ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label पॉण्डिचेरी. Show all posts
Showing posts with label पॉण्डिचेरी. Show all posts

Wednesday, October 31, 2012

१४०. निमित्त कॉफीचं ...

वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.

वैभवने मला हुकूम सोडला. साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.

छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही. वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना करते.

आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘ वर्षाची नाही, महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने ‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय? वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – जाऊ दे, तुला नाही कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.

काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.

अरे, हे कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीचं घेणार ना, दुसरं काय? माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.

वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस.

मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी माझी आणखी एक अडचण असते.  ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन आला ते माझ्यासाठी.

आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा, ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.

मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.

तिथल्या तरुण मुलाने विचारलं, काय घेणार?
कॉफी, मी सांगितलं.
"कोणती?" 
मी एक नाव सांगितलं.
साखर हवी की नको? त्या मुलाने विचारलं.
पाहिजे, मी सांगितलं.
किती? पुढचा प्रश्न – त्याचंही उत्तर मी दिलं.
दूध? आणखी एक प्रश्न.
हो माझं उत्तर.
गरम का थंड? प्रश्न – त्याचंही उत्तर दिलं.
क्रीम हवं? प्रश्न काही संपेनात.

अरे बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला? मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.

काउंटरवरच्या त्या मुलाला माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर  ...

मला त्याच्या या उत्तराचं आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या         चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका विद्यार्थ्याला इथं सांगत होते ... तो हसून पुढच्या ग्राहकाकडे वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं , हे माझ्या लक्षात आलं.

एक तर प्रश्न माहिती पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही शिकण्यापासून सुटका नाही.

या प्रसंगानंतर काही महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी – अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत (साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.

कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक  मिळत नाही, पण इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!

माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते. कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.

मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ...
**

Tuesday, September 27, 2011

९१. भक्तीहीनता

आजवर अनेक लोकांनी माझ्यात भक्तीचं, श्रद्धेचं बीज रुजावं म्हणून प्रयत्न केले आहेत पण ते दुर्दैवाने सगळे फोल ठरले. मी कधीच चांगली ‘भक्त’ नव्हते आणि पुढेही बहुधा मी ती होऊ शकणार नाही. पण कोणा पंथावर, धर्मावर, देवावर श्रद्धा नसतानाही आजवरचे माझे आयुष्य एकंदरित आनंदाचे गेले आहे.

पण अर्थातच मला देवळांत जायला आवडतं – विशेषत: तिथ गर्दी नसते तेव्हा! मला देऊळ पहायला आवडतं. माझ मन भूतकाळात जातं आणि त्या काळाची चित्र रंगवतं – काल्पनिकच! या चित्राची मी वर्तमानाशी तुलना करते. कधी त्या चित्रात फरक पडलेला असतो तर कधी ते चित्र तंतोतंत तसंच असतं! देवापेक्षा लोकांचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला नेहमी कुतुहलाचा विषय वाटतो. अनेकदा अशा ठिकाणांबाबत ज्या कथा असतात, त्या विलक्षण असतात आणि अशा देवळांभोवतीचा बाजारही चित्तवेधक असतो. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं एका हातात भौतिकवाद आणि एका हातात अध्यात्म घेऊन(?) वाटचाल करत असतात. या प्रक्रियेत नेमकं काय घडतं हे ज्याचं त्याला – जिचं तिलाच कळतं!

त्यादिवशी कारेकल (Karaikal) या पुदुचेरीतील जिल्ह्याच्या शहरात प्रवेश करताना सुंदरराजनने या परिसरात जागृत शिव मंदिर असल्याचं मला सांगितलं आणि त्याने मला उत्साहन विचारलं, “तुम्हाला जायला आवडेल का या देवळात?” खरं तर आज दिवसभर भरपूर काम आहे, म्हणून आम्ही भल्या सकाळी सहा वाजता पुदुचेरीतून बाहेर पडलो आहे. पण आत्ताच कशाला नकारघंटा वाजवायची म्हणून मी म्हणते, “ बघू, आपलं काम वेळेत संपलं तर जाऊ”. अनुभवाने मला माहिती आहे की मी स्पष्ट नकार देत नाही तेव्हा आमचं काम ‘वेळेत’ हमखास संपतं!

दिवसभरात दोन तीन मीटिंग होतात, काही गावांत आम्ही जातो तिथ गावक-यांशी चर्चा होते, अडचणी काय आहेत आणि त्यातून पुढं  कसं जायचं यावर विचारविनिमय होतो. हे करताकरता संध्याकाळचे साडेपाच वाजतात. “जायचं का आपण मंदिरात?” गावातला एकजण अपेक्षेने विचारतो. आमच्यातला एक गट मागच्याच आठवड्यात तिथ जाऊन आलाय त्यामुळे ते सगळे थेट पुदुचेरीकडे प्रयाण करतात.  

दिवसभर ब-यापैकी दगदग झालीय. पुदुचेरीला पोचायला अजून चार तास लागतील. पण अर्धा एक तास जास्तीचा या देवळासाठी द्यायला माझी हरकत नाही. मग आम्ही थिरूनल्लार (Thirunallar) ला जातो.

