते. प्रशिक्षणात दोन सत्रांच्या मध्ये घेतले जाणारे हे खेळ छोटे आणि गमतीदार असतात. लोकांचा कंटाळा घालवायचा हाच त्याचा मर्यादित उद्देश असतो. आता इथं त्या खेळाचा अनुवाद करत बसले तर मजा जाणार. मला एकदम ‘शिकाम्बा लेक’ची आठवण येते.

मी पुढं येते. सगळ्यांना गोलात उभे राहायला सांगते. ‘शिकाम्बा सगळ्यांना माहिती आहे का’ ते विचारते – अर्थात ते त्या सगळ्यांना माहिती असतं. मी जे शब्द बोलेन त्यानुसार कृती करायची हे मी समजावून सांगते आणि मग मी ‘शिकाम्बा’ शब्द उच्चारून पुढे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. मग मी म्हणते ‘मशाम्बा’ आणि मागे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. सगळे हसतात. मी ‘शिकाम्बा’ म्हटलं की सगळे पुढे उडी मारतात आणि मी ‘मशाम्बा’ म्हटलं की सगळे मागे उडी मारतात. खिडकीतून अनेक लहान मुलं कुतूहलाने पाहताहेत आमच्याकडं – विशेषत: माझ्याकडं!

दोन चार उड्या झाल्यावर मी ‘मशाम्बा’ म्हणत पुढे उडी मारते ....अनेकजण माझं अनुकरण करतात.
मग हास्याची एक लाट. 

आम्ही पुढे काही मिनिटं खेळतो.
“शिकाम्बा–मशाम्बा” म्हणजे आपलं  “तळ्यात-मळयात”.
पोर्तुगीज भाषेत ‘मशाम्बा’ म्हणजे शेत.  

संध्याकाळी मी तिथून निघते तेव्हा शाळेचा आवारात काही मुलं “शिकाम्बा-मशाम्बा” खेळताहेत. 

लहानपणी मी ज्या गावात होते तिथल्या तळ्याची मला फार आठवण येते.
आता लवकारात लवकर ‘शिकाम्बा लेक’ला जायला हवं....