ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 29, 2013

१६५. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १२. ब्रह्म

भाग ११ 

सगुण आणि निर्गुण

विवेकानंदांचा ब्रह्मविषयक विचार जर सांगायचा झाला तर तो 'सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण अशा शब्दांत सांगता येईल. निर्गुण ब्रह्म विवेकानंदांना भयावह अथवा राक्षसी वाटत नाही. पण मानवी मनाला सगुण ब्रह्माची, ईश्वराची गरज आहे हेही ते जाणतात. या दोन्ही स्वरुपांना एकाच वेळी स्वीकारण्यात विवेकानंदांना कसलीही विसंगती, विरोधाभास वाटत नाही. कारण त्यांच्या मते हे दोन्ही शब्द म्हणजे एकाच अंतिम सत्याकडे पाहण्याचे दोन विभिन्न दृष्टिकोन होत. ज्याची जी गरज, त्याने तो मार्ग चालावा - यात भांडण्याचा प्रश्न येतोच कुठे?

एखाद्या व्यक्तीला तिचा मुलगा बाबा म्हणून हाक मारेल, तर भाची मामा म्हणेल. बाबा, मामा हे त्या व्यक्तीशी हाक मारणाराचे नाते दर्शवितात. ती व्यक्ती मात्र एकच असते. कोणी ब्रह्म सगुण आहे असे सांगेल तर कोणी म्हणेल की ब्रह्म निर्गुणच आहे असे म्हणेल. यामुळे आपण गडबडून गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण सगुण आणि निर्गुण हे दोन्ही शब्द अंतिम सत्तेशी त्या व्यक्तीचे असणारे नाते दाखवितात. सगुण आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे एकच असा अर्थातच या उदाहरणाचा अर्थ नाही. याचा सविस्तर उहापोह आपण यापुढच्या विवेचनात करणार आहोत.

ईश्वर

सगुण ब्रह्म म्हणजे विवेकानंदांचा ईश्वर. खरोखर देव आहे का? असा प्रश्न जर आपण विवेकानंदांना केला तर ते आपल्यावर रागावणार नाहीत. कारण कोणे एके काळी हाच प्रश्न घेऊन विवेकानंद भिरीभिरी हिंडले होते. आणि दक्षिणेश्वरचा तो पुजारी जेंव्हा  होय! मी तुला पाहतो त्याहून कैक पटींनी स्पष्टपणे ईश्वराला पाहतो”, असे म्हणाला; तेंव्हा अवाक् झाले होते.

आपली ईश्वरावर खरीखुरी श्रद्धा आहे का? - असा प्रश्न विवेकानंद आपल्याला आवेशाने विचारतात. रस्त्यावरील कोणत्याही माणसावर आपण विश्वास ठेवतो. जगातील कोणत्याही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो. पण ईश्वरावर मात्र आपला विश्वास नसतो अशी खंत विवेकानंद व्यक्त करतात. आपण तोंडाने ईश्वरावर विश्वास असल्याचे बोलतो. पण प्रत्यक्षात मात्र आपण त्या विश्वासाला जागून जगत नाही. म्हणजे आपला विश्वास हा उगाचच, केवळ शब्दांपुरता असतो. म्हणूनच विवेकानंद आपल्याला विचारतात, 'ईश्वरावर विश्वास असून त्याच्या प्राप्तीसाठी वेडे न होणे तुला शक्य आहे का? मला वाटते की स्वामीजींच्या या प्रश्नातील गर्भितार्थ आपल्याला आत्मपरीक्षणास उद्युक्त करेल.

रामकृष्णांना ईश्वराविषयी अवास्तव चर्चा करणे, वाद घालत बसणे आवडत नसे. ते म्हणत,  ''साक्षात्कार करुन घ्या. विवेकानंदांचेही तेच म्हणणे होते. कशाकरता आपण नुसतेच व्यर्थ बोलत राहायचे? विवेकानंद म्हणतात, आमचे ईश्वरत्व हेच खुद्द ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण होय. किती प्रगाढ वेदान्तनिष्ठा आहे ही! (हे वाक्य थोडे गोलांकारी आहे – म्हणजे आम्ही ईश्वर आहोत हे आधी मानायचे आणि मग त्यावरून ईश्वर आहे हे मानायचे! पण इथे तर्क बाजूला ठेवून भावनेतून बघितले तर या वाक्याचा अर्थ सोपा वाटतो – असे माझे मत!)

विवेकानंदांना सगुण ब्रह्म (ईश्वर) आणि निर्गुण  ब्रह्म यांचा एकाच वेळी स्वीकार करण्यात काहीच वावगे वाटत नाही. ब्रह्माच्या या दोन्ही संकल्पना एकमेकींना पूरक आहेत असे त्यांना वाटते. आता आपण ईश्वराच्या असितत्वाचे समर्थन त्यांनी कोणकोणत्या प्रकारे केले आहे ते पाहू.