इथल्या देवळात शिव आणि शनी असे दोघे एकत्र आहेत. मी आजवर फार थोडी शनीची देवळं  पाहिली आहेत. पुण्यातलं (शानिपारापाशी असलेलं!) शनीच देऊळ कधी आत जाऊन पाहिलेलं नाही. एकदा कधीतरी शनी शिंगणापूरला गेले होते असं आठवतं. दिल्लीत आश्चर्य वाटावं इतक्या जास्त संख्येत शनीची देवळं दिसतात. पण सगळ्याच शनी मंदिरांभोवती भिकारी असतात, अपंग लोक असतात. शनी आणि दु:ख, शनी आणि वेदना, शनी आणि जगण्याची धडपड असंच चित्र माझ्या मनात आहे. शिवाय एकदा कधीतरी वाचलेलं शनिमाहात्म्य पण आनंददायी नाही. त्यामुळे ‘शनी’च्या देवळात जाणं  मी आजवर टाळत आलेय. त्याउलट मी ब-याच ‘शिव’ मंदिरांत गेलेय. ती सगळी साधारणपणे थंड, सुंदर आणि शांत होती. अशा प्रत्येक भेटीत मी एक प्रकारच्या अपूर्व शांतीचा अनुभव घेतला आहे.  

इथल्या देवळाला जैन आणि शैवांच्या संघर्षाचा इतिहास आहे. एक राजा होता, एक संत होते आणि काही चमत्कारही होते. या जागेचा महाभारतकालीन नल राजाशीही संबंध आहे. इथे नलाने शनी देवतेची कृपा प्राप्त करून घेतली अशी कथा आहे. भक्त सांगतात की, हे एकच ठिकाण आहे की जिथं शनी ‘कृपेच्या’ अवस्थेत आहे. इथे शंकराच्या शक्तीमुळे शनी ‘नियंत्रणात’ आहे!

कोणत्याही धार्मिक ठिकाणी गेलं, धर्मग्रंथ वाचले आणि पुराणकथा वाचल्या की एक गोष्ट लक्षात येते – ती म्हणजे आपले देव अगदी मानवी आहेत. देवांचे विचार, देवांच्या कल्पना, देवांचे स्वभाव आणि देवांच वागणं  अनेकदा माणसांसारखं असतं. कदाचित मानवी मन देवाची कल्पना ‘इतकीच’ करू शकतं. अज्ञाताला जाणण्याचा प्रयत्न ज्ञात बाबींमधून करायचा ही आपली शिकण्याची नेहमीची पद्धत आहे.  

मला ते देऊळ आवडतं. त्याची वास्तू आकर्षक आहे. मला काही कळायच्या आधी मला एका रांगेतून पुढं  नेलं जातं रांग मोडून – आणि तिथं पूजा आहे. आम्ही रांग मोडून पुढे घुसतो तेव्हा कोणी तक्रार करत नाही. नंतर  माझ्या  लक्षात येतं की सगळ्याच मंदिरांत “जास्त पैसे दया आणि लवकर दर्शन घ्या” अशी व्यवस्था असते. मला अशी रांग मोडून जाणं  आवडत नाही, देवापुढे कोणी कसा काय जास्त मोठा असतो – आणि तेही केवळ पैसे जास्त आहेत किंवा पद मोठं  आहे म्हणून? खरं सांगायचं तर लोकांचा देवावर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं! मी देवळात पूजा वगैरे कधी करत नाही पण इथं मी अगतिक आहे. म्हणजे मी अजूनही त्यातून बाहेर पडू शकते हे आहेच – पण जे काही चाललं आहे त्यात आधी नकळत का होईना सहभागी होऊन मी माझी संमती दिलेली आहे अप्रत्यक्षपणे – आता एकदम बाहेर पडायचं तर माझे सहकारी दुखावले जातील. ग्रंथालयात निरक्षर माणसाची जी अवस्था होईल तशीच माझी इथं झाली आहे.


पूजेत लगेचच एक अडचण येते. “तुमची रास काय?” असं मला पुजारी विचारतो आणि मी “मला रास  नाही” असं उत्तर देते. त्यावर सगळे एकदम चिडीचूप होतात. मग आपापसात ते तामिळ भाषेत काहीतरी बोलतात – जे मला सुदैवाने समजत नाही. मग पुजारी मला “तुमचा जन्म कोणत्या महिन्यातला?” असं विचारतात. इथं काहीतरी ठोकून द्यावं, खरं सांगू नये असं मला वाटतं. पण मी खरी माहिती सांगते. पूजा संपल्यावर सुंदररा जन मला दक्षिणा द्यायला सांगतो. पण माझं पैशांच पाकीट गाडीतच आहे. तो घाईघाईने एक नोट माझ्या हातात देतो ती मी आरतीच्या तबकात टाकते. नंतर त्याला मी पैसे देते तेव्हा तो घेतो कारण हे पैसे मी दिले नाहीत तर या पूजेचं पुण्य मला मिळणार नाही. म्हणजे एका अर्थी माझ्या इच्छेविरुद्ध मला पैसे द्यावे लागले आहेत. पण सुंदरराजनचा हेतू चांगला आहे हे मला माहिती आहे – म्हणून मी वाद घालत नाही.

