ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 22, 2013

१६४. विवेकानंदांचा वेदान्त विचार भाग ११. समन्वय

भाग १० 

विवेकानंदांचा वेदान्त विचार समजावून घेताना प्रचलित व परंपरागत वेदान्तांपैकी कोणते मत त्यांना मान्य होते असा प्रश्न साहजिकच मनात येतो. एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी आणि ती म्हणजे विवेकानंदांना सर्वच आचार्यांबददल आदर असला तरी ते कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायाचे अनुयायी नव्हते.

वेदान्तामधील संप्रदायाविषयी बोलताना विवेकानंद म्हणतात, द्वैती, विशिष्टाद्वैती व अद्वैती यापैकी कोणताही भारतीय संप्रदाय असो, आपण सनातन मतावलंबी आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या संप्रदायांनी उपनिषदे, व्याससूत्रे व गीता यांचे प्रामाण्य मान्य केले आहे. या सर्व संप्रदायांचा आधार ही प्रस्थानत्रयी आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू यांनी म्हणा, आणखी कोणीही म्हणा, जेंव्हा एखादा नवीन संप्रदाय स्थापन केला तेंव्हा त्यांनी ही प्रस्थानत्रयी घेऊन तिच्यावर एक नवे भाष्य लिहिले असे आपल्याला दिसून येते. उपनिषदांतून निर्माण झालेल्या संप्रदायांपैकी कोणा एकालाच वेदान्त हे नाव देणे बरोबर नाही. वेदान्त या शब्दात सर्व संप्रदायांचा समावेश होतो. म्हणूनच विवेकानंद स्वत:ला अमुक वेदान्ती न म्हणवून घेता फक्त वेदान्ती म्हणवून घेतात.

भगिनी निवेदिता विवेकानंद ग्रंथावलीच्या प्रस्तावनेत म्हणतात, जीत सर्व काही एकमेवाद्वितीय होऊन जाते अशा त्या अनुभूतीचा प्रचार करणा-या अद्वैत तत्त्वज्ञानाचे सार्वभौमत्व घोषितानाच स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला याही तत्त्वांची जोड दिली की, द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत हे एकाच लक्ष्याच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीचे तीन टप्पे असून त्यातील शेवटी निर्देशिलेला टप्पा हाच तिचे अंतिम लक्ष्य होय.

द्वैताची आणि विशिष्टाद्वैताची उपयुक्तता विवेकानंदांना पूर्णत: मान्य असली तरी शंकराचार्यांचा अद्वैतवाद तार्किक दृष्टया सर्वात उच्च असल्याचीही त्यांची ठाम धारणा होती. एके ठिकाणी ते म्हणतात, अशा रीतीने अनेकेश्वरवाद, द्वैतवाद प्रभृतीतून मार्ग काढून अद्वैत वेदान्त उपस्थित झाल्यावर मग धर्मविज्ञान आणखी पुढे जाऊ शकत नाही.

या तीनही वेदान्तांचा आशय विवेकानंद आणखी एका प्रसंगी वेगळयाच पद्धतीने सांगतात. ते म्हणतात, अद्वैत हे व्यवहारात आणले असता ते विशिष्टाद्वैताच्या भूमिकेवरुन कार्य करते. द्वैतवादाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे - लहान वर्तुळ मोठया वर्तुळाहून वेगळे आहे व त्याच्याशी फक्त भक्तीने जोडले गेले आहे. विशिष्टाद्वैताचा अर्थ आहे - लहान वर्तुळ मोठया ववर्तुळाच्या आत आहे व त्याची गती मोठया वर्तुळाने नियमित होत आहे. अद्वैतवादाचा अर्थ आहे - लहान वर्तुळ विस्तार पावून मोठया वर्तुळाशी एकरुप होऊन जाते.  स्वामीजींच्या या उदाहरणावरुन जीव - ब्रह्मविषयक तीनही संप्रदायांची कल्पना किती सोप्या रीतीने स्पष्ट होते!

वल्लभाचार्य व निंबार्काचार्य संप्रदायांचा विचार विवेकानंदांनी फारसा स्वतंत्रपणे केला असल्याचे दिसून येत नाही. पण उर्वरित तीनांबाबत बोलताना विवेकानंद म्हणतात, माझ्या अल्पमतीनुसार मी हया निष्कर्षाप्रत आलो आहे; की ही तीनही दर्शने परस्परविरोधी नाहीत. आपल्या षडदर्शनांच्या बाबतीत आपल्याला हे आढळते की त्यात महान सत्यांचा क्रमश: विकास झालेला आहे. त्यांचा प्रारंभ मंद स्वरांत होतो व त्यांची समाप्ती अद्वैतवेदान्ताच्या विजयभेरीने होत असते. तसेच या तीन दर्शनांत मानवी मन क्रमश: अधिकाधिक उच्च आदर्शाप्रत प्रगत होत जाते आणि शेवटी सर्व काही अद्वैतवादाच्या  त्या अदभूत एकत्वात विराम पावते. म्हणूनच ही तीनही दर्शने परस्परविरोधी नाहीत.

वेदान्त संप्रदायाविषयीची विवेकानंदांची ही समन्वयाची भूमिका लक्षात घेऊनच आपण यापुढची वाटचाल करणार आहोत.

क्रमश:

1 comment:

  1. वेदान्त विचार उदाहरणे देवून समजावते आहेस हे बरेच आहे... नाहीतर कठीणच होते सारे :)

    ReplyDelete