प्रत्येकाला त्याने अथवा तिने इच्छा व्यक्त करताक्षणीच ईश्वरसाक्षात्कार होणे शक्य नाही ही व्यावहारिक अडचण विवेकानंद जाणतात. ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा देताना एखाद्याची डळमळीत झालेली श्रद्धा पुन्हा स्थिर व्हावी आणि माणसांनी ईश्वरसाक्षात्काराचा मार्ग चोखाळावा असाही त्यांचा एक सुप्त हेतू असावा. कदाचित त्यामुळेच 'ईश्वर अनिर्वचनीय आहे, त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणून भागणार नाही असे त्यांना वाटत असावे.

आपल्या अवतीभोवती जर आपण पाहिले तर भोवतालच्या जगात एक प्रकारचा नियमितपणा आढळून येतो. सृष्टीचे चक्र एका विशिष्ट त-हेने चाललेले आपण पाहतो. हे विश्व इतके विशाल आहे की साध्या मानवी शक्तीला त्याचे नियमन करता येणे अशक्य आहे. कोणी उच्च प्रकारचा देवच या जगावर नियंत्रण ठेवून असेल. तोच ईश्वर.

कार्यकारणभावाचा सिद्धान्त व्यवहारातही आपण मानतो. एखादी घटना घडली की 'ती याच प्रकारे का घडली असावी? असा विचार आपल्या मनात येतोच. जगत् हेही एक प्रकारचे कार्यच आहे. त्याचे कारण म्हणजेच ईश्वर.

वरवर दिसणा-या  विविधतेच्या अंतरंगात जर आपण डोकावून पाहिले तर आपल्याला एकतेचा प्रत्यय येतो. जगात किती विविध रंगांची, वर्णांची, वंशांची, रक्तांची, भाषा बोलणारी माणसे आहेत! पण या सर्वांमध्ये मनुष्यत्व नामक एक समान गोष्ट आहे. इतर वस्तू आणि माणसे यांच्यातही अस्तित्वाचे एक समान तत्त्व आहेच असे म्हणता येईल. जगात जे जे काही आहे ते एकाच शक्तीच्या वेगवेगळया स्पंदनांमुळे वेगवेगळे प्रतीत होते. ती एक सर्वव्यापी शक्ती म्हणजेच ईश्वर!

प्रेमातूनही विवेकानंद ईश्वरापर्यंत पोहोचतात. एक व्यक्ती दुस-या व्यक्तीवर का बरे प्रेम करते? कारण दुस-या व्यक्तीमध्ये प्रत्येक जण स्वत:लाच शोधत असतो. बहुतेक लोकांना आपल्यातील या सुप्त भावनेची जाणीव नसते हे खरेच! पण आपल्या सर्वांमध्ये समान असणारे ते सुप्त प्रेममय तत्त्व म्हणजेच ईश्वर.

ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विवेकानंद शब्दप्रामाण्याचाही आधार घेतात. हा आधार उपनिषदांचा आहे तसाच गीतेचाही आहे. अर्थात येथे एक समस्या अशी येते की सर्व हे सर्व प्राचीन ग्रंथ ईश्वरनिर्मित असल्याने आपण त्यांचे प्रामाण्य मानले पाहिजे असे आधी सांगितले जाते. आणि मग हे ग्रंथच ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करतात. म्हणजे 'अ चा आधार 'ब आणि 'ब चा आधार अशी स्थिती  निर्माण होते. पण या तार्किक विसंगतीकडे विवेकानंद साफ दुर्लक्ष करतात.

ईश्वर हा या जगाचा चित्रकार आहे अन हे जग म्हणजे त्याने काढलेले एक चित्र आहे अशी कल्पना विवेकानंद मांडतात. चित्रकार असल्याविना चित्र कोठून निर्माण होणार?  कवीशिवाय कविता जशी अशक्य तसेच हे जग ईश्वराविना अशक्यच आहे. या जगाच्या निर्मितीचे सारे श्रेय ईश्वराकडेच जाते.

ईश्वरसंकल्पनेची आवश्यकता हाही मुददा त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विवेकानंदांना पुरेसा वाटतो. मानवी जाणीवेच्या क्षेत्रात ज्याअर्थी ईश्वर नावाची संकल्पना आहे, त्या अर्थी ईश्वर आहेच असेही एक विधान विवेकानंद करतात.

आणि अनेक संतमहात्म्यांना झालेला ईश्वरसाक्षात्कार! तो तर ईश्वराच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा!! श्री. अमितकुमार मुजुमदार या संदर्भात असे लिहितात, Direct experience of God is the only positive proof of God’s existence, not only because other proofs leave a gap between the prover and the proved, but because religion is not a dogma with Hindus, but realization of potential divinity of man, since every man is potentially divine, or to put it in a different way, man and God – the Individual soul and the Universal soul are basically identical, no proof of God short of realization of this identity is of any value.