आता कसल्यातरी महागड्या मण्याची पूजा आहे. हा मणी कसला, त्याची काय गोष्ट आहे हे काहीच मला समजत नाही. एक पुजारी किल्ल्यांचा भला मोठा जुडगा घेऊन येतात आणि कुलुपांमागून कुलूपं उघडतात. भक्तांचा एक गट शांतपणे या समारंभाची वाट पाहतोय – म्हणजे काहीतरी महत्त्व असणार याचं. अचानक दोन स्त्रिया शंकराच एक तामिळ भक्तीगीत गायला सुरुवात करतात. मला ते गाणं  आठवतंय. एके काळी ते मी खूपदा ऐकलं होतं. इतर भक्तांसोबत मीही ते  गाणं त्या दोन स्त्रियांच्या पाठीमागं म्हणते आहे. मी ते विसरलेय असं वाटतं होतं मला – पण आता ते मला व्यवस्थित आठवतंय. मला लहान मुलीसारखा आनंद होतो – मला ते गाणं आठवतंय याचा आणि ते अवघड तामिळ शब्द मला उच्चारता येताहेत याचाही.

एकदाच्या सगळ्या पूजा संपतात. मंदिराचे मुख्य पुजारी मला प्रसाद देतात. त्यांच्या मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीत ते मला सांगतात की हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्या खालोखाल प्रसिद्ध आणि जागृत आहे. देवांमधला हा श्रेणीक्रम मला कधी समजत नाही. ते सगळेच शक्तिशाली आणि सर्वसमावेशक नसतात का? आता उदाहरणार्थ इथं मी प्रार्थना केली नाही म्हणून शिव माझ्यावर रागावला अशी आपण कल्पना केली, तर त्यातून असं निष्पन्न होईल की शिव हा माणसासारखा मातीचा आहे – त्याला सलाम नाही केला की तो रागावतो! असल्या सगळ्या मानवी भावांच्या पल्याड देव पोचलेले असतात असं मी समजते!

मुख्य पुजारी पुढे सांगतात: इथं तुम्ही जी काही इच्छा मनात धरली असेल ती पूर्ण होईल.

त्यावर सगळे समाधानाने हसतात. मीही हसते. त्यांची श्रद्धा त्यांना सुखी ठेवते आहे तर असू दे, उगाच कशाला प्रश्न विचारायचे त्यांना?

“तुम्ही काय इच्छा धरली होती?” परतीच्या वाटेवर सुंदरराजन मला विचारतो.

“मला हा देव इतका शक्तिशाली आहे हे जर आधी माहिती असतं, तर मी नक्की दोन तीन गोष्टी मागितल्या असत्या ..” मी सांगते. सामान्यपणे सगळ्या भक्त मंडळींचं या उत्तराने समाधान होतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. आजचा प्रसंग त्याला अपवाद नाही.

मी काय विचार करत होते मंदिरात? मी प्रार्थना नक्कीच करत नव्हते – ती कशी करतात ते मला माहिती नाही. मी ईश्वराकडे काही मागत नव्हते हेही नक्की.

मी भक्त आणि त्यांची भक्ती पहात होते – त्यात कुठेतरी प्रामाणिक आणि खरी भक्ती असणार, त्यात कुठेतरी भक्तीची असीम प्रेरणा असणार. मी नेहमीप्रमाणे पहात होते; आपल्याला किती कमी माहिती आहे याचं नेहमीप्रमाणे मला आश्चर्य वाटतं होतं; शेकडो वर्षांपूर्वी इथलं चित्र काय असेल आणि आणखी पाचशे वर्षांनी चित्र कसं असेल याचा मी विचार करत होते; उत्पत्ति-स्थिती-लय यांच्या अविरत चक्राचा मी विचार करत होते; माझ्या आजच्या जगण्याबद्दल मी समाधानी होते – सुख असो की दु:ख;  यातलं काहीच अखेर टिकणार नाही या जाणीवेने मी शांत होते.

भक्तीहीनतेच्या त्या क्षणी मला ते जुनपुराणं  सत्य पुन्हा एकदा सापडलं. माझ्या भक्तीहीनतेमुळे न शिवाचे काही बिनसते, ना शनीचे, ना आणखी कोणा देवतेचे – आणि मुख्य म्हणजे न माझेही काही बिघडते. आम्ही एक निर्णय घेतला आहे – तो आहे एकमेकांकडून काही न मागता, काही अपेक्षा न करता; काही देवाणघेवाण न करता एकमेकांसोबत जगायचं. त्यात आम्ही समाधानी आहोत. निदान मी तरी नक्कीच आहे. 

तस पहायला गेलं तर भक्तीची मला काय गरज?
**

तुम्हाला कदाचित 'यशस्वी माघार' वाचायला आवडेल.

Thursday, September 23, 2010

४५. संवाद

माणसं एकमेकांशी कशासाठी बोलतात?

मन मोकळं करण्यासाठी?
वेळ घालवण्यासाठी?
ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी?
की सवय म्हणून?

अनेकदा मला हे प्रश्न पडतात, विशेषत: मी स्वत: आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत असते तेंव्हा तर मला हमखास हे प्रश्न पडतात.