सगुण आणि निर्गुण या दोन्हीही संकल्पना माणसांच्या आध्यात्मिक विकासाला आवश्यक आहेत. किंबहुना मानवाचा आध्यात्मिकदृष्टया विकास व्हावा म्हणूनच सगुण ईश्वराची संकल्पना आली आहे. एका अर्थी पाहायला गेले तर सारे देव 'मानवनिर्मित आहेत. माणसांचा देव माणसासारखाच लढाया करतो, त्याला राग येतो आणि खुषीत असला की, तो समोरच्याला हवे ते तो उदारपणे देतो.

निर्गुण ब्रह्माची संकल्पनाच अतिशय सर्वोच्च आहे, श्रेष्ठ प्रतीची आहे, हे विवेकानंद स्पष्टपणे सांगतात. फक्त ईश्वराचीच म्हणजे सगुण ब्रह्माचीच कल्पना आपण मान्य केली तर त्यातून अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक आणि व्यावहारिक समस्या उदभवतात. सगुण ईश्वर हा अनंत कल्याणमय असतो, दयाळू असतो, सद्गुणांचे भांडार असतो. पण मग या त्याच्या जगात सारे काही चांगले कोठे आहे? सैतानी आणि पाशवी प्रवृत्ती आपल्या सभोवताली आहेतच. खून आहेत, दरोडे आहेत, अपघात आहेत, दंगली आहेत, घातपात आहेत, बलत्कार आहेत, युद्ध आहे .....................थोडक्यात काय तर हे जग म्हणजे चांगले आणि वाईट यांची एक सरमिसळ आहे!

आपण जर फक्त सगुण ईश्वराचेच अस्तित्व मानले तर त्याच्यातून वर उल्लेख केलेल्या सा-या  गोष्टी आपल्याला बाजूला कराव्या लागतील. कारण ईश्वर दयाळू आहे - तो क्रूर गोष्टी कशा करेल? मग आपल्याला चांगले आणि वाईट, शुभ आणि अशुभ अशा दोन्ही गोष्टींचे अस्तित्व एकाच वेळी मान्य करावे लागते. ईश्वर आणि सैतान यांची सत्ता एकाच वेळी मान्य करणे याचा अर्थ असा होतो की ईश्वराचे अस्तित्व , त्याची सत्ता मर्यादित आहे. मग त्याचे अनंतत्व, सर्वव्यापित्व नाहीसे होते. या समस्येची उकल करण्यासाठी सगुण ईश्वराच्या पलिकडे जाणे आवश्यक ठरते.

एकदा का आपण निर्गुण ब्रह्माची संकल्पना स्वीकारली की मग हा प्रश्न उरतच नाही. सर्वशक्तिमान  ईश्वर सैतानाला हाकलून का देवू शकत नाही किंवा त्याने सैतानाला कोठे हाकलून द्यावे अशा प्रकारचा वाद निर्गुण ब्रह्माच्या स्तरावर निर्माणच होऊ शकत नाही. कारण चांगले-वाईट हे सापेक्ष जगाच्या पातळीवरचे, व्यावहारिक पातळीवरचे असते. पारमार्थिक पातळीवरुन व्यावहारिक पातळीवरचे सत्य (आणि म्हणून सर्व काही) बाधित होते हे आपण शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेल्या सत्तात्रयाचा अभ्यास करताना सविस्तर पाहिले आहेच. निर्गुण  ब्रह्म स्वत: चांगले किंवा वाईट नसते तर ते त्या दोहोंच्याही पलिकडचे असते. ते त्रिगुणातीत असते.

हे सगळे ठीक आहे! पण सामान्य माणसाची भावनिक आणि आध्यात्मिक भूक भागवायला निर्गुण  ब्रह्म अगदीच निरुपयोगी आणि निकामी असते. माणसाने मग कशावर श्रद्धा ठेवायची असाच मूलभूत प्रश्न अशा परिस्थितीत समोर येतो. ब्रह्म केवळ निर्गुणच असेल तर माणसाने कोणाची प्रार्थना करायची? कोणाची भक्ती करायची? त्याने कोणाचे गुणवर्णन गायचे? कोणावर विश्वास ठेवायचा? कोणाला पाहायचे? ब्रह्म केवळ निर्गुणच असेल तर माणसाचे सारे भावविश्वच नाहीसे होऊन जाईल.