आणि गंमत म्हणजे दरवेळी या प्रश्नांची वेगळीच उत्तरे मला मिळतात.
व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार आणि खरे सांगायचे तर माझ्या मनस्थितीनुसार या प्रश्नांची उत्तरे बदलतात असे मला आढळले.

मजा वाटली मला. पण मनातला गोंधळ अधिकच वाढला.

मी मूळची गणिताची विद्यार्थिनी असल्याने (आता आलिकडे मला गणित काहीच येत नाही हा भाग वेगळा!) एखादा प्रश्न सोडवण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग असतात हे मला माहिती आहे - माझी तशी श्रद्धाच आहे म्हणा ना!

पर्याय म्हणून मी या प्रश्नांकडे दुस-या बाजूने पहायचे ठरवले. मी विचार करायला लागले.
माणसं का ऐकतात?

प्रश्न बदलला तरी उत्तरं मात्र तीच येऊ लागली. म्हणजे:
माणसं वेळ घालवण्यासाठी ऐकतात.
माणसं ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी ऐकतात.
माणसं सवय म्हणून ऐकतात.

विचार करताना दोन गोष्टी नव्याने लक्षात आल्या. म्हणजे आहेत तशा त्या जुन्याच, अनेकदा कानांवर पडलेल्या - पण साक्षात्काराचा ठसा काही वेगळाच असतो.
एक म्हणजे - माणसं नाईलाजाने, पर्यायच नसतो म्हणून ऐकतात.
त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे खरं तर माणसं ऐकतच नसतात! आणि बोलणा-याला (बोलणारीला) तरी कोठे फिकीर असते समोरचा ऐकतोय (ऐकतेय) की नाही ते! आपण आपले आपल्याच बोलण्यावर (- लिहिण्यावरही) खूष असतो!

हे असं चित्र समोर आल्यावर काही काळ माझी अवस्था फार वाईट झाली. म्हणजे मला कोणाशी काही बोलावसं वाटेना, कोणाचं काही ऐकावं वाटेना. संवादाची प्रक्रिया म्हणजे मला एक शुद्ध फसवणूक वाटायला लागली. बोलून मन मोकळं करण्याजोगं आपण काही अनुभवलं तरी आहे का, याच आश्चर्य वाटायला लागलं!

हे सगळे विचार मनात येत होते तेव्हा माझा मुक्काम पॉंडिचेरीत होता. पॉल ब्रन्टनच्या पुस्तकात रमण महर्षींच्या मौनाबद्दल वाचलं होतं. पॉंडिचेरीपासून रमणाश्रम काही तासांच्या अंतरावर! मग मी तिकडे गेले.

रमणाश्रम शांत होता. पण ती गंभीर स्मशानशांतता नव्हती. रमण महर्षींच्या प्रतिमेसमोर बसल्यावर वाटलं: या माणसाला समजेल आपण काय म्हणतो आहोत ते. (मेलेल्या माणसाला कसं समजेल? - असा एरवी सहज सुचणारा विचार तेथे माझ्या मनात आला नाही हेही नवलच!) - जणू ते आधीच समजल्यागत त्यांच ते गूढ स्मितहास्य!

पण मला काही बोलावसं वाटेना. दुस-यांशी बोलायचं नसतं तेंव्हा अनेकदा मला स्वत:शी बोलायला आवडतं. पण तेथे स्वत:शीही बोलावसं वाटेना. ऐकायची तयारी होती माझी - पण माझ्याशी रमण महर्षी कसे बोलणार? तेथे ते नव्हते, त्यांचा फक्त फोटो होता. तो फोटो जिवंत वाटत होता, पण अखेर तो फोटोच होता. मी नुसती बसून राहिले शांतपणे. काहीच मनात नव्हतं. आपल्या मनात काही नाही याची जाणीवही नव्हती.

परतीच्या प्रवासात लक्षात आलं, की आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्यालाच नीट माहिती नसतं. चाचपडत असतो आपण, म्हणून भारंभार बोलत राहतो. त्यातून कधीतरी नेमकेपणाने अभिव्यक्त होऊ – या एकमेव आशेवर आपण बोलत राहतो (लिहित राहतो!) आपण जसे आपल्या गोंधळात असतो, तसेच समोरचा(ची)ही बहुतेक तशाच गोंधळात असतो - असते. गोंधळलेल्यांचे ऐकण्यात फायदा नसतो हे अनुभवाने आपण सगळे जाणतो - म्हणून ’ न ऐकण्याची’ प्रवृत्ती एका अर्थी स्वाभाविकच!

’काय बोलायचे’ हे ज्यांना समजले, ती रमण महर्षींसारखी ऋषितुल्य माणसे त्यांच्या जिवंतपणीही फार काही बोलली नाहीत .. आणि त्यांचे ’ऐकायला’ जगभरातून माणसं धडपडत तिथवर येतात – रमणांच्या मृत्युनंतरही येतात.

संवादाचे सार अखेर कळण्यात आहे - बोलणे अथवा लिहिणे ही केवळ साधनेच आहेत.
या साधनांविनाही संवाद होतो यातच त्याचे सारे रहस्य दडलेले आहे काय?

Thursday, August 19, 2010

४०. पाचवी सावित्री

सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.
पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.

एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.  

मृत्युशी गप्पागोष्टी करत स्वत:च्या हुषारीने सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी सावित्री. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: करणारी, बाह्य गोष्टींपेक्षा स्वत:च्या सहचराचे आंतरिक गुण पाहणारी, यमाशी न घाबरता संवाद करणारी सावित्री. तिचे हे सगळेच गुण विलक्षण वाटत लहानपणी; आणि खरे तर अजूनही.

पण कधीकधी असेही वाटते की परिस्थितीपुढे एवढी शरणागती पत्करणे हे सावित्रीने का स्वीकारले असेल? तिच्या स्वत:त असामान्य क्षमता असतानाही? काहीही करून, तडजोड स्वीकारून लग्न केलेच पाहिजे या मानसिकतेतून तिला बाहेर का पडता आले नाही? कदाचित काळाच्या फार पुढे कोणालाच जाता येत नाही हेच तात्पर्य याही कथेतून द्यायचे असेल त्या काळच्या समाजधुरिणांना!

शिवाय यमाकडून सावित्री जे तीन वर मागते तेही जरासे मजेदार आहेत. पहिला वर सावित्री मागते तो सास-याची दृष्टी परत येऊन त्याचे राज्य त्याला परत मिळावे हा. दुस-या वरानुसार स्वत:च्या पित्याला शंभर मुलगे व्हावेत अशी ती मागणी करते. तिस-या वरानुसार सत्यवानापासून तिला स्वत:ला शंभर मुलगे व्हावेत असे ती मागते. यमासारख्याकडून हुषारीने स्वत:च्या मागण्या मान्य करून घेणे हे नि:संशय वादातीत कौशल्य आहे. पण यात सावित्री स्वत:च्या बाईपणाला कमी लेखते असे वाटत राहते नेहमीच मला ही गोष्ट वाचताना! मागून मागायचे, तर स्वत:सारखी एखादी तरी मुलगी तिने मागायला हवी होती अशी हळहळ मला लहान वयात वाटत असे. सावित्रीचा सगळा लढा वैयक्तिक स्वरूपाचा होता - जरी तो तेजोमय असला तरी व्यक्तिगत स्वरूपाचा होता हे जाणवते.

सावित्रीच्या गुणांची झलक परिस्थितीशी हसतमुखाने दोन हात करणा-या अनेक स्त्रियांकडे पाहताना आजही मिळते. स्वत:ला कमी लेखून कुटुंबाचे भले करण्यासाठी कितीतरी असंख्य स्त्रिया स्वत:ची हुषारी खर्च करत असतात. ते करत असताना त्या स्वत:ला कमी लेखण्यात त्यांची ताकद खर्च होते. महाभारतात वर्णन केलेली अशी सावित्री खरोखर होऊन गेली असेल, ती केवळ कविकल्पना नसावी असे भक्कमपणे वाटावे इतक्या स्त्रिया - समाजातल्या अनेक घटकांतील, वयोगटातील, आर्थिक परिस्थितीतल्या स्त्रिया मला पाहायला मिळाल्या.

दुसरी सावित्री म्हणजे जोतिबांच्या बरोबरीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी! हिचा लढा वेगळाच होता. ती यमाला इतर सर्व मर्त्य माणसांसारखीच सामोरी गेली. पण समाजाला सामोरी जाताना मात्र त्या आधीच्या सावित्रीचा तेजाचा वसा तिने चालवला. भारतातल्या स्त्रियांच्या पहिल्या शाळेची पहिली शिक्षिका, अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा चालविणे, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरची विहीर खुली करणे, विधवेचे मूल दत्तक घेणे असे कितीतरी ’पहिले’ प्रयत्न या स्त्रीने केले. त्यात तिला तिच्या पतीची जोतिबांची साथ होती, किंबहुना त्यांची प्रेरणाही होती हे आहे. पण त्या काळात एका स्त्रीने समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतका सक्रिय पुढाकार घेणे हे असामान्यपणाचे लक्षण होते यात शंकाच नाही. जे इतर कोणाला सुचू नये ते सुचणे, इतकेच नाही तर इतरांचा विरोध असताना ते काम आयुष्यभर सातत्याने आणि निष्ठेने करत राहणे हे विलक्षणच आहे. त्या काळात ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ चालवणे हा क्रांतीकारक कार्यक्रम होता. सामाजिक काम करत असताना तिने कविताही लिहिल्या. आधुनिक मराठी कवितेतला तिचा वाटा अगदी नगण्य मानता येणार नाही. १८४८ म्हणजे आता फार जुना काळ वाटतो, पण त्या काळच्या वर्तमानाचे चटके सावित्रीबाईंनी सोसले.

जोतिबांच्या निधनानंतर शेतकरी कामकरी वर्गाकरता विचारांचे आणि संधींचे नवे दालन उघडणा-या ’सत्यशोधक समाजाची’ धुरा सावित्रीने यशस्वीपणे सांभाळली. शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे काम करत असताना या सावित्रीची दृष्टी अधिक व्यापक होती, त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता असे जाणवते. ’स्व’ विस्तारला की काय होते याचे चित्र या सावित्रीच्या आयुष्यात दिसून येते. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची, काळाच्या पुढे जाऊन कृती करण्याची एक नवी परंपरा या सावित्रीने निर्माण केली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सत्यवानाच्या सावित्रीइतकीच हीदेखील तेजस्वी आणि स्वयंपूर्ण होती - पण हिच्या तेजाचा अविष्कार दीनदुबळयांसाठी होत राहिला, स्वत:साठी नाही.

काही वर्षांपूर्वी तिसरी एक सावित्री भेटली. ती म्हणजे पु.शि. रेगे यांची सावित्री. त्यात पहिल्या वाचनात खरे तर सावित्रीपेक्षा ’मोर यावा’ म्हणून आजीजवळ हट्ट करणारी, ’मी येईन तेंव्हा आधी लच्छीनं नाचलं पाहिजे’ ही मोराची अट लक्षात ठेवून सदैव आनंदात राहणारी आणि त्या ओघात मोराचे भान न उरणारी लच्छी जास्त भावली होती. पुढे कधीतरी त्या कथेचा  ’म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपणच व्हायचं’ असा अर्थ लावणारी सावित्री वेगळीच आहे हे जाणवलं आणि तिच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली.

रेगेंची सावित्री आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही तिच्यासारखी स्वगतात्मक पत्र लिहायला आवडतात. पूर्वी पत्र लिहायचे; आजकाल ई-मेल लिहिते मी, इतकाच काय तो फरक! शिवाय असा मनमोकळा संवाद साधायला समोरच्या माणसाची आणि आपली फार ओळख असायला पाहिजे असा माझा कधीच आग्रह नसायचा, आजही नसतो. किंबहुना जोवर ओळख कमी असते तोवरच मनमोकळा संवाद होतो, असा माझा अनुभव आहे .असो.  हा अतिशय वादाचा मुद्दा होऊ शकतो याची मला जाणीव आहे.

ही सावित्री म्हटले तर आत्ममग्न आहे, म्हटले तर स्वत:ला विसरून दुस-यासाठी काही करणारी आहे. तिला वीणा वाजवता येते, लेखन करता येते. स्वत:च्या मर्यांदांची तिला जाणीव आहे तशीच स्वत:च्या सामर्थ्याचीही. स्वत:च्या भावनांना ती निखळपणे सामोरी जाऊ शकते, पराभवाचे तिला दु:ख होते, पण त्या पराभवाला स्वीकारून तिला पुढेही जाता येते. ही सावित्रीही गूढच आहे, पण ती पुष्कळशी तुमच्या आमच्यासारखी वाटते. मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.

आणखी काही काळाने पॉंडिचेरीच्या वास्तव्यात आणखी एक सावित्री भेटली, ती व्यक्ती म्हणून नाही तर एक असामान्य कल्पना म्हणून! योगी अरविंदांनी सत्यवान – सावित्री कथेचा आध्यात्मिक स्तरावरून एक वेगळाच अर्थ लावला आहे. त्यांच्या मते वैदिक ऋषींनी या कथेद्वारे शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंदांच्या मते सत्यवान आंतरिक दैवी सत्य असलेल्या पण अंध:कारात आणि अज्ञानात अडकलेल्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन (हा अंध आहे) हे अंध झालेले दैवी मन आहे. सावित्रीचा पिता अश्वपति तपस्येचे प्रतीक आहे. तर स्वत: सावित्री तपस्येतून उदय पावणारी आणि दैवी सत्याला अज्ञानातून मुक्त करणारी दैवॊ शक्ती आहे. सावित्री शाश्वततेचं, अनंतत्त्वाचं रूप आहे. योगी अरविंदांच्या मतानुसार सावित्री हा परिवर्तनाचा मंत्र आहे - आणि ते येथे कोणत्याही सामाजिक परिवर्तनाबाबत बोलत नाहीत तर मनुष्यत्वाकडून ईशत्वाकडे नेणा-या मार्गाबद्दल बोलत आहेत. मानव्याकडून महामानव्याकडे होणा-या प्रवासाबाबत बोलत आहेत.

अरविंदांची सावित्री मला जवळची वाटली, पण ती मला समजली नाही. तितकी प्रगल्भता माझ्यात बहुधा तेव्हा नव्हती - आणि कदाचित आजही नाही. अरविंद सांगतात त्या दृष्टीकोनातून सावित्रीची कथा वाचली, की वरती मी उल्लेख केला होता ते सारे प्रश्न गायब होतात. आजवर न दिसलेले, न भावलेले, न कळलेले काही नवे कळल्यासारखे वाटते - पण ते क्षणभरच! एक भव्य दिव्य स्वप्न डोळ्यांसमोर यावे पण क्षणार्धात नाहीसे होऊन आपले मोडके तोडके जगणे शिल्लक राहिले आहे अशी विषण्णता मला अरविंद वाचताना येते. म्हणून माझ्यापुरता मी एक नियम केला आहे - मी फक्त अरविंदांची पत्रे वाचते. त्यात एक वेगळेच अरविंद समोर येतात – मिस्किल, साधे, मानवी, दुस-यांच्या मर्यादा समजून घेणारे. ते मग जवळचे वाटतात – मित्रासारखे वाटतात.