विवेकानंद म्हणतात, आपल्याला भगवंताचे दर्शन फक्त या मानवी रुपामधूनच होणे शक्य आहे. ते पुढे असेही म्हणतात की, आपण जोवर मनुष्य आहोत तोवर ईश्वरालाही मनुष्य समजण्यापेक्षा त्याच्यापेक्षा अन्य कोणतीही उच्च धारणा करणे आपल्याला शक्य नाही. ..................मानवी मन आणि बुद्धीला गोचर होऊ शकणारी निर्गुणाची सर्वोच्च धारणा सगुण ईश्वर हीच होय.

विवेकानंदांच्या मते एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. त्यात फक्त एखाद्या सर्वशक्तिमान स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुरपणा दिसून येतो. यावर उपाय काय? तर सगुण आणि निर्गुण दोन्हीही ब्रह्म मान्य करायचे! निगर्ुणाने सगुणाला बाधा येत नाही उलट निर्गुणामुळे सगुण समजायला सोपे जाते. स्वामीजी म्हणतात, निर्गुणाच्या धारणेमुळे सगुण धारणेचा नाश होईल असे मात्र नाही. निर्गुणाद्वाराच सगुणाचे यथार्थ आकलन होऊ शकते.

याचा अर्थ ईश्वर दोन आहेत असा नाही. अंतिम सत्ता एकच आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, निर्गुण आणि सगुण ब्रह्म म्हणजे पाणी आणि बर्फ यांच्यासारखे आहे. बर्फ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गोठलेले पाणीच असते आणि बर्फ वितळले की त्याचे पाणी होते. म्हणजे एकाच तत्त्वाच्या या दोन बाहयत: भिन्न अशा अभिव्यक्ती आहेत इतकेच!

ईश्वर सर्वव्यापी आहे. ईशावास्य उपनिषदात सांगितले आहेच की, 'ईशावास्यमिदम सर्वम - या सर्वामध्ये ईश्वराचा वास आहे. अर्थात या जाणीवेतून जगणे हे आपल्याला पहिल्या क्षणी जमणार नाही. पण क्रमाक्रमाने अथवा टप्प्याटप्प्याने आपण या सत्याचे आकलन करु शकतो. आपले कुटुंबीय, आपले शेजारी, आपले शहरवासी, आपले राज्य, आपला देश, आपले जग आणि आपले विश्व यांच्यात सर्वत्र आपण ईश्वर पाहू शकतो. पुढची पन्नास वर्षे हा देश म्हणजेच तुमचा ईश्वर. बाकी सा-या  देवतांकडे काही लक्ष देवू नका असे आवाहन स्वामीजी आपल्याला करतात तेंव्हा त्यामागे केवळ राष्ट्रवादाची भूमिका नसते तर ईश्वराच्या सर्वव्यापकत्वाची एक प्रखर जाणीवही असते.

विवेकानंदांचा ईश्वर मानवी स्वरुप् धारण करतो याबाबत आपल्याला काही आश्चर्य वाटायला नको. कारण वस्तुत: (प्रत्यक्षात नव्हे!) प्रत्येक माणूस ईश्वर नाही काय? सगुण ईश्वरामुळे मानवी मनाचे उत्थान होते आणि तोच त्याचा सर्वात मोठा फायदा आहे.

अर्थात सगुण ईश्वराच्या संकल्पनेचा भरपूर तोटाही या जगाने सोसला आहे म्हणा! मानवी मनाच्या पंथाभिमानाला धुमाकूळ घालायला सगुण ईश्वराचे एक चांगलेच निमित्त मिळाले आहे. माझाच देव किती चांगला, माझाच देव किती श्रेष्ठ यावरुन जो तो भांडत आहे. जगात सर्वात जास्त हिंसा आणि क्रौर्य हे ईश्वराचे नाव घेत, ईश्वरासाठीच झाले आहेत याची विवेकानंद आपल्याला आठवण करुन देतात. त्याउलट निर्गुण  ईश्वराच्या उपासकांत प्रचंड कर्मवीर, प्रचंड नीतिवीर उपजले आहेत. म्हणून निर्गुण  ब्रह्म हेच आपले ध्येय आहे.  सगुण ईश्वराचा आधार घेऊन अंतत: आपल्याला निर्गुण  ईश्वराप्रतच पोहोचायचे आहे याचा विसर पडता कामा नये. 

क्रमश: 

1 comment:

  1. हे सगळं खरंच इतकं सोप्पं अहे कि तू छान समजावलं आहेस माहिती नाही. पण बरोबर आहे....
    उदाहरणं पण छान आहेत, वाचताना त्यांच्याशी relate होता येतं.
    "सगुण ईश्वराचा आधार घेऊन अंतत: आपल्याला निर्गुण ईश्वराप्रतच पोहोचायचे आहे याचा विसर पडता कामा नये."
    हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं! कैकदा माणूस वाटेने चालता चालताच आपण कुठे जातोय तेच विसरतो....

    ReplyDelete