या सगळ्या सावित्रींची आठवण मागचे काही दिवस सातत्याने माझ्यासोबत आहे.

त्याचं काय झालं, काही मित्रमैत्रिणींच्या प्रोत्साहनाने मी संगीत ऐकण्याकडे एकदम वळले. माझ्या नादिष्ट स्वभावानुसार मग दिवसातला (आणि रात्रीचाही) जमेल तितका काळ मी संगीत ऐकण्यात घालवायला लागले. कुमार गंधर्वांनी गायलेल्या कबीराच्या रचना ऐकताना मला अनेक गोष्टी आठवल्या. त्यात प्रकर्षाने आठवली ती पु. शि. रेगेंच्या ’सावित्री’मधली लच्छी. म्हणून प्रवासात असतानाही रात्री दहा वाजता एका मैत्रिणीला फोन करून मी तिच्याकडचं ’सावित्री’ माझ्यासाठी आणायला सांगितलं  आणि तिने ते आणलही.

तो दिवस चांगला गेला होता माझा. त्या आनंदात ’सावित्री’ वाचायला घेतली. लच्छीची गोष्ट संपली आणि मला एकदम बावचळल्यासारखचं झालं. कारण त्या ’सावित्री’शी माझा काही सूर जुळेचना. जेमतेम १२० पानांच पुस्तक आहे ते - त्यामुळे तासाभरात वाचून झाल. आणि ते झाल्यावर फार रिकामं वाटल मला - उदास नाही (ते चाललं असतं मला!) - रिकामं!

रात्रभर माझी चिडचिड झाली. एक दोन जणांना ई मेल लिहून उगाच माझा वैताग त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न केला. ’सावित्री मला कळलीच नाही’ अशी तक्रारही मी काही जणांकडे गेली. त्यावर सगळे फक्त हसले - समंजसपणे हसले - त्यामुळे मला जास्तच रिकामं वाटायला लागलं!

मला वाटतं मी ’सावित्री’ला बाहेरच्या जगात शोधायचा प्रयत्न करते ही आत्ताच्या घटकेला सगळ्यात मोठी अडचण आहे. खरी ’सावित्री’ बहुधा आपल्यातच असते. ज्या ज्या टप्प्यावर जी जी सावित्री समजण्याची माझी लायकी होती, ती ती सावित्री मला भेटली. बुद्धीची तलवार परजून मी विश्लेषण केल्याने त्यातल्या कोणत्याच सावित्रीचे काही बिघडले नाही - अर्थात माझेही काही बिघडले नाही म्हणा, उलट काही घडतच गेले. सावित्री वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येते, कारण त्या त्या वेळच्या माझ्या गरजा वेगळ्या असतात. मी बदलते म्हणून मला भावणारी ’सावित्री ’ बदलते. आता माझी गरज बदलल्याने जुनी ओळखीची सावित्री मला अनोळखी वाटण अगदी स्वाभाविक आहे. म्हणून जुनं नातं चुकीचं होतं, गैरवाजवी होतं, अवास्तव होतं .. असे कोणतेही निष्कर्ष घाईने काढायचीही गरज नाही. त्या सगळ्यांच ऋण घेऊनच आता पुढची वाटचाल करायला हवी. सावित्रीचा वसा घ्यायचा म्हणजे स्वत:च भानं राखून जगायचं...

सावित्री हवी, तर स्वत:च सावित्री व्हायला हवं............ते अद्याप जमेल की नाही हे माहिती नाही.
पण आता बहुतेक पाचवी सावित्री भेटण्याची वेळ आलेली दिसते आहे

Friday, July 9, 2010

३४. जीवो जीवस्य...

आज खूप दिवसांनी दुपारच्या वेळी मी घरात होते. रणरणत्या उन्हामुळे आसमंत चिडीचूप होता. मी राहते त्या भागात बरीच झाडे आहेत. मी खिडकीतून दिसणा-या झाडांकडे नुसतीच निरर्थकपणे पाहत होते. इतक्या उन्हात यांच्या आत काय लगबग चालू असेल, याचही मला कुतुहल होतं! इतक्यात एका फांदीवरून खार धावत गेली. तिच्या पुढेमागे कोणीच नव्हतं खर तर! याच बाईसाहेबांची दुपारच्या वेळी इतकी धांदल का चालली होती?

क्षणार्धात एक जुनच चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभ राहिलं! तो क्षण आठवला की अजून माझ्या काळजाचा एक ठोका चुकतो. मी तेंव्हा नेमके काय करायला हवे होते? काहीच न करता नुसतीच अलिप्तपणे मी बघत राहिले, ते बरोबर की चूक? परिस्थितीची नीट माहिती न घेता आपल्या बळाच्या आधारावर कोणा एकाची बाजू मी उचलून धरणे योग्य झाले असते का?

पॉंडिचेरीला होते मी. अरविंद आश्रमाच्या परिसरात राहत होते. अरविंदांची काही पुस्तके तेथे बसून नीट वाचावीत या इराद्याने गेले होते, त्यामुळे तेथे बरेच महिने माझा मुक्काम होता. आश्रमाचे ग्रंथालय छानच होते (अजूनही आहे!). पुस्तकांचा संग्रह तर चांगला होताच, शिवाय वाचत बसायची जागा निवडायलाही पुष्कळ वाव होता. मी बहुधा पहिल्या मजल्यावरच्या उघडया गच्चीत बसायचे. सावली देणारा कोपरा एक दोन दिवसांतच ध्यानात आला. डॊळे पुस्तकातून उचलून समोर पाहिले की चकाकणारा निळा आणि संथ समुद्र दिसायचा. त्याच्यावरून येणा-या वा-याच्या झुळुकांनी जवळपासची झाडे जणू खुषीत नाचायची. गच्चीतल्या मोकळ्या जागेत फुलझाडांच्या ब-याच कुंडया होत्या. त्यांच्या संगतीत एकूण छान चालला होता माझा वाचनाचा कार्यक्रम.

तिस-या चौथ्या दिवशी खारींची वर्दळ सुरू झाली. आधी त्या बहुधा मला बिचकल्या होत्या. पण आता त्यांनाही माझी सवय झालेली दिसत होती. अगदी निर्भयपणे, आत्मविश्वासाने त्या आमच्यासमोर (आणखी एक दोन जण असायचे वाचत बसलेले!) वावरायच्या. हातभर अंतरावरून बिनधास्त धावायच्या. कधी एखादी खार निवांतपणे समोर बसून टुकूटुकू पाहत राहायची - तत्त्वचिंतक असल्याचा आव आणत! फार गंमत वाटायची मला. दोन तीन तास मी माझ्या ठराविक खुर्चीत बसून असायचे. थोडा वेळ अरविंद वाचणे आणि बाकी वेळ समुद्र आणि खारी पाहणे असे माझे एकंदर छान चालले होते.

एक दिवस मी नेहमीच्या वेळी ग्रंथालयात गेले. सायकल लावून प्रवेशद्वारात येते तोच डावीकडे झुडुपात असलेले मांजर इमारतीच्या पाठीमागे धावले. एकदम सात आठ खारींचा चित्कार मला ऐकू आला. काही कळायच्या आतच इमारतीला मागच्या बाजूने वळसा घालून तो बोका माझ्यासमोर उभा होता.

ही सगळी घटना सेकंदाच्या जणू काही अंशातच घडली. मी अद्याप खारींच्या आवाजाचा वेध घेत होते, तोवर हे बोकोबा माझ्यासमोर उभे ठाकले. त्याला पळ काढायला पुष्कळ वाव होता, तरीही तो बोका उभा का राहिला हे मला आजतागायत कधी कळले नाही. तो बोका तसाच उभा होता म्हणून माझी नजर अजाणता त्याच्याकडे वळली! क्षणभर माझी नजर गोठलीच. त्या बोक्याच्या तोंडात एक खार होती. सुटकेसाठी ती धडपडत होती. आणि एखाद्या विजयी वीराच्या थाटात बोका माझ्यासमोर उभा होता.

मी झटकन खाली पाहिले. आसपास एकही दगड नव्हता. बोक्याला काहीतरी फेकून मारले की स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो खारीला सोडेल असा माझा हिशोब होता. बोका बिथरू नये म्हणून मी सावकाश हालचाल केली. एक पाय वरती उचलून हातात चप्पल घेतली. खार अजून तडफडत होती. बोका शांतपणे माझ्यासमोर उभा होता.

बोक्याच्या त्या नजरेने माझे अवसान गळाले. मला वाटले, आपण फक्त आपल्याच भावनेचा विचार करतो आहोत! ’जीवो जीवस्य जीवनम’ हा तर निसर्गाचाच न्याय आहे! रोजच्या सहवासामुळे आपल्याला खारीबद्दल जास्त आत्मीयता वाटते आहे. पण ही खार म्हणजे त्या बोक्याचे अन्न आहे. एवढया चपळ खारीला पकडण्यासाठी त्या बोक्यालाही काही कमी श्रम करावे लागले नसतील! त्याच्या तोंडचा घास काढून घेण्याचा मला काय अधिकार? निसर्गाने सर्वांना लढण्याची अस्त्रे दिली आहेत, तशीच बचावाचीही! आजवर किती खारी या बोक्याच्या तावडीतून निसटल्या असतील, पण आज बाजी याने मारली आहे. मी बळ वापरले तर कदाचित ही खार सुटेलही. पण या घटनेत मी मध्येच नाक खुपसणे न्याय्य होईल का?

माझा पुतळाच झाला होता. या विचारांच्या आंदोलनात मी गुंतलेली असतानाच खारीची तडफड संपली. बोका मला ओलांडून शांतपणे पुढे गेला. या सगळ्या घटनेला इतका कमी वेळ लागला की आसपासच्या माणसांना काही पत्ताही लागला नाही.

मला ती खार आठवते. तो बोका आठवतो. अनेक प्रसंग आठवतात. माणसे आठवतात. स्वत:च्या करण्याचे आणि नाकर्तेपणाचे सोयिस्कर समर्थन मला करता येते. पण दर वेळी मी न्याय्य बुध्दीने वागले असा कौल माझे मन मला देत नाही. मनालाही निसर्गाची एक गती आहे. त्या गतीचे मी समर्थन करते आहे का? पण ते तरी न्याय्य ठरते का?

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरूण भारत, १० जुलै १९